Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सटाणा, मनमाडला पावसाचा दिलासा

$
0
0

मंगळवारी सायंकाळी अर्धा तास पाऊस; जिल्ह्यात इतरत्र मात्र प्रतिक्षाच

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या पंधरवाड्यापासून चातकासारखी वाट बघत असलेल्या बळीराजाला वरुणराजाने मंगळवारी सायंकाळी सुखद धक्का दिला. मंगळवारी सटाणा शहरासह परिसरात तब्बल पाऊण तास जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैरण झालेल्या जनतेला पावसाने ओलेचिंब करीत वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अजून दमदार पावसाची गरज आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कडकडीत ऊन पडत होते. घामाच्या धारांनी बेजार झालेल्या सटाणा शहरवासीयांना मंगळवारी सायंकाळी अचानकपणे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर थोड्याच वेळात नामपूर रोड परिसरासह निम्म्या शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सोसाट्याचा सुटताच पावसाने आगमन झाले. सटाणा शहरात जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पावसाच्या आगमनासाठी आतूर झाले होते. सोमवारी तरसाळी परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील इतर भागात मात्र सकाळपासून कडकडीत ऊन होते. मात्र सायंकाळी आलेल्या पावसाने सगळ्यांना आनंद झाला. पाऊस सुरू असतांनाच शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली. त्यातही काही विद्यार्थ्यांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. भाजीपाला विक्रेत्यांसह इतर लहान व्यापाऱ्यांचेही या पावसाने हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आडोशाचा आधार घ्यावा लागला.

वीजपुरवठा खंडित

मंगळवारी सायंकाळी खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. या पावसामुळे शहरातील गटारी, नाले प्रवहित झाले होते.

00

मनमाडला मुसळधार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा होता. कडाकडीत उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी पावणे पाच ते पाचच्या दरम्यान शहरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. तब्बल अर्धा ते पाऊण तास पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले. काही ठिकाणी गटारी तुंबल्या. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले. शाळेच्या वेळात पाऊस आल्याने मुलांना शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या पालकांची एकच झुंबड उडाली.

चांदवड , नांदगाव ढगाळ

चांदवड व नांदगाव तालुका परिसरात मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते , पावसाने वातावरण निर्मिती केली पण पाऊस सायंकाळ पर्यंत पडला नसल्याने नागरिकांची निराशा झाली.

000

वादळी पावसाने कांदा चाळीचे नुकसान

म. टा. वृत्तसेवा,कळवण

जून महिन्याच्या पंधरवड्यात एकदाही न झालेल्या पावसाने सोमवारी दुपारी कळवण शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे दोन शेड कोसळले. या शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. भेंडी येथील मराठी शाळेचे पत्रे उडाल्याने शाळेचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे झालेल्या

नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

सोमवारी दुपारी कळवण शहरासह तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शिंदे यांचे कांदा साठवणीचे दोन शेड जमीनदोस्त झाले. दोन्ही शेडमधील १६०० क्विंटल कांदा पाण्यात भिजला. मागील पंधरवाड्यात बोरदैवत परिसरातील शेकडो घरांची पडझड होऊन घरांवरील पत्रे उडाले होते. तर काही घरांच्या भिंती पडल्यामुळे नुकसान झाले होते. शिवाय घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करून शासनस्तरावरून नुकसान भरपाई द्यावी. नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे.

पंचनाम्याच्या सूचना

तहसीलदार कैलास चावडे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानीबाबत पंचनामे करण्याची सूचना केली असून, कांदा शेड बाबत भरपाईची तरतूद नसून अन्य नुकसान ग्रस्तांना शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती नुकसान भरपाई नुकसानग्रस्तांना देणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहिरीत मिळाल्या चोरीच्या दुचाकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अंबड औद्योगिक परिसरातील चुंचाळे शिवारातून दोन चोरीच्या दुचाकी शोधण्यात अंबड पोलिसांना यश आले असून, आतापर्यंत या चोरीच्या वाहनांची सख्या आठवरून दहावर पोहोचली आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत १० जून रोजी घरफोडीची घटना घडली होती. त्यासंदर्भात अंबड पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून वाहनचोर शोधण्यास यश मिळवले.

चोरी व घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी विजय केशव गुप्ता (वय २२, रा. चुंचाळे, अंबड), प्रशिक उर्फ भुऱ्या बाळू भरीत (वय १९, रा. वरचे चुंचाळे, अंबड) व नवनाथ उर्फ डॉलर रामदास साळवे (वय १९ रा. आंबेडकरनगर, वरचे चुंचाळे, अंबड) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी अंबड पोलिस ठाणे हद्दीतील अंबड औद्योगिक परिसरात असलेल्या कंपनीमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली होती. त्यांच्याकडून कंपनीमधील चोरी गेलेले १ लाख २५ हजार रुपये किमतीचे पार्ट्स जप्त करण्यात आले होते. तसेच, यातील संशयित आरोपी नवनाथ साळवे याच्याकडून २ लाख ४० हजार किमतीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीवरून अंबड येथील चुंचाळे शिवारातील एका विहिरीतून आणखी दोन दुचाकी क्रेनच्या साह्याने शोधून काढल्या. यातील एक संशयित आरोपी फरार असून, त्याला पकडल्यानंतर आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओंनी घेतला योग दिनाचा आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानिमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून विशेष कार्यक्रमाचे आयो​जन करण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करून विद्यार्थी, पालक, नागरिक व ग्रामस्थ यांच्यामध्ये जनजागृती होण्यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधत प्रत्येक शाळेमध्ये योगासनांचे प्रात्यक्षिक, प्राणायाम, आदींबाबत तसेच नागरिकांचा सहभाग घेऊन योग दिन साजरा करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषण सिन्नर आढावा

$
0
0

कुपोषण निर्मूलनाची राज्यपालांकडून दखल

डॉ. नरेश गीते यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी तीन हजारापेक्षा जास्त ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या कामाची राज्याच्या राज्यपालांनीही दखल घेतली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

सिन्नर तालुक्याची तालुकास्तरीय आढावा बैठक ज्वालामाता मंगल कार्यालयात डॉ. गिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते म्हणाले, की कुपोषणाच्या सर्वेक्षणातून काही बालके सुटली असल्यास पुन्हा सर्वेक्षण करून त्या बालकांना शोधून त्यांना ग्राम बाल विकास केंद्रात आणावे, असे आदेश दिले. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक जिल्ह्याचे काम समाधानकारक असून, तीन महिन्यांपूर्वी नाशिक जिल्हा देशात २२५ क्रमांकावर होता, मात्र आज १०६ क्रमांकावर आला आहे. या योजनेत सिन्नर तालुका सर्वात मागे असल्याने नाराजी व्यक्त करीत गिते यांनी प्रत्येक ग्रामसेवकाचा आढावा घेऊन घरकुल पूर्ण करण्याचे आदेश दिले. यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाकडून काम पूर्ण होण्याची मुदत लेखी स्वरुपात लिहून घेण्यात आली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी ग्राम बाल विकास केंद्रांचा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे यांनी आरोग्य विभागाचा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेलकंदे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी दूषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला.

ग्रामविकास अधिकाऱ्याचा सत्कार

सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी येथील ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी कुपोषण निर्मूलनासाठी पुढाकार घेतला आहे. गावात एकूण ४१७ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात १२ तीव्र कुपोषित तर २९ मध्यम कुपोषित बालके आढळून आली. या बालकासाठी गावात ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले असून, यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार आहार व औषध देण्यात येत आहेत. आहार व औषधांमुळे १२ तीव्र कुपोषित बालके मध्यम कुपोषित श्रेणीत गेली असून, मध्यम कुपोषित बालकांपैकी १४ बालक सर्वसाधारण श्रेणीत गेली आहेत. या कामात योगदान दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी येथील ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांचा शेवग्याचे झाड देऊन सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५६९ जातपडताळणी प्रमाणपत्रांचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी तंत्रशिक्षण महामंडळाने जातपडताळणी सक्तीची केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून नाशिक येथील समाज कल्याण विभागाच्या जातपडताळणी विभागाकडे आलेल्या हजारो अर्जापैकी केवळ ५६९ जातपडताळणी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन या विभागावर न्यायालयाने ताशेरे ओढून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना जात पडताळणी सक्तीची करा असे आदेश दिले होते. हा निकाल ६ सप्टेंबर २०१७ रोजी लागला होता. या आदेशाबाबत तंत्रशिक्षण मंडळाने सामजकल्याणच्या जातपडताळणी विभागाला कल्पना देणे गरजेचे होते. परंतु, तंत्रशिक्षण विभागाने समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी विभागाला ११ जून २०१८ रोजी याबाबत माहिती दिली. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ नसताना समाजकल्याण विभागावर अचानक कामाचा ताण वाढला, अचानक अर्जांचा लोड आल्याने तत्काळ शहनिशा न करता प्रमाणपत्र देता येत नाही तरीही चार दिवसांत जातपडताळणी विभागाने ५६९ प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे.

३ हजार २०० अर्जांमध्ये त्रुटी

जातपडताळणी विभागाकडे आलेल्या अर्जांमध्ये अनेक त्रुटी असून, या अर्जांमध्ये काहींचे पत्ते अपुरे तर काही अर्जदारांनी पुराव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, असे तीन हजार २०० अर्ज प्रलंबीत आहेत. या अर्जदारांना कल्पना देण्यात आली असून, अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. जातपडताळणी अर्ज भरताना तो ऑनलाइन भरावा लागतो. प्रत्येक अर्जदार स्वत: अर्ज भरीत नाही. तो अर्ज सायबर कॅफेच्या संचालकाकडून भरुन घेतला जातो. काही वेळा त्यात मोबाइल नंबर टाकला जात नाही. त्यामुळे अर्जामध्ये त्रुटी असल्यास अर्जदाराला कळवता येत नाही. असे अनेक अर्ज पडून आहेत.

केवळ दोन कर्मचाऱ्यांवर भिस्त

समाज कल्याण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असली तरीही काम मात्र कासवगतीने सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी सपर्क साधला असता या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी केवळ दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित १५ कर्मचारी कंत्राटी आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेही अधिकार नसल्याने ते कार्यवाही करू शकत नाहीत. यातील काही कर्मचारी अप्रशिक्षित आहेत. त्यामुळे आलेल्या प्रकरणांचे वर्गीकरणही त्यांना व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे काम पुढे सरकत नाही. येणाऱ्या गर्दीचा लोंढा बघता समाजकल्याण विभागाच्या उपायुक्त वंदना कोचुरे यांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.

