Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अल्को टेस्टसाठी धुळे विभागाला तीन मशिन

$
0
0

विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कर्मचाऱ्यांमधील व्यसनाधिनता कमी होऊन व्यसनमुक्त होण्यासाठी दोन समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना मज्जाव करण्यासाठी अल्को टेस्टसाठी धुळे विभागाला तीन मशिन उपलब्ध झाल्याची माहिती धुळे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. एसटीच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त धुळे आगारातील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी विविध योजना एसटी महामंडळ राबवत आहे. चालक आणि वाहकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात असल्याचेही त्या महणाल्या. एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त येथील मध्यवर्ती आगारात विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी आगार व्यवस्थापक भगवान जगनोर, स्वाती पाटील, शिवाजीराव घोरपडे उपस्थित होते.

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची अल्को टेस्ट करण्यासाठी धुळे विभागासाठी तीन अल्को टेस्ट मशिन उपलब्ध झाले आहेत. भरारी पथकांकडून चालकांची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ४० वर्षांआतील कर्मचाऱ्यांची तीन वर्षांतून एकदा आणि ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांची दर वर्षाला आरोग्य तपासणी केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शाळांना सुरुवात झाल्यावर गर्दीचा हंगाम सुरू होईल. त्यानंतर या जादा बसेस पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक सपकाळ यांनी सांगितले. या वेळी प्रवासी व अधिकाऱ्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

गेल्या वर्षभरात धुळे विभागाची कामगिरी चांगली राहिली असून, विभागाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. प्रती किलोमीटर मागे महामंडळाला विभागातून दोन रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशांची संख्यादेखील वाढलेली आहे. तसेच गेल्या वर्षभरात धुळे विभागाला २७ सीटर आणि ४ स्लिपर शिवशाही बस उपलब्ध झाल्या आहेत. शिवशाहीची आरामदायी प्रवासासाठी मागणी होत आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यास ती त्वरित सोडविण्यात येत आहे. प्रवाशांशी असभ्य वर्तणूक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे, असेही नियंत्रक सपकाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूररेषेतील बांधकामे पाडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लॉन्सवरील कारवाईत महापालिका तोंडघशी पडल्यानंतर या पूररेषेतील अतिक्रमणांच्या कारवाईला ब्रेक लागल्याची चर्चा होती. मात्र, ही बांधकामे पाडणारच असल्याचे प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केल्याने, येथील रहिवाशांचे धाबे दणाणले आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. रस्त्यावरील हॉकर्सची अतिक्रमणे हटवल्यानंतर त्यांनी आता नागरिकांनी मुख्य रस्त्यांवर करून ठेवलेली अतिक्रमणे लक्ष केली आहेत. सोबतच बड्यांच्या अतिक्रमणांकडे वकृदृष्टी फिरवत शहरात अनधिकृतपणे सुरू असलेले १६६ लॉन्स व मंगल कार्यालयांवरही कारवाई सुरू केली आहे. त्यात सर्वप्रथम आयुक्त मुंढे यांनी नदीपात्रातील पूररेषेत केलेली अतिक्रमणे रडारवर घेत गेल्या पंधरवाड्यात गंगापूर रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा चालवला. उच्च न्यायालयाने निळ्या व लाल पूररेषेतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक शहरात गोदावरी पात्रात निळ्या व लाल पूर रेषेअंतर्गत जवळपास साडेतीन हजार अतिक्रमणे आहेत. या अनेक बिल्डरांनी तर पूर रेषेतच इमारती उभ्या करीत, त्यात ग्राहकांना घरे विकली आहेत. या इमारतींना अद्याप बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. गावठाणात ही संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु, गावठाणात नव्याने बांधकाम करताना स्टिल्ट बांधकाम केल्यास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे गावठाणातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गावठाण क्षेत्र वगळता पूररेषेत असलेली जवळपास साडेतीन हजार अनधिकृत बांधकामे आयुक्त मुंढे यांनी रडारवर घेतली आहेत. गेल्या पंधरवाड्यात आयुक्तांनी पूर रेषेतील विश्वास लॉन्स व ग्रीन फिल्ड लॉन्सवर कारवाई केली होती. परंतु, ग्रीन फिल्ड लॉन्स प्रकरणात महापालिकेला तोंडघशी पडावे लागले होते. आयुक्तांना थेट उच्च न्यायालयात माफीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे महापालिकेने पूर रेषेतील कारवाईबाबत शिथिलता दिल्याची चर्चा आहे. पूर रेषेतील बांधकामे पाडताना पुन्हा अडचणी येऊ नयेत म्हणून महापालिकेकडून पुरेसा अभ्यास करूनच कारवाई केली जाईल, अशी चर्चा होती. परंतु, प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मात्र उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने पूर रेषेतील बांधकामांवर कारवाई होणारच असल्याचा दावा केला. पूर रेषेतील अतिक्रमणे पाडणारच असे सांगत, अतिक्रमण विभागाला या संदर्भात आदेश दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या बांधकामांना अभय मिळाल्याची चर्चा आता अफवाच ठरणार आहे.

पोलिस बंदोबस्ताची अडचण

महापालिकेने पूर रेषेतील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासाठी पोलिस संरक्षण न मिळणे हा मोठा अडथळा आहे. सध्या महापालिका आणि पोलिसांमध्ये सुरक्षा पुरवण्यावरून संघर्ष सुरू आहे. पोलिसांना कायद्याने काम करण्याचा सल्ला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्यानंतर तो पोलिस आयुक्तांना जिव्हारी लागला आहे. त्यांनी जुनी थकबाकी भरा, मग बंदोबस्त घ्या अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्ताची अडचण येत असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी मान्य केले असून, पोलिसांसोबत बैठक घेऊन बंदोबस्ताचा विषय मार्गी लावला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सिडकोबाबत वर हात

सिडकोतील अतिक्रमणे हटवण्याच्या महापालिकेच्या कारवाईविरोधात आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी आमदार हिरेंच्या स्थगितीच्या मागणीच्या पत्रावर 'कारवाई करावी' असा शेरा मारला होता. तसेच संबंधित पत्र महापालिकेला पाठविले होते. आमदार हिरेंनी मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिल्याचा दावा केला होता. परंतु, प्रशासन मात्र या आदेशाबाबत संभ्रम निर्माण करीत आहे. त्यामुळे प्रभारी आयुक्तांनी सिडकोबाबत अधिक भाष्य न करता, याबाबत अंतिम निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे हेच घेतील, असे सांगत आपली सुटका करून घेतली आहे.

पूर रेषेतील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयानेच आदेश दिले आहेत. त्यानुसार ही बांधकामे पाडली जाणार आहेत. त्यासंदर्भात अतिक्रमण विभागाला आदेश दिले आहेत. पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल.

- राधाकृष्णन बी., प्रभारी आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर मागणीचे आणखी १० प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सूनपूर्व पावसाने सलामी दिली असली तरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यामुळे जूनमध्येही ग्रामीण भागातून टँकरची मागणी होत असून, १० प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये येवला, सिन्नर, सुरगाणा, देवळा, बागलाणमधून टँकरची मागणी होत आहे.

जिल्ह्यात सध्या ७५ टँकर सुरू असून, पाच तालुक्यांमधून आणखी १० टँकरचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील २६२ गावे आणि वाड्यांमध्ये ७५ ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बागलाण तालुक्यात २२ गाव-वाड्यांमध्ये १५ टॅँकर, देवळ्यात सहा गाव-वाड्यांमध्ये तीन टॅँकर, मालेगावात ४० गाव-वाड्यांमध्ये आठ टॅँकर, नांदगावात ५३ गाव-वाड्यांमध्ये सहा टॅँकर, पेठमध्ये सहा गाव-वाड्यांमध्ये दोन टॅँकर, सुरगाण्यात सहा गाव वाड्यांमध्ये दोन टॅँकर, सिन्नरमध्ये ४० गाव वाड्यांमध्ये ११ टॅँकर, त्र्यंबकेश्वरमध्ये २३ गाववाड्यांमध्ये चार टॅँकर, येवल्यात ६६ गावे आणि वाड्यांमध्ये २४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील २६२ गाव-वाड्यांमध्ये ७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आता येवला, सुरगाणा, देवळा, बागलाण, सिन्नर तालुक्यांमधून १० टँकरच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किशोर दराडेंसाठी येवल्यातून बळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदार संघ निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने बाजी मारणारे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचे लहान बंधू किशोर दराडे हेदेखील शिवसेनेच्याच तिकिटावर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उरले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ येवल्यात संस्थाचालक व शिक्षकांचा मेळावा झाला.

शिक्षकांच्या वर्षानुवर्षे जैसे थे असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी किशोर दराडे यांच्यासारख्या झोकून देणाऱ्या उमेदवाराला आमदार म्हणून निवडून देण्याची गरज असल्याचे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड. माणिकराव शिंदे यांनी सांगितले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड होते. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात संस्थाचालक व शिक्षक संघटनांचे समर्थन दराडे यांना मिळत आहे. ते नाशिक जिल्ह्यातील एकमेव प्रबळ उमेदवार असल्याने यावेळी त्यांच्या विजयाचे गणित देखील सोपे असल्याचा दावा अॅड. शिंदे यांनी केला. शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक जिंकताना दराडे यांच्या रुपाने येवला तालुक्याला तिसरा आमदार मिळणारच असल्याचे सांगितले. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे, येवला पंचायत समिती माजी सभापती संभाजी पवार, सेनापती तात्या टोपे संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याच्या बागूलबुवात अडकले वृक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील दोन वर्षांपासून झाड पडण्याच्या स्थितीत आहे. इमारतीचा थोडा आसरा मिळाल्याने झाडाने दम धरल्याचे दिसते. मात्र, धोका टळला नसून, मागील वर्षाप्रमाणे त्याचा मोठा भाग कोसळू शकतो. याच झाडाच्या समोर जांभळाचे झाड आहे. वर्षातून दोनदा त्याची व्यवस्थित छाटणी होते. कारण त्याच्यावर वीज वितरण कंपनीच्या तारा गेलेल्या आहेत. डिसुझा कॉलनीतील हे चित्र शहरात सर्वत्र दिसते. कायद्याचा बागूलबुवा केल्याने वृक्ष लावणारे आणि वृक्षांची जोपसना करणारे हात दूर तर जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त होते आहे.

शहर पोलिसांकडे वृक्षतोडीचे दरवर्षी किमान सात ते आठ गुन्हे दाखल होतात. यंदा तर एका सोसायटीच्या सदस्यांविरोधात सोनचाफा तसेच, इतर फुलझाडांची छाटणी केली म्हणून नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेस अद्याप दोन महिनेही झाले नसतील. वृक्षांची जोपासना आणि वाढ होणे शहरासाठी आवश्यक आहे. मात्र, यासाठी नागरिकांनाच कोंडीत पकडण्याचा प्रकार वाढत आहे. हौसेने म्हणून लावलेले नाराळाचे झाड मोठे झाले. त्याच्या मुळा किंवा फांद्या घरांसाठी धोकादायक ठरल्या तर छाटणीचीही मंजुरी सहजासहजी मिळत नाही. यामुळे घराच्या आसपास मोठे तर सोडा पण फुलझाडही लावण्यास नागरिक कचरू लागले आहेत. पर्यावरणपूरक काम शेवटी माणसांसाठी होते. मात्र, काही स्वार्थी लोक कायद्याचा दुरोपयोग करून गब्बर होत असल्याची टीका होत आहे.

योग्य धोरण आखणे गरजेचे

नवीन इमारतींना वृक्ष लागवड बंधनकारक करण्यात आली आहे. तसे फोटो बांधकाम पूर्णत्वाच्या वेळी फाइलला जोडण्यात येतात. पण पुढे काय असा प्रश्न अनुर्त्तीणच राहतो. नवीन इमारतीत मोठे वृक्ष लावण्यास कोणीही इच्छुक नसते. दुसरीकडे लावलेली झाडे वाढणार नाही याचीही काळजी घेतली जाते. दुर्दैवाने यासाठी कारणीभूत ठरतोय कायद्याचा बागूलबुवा. माणसे झाडांसाठी आणि झाडे माणसासाठी आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याबाबत वेळीच पारदर्शकता आणि कामाची गती वाढवून योग्य धोरण आखणे आवश्यक झाले आहे. अन्यथा भीक नको पण...अशी सर्वसामान्यांची गत होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगची कोंडी फुटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये पार्किंगचा जटिल प्रश्न अखेर सुटला आहे. स्टेशनमध्ये दोन नवीन पार्किंग सुरू झाले असून, एकूण चार पार्किंग उपलब्ध झाले आहेत. याशिवाय देवी चौकाशेजारी खासगी जागेत पाचवे पार्किंग आहे. येथे प्रीमियम पार्किंग ही संकल्पना प्रथमच राबविण्यात आल्याने शिस्त, स्वच्छतेबरोबरच महसूलप्राप्तीचा हेतूदेखील सफल झाला आहे. 'मटा'ने त्रस्त प्रवाशांची यासंदर्भातील भूमिका वेळोवेळी मांडली होती.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनला अतिक्रमणांचा विळखा असल्याने पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. सिन्नर फाटा सोडल्यास सर्व बाजूंनी रेल्वे स्टेशनमध्ये वाहन उभी केलेली असतात. नातेवाइकांना घेण्या-सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांना आवारात गाडी पार्किंगसाठी जागाच नाही. त्यांच्यासाठी प्रीमियम पार्किंग सुरू झाले आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये देवी चौक आणि रेल्वे पोलिस ठाण्याशेजारी अशा दोन ठिकाणी पे अँड पार्क योजना आहे. आता मुख्य प्रवेशमार्गावर प्रीमियम पार्किंग सुरू झाले आहे. दुसरे प्रीमियम पार्किंग पार्सल ऑफिसशेजारी या आठवड्यात सुरू होणार आहे. दोन तासांसाठी दहा रुपये असे त्याचे दर आहेत. प्रीमियम पार्किंगमुळे फुकट पार्किंग करणाऱ्यांकडून शुल्क वसुली सुरू झाल्याने रेल्वेला महसूल मिळत आहे, तसेच वाहतूक कोंडीही टळली जात आहे. अनधिकृत पार्किंग करणारे, तसेच अनेक प्रवासी तेथेच लघुशंका करतात, त्यालाही आळा बसला आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये देवी चौकात जुने पार्किंग आहे. तेथे सुमारे दीड हजार दुचाकी पार्क करता येतात. येथे वाहनांची एवढी गर्दी झाली आहे, की प्रवाशांना वाहन शोधून बाहेर काढणे अवघड होते. गाड्यांवर प्रचंड धूळ साचलेली असते. या पार्किंगपासून रेल्वे स्टेशन दीडेशे-दोनशे मीटर दूर आहे. रोज अप-डाऊन करणारे येथे गाड्या लावतात. सकाळी गाडी पकडण्यासाठी व तिकीट काढण्यासाठी त्यांची प्रचंड ओढाताण होते. वर्षभरापूर्वी रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयामागील जागेत दुसरे पार्किंग सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि मनस्ताप वाचत आहे.

चारचाकींसाठी दोन पार्किंग (स्वतंत्र चौकट)

रेल्वे स्टेशनवर आता दोन ठिकाणी चारचाकींचे पार्किंग सुरू झाले आहे. चारचाकी वाहनांसाठी पार्सल ऑफिसजवळ अधिकृत पार्किंग आहे. असे दुसरे पार्किंग सुभाषरोडवर सुरू झाले आहे. नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बलाच्या मागील जागेत कुंभमेळ्यात काँक्रिटीकरण करून नवा तळ उभारण्यात आला आहे. त्या जागी नवीन पार्किंग झाले आहे. येथे अडीचशे दुचाकी उभ्या करता येतात. पार्किंग करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने आणि त्यातच या जागेत सरकते जिने उभे राहत असल्याने पार्किंगला अडथळा येत आहे. त्यामुळे हा तळ शेजारीच असलेल्या सुभाषरोडवर स्थलांतरित करण्यात आला आहे. येथे आता दुचाकीबरोबरच चारचाकी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

वाहनचालकांची लूट थांबली (स्वतंत्र चौकट)

चारचाकी वाहनांसाठी दोन ठिकाणी पार्किंग सुरू झाल्याने या चालकांकडून बेकायदेशीर शुल्क घेण्यास प्रतिबंध बसला आहे. चारचाकी वाहन उभे झाले, की चालकाकडून काही टवाळखोर रेल्वेची खोटी पावती देऊन तीस ते चाळीस रुपये वसूल करीत होते. पार्किंगचा बोर्ड दुचाकीचा असल्याने चालकही मुकाट्याने पैसे देत होते. या त्रासामुळे काही वाहनचालक रेल्वे सुरक्षा दल कार्यालयाशेजारील भिंतीशेजारी वाहने उभी करीत होते. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलही हतबल झाले होते. वाहनचालकाने बेकायदेशीर शुल्क देण्यास विरोध केला वाहनांचे नुकसान केले जात होते. आता चारचाकी वाहनांसाठी पार्सल ऑफिस आणि सुभाषरोडला वाहनतळ सुरू झाल्याने वाहनचालकांची लूट थांबली आहे.

(लोगो मटा इम्पॅक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात आवक कमी

$
0
0

मालेगाव : शेतकरी संपाचा सोमवारी चौथा दिवस होता. शहर व तालुक्यात संपाचा फारसा परिणाम झालेला नसला तरी बाजार समितीत भाजीपाला व भुसार शेतमालाची आवक मात्र मंदावलेली आहे. बाजार समितीमधील व्यवहार सुरू असले तरी शेतकरी संपामुळे भुसार मालाची आवक ३०० ते ४०० क्विंटल इतकीच होत आहे. मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावर देखील आवक घटली आहे. शहरात अन्यत्र मात्र भाजीपाला तसेच दूध विक्रीवर कोणताही परिणाम झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणव्यांपासून वनसंपदा जपण्याचे आव्हान

$
0
0

जागतिक पर्यावरणदिन

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : जंगलांमध्ये लागणारे वणवे हे आजही मोठे आव्हान असून, दरवर्षी वणव्यांमुळे कोट्यवधीची मौलिक वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. यंदा संपूर्ण भारतात वणव्यांच्या जेवढ्या घटना घडल्या त्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे, तर सर्वाधिक वणवे मार्च महिन्यात लागले आहेत. वन विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली असली तरी अद्याप वणव्यांचा दाह शमविण्यात सपशेल अपयश येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

हिमालय पर्वतरांग, पश्चिम घाट, विविध नद्यांचे खोरे, समुद्रकिनारा, ईशान्येतील घनदाट जंगल अशी वैविध्यपूर्ण जैवविविधता भारताला लाभली आहे. वनांच्या क्षेत्रात नांदणाऱ्या या विविधतेचे संगोपन करण्याचे मोठे आव्हान आहे. जंगलांमध्ये लागणारे वणवे ही वन विभागासाठी चिंतेची बाब आहे. मात्र, त्यातून कुठलाही दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. वनांमध्ये पेटणारे वणवे आटोक्यात यावेत, त्याची माहिती तत्काळ मिळावी यासाठी थेट उपग्रहाचीही मदत घेतली जात आहे. ज्या भागात वणवे लागले आहेत तेथील संबंधित वन विभाग आणि अधिकाऱ्याला त्याची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तत्काळ सूचना व्हावी, अशी यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वणव्यांसंबंधी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते, वणवे रोखण्यासाठी किंवा विझविण्यासाठी निधीचीही तरतूद केली जाते, वन विभाग खबऱ्यांना बक्षीसही देते हे सारे असले तरी वणव्यांचा दाह कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या १ जानेवारी ते ४ जून या कालावधीत संपूर्ण भारतात वणव्यांच्या तब्बल १ लाख २१ हजार ३४० घटना घडल्या आहेत. एकूण ५ लाख ९ हजार ३९६ ठिकाणी लागलेल्या या वण‌व्यांमुळे त्या परिसरातील मौलिक अशी वनसंपदा खाक तर झालीच आहे, पण या ठिकाणी असलेल्या जैवविविधतेलाही त्याचा फटका बसला आहे. देशात सर्वाधिक वणवे मध्य प्रदेशमध्ये (३१,७८८) लागले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात २९,४५४, ओडिशामध्ये २८,७१०, छत्तीसगढमध्ये २८,५०१ आणि मिझोरममध्ये ११,२८० ठिकाणी वणवे लागले आहेत. गेल्या वर्षी याच काळात महाराष्ट्रात २१,७२९ वणवे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास आठ हजार वणवे यंदा अधिक लागले आहेत.

डेहराडूनच्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून वणव्यांसाठी अत्याधुनिक अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. नासा या संस्थेने त्यासाठी मदत केली आहे. याद्वारे वन कर्मचाऱ्यांना थेट मोबाइलवर मेसेज प्राप्त होतो. अक्षांश आणि रेखांशाच्या माध्यमातून वणव्याचे ठिकाण कळविले जाते. काही वणवे किरकोळ स्वरूपाचे असतात. त्यामुळे ते आटोक्यात आणले जातात. मात्र, मोठे वणवे आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. यात लहान आणि मोठे अशा सर्वच प्रकारच्या वन्यजीवांना फटका बसतो, असे वन विभागाचे अधिकारी मान्य करतात. काही वन्यप्राण्यांचा अधिवासही यामुळे नष्ट होतो. वणवे लागल्यानंतर ते विझविणे हा उपचार असला तरी मुळात वणवे लागू नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने फारसे प्रयत्न होत नसल्याचे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने 'मटा'शी बोलताना सांगितले.

सर्वाधिक वणव्यांनी होरपळलेली पाच राज्ये

मध्य प्रदेश : ३१,७८८

महाराष्ट्र : २९,४५४

ओडिशा : २८,७१०

छत्तीसगढ : २८,५०१

मिझोरम : ११,२८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलाकारांना वेध कलासंगम महोत्सवाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आपल्या वाचकांसाठी नेहमीच नवनवीन संकल्पना घेऊन येत असते. गेल्या वर्षापासून 'मटा'ने 'कलासंगम' उपक्रमाचे आयोजन करून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे दिग्गज कलाकारांचा मानसन्मान देखील केला आहे. उत्कंठा वाढीस लावणारा कलासंगम महोत्सव ९ आणि १० जून रोजी कुसुमाग्रज स्मारक येथे होत असून, कलाकार व रसिकांना त्याचे वेध लागले आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जून रोजी कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे हा महोत्सव होणार आहे. प्रस्थापित कलाकारांच्या कलांचे सादरीकरण आणि उभरत्या कलाकारांना व्यासपीठ म्हणजे कलासंगम महोत्सव. विविध कलांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा हा महोत्सव शनिवारी होणार आहे. तालवाद्यापासून सुशीरवाद्यांपर्यंत साऱ्यांचाच समावेश यात राहणार असून, नाशिककर कलाकारांची शिगेला पोहोचलेली उत्कंठा आता पूर्णत्वाकडे गेली आहे. मटा कलासंगम महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी नाशिककरांनी महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला होता.

नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन, वादन, शिल्प, नृत्य, नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा कलासंगम महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवात नाशिकच्या सप्तकन्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर उभरत्या कलाकारांचे संबळवादन ठेवण्यात आले आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन व फोटोग्राफी या सात कलांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयांतील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे डेमोन्स्ट्रेशनही यावेळी होईल. नाशिकच्या कलावंतांचा समावेश असलेली आर्टिझन्स फिल्म यावेळी दाखविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांचे तबलावादन, गायन व नृत्य, तसेच काही डेमो होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. दोन्ही दिवस कुसुमाग्रज स्मारकात शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात दुर्मिळ नाणी, तसेच शस्त्रास्त्रे नाशिककरांना बघायला मिळणार आहेत. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या फेस्टसाठी हॅण्ड फाऊंडेशनचे सहकार्य लाभत आहे.

हौशी कलाकारांनो सहभागी व्हा!

या महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांसाठी व्यासपीठ देण्यात येणार आहे. हौशी कलाकारांना आवाहन करण्यात येत आहे, की गायन, वादन, नृत्य, चित्र, शिल्प, फोटोग्राफी, मॉडर्न आर्टमध्ये पीअर्सिंग, नेल आर्ट, तसेच आणखीही संबंधित आर्टमध्ये ज्यांना परफॉर्मन्स सादर करावयाचे असतील त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करावा. नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅनरद्वारे विरोधकांचा समाचार

$
0
0

धुळ्यातील पांझरा चौपाटीप्रकरणी आमदार गोटे आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पांझरा नदीकिनारीच्या प्रस्तावित रस्ता कामात अडथळा ठरत असलेली मंदिरे हटविण्यावरून ठाम असलेले आमदार अनिल गोटेंनी महापालिकेच्या बाहेर एक बॅनर लावून विरोधकांना आव्हान दिले आहे.

शहरातील पापंझरा चौपाटीवरील रस्ता बांधकाम आणि मंदिर अतिक्रमण हटावसंदर्भात जिल्ह्यातील तीन मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊनदेखील हा प्रश्न सुटलेला नाही, असेच या बॅनरमधून आमदार गोटेंनी सांगितल आहे. आपल्या विरोधकांवर या बॅनरद्वारे अप्रत्यक्ष टीकाही केलेली आहे. तसेच पांझरा नदीकिनारी दोन्ही बाजूला रस्ते होणारच, अशी भूमिका शहराचे आमदार अनिल गोटे घेतली आहे. या प्रकरणी महानगरपालिकेच्या बाहेर लावण्यात आलेला मोठा बॅनरने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून पांझरा चौपाटीवरील मंदिर हटाव अतिक्रमण आणि रस्त्याचे काम यावर वादंग सुरू आहे. याला बॅनरबाजीचा जोड मिळाला असून, आमदार गोटे यांच्याविरोधात शहरात बंद पुकारण्यात आला, प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली त्याला आमदार गोटे यांनी यातून उत्तर दिले आहे. आमदार गोटे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील मंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मंदिर बचावच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवाय विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनाही निवेदन देऊन आपले म्हणणे त्यांच्या कानी घातले होते. या सर्व खटाटोपाचा आमदार गोटे यांनी या बॅनरद्वारे विरोधकांचा समाचार घेतल्याचे दिसमन येत आहे. या बॅनरवर दिलेल्या मजकुराची शहरात चर्चा सुरू असून, हे प्रकरण कुठपर्यंत जाते याकडे धुळेकरांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिल्याबाईंच्या प्रतिमेचे कष्टकऱ्यांच्या हस्ते अनावरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील रेल्वे कामगारांकडून नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कार्यालयात अहिल्याबाई होळकर जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. 'एनआरएमयू'च्या कार्यालयास देण्यात आलेल्या अहिल्याबाईंच्या प्रतिमेचे कष्टकरी महिलांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमास मनमाड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक साईनाथ गिडगे, मच्छिंद्र बिडकर, अर्जुन काळे, हेमंत डोंगरे, राजेंद्र लहिरे, टीआरडी विभागाचे आढाव, राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद भारसकर होते. अहिल्याबाईंचा सन्मान त्यांनी मांडलेल्या विचारांचे आचरण केल्यावरच होईल. त्यामुळे त्यांच्या विचारांचे आचरण करावे, असे प्रतिपादन लहिरे यांनी केले.

