Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जनक्षोभापुढे माघार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील अनधिकृत बांधकामांवर कोणत्याही दिवशी बुलडोझर चालवू, असा इशारा देणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सिडकोतील अतिक्रमणांबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यानी मुंढेंना सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्याने, तसेच वाढता जनक्षोभ लक्षात घेत आयुक्तांनी तूर्तास सिडकोतील घरांवरील रेखांकनाची कारवाई थांबविली आहे.

सिडकोतील वाढता जनक्षोभ लक्षात घेत आमदार सीमा हिरे यांनी गुरुवारी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासमोर सिडकोतील अस्वस्थतेची कहाणी विशद केली. त्यानंतर आयुक्तांशी कारवाई थांबविली आहे. दरम्यान, सिडकोत टीडीआर लोड होत नसतानाही महापालिकेने येथील नागरिकांना कंपाउंडिंग धोरणात अर्ज करण्याचे आवाहन केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी पदभार घेतल्यापासून शहरातील अतिक्रमणे रडारवर घेतली आहेत. त्यातच आयुक्तांनी सिडकोतील अतिक्रमणांसंदर्भातील एका तक्रारीचा आधार घेत संपूर्ण सिडकोतल्या २५ हजार घरांवर बुलडोझर फिरवण्याचा तयारी सुरू केली होती. नगररचना विभागाच्या वतीने सिडकोतील घरांवर रेखाकंनाचे काम सुरू केल्याने सिडकोतील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. सिडकोतील रहिवाशांमध्ये या कारवाईविरोधात असंतोष निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्याच्या प्रश्न निर्माण झाला होता. सिडकोतील कारवाईबाबत आयुक्तांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही मुंढेंनी हुसकावून लावले होते. कोणत्याही दिवशी बुलडोझऱ् चालवू, असा इशाराही दिला होता. नगरसेवकांशीही वाद घातला होता. त्यामुळे सिडकोतील कारवाई अटळ समजून नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलनाची तयारी सुरू केली होती. परिणामी भाजपच्याच अडचणी वाढल्या होत्या.

मुंढेंच्या कार्यपद्धतीचा अनुभ‌व असलेल्या भाजप आमदार सीमा हिरेंनी वाढता जनक्षोभ लक्षात घेत तातडीने गुरुवारी जव्हारमध्ये जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुंढेंच्या या कारवाईमुळे होणाऱ्या संभावित परिणांमाची जाणीव त्यांनी करून दिली. या कारवाईने सिडकोतील सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, अशी जाणीव हिरेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी मुंढेंना फोन करून तूर्तास ही कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार हिरेंनी दिली. यावेळी नगरसेविका छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, शोभा सोनवणे, नगरसेवक उद्धव निमसे, दिलीप देवांग, एकनाथ नवले, मुन्ना हिरे, मयूर लवटे, सुशील नाईक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व सिडकोतील नागरिक उपस्थित होते.

रेखांकनाचे काम थांबले

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आयुक्त मुंढेंनीही वाढता जनक्षोभ लक्षात घेत रेखांकनाची कारवाई तूर्तास थांबविण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत. जनक्षोभ वाढत असल्याने ही कारवाई थांबवत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. परिणामी सिडकोत गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेतर्फे सुरू असलेले रेखांकनाचे गुरुवारी थांबल्याचे दिसून आले. संपूर्ण सिडकोत कोठेही रेखांकनाचे काम करण्यात आले नसल्याने तूर्तास तरी सिडकोतील नागरिकांना काही दिवसांसाठी दिलासा मिळाला असला, तरी अतिक्रमणांवरील कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

टीडीआर अशक्यच

दरम्यान, महापालिकेने या नागरिकांना अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रशमन धोरणांतर्गत कंपाउंडिंग चार्जेस भरून बांधकामे नियमित करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, महापालिकेची ही फसवेगिरी असल्याचा दावा येथील नगरसेवकांनी केला आहे. सिडकोत एकच एफएसआय असून, येथे टीडीआर लोड करून बांधकामे नियमित करणे शक्य नाही. त्यामुळे ही बांधकामे अधिकृत होत नसतानाही महापालिकेने केलेले आवाहन चुकीचे असल्याचा दावा केला जात आहे. अतिक्रमणांची कारवाई करण्यापूर्वी महापालिकेला सिडकोची परवानगीही आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेला आस्ते कदमचा पर्याय स्वीकारावा लागला आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे सिडकोतील सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सिडकोतील नागरिक वर्षानुवर्षे येथे राहत असून, सिडकोतील अधिकाऱ्यांच्या चुकांची शिक्षा नागरिकांना देण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची गुरुवारी भेट घेतली असून, त्यांनी महापालिकेला कारवाई थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

-सीमा हिरे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ही तर राष्ट्रवादी-भाजप युतीला चपराक

0
0

शैलेन्द्र तनपुरे

shailendra.tanpure@timesgroup.com

नाशिक : पुरेसे संख्याबळ नसताना शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत घडवून आणलेला विजयाचा चमत्कार हा पक्षाला बळ देणारा तर ठरणार आहेच, पण जिल्ह्यातील राजकारणालाही नवा आयाम देणारा ठरणार आहे. राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे व शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांची लढत अत्यंत काट्याची होईल, अशीच सार्वत्रिक भावना असताना प्रत्यक्षात दराडेंनी अभूतपूर्व मते घेत मिळविलेला विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस- आघाडीच्या भाजपबरोबरच्या अभद्र युतीलाही चपराक म्हणावी लागेल.

विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना सुरुवातीपासून आत्मविश्वासात वावरत होती. उमेदवारी जाहीर करण्यापासूनच त्यांनी ही आक्रमकता दाखवून दिली होती. वास्तविक भाजपबरोबर त्यांची युती ही सर्वांनीच गृहीत धरली होती. त्यानुसार राज्यातील सहापैकी निम्या जागांवर दोघांनीही उमेदवार जाहीर करून अप्रत्यक्ष युती झाल्याचे संकेत दिले होते. मात्र, पालघरचे नाट्य घडले अन् युतीचे मुसळ केरात गेले. त्यानंतर शिवसेनेला इशारा देण्यात भाजपने बराच काळ घालविला. पावणेदोनशेहून अधिक मतसंख्या असताना भाजपला ना स्वत:ची ताकद ओळखता आली ना काळाची पाऊलेही. साहजिकच प्रारंभी परवेझ कोकणी या अपक्षाला पाठिंबा असल्याचे वातावरण निर्माण केले गेले. नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला गेला. खरे तर तोपर्यंत दराडेंनी या मतांवर दरोडा टाकला होता. कोकणींच्या फसवणुकीमुळे शंभरावर असलेला मुस्लिम मतदारही शिवसेनेला आयताच मिळाला. भाजपला त्याची साधी भुणभुणही लागू नये हे धक्कादायक होते. राजकारणातील वास्तवाच्या अज्ञानाचे प्रदर्शनही त्यात घडले. शिवसेनेतून आयात केलेला उमेदवार राष्ट्रवादीत फीट बसलाच नाही. त्यामुळे पराभवाची तीव्रता वाढली. या निकालातून शिवसेनेचा एकजिनसीपणा, भाजपचा कमालीचा वेंधळेपणा, पाहुण्यांच्या हातून साप मारण्याचे राष्ट्रवादीचे धोरण आणि काँग्रेस व मनसे यांना अजूनही न गवसलेला शहाणपणा अशा विविध छटा पाहायला मिळाल्या आहेत. सर्वच पक्ष विरोधात असताना मोठ्या मताधिक्याने मिळविलेला हा विजय जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यात मदतगार ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाईचे आदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा,कळवण

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी कळवण तालुक्यातील आढावा बैठकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. बदली होऊनही अद्यात दप्तर न देणाऱ्या दोन तत्कालिन ग्रामसेवकांवर फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले. विविध विकासकामांचे अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी ठरवून देत त्यानंतर आपण सविस्तर आढावा घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. डॉ. गिते यांच्या 'कडक' आढाव्यामुळे ग्रामीण भागातील अपूर्ण असलेल्या विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

डॉ. गिते यांच्या उपस्थितीत तालुक्याची आढावा बैठक येथील हरी ओम लॉन्समध्ये घेण्यात आली. महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहार संहितेबाबत माहिती दिली. ग्रामसेवकांनी ग्रामविकास आराखड्यातील १० टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश गिते यांनी दिले.

डॉ. गिते यांनी ग्राम बालविकास केंद्र अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची माहिती घेतली. तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांबाबतची माहिती वस्तुस्थितीनुसार नसल्याचे सांगत पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणाची खोटी माहिती दिल्यास कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे गिते यांनी सांगितले. पाणी गुणवत्ता तपासणीचे काम आरोग्य कर्मचारी व ग्रामसेवकांचे आहे. त्यात गैर आढळल्यास दोघांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कोसवन व सप्तशृंगगड येथील तत्कालीन ग्रामसेवकांनी अद्याप नवीन ग्रामसेवकास दप्तर उपलब्ध करून दिले नसल्यामुळे तत्कालीन ग्रामसेवकांवर तत्काळ फौजदारी कार्यवाही करण्याच्या व ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्याला नोटीस बजावण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले. धार्डेदिगर ग्रामपंचायत ग्रामसेवकांचीही तपासणी करणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

कसबेवणी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची डॉ. गिते यांनी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहेश्वरीतर्फे क्रीडा स्पर्धा

0
0

सोशल कनेक्ट

माहेश्वरीच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड माहेश्वरी कुमार मंच आणि जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे नाशिकरोड येथे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव झाला. विविध क्रीडाप्रकारात मालेगावने वर्चवस्व मिळवले. माहेश्वर युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन भुतडा, नाशिकरोड अध्यक्ष अच्युत राठी, विष्णु तापडिया, ओकांर राठी, पुष्पक कलंत्री, संकेत लोहिया, संदेश लोहिया यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

संकेत राठी, नीतेश बूब, नीतेश तापडिया, आशिष कलंत्री, विनय केला, समीर भट्टड, नीतेश नावंदर, मनोज भुतडा, ऋतिक कलंत्री आदी यावेळी उपस्थित होते. क्रिकेटमध्ये मालेगाव टायगर्सने विजेतेपद तर नाशिकरोड इमेजने उपविजेतेपद मिळवले. व्हॉलीबालमध्ये नाशिकरोड इमेजने विजेतपद व इगतपुरी माहेश्वरी युवक मंडळाने उपविजेतेपद मिळवले. बुद्धीबळात तेजल लढ्ढा विजेता तर हार्दिक कलंत्री उपविजेता ठरला. बॅडमिंटन एकेरीत वेदांत सोनीने प्रतीक मालपाणीला हरवून विजेतेपद मिळवले. दुहेरीत प्रतीक मालपाणी-सिद्धार्थ काबरा जोडीने प्रथमेश जाजू-अनिरुद्ध काबरा जोडीला हरवले. टेबल टेनिस एकेरीत शुभम राठीने अंकित करवाला हरवून विजेतेपद मिळवले. दुहेरीत विष्णु तापडिया-नितीश बूबने अच्युत राठी-नितीश तापडीयाला नमवले. कॅरम एकेरीत अंकत करवा जेता तर मुकूंद राठी उपविजेता ठरला. दुहेरीत अंकित करव-दर्शन जाजू या जोडीने मुकुंद राठी-चेतन माहेश्वरीवर विजय मिळवला. जलतरण स्पर्धेत सिद्धार्थ काबरा प्रथम तर राघवेंद्र जाजू द्वितीय आला. धावण्यामध्ये जालज बिहानी प्रथम तर जयेश झंवर द्वितीय आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत क्रेनद्वारे फांद्यांची छाटणी