कॅम्पला प्रतिसाद नाही

अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी असतात. या त्रुटी पूर्ण केल्याशिवाय पडताळणी प्रमाणपत्र देता येत नाहीत. यासाठी २१ मे ते २५ या कालावधीत विभागाच्या वतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्यांच्या अर्जांबाबत अडचणी आहेत अशा अर्जदारांपैकी बोटावर मोजण्याइतक्या अर्जदारांनी आपल्या अर्जातील त्रुटी पूर्ण केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळ बाद

$
0
0

निवडणूक लढणार नसल्याचे छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

"मी लोकसभा लढवायची, की विधानसभा याचा विचार अद्याप केलेला नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर नाशिककरांनी यापूर्वीच माझी हौस फेडलेली असून, त्यावर आता न बोललेलेच बरे. भविष्यात काय करायचे, मी आता सांगू शकत नाही," असा खुलासा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंग‌ळवारी नाशिकमध्ये केला. माजी खासदार समीर भुजबळ मात्र कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

भुजबळ काका-पुतण्यांच्या राजकीय वाटचालीबाबत बरेच अंदाज बांधले जात होते. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. या पत्रकार परिषेदत समीर भुजबळही उपस्थित होते. छगन भुजबळ म्हणाले, की मी सध्या आजारी आहे. त्यामुळे अद्याप कोणतीही निवडणूक लढण्याचा विचार केलेला नाही. भविष्यात काय करायचे, हे मी आता सांगू शकत नाही. समीर मात्र निवडणूक लढवणार नाही. तसेच, मी पक्ष संघटनेविषयी काय काम करायचे याचा निर्णय पक्ष घेईल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह राज्य सरकारच्या कामगिरीवरही टीका केली. सरकारने राज्यावरील कर्ज दुप्पट केले आहे. सरकार चांगले काम करीत असून, सध्या सर्वत्र अदृश्य विकासही दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पालकमंत्र्याकडे अनेक खाती असून, त्यांच्यावर आता उपोषणे सोडवण्याचीही जबाबदारी असल्याचा टोला त्यांनी पालकमंत्री नाशिकला येत नसल्याबद्दलच्या प्रश्नावर लगावला.

खडसेंनाबरोबर घेऊन काम करू!

एकनाथ खडसे यांनी ओबीसी प्रश्नांविषयी छगन भुजबळ यांचे समर्थन केले होते. याविषयी ते म्हणाले, की ओबीसींसाठी एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित केले. चर्चा घडवली. त्याद्वारे त्यांनी ओबीसी हितासाठी चांगले योगदान दिले आहे. भविष्यातही त्यांच्या भूमिकेचा विचार करू. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. त्यामुळे भविष्यात ओबीसी व त्यांच्या प्रश्‍नांसाठी खडसेंसह सर्वांनाबरोबर घेऊन काम करता येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

मोठेपणा की अडचण?

विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयात छगन भुजबळ यांचाही वाटा असल्याचा दावा केला होता. त्याबाबत विचारले असता, छगन भुजबळ म्हणाले, की कोणीही काहीही वक्तव्य करू शकतो. परंतु, दराडेंनी या वक्तव्यातून मला मोठेपणा दिला, की मला अडचणीत आणण्यासाठी वक्तव्य केले हे मात्र समजले नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगदिनानिमित्त युवा संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेहरू युवा केंद्राच्या वतीने चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी सकाळी ७ ते १० या कालावधीत गंगापूर रोड येथील समाजकार्य महाविद्यालयात युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. विलास देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात जिल्ह्यातील गाव व तालुका पातळीवरील सर्व नेहरू युवा केंद्राशी संलग्नित युवा, महिला, क्रीडा मंडळे, व्यायामशाळा व सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी तसेच योग विद्या गुरुकुलचे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. युवक-युवतींनी योग दिन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वय भगवान गवई यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे यांना रोटरीचा नाशिकभूषण पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा 'नाशिक भूषण २०१७-१८' पुरस्कार कृषिक्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. शुक्रवारी (२२ जून) आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

नाशिक ही ज्यांची जन्मभूमी अथवा कर्मभूमी आहे आणि ज्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:बरोबर नाशिकचे नाव उज्ज्वल केले अशा व्यक्तींना 'नाशिक भूषण' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची संकल्पना १९९६-९७ पासून रोटरी क्लब ऑफ नाशिक राबवत आहे. रोटरी क्लबच्या पुरस्काराने याआधी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, शांताबाई दाणी, कुसुमताई पटवर्धन, वसंतराव गुप्ते, दादासाहेब पोतनीस, विनायकदादा पाटील, डॉ. वसंत पवार. बापू नाडकर्णी, बाबुभाई राठी, कृष्णराव वाईकर, बाळासाहेब दातार, सुधाकर भालेराव, बेंजन देसाई, जगुभाई सपट, गोरखभाई झवेरी, बाळासाहेब वाघ, विश्वासराव मंडलिक, डॉ. नरेंद्र जाधव, उत्तम कांबळे, डॉ. विजय काकतकर, देवेंद्र बापट, राजेंद्र बागवे, अमोल चिटणीस, विनायक गोविलकर शिक्षणमहर्षी डॉ. मो. स. गोसावी आदींना सन्मानित करण्यात आले आहे.

शुक्रवारी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यास नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, सचिव मनीष चिंधडे, नाशिक भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्रीनंदन भालेराव यांच्यासह पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. श्रीया कुलकर्णी, हेमराज राजपूत, स्वाती मराठे, डॉ. जयंत वाघ आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांचा पार्ट्यांवर ताव

$
0
0

शिक्षक मतदारसंघ निवडणूक

उमेदवारांची गाठीभेटीसाठी शक्कल; हॉटेल्स, लॉन्सचालकांचीही चांदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून, सर्वच उमेदवारांनी मतदार शिक्षकांच्या गाठीभेटीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. शिक्षक संघटनांना हाताशी धरून शहरांमध्ये शिक्षकांसाठी व्हेज, नॉनव्हेज पार्ट्याच आयोजित केल्या जात असल्याने या निवडणुकांच्या निमित्ताने हॉटेल्स आणि लॉन्सचालकांची चांदी होत आहे. विशेष म्हणजे शिक्षकही या पार्ट्यांवर ताव मारत असून, चंगळ करून घेत आहेत. दुसरीकडे संस्थाचालकांच्या शिरकावामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता असून, कोणाची निवड करायची याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.

शिक्षक मतदारसंघासाठी २५ जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत ही सहा ते सात उमेदवारांमध्ये आहे. त्यात भाजपचे अनिकेत पाटील, राष्ट्रवादी पुरस्कृत संदीप बेडसे, भाजपचे बंडखोर माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, टीडीएफचे भाऊसाहेब कचरे पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांच्यासह एस. डी. भिरुड रिंगणात आहेत. निवडणूक प्रचाराला आता अ‌वघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या मतदारसंघाचा विस्तार पाच जिल्ह्यांमध्ये असल्याने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे मतदारांना एकत्रित जमा करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यासाठी हॉटेल्स, लॉन्स बुक केले जात आहेत. या हॉटेल्स आणि लॉन्समध्ये शिक्षक मतदारांची चंगळ होत असून, ओल्या व सुक्या पार्ट्या दिल्या जात आहेत. त्यामुळे हॉटेल्स व लॉन्सचालकांची चांदी झाली असून, सध्या पाचही जिल्ह्यांतील तालुक्याच्या ठिकाणांवरील सर्व हॉटेल्स व लॉन्स बुक आहेत. उमेदवार या पार्ट्यांच्या ठिकाणी जाऊन मला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. शिक्षक मात्र संस्थाचालकाला मदत करायची, की शिक्षकालाच निवडून आणायचे याबाबत मात्र संभ्रमावस्थेत आहेत.

भेटवस्तूंचाही वर्षाव

पार्ट्यांसाठी येणाऱ्या शिक्षकांना खुश करण्यासाठी उमेदवारांकडून या शिक्षकांवर भेटवस्तूंचाही वर्षाव केला जात आहे. काही ठिकाणी शिक्षण संस्थाचालकाच्या संमतीने भेटवस्तू थेट शाळेवरच पोहचवल्या जात आहेत. या भेटवस्तूंची वाच्यता होऊ नये म्हणून त्या थेट विशिष्ट व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचवल्या जात आहेत. तसेच, काहींवर तर गुप्तपद्धतीने लक्ष्मीचा वर्षाव केला जात आहे. या घडामोंडीमुळे प्रथमच या निवडणुकीला वेगळे वलय प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरत्या पीयूसी सेंटरद्वारे सर्रास प्रमाणपत्र वितरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात दुचारी, चारचाकी व अवजड वाहनांना प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील 'पीयूसी' प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. त्यासाठीची अधिकृत केंद्रे ठिकठिकाणी सुरू आहेत. मात्र, सातपूर एमआयडीसीत एकाच नावाने एकाहून अधिक ठिकाणी फिरते 'पीयूसी' केंद्र सुरू असल्याने वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत 'आरटीओ'कडून कारवाई होणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरटीओ प्रमाणित एक 'पीयूसी' केंद्र चालविण्याची मुभा असताना त्याच परवान्यावर फिरते पीयूसी केंद्र स्थापन करीत पीयूसीचे वाटप सुरू असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. त्याकडे आरटीओ विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे. केवळ वाहन पेट्रोलचे आहे की डिझेलचे याची विचारणा करीत हे प्रमाणपत्र दिले जात असल्याची चर्चा आहे. पीयूसी केंद्र घेणाऱ्या संस्थेला पीयूसी मशिन आणावे लागते. या केंद्र चालकाला प्रमाणपत्राची पुस्तके आरटीओतून देण्यात आलेली आहेत. वाहनधारकांना पीयूसी प्रमाणपत्र दिल्यानंतर ही माहिती आरटीओला द्यावी लागते. परंतु, प्रमाणपत्र देण्याची सर्व प्रक्रिया वाहनांची तपासणी न करताच केली जात आहे. दरम्यान, सातपूर परिसरातील एका पीयूसी केंद्र चालकाने नियम धाब्यावर बसवत फिरते पीयूसी केंद्र उभारले आहे. या केंद्रचालकाचे प्रमुख पीयूसी केंद्र सातपूर त्र्यंबकरोडवर आहे. मात्र, याच परवान्यावर हा चालक एमआयडीसी भागात ओम्नी व्हॅनमध्ये फिरून वाहनधारकांना पीयूसीचे वाटप करत आहे. त्यामुळे याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

रस्त्यांवर धावणारी दुचाकी वाहने, तसेच रिक्षा, कार, ट्रक अशा प्रत्येक वाहनाला 'पीयूसी' प्रमाणपत्र आवश्यक असते. संबंधित वाहन वायू प्रदूषण करीत नाही असा या प्रमाणपत्राचा अर्थ असतो. प्रत्येक वाहनाला दर सहा महिन्यांतून एक वेळा असे वाहन प्रदूषणमुक्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (पीयूसी) घ्यावे लागते. वाहतूक पोलिस, आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहने अडविल्यानंतर इतर कागदपत्रांबरोबरच 'पीयूसी'ही दाखवावे लागते. मोटारसायकलसाठी ४० रुपये, तर १०० रुपये घेऊन चारचाकीसाठी पीयूसी दिले जाते. अनेकदा तर केंद्रावर पीयूसी मशिनमध्ये प्रदूषणाची चाचणी न करताच प्रमाणपत्र दिले जात असल्याचे दिसून येत आहे. दुचाकी-चारचाकी वा कोणत्याही वाहनांतून रस्त्याने जाताना काळा धूर सोडला जात असला, तरी त्यांच्यावर काहीच कारवाई होणार नाही, असेही यामुळे स्पष्ट होत आहे.

२ कॉलम (फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग करणाऱ्यांची रोकडोबावाडीत वरात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रोकडोबावाडीतील १९ वर्षीय युवतीचा विनयभंग करून तिला पळवून नेण्याची धमकी देत तिच्या आई, बहिण व काकाला मारहाण केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयितांना अटक करून त्यांची वरात काढली.

पोलिसांकडे युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित युवती आई, लहान बहिणीसमवेत रोकडोबावाडी परिसरात राहते. तेथील संदीप चटोले (२५) आणि सनी चटोले (२१) हे तिचा पाठलाग करायचे. तिला उचलून नेण्याची धमकी देत असत. ते गुंड असल्याने युवतीने घाबरुन तक्रार दिली नव्हती. संबंधित युवती सोमवारी (दि. १८) दुपारी आई, बहिणीसह मामाकडे निघाली असता रोकडोबावाडीतील मते गिरणीसमोर कट्ट्यावर बसलेल्या चटोले बंधूंनी मायलेकींना थांबवले. संदीपने युवतीचा हात धरून ओढले आणि तू मला खूप आवडतेस, मी तुला घरातून उचलून घेऊन जाणार आहे, असे सांगितले. विरोध करताच तिला मारहाण केली. युवतीची आई व बहिण मदतीला आले असता सनीने आईचा हात पिरगळला व लहान बहिणीला धक्काबुक्की केली. युवतीचे काका आल्यावर त्यांनाही लोखंडी राडने मारहाण केली. नागरिक मदतीला आल्यावर दोघा गुंडांनी या युवतीला 'तुला पळवून नेल्याशिवाय राहणार नाही', अशी धमकी देत पळ काढला. युवतीने उपनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघा गुंडांना अटक करून त्यांची रोकडोबावाडीतून वरात काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ठ बांधकाम पाडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्यामाध्यमातून सुरू असलेल्या येथील नाल्याचे बांधकाम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे तसेच अरुंद होत असल्याने सदर बांधकाम उपसरपंच संजय मोरे ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले. याठिकाणी तातडीने रुंद व दर्जेदार बांधकाम करून मनाडी नाल्याचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्धार यावेळी संजय मोरे व गणेश बनकर यांनी व्यक्त केला. या बांधकामाबाबत अनेक नागरिकांनीही ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची गंभीर दाखल घेत उपसरपंच संजय मोरे, गणेश बनकर यांनी कामाची पाहणी करून बांधकाम निकृस्थ व अरुंद असल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने हे बांधकाम पडण्याचे आदेश दिले. संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त होईपर्यंत संजय मोरे व गणेश बनकर या ठिकाणी उपस्थित होते.

पिंपळगाव बसवंत शहराच्या मध्यवस्तीसह बाजारपेठेतून जाणारा मनाडी नाला पिंपळगाव शहरासाठी मोठा शाप ठरल्याची भावना येथील व्यापारी व नागरिकांमध्ये आहे. दरवर्षी पावसाळ्यात मनाडी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे जुना आग्रा रोड व बाजार पेठेतील अनेक दुकानात पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने होणारे नुकसान लक्षात घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय स्थलांतरित केले आहेत. या पाश्वभूमीवर मागील सदस्य मंडळाच्या कार्यकाळात महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या माध्यमातून मनाडी नाला दुरुस्ती व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. त्यानुसार दोन तीन वर्षापूर्वीच मनाडी नाल्याचे रुंदीकरण व जल शुद्धिकरण प्रकल्पाचे प्रारंभ झाला होता. मात्र मंजूर निधीच्या तुलनेत संबंधित ठेकेदाराने मनाडी नाल्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे तसेच अरुंद स्वरुपात पूर्ण करण्याचा धडाका लावला होता यामुळे इतका मोठा निधी खर्च होऊनही मनाडी नाल्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता नसल्याने ग्रामपंचायत ने सदर बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला व नव्याने दर्जेदार बांधकाम व रुंदीकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ATMमधील पाचपट पैशांचा आनंद क्षणिकच

$
0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील विजयनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशिनमधून ग्राहकांना पाचपट रक्कम मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उशिरा घडला. या प्रकाराच्या मुळाशी पोहोचण्यात बँकेला यश आले असून, ज्या ज्या ग्राहकांना अधिक पैसे मिळाले ते वसूल करण्यासाठीची कार्यवाही सुरू केल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी मंगळवारी दिली.

सिडकोतील विजयनगरमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन आहे. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास या मशिनमध्ये रकमेचा भरणा करण्यात आला. परंतु, रात्री साडेनऊच्या सुमारास या एटीएमवर ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली. पैसे काढताना जेवढी रक्कम टाकू त्याच्या पाचपट रक्कम मिळत असल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांचे गर्दीकडे लक्ष गेले. घडणारा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही सजग नागरिकांनीही बँकेला याबाबत कळविले. परंतु, तोपर्यंत ग्राहकांनी तब्बल दोन लाख ६८ हजार रुपयांची रक्कम काढल्याचे समजते. यानंतर येथे तत्काळ पोलिस कर्मचारी तसेच, बँकेचे अधिकारी दाखल झाले. गर्दीला हटवून हे एटीएम केंद्र बंद करण्यात आले.

एटीएममधील दोष दूर

हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा शोध घेऊन त्रूटी दूर करण्यात आल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी दिली. मशिनच्या ज्या ट्रेमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचा भरणा करावयाचा हवा होता त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा भरणा करण्यात आला. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे अॅक्सिस बँकेतील विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. बँकेच्या किंवा अन्य बँकांच्या कोणत्या ग्राहकांनी येथून या कालावधीत पैसे काढले याची माहिती संकलित केली जाते आहे. हे पैसे संबंधित ग्राहकांकडून रिकव्हर करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

आमच्या गस्तीवरील पोलिसांनी गर्दीबाबत विचारणा केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत खातरजमा केली. बँकेने एटीएम कार्यप्रणालीमधील त्रूटी दूर केल्या आहेत. या एटीएम सेंटरवरून त्या विशिष्ट कालावधीत पैसे काढणाऱ्यांची माहिती बँकेला सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कुणाला अतिरिक्त पैसे मिळाले असतील तरी बँक ती वसूल करू शकेल.

- सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकल्याण उपायुक्तच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जातपडताळणी अर्जासाठी विद्यार्थी व पालकांची प्रचंड झुंबड उडाली असून समाजकल्याण विभागात विद्यार्थ्यांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. मात्र, हे पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी नाशिक विभागाला उपायुक्तच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना विहित वेळेवर मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

समाजकल्याण विभागामार्फत जातपडताळणी प्रमाणपत्राची छाननी करण्यासाठी उपायुक्तांची भूमिका महत्त्वाची असते. जातपडताळणीसाठी आलेल्या फायलीची शहानिशा करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त, जातपडताळणी समितीचे अध्यक्ष व संशोधन अधिकारी या तिघांच्या सह्या यावर आवश्यक असतात. त्यानंतर जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात येते. यातील उपायुक्त पदाचा प्रभारी कार्यभार वंदना कोचुरे यांच्याकडे आहे तर समितीचे अध्यक्ष म्हणून पी. व्ही. पाटोळे हे काम पाहतात. राकेश पाटील हे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वंदना कोचुरे यांच्याकडे परभणी जिल्ह्याचीही जबाबदारी आहे. तीन दिवस परभणी व तीन दिवस नाशिक अशी त्यांची धावपळ असते. समितीचे अध्यक्ष हे अपघातात जखमी झाल्यानंतरदेखील कार्यालयात हजर राहून जातपडताळणीची प्रकरणे निकाली काढत असतात. वंदना कोचुरे यांच्याकडे नाशिकचा प्रभारी कार्यभार असल्याने त्या नाशिकमध्ये पूर्णवेळ हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे कामावर परिणाम होतो. राज्यामध्ये सर्वात जास्त कॉलेजांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल नागपूर व त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा नंबर लागतो. त्यानुसार जातपडताळणीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्यादेखील त्यानुसारच आहे. सर्वात जास्त अर्ज हे पुण्यात येतात. त्यानंतर नागपूर व नाशिक अशी अर्जांची संख्या असते. नाशिक विभागाला उपायुक्त नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक राहात नाही. नाशिक विभागात कर्मचाऱ्यांची सख्या अपुरी आहे.

लोक प्रतिनिधींचा दबाव

अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. अनेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघातील विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मिळावे म्हणून अधिकाऱ्यांवर दाबाव आणत आहेत. या विभागाच्या अडचणी सोडवण्यात लोकप्रतिनिधींना स्वारस्य नाही. फक्त दबाव टाकून लोकांचे प्रश्न कसे सुटतील याकडे त्याचा कल आहे. या ठिकाणी मनुष्यबळ वाढवावे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

--

माझ्याकडे दोन जिल्ह्याचा पदभार असला तरीही दोन्ही जिल्ह्यांना समान न्याय देत आहे. पहाटे चार वाजता ऑफिसला येऊन प्रकरणाचा निपटारा करीत आहे. आमच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याने दोन आठवड्यापासून सुटी घेतलेली नाही. येत्या दोन दिवसांत जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा होईल.

- वंदना कोचुरे, उपायुक्त, समाज कल्याण जातपडताळणी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन भत्ता द्या!’

$
0
0

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा पाहता इतर देशांतील कमी किंमत आणि भारतातील कांद्यासाठी लागणारा जादा वाहतूक खर्च पाहता, पूर्ण क्षमतेने कांदा निर्यात होण्यास बाधा निर्माण झाली आहे. कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी दिला जाणारा पाच टक्के प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करून तो ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावा, अशी मागणी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

डॉ. भामरे यांनी कांद्याचे दर पडत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, प्रभुंना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे. नाशिकसह राज्यातील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. देशातील इतर राज्यांची तुलना करता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होते. या हंगामात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन असून गुणवत्तापूर्ण कांदा उपलब्ध आहे. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यात हा एकमेव मार्ग आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा पाहता इतर देशांतील कमी किंमत आणि भारतातील कांद्याकरीता लागणारा जास्त वाहतुकीचा खर्च पाहता पूर्ण क्षमतेने निर्यात करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पाच टक्के प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करीत तो ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावा, अशी मागणी डॉ. भामरे यांनी सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. प्रभू यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याची शक्यता आहे.

प्रोत्साहन भत्त्यामुळे वाढते निर्यात

काही वर्षांपूर्वी कांदा निर्यातदारांना पाच टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जात होता. तेव्हा देशाची वार्षिक कांदा निर्यात ३३ लाख मेट्रिक टनापर्यंत गेली होती, जी गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक होती. यावर्षी प्रोत्साहन भत्ता नसल्याने देशाची निर्यात ५० टक्क्यांनी घटली आहे. ज्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांवर होत असून इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करण्यास ते यापुढे विचार करणार नाहीत. असे करणे कोणासाठीही हिताचे नाही, याकडे डॉ. भामरे यांनी प्रभू यांचे लक्ष वेधले. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रपतींच्या उपस्थितीत व्यापारी-उद्योजकांची बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ग्रीस देशाच्या दौऱ्यावर आहेत. अथेन्स येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर ग्रीस भारत बिझनेस फोरमतर्फे भारत व ग्रीस दोन्ही देशांमध्ये दरम्यान व्यापार-उद्योग द्विपक्षीय संबंध वाढावेत, यासाठी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत व्यापारी-उद्योजकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी मनोगतातून महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. भारत आणि महाराष्ट्र सरकारने व्यापार-उद्योग वाढीसाठी व सहकार्यासाठी चांगले धोरण आखलेले असून आपण सर्वांनी महाराष्ट्रात व्यापार-उद्योगातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

व्यापार-उद्योग वाढीसाठी बैठक होणार असून सकाळच्या सत्रामध्ये ऊर्जा, पर्यटन, अ‍ॅग्री बिझनेस, फार्मा आणि आयसीटी या क्षेत्रातील पाच समुहांना भेटी दिल्या. त्यानंतर हेलिनिक रिपब्लिक अ‍ॅसेट डेव्हलपमेंट फंड (एचआरएडीएफ) यांच्या प्रतिनिधींसमवेत ऊर्जा, पर्यटन, अ‍ॅग्री बिझनेस, फार्मा आणि आयसीटी या क्षेत्रातील संधीबाबत राउंड टेबल झाली. त्यानंतर ग्रीस पार्लमेंटला भेट देण्यात आली. याप्रसंगी भारताच्या अथेन्स येथील राजदूत शमा जैन, प्रदीपकुमार केरूका, चेंबर्स अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष ललित गांधी, भावेश माणेक, मनप्रीत नागी, जयेश ओसवाल, श्रीकृष्ण गोसावी, राजन ठावकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक संचालक बागूल यांची बदली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वादग्रस्त ठरलेल्या नगररचना विभागाच्या दप्तर दिरंगाईसह संशयास्पद फायलींची तपासणी सुरू केली असतानाच, मंगळवारी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आकाश बागूल यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले आहेत. बागूल यांची नगर महापालिकेच्या नगररचना विभागात सहाय्यक संचालक पदावर बदली झाली असून, नगरचे सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांची नाशिक महापालिकेत याच पदावर बदली झाली आहे. परंतु, ग्रीनफिल्ड लॉन्स प्रकरणासह विभागातील अनियमिततेप्रकरणी बागूल यांच्यासह अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असतानाच, आलेल्या बदली आदेशामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बागूल यांना कार्यमुक्त करू नये, असा आग्रह आयुक्तांचा असला तरी शासन आदेशात तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या आठवड्यापासून नगररचना विभागाची झाडाझडती सुरू केली आहे. सर्वाधिक फाइल पेंडन्सी असल्याने तसेच नागरिकांच्याही तक्रारी प्रलंबित राहत असल्याने आयुक्तांनी या विभागाची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे या विभागात जवळपास १८४६ फायली प्रलंबित असल्याचे समोर आले होते. अनेक फायली तीन ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. या फायली प्रलंबित ठेवण्यामागे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा संशय आयुक्तांना आहे. अतिरिक्त आयुक्तांसह उपसंचालक प्रतीभा भदाणेंची एक समिती गेल्या आठवड्यापासून नगररचना विभागाची तपासणी करीत आहे. ग्रीन फिल्ड प्रकरणात मुंढे यांना कोर्टात माफी मागावी लागली होती. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला असून, त्या प्रकरणात पाच अधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत.

नगररचना विभागाची झाडाझडती सुरू असतानाच, मंगळवारी या विभागाचे प्रमुख सहाय्यक संचालक आकाश बागूल यांची अचानक बदली झाली आहे. बागूल यांची अहमदनगर पालिकेत सहाय्यक संचालक पदावर बदली झाली आहे. नगरचे सुरेश निकुंभे यांची नाशिक महापालिकेत नगररचना विभागात बागूल यांच्या जागेवर बदली झाली आहे. ग्रीनफिल्ड प्रकरणासह फाइल पेंडन्सी प्रकरणात बागूल यांची तपासणी व झाडाझडती सुरू असतानाच, बागूल यांच्या बदलीचे आदेश आल्याने आयुक्तांची कारवाई अडचणीत आली आहे. बागूल यांच्यावर कारवाई व्हावी असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु, त्यांच्या बदलीमुळे समीकरणे बदलली असून त्यांना तपासणी होईपर्यंत कार्यमुक्त करू नये, अशी प्रशासनाची इच्छा आहे. परंतु, शासनाच्या आदेशात त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे असे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

बागूलांची चौकशी?

नगररचना विभागातील सर्व सावळ्या गोंधळाप्रकरणी आकाश बागूल यांच्यावर ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाईची तयारी आयुक्तांकडून सुरू होती. बागूल यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी त्यांची विभागीय चौकशी करावी अशा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासंदर्भात मंगळवारी आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांनी यावर खलबते केली. त्यामुळे बागूल यांची बदली झाली असली तरी त्यांच्या अडचणी मात्र कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

पाच जणांना नोटिसा

ग्रीनफिल्ड प्रकरणात आयुक्त मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डेंसह पाच अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. यामध्ये नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आकाश बागूल, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांचा समावेश आहे. ग्रीन फिल्ड लॉन्स प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी या नोटिसा काढण्यात आल्या असून, त्यांना सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रीनफिल्ड प्रकरणात आयुक्तांना माफी मागावी लागली होती, तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने २० लाखांचे बांधकाम पुन्हा करून द्यावे लागत होते. उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही, या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेने दोन जण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जखमी झाल्याची घटना सिन्नर फाटा ते चाडेगाव दरम्यानच्या रस्त्यावरील दत्तमंदिर परिसरात घडली. जखमींपैकी किशोर तुकाराम बोऱ्हाडे (वय ४६, रा. हनुमंतानगर, लोखंडे मळा, जेलरोड) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संजय त्र्यंबक सावंत (५५, रा. धनराजनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे दुसऱ्या जखमीचे नाव आहे. बोऱ्हाडे हे त्यांचे मित्र सावंत यांच्यासोबत दुचाकीवरुन (एमएच १५ डी.एन.११०७) चाडेगाव येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा येथून चाडेगावच्या दिशेने जात होते. या रस्त्यावर इनोव्हा कारने (एमएच १५ व्हीएक्स ४५६०) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

यात संजय सावंत यांच्या डोक्यास व पायास तर बोऱ्हाडे यांच्या पायास गंभीर इजा झाली. अपघातानंतर दोघाही जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातानंतर तब्बल अठरा दिवसांनंतर जखमींनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात इनोव्हाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात शेतमाल लिलाव होणार ऑनलाइन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात इ नाम योजनेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. इ नामच्या शुभारंभ झाल्याने शेतीमालाचे लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. बोलतांना जाधव यांनी इ नाम पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतमालाचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केल्याने बाजारभाव चांगला मिळून शेतकरी बांधवाना आर्थिक फायदा होईल. तसेच शेतामालाचे पेमेंट देखील ऑनलाइन होईल. शेतमाल लिलाव ऑनलाइन पद्धतीने व्हावेत यासाठी शेतकरी बांधवांनी बँक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स व मोबाइल क्रमांक बाजारात शेतमाल लिलावासाठी द्यावा. बाजार समितीच्या नोंदणी कक्षात नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपसभापती सुनील देवरे, वंसत कोर, प्राजक्ता वाडीकर, ऋषिकेश पवार, भिका कोतकर, सचिव अशोक देसले आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

थकीत पेमेंटबाबत आवाहन

येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील कांदा व्यापारी जय भोलेनाथ ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट थकीत आहेत. अशा शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचा मिळालेला चेक व हिशेबपट्टीची झेरोक्स बाजार समितीच्या कार्यालयात तीन दिवसात जमा करावी असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात नऊ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या तसेच, वितरणात अनियमितता असलेल्या मालेगाव तालुक्यातील नऊ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने जिल्हा पुरवठा विभागाने रद्द केले आहेत. सन २०१६ पासून आजतागायत १७ विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे रॉकेलची मागणी व पुरवठा घटला असला तरी काळाबाजार सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या निळ्या केरोसिनमध्ये केमिकल आणि पावडर टाकून भेसळ केली जात असल्याचा प्रकार अलीकडेच पुढे आला होता. निळ्या रंगाचे कमी दराचे रॉकेल जादा दराने विक्री केले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने रॉकेलच्या काळाबाजाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पंचवटीत अशा दोन दुकानदारांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातदेखील केरोसिन वितरणात अनियमितता दिसून आली आहे. तब्बल नऊ दुकानांच्या केरोसिन विक्रीचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०१६ पासून आजतागायत तब्बल १७ केरोसिन विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली. एक दुकान निलंबित करण्यात आले आहे. याखेरीज २० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

...यांचे परवाने रद्द

शब्बीरनगर, नयापुरातील अजुन आरा अलतिफ, शेख हमीद शेख इमान, शेख रसुल शेख, नदीमखान अखिलखान, नियाज अलीअकबर अली (बेलबाग, नयापुरा), बी. एम. जाधव (शब्बीरनगर, मेनरोड, नयापुरा), अब्दुल मतीन शरीफ (गोल्डननगर), शेख नवाब शेख इसा (मोमीनपुरा), शकीलाबानो शकील अहमद (रौनकाबाद नयापुरा) यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images