Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिवसेनेत पुन्हा फेरबदल

$
0
0

नाशिक संपर्कप्रमुखपदी भाऊसाहेब चौधरी; संघटनेत महिलांचाही टक्का वाढवला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेत फेरबदल सुरूच असून, आता आमदार अजय चौधरी यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदावरून हटवून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुक संजय राऊत यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे अजय चौधरींनीच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. तसेच, संघटनेत महिलांचा टक्का वाढावा, यासाठी ५४ महिलांची विविध पदांवर नियुक्त्या करीत नवी जबाबदारी टाकली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून शिवसेनेतील बंडाळी उफाळून आली आहे. नरेंद्र दराडेंच्या नावामुळे चर्चेनंतर उफाळलेल्या वादाने थेट महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनाच हटविण्यात आले. त्यांच्याऐ‌वजी महेश बडवे आणि सचिन मराठे यांच्याकडे महानगरप्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यानंतर शिवाजी सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येऊन अजय चौधरी यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. नाशिकचे संपर्कप्रमुखपद असताना नाशिकमधील नियुक्त्यांमध्ये चौधरींना डावलण्यात आले होते. त्यामुळे चौधरी नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी नाशिकला येऊन माझ्या बदलाची वाट पाहू नका, असे सांगत गटबाजी करणाऱ्यांना खडसावले होते. त्यामुळे चौधरी कायम राहतील, अशी चर्चा होती. परंतु, चौधरींनी जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती ठाकरेंकडे केल्यानंतर त्यांनाही तडकाफडकी बदलण्यात आले आहे. अजय चौधरी यांच्याकडील नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे चौधरींकडे आता दिंडोरीसह नाशिकचाही पदभार असणार आहे. चौधरींच्या या नियुक्तीने नाशिकवर पूर्णपणे आता राऊत गटाचे वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

महिलांचा टक्का वाढला

महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यात ५४ महिलांना संघटनेत काम करण्याची संधी देत नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. शामला दीक्षित यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैशाली राठोड यांच्याकडे महानगर संघटक (महापालिका) म्हणून काम दिले आहे. ज्योती देवरे - पंचवटी, अश्विनी रेडेकर - मध्य, अनिता पाटील - पश्चिम, रेणुका वंजारी - नाशिक पूर्व असे मतदारसंघनिहाय संघटकपदाचे काम सोपविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापारी, उद्योजक संतप्त

$
0
0

महापालिकेची थकीत एलबीटी भरण्यासाठी नोटीस;

व्यापारी-उद्योजक तीव्र लढा उभारणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने थकीत एलबीटीबाबत मोहीम उघडून दोन हजारांहून अधिक व्यापारी व उद्योजकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे व्यापारी व उद्योजकांमध्ये प्रचंड संताप आहे. या नोटीसला विरोध करण्यासाठी उद्योजक संघटना व व्यापारी संघटना एकत्र आल्या असून, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी आयमा रिक्रिएशन सेंटर येथे बैठक झाली. त्यात महापालिकेच्या कारवाईविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेने पाठवलेल्या या नोटीसमध्ये उद्योजक, व्यापारी यांना एलबीटी तत्काळ भरण्याचे निर्देश दिले आहेत. अशा नोटिसा टप्याटप्याने ३५ हजार उद्योजक, व्यापारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. ज्यांची एलबीटी वसुलीबाबत निर्धारणा झालेली आहे, अशा उद्योजक, व्यापाऱ्यांनाही पुनर्निर्धारणेविषयी नोटिसा परत पाठविण्यात आल्या आहेत. त्या असेसमेंटमध्ये अनेक चुका असून, मोठ्या प्रमाणात व्याज आणि कराची मागणी करण्यात आलेली आहे. एलबीटी पूर्ण संपुष्टात आलेला असताना अशाप्रकारे उद्योजकांना त्रास दिला जात आहे. मनपाच्या आयुक्तांना संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला वेळ नाही तसेच, पूर्ण पैसे भरल्याशिवाय अपिलात जाता येत नाही. यामुळे उद्योजक, व्यापाऱ्यांची फसगत होत असल्याचा सूर या बैठकीत होता.

याप्रसंगी आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, लघु उद्योग भारतीचे संजय महाजन, टॅक्स प्रॅक्टिसर्नस असोसिएशनचे अनिल चव्हाण, मनपा एलबीटी ॲन्ड कर सल्लागार प्रदीप क्षत्रिय, आयमाचे सरचिटणीस निखिल पांचाल, उपाध्यक्ष हिमांशु कनानी, खजिनदार ललित बूब, प्रकाश ब्राह्मणकर, राजेंद्र बकरे हे उपस्थित होते.

व्यापारी-उद्योजक एकत्र

या बैठकीत एलबीटी नोटीसबाबत सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली. शासनाने या एलबीटीबाबत केलेली मागणी व चौकशी अन्यायकारक असून, त्याची झळ सामान्य नागरिक ते उद्योजक, व्यापारी अशा सर्वांनाच सोसावी लागणार आहे. कामकाजाचे दप्तर महापालिकेत नेणे उद्योजक व्यापारीवर्गास अशक्य ठरणार आहे. यामुळे औद्योगिक व्यापारी, उद्योजक सर्वच त्रस्त झाले आहेत. अशात झालेल्या या घरपट्टीवाढीमुळे उद्योजक, व्यापाऱ्यांना मोठ्या संकटास सामोरे जावे लागणार आहे. घरपट्टीवाढ व एलबीटी नोटिसा या सर्वांसाठी अन्यायकारक असून, याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्वांनी या विरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील पाच न्यायाधीशांच्या बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल एस. बी. अग्रवाल यांनी राज्यातील १७२ जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील पाच जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा समावेश आहे. तसेच धर्मादाय सह आयुक्तालयातील काही बदल्या आहेत.

अहमदनगरमधील सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावणारे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांची चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे बदली करण्यात आली आहे. तर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात बदलून आलेल्या न्यायाधीशांमध्ये एस. सी. खाती मुंबई (दिंडोशी) येथून नाशिक, आर. एच. मोहम्मद पुणे येथून नाशिक (मालेगाव) आर. जी. वाघमारे अकोला येथून नाशिक (निफाड) एस. एस. नायर औरंगाबाद येथून नाशिक, पी. आर. देशमुख सोलापूर (पंढरपूर) येथून नाशिकला आले आहेत. यात प्रभारी धर्मादाय उपआयुक्त वैशाली पंडित यांची नागपूरला तर सहायक धर्मादाय आयुक्त दीप्ती कोळपकर यांची वाशी येथे बदली करण्यात आली आहे. राज्यातील सर्व न्यायालये ४ जून रोजी सुरू होणार असून बदली झालेल्या न्यायाधीशांना ४ जून रोजी हजर व्हावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वसाधारण सभेत पाणीर्टचाईच्या झळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक पंचायत समितीची सर्वसाधारण सभा सोमनाथ नगरच्या पाणी टंचाईच्या वादळी चर्चेने गाजली. तसेच पेसा निधीचा वापर केवळ बांधकामासाठी करायचा नसून, कुपोषणाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीही करा, असे खडेबोल उपसभापती रवींद्र भोये यांनी प्रशासनाला सुनावले. या दोन्ही विषयांमुळे त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची सभेत वातावरण तापले होते.

सभापती ज्योती राऊत यांच्या अध्यक्षते खाली ही सभा झाली. उपसभापती भोये, सदस्य मोतीराम दिवे, अलका झोले, मनाबाई भस्मे, देवराम मौळे, जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाणी टंचाईचा पश्न गंभीर होत असताना प्रशासन मात्र त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने सभेत गरमागरम चर्चा झाली. रुपांजली माळेकर यांनी सोमनाथ नगरचा पाणीप्रश्न लावून धरला. तालुक्यात टंचाईच्या झळा असताना   शासन दरबारी सामसूम असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त झाली. सोमनाथ नगर येथेच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याचे या सभेतील चर्चेतून उघड झाले. याबाबत गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी प्रत्येक गावाचे सरपंच, ग्रामसेवक तलाठी यांची संयुक्त बैठक बोलावणार असल्याचे जाहीर केले.

त्र्यंबक तालुक्याची निर्मिती होऊन २० वर्ष झाली. मात्र अद्याप पंचायत समिती कार्यालयास स्वत:ची इमारत नाही. सन १९६८ च्या दरम्यान बांधलेल्या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत सर्व कारभार सुरू आहे. पावसाळ्यात या दगडी बांधकामाची इमारत कोसळून अपघाताची शक्यता आहे. स्वछता गृहाची अडचण आणि झालेली दुरवस्था मांडण्यात आली. कार्यालय दुरुस्तीचा ठराव करण्यात आल्याची आपणास माहिती नाही असे सभापती राऊत यांनी सांगितले. कार्यालय दुरुस्तीचा   तांत्रिक निर्णय अद्याप घेतलेला नसल्याने सदस्य संतप्त झाले. याकरिता  दहा  लाख रुपये तरतूद करण्याचे ठरले असताना यावर मतभेद दिसून आले. सदस्यांनी निधी खर्च करावा यावर   दोन सदस्यांनी विरोध दर्शविला. तर गटविकास अधिकारी दिशाभूल करतात असा आरोप भोये यांनी केला. सहा सदस्यांच्या सभागृहात  फूट पडल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा फोटो

‘जीएसटी’वर रंगणार २६ रोजी ‘मटा संवाद’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात जीएसटी लागू होऊन साडेनऊ महिन्यांचा काळ उलटला असला, तरी या करपद्धतीबाबत आजही अनेकांचा गोंधळ कायम आहे. सामान्य ग्राहकांचा या बदलामुळे मोठा गोंधळ होतो. त्यातच अनेकांची फसवणूक व जास्त पैसे घेतले जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे ही करपद्धत काय आहे, त्यासाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यायला हवी, याची संपूर्ण माहिती 'जीएसटी'चे उपायुक्त संजय पोखरकर हे दि. २६ एप्रिल रोजी 'मटा संवाद' या कार्यक्रमातून देणार आहेत.

देशभरात दि. १ जुलैपासून जीएसटी लागू झाला व त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यात काही वस्तू कोणत्याही करपद्धतीत नव्हत्या, त्या जीएसटीअंतर्गत आल्यामुळे त्यांच्या किमती काही प्रमाणात वाढल्या. पण, काही वस्तूंच्या किमती कमी झाल्या. याबद्दल मात्र सर्वसामान्य ग्राहकांना फारसे समजले नाही. त्यामुळे वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत उपायुक्त पोखरकर मार्गदर्शन करणार आहेत. सातपूर येथील आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या निमा हाउसमध्ये सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जीएसटीत झालेले बदल व्यापारी, उद्योजकांचाही गोंधळ उडवणारे ठरले. त्यामुळे सुरुवातीला नेमके किती पैसे ग्राहकांकडून घ्यावेत याबद्दलची माहिती त्यांच्याकडे नव्हती. या गोंधळचा गैरफायदा काहींनी घेतला. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली. आता बऱ्याच प्रमाणात या करपद्धतीचे दर स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहणे गरजेचे आहे. पण, असे सजग राहण्यासाठी काय करायला हवे, याबद्दल पोखरकर बोलणार आहेत. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवरही ते संवाद साधणार आहेत.

--

शंकांचेही निरसन

'जीएसटी'चे अधिकारी प्रथम त्यांचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर उपस्थितांच्या शंकांचेही ते निरसन करणार आहेत. जीएसटीसंदर्भात शंकानिवारणासाठी उपलब्ध असलेल्या विविध व्यासपीठांबाबतही यावेळी अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी या उपक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(जीएसटी लोगो घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंथेटिक ट्रॅकवर ओळखपत्र सक्तीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर सराव करण्यासाठी यापुढे ओळखपत्र सक्तीचे करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांनी दिली.

सिंथेटिक ट्रॅकच्या नुकसानीबाबत 'मटा'मध्ये सोमवारी 'सिंथेटिक ट्रॅकची धूळधाण' या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची तातडीने दखल घेत क्रीडा उपसंचालकांनी हे आदेश दिले आहेत.

नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात राज्य सरकारतर्फे सहा कोटी रुपये खर्च करून सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. मात्र, या ट्रॅकचा वापर खेळाडूंना होण्याऐवजी या परिसरातील नागरिकांनाच जास्त होऊ लागला. या ठिकाणी सकाळ-सायंकाळ जॉगिंगसाठी गर्दी होत आहे. शहरातील खेळाडूंनी याबाबत विभागीय क्रीडा उपसंचालकांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर ठोस निर्णय झाला नाही. या ठिकाणी नागरिक गर्दी करीत असल्याने खेळाडूंना सराव करताना अडथळा येत होता. संपूर्ण विभागात हा एकमेव ट्रॅक असल्याने याची जपणूक व्हायला पाहिजे, अशी खेळाडूंची भावना आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या ट्रॅकच्या देखभाल-सुरक्षेबाबत नाराजीचा सूर होता. मध्यंतरी परिसरातील ट‌वाळखोरांनी खेळाडूंना धमकावण्याचे प्रकारदेखील केले होते. महिला खेळाडूंनाही धमक्या दिल्या होत्या. त्यावेळी या ठिकाणी सुरक्षारक्षक नोमण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. आता 'मटा'च्या वृत्ताची दखल क्रीडा उपसंचालकांनी घेतली असून, या ठिकाणी जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांचे समुपदेशन करून त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, तसेच येथे सुरक्षारक्षकही नेमण्यात येणार असून, खेळाडूंना विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सहीने ओळखपत्र दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.

--

'मटा'तील वृत्तानंतर सिंथेटिक ट्रॅकबाबत तातडीने बैठक घेण्यात आली. या ठिकाणी लवकरच सुरक्षारक्ष नेमण्यात येणार असून, खेळाडूंना ओळखपत्रदेखील देण्यात येईल. ज्यांच्याकडे ओळखपत्र असेल, असेच खेळाडू या ट्रॅकवर प्रवेश करू शकणार आहेत.

-जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक, नाशिक विभाग

--

लोगो : म. टा. इम्पॅक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

$
0
0

गंगापूर रोडवरील भाजी विक्रेत्यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडच्या आकाशवाणी केंद्राजवळ सुरू असलेल्या भाजी विक्रेत्यांच्या उपोषणासाठी टाकलेला मंडप महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केला असून पर्यायी जागेत जाऊन व्यवसाय करावा; अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. बाजाराच्या आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा असूनही महापालिका आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप येथील विक्रेत्यांनी केला आहे.

आकाशवाणी केंद्राजवळ होणाऱ्या विकास कामात भाजी विक्रेते आडकाठी आणत असून त्यांनी दिलेल्या पर्यायी जागेत सथलांतरीत व्हावे, असा आशयाची नोटीस महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी येथील विक्रेत्यांना दिली. नोटीस सायंकाळी मिळाल्यानंतर यावर सोमवारी वकिलांचा सल्ला घेऊन उत्तर देण्यात येणार होते. परंतु, महापालिकेने सकाळीच आपला लवाजमा आणून पोलिस बंदोबस्तात उपोषणकर्त्यांचे साहित्य जप्त केले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलक ज्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी टाकण्यात आलेला मंडप महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून टाकला. तसेच उपोषणासाठी आणण्यात आलेल्या गाद्या जप्त केल्या. तसेच इतरही काही साहित्य जप्त करण्यात आले. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या पर्यायी जागेत जाऊन व्यवसाय करावा; अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. भाजी विक्रेत्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरुच असून जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असा निर्धार येथील विक्रेत्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघ कॉलेजला संशोधनासाठी दीड कोटींचे अनुदान

$
0
0

शुभवार्ता

००००००००

देशभरातील १०४ पैकी मोजक्या सात प्रस्तावांना मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंधन तुटवड्याच्या समस्येवर पर्याय शोधण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 'नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन २०२०' ही योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत देशभरातील १०४ पैकी ७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामध्ये के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज व अंबड एमआयडीसीतील पनवा इंजिनीअरिंग प्रा. लि. यांनी सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. या प्रकल्पास सरकारने दीड कोटींचे अनुदान जाहीर केले आहे.

'नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन २०२०' या योजनेंतर्गत इलेक्ट्रिक-हायब्रीड वाहनांची निर्मिती करणे, बॅटरी तंत्रज्ञान विकसित करणे, इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी व्यवस्थापन, बॅटरी चार्जिंग आणि सध्याच्या वाहनांमध्ये हायब्रीड किट बसविणे यासारख्या प्रयोगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजने पनवा इंजिनीअरिंग प्रा. लि. यांच्यासोबत अवजड वाहनांच्या चार्जिंग स्टेशनच्या निर्मितीसाठी प्रकल्प प्रस्ताव सादर केला होता. अनेक बैठकी व सादरीकरणानंतर त्यांच्या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे.

'इलेक्ट्रिक बससाठी डी. सी. चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करणे' या शीर्षकांतर्गत हा प्रकल्प सादर केला गेला. वाघ कॉलेजमधील प्रा. डॉ. सुनीता पाटील (उगले) व प्रा. डॉ. दिनेश चांदवडकर तसेच पनवा इंजिनीअरिंगमधील अजिंक्य जोशी व सुरेश जोशी या प्रकल्पाचे संशोधक म्हणून काम बघणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व त्यासाठी लागणाऱ्या डी. सी. चार्जरची निर्मिती करताना भारतीय तंत्रज्ञांना विविध आव्हानांना (चार्जिंग कालावधी, बॅटरी व्यवस्थापन) तोंड द्यावे लागत आहे. बॅटरीचा प्रकार व क्षमता तसेच किंमत, चार्जिंग स्पीड आणि रेंज या सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय वातावरणाला अनुकूल असे तंत्रज्ञान (वाहन, बॅटरी, इलेक्ट्रिक मोटर आणि चार्जर) विकसित करणे हा भारत सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रकल्प प्रस्ताव मागविले होते. त्याला प्रतिसाद म्हणून भारतातील प्रतिष्ठित आयआयटी, एनआयटी, अशा संस्थांनी व बॉश, महिंद्रा, टाटा मोटर्स अशा नामांकित कंपन्यांनी प्रकल्प प्रस्ताव सादर केले. या यशाबद्दल प्रकल्प संशोधकांचे वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त चांगदेवराव होळकर, अशोक मर्चन्ट, समीर वाघ, प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर व सचिव के. एस. बंदी यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पिच्छा सोडेना!

$
0
0

बागलाण, निफाडमध्ये पाऊस; शेतकरी हवालदिल

टीम मटा

गत दोन दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर उकाडा आणि सायंकाळी पावसाचे वातावरण होत आहे. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. मंगळवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह सटाणा, निफाड भागात काही ठिकाणी पाऊस झाला. येवला, सिन्नर तालुक्यातही पावसाचे वातारण होते

बागलाणला पुन्हा फटका

सटाणा : बागलाण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सटाणा शहरवासीयांना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास वातावरणात आलेल्या गारव्याने सुखद धक्का दिला. थोड्याच वेळात सोसाट्याच्या वारा सुटल्याने ज्यांच्या शेतमाल बाहेर होता त्या शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला. दुपारी साडे तीनच्या सुमारास तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह नामपूर, दोधेश्वर, कोटबेल जोरण, किकवारी, तळवाडे दिगर आदी भागात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा खांडणीला मोठा पटका बसला आहे. मात्र पावसानंतर काही मिनिटातच ताबडतोब कडकडीत उन्हाचे चटके बसू लागले.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सटाणा शहरात सोसाट्याचा वारा व ढगांचा गडगडाट होवून वातावरणात बदल झाला. दुपारी पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर तालुक्यातील काही भागात हलक्या व तुरळक सरी पडल्या. मात्र अर्धा तासांच वातावरणात पुन्हा पूर्ववत होवून कडकडीत ऊन पडले. तालुक्यातील जोरण, किकवारी, तळवाडे दिगर, नामपूर, दोधेश्वर, कोटबेल या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सोमोरे जावे लागणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी सावरत असतांनाच मंगळवारी पुन्हा अवकाळी सरींनी कोसळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

गोदाकाठावर हलक्या सरी

निफाड : मंगळवारी वातावरणात प्रचंड उष्मा होता. दुपारी चारच्या दरम्यान ढगाळ वातावरण झाले. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसर, पश्चिम भागात वादळवाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. चितेगाव ते पिंपळस या नाशिक महामार्गावर मात्र जोरदार पाऊस झाला. वादळवारा असल्यामुळे महामार्गावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तालुक्यात दुपारी चारच्या दरम्यान खेरवाडी, चांदोरी, सोनगाव, भेंडाळी, सायखेडा या गावांच्या परिसरात हलका तर काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला. तर नैताळे, उगाव, निफाड, विंचुर, पिंपळगाव, ओझर या गावांच्या परिसरात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी वादळवारा सुरू होता. बहुतांश द्राक्ष बागांचे खुडे आटोपले असून, अपवादात्मक ठिकाणी द्राक्षाचे खुडे सुरू आहेत. तर काही भागात गहू काढण्याचे कामही शेतांमध्ये सुरू आहे. उन्हाळ कांदा काढणीचे कामेही यामुळे खोळंबली. पावसाचा संभाव्य अंदाज घेऊन कांदे झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिक कागद टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

येवल्यात ढगाळ वातावरण

येवला : तोंडचे पाणी पळविणाऱ्या यंदाच्या कडक उन्हाळ्याने सर्वांनाच हैराण केले असताना गेल्या दोन दिवसांतील अवकाळीसदृश्य ढगाळी वातावरणाने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. सोमवारी सायंकाळी तालुक्यात अवकाळीचे काहीसे थेंब पडतानाच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दुपारी तालुक्यात ढगाळी वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा निर्माण होताना घामाघूम करणाऱ्या दमट वातावरणाने तालुकावासीयांना असह्य केले होते. दुपारी चार नंतर तळपता सूर्य अधूनमधून ढगाआड लपला गेल्याने तालुक्यात अवकाळी पावसाच्या छटा दिसत होत्या. मात्र, दोन तासानंतर हे वातावरण निवळले. दरम्यान, गेल्या दोन दिवसात निर्माण झालेल्या या पावसाळी वातावरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा काढणीला आला आहे. काही शेतकऱ्यांकडून शेतातील उन्हाळ कांदा काढून तो चाळीत साठविण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दीच्या वादामुळे मृतदेह ५ तास रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बेकायदेशीर वाहतूक, चोरटी वाहतूकप्रसंगी किंवा दंडात्मक कारवाईचा मुद्दा असल्यास नेहमी 'कर्तव्यदक्ष' असणाऱ्या पोलिसांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघाताबाबत हद्दीचा वाद पुढे करून महिलेच्या मृतदेहाला तब्बल पाच तास हात लावला नाही. त्र्यंबक आणि मोखाडा पोलिसांच्या या कृत्यामुळे मयत महिलेच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.

त्र्यंबकपासून जव्हार रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर तोरंगण घाटात त्र्यंबक पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची हद्द संपते. नाशिक ग्रामीण पोलिस हद्द संपते आणि पालघर ग्रामीण पोलिसांची हद्द सुरू होते. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाजारात खेळणी विक्री करणारे व्यावसायीक टेम्पोने नाशिककडे येत असताना तोरंगण घाटातील एका अवघड वळणावर भांगेदेव येथे टेम्पो पलटून दरीत कोसळला. अपघात झाला तेथे त्र्यंबक आणि मोखाडा पोलिसांच्या हद्दीची सीमा आहे. याबाबत त्र्यंबक आणि मोखाडा पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून त्र्यंबक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. भागवत लोंढे, डॉ. नायडू यांनी आठ जखमींवर उपचार केले. मात्र या अपघातात नाशिकमधील वडाळा गाव येथील महिला चंद्रभागा ठाकरे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. मोखाडा पोलिसांनी मात्र ही घटना आमच्या हद्दीतील नाही असे सांगून अपघात ठिकाणापासून काढता पाय घेतला. दरम्यान, त्र्यंबक पोलिसांनीही आपण अपघातग्रस्तांना येथे आणले. परंतु अपघातस्थळ मोखाडा हद्दीत येते म्हणून मृतदेहाचा पंचनामा त्यांनीच करावा, अशी भूमिका घेतली. हद्दीच्या या वादात तब्बल पाच तास गेले. त्यानंतर रात्री बारा वाजता नाशिक जिल्हा रुग्णालयात त्या महिलेचा मृतदेह आणून तेथे पंचनाम करण्यात आला. पोलिसांच्या हद्दवादामुळे मृत महिलेच्या नोतवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. नातेवाईकांनी त्रागा केल्यानंतर रात्री उशिरा मोखाडा पोलिसांनी घटना त्यांच्या हद्दीतील असल्याचे मान्य करून गुन्हा नोंदवला. तसेच अपघातातील वाहन देखील ते घेऊन गेले.

...तेव्हा धावत येतात पोलिस

या घाटात सतत अपघात होत असतात. याआधी अनेकदा दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या वाहनांचाही अपघात झाला आहे. तेव्हा मात्र मोखाडा पोलिस तातडीने धाव घेतात. मग एका महिलेचा मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी हद्दीचा मुद्दा पुढे करून मोखाडा पोलिसांनी माणुसकीची लक्तरे वेशीला टांगली, अशा प्रकारचे मेसेज मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धनगरचे वळण जीवघेणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वररोडला लागूनच असलेल्या समृद्धनगर येथील रस्त्याचे वळण अपघातांचे केंद्र बनले आहे. सोमवारी रात्री महिंद्रा कंपनीत यंत्रे घेऊन जाणारा आयशर टेम्पो येथे उलटल्याने मोठा अपघात घडला. परंतु, रस्त्यावर दुसरे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. वारंवार अपघात होत असलेल्या समृद्धनगरच्या वळणावर त्वरित गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

समृद्धनगर, अशोकनगर, कार्बन नाका, शिवाजीनगर ते थेट बारदान फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रोजच वाहनांची मोठी वर्दळ असते. महिंद्र कंपनीचे मटेरिअल गेट नेमके याच रोडवर असल्याने वाहनांची मोठी गर्दी होते. अगोदरच दुभाजकांविना असलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करून वाहने चालवावी लागतात. त्यातच त्र्यंबकेश्वररोडला लागून असलेल्या समृद्धनगर येथील रस्त्याचे वळण अपघातांचे केंद्रच बनले आहे. त्र्यंबकरोडवरून येथे वळण घेताना वाहनचालकांची नेहमीच तारांबळ उडते. महापालिका व पोलिस प्रशासनाकडे वेळोवेळी मागणीकरूनदेखील दुभाजक व गतिरोधक टाकण्यात येत नसल्याने अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, सोमवारीचा अपघातही त्याचमुळे घडल्याचेही सांगितले जात आहे. आयशर टेम्पोतून महिंद्र कंपनीची यंत्रे पडल्याने मोठा आवाज झाला होता. त्यामुळे समृद्धनगरमधील रहिवासी धास्तावले होते.

सातपूर भागात अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास लॉजेस्टिक कंपनीचा कंटेनर बॉश (मायको) कंपनीसमोर चालकाने उभा केला. कंटेनर बंद न करता न्यूट्रल ठेवत चालक पत्ता विचारण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गेला होता. उतार असल्याने कंटेनर अचानक पुढील दुचाकींना चिरडत निघाला. घाबरलेल्या कंटेनरचालकाने केबिनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता पाय घसरून त्याचा कंटेनरच्या चाकाखालीच मृत्यू झाल्याची घटना घडली. असे अपघात वारंवार होत आहेत. मात्र, याप्रश्नी महापालिका व पोलिस प्रशासन लक्ष देत नसल्याने अपघातांचा रोजच सामना करण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे. त्यामुळे किमान गरजेच्या ठिकाणी तरी गतिरोधक टाकावेत, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.

समृद्धनगरच्या वळणावर रोजच अपघात होत असल्याने येथे, तसेच परिसरात आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज आहे. मात्र, पोलिस प्रशासन व महापालिका याकडे लक्ष देत नसल्याने अपघात वाढले आहेत. त्यामुळे तातडीने उपाय योजावेत.

-सुभाष गुंबाडे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांची अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरातील धोंडीरोड भागात गेल्या ४० वर्षांपासून लष्कराच्या जागेवर अतिक्रमण करून उभारलेल्या घरांवर मंगळवारी जेसीबी चालविण्यात आला.

येथे राहणाऱ्या नागरिकांना लष्कराने घरे असलेली संबंधित जागा मोकळी करावी, अशी सूचना दिली होती. त्यावर संबंधित घरमालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या रहिवाशांकडे जागेचा कोणताही पुरावा नसल्याने अखेर न्यायालयाने लष्कराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर लष्कराच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकास पाचरण करीत स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात चार घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले.

कॅम्प परिसरातील धोंडीरोडवरील खंडोबा टेकडीच्या मागील पोल्ट्री फार्मजवळील लष्कराच्या जागेत तुकाराम शंकर बोडके, भास्कर सुधाकर वाघमारे, सुरेश दामू निकम, श्रीमती लक्ष्मीबाई शर्मा यांच्यासह काही नागरिक गेली ४० वर्षे अनधिकृतरीत्या राहत होते. येथील अतिक्रमण हटविण्याबाबत लष्कराने संबंधितांना सूचना देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान लष्करातील अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येथील अतिक्रमण नाशिक महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमीनदोस्त करण्यात आले. सोळा कर्मचारी, तीन वाहने, तसेच देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांच्यासह ५० पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी स्वत:हून घरांतील साहित्य काढून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना उन्हाचा चटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एप्रिलच्या मध्यावर उन्हाचा कडाका वाढला असून मंगळवारी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वातावरणातील आर्द्रतेमध्ये होत असलेले कमी जास्त प्रमाण तापमानात वाढीस कारणीभूत ठरत असून नाशिककरांना तीव्र उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. मंगळवारी दुपारपर्यंत कडक ऊन व त्यानंतर ढगाळ वातावरण शहरात होते.

राज्यभरात बुधवारी (दि. १८) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. याचा अनुभव शहरात मंगळवार दुपारनंतर आला; परंतु त्यामुळे नाशिककरांची उकाड्यापासून मुक्तता झाली नाही. वातावरणातील आर्द्रतेच्या बदलत्या प्रमाणामुळे उन्हाचा तीव्र चटका जाणवत असून घामाने नाशिककर पुरते हैराण झाल्याचे चित्र शहरात होते. दुपारी साधारणपणे ३ वाजेपर्यंत कडाक्याचे ऊन असल्याने अनेकांनी कामाशिवाय घराबाहेर जाणेही टाळले. शहरवासीय सिग्नल लागल्यावरही सिग्नल सुटेपर्यंत झाडांचा आसरा घेत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. या परिस्थितीपासून ढगाळ वातावरणात सुटका मिळेल, ही अपेक्षाही फोल ठरली असून दमट वातावरणामुळे उकाड्याची तीव्र अधिक जाणवत होती. दरम्यान, यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असा अंदाज वर्तवला जात आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाची पहिली सर येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत असून त्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून यंदा लवकर सुटका होणार आहे.

आठवडाभरातील तापमान

दिनांक........कमाल....किमान....आर्द्रता (टक्के)

१७ एप्रिल....४०.२....२४.८ ........५८

१६ एप्रिल....३८.५....२२.३........५४

१५ एप्रिल....३८.७....२१.६........५४

१४ एप्रिल....३७.६....२०.४........४७

१३ एप्रिल....३८.१....१८.१........५०

१२ एप्रिल....३६.५....१९.८........६२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना करदिलासा नाहीच

$
0
0

मुख्यमंत्र्यांनी आमदारांना टोलवले

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी लागू केलेल्या तुघलकी करवाढीच्या विरोधात नाशिकचे वातावरण तापले असतांनाच, भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनी मंगळवारी (दि. १७) मुंबई गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी आयुक्तांनी केलेल्या करवाढीतून नाशिककरांना दिलासा देण्याची मागणी आमदारांच्या वतीने झाली. परंतु, मुख्यमंत्र्यानी थेट दिलासा देण्याऐवजी आमदारांनाच टोलवले आहे.

शेतकरी आणि जनतेच्या भावना ऐकण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये येतील. त्यानंतर शेतकरी, नागरिकांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या आमदारांना रिकाम्या हाताने परत यावे लागले आहे.

तुकाराम मुंढेंनी लागू केलेल्या करवाढीवरून शहरातील शेतकरी, नागरिक, औद्योगिक, व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे. या करवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणार असून, शेतकरीही भरडला जाणार आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शहरात या करवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह भाजपच्या तीनपैकी दोन आमदारांनी या करवाढीविरोधात थेट भूमिका घेत, रस्त्यावर उतरले आहेत.

परिस्थितीची जाणीव करून दिली

विशेष म्हणजे, महापौर रंजना भानसी यांनीही आता जनतेसोबत राहत रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. या करवाढीविरोधात जनतेची भावना तीव्र होत असल्याचे लक्षात घेऊन आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, भाजपचे पदाधिकारी महेश हिरे यांनी मंगळवारी तातडीने मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना शहरात करवाढीवरून उसळलेल्या आगडोंबची जाणीव करून दिली आहे. आयुक्तांनी शहरातील इंचइंच जागेवर कर लावण्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. शेतजमिनीवरही कर लावून शेतकऱ्यांनाही उद्ध्वस्त केले जात आहे. त्यामुळे ही करवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

करवाढीचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात

मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बाजू ऐकून घेत, थेट दिलासा देण्याऐवजी करवाढीचा चेंडू पालकमंत्री गिरीश महाजनांकडे टोलवला आहे. वाढलेल्या करासंदर्भात पालकमंत्री महाजन हे आठ दिवसांत नाशिकमध्ये येऊन शेतकरी, औद्योगिक संघटना, शैक्षणिक संघटना, नागरिकांच्या संघटनांसोबत चर्चा करतील. त्यानंतर महाजन हे आयुक्तांसोबतही चर्चा करून करवाढीसंदर्भात योग्य तो निर्णय घेतील असे त्यांनी सांगत आमदारांना टोलवले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारात थेट दिलासा देता आला असता. परंतु, मुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्याऐवजी पालकमंत्र्याच्या कोर्टात चेंडू टोलवल्याने करवाढीसंदर्भात भाजपकडूनच वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भाजप विरोधातील असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दशक्रियेला जीवन संजीवनीची प्रात्यक्षिके

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक - थोरले दोन भाऊ अकाली हरपण्याचा धक्का कुणासाठीही मोठाच. यातून सावरणेही कठीण. मात्र आपल्या कुटुंबावर अपघाताने ओढवलेली अशी वेळ अन्य कुणावरही येऊ नये ही जाणीव जपत मोहाडीतील एका धाकट्या भावाने अनोख्या पद्धतीने आपल्या थोरल्या भावांना आदरांजली अर्पण केली. भावाच्या दशक्रियेला जीवन संजीवनी (बेसिक लाइफ सपोर्ट) मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे याचे प्रात्यक्षिकच भूलतज्ज्ञांच्या मदतीने स्नेहीजणांना दाखविले. या अभिनव उपक्रमाद्वारे कळमकर कुटुंबीय आणि मोहाडी गावाने आदर्श घालून दिला आहे.

'जातस्य ही ध्रुवो मृत्यू' हा सिद्धांत अटळ आहे. जो जन्मला त्याला मृत्यू आहेच, हा त्याचा मथितार्थ. भगवतगीतेमधील हा विचार तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने शंभर टक्के बरोबर असला तरी जीवाभावाची व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली की चुटपूट लागतेच. अशावेळी त्या व्यक्तीला वाचविण्यात आपण कुठे कमी पडलो का हा विचार संवेदनशील मनाला अस्वस्थ करतो. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावातील कळमकर कुटुंबीयही याला अपवाद कसे असणार! बाळासाहेब देवराम कळमकर (वय ६०) यांना ह्दयविकाराच्या तीव्र झटका आला. गावापासून शहर तसे दूरच. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे २००९ मध्ये बाळासाहेबांचे दुसऱ्या क्रमांकांचे बंधू कमलाकर यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यानंतर पुन्हा ही अनपेक्षित घटना घडल्याने कळमकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंतचे उपचार आपण देऊ शकलो असतो तर कदाचित त्यांना वाचविता आले असते, याची चुटपूट कुटुंबीयांना लागली. बाळासाहेबांच्या दशक्रियाविधीची तयारी सुरू झाली. त्यांचे सर्वात धाकटे बंधू शाम कळमकर आणि चुलते सुरेश कळमकर तयारीबाबत चर्चा करीत असतानाच कीर्तन-प्रवचनाऐवजी जीवन संजीवनी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्याचा विचार पुढे आला. कळमकर कुटुंबीय व नातलगांनी त्यास एकमुखाने होकार दिला. अवयवदान चळवळीचे अध्वर्यू डॉ. भाऊसाहेब मोरे यांनीही कळमकर कुटुंबीयांच्या या निर्णयाचे कौतुक केले. नाशिकमधील भूलतज्ज्ञांना मंगळवारी (दि. १७ एप्रिल) दशक्रिया विधीवेळी कार्यशाळा घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. कळमकर परिवाराचे नातलग, ग्रामस्थ, स्नेहीजण आणि मित्रपरिवाराला डॉ. प्रशांत देवरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. नितीन वाघचौरे आणि डॉ. दिनेश पाटील यांनी प्रात्यक्षिकांद्वारे जीवन संजीवनीबाबत मार्गदर्शन केले. हृदयविकाराची लक्षणे, कारणे तसेच अशावेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने करावयाचे प्रथमोपचार याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे उपस्थित काही महिलांनी स्वत: पुढे येऊन ही प्रात्यक्षिके केली. शंकांचे निरसनही करवून घेतले. या प्रबोधनात्मक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होते आहे.

जीवन संजीवनी क्रिया समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. बेसिक लाइफ सपोर्ट प्रशिक्षण आता खऱ्या अर्थाने चळवळीचे रूप धारण करते आहे. कळमकर कुटुंबीयांनीही दशक्रिया विधीवेळी हा उपक्रम आयोजित करून समाजाला आदर्श घालून दिला आहे.

डॉ. राहुल भामरे, सदस्य, भूलतज्ज्ञ संघटना, नाशिक

माझ्या दोन्ही भावांचे हृदयविकाराने निधन झाले. प्रथमोपचारांच्या माहितीअभावी कुणाच्याही कुटुंबात अशी घटना घडू नये हा जीवन संजीवनी कार्यशाळा घेण्यामागील आमचा उद्देश होता. कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाद्वारे कुणी एकाचेही प्राण वाचविले तरी हा उद्देश सफल होईल.

- शाम कळमकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम पुन्हा कॅशलेस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातील अनेक एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने ग्राहकांना भरदुपारी वणवण भटकण्याची वेळ आली. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर एटीएममधील खडखडाट ग्राहकांमध्ये संताप निर्माण करणारा ठरत होता. राष्ट्रीय बँकांपासून सहकारी बँकांपर्यंत अनेक एटीएम पैशांविनाच असल्याचे बोर्ड लावण्यात आले होते. काही एटीएमवर कुठल्याही प्रकारची सूचना नसल्याने ग्राहक पैशांसाठी प्रयत्न करुनही त्यांना पैसे मिळत नव्हते. गंगापूररोड, एमजीरोड या बाजारपेठेतील एटीएमही पैशांविनाच असल्याचे दिसून आले. यामुळे ग्राहकांना पैशांसाठी वणवण करावी लागली.

जिल्ह्यातील एटीएममध्ये पैसे नाहीत याबाबत सध्या तरी कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. चलन तुटवड्याबाबत तातडीने आढावा घेतला जाईल.

- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

रांगा लावूनही हात रितेच!

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरातील जवळपास सर्वच बँकांच्या एटीएममध्ये मंगळवारी पैशांचा खडखडाट झाल्याने नागरिकांची पैशांअभावी मोठी गैरसोय झाली. नाशिकरोडला एटीएममधील कॅश संपल्यानंतर नागरिकांना तासभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.

शहरातील बहुतांश एटीएममध्ये मंगळवारी सकाळी काही प्रमाणात रोकड होती. परंतु, दुपारनंतर जवळजवळ सर्वच एटीएम कॅशलेस झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. रांगेत तासभर उभे राहूनही नागरिकांना एटीएममधून पैसे मिळाले नाही. प्रेस आवारातील स्टेट बँकेच्या एटीएमवर शेकडो कामगारांची पैसे काढण्यासाठी रांग लागलेली होती. परंतु, एटीएममधील कॅश संपल्याने कामगारवर्गास रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. दत्तमंदिर, बिटको चौक, रेल्वे स्टेशन, स्टेट बँक शाखा या परिसरातील सर्वच एटीएमवर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दुपारनंतर धावाधाव

मंगळवारी दुपारनंतर बहुतांश एटीएम कॅशलेस झाल्याने नागरिकांना दुसरे एटीएम शोधावे लागले. काही एटीएमवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. ज्या काही तुरळक ठिकाणच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती, तिथेही केवळ दोन हजाराच्या नोटाच मिळाल्या. परंतु, अवघ्या तासाभरातच सर्वच एटीएम खाली झाली. नागरिकांना पैशांसाठी धावाधाव करावी लागली. काही नागरिकांनी ऐनवेळी बँकांमध्ये धाव घेतली.

सणाच्या पार्श्वभूमीवर पैशांची टंचाई

अक्षय्य तृतिया सणाच्या निमित्ताने नागरिकांकडून मोठी खरेदी केली जाते. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची मंगळवारी मोठी झुंबड उडालेली असताच एटीएममधील कॅश संपल्याने नागरिकांची मोठी फजिती झाली. काही नागरिकांना ऐनवेळी कॅशअभावी किरकोळ खरेदी करता आली नाही.

प्रेस आवारातील स्टेट बँकेच्या एटीएममधील कॅश मंगळवारी संपल्याने नागरिकांना पैसे काढता आले नाहीत. या एटीएमवर पैसे काढण्यासाठी मोठी रांग लागली होती.

-दिनेश मोवळे, ग्राहक

मंगळवारी गंगापूररोड, अशोकस्तंभ, सीबीएस या भागातील एटीएममध्ये खडखडाट होता. सोमवारीदेखील पेठफाटा, दिंडोरी रोड, मेरी कॉलनी या भागातील एटीएममध्ये पैसे नव्हते. दोन दिवसांपासून एटीएममध्ये पैशांची टंचाई आहे.

-अनिल कदम, ग्राहक

सायंकाळी आले पैसे

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गेल्या काही दिवसांपासून एटीएममध्ये पैसै नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. सातपूर भागात गेल्या तीन दिवसांपासून काही ठराविक ठिकाणी असलेल्या एटीएममध्येच पैसे असल्याने ग्राहकांची गर्दी झाली होती. रविवारी व सोमवारी एटीएमध्ये पैसेच नसल्याने रिकाम्या हाती ग्राहकांना परतावे लागले. मंगळवारीदेखील दिवसभर एटीएममध्ये खडखडाट पहायला मिळाला. सायंकाळी पाच वाजेनंतर एटीएममध्ये पैसे आल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. वयोवृद्ध नागरिक व निवृत्त झालेल्या कामगारांना एटीएममध्ये नसलेल्या

पैशांमुळे सर्वांधिक त्रास सहन करावा लागला.

पंचवटीत एटीएम पर्यायी व्यवस्था

पंचवटी : पंचवटी परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये खडखडाट होता. अॅक्सिस, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, युनियन, आयसीआयसीआय आदी बँकांच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध होते. पर्यायी व्यवस्था असल्यामुळे पंचवटीतील ग्राहकांना फारसा परिणाम जाणवला नाही.

ज्येष्ठांची वणवण

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

दोन दिवसांपासून इंदिरानगर परिसरातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे दिसून येत आहे. एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. बँकेत याबाबत विचारणा केली असता प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. बँकांच्या एटीएममध्ये ऐन सणावारात अशा प्रकारे पैसे मिळत नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत.

बँक बंद असताना किंवा बँक जवळ नसताना एटीएममधून पैसे काढणे सहज शक्‍य होते. आजकाल सर्वचजण एटीएमचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. कालपासून इंदिरानगर परिसरातील एकाही एटीएमवर पैसे उपलब्ध नसल्याने एटीएम बंद असल्याचा फलक लावण्यात आले होते. अचानकपणे असे फलक लावल्याने नागरिकानी संताप व्यक्‍त केला आहे. विशेष म्हणजे बँकांच्या जवळ असलेल्या एटीएममध्येसुद्धा पैसे शिल्लक नसल्याचे दिसून आले. बँकेत इतरवेळी पैसे काढण्यासाठी उभे राहिल्यावर कर्मचारी एटीएमचा वापर करण्याचा सल्ला देत असतात, मात्र आता एटीएममध्येच पैसे नसल्याने काय करायचे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला होता. इंदिरानगर परिसरात साधारणतः ३५ एटीएम असून यातील एकाही एटीएमवर पैसे शिल्लक नव्हते. ज्या एटीएमवर पैसे आहेत तेथे केवळ दोन हजाराच्याच नोटा उपलब्ध असल्याचे दिसून आले.

कॅशलेस करण्याच्या सवय नागरिकांना लावण्याआधी बँकांनी एटीएममध्ये पैसे भरण्याची व्यवस्था सक्षम करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

जवळ पैसे ठेवण्यापेक्षा गरजेनुसार एटीएममधून पैसे काढणारे ज्येष्ठ नागरिक अनेक आहेत. सण असताना नागरिकांना बँकेतून स्वतःचेच पैसे काढता येत नसल्याने त्रास होत आहे. बँकांनी याबाबत योग्य नियोजन केले पाहिजे.

- हर्षद गोखले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Cash Crunch: इथं फक्त २०, ५०च्या नोटांची छपाई

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा देशात नोटांची टंचाई जाणवत आहे. सरकारी निर्णयाच्या दिरंगाईमुळेच देशात चलनी नोटांची टंचाई झाली आहे. नाशिकरोडच्या नोटप्रेसमध्ये सहा डिनॉमिनेशनच्या नोटा छापल्या जातात. मात्र, धक्कादायक बाब अशी की, फक्त वीस आणि पन्नास या मूल्यांच्या नोटांचीच छपाई सुरू आहे.

उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीस आणि शंभराच्या नोटांची नवीन डिझाइन केंद्र सरकारने अद्याप मंजूर न केल्यामुळे या नोटांची छपाई नाशिकरोड प्रेसमध्ये थांबली आहे. दोनशे आणि पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी परदेशी शाईचे शॉर्टेज असल्याने या नोटांचे उत्पादन थंडावले आहे. परिणामी देशात नोटांची तीव्र टंचाई जाणवत आहे.

स्टेट बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, नोटांची रखडलेली छपाई हे जसे एक कारण आहे तसे नागरिकांची प्रवृत्ती हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. उपलब्ध नोटांमध्येही व्यवहार सुरळीत होऊ शकतात. मात्र, बँकेतून काढलेल्या दोनशे, पाचशे व दोन हजारांच्या नोटा परत बँकेत भरणा केल्या जात नसल्याने एटीएममध्ये खडखडाट आहे. नोटा बँकेतून काढण्याचे प्रमाण वाढले आहे. भरणा तेवढा होत नाही.

छपाईचा प्रचंड वेग

नाशिकरोड कारखान्यात दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशेच्या नोटांची छपाई केली जाते. सर्व प्रकारच्या नोटांची मिळून दर दिवसाला चौदा ते अठरा दशलक्ष एवढ्या प्रचंड संख्येने छपाई केली जाते. यासाठी अडीच हजार कामगार सकाळी सातपासून तीन शिफ्टमध्ये काम करतात. सहा डिनॉमेशनपैकी फक्त दहा आणि पन्नासच्या नोटांची छपाई सुरू आहे. सरकारने पन्नास आणि दोनशेच्या नव्या नोटा बाजारात आणल्या आहेत. त्याचप्रमाणे वीस आणि शंभराच्या नवीन नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. मात्र, वीस आणि शंभराच्या नोटांची ३१ मार्चपर्यंतची ऑर्डर छापून झाली आहे. या दोन्ही नोटांचे नवीन डिझाइन अर्थमंत्रालयाकडून अजून मंजूर न झाल्याने त्यांची छपाई थांबली आहे. तर दोनशे आणि पाचशेच्या नोटांची छपाई परदेशातून येणाऱ्या ओव्हीआय शाईअभावी थांबली आहे. म्हणजेच फक्त वीस, दहा आणि पन्नासच्या नोटाच छापल्या जात आहेत. कामगारांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून सर्व मशिन्सवर याच नोटांचे डिझाइन सध्या लावण्यात आले आहे.

नवीन लाइन येणार

नाशिकरोड आणि देवास या प्रेस महामंडळाच्या मालकीच्या आहेत. नाशिकरोड नोटप्रेसमधील मशिन्स १९८५ साली उभारण्यात आल्या. त्यांची सर्व्हिसिंग व आधुनिकीकरणही झालेले नाही. याउलट रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालगोणी प्रेस आधुनिक आहेत. मशिन्सची संख्याही जास्त आहे. नाशिक व देवासच्या प्रेसमध्ये पाचशेच्या पाच दशलक्ष नोटा दर दिवसाला छापल्या जातात. छपाई वेग वाढविण्यासाठी नाशिकरोड प्रेसमध्ये पाच मशिनलाइन आहेत. दोन नवीन लाइन येणार आहेत. एका लाइनमध्ये ऑफसेट, इंटेग्लो, नंबरिंग आणि कटपॅक अशा चार मशिन असतात. एका लाइनमध्ये एकदा कागद टाकला तर नोटांचे बंडलच बाहेर पडते.

जोश आहे, काम नाही

नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये अडीच हजार कामगार रात्रंदिवस निष्ठेने काम करतात. सध्या फक्त दहा व पन्नासच्या नोटांचीच ऑर्डर असल्याने कामगारांना नवीन ऑर्डरची प्रतीक्षा आहे. नोटबंदीच्या काळात नाशिकरोड प्रेस कामगारांनी वर्षभर सुटी न घेता काम केल्यामुळेच देशाला नोटबंदीची झळ पोहचली नाही. नोटबंदीत नाशिकरोड प्रेसच्या नोटा रस्ता, रेल्वे बरोबरच प्रथमच हवाईमार्गे देशभरात पोहचविण्यात आल्या. नाशिकरोड आणि देवास प्रेसने मिळून नोटबंदीत २७ डिसेंबरला एकाच दिवसात एकूण ३७.५ दशलक्ष नोटांची छपाई करून विक्रम केला होता. त्यामध्ये नाशिकरोडचा वाटा २०.५ दशलक्ष तर देवासचा वाटा १७ दशलक्षांचा होता. ३७.५ दशलक्ष नोटांमध्ये पाचशेच्या २६.५ दशलक्ष नोटांचा समावेश होता. उर्वरित नोटा वीस, पन्नास आणि शंभरच्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन प्रभाग समित्या बिनविरोध

$
0
0

सिडको, सातपूर, नाशिकरोडमध्ये मात्र थेट लढत रंगणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिक पश्चिम या तीन प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने तीनही ठिकाणी सभापतिपदाची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी निवडणूक प्रक्रियेची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. मात्र, सिडको, सातपूर व नाशिकरोड प्रभाग समितीसाठी शिवसेना व मनसेने उमेदवार उतरवल्याने या ठिकाणी काट्याची लढत बघायला मिळणार आहे. दरम्यानल सातपूरमध्ये मनसेसह भाजप आणि शिवसेनेही अर्ज दाखल केल्याने तेथे चुरशीची लढत होणार आहे.

महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापतिपदांसाठी येत्या २० आणि २१ एप्रिल रोजी निवडणूक आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. त्यानुसार, प्रभाग समित्यांसाठी नगरविकास विभागाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. सहा प्रभाग समिती सभापतीसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत. पंचवटी प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व असल्याने या ठिकाणी पूनम धनगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तर नाशिक पूर्वमध्येही भाजपचे बहुमत असून सुमन भालेराव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांचाही निवड बिनविरोध झाली आहे. नाशिक पश्चिम प्रभाग समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आघाडी करत, नुकत्याच नव्याने निवडून आलेल्या अॅड. वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम प्रभागासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही निवडणूक बिनविरोध झाली असून आता निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता उरली आहे.

मनसेचा कौल ठरणार मोलाचा

नाशिकरोड प्रभाग समितीमध्ये भाजपकडे काट्यावर बहुमत आहे. तेथे भाजपचे १२ सदस्य असून पंडित आवारे यांना उमेदवारी दिली आहे. बहुमत असतानाही शिवसेनेने ज्योती खोले यांचा अर्ज दाखल करून भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी सरळ लढत होणार आहे. सिडकोमध्ये बहुमत असलेल्या शिवसेनेने हर्षा बडगुजर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपने भगवान दोंदे यांनी उमेदवारी दिल्याने तेथेही थेट लढत होणार आहे. सातपूरमध्ये कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. भाजपचे सर्वाधिक नऊ सदस्य निवडून आले असले तरी शिवसेना-रिपाइंचे संख्याबळही नऊ आहे. त्यामुळे मनसेच्या दोन सदस्यांचा कौल कुणाच्या पारड्यात पडतो. यावर तेथील सभापतिपदाचा फैसला होतो. गेल्या वेळी मनसे-भाजपसोबत गेली होती. मात्र, यंदा मनसेने योगेश शेवरे यांना, शिवसेनेने संतोष गायकवाड यांना तर भाजपने रवींद्र धिवरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तेथे तिरंगी सामना होणार असून मनसेच्या भूमिकेवरच सभापती ठरणार आहे.

विषय समित्यांना २६ चा मुहूर्त

विभागीय आयुक्तांनी प्रभाग समित्यांपाठोपाठ पालिकेतील चार समित्यांच्या निवडणुकीचाही कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, २६ तारखेला या चारही समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. २६ तारखेला सकाळी साडेदहा वाजता विधी समितीच्या सभापतीची, दुपारी १२ वाजता शहर सुधारणा समितीची, दीड वाजता आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सभापतीपदाची तर दुपारी साडेतीन वाजता महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या चारही समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत असल्याने सभापती भाजपचाच होणे जवळपास निश्चित आहे.

विभाग....... नियोजित सभापती

पूर्व : सुमन भालेराव

पंचवटी : पूनम धनगर

पश्चिम : अॅड. वैशाली भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटकोंडी फुटणार

$
0
0

सहा हजार इमारतींचा प्रश्न मिटणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावर एफएसआयचे उल्लघंन केल्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून इमारतींमधील रखडलेला कपाटाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकांनी एफएसआयचे उल्लंघन केल्याने तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. महासभा आणि स्थायी समितीच्या ठरावानंतर महापालिकेने मंगळवारी सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या भूखंडाच्या दोन्ही बाजूला अंतर सोडून रस्ता नऊ मीटरचा करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यासाठी तीस दिवसांत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्याने शहरातील प्रलंबित कपाटकोंडीही फुटण्यास मदत होणार आहे.

शहर विकास आराखड्यामध्ये बांधकामातील कपाटांसाठी सरकारने ठराविक एफएसआय मोफत दिला होता. मात्र, तरीही व्यावसायिकांनी कपाटांऐवजी खोल्यांची रुंदी वाढवून ग्राहकांकडून जास्तीचा पैसा लाटला होता. त्यावर तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अशा बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला देण्यास नकार दिला. जानेवारी २०१६ मध्ये सरकारने टीडीआर धोरण बदलताना सहा व साडेसात मीटर रस्त्यावर टीडीआर लोड करण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे शहरात कपाटकोंडीमुळे बांधकाम व्यवसायच ठप्प झाला होता. यावर बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेने पाठपुरावा केल्यानंतर सरकारने तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार रस्ते रुंदीकरणाचे धोरण स्वीकारण्याचा ठराव स्थायी समिती व महासभेने पारित केला. यात आयुक्तांना अशी बांधकामे नियमित करण्याचे अधिकार देण्याचे धोरण आहे. महापालिकेच्या वतीने मंगळवारी हे धोरण जाहीर करण्यात आले. त्यात सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील भूखंडासमोरील ठराविक अंतराची जागा नऊ मीटरचे रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. यातून नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार १.१ एफएसआय व यापूर्वी इमारतीवर लोड केलेला ४० टक्के एफएसआय मिळून दीड एफएसआय उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ मिळून कपाटांच्या माध्यमातून झालेले एफएसआयचे उल्लंघन कायद्याच्या चौकटीत बसविता येणार आहे. त्यामुळे शहरातीस कपाटकोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images