म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठीची महापौर रंजना भानसी यांची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेटाळून लावल्यानंतर आता महापौरांचीही महापालिकेत कवडीची किंमत राहिली नसल्याची भावना भाजप नगरसेवकांमध्ये बळावली आहे. विशेष म्हणजे बजेटमध्ये यासाठीची तरतूद असतानाही, केवळ शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन २६ वर्षांची परंपरा खंडित करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे विरोधकांसोबतच महापौरांसह सत्ताधारी नगरसेवकही दुखावले गेल्याने त्याचे पडसाद आता आचारसंहिता संपताच उमटणार आहेत. मुंढे यांच्या विरोधात आता सर्वपक्षीय व्यूहरचना आखण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. यासंदर्भात शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या गुप्त बैठका होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच करवाढीचे आंदोलन तीव्र करून मुंढेंच्या विरोधी आंदोलनाला धार येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनीच आपणास नाशिकमध्ये पाठवल्याचे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता महापालिकेतील कारभारावर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापालिकेतील भाजपच्या पदाधिकारी, विरोधी पक्षांसह नगरसेवकांना पालिकेतूनच हद्दपार केले आहे. लोकप्रतिनिधींच्या सर्व कामांवर फुली मारल्यामुळे दुखावल्या गेलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना करवाढीच्या निर्णयामुळे मुंढेंच्या विरोधात लढण्याचे बळ मिळाले होते. करवाढीच्या माध्यमातून मुंढेंविरोधात आंदोलनाची धार तीव्र करण्यात आली. त्याचे परिणाम करवाढीला स्थगिती देण्यात झाली. परंतु, मुंढे यांच्या मदतीला विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता धावून आली. मुंढे यांनी या आचारसंहितेचा बाऊ करीत, स्थगितीचा वार सत्ताधाऱ्यांवर पलटवला. त्यामुळे सत्ताधारी याचा वचपा आचारसंहिता संपताच काढण्याच्या तयारीत होते. परंतु, पुन्हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागल्याने आचारसंहितेची मुदत २ जुलैपर्यंत वाढली. त्यामुळे पदाधिकारी पुन्हा हतबल होऊन त्यांनी पालिकेपासून अंतर राखले. मात्र, संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या स्वागतासह ईदसाठी ईदगाह मैदानावर सुविधा देण्यास एका शासकीय पत्रकाच्या आधारे प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी या निर्णयावर टिकेची झोड उडवली.
संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या स्वागताची परंपरा २६ वर्षांपासून आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय मागे घेऊन स्वागतासंदर्भात आदेशित करण्याची विंनती महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांकडे केली. महापौरांनी आयुक्तांना पत्र दिल्याने यातून मार्ग निघेल अशी आशा असतानाच, आयुक्तांनी महापौरांचीही मागणी फेटाळून लावल्याने हा घाव भाजपसह महापौरांच्या वर्मी लागला आहे. महापालिकेत महापौरांच्या शब्दावर दोन ते तीन लाखांचाही खर्च होत नसल्याची भावना भाजपच्या नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांमध्ये बळावली आहे. विशेष म्हणजे यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली असून, महासभेने बजेटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या खर्चाबाबत कोणताही वाद नसताना, प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे आता भाजप पुन्हा आक्रमकतेच्या पावित्र्यात आले आहे. त्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुंढेंच्या विरोधातील लढाईत शिवसेनेसह, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेलाही सहभागी करून घेण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पाहिली जात आहे.
गुप्त बैठका सुरू
महापालिकेतील सध्याच्या प्रशासकीय राजवटीला आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकही कंटाळले आहेत. त्यातच पालखी सोहळ्यावरून या पक्षांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या कृतीचा निषेधही केला आहे. पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवक यामुळे दुखावले गेले असून, समदु:खी असलेले सत्ताधारी आणि विरोधक आता मुंढेंच्या मुद्द्यावर एकत्र यायला तयार झाले आहेत. त्यामुळे मुंढे यांचे करायचे काय, यावर भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर दोघांचेही अस्तित्व संपेल. म्हणून दोघांनी आचारसंहिता संपताच काहीतरी सोक्षमोक्ष लावण्यावर एकत्र येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आचारसंहितेनंतर मुंढेंच्या विरोधात आंदोलानाला पुन्हा धार येण्याची शक्यता आहे.
नाशिकला वेगळा न्याय का?
महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांना पत्र पाठवून पालखी सोहळ्यासाठी अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, अशी विनंती केली होती. त्यावर प्रशासनाने कोणताही विचार न करता, सरकारकडून आलेले परिपत्रक जोडून महापौरांकडे परत पाठवून दिले आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा पवित्रा महापौरांच्या जिव्हारी लागला आहे. महापौरांचीही किंमंत केली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंडवडकडून या आदेशाला केराची टोपली दाखली असताना, नाशिकमध्येच त्याची अंमलबजावणी का केली जाते, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.