0
0

देवळाली कॅम्प : येथील लामरोडसह शहरांतर्गतच्या मुख्य रस्त्यांवरील झाडांची छाटणी करण्यासाठी वीज वितरण कंपनीने थेट क्रेनची मदत घेतली आहे. शहराच्या लामरोडसह अन्य मुख्य रस्त्यांवर जास्त प्रमाणात वड, पिंपळ, नारळ यांसारखी उंच झाडे आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा झाडांच्या वीजतारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची मान्सूनपूर्व छाटणी करण्यात येत आहे. यापूर्वी उंच झाडांच्या फांद्यांची झाडावर जाऊन छाटणी केली जात असे. मात्र, आता तशी माणसे उपलब्ध होत नसल्याने क्रेनचा आधार घ्यावा लागत आहे.

--

पवार यांची निवड (फोटो)

जेलरोड : मविप्रच्या गांधीनगर येथील जनता विद्यालयाच्या शालेय समितीवर साहेबराव पवार यांची सदस्यपदी निवड झाली आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटी शिक्षक मंडळाचे सदस्य, तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांच्या पतसंस्थेचे ते माजी सचिव आहेत. या निवडीचे मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक नाना महाले, नाशिक एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे आदींनी स्वागत केले आहे.

--

वाढदिवस वृद्धाश्रमात (फोटो)

देवळाली कॅम्प : शहरातील मानवसेवा वृद्धाश्रमात भोजनवाटप करीत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी सरचिटणीस प्रीतम आढाव यांनी आपला वाढदिवस साजरा केला. सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थी दत्तक योजना आदींच्या माध्यमातून अलीकडे आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आढाव यांनी वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून समाजभान दाखविले असल्याची भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, एकनाथ शेटे, उपमहापौर प्रथमेश गिते, अजय बोरस्ते, सचिन मराठे, विक्रांत चांदवडकर, बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, मीना करंजकर, तानाजी करंजकर, प्रेरणा बलकवडे आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात शिवसेनेचा जल्लोष

0
0

टीम मटा

विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लक्षवेधी निवडणुकीत शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय मिळविल्याने येवला, मालेगाव, मनमाड, निफाडसह संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

येवल्यात आतषबाजी

येवला : नरेंद्र दराडे विजयी झाल्याचे वृत्त येवल्यात धडकताच दराडेंचे 'होमपीच' असलेल्या येवल्यात मोठा जल्लोष सुरू झाला. भगवे झेंडे नाचवीत शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व दराडे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहरात एकच जल्लोष सुरू झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजीसह गुलालाची उधळण करीत विंचूर चौफुलीवर सर्वांनीच फेर धरला. 'शिवसेनेचा विजय असो', 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', आदी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

0000

निफाडमध्ये आनंदोत्सव

निफाड : शहरातील शिवाजी चौकात निफाड शहर शिवसेनेच्या वतीने फटाके उडवून जल्लोष करण्यात आला. नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर कराड, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, नगरसेवक जावेद शेख, संदीप जेऊघाले, उपतालुकाप्रमुख इरफान सैय्यद, युवासेनेचे तालुकाप्रमुख बापू कापसे, संजय धारराव, योगेश कुंदे, गौतम ललवाणी व शिवसैनिक उपस्थित होते.

0000

मनमाडला मिठाई वाटप

मनमाड : दराडे विजयी झाल्याचे कळताच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनमाड येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजीसह जल्लोष केला. शिवसेनेनेविरोधात सगळ्यांनी एकजूट करूनही दराडे यांनी बाजी मारल्याने संपूर्ण शहरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेनेतर्फे गुरुवारी दुपारी एकात्मता चौकात विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिवसेना नेते अल्ताफ खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, शहर उपप्रमुख जाफर मिर्झा, सोनू पोहाल, परेश राऊत, प्रवीण धाकराव, पंडीत सानप, वाल्मिक दराडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. नांदगाव शहर व तालुक्यातही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विजयाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.

0000

मालेगावात उधळला गुलाल

मालेगाव : अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी बाजी मारल्याचे कळताच मालेगावी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शिवसैनिकानी उत्सव वाजंत्री वाजवून, फटाके उडवून जल्लोष केला.

संपर्क प्रमुख प्रमोद शुक्ला, युवासेना विस्तारक अविष्कार भुसे, अजिंक्य भुसे, संजय दुसाने, श्रीराम मिस्तरी, सखाराम घोडके, दादाजी शेजवळ, जे. पी. बच्छाव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळ यांना तूर्त दिलासा नाही

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना गुरुवारीही जामिनाविषयी दिलासा मिळू शकला नाही. सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्याने सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी समीर यांना कोणताही अंतरिम दिलासा न देता जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ५ जूनला ठेवली.

'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) या कायद्यातील कलम ४५ अन्वये मनी लाँडरिंगमध्ये सहभाग नसल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवरच टाकण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हे कलम जुलमी स्वरूपाचे असल्याचे सांगत घटनाबाह्य ठरवले होते. यासह अन्य काही मुद्द्यांच्या आधारावर मुख्य आरोपी छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांनी ४ मे रोजी जामीन मंजूर केला आहे. इतकेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाने कलम ४५ अन्वये घटनाबाह्य ठरवल्यानंतर संपूर्ण देशात अशा प्रकरणांत आरोपी असलेल्यांना त्या-त्या न्यायालयांकडून जामीन मंजूर झालेले आहेत. केवळ समीर यांनाच अद्याप जामीन मिळालेला नाही', असा युक्तिवाद समीर यांच्यातर्फे अॅड. विक्रम चौधरी यांनी मांडला. मात्र, 'ईडी'तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला.

'या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले असले तरी अद्याप तपास यंत्रणेचा तपास पूर्ण झालेला नाही. समीर अनेक बनावट कंपन्यांवर संचालक होते आणि या कंपन्यांमार्फत काळा पैसा अन्यत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. परदेशी कंपन्यांशीही याचा संबंध असून या साऱ्याशी समीर यांचा थेट संबंध आहे', असे म्हणणे सिंग यांनी मांडले. त्याच वेळी कलम ४५ रद्दबातल ठरलेले असले तरी केंद्र सरकारने या कायद्यात १९ एप्रिलला अधिसूचनेद्वारे दुरुस्ती केलेली असल्याने त्याआधारे समीर यांना दिलासा दिला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाही त्यांनी मांडला. मात्र, या संदर्भात न्या. गडकरी यांनी वारंवार उपस्थित केलेल्या काही कायदेशीर प्रश्नांविषयी सिंग यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. अखेर सिंग यांनी पुढील सुनावणी सुटीनंतरच्या नियमित न्यायालयात ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायमूर्तींनी ती ५ जूनला ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाद मतांतही दराडेंची आघाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत गेल्या वेळी शंकास्पद मतपत्रिकांवरूनच वाद निर्माण झाला होता. या शंकास्पद मतदानामुळे अटीतटीची निवडणूक होऊन वाद शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. त्यामुळे या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम शंकास्पद मते बाजूला काढण्याचा निर्णय दोन्ही उमेदवारांच्या संमतीने घेतला गेला. १३ मते शंकास्पद आढळली. मात्र, या मतांमध्येही दराडे यांची आघाडी होती.

दोन मतपत्रिकांवर दराडे यांना प्रथम क्रमांकाचा पसंतीक्रम देत त्याभोवती बॉक्स करण्यात आला होता, तर आठ मतपत्रिकांवर खाली-वर पसंतीक्रमांक टाकण्यात आला होता. एक मतपत्रिका कोरी आढळली. एका मतपत्रिकेवर दराडे यांच्या नावासमोर एक क्रमांक टाकून पुढे रेषा आखण्यात आल्या होत्या. अन्य एका मतपत्रिकेवर दराडे यांच्या फोटोखाली पसंतीक्रम टाकण्यात आला होता. १३ पैकी १२ मतपत्रिकांवर दराडे यांनाच पसंतीक्रम दर्शविण्यात आला होता, तर एक मतपत्रिका कोरी होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्व मतपत्रिका बाद केल्या.

उमेदवारांसमोर स्ट्राँग रूममधून सकाळी साडेसहाला मतपेट्या केंद्रावर आणण्यात आल्या. मतांची खातरजमा केल्यानंतर सकाळी आठला प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. दोन टेबलांवर मतमोजणी झाली. एका टेबलवर उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तर दुसऱ्या टेबलवर जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला २५ मतपत्रिकांचे २५ गठ्ठे आणि १९ मतपत्रिकांचा एक असे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते दोन टेबलांवर समसमान वाटण्यात आले. मतमोजणी सकाळी दहा वाजता पूर्ण झाली असली तरी आयोगाकडून अंतिम निर्णय येईपर्यंत निकाल घोषित करण्यात आला नाही. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अधिकृत निकाल जाहीर करीत दराडे यांना प्रमाणपत्र दिले.

दराडे-सहाणे-कोकणी एकत्र

मतमोजणीला सुरुवात होताच दराडे आणि सहाणे यांनी एकमेकांजवळ बसून मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनुभवाबाबत हितगूज केले. दोघांनी बराच वेळ चर्चा करीत हास्यविनोद केले. त्यानंतर अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनीही मतमोजणी केंद्रात हजेरी लावली. नंतर तिघेही हास्यविनोद रंगले. या निवडणुकीत झालेल्या 'लक्ष्मीदर्शना'ची आणि मतदारांकडून आलेल्या कटूगोड अनुभवांच्या शिदोरीची एकमेकांनी देवाण-घेवाण केली.

--

कोट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळामुळे मी विजयी होऊ शकलो. सर्वच पक्षांतील मतदारांनी मला मते दिली आहेत. सर्वांशी माझे चांगले संबंध असल्याचा फायदा झाला. त्यामुळे पक्षीय समीकरणातून विजय सोपा झाला. जातीपातीचा विचार न करता सर्वच जण पाठीशी राहिले.

- नरेंद्र दराडे, विजयी उमेदवार, शिवसेना

भाजपने धोका देत माझी फसवणूक केली. मी अपक्ष असलो तरी भाजपने मला पाठिंबा दिला असता तर नक्कीच माझा विजय झाला असता. मात्र, आज निकालाकडे नजर टाकली असता भाजपच्या पदरी काय पडले, हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे भाजपने स्वत:सह राष्ट्रवादीचा पराभव ओढ‌वून घेतला आहे.

- परवेझ कोकणी, अपक्ष उमेदवार

- पराभव मी मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे. मतदार धनशक्तीच्या मागे उभे राहिले हे स्पष्टच झाले. चांगला सुसंस्कृत, सभ्य आणि निष्कलंक उमेदवार मतदारांना नको होता. दराडे यांना मतदान करणाऱ्यांनी जिल्ह्यातील ४५ लाख जनतेचा अपमान केला आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही माझ्या विरोधात काम केल्याने त्याचाही फटका बसला.