'एनआरएमयू'चे सचिव अंबादास निकम यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर पिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप चव्हाण, भावराव आंधळे, कैलास सुपारे, कृष्णार शेरमाळे, किरण शिंदे, दत्तू शिंदे, राम चितनर, सुरेश पगारे, पवन भोजने संजय कदम, सुरेश मासाले, संजय वानखेडे, रोहन सलोदर, सतीश गांगुर्डे, सुनील गढवे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य लेखाधिकारी भोर यांची अखेर बदली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बदलीच्या प्रतीक्षेत असलेले महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांची अखेर मुंबईत बदली झाली आहे. भोर यांना राज्य सरकारने पदोन्नती दिली असून, त्यांना मुख्य लेखाधिकारी पदावरून उपसंचालक (प्रशासन) लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई या पदावर बढती देण्यात आली आहे.

भोर यांच्या बदलीमुळे नवी मुंबईचे मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे यांचा नाशिक महापालिकेत पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे यांची यापूर्वीच नाशिक महापालिकेत बदली झाली असली तरी, शासनाने महापालिकेतील लेखाधिकारी हे पद उपसंचालक दर्जाचे केले आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेतील सध्याच्या वातावरणाला कंटाळून सुभाष भोर यांनी राज्य सरकारकडे विनंती बदलीचा अर्ज केला होता. महापालिकेत सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाया आणि पदाधिकाऱ्यांच्या जाचामुळे त्यांनी महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. सरकारनेही त्यांची विनंती मान्य केली नसली, तरी नाशिक महापालिकेतील मुख्य लेखाधिकारी हे पद उपसंचालक दर्जाचे केले होते. पाठोपाठ नवी मुंबई महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे यांची नाशिक महापालिकेत बदली केली होती. परंतु, भोर यांना मात्र वेटिंगवर ठेवण्यात आले होते. आता राज्य सरकारने राज्यातील १० लेखाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात सुभाष भोर यांच्या बदलीचेही आदेश प्राप्त झाले आहेत. भोर यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची उपसंचालक, (प्रशासन) लेखा व कोषागारे संचालय मुंबई या पदावर बदली केली आहे. भोर यांच्या बदलीमुळे सुहास शिंदे यांचा महापालिकेतील उपसंचालक लेखा पदाचा भार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु शिंदे यांचे पद मुख्य लेखाधिकारी असले तरी, नाशिक महापालिकेतील लेखा विभागातील प्रमुख पद आता उपसंचालक दर्जाचे झाले आहे. त्यामुळे शिंदेंना पदभार घेण्यास अडचण आहे. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मर्जीवरच आता त्यांचा महापालिकेतील पदभार अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार न्यायालये नवीन जागेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस मुख्यालयाकडून मिळालेल्या अडीच एकर जागेत चार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालये अखेर सोमवारी स्थंलातरित करण्यात आली. सकाळी १० वाजता एका छोटेखानी कार्यक्रमानंतर कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात आले.

नाशिक जिल्हा कोर्टाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा नाशिक बार अससोसिएशनने प्रयत्नाने मिळवली. याच अडीच एकर जागेत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर ही चार न्यायालये स्थलांतरित करण्यात आली आहेत. सदर न्यायालयांचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजीत हांडे यांच्या उपस्थितीत पार पडले. नाशिक बार असोसिएशन आणि नाशिक जिल्हा न्यायालय प्रशासन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर तसेच नाशिक बार अससोसिएशनचे पदाधिकारी अ‍ॅड. प्रकाश आहुजा, अ‍ॅड. जालिंदर ताडगे, अ‍ॅड. शरद गायधनी, अ‍ॅड. श्यामला दीक्षित, अ‍ॅड. संजय गिते, अ‍ॅड. हर्षल केंगे, अ‍ॅड. महेश लोहिते, अ‍ॅड. शरद मोगल, अ‍ॅड. सोनल कदम, अ‍ॅड. कमलेश पाळेकर, अ‍ॅड. श्रीधर माने यांच्यासह इतर वकील मोठ्या संख्येने हजर होते.

इतर न्यायालयेही होणार स्थलांरित

जिल्हा कोर्टासाठी पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा हायकोर्टाच्या आदेशाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता तसेच पोलिस प्रशासनाने आपली आस्थापने स्थलांतरित केल्यानंतर रिकाम्या झालेल्या इमारती कोर्टाला उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा विचार करून येथे फक्त दिवाणी न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. फौजदारी स्वरुपाचे खटले चालविणाऱ्या न्यायालयांना विशेष सुरक्षेची आवश्यकता भासते. एकदा दिवाणी न्यायालये व्यवस्थित सुरू झाली की हळूहळू इतर न्यायालयेदेखील नवीन जागेत स्थलांतरित करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामांचे २८५० प्रस्ताव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण-२०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार महापालिकेत अनधिकृत बांधकामांच्या प्रस्तावांचा पाऊसच पडला आहे. या प्रस्तावांची संख्या अडीच हजारांच्याही पार गेली आहे.

