Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘आरटीई’ची आज दुसरी लॉटरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रक्रियेची दुसरी लॉटरी शुक्रवारी (दि. २०) काढली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ हजार ५८९ पैकी ३ हजार १ विद्यार्थ्यांची पहिल्या लॉटरीत निवड झाली होती. त्यापैकी २ हजार १८२ जागा भरल्या गेल्या आहेत. उर्वरित ४ हजार ४०७ जागांसाठी ही लॉटरी काढली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

आरटीई प्रक्रियेतून प्रवेशाविषयी तक्रारी असलेल्या पालकांचे दोन दिवस शिक्षण विभागाकडून तक्रार निवारण करण्यात आले. यामध्ये बागलाणमधील एक, नाशिक ग्रामीणमधील एक, येवल्यातील दोन आणि नाशिक शहरातील १५ अशा एकूण १९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्वांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्यानंतर दुसऱ्या लॉटरीचे नियोजन आखण्यात आले आहे. या लॉटरीमध्येही एक किलोमीटरच्या आतील अर्ज शिल्लक असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पहिल्या लॉटरीमध्ये भाग्यवान पद्धतीत क्रमांक काढले गेल्यानंतर आता एनआयसी पुणे यांच्याकडून संगणकीय लॉटरी पद्धतीने ही प्रक्रिया केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या भांडणातून कोयत्याने केले वार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सिन्नर फाटा येथील टपरीचालक गजानन साहेबराव थोरात (३४, रा. किसान चौक, एकलहरे रोड, नाशिकरोड) यांच्यावर बुधवारी (दि. १८) सायंकाळी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा शेख, इरफान शेख आणि अक्षय नाईकवाडे अशी संशियतांची नावे आहेत. यांच्याव्यतिरिक्त अन्य दोघे आहेत.

दरम्यान, जखमी थोरात यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून गुरुवारी शुद्धीवर आल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवित कोयत्याने हल्ला करणाऱ्यांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फेब्रुवारी महिन्यात संशियतांचा गजानन थोरात यांचा भाऊ सुनील थोरात यांच्याशी वाद झाला होता. या वादात गजाननने मध्यस्ती करून वाद मिटवला होता. त्यानंतर बाबा शेख याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर बाबा शेख, इरफान शेख व अक्षय नाईकवाडे व त्यांच्या इतर दोन साथिदारांनी बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा येथील पान स्टॉलवर गजानन यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. समाधान थोरात, अन्वर देशमुख यांनी जखमी गजानन यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या गुन्ह्यातील हल्लेखोर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

..

शेतकरी आत्महत्या;

संशयिताला कोठडी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिंदे येथील पुरुषोत्तम आगळे या शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी भाऊसाहेब विठोबा देवकर याची कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. भाऊसाहेब देवकर या शेतकऱ्याने शिंदे गावातीलच पुरुषोत्तम आगळे या शेतकऱ्याची चार एकर शेती आठ वर्षांपासून अर्ध्या वाट्याने करण्यासाठी दिलेली होती. परंतु, दोन वर्षांपासून भाऊसाहेब देवकर याने पुरुषोत्तमला जमीन कसण्याचा मोबदला दिला नव्हता.

त्यामुळे पुरुषोत्तम त्याच्याकडे मोबदल्यासाठी वारंवार मागणी करीत असे. सोमवारी (दि. १६) दुपारी चार वाजता भाऊसाहेब व त्याची पत्नी सविता देवकर या दोघांनी पुरुषोत्तमच्या घरी येऊन जमीन सोडून देण्यासाठी धमकावले. पुरुषोत्तम यांनी थकीत मोबदला मागितला असता भाऊसाहेब यांनी त्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर आलेल्या नैराश्यातून पुरुषोत्तम यांनी त्याच रात्री आत्महत्या केली. पोलिसांनी भाऊसाहेब देवकर याला ताब्यात घेतले होते. त्याला नाशिकरोड न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी प्रकरणी पाच जणांना बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भंगार बाजारातील दुकान हटविल्यानंतर नवीन जागा मिळवून देण्याचे सांगून दोघांकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका कथित पत्रकाराचा सहभाग असल्याचेही उघडकीस झाले असून, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नूर अली सादिक अली शेख (वय ६४, व्यवसाय- भंगार व्यापार) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे, की संशयित आरोपी महिला कथित पत्रकार अस्मिता रुपवते (२८, रा. पंचवटी) यांनी ओळख असल्याने मला कंपनी टाकण्यासाठी जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांना सिडकोतील उत्तमनगर येथील मैत्रिणीच्या घरी आणले. या ठिकाणी रुपवते घरातून बाहेर पडल्या त्याच वेळी संशयित आरोपी इम्रान मुनिर मनियार (२५), शाहारुख रमझान मनियार (२४), नदीम अन्वर मनियार (२२), वसीम सलीम शेख (२७) या चार जणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी शेख व त्यांचे मित्र शब्बू खान यांना शिवीगाळ करून मारहाण केली व आरोपींनी त्यांचे चित्रीकरण करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा दम देऊन सहा लाख रुपयांची खंडणी मागितली. यावेळी त्यांच्याकडून सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये व मोबाइल काढून घेतले. उर्वरित रक्कम भंगार मार्केट येथून आणण्यासाठी शेख यांचा मित्र शब्बू व दोन संशयित गेले. भंगार मार्केट येथे तेथील व्यापाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी संशयितांना पकडले व पोलिसांना माहिती दिली. यादरम्यान उत्तमनगर येथे शेख यांना घरात दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत घरात डांबून ठेवले होते. या घटनेची माहिती पोलिसांना समजली याची कुणकूण इतर दोघांना लागली आणि ते फरार झाले. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चारही संशयितांना मुंबई नाका परिसरातून ताब्यात घेत अटक केली. अंबड पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. या घटनेतील पाचवी संशयित आरोपी कथित माहिला पत्रकार अस्मिता रुपवते यांना ताब्यात घेत अटक केली. पोलिस त्यांना आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहेत. वरिष्ठ निरीक्षक कड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विजय पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने होर्डिंग्ज हटविण्याची मागणी

$
0
0

जेलरोड : नाशिकरोड, जेलरोड, उपनगर परिसरात पुन्हा एकदा अनधिकृ होर्डिंग्ज लागले आहेत. अभिनंदन, जयंती, वाढदिवस आदींचे हे होर्डिंग्ज लावल्याने परिसर विद्रूप झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. होर्डिंग्जवरून वादही होत आहेत. महापालिका अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवीत आहे. मात्र, होर्डिंग्जकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार आहे. जेलरोडच्या प्रेससमोर, बिटको चौकात, जेलरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, नांदूर नाका, उपनगर सिग्नल, नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर चौक येथे ही होर्डिंग्ज लावलेली आहेत.

--

डीपीवरील फांद्या छाटल्या (फोटो)

जेलरोड : जेलरोड येथील सावरकरनगरमधील डीपीवर आलेल्या फांद्या अखेर छाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबले आहेत. येथील नागरिक अमोल पांडे, भास्कर गुरव, संदीप मुळाणे, गणेश गडाख आदींनी याबाबत तक्रार केली होती. फांद्या डीपीवर आल्याने घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे लहान मुले, नागरिक जखमी होण्याचा धोका होता. वीजपुरवठाही खंडित होत होता. आता फांद्या छाटल्याने धोका टळला आहे.

--

प्लास्टिक पिशव्यांचा वापर

जेलरोड : नाशिकरोडला दूधविक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतरही अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून दूधविक्री होत आहे. अशा दूधविक्रेत्यांवर कारवाईसाठी गेलेल्या स्वच्छता निरीक्षकांना दूधविक्रेत्यांकडून मारहाणीचे दोन प्रकार झाले होते. दूधविक्रेत्याला अटक होऊन लगेच जामीनही मिळाला. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्याचा गैरफायदा घेत दूधविक्रेते प्लास्टिक पिशव्यांतून कॅनॉलरोड, जेलरोड, देवळालीगाव, जत्रा चौक आदी ठिकाणी दूधविक्री करीत आहेत.

--

'बीजीव्हीएस'चे अधिवेशन

नाशिकरोड : भारत ज्ञानविज्ञान समुदाय या सामाजिक संघटनेचे नाशिक तालुका ग्रामीण अधिवेशन शनिवार (दि. २१) दुपारी ३ वाजता पळसे येथील संत आईसाहेब विद्यालयात होणार आहे. त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन बीजीव्हीएसचे नानासाहेब सरोदे, सुनीता सिंग, नारायण जाधव, विजया बंदरे, जयदीप जोशी, प्रशांत धात्रक, सचिन टिळे, सतीश टिळे, उज्ज्वला कासार, योगिता कासार, कैलास पाटील, योगिता देवराळे, संजय जाट, धनंजय तुंगार, सागर ढेरिंगे, नितीन पाटील, संतोष सोनवणे आदींसह भारत ज्ञानविज्ञान समुदाय जिल्हा कमिटीने केले आहे.

--

सर्वाधिक प्रतिक्रिया मिळालेली बातमी

टेलरचा मुलगा बनला लखपती

केरळमधील टेलरचा मुलगा जस्टिन फर्नांडिस नागपुरात लखपती बनला आहे. नागपूर आयआयएमचा विद्यार्थी असलेल्या जस्टिनला १९ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजचा जॉब मिळाला आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊत यांनी घेतला आढावा

$
0
0

नाशिक : शहर शिवसेनेतील फेरबदलानंतर शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी राऊत गुरुवारी नाशिकमध्ये आले होते. यावेळी राऊत यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड बैठक घेऊन संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. गतकाळात झालेल्या वादावरही चर्चा केली. महानगरप्रमुख पदावरील फेरबदल आणि शिवाजी सहाणे यांच्या हकालपट्टीनंतर झालेल्या आरोप प्रत्यारोपांबाबत झालेल्या डॅमेज कंट्रोलचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच येत्या काळात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांच्या तयारीसंदर्भात त्यांनी चाचपणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव मार्गावरील चार लुटारू अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव-चाळीसगाव मार्गावर मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी येथील चार सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आले.

भगवान सीताराम करगळ (रा. सवंदगाव), काळू तुकाराम शिंदे (रा. काजवाडे), विठोबा रामचंद्र वायकर, बबन चैत्राम महानोर, (दोन्ही रा. खालचे टिपे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघ संशयितांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून ३ दुचाकी, चोरी केलेले तीन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम असा एकूण १ लाख २६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मालेगाव-चाळीसगाव मार्गावरून प्रवास करताना शहरातील ललवाणी दाम्पत्य, पिलखोड येथील शेख दाम्पत्य व अजून एका महिलेस मारहाण करून लुटमार केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. अवघ्या काही तासात एकाच मार्गावर असे हल्ले झाल्याने पोलिसांपुढे त्या हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. या लुटमार प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अशोक करपे व पथकाने मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे चौघा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदांच्या शेवटी आलेले तत्त्वज्ञान परमेश्वर मांडते

$
0
0

लक्ष्मीकांत जोशी यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा परमेश्वर असतो. अगदी वेदांच्या शेवटी आलेले तत्त्वज्ञान परमात्व तत्त्वाचे स्वरूप मांडते. आत्मानंद हा शेवटी महत्त्वाचा असून जे नाशिवंत धर्माचे आहे तेथे किती वेळ रहायचे हे आपण ठरवायचे असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निरुपणकार व अभ्यासू लक्ष्मीकांत जोशी यांनी केले.

शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे 'जगद्गुरू आदी शंकराचार्य - चरित्र, चिंतन व चार मठांची स्थापना' या विषयावर तीन दिवसांची व्याख्यानमाला सुरू असून गुरूवारी दुसऱ्या दिवसाचे पुष्प जोशी यांनी गुंफले. ते म्हणाले, की शंकराचार्य यांचे जीवन परमानंदाने व्यापलेले होते. त्यांना परमेश्वराची व्याख्या कळालेली होती. त्यामुळे त्यांनी पंचदेवता व पंचयज्ञाची संकल्पना मांडली. सूर्यादी देवता आणि पितृयज्ञाज्ञी कर्मे महत्त्वाची असून त्यामुळे चित्तशुद्धी होते. घरात कामे करीत असताना छोटे मोठे किडे मारले जातात. त्या दोषातून परिमार्जन होण्यासाठी ही कर्मे सांगितली आहेत. आनंदाच्या प्राप्तीसाठी चित्तशुद्धी अत्यंत गरजेची असते. विज्ञाननौका या स्तोत्रांमध्ये आठच स्तोत्र आहेत; परंतु त्यात आत्मशोधाचा भाग आलेला आहे. प्रपंचामध्ये आनंदाची व्याख्या संकुचित असते, आज मोठा आनंद मिळाला तर आपण लहान आनंदाला विसरून जातो. त्यामुळे निश्चित आनंदासाठी प्रयत्न करावे, असेही जोशी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संवैधानिक न्याय’वर आज व्याख्यान

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संगिनी महिला जागृती मंडळातर्फे आज, शुक्रवारी (दि. २० एप्रिल) डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेत 'संवैधानिक न्याय : सद्य:स्थिती आणि भविष्यातील दिशा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. मु. शं. औरंगाबादकर सभागृह, परशुराम साईखेडकर नाट्यगृहामागे या ठिकाणी डॉ. संजय दाभाडे यांचे हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. दाभाडे हे दलित, आदिवासी अधिकार आंदोलनाचे राज्य कमिटी सदस्य, आरक्षण हक्क सरंक्षण समिती पुणेचे निमंत्रक, जनआरोग्य मंचाचे सदस्य, आदिवासी अधिकार मंचाचे राज्य कमिटी सदस्य, तर शिक्षण, आरोग्य, आरक्षण आणि अॅट्रॉसिटीज या विषयांवर काम करणारे, संशोधन करणारे कार्यकर्ते, लेखक आहेत. या व्याख्यानात ते अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये वेगवेगळ्या मार्गाने होत असलेली छेडछाड, एसएसी, एसटी, तसेच ओबीसींच्या शिष्यवृत्तीमध्ये सतत होत असलेली कपात आणि आरोग्यासारख्या मूलभूत सेवांचे छुप्या मार्गाने होत असलेले खासगीकरण याचा संशोधनात्मक अभ्यास, तसेच पुढील रणनीती मांडणार आहेत.

नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगिनी महिला जागृती मंडळाच्या अध्यक्षा अनिता पगारे, शीतल पवार, कल्याणी ए. एम., जयंत बोरीचा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला, नाशिकचे समन्वयक सचिन मालेगावकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुनर्नियुक्ती नियमात दुरुस्तीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यभरात ११ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. पुनर्नियुक्तीच्या नियमांमध्ये केलेला बदल दुरुस्त करावा, कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागण्यांसाठी महासंघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात जिल्ह्यातील ९५० कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असून १६ एप्रिलपासून जिल्हा परिषद समोर कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान मागण्याच्या पूर्ततेसाठी आणि आंदोलन मागे घेण्यासाठी वित्त मंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्त, आरोग्य सेवा, काही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह राज्य संघटनेची बैठक बोलावण्यात आली. यावेळी आंदोलन मागे घ्यावे असे सूचित करण्यात आले. परंतु नियमित सेवेत रिक्त पदावर समायोजन आणि समायोजन होत नाही, समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील, असे राज्य संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कामबंद आंदोलनाकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि संघटनेच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या शासनाने पूर्ण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी कंपन्या देशात गुंतवणुकीस सकारात्मक

$
0
0

सचिव डॉ. अरुणा शर्मा यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

उद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असणारे प्रयत्न आणि मेक इन इंडियासारख्या योजनांच्या परिणामी सद्यस्थितीत विदेशातील नामांकीत कंपन्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सकारात्मक आहेत. सद्यस्थितीत या कंपन्यांशी प्रशासकीय स्तरावर आशावादी संवाद सुरू आहे. यासारख्याच प्रयत्नांचा प्रतिसाद म्हणून नाशिकमध्ये थिसेनक्रूपच्या माध्यमातून ३५ हजार टन क्षमतेचे सीआरजीओ ग्रेडचे स्टील उत्पादित होणार आहे. यासारख्या घडामोडींमुळे स्टील उद्योगाच्या क्षेत्रात दोन वर्षांपासून आशावादी पर्व सुरू असल्याची माहिती केंद्रीय स्टील मंत्रालयाच्या सचिव डॉ. अरुणा शर्मा यांनी दिली.

थिसेनक्रूप कंपनीच्या सीआरजीओ इलेक्ट्रिकल स्टील निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन डॉ. शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आजमितीस स्टील उत्पादनाच्या स्पर्धेत भारताची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते. अद्याप भारताचे स्थान काही वर्षांपासून पाचव्या ते सहाव्या स्थानावर आहे. पण केंद्र सरकारकडून या उद्योगास चालना देण्याचे प्रयत्न देशभरात सुरू आहेत. याच्या परिणामी भारत लवकरच स्टील उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावेल, असा विश्वासही डॉ. शर्मा यांनी व्यक्त केला.

भारतीय बाजारपेठेत सातत्याने कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेडची मागणी वाढते आहे. आजमितीस ४ लाख टन सीआरजीओ स्टीलची गरज देशाला आहे. नाशिकमधील या प्रकल्पामुळे यातील ३५ हजार एमटी क्षमता विकसित केले जाणे स्वागतार्ह असले तरीही एकूण गरज ही पूर्णत: भारतातच पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. देशात स्टील निर्मितीस चालना देणे म्हणजे सरकार स्टील इर्म्पोटच्या विरोधात असल्याचा अर्थ काढला जाऊ नये. सरकार इर्म्पोटच्या विरोधात नाही पण स्टील डम्पिंगला सरकारचा पूर्ण विरोध असेल, असेही त्या म्हणाल्या.

..

जमीन उपलब्धतेवर भर हवा

नाशिक परिसर हा शेती आणि सेवा क्षेत्रासोबतच उद्योगालाही अनुकूल आहे. कुठल्याही उद्योगांसाठी आवश्यक असे पोषक वातावरण येथे असले तरीही उद्योगांसाठी मूलभूत सुविधा आणि बिनाशेती जमिनीच्या उपलब्धतेसाठी सरकारच्या वतीने योग्य धोरणे आखली जाण्याची अपेक्षा थिसेनक्रूपचे व्यवस्थापकीय संचालक के. व्यंकटेशन यांनी व्यक्त केली. नव्या उद्योगांसमोर आवश्यक जमिनीचा प्रश्न मोठा असतो, असेही त्यांनी सांगितले.

टाटा स्टीलसोबत जॉईंट व्हेंचर शक्य

डिसेंबर २०१८ अखेर टाटा स्टीलसोबत जॉईंट व्हेंचर सुरू होण्याबाबत आम्ही आशावादी असल्याचे थिसेनक्रूप इलेक्ट्रिकलचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. जेन्स ओव्हेरॅथ यांनी सांगितले. नाशिकमध्ये सीआरजीओ इलेक्ट्रिकल स्टील निर्मितीत दरवर्षी ३५ हजार टन क्षमतेची वाढ थिसेनक्रूप करणार आहे. नाशिकमधील या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ भारतच नव्हे तर भारताशेजारील श्रीलंका, थायलंड किंवा इंडोनेशियासारख्या देशांमधील बाजारपेठेवरही कंपनीचे लक्ष असणार आहे. आशिया ही आमच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. युरोपातील आमच्या एकूण उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन हे या भागात येते. यातही आशियात भारताची बाजारपेठ अतिशय मोठी आहे. यामुळेच हा प्रकल्प नाशिकमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टील उत्पादनात नाशिकचा वरचष्मा

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bदेशामध्ये पहिल्यांदाच कोल्ड रोलिंगपासून कोल्ड ग्रेन ओरिएंटेड (सीआरजीओ) इलेक्ट्रीकल स्टीलचे उत्पादन नाशिकमधून करण्यात येणार आहे. देशात वर्षाकाठी सुमारे ४ लाख टन सीआरजीओ स्टीलची मागणी आहे; पण या ग्रेडचे स्टील भारतामध्ये अद्याप उत्पादित होत नव्हते. आता थिसेनक्रुपच्या नाशिकमधील प्रकल्पात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने सीआरजीओ स्टीलनिर्मितीचा श्रीगणेशा झाला आहे. ही कंपनी आता वर्षाकाठी सुमारे ३५ हजार टन सीआरजीओ स्टील निर्माण करणार आहे. सीआरजीओ इलेक्ट्रीकल स्टीलनिर्मितीत भारतातील एकमेव असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी झाले.

थिसेनक्रुपच्या वाडीवऱ्हे येथील प्रकल्पात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने या महत्त्वाकांक्षी स्टील उत्पादनास सुरुवात झाली आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय स्टील मंत्रालयाच्या सचिव डॉ. अरुणा शर्मा, थिसेनक्रुप इलेक्ट्रीकल स्टीलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. जेन्स ओव्हेरॅथ, मुंबईतील जर्मन दूतावासातील अधिकारी पीटर केर्न आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. व्यंकटेशन उपस्थित होते. या निर्णयामुळे कंपनीच्या नाशिकमधील प्रकल्पाची क्षमता प्रतिवर्षी ३५ हजार एमटीपर्यंत वाढणार आहे. सीआरजीओ स्टीलनिर्मितीत जगात मोजक्या कंपन्या कार्यरत आहेत. भारतात अशा प्रकारचा प्रकल्प अद्याप नव्हता. तो या प्रकल्पाच्या निमित्ताने भारतातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.

आमच्या दृष्टीने भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्ही देशातील एकत्व सीआरजीओ स्टील उत्पादक आहोत. विस्तारामुळे आम्हाला सर्व उत्पादनांचा विचार नावीन्यपूर्ण दृष्टिकोनातून करणे शक्य होणार आहे. आमच्या सर्व उत्पादनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल.

- डॉ. जेन्स ओव्हेरॅथ, अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, थिसेनक्रुप

या उत्पादनाला असणारी मागणी काही महिन्यांतच मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. देशातील वीज आणि ट्रान्समिशन क्षेत्रासाठी निश्चित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी या अतिरिक्त क्षमतेची मदत होईल.