-अॅड. शिवाजी सहाणे, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडको बचाव समिती कारवाईप्रश्नी आक्रमक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या कठोर भूमिकेविरोधात सिडको बचाव संघर्ष कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीतर्फे सोमवारी (दि. २८) राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, समितीच्या कार्यक्रमांत कोणत्याही राजकीय पक्षांचा सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

गुरुवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. सिडकोतील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. त्याला नागरिकांनी विरोध दर्शविला असला, तरी महापालिकेतर्फे सलग तीन दिवस रेखांकनाचे काम करण्यात आले. त्यामुळे या मोहिमेविरोधात सर्वच पक्षांनी आपापल्या परीने भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी सिडको बचाव संघर्ष कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन या समितीच्या माध्यमातून उपमहापौर प्रथमेश गिते यांना ही मोहीम स्थगित करण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर याच समितीच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून निर्णय घेण्यासाठी गुरुवारी बैठकी घेण्यात आली. यावेळी आमदार डॉ. हिरे यांच्यासह माजी नगरसेवक बळीराम ठाकरे, मुरलीधर भामरे, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष वैभव देवरे यांच्यासह मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

यावेळी मुरलीधर भामरे, नितीन माळी, वैभव देवरे, मुकेश शेवाळे, बी. एल. श्रीवास्तव, बाळा भाटिया, डॉ. संदीप मंडलेचा, नाना ठोंबरे, शांताराम देवरे, संतोष हरगोडे, विजय अहिरे, कैलास खैरनार, जिभाऊ बच्छाव, संजय मोरे, ओंकार पाटील, स्वप्निल जाधव, पंकज आरोटे, मयूर साळुंखे, विनायक क्षीरसागर, ज्ञानेश्वर वानसे, रमाकांत देसले, अरुण महाले, भरत रोकडे आदींसह हजारो सिडकोवासीय उपस्थित होते.

सेक्टरप्रमाणे बांधावी मोट

महापालिकेच्या कारवाईविरोधात सेक्टरप्रमाणे मोट बांधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, की सिडकोच्या सुरुवातीच्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत हे आंदोलन पेटले पाहिजे. त्यासाठी २५ हजार घरांतील सुमारे चार लाखांहून अधिक लोक या आंदोलनात सहभागी झाले पाहिजेत. सिडकोने अनेक योजना गुंडाळल्या. स्कीम काढून प्लॉट पाडलेत. सिडकोने तरी सिडकोच्या प्लॅनप्रमाणे योजना उभारली आहे का, याची आधी चौकशी करावी आणि मगच अतिक्रमणांना हात लावावा.

प्रसंगी रस्त्यावर उतरणार

आमदार डॉ. हिरे म्हणाले, की सिडकोवासीयांवर अन्याय होऊ नये यासाठी या निष्पक्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिडकोकडून रीतसर परवानगी घेऊन बांधकाम केलेले असतानाही महापालिका ते अतिक्रमण कसे ठरवू शकते, असा प्रश्न उपस्थित करून महापालिकने ही मोहीम थांबविलीच पाहिजे, असे सांगितले. प्रसंगी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आयुक्त शनिवारी (दि. २६) कोर्टाच्या कामाने बाहेरगावी राहणार असल्याने सर्वांच्या साक्षीने सोमवारी (दि. २८) धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेतेमंडळीची पाठ

निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी चढाओढ करणारी राजकीय नेतेमंडळी सध्या मात्र सिडकोत सुरू असलेल्या मोहिमेबाबत मूग गिळून गप्प बसल्याचे दिसत असून, सिडको बचाव संघर्ष समितीच्या गुरुवारच्या बैठकीकडे सिडकोतील नगरसेवकांबरोबरच राजकीय नेत्यांनीही पाठ फिरविल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोणत्याही राजकीय पक्षाचा या समितीला बॅनर नसताना राजकीय नेते किंवा नगरसेवकांनी याकडे पाठ का फिरविली, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून पक्षविरहित एकीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ अभियंत्यांच्या बदल्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासह शिस्त लागण्यासाठी आता बदलीसत्र सुरू केले असून, गुरुवारी एकाच दिवशी २२ अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली केलेल्या सर्व २२ अभियंत्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभारी शहर अभियंता संजय घुगेंकडे सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभाग सोपवण्यात आला आहे, तर पाणीपुरवठा विभागाची दोन विभागांत फोडणी करीत स्वतंत्र दोन विभाग करण्यात आले आहेत.

महापालिकेत मोठ्या प्रमाणावर खांदेपालटाला आयुक्त मुंढेंनी सुरुवात केली आहे. त्यांनी गुरुवारी महापालिकेतील २२ अभियंत्यांच्या एका झटक्यात बदल्या करून मोठा दणका दिला आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांची बदली नगररचना विभागात करण्यात आली आहे. प्रभारी शहर अभियंता घुगे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग सोपविण्यात आला आहे. शिवाजी चव्हाणके यांच्याकडे पंचवटी, पूर्व व नाशिकरोड विभाग पाणीपुरवठा, तर नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग चव्हाण यांच्याकडे पश्‍चिम, सिडको व सातपूर पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामसिंग गांगुर्डे यांच्याकडे नाशिकरोड, सिडको व सातपूर बांधकाम विभाग सोपविण्यात आला आहे. प्रशांत पगार यांची बदली ट्रॅफिक सेलमध्ये करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या गडावर शिवसेनेचा भगवा

0
0

दराडेंचा सहाणेंवर १६७ मतांनी दणदणीत विजय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राष्ट्रवादीच्या गडाला शिवसेनेने धक्का दिला. प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे यांचा तब्बल १६७ मतांनी मानहानिकारक पराभव केला. शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीला बळ देणाऱ्या भाजपलाही शिवसेनेने जोरदार ठोसा लगावला असून, मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनाही तोंडघशी पाडले. या निवडणुकीत दराडे यांना ३९९, तर राष्ट्रवादीचे सहाणे यांना २३२ मिळाली.

या विजयाने राष्ट्रवादीचा नाशिकचा गड शिवसेनेने हिसकावला असून, राष्ट्रवादीसह भाजपचीही पीछेहाट झाली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनाही तोंडघशी पाडले. त्यामुळे कमी मते असतानाही शिवसेनेने राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला नाशिकचा गड खेचून आणला आहे.

नाशिक विधान परिषदेसाठी शिवसेनेचे दराडे आणि राष्ट्रवादीचे सहाणे यांच्यात सरळ लढत होती. सोमवारी झालेल्या मतदानात ६४४ सदस्यांना मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे शंभर टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्कंठा टिपेला पोहोचली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या इमारतीत गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. गेल्या वेळेसारखा वाद होऊ नये म्हणून सर्वप्रथम नोटा व शंकास्पद मते बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ६४४ पैकी १३ मते शंकास्पद आढळली. उमेदवारांच्या संमतीने ही मते अखेर बाद ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण ६३१ मते वैध ठरली. उमेदवारांना निवडून येण्यासाठी ३१६ चा कोटा निश्‍चित झाला. सकाळी दहापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. पहिल्याच फेरीत दराडे यांनी ३१६ चा आकडा पार करीत ३९९ मते मिळवली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सहाणे यांना २३२ मतांवरच समाधान मानावे लागले. अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनी अंतिम क्षणी शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने कोकणी खातेही उघडू शकले नाहीत. मात्र, सेनेसाठी कोकणींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे.

सहाणेंचा काढता पाय

गेल्या वेळची संधी हुकल्याने अॅड. शिवाजी सहाणेंनी दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी स्वयंघोषित उमेदवारीमुळे शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत जोर लावला होता. अखेरच्या चरणात सेना, राष्ट्रवादीत झालेल्या दुरंगी लढतीत भाजपच्या पाठिंब्याने अॅड. सहाणेंचे पारडे जड मानले जात होते. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होताच आपणच निवडणूक जिंकणार, या अविर्भावात सहाणे दाखल झाले होते. मात्र, तासाभरात निकालाचा कल लक्षात येताच त्यांनी मतमोजणी कक्षातून काढता पाय घेतला. या वेळी त्यानी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राष्ट्रवादी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही काढता पाय घेतला.

एकूण मते : ६४४

बाद मते : १३

वैध ठरलेली मते : ६३१

विजयासाठी आवश्यक मते : ३१६

उमेदवारांना मिळालेली मते

नरेंद्र दराडे (शिवसेना) : ३९९

अॅड. शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी) : २३२

परवेझ कोकणी (अपक्ष) : ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक कर्मचारी जाणार संपावर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केवळ दोन टक्के तुटपुंजी वेतनवाढ देण्याचे प्रस्तावित केल्यामुळे बँक कर्मचारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी ३० व ३१ मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपाअगोदरच नाशिकमध्ये ठिकठिकाणी बँकेचे कर्मचारी विविध मार्गाने निषेध व्यक्त करीत आहेत. स्टेट बँकेच्या कर्मचारी संघटनेने गुरुवारी गंगापूर रोडवरील शाखेसमोर स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन व यूएफबीयूच्या झेंड्याखाली जोरदार निदर्शने केली.

यापूर्वीही आंदोलनाचा भाग म्हणून ८ व ९ मे रोजी देशभर मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. बँक कर्मचारी व अधिकारी वर्गाची वेतनवाढ ही दर पाच वर्षांनी होत असते. यात बँक कर्मचारी संघटना व बँक व्यवस्थापन यांच्यात वेतनासंबंधी वाटाघाटी होऊन वेतनकरार अस्तित्वात येतो. याला द्विपक्षीय करार असे म्हटले जाते. गेल्या वेळी वेतनवाढ ही २०१२ ते २०१७ या कालावधीसाठी होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये कराराची मुदत संपली आहे. मागील वेतनकाराराची मुदत संपल्यानंतर अधिकृतपणे बोलणीला सुरुवात झाली. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही सरकारकडून सकारात्मक चिन्हे दिसत नसल्याने शेवटी बँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाख विद्यार्थ्यांना लिंबू-पाणी

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

एमकेसीएलच्या एमएस-सीआयटी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांना लिंबू-पाण्याची प्रत्येकी शंभर पाकिटे वाटण्याचा अभिनव उपक्रम यंदा राबविण्यात आला. उष्माघातापासून विद्यार्थ्यांचे रक्षण व्हावे, या त्यामागील उद्देश होता. एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक मकरंद बेलगावकर आणि विभागीय समन्वयक सुभाष पाटील यांनी ही माहिती 'मटा'ला दिली.

लिंबू-पाणी ही एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची संकल्पना आहे. यंदाचा उन्हाळा तीव्र होता. मार्च ते मेदरम्यान एमएस-सीआयटीला प्रवेश घेतलेल्या राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांना ही पाकिटे देण्यात आली. जिल्ह्यात २५ हजार जणांनी या कोर्सला प्रवेश घेतला आहे. त्यांनाही त्याचा लाभ देण्यात आला. हा कोर्स चालविणारी राज्यात साडेपाच हजार, तर जिल्ह्यात तीनशे केंद्रे आहेत. त्यांच्यापर्यंत लिंबू-पाणी पाकिटाची पोती पोहोचविण्यात आली. कोर्ससाठी विद्यार्थी उन्हाचा सामना करीत येतात. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघात होऊ शकतो. हे लक्षात घेऊन लिंबू-पाण्याची पाकिटे देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला मोठे पाकीट देण्यात आले. त्यात लहान तीस पाकिटे आहेत. ती महिनाभर पुरतात. एका लहान पॅकटमध्ये पाणी टाकल्यावर मोठा ग्लास सरबत तयार होते.

या उपक्रमाचा संपूर्ण खर्च एमकेसीएलने केला. त्याचा भार विद्यार्थ्यांवर येऊ दिला नाही. पॅकेटसोबत प्रत्येकाला विवेक सावंत यांचे दोन पानी पत्र देण्यात आले. त्यात उष्माघात का होतो, त्याची लक्षणे कोणती, त्यावर उपाय काय आदी माहिती आहे.

आता दोन महिने

एमकेसीएल अभ्यासक्रमाचे हे सोळावे वर्ष आहे. हा अभ्यासक्रम तीन महिन्यांऐवजी आता दोन महिन्यांचा झाला आहे. नव्या अभ्यासक्रमात तब्बल दोनशे आयटी कौशल्ये शिकवली जातात. ऑनलाइन जातीचा दाखला, जन्मदाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड आदी ही कौशल्ये आहेत. याशिवाय वर्ड एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट आदींबरोबरच इंग्रजी व मराठी टायपिंगचे प्रशिक्षणही दिले जाते. दोन महिन्यांच्या कालावधीत पन्नास सत्रे होतात. प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाते. त्यामुळे त्यांची चांगली तयारी होते.

एमकेसीएलला देश-विदेशात पसंती मिळत आहे. अरब देश, इजिप्त, युरोपमध्ये हा कोर्स चालविला जातो. राजस्थान, ओरिसा, हरियाणा, बिहार आदी राज्यांतही त्याला मागणी आहे. बिहार सरकारने एक कोटी विद्यार्थ्यांना हा कोर्स देण्याचे जाहीर केले आहे. कोर्सची फी चार हजारांपर्यंत असून, त्यात पुस्तकांचाही समावेश आहे.

- सुभाष पाटील, विभाग समन्वयक

एमएस-सीआयटीच्या प्रत्येक सेंटरमधील प्रत्येक संगणकावर वेब कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेत पारदर्शकता आली आहे. विद्यार्थी येताना व जाताना बायोमॅट्रिक नोंद करतात. ते करताच पालकांच्या मोबाइलवर संदेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्याची सुरक्षा व नियमितता याबाबत पालक निर्धास्त राहतात.

- मकरंद बेलगावकर, जिल्हा समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निसुरक्षेबाबत शाळांना फेरनोटिसा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अग्निप्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या शहर परिसरातील ३० ते ४० शाळांना फेरनोटिसा काढण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच शाळांनी या उपाययोजना कराव्यात, असा महापालिकेचा मानस आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहता अग्निप्रतिबंधक उपाययोजना शाळांनी करणे गरजेचे आहे. मात्र, शहर परिसरातील बहुतांश सरकारी आणि खासगी शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या सर्व शाळांना नोटीस बजावली आहे. शाळांनी अग्निसुरक्षेसाठीची उपाययोजना तातडीने करावी अन्यथा कारवाई केली जाईल असे त्यात म्हटले आहे. शहरातील ३० ते ४० शाळांनी अद्याप या नोटिशीची दखल घेतलेली नाही किंवा सुरक्षा उपाययोजनाही केलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळांना फेरनोटिसा काढण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. पुढील आठवड्यात या फेरनोटिसा शाळांना प्रत्यक्ष मिळतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शाळा उघडण्याच्या तोंडावरच या शाळांवर महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन रेल्वे गाड्या रद्द

0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

मुंबई विभागातील सायन आणि कुर्ला दरम्यानच्या मार्गावरील पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी २६ मे रोजी रात्री साडेअकरा ते २७ मेपर्यंत सकाळी साडेतीन वाजेदरम्यान स्पेशल ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील काही रेल्वे रद्द, तर काही दादरपासूनच माघारी फिरवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे सूत्रांनी दिली. रद्द् करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पंचवटी, राज्यराणी आणि गोदावरी एक्स्प्रेसचा समावेश आहे.

नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या तीन गाड्या २७ मे रोजी रद्द केल्या आहेत. यामध्ये मनमाड-मुंबई राज्यराणी, मनमाड-मुंबई पंचवटी आणि मनमाड-एलटीटी गोदावरी या एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. या शिवाय गाडी क्रमांक १०५८ अमृतसर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२८१० हावडा मेल आणि गाडी क्रमांक १२१०६ विदर्भ एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत न जाता दादरपर्यंतच जाणार आहेत. पंचवटी, राज्यराणी आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे बसला गर्दी वाढण्याची शक्यता आहे. उद्या, शनिवारी (दि. २६) सरकारी कार्यालयांना सुटी असल्यामुळे नोकरदारांना या गाड्या रद्दचा फारसा फटका बसणार नाही. मात्र व्यावसायीकांना बसेसचा पर्याय शिल्लक असल्यामुळे त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​बेलतगव्हाणच्या सरपंचावर अविश्वास

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

बेलतगव्हाणचे सरपंच श्रीधर धुर्जड हे ​ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज ​करीत असल्याने​ त्यांच्याविरोधात आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्‍वास ठराव ७ विरूद्ध १ मताने मंजूर झाला आहे. यामुळे त्यांना सरपंच पदावर पायउतार व्हावे लागणार आहे.

​सुनील धुर्जड ​यांसह​ सात सदस्यांनी १९ मे रोजी तहसीलदारांकडे ​​अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार २४ मे रोजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच श्रीधर धुर्जड, उपसरपंच प्रतिभा कातोरे, सुनील धुर्जड, निकिता पाळदे, शरद पाळदे, अश्‍विनी महानुभाव, वंदना कुटे, अर्चना दोंदे आदी उपस्थित होते. किरण मोरे अनुपस्थित होते. सात विरूद्ध एक अशा मताने विश्‍वास ठराव मंजूर झाल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ (२) अन्वये श्रीधर धुर्जड यांचे सरपंच पद रद्द​​ झाले​ आहे​. सध्या जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नव्या सरपंचाची निवड होईपर्यंत उपसरपंच प्रतिभा कातोरे ​या प्रभारी सरपंच म्हणून कामकाज पाहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलासंगम’मधून बहरणार कलेचे विश्व

0
0

७ वा वर्धापनदिन लोगो वापरावा

कलासंगम लोगो वापरावा

'मटा'च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रस्थापित कलाकारांच्या कलांचे सादरीकरण आणि उभरत्या कलाकारांना व्यासपीठ म्हणजे 'कलासंगम' महोत्सव. विविध कलांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा हा महोत्सव जूनमध्ये होणार आहे. तालवाद्यापासून तर सुशीरवाद्यांपर्यंत साऱ्याचाच समावेश येथे असून, नाशिककर कलाकारांची शिगेला पोहोचलेली उत्कंठा आता पूर्णत्वाकडे गेली आहे.

सातव्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे दोन दिवस हा महोत्सव होणार आहे. 'मटा कलासंगम' महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी नाशिककरांनी महोत्सवाला उदंड प्र्रतिसाद दिला होता.

नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन वादन, शिल्प, नृत्य नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी हा या 'कलासंगम' महोत्सवाचा उद्देश आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. 'मटा' वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना एकत्रित करून एक मोठा आर्ट फेस्ट नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टमध्ये संगीत, वादन, नृत्य, चित्र, शिल्प या कलांचा संगम नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे.

महोत्सवात नाशिकच्या सप्तकन्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर उभरत्या कलाकारांचे संबळवादन ठेवण्यात आले आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन व फोटोग्राफी या सात कलांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयातील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे डेमोस्ट्रेशनही यावेळी होईल. तसेच नाशिकच्या कलावंतांचा समावेश असलेली आर्टिझन्स फिल्म यावेळी दाखवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांचे तबलावादन, गायन व नृत्य तसेच काही डेमो होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पहाण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या महोत्सवाला हॅण्ड फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे.

कुसुमाग्रज स्मारकात दोन दिवस धमाल

'महाराष्ट्र टाइम्स'च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ९ व १० जून रोजी संपूर्ण दिवस कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन्ही दिवस कलेच्या प्रांतातील मुशाफिरी असून, दोन दिवस धमाल येणार आहे. नाशिकमधील मान्यवर कलाकार यात सहभागी होत असून, मान्यवर शिल्पकार यात डेमो देणार आहेत. तसेच मुंबईहून सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत.

हौशी कलाकारांना आवाहन

या महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांसाठी व्यासपीठ देण्यात येणार आहे. हौशी कलाकारांना आवाहन करण्यात येत आहे की, गायन, वादन, नृत्य, चित्र, शिल्प, फोटोग्राफी, मॉडर्न आर्टमध्ये पीअर्सिंग, नेल आर्ट तसेच आणखीही संबंधीत आर्टमध्ये ज्यांना परफॉर्मन्स सादर करावयाचे असतील त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ०२५३ ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करावा. नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी फेस्टिव्हल

0
0

लोगो - प्रॉपर्टी फेस्टिव्हल

प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आज उद्घाटन

टाइम्स ग्रुपतर्फे आयोजन; सर्वोत्तम ऑफर्ससाठी नामी संधी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिककरांसाठी आयोजित प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आज (२६ मे) उद्घाटन होणार आहे. सर्वोत्तम ऑफर्ससाठी नामी संधी असणारा हा फेस्टिव्हल रविवारपर्यंत गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये होणार आहे. शहरातील आघाडीचे विकासक त्यात सहभागी होणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये असंख्य ड्रीम प्रोजेक्टस् व आकर्षक ऑफर्स मिळणार असल्याने नाशिककरांसाठी ही मोठी संधी आहे.

या प्रदर्शनात आवाक्यातील घरे, लक्झरी फ्लॅट, टाऊनशीप, रो हाऊसेस, व्हीला, फ्लॅट, प्लॉट्स, वीक एण्ड होम, कार्यालये आदींच्या खरेदीसाठी माहिती उपलब्ध असणार आहे. इंद्रप्रस्थ हॉल येथे सकाळी १०.३० ते रात्री ९ या वेळेत या प्रदर्शनाला इच्छुक ग्राहकांना भेट देता येणार आहे. त्याचप्रमाणे विकसकांच्या वतीने आकर्षक योजनाही ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे.

या प्रदर्शनात रुंगटा ग्रुप, सम्राट ग्रुप, ड्रिम शेल्टर्स, श्रीयोग बिल्डर्स, मालपाणी ग्रुप, अनमोल नयनतारा ग्रुप, परांजपे डेव्हलपर्स, जय डेव्हलपर्स, एचडीएफसी आणि कारडा कन्स्ट्रक्शन्स यांसह विविध ग्रुप सहभाग घेणार आहेत. आपल्या स्वप्नातील घराचं स्वप्न साकारण्यासाठी या प्रदर्शनास भेट देण्याची संधी २६ व २७ मे रोजी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचनात ’साफसफाई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगररचना विभागाची साफसफाई सुरू केली आहे. शुक्रवारी २७ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यातील १८ जण हे नगररचना विभागातील आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने या बदल्या केल्या असून, त्या रद्द करण्यासाठी राजकीय दडपण आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आतापर्यंत मुंढेंनी बेशिस्त व गैरवर्तन करणाऱ्या १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, जवळपास डझनभर अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. मुंढेंनी नगररचना विभागातील १८ कनिष्ठ अभियंत्याच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे नगररचना विभाग हादरला असून, वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यावरील कारवाईने खळबळ उडाली आहे. नगररचना विभागात ऑटो डीसीआर यंत्रणेला अभियंतेच अडथळा आणत होते. त्यामुळे मुंढेंनी बिल्डरांशी संधान बांधून कार्यरत असलेल्या अभियंत्याना मोठा दणका दिला आहे. दरम्यान, मनपा आयुक्त मुंढेंनी वैद्यकीय विभागातही साफसफाई केली असून तब्बल ८ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारीची बदलीही डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर प्रभारी म्हणून डॉ. जयराम कोठारी यांची नियुक्ती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसई बारावीचा आज निकाल

0
0

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज, शनिवारी २६ मे रोजी सकाळी १० वाजतानंतर ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निकालाच्या अनेक तारखा सोशल मीडियावर फिरत होत्या. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्याचवेळी, इयत्ता दहावीचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होणार असल्याचेही सीबीएसईने क‌ळवले आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल www.cbseresults.nic.in किंवा www.cbse.nic.in या वेबसाइटवर पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images