म. टा. वृत्तसेवा, जेलरोड
जेलरोडची लोकसंख्या, नवीन इमारती, व्यापार, संस्थांची संख्या वाढल्यानंतरही येथे टपाल कार्यालय सुरू झालेले नाही. १९८० च्या लोकसंख्येच्या तुलनेत नेमलेले पोस्टमनच येथे काम करतात. त्यातील काही निवृत्तही झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना उशिराने टपाल मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. वास्तविक नाशिकरोड कार्यालयात सर्वांत जास्त टपाल जेलरोडचे असते. त्यामुळे जेलरोडला टपाल कार्यालयाची मागणी होत आहे.
नाशिकरोड टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की जेलरोडची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाच वर्षांपूर्वी तेथे टपाल कार्यालयासाठी प्रयत्न केले होते. मात्र, परवडणाऱ्या दरात जागाच मिळाली नाही. ती मिळाली, तर टपाल कार्यालय नक्की सुरू होऊ शकेल.
जेलरोडला भारत प्रतिभूती आणि नोटांचे मुद्रणालय आहे. दोन्हीमध्ये मिळून चार-पाच हजार कामगार आहेत. त्यातील बहुतांश जेलरोडला राहतात. जेलरोडला डझनभर शाळा आहेत. तीस वर्षांपूर्वी जेलरोडच्या गोदावरी नदीवर जाण्यास लोक घाबरायचे, आता जत्रा हॉटेल चौकाच्या पलीकडे लोकवस्ती झाली आहे. जेलरोडची लोकसंख्या व विस्तार वेगाने होत आहे. मात्र, त्या तुलनेत बऱ्याच सुविधांचा अभाव दिसत आहे.
नाशिकरोडला उपनगर, नेहरूनगर, देवळालीगाव, सीएनपी प्रेस येथे टपाल कार्यालय आहे. नाशिकरोड कार्यालयात सर्वांत जास्त टपाल जेलरोडचे असते. जेलरोडचा विस्तार मोठा आहे. एकलहरे, पवारवाडी, राजराजेश्वरी, भारतनगर, टाकळीरोडवरील आढाव मळा, लोखंडे मळा, गोसावी मळा आदी परिसर जेलरोड भागात येतो. या भागात नवीन वसाहती होत आहेत. इमारती होत आहेत. त्यामुळे टपाल कार्यालयाची गरज वाढली आहे.
यासंदर्भात नाशिकरोडचे पोस्टमास्तर सुधाकर जाधव म्हणाले, की पाच-सहा वर्षांपूर्वी जेलरोडच्या नेते व समाजसेवकांशी बोलणी करून आम्ही तेथे टपाल कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा महापालिका किंवा सामाजिक संस्थेची जागा कमी दरात मिळाली नाही. आताही तीच समस्या आहे. जेलरोडला टपाल कार्यालय झाले, तर पोस्टमनची पायपीट कमी होईल. टपाल वाहण्याचा प्रश्नही सुटू शकेल.
पोस्टमनची होतेय कसरत
जेलरोडची लोकसंख्या वाढल्याने टपाल वाटप करताना पोस्टमनच्या नाकीनऊ येत आहेत. सायकलवर एवढ्या मोठ्या परिसरात टपाल बटवडा करणे अवघड जाते. जेलरोडसाठी नऊ पोस्टमन नियुक्त आहेत. पोस्टमनने दररोज १२ ते १५ किलोमीटर फिरणे अपेक्षित आहे. मात्र, जेलरोडच्या पोस्टमनला ३० किलोमीटरपर्यंत फिरावे लागते. एकाकडे दरदिवसाला सातशे टपाल वाटपासाठी असतात. जेलरोडला टपाल कार्यालय उघडल्यास रोजचा टपाल वाहण्याचा त्रास वाचेल, तसेच नांदूर, मानूर, दसक, पंचक आदी परिसरालाही लाभ मिळू शकेल.
रोजंदारीवरीबाबत उदासीनता
टपाल खात्यात १९८० पासून भरतीच झालेली नाही. नाशिकरोड कार्यालयात १९८० मध्ये २५ पोस्टमन होते. आता लोकसंख्या अनेक पटींनी वाढली, तरी पोस्टमनची संख्या तेवढीच आहे. उलट त्यातील अनेक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे दोनशे रुपये रोजावर माणसे भरून टपाल वाटप केले जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. बेरोजगार उत्साहाने येतात. तथापि, टपाल वाटपाचे अवघड काम दोन दिवस केल्यानंतर त्यातील अनेक जण गायब होतात. परिणामी टपाल साचत जाते. त्यामुळे निवृत्त टपाल कर्मचाऱ्यांचीही मदत प्रसंगी घ्यावी लागते. मनुष्यबळ कमी व काम जास्त असल्याने पोस्टमनला सुटी घेता येत नाही. ते आजही सायकलवरच टपाल वाटतात. नाशिकरोडला वीस भाग आहेत. त्या तुलनेत पोस्टमन कमी पडतात. बहुसंख्य नवीन इमारतींत लेटर बॉक्स नसतात. इमारती चढून व सायकल चालवून पोस्टमनची दमछाक होत आहे.
जेलरोडची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. दूरपर्यंत लोकवस्ती झाली आहे. या नागरिकांना नाशिकरोडच्या मुख्य टपाल कार्यालयात जावे लागते. त्यात वेळ, पैसा, श्रम खर्ची पडतात. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांचे व अन्य टपाल वेळेत मिळत नाही. हे लक्षात घेऊन येथे तातडीने टपाल कार्यालय सुरू करावे.
-गुड्डू शेख, नागरिक
(फोटो आहेत.)