नगररचना विभागाकडून या प्रस्तावांची मोजदाद सुरूच असून, आतापर्यंत २८५० प्रस्तावांची नोंद झाली आहे. अजूनही मोजदाद सुरूच असल्याने ही संख्या तीन हजारापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने राज्यभरातील अनधिकृत बांधकामे दंडात्मक शुल्क भरून नियमित करून घेण्यासाठी 'महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण-२०१७' जाहीर केले होते. या धोरणाअंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची प्रकरणे कम्पाउंडिंग चार्जेस भरून नियमित करता येणार आहेत. त्यासाठी ३१ मेची डेटलाइन निश्चित करण्यात आली होती. या धोरणाअंतर्गत अनेकांनी अनधिकृत बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी पालिकेच्या नगररचना विभागामध्ये मोठी गर्दी केली होती. कपाट प्रकरणामुळे साडेसहा हजार इमारतींना बांधकाम परवाना मिळालेला नाही. त्यामुळे यातील अडीच हजार बिल्डरांनी या धोरणाचा लाभ घेतला असल्याचे समोर आले होते. प्रत्यक्षात हा आकडा आता २८५० पर्यंत पोहचला आहे. नगररचना विभागाकडे दाखल असलेल्या प्रस्तावांची मोजदाद सध्या सुरू असून, ते तीन हजारांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमिताभ यांच्या प्रवासाचे ‘७५ फ्रेम्स’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाची झलक दाखविणाऱ्या '७५ फ्रेम्स' हे प्रदर्शन हॉटेल ताज गेट वे येथे भरविण्यात आले आहे. अमिताभ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त चित्रकर्ती शर्वरी लथ व रतन लथ यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सन १९७२ ते १९८२ च्या दशकात अँग्री यंग मॅन दाखविण्यात अमिताभ बच्चन यशस्वी झालेले होते. त्यांच्या अभिनयाची आणि डायलॉग्जची छाप जननमानसावर अजून आहे हीच मेख ओळखून शर्वरी यांनी अमिताभ यांच्या पोस्टर प्रदर्शनाची संकल्पना साकारली आहे. हॉटेल ताज गेट वे येथे आयोजित केलेल्या या प्रदर्शनात बिग बी यांच्या सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाची झलक बघावयास मिळते. प्रदर्शनात ७२ ते ८२ या दशकातील अमिताभ बघितल्यावर त्या काळातील अदालत, खून पसीना, डॉन, कसमे वादे, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, काला पत्थर, कालिया, लावारिस या चित्रपटांची आठवण होते. १९८४ साली जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा इंदिराजींच्या अंत्यसंस्काराच्यावेळी मित्र राजीव गांधी यांच्या दु:खात अमिताभ हेदेखील शोकमग्न झालेले प्रदर्शनातील एका पोस्टरमध्ये दाखविण्यात आलेले आहे.

पत्नी जया बच्चन, मुले अभिषेक, श्वेता यांच्यासोबतची काही चित्रे यात आहेत. त्यांचा अलिकडच्या काळातील लूकदेखील या प्रदर्शनात दाखविण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे अलाहाबाद मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या अमिताभ यांचे त्यावेळचे पोस्टर प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहे. एकूणच अमिताभ यांचा चेहरा अधिक स्पष्ट करणारे हे प्रदर्शन असून, प्रदीप चंद्रा आणि एसएमएम ओजा यांची ती निर्मिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नदीत बुडून महिलेचा मृत्यू

$
0
0

पंचवटी : औरंगाबाद रोडवरील ओढा शिवारातील नदीपात्रात कपडे धुणाऱ्या महिलेचा पाण्यात तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ३) दुपारी घडली. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अलका गजानन सोनवणे (वय ४५, रा. ओढा शिवार, ता. जि. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. अलका सोनवणे या रविवारी दुपारी गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवत असताना अचानक त्यांचा तोल गेला. त्यांना पाण्याबाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

---

हिरावाडीत युवकावर प्राणघातक हल्ला

पंचवटी : हिरावाडी परिसरात सोमवारी (दि.४) एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला. किरकोळ भांडणाचा मनात राग धरून हा हल्ला चार ते पाच जणांच्या टोळक्याने केला आहे. धारदार शस्त्राने या युवकावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेतील जखमीवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार रवींद्र सामंत (वय १९, राहणार, फ्लॅट नं.१०, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगला परिसर, अमृतधाम) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तुषार सोमवारी (दि.४) दुपारी साडेतीन-चार वाजेच्या सुमारास त्रिकोणी बंगला परिसरातील अंबिका पार्क जवळून जात असताना, अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने तुषारवर धारधार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात तुषारच्या पाठीत व पोटात वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या तुषारला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडे पडल्याने वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पिंपळगाव-निफाड रस्त्यावर वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ मोठी झाडे उन्मळून पडल्याने या मार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दावचवाडी, लोणवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. पिंपळगाव-निफाड मार्गावर वादळामुळे चार ते पाच ठिकाणी लिंबाचे झाड थेट रस्त्याच्या मधोमध पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आंदोलन चौकट

$
0
0

शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या संपाला नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे, असा दावा संघटनेच्या शंकर दरेकर यांनी केला आहे. बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढत असल्याचे भासविले जात असले तरी नेहमीच्या तुलनेत ही आवक मोठ्या प्रमाणात रोडावल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करायला हवेत, असे वक्तव्य अभिनेत्री रविना टंडन यांनी केले. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांनीही या आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट ठरवित शेतकऱ्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांचाही नाशिकमधील शेतकरी संघटनांनी निषेध नोंदविला आहे. शेतकऱ्यांच्या भावना भडकावण्याचा उद्योग कुणी करू नये, असा इशाराही संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान नागपूर येथे जय जवान जय किसान संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या पदाधिकाऱ्यालाही नाशिकमधील शेतकऱ्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालघर’ची पुनरावृत्ती करा

$
0
0

कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्र्यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

लोकसभेच्या पालघर मतदारसंघात प्रतिकूल परिस्थिती असतांनाही भाजपने विजय खेचून आणला. पालघरच्याच निकालाची पुनरावृत्ती नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातही करा, असे आवाहन जलसंपदा मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी नाशिकरोड येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना केले.

भाजप उमेदवार अनिकेत पाटील यांचा उमेदवारी उर्ज दाखल करण्यापूर्वी दत्तमंदिर येथील उत्सव लॉन्स येथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात महाजन बोलत होते. पालघर निवडणूक म्हणजे भाजपचे नवीन व्हर्जन आहे. या व्हर्जनचा पुरेपूर वापर नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत केल्यास भाजपलाच यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानपरिषदेत भाजपचे संख्याबळ पुरेसे करण्यासाठी ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याची भावनिक सादही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी घातली.

गेल्या चार वर्षांत भाजपच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. परंतु, राज्यसभा व विधान परिषदेत भाजपकडे बहुमत नसल्याने या सर्व चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी उशिरा झाली. यापुढे याप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करा, असे आवाहन पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र राज्यसभेसह विधान परिषदेत भाजपचा बहुमत मिळाल्यास जनतेसह शिक्षकांचे प्रश्न सोडविणे आणखी सोपे जाईल. यासाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवारास विजयी करा, असे आवाहन जलसंधारणमत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी केले. या मेळव्यात उमेदवार अनिकेत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास मंचावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती हिमगौरी आडके, दिनकर पाटील, संभाजी मोरुस्कर, माजी आमदार शिवराम झोले, गुलाबराव पाटील यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे

$
0
0

मान्सूनपूर्व पावसामुळे वित्त व जीवित हानी

- एका व्यक्तीचा मृत्यू; सहा जण जखमी;

- २१ जनावरे दगावली

- २५६ मालमत्तांचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने गेल्या तीन दिवसांत जीवित आणि वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. आंबेवाडी (ता. इगतपुरी) येथे वीज अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, ठिकठिकाणी अशा घटनांमध्ये २१ जनावरे दगावली आहेत. याखेरीज घरे, गोठे, कांदाचाळ, शेडनेट अशा २५१ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, त्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. परंतु, त्याआधीचे दोन दिवस वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्यातील काही भागात थैमान घातले. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. धुळवड (ता. सिन्नर) येथे निवृत्ती रामनाथ आव्हाड यांच्या घरासह लगतच्या सात ते आठ घरांचे नुकसान झाले असून, चारजण जखमी झाले आहेत. शहा येथे ३२ घरांची अंशत: पडझड झाली असून, ग्रामपंचायत सभागृह व कांदाचाळीचे नुकसान झाले. देवपूर येथे २१ घरे, चार पोल्ट्री शेडचे नुकसान झाले असून वीज अंगावर पडून बैल, वासराचा मृत्यू झाला आहे. वावी येथे २६ घरांचे तर नांदूरशिंगोटे येथे २२ घरांचे नुकसान झाले आहे. पांढुर्ली येथे १५ घरे, १४ गोठे व सात शेडनेटची थोडी पडझड झाली आहे. बागलाण तालुक्यातील कर्हे येथे एका वासराचा मृत्यू झाला आहे. मालेगाव तालुक्यातील पोहाणे गावात राघो देवाजी सोनवणे यांच्या बैलाचाही वीज अंगावर पडून मृत्यू झाला. याच तालुक्यातील संवदगाव येथे वादळी वाऱ्याने विजेची तार तुटली. विजेचा धक्का बसून म्हैस, बोकड आणि तीन शेळयांचा मृत्यू झाला. माल्हणगाव येथे गोठ्याचे पत्रे उडाले असून, भिंतही पडली आहे. भरविर बु. (ता. इगतपुरी) येथे तान्हाजी किसन झनकर यांच्या घराचे पत्रे उडाले. आंबेवाडीत अंगावर वीज पडून एका व्यक्तीसह तीन गायी, दोन बैलांचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यातील सोनगाव येथे शिवनाथ त्र्यंबक गावले यांच्या एका गायीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. तारुखेडले येथील सदाशिव वामन शिंदे व अनंत माधव जगताप यांच्या घरांचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कुंदेवाडीत वीज अंगावर पडून एक महिला ४० टक्के भाजली आहे. त्यांच्यावर निफाडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोळगाव येथील किरण दिनकर गवळी यांच्या घराचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले. पत्र्यांवरील दगड डोक्यात पडल्याने गवळी जखमी झाले.

-

येवल्यात घरांचे नुकसान

येवला तालुक्यातील डोंगरगाव, सुरेगाव, गारखेडे, देवळाणे, कानडी, दुगलगाव, खैरगव्हाण, अंदरसूल, नगरसूल, विखरणी, भिंगारे या गावांमध्ये वादळीवारा आणि विजांमुळे घरांचे नुकसान झाले आहे. डोंगरगाव येथे रामेश्वर विठ्ठल सोमसे यांच्या एका बैलाचा वादळी वाऱ्याने गोठा पडून मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images