के. व्यंकटेशन, सीईओ, थिसेनक्रुप स्टील भारत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाचे ‘उज्जीवन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, तसेच परिणाम फाउंडेशनतर्फे 'छोटे कदम कम्युनिटी कनेक्ट' या कार्यक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाचे रंगरंगोटीसह नूतनीकरण करीत २५ नवीन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नूतनीकरण केलेल्या विभागाचे उद्घाटन परिणाम फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक मल्लिका घोष, नमिता कोहोक यांच्या हस्ते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. गजानन होले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याबाबत बोलताना 'उज्जीवन'च्या सीईओ सुधा सुरेश यांनी सांगितले, की प्रसूती विभागाचे नूतनीकरण केल्याचा आनंद मोठा आहे. समाजाच्या महत्त्वपूर्ण गरजा भागविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याला उज्जीवन शाखेचे सदस्य स्वेच्छेने पाठबळ देतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून २४ राज्यांमधील कम्युनिटीला विविध दृष्टिकोनांतून लाभ होत असल्याचे सुधा रमेश यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे परिणाम फाउंडेशनच्या मल्लिका घोष यांनी स्पष्ट केले, की हा प्रकल्प राबविण्याची परवानगी देणे हेच महत्त्वाचे होते. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने यात रस दाखविला. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला. प्रसूती विभागाध्ये अधिक सोयीचा अनुभव रुग्णांना मिळेल. राष्ट्रीय पातळीवर नागरिकांसाठी प्रभावी, फायदेशीर आणि कायमस्वरूपी राहतील, असे प्रकल्प आम्ही हातात घेणार असून, यात समाजाच्या गरजा भागविण्याकडे आमचा कल असल्याचे घोष यांनी सांगितले. छोटे कदम हा प्रकल्प सार्वजनिक पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रांसाठी असल्याचे घोष म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉक विथ कमिशनर’साठी टोकन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवी मुंबईच्या धर्तीवर आयुक्त तुकाराम मुंढेंनी नाशिकमध्येही शनिवारी (दि. २१) गोल्फ क्बल मैदानावर 'वॉक विथ कमिनशनर' उपक्रम आयोजित केला असून, त्यासाठी नागरिकांना तक्रारी व सूचना विभागीय कार्यालय प्रतिनिधीकडे अगोदर सादर कराव्या लागणार आहेत. या ठिकाणी होणारी संभावित गर्दी पाहता, तक्रार व सूचना करणाऱ्यांना टोकनशिवाय आयुक्ताकडे निवेदन करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी महापालिकेत घेऊन येणाऱ्या नगरसेवकांना नाशिक अॅपवर तक्रार करण्याचे आवाहन मुंढे करीत असताना मुंढेंकडून घेण्यात येणाऱ्या उपक्रमावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे.

नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढेंनी जनतेशी संवाद साधण्यासाठी 'वॉक विथ कमिनशनर' हा उपक्रम सुरू केला होता. हा उपक्रम चांगलाच हिट झाला होता. नाशिकमध्ये आल्यानतर मुंढेंनीही हा उपक्रम सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. करवाढीच्या आयुक्तांच्या निर्णयाने शहरभर वातावरण ढवळून निघाले असून, मुंढेंच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रीत येत आंदोलन उभे केले आहे.आयुक्त मुंढे यांनी केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात येत्या २३ एप्रिलला विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. यात नगरसेवकांकडून आयुक्तांच्या भूमिकेला कडाडून विरोध होणार आहे. त्यामुळे महासभेआधीच आयुक्तांनी जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. २१ तारखेला सकाळी साडेसहा वाजता अनंत कान्हेरे मैदानावर हा उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या उपक्रमाअंतर्गत नागरिक आपल्या तक्रारी, सूचना, संकल्पना आयुक्तांकडे सादर करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांना आपल्या तक्रारी सकाळी उपक्रमस्थळी विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लेखी तक्रार व सूचना सादर केल्यानंतर त्यांना टोकन मिळणार असून, टोकन नंतर आयुक्तांकडे निवेदन करता येणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

नगरसेवकांचा आक्षेप

दरम्यान आयुक्तांच्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमावर पालिकेतील नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागरिकांच्या तक्रारी घेऊन आयुक्तांकडे गेल्यावर स्वत: आयुक्त तक्रारी नाशिक अॅपवर करण्याचे सांगतात. नगरसेवकांचा न्याय हा आयुक्तांनाही लागू असून, आयुक्तांनी हा उपक्रम घेण्याऐवजी नागरिकांनाच थेट अॅपवर तक्रारी व सूचना करायला का लावत नाहीत, असा सवाल नगरसेवक करीत आहेत. नगरसेवकांना नागरिकांपासून दूर करायचे अन् स्वत: मात्र आयुक्तांनी नगरसेवकांशी चर्चा करायची, हा सरळ नगरसेवकांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा भाग असल्याचा दावा नगरसेवक खासगीत करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृणधान्यांना पौष्टिक अन्नपदार्थाचा दर्जा

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : ज्वारी, बाजरी, नागली, भगर किंवा वरई या तृणधान्यांना केंद्र सरकारने पौष्टिक अन्नपदार्थाचा दर्जा दिला आहे. या पदार्थांमधील पोषकमूल्यांचे विश्लेषण व निरोगी शरीरासाठी या पदार्थांची आवश्यकता लक्षात घेऊन हा दर्जा देऊ केला असून, या पदार्थांविषयी प्रचार व प्रसार होणे, हा त्यामागील उद्देश आहे. महाराष्ट्रात तृणधान्यांचे उत्पादन मोठे असल्याने येथील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून त्यांना चांगला हमीभावही मिळू शकणार आहे.

पूर्वी तृणधान्यांकडे म्हणजे गरिबांचे किंवा ज्यांना गहू, तांदूळ, डाळींसारखे पदार्थ विकत घेणे परवडत नाही, अशा व्यक्तींचे अन्न म्हणून पाहिले जात असे. तृणधान्यांमधील पोषकमूल्यांचा विचार होत नसल्याने गहू, तांदूळ, डाळींनाच आजपर्यंत मोठी मागणी राहिलेली आहे. आजच्या काळात कर्करोग, मधुमेह, ह्रदयरोग अशा आरोग्यविषयक विविध समस्या पाहता डॉक्टरांकडूनदेखील तृणधान्य सेवनाचा सल्ला दिला जात आहे. निरोगी आरोग्यासाठी या पदार्थांची गरज लक्षात घेत हे वर्ष 'जागतिक तृणधान्य वर्ष' जाहीर करावे, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर तृणधान्याचा देशात प्रसार व्हावा, या उद्देशाने तृणधान्यांना पौष्टिक अन्नधान्याचा दर्जा देण्यात आला आहे.

आदिवासी शेतकऱ्यांना लाभ

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांमधून भगरीसाठी आवश्यक कच्चा माल मोठ्या प्रमाणात पुरवला जातो. भगरीवर होणाऱ्या प्रक्रियांमध्ये देशात नाशिकचा क्रमांक वरचा आहे. तर नागली, ज्वारी, बाजरी या पदार्थांचे उत्पादनदेखील राज्यात मोठे आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे.

भारतात तृणधान्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आदिवासी भागात पिकविल्या जाणाऱ्या तृणधान्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. तृणधान्याच्या प्रचार, प्रसारामुळे शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळू शकणार आहे.

-महेंद्र छोरिया, अध्यक्ष, नाशिक भगर मिल असोसिएशन

तृणधान्ये ही आपल्या शरीराची अगदी मूलभूत गरज आहे. शरीराला ताकद देण्याचे काम तृणधान्ये करीत असतात. रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे कार्यही तृणधान्ये करीत असल्याने निरोगी शरीरासाठी तृणधान्ये आवश्यक आहेत.

-मीनल बाकरे-शिंपी, आहारतज्ज्ञ

- - -

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री चक्रधर स्वामींच्या पाऊलखुणा होणार ठळक

$
0
0

मटा विशेष (फोटो आहेत)

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : भारतभ्रमंती करताना अनेक साधू-महंतांचे पाय नाशिक क्षेत्री लागले, त्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारातून नाशिक भूमीला घडवले. याच संतांमध्ये प्राधान्याने नाव घ्यावे लागते ते ते महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे. वैशाख शुद्ध पंचमी ११९२ रोजी नाशिकला अंजनेरी क्षेत्री त्यांचे वास्तव्य झाले होते. या घटनेला आज तब्बल ८२६ वर्षे पूर्ण होत असून पूर्ण गावाने हा दिवस अविस्मरणीय करण्याचा ठराव केला आहे. एखाद्या सिद्धपुरुषाच्या आगमनाला, वास्तव्य झालेल्या दिवसाला पूर्ण गावाने एकत्र येत महोत्सव साजरा करण्याची ही पहिलीच घटना असून यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध महंत अंजनेरीला दाखल झाले आहेत.

११९२ मध्ये भारतभ्रमण करताना त्र्यंबकेश्वरी आलेले श्री चक्रधर स्वामी मजल दरमजल करीत अंजनेरी गावात पोहोचले आणि येथे त्यांनी वास्तव्य केल्याचा उल्लेख नवसंशोधित महानुभाविय बृहत् कालनिर्णय या ग्रंथाच्या कालदर्शक पृष्ठक्रमांक १९ मध्ये आहे. जेथे स्वामींनी वास्तव्य केले, तेथे असलेल्या ऐतिहासिक प्राचीन हेमाडपंती मंदिरात ते थांबले होते. याठिकाणी नंतर ओटा बांधण्यात आला असून, श्री दत्तमहाराजांची मूर्तीदेखील स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अंजनेरी नगरीवर चक्रधर स्वामींचे अधिक प्रेम असून, दोन वेळा या प्राचीन मंदिरात त्यांचा निवास झालेला आहे.

सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने मेहकर येथील बाणेश्वराच्या मंदिरातील बोणेबाईंबरोबर श्री चक्रधर स्वामी त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठणला येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली. यानंतर ते भारतभ्रमणाला निघाले आणि त्र्यंबकेश्वरी आले होते. या घटनेला आज ८२६ वर्षे पूर्ण होत आहेत.

मंदिराचा जीर्णेाद्धार प्रस्तावित

साडेआठशे वर्षांपूर्वीचे हे हेमाडपंती मंदिर असून त्याकडे पुरातन खात्याचे दुर्लक्ष आहे. याठिकाणी जाण्यासाठी काहीही सोय नसून ओळखीसाठी साधा बोर्डही तेथे लावलेला नाही. केंद्रसरकारच्या नियमानुसार तेथे दुसरे कुणी बोर्डही लावू शकत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली असून, राज्यभरातून महानुभाव पंथीय भाविक येथे रोजच हजेरी लावतात. परंतु, त्यांना हे मंदिर सापडण्यासाठी खूप कष्ट पडतात, अशी स्थिती आहे.

महोत्सवासाठी सजली अंजनेरी नगरी

परमपूज्य सुकेणेकर बाबा, श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महंत श्री अशोक महाराज ठाणापती यासारखे मोठे महंत अंजनेरीत दाखल झाले असून श्री चक्रधर स्वामींचा वास्तव्यदिवस साजरा करण्यासाठी अंजनेरी नगरीला सजविण्यात आले आहे. येथे दिवसभर धार्मिक विधी चालणार असून महाराष्ट्रभरातून अनेक भाविक हजेरी लावणार आहेत.

महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होणार आहे. राज्यातून अनेक संत महंत येथे आले असून अंजनेरी गावाने घेतलेला हा पुढाकार प्रेरणादायी आहे. यापुढे प्रत्येक वर्षी हा दिवस आम्ही साजरा करणार आहे.

-आकाशमुनी मेहकरकर महानुभाव, आयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील ८० टक्के एटीएम सेंटर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात रोख चलनाची टंचाई भासू लागली असून जिल्ह्यातील ८० टक्के एटीएम बंद आहेत. उर्वरित २० टक्के एटीएममध्ये दिवसातून फक्त एकच तास पैसे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाभरात एकूण ७७३ एमटीएम आहेत.

शहरातील रोख चलनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीयकृत व कॉर्पोरेट बॅँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक नकुतीच झाली. यात ही बाब समोर आली आहे. यावेळी बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी सागितले, की एटीएममध्ये टाकण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे चलन टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात चलनाची टंचाई जाणवत असून सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास अडचण येत आहे. जिल्ह्यात विविध बॅँकांचे ७७३ एटीएम आहेत. त्यातील बहुतांश एटीएम बंद आहेत. यातील केवळ २० टक्के एटीएम सुरू आहेत. जे एटीएम सुरू आहेत ते देखील नोटांअभावी पूर्ण दिवसभर पैसे उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. या एटीएममध्ये एक तास पुरेल इतकीच रोख रक्कम टाकली जात आहे. एटीएम सुरू नसल्याने नागरिकांना भाजी, दूध यासारख्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. बाजारात पैसे नसल्याने खरेदीदार बाहेर पडत नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. येत्या काळात पैसे उपलब्ध न झाल्यास एटीएम समोर पुन्हा रांगा लागतील. देशात अनेक ठिकाणी रोख रकमेची टंचाई भासत असून चत्यावर तोडगा काढला जाईल, असे रिर्जव बँकेने कळवले आहे.

रोज ९० कोटींची गरज

शहरात बुधवारपर्यंत (दि. १८) विशेष अडचण येत नव्हती; मात्र गुरुवारपासून परिस्थिती बिकट होत चालली आहे. येत्या काही दिवसात चलन उपलब्ध न झाल्यास नागरिकांचे हाल होणार आहे. जिल्ह्यातील एटीएम केंद्राना ३० कोटी तर शहरात ६० कोटी याप्रमाणे साधारण ९० कोटी रुपयांची दैनंदिन एटीएमसाठीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळ्या फिती लावून मारहाणीचा निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथे कर्तव्य बजावताना स्वच्छता निरीक्षकांना झालेल्या मारहाणीच्या घटनांच्या निषेधार्थ म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) काळ्या फिती लावून कामकाज केले. प्लास्टिकचा वापर विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कारवाईसाठी गेले असताना ही घटना घडली. नाशिकरोड विभागीय कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर किसन भोसले व सहकारी विजय मोरे, अनिल गांगुर्डे हे मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास पाहणी करीत असताना जेलरोडवरील थोरात पेट्रोलपंपालगत असलेला दूधविक्रेता प्लास्टिकच्या पिशवीत दूध विक्री करताना आढळल्याने भोसले व त्यांच्या सहकाऱ्याने दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यावेळी दूधविक्रेत्याने भोसले यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नाशिकरोड विभागातच मनपा कर्मचाऱ्यांना मारहाणीची दुसरी घटना घडली. त्याचे पडसाद गुरुवारी (दि. १९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात उमटले. कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या मारहाणीचा निषेध नोंदविला. यासंदर्भात संघटनेतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनही देण्यात आले. कर्मचाऱ्यांना योग्य ती सुरक्षा प्रदान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ लाखांच्या चोरीचे सापडेनात धागेदोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहा रुपयांच्या पाच नोटा खाली पडल्याचे सांगत सहा ते सात चोरट्यांनी अगदी नियोजित पद्धतीने तब्बल २८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हातोहात लंपास करून १६ दिवस उलटले आहे. गुन्हा घडल्यापासून पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला. मात्र, पैशांसह बँकेतून बाहेर पडलेले चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असले, तरी ते फारार होण्यात यशस्वी ठरले आहेत.

चोरीची घटना दि. ३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील मॉडर्न कॅफेसमोरील सारस्वत बँकेत घडली होती. कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ या दुकानामधील कर्मचारी प्रशांत भास्कर वाणी (वय ३७) आपल्या सहकाऱ्यांसमवेत बँकेत पैसे जमा करीत असताना बॅग लिफ्टिंगचा प्रकार घडला होता. दहा रुपयांच्या पाच नोटा खाली टाकून चोरट्यांनी कर्मचाऱ्यास तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. नंतर अवघ्या तीन ते चार सेकंदांत चोरटे २८ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. वेगवेगळ्या टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. मात्र, एखाद्या चित्रपटात शोभावे अशा पद्धतीने सहा ते सात चोरटे कोणताही मागमूस न ठेवता फरार झाले. याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की चोरटे सीसीटीव्हीत दिसत असल्याची बाब खरी असली, तरी संशयित आरोपींची ओळख पटविणे हेच महत्त्वाचे असते. 'इजी मनी'च्या लालसेपायी नवनवीन गुन्हेगार असे गुन्हे करण्यास धजावतात. या गुन्ह्याचा तपास विविधागांनी सुरू असून, यावर क्राईम ब्रँचसह पोलिस स्टेशन पातळीवर तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या संशयितांच्या फोटोग्राफ्सची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी कळविण्यात आली आहे. आरोपींनी अगदी नियोजनपूर्वक गुन्हा केला असून, सराईत गुन्हेगाराच अशा प्रकारे काम करू शकतात. तपास सतत सुरू असून, गुन्ह्यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही नखाते यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरी, शादी, प्रॉपर्टीत ‘धोका’

$
0
0

मटा विशेष

फसवणुकीच्या घटनांमध्ये वेगाने वाढ; पोलिस यंत्रणेपुढे तपासाचे आव्हान

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : नोकरी, विवाह आणि प्रॉपर्टी या अत्यावश्यक पण योगायोगाच्या गोष्टी प्रत्येकालाच मिळणे कठीण असते. पैशांचे वाढते महत्त्व नेमकी याच बाबींतून प्रतिबिंबीत होते. भामटे याचा फायदा उचलण्यासाठी सरसावले असतात. नोकरी, विवाह आणि प्रॉपर्टी यात फसवणुकीचे प्रमाण वाढते असून, भविष्यात यात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात नोकरी, विवाह आणि प्रॉपर्टी मिळणे हा योगायोगाचा भाग मानला जातो. मात्र, शहरीकरणात या अत्यावश्यक बाबी म्हणून गणल्या जातात. शहर पोलिसांकडे २०१७ फसवणुकीचे तब्बल २४० गुन्हे दाखल झालेत. यात वरील तीन घटकांच्या गुन्ह्यांचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत होते. चालू वर्षीही फसवणुकीच्या गुन्ह्यांचा वारू उधळला असून, यंदा मार्च महिन्यापर्यंत तब्बल ७३ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१४ पासून विचार करता फसवणुकीच्या गुन्ह्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसते. याबाबत क्राइम ब्रँचचे पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की नोकरी लावून देतो म्हणून पैसे उकळण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. सरकारी नोकरीसाठी युवकांचे पालक लाखो रुपये मोजून देतात. कोणतीही हमी, खात्री पाहिली जात नाही. मागील दोन वर्षांपासून परदेशात नोकरी अथवा परराज्यात श्रीमंत कुटुंब असल्याचे भासवून विवाहोत्सुक मुला-मुलींना अथवा घटस्फोटितांना विविध वेबसाइटच्या माध्यमातून फसवले जाते. तर तिसरा प्रकार हा प्रॉपर्टीशी संबंधित असून, याची संख्या पहिल्या दोन पेक्षा अधिक असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. शहरी भागात जमिनीसह इतर स्थावर मालमत्तांचे भाव वाढले असून, त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात. बऱ्याचदा परिचित व्यक्ती यात सहभागी असतात. बनावट दस्ताऐवजाच्या आधारे दुसरीच व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला प्लॉट अथवा फ्लॅट विक्री करून मोकळी होते. परशहरातील व्यक्तींनी शहरात घेतलेल्या फ्लॅट अथवा प्लॉटबाबत या तक्रारी जास्त असतात. आता पोलिस अशा तक्रारींची गंभीर दखल घेत असून, अगदी टोळी पद्धतीने होणारे काम हाणून पाडले जाते.

नागरिकांचीही सजगता महत्त्वाची

पोलिस आपले काम करीत असले तरी फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही व्यवहार त्रयस्थामार्फत करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी. आपली जमीन, फ्लॅट अथवा प्लॉट भाड्याने देण्याची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पाडली तर पुढील कटकटी उद्भवणार नाहीत. दुसरीकडे, त्यांचा वापर होत नसल्यास ठराविक कालावधीने आपला सातबारा उतारा घेणे, त्या ठिकाणी भेटी देणे, आजुबाजुच्या नागरिकांशी संपर्क ठेवणे यास प्राधन्य द्यावे. सायबर फसवणुकीचे प्रकारही थोडीशी सावधगिरी बाळगून टाळता येऊ शकतील. पिन क्रमांक सांगणे, एटीएम सेंटरमध्ये कार्ड बदली करणे, परदेशात व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवणे आदी प्रकारांमध्ये आर्थिक फसवणूक होते.

गुन्हेगारीचा आलेख

वर्ष- गुन्हे घडले- गुन्हे उघडकीस

२०१४-१३१-७५

२०१५-१६२-१२१

२०१६-१८२-१३५

२०१७-२४०-१७२

मार्च २०१८ पर्यंत -७३-५७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अधिकाऱ्याची अफलातून कारवाई

$
0
0

प्रसुतीसाठी बोलविल्याने परिचारिकांना केले कामावरून कमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतल्या महापालिकेच्या मायको रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या प्रसुतीसाठी मध्यरात्री फोन लावल्याने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांने चार परिचारिकांना कामावरून कमी करण्याचा अफलातून निर्णय घेतला. विशेष म्हणजे वैद्यकीय अधीक्षकांनीही कोणतीही शहानिशा न करताच कारवाई केली. यामुळे संतप्त परिचारिकांनी महापौरांकडे धाव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचीच चुकी निदर्शनास आल्यानंतर या परिचारिकांना पुन्हा सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमधे रुग्णांची हेळसांड होण्याचे प्रकार सुरूच असून वैद्यकीय अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणेच कारभार करत असल्याचे चित्र आहे. पंचवटीतल्या मायको रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वीच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसुती झाली होती. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई सुरू असतानाच, याच रुग्णालयात दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने चार परिचारिकांना अर्ध्या रात्री प्रसुतीसाठी कॉल केल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्याचा प्रताप केला आहे. या रुग्णालयात गेल्या महिन्यात प्रसुतीसाठी एक महिला रुग्णालयात दाखल झाली होती. रात्रीच्या वेळेस ड्युटीवर असलेला संबंधित वैद्यकीय अधिकारी मात्र ड्युटीवरून गायब होता. संबंधित महिलेची प्रकृती क्रिटीकल असल्याने ड्युटीवरील परिचारिकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला कॉल केला. परंतु संबंधित अधिकाऱ्यांने येण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पुन्हा कॉल केल्यानंतर संबधित महाशय आले. त्यानंतर मात्र आपल्याला अर्ध्या रात्रीत फोन केल्याचा राग डोक्यात ठेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या या परिचारिकांची सेवा समाप्तीची शिफारस वैद्यकीय अधीक्षकाकडे केली. वैद्यकीय अधीक्षकांनाही कोणतीही शहानिशा न करताच, त्यांच्या सेवा समाप्तीची प्रक्रिया सुरू केली. परंतु, संबंधित महिलांनी महापौर रंजना भानसीकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.

प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न

महापौरांनी वैद्यकीय अधीक्षकांना पाचारण करत, चौकशी न करताच, केलेल्या कारवाईबाबत जाब विचारला. सगळा प्रकार समोर आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत, परिचारिकांना कामावर पुन्हा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे वैद्यकीय रुग्णालयातील हा सगळा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>