म. टा. प्रतिनिधी, नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणातून दोन अपक्ष उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, यंदा तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. आमदारकीसाठी शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असून, आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा प्रारंभ होत आहे. विधान परिषद निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंग भरू लागले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी सोमवारचा दिवस निवडणूक आयोगाने निश्चित केला होता. त्यामुळे निवडणुकीचा आखाडा कोण सोडणार आणि कोण पाय घट्ट रोवून झुंज देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सकाळी १० ते दुपारी तीन ही अर्ज माघारीची मुदत होती. दुपारी अडीचपर्यंत अर्ज माघारीसाठी कोणीही उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही. परंतु, अडीच वाजता काँग्रेसपुरस्कृत अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि पाठोपाठ देवळा विकास आघाडीचे अशोक आहेर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. दुपारी तीन वाजता अर्ज माघारीची मुदत संपूनही या दोघांव्यतिरिक्त अन्य कुणी अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांनी आपले आव्हान कायम ठेवले असून, ही तिरंगी लढत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. प्रचारासाठी तेरा दिवस निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी सर्वच उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. प्रचाराला यापूर्वीच सुरुवात झाली असली, तरी प्रतिस्पर्धी कोण असणार याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटणार आहे. एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी उमेदवारांनी रणनीती आखली असून, जिल्ह्यातील ६४४ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना केवळ १३ ते १४ दिवसांचा अवधी मिळणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचे संकेत मिळू लागल्याने भाजपमधील नेत्यांचे निकटवर्ती मानले जाणारे कोकणी माघार घेतील, असा कयास बांधला जात होता. परंतु, कोकणी यांनी माघार न घेतल्याने ही निवडणूक तिरंगी होईल हे स्पष्ट झाले आहे. -- आघाडीबाबतचा निर्णय झाला नव्हता. त्यामुळे पक्षाच्या सूचनेनुसार अपक्ष अर्ज दाखल केला. आता आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार या निवडणुकीतून माघार घेत असून, आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत. -ज्ञानेश्वर गायकवाड, माघार घेणारे अपक्ष अर्जदार -- अपक्ष उमेदवारी करणारे परवेज कोकणी माझे मित्र आहेत. आपण माघार घ्यावी यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यांना सहकार्य व्हावे यासाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे. कोकणी यांच्या गळ्यात विजयाची माळ पडावी याकरिता देवळा नागरी विकास आघाडीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. -अशोक आहेर, माघार घेणारे अपक्ष अर्जदार -- \Bलोगो : विधान परिषद निवडणूक\B
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट