अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्या भूमिकेकडे लक्ष म. टा. प्रतिनिधी, नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना माघारीसाठी सोमवार (दि. ७ मे) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार असून, माघारीनंतर कितीजण उमेदवारीवर ठाम राहतात याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, त्यावरच ही लढत दुरंगी होणार की तिरंगी हे स्पष्ट होऊ शकणार आहे. विधान परिषदेचे आमदार जयवंत जाधव यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी सहाणे यांनी तर शिवसेनेच्यावतीने येवल्यातील नरेंद्र दराडे यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा आखाडा अधिक तापण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच अर्ज छाननी प्रक्रियेत सहाणे यांनी दराडे यांना धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला. परंतु, छाननीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडींनंतर दराडे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडून वैध ठरविण्यात आला. परिणामी, निवडणुकीपूर्वीच दराडे यांना गारद करण्याचा सहाणे यांचा मनसुबा धुळीस मिळाला. त्यामुळे दराडे आणि सहाणे यांच्यामध्ये 'कांटे की टक्कर' होणार हे उघड असले तरी परवेज मोहम्मद युसुफ कोकणी यांनीही अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने तिरंगी लढत होण्याचीदेखील शक्यता आहे. आज दुपारनंतर चित्र स्पष्ट होणार कोकणी यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरी त्यांचे भाजपमधील नेत्यांशी घनिष्ट संबंध आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी सर्वपक्षीयांशी सलोखा निर्माण केला आहे. कोकणी यांनी माघार घेतली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येच आमदारकीसाठी रस्सीखेच होईल. परंतु, कोकणी यांनी निवडणुकीतील आपले आव्हान कायम ठेवले तर मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा नेमका कोणाला मिळतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोकणी यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न होऊ शकतात. परंतु, कोकणी बॅकफुटवर येणार की निवडणुकीत दंड थोपटून प्रचाराला लागणार हे आज स्पष्ट होणार आहे. याखेरीज छाननीत देवळा येथील अशोक देवराम आहेर आणि नाशिक तालुक्यातील लहवित येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड यांचेही अर्ज वैध ठरले असून, तेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ६४४ मतदार या निवडणुकीमध्ये पसंती क्रमानुसार मतदान करू शकणार आहेत. त्यामुळे एकेका मतासाठी उमेदवारांना कडवी झुंज द्यावी लागणार असून, आज दुपारनंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट