मंगळवारी सायंकाळी अर्धा तास पाऊस; जिल्ह्यात इतरत्र मात्र प्रतिक्षाच म. टा. वृत्तसेवा, सटाणा गेल्या पंधरवाड्यापासून चातकासारखी वाट बघत असलेल्या बळीराजाला वरुणराजाने मंगळवारी सायंकाळी सुखद धक्का दिला. मंगळवारी सटाणा शहरासह परिसरात तब्बल पाऊण तास जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैरण झालेल्या जनतेला पावसाने ओलेचिंब करीत वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अजून दमदार पावसाची गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून कडकडीत ऊन पडत होते. घामाच्या धारांनी बेजार झालेल्या सटाणा शहरवासीयांना मंगळवारी सायंकाळी अचानकपणे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर थोड्याच वेळात नामपूर रोड परिसरासह निम्म्या शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सोसाट्याचा सुटताच पावसाने आगमन झाले. सटाणा शहरात जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पावसाच्या आगमनासाठी आतूर झाले होते. सोमवारी तरसाळी परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील इतर भागात मात्र सकाळपासून कडकडीत ऊन होते. मात्र सायंकाळी आलेल्या पावसाने सगळ्यांना आनंद झाला. पाऊस सुरू असतांनाच शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली. त्यातही काही विद्यार्थ्यांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. भाजीपाला विक्रेत्यांसह इतर लहान व्यापाऱ्यांचेही या पावसाने हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आडोशाचा आधार घ्यावा लागला. वीजपुरवठा खंडित मंगळवारी सायंकाळी खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. या पावसामुळे शहरातील गटारी, नाले प्रवहित झाले होते. 00 मनमाडला मुसळधार म. टा. वृत्तसेवा, मनमाड मनमाड शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा होता. कडाकडीत उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी पावणे पाच ते पाचच्या दरम्यान शहरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. तब्बल अर्धा ते पाऊण तास पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले. काही ठिकाणी गटारी तुंबल्या. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले. शाळेच्या वेळात पाऊस आल्याने मुलांना शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या पालकांची एकच झुंबड उडाली. चांदवड , नांदगाव ढगाळ चांदवड व नांदगाव तालुका परिसरात मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते , पावसाने वातावरण निर्मिती केली पण पाऊस सायंकाळ पर्यंत पडला नसल्याने नागरिकांची निराशा झाली. 000 वादळी पावसाने कांदा चाळीचे नुकसान म. टा. वृत्तसेवा,कळवण जून महिन्याच्या पंधरवड्यात एकदाही न झालेल्या पावसाने सोमवारी दुपारी कळवण शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे दोन शेड कोसळले. या शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. भेंडी येथील मराठी शाळेचे पत्रे उडाल्याने शाळेचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. सोमवारी दुपारी कळवण शहरासह तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शिंदे यांचे कांदा साठवणीचे दोन शेड जमीनदोस्त झाले. दोन्ही शेडमधील १६०० क्विंटल कांदा पाण्यात भिजला. मागील पंधरवाड्यात बोरदैवत परिसरातील शेकडो घरांची पडझड होऊन घरांवरील पत्रे उडाले होते. तर काही घरांच्या भिंती पडल्यामुळे नुकसान झाले होते. शिवाय घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करून शासनस्तरावरून नुकसान भरपाई द्यावी. नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे. पंचनाम्याच्या सूचना तहसीलदार कैलास चावडे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानीबाबत पंचनामे करण्याची सूचना केली असून, कांदा शेड बाबत भरपाईची तरतूद नसून अन्य नुकसान ग्रस्तांना शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती नुकसान भरपाई नुकसानग्रस्तांना देणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. 000
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट