काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांची माहिती म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या २९ एप्रिल रोजीच्या दिल्ली येथील जनआक्रोश रॅलीस नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली. केंद्रात भाजप सरकारचे दलित विरोधी धोरण, महिलांवर होणारे अत्याचार व त्याला मिळणारा राजाश्रय, सामाजिक असंतोष, अल्पसंख्यांकाच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, पेट्रोल व डिझेलच्या भावात सातत्याने होणारी वाढ, वेगाने ढासळणारी अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, मागील चार वर्षात रोजगार निर्मितीत आलेले अपयश व शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये प्रचंड असंतोष व आक्रोश निर्माण झाला आहे. या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवार २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रामलीला मैदान, नवी दिल्ली येथे जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनआक्रोश रॅलीसाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख नेते, आजी, माजी आमदार व खासदार, प्रदेश व अखिल भारतीय प्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, फ्रन्टल प्रमुख व सेल अध्यक्ष, सेवादल, एनएसयुआय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट