Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बालरोग तज्ज्ञांची शनिवारपासून परिषद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आधुनिक, प्रगत उपचार पद्धतीवर विचारमंथन करून अद्यावत ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी बालरोग तज्ज्ञाची राष्ट्रीय संघटना इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्यातर्फे येत्या २३ व २४ रोजी नाशिकमध्ये विभागीय परिषद 'नाशिकॉन २०१८' होत असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जयंत रणदिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परिषदेचे यंदा चौथे वर्ष असून, यात सुमारे पाचशेहून अधिक बालरोगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेचे उद्घाटन इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. केदार मालवतकर यांच्या हस्ते शनिवारी (दि. २३) हॉटेल एक्सप्रेस इन येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. परिषदेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, असे संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत सुरवसे यांनी सांगितले. तज्ज्ञांमध्ये लहान बाळाच्या अतिदक्षता आजाराच्या तज्ज्ञ डॉ. सोनू उदानी (मुंबई), नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. उमेश वैद्य (पुणे), मेडिको लिगल विषयावरील अॅड. डॉ. गोपीनाथ शेनॉय (मुंबई), लसीकरण विषयावरील डॉ. विपिन वशिष्ठ (बिजनोर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. यावेळी डॉक्टर व पेशंट संबंध सुधारण्यासाठी प्रत्येक व्याख्यानानंतर डॉक्टरांद्वारेच लघुनाटिकेचे सादरीकरणही करण्यात येणार आहे.

संयोजक समितीचे सचिव डॉ. अमोल पवार यांनी परिषदेतील विविध विषयांची माहिती देतांना सांगितले, की अनेक नव्या व वेगळ्या विषयांचा यावेळी समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महागड्या वैद्यकीय सेवा स्वस्त करण्यासाठी स्वदेशी निर्मित मशिनच्या वापरावर प्रबोधन, ग्रामीण भागातील कुपोषण व शहरी भागातील मुलांसाठी मोबाइल, व्हिडिओ गेम्स, खाद्य सवयी यांचा मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासावर परिणाम, पौगंडावस्थेतील मुलांसाठी शरीर व स्वभावातील बदल व उपचार, संसर्गजन्य आजार जसे डेंग्यू साठी प्रगत उपचार व अपस्मारावरील नवीन औषधी व उपचार पद्धती यांचा समावेश आहे.

बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेने जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांसाठी कार्य केले आहे. त्र्यंबक-हरसूल भागात विविध तपासणी शिबिरे घेऊन कुपोषित बालकांची नोंद घेतली. या बालकांवर उपचारही केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. प्रवीण भांबरी, डॉ. प्रशांत कुटे, डॉ. रविंद्र सोनवणे, डॉ. आनंद माखरिया, डॉ. मोहन वारके, डॉ. प्रकल्प पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नायपर’ परीक्षेत २६ विद्यार्थ्यांचे यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेतील संशोधनासाठी कार्यरत असणाऱ्या नायपर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च) या संस्थेतील प्रवेशासाठीच्या पात्रता परिक्षेत मविप्रच्या फार्मसी कॉलेजमधील तब्बल २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

नायपर या चंदीगढस्थित संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पात्रता प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले. अभिषेक नाईक हा विद्यार्थी एसटी प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. स्वाती बागूल ही चौथ्या तर श्रुती चव्हाण ही पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. खुल्या प्रवर्गातून अनुजा मुळे ही विद्यार्थिनी तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून योगेश्वरी बोराडे १६ व्या, वेदांत गाढेकर २३ व्या, गौरव सानप ३० व्या, तेजस चव्हाण ३१ व्या, कोमल भामरे ३९ व्या, जयश्री देवरे ४१ व्या, माधुरी क्षीरसागर ५९ व्या व कोमल ठोक ही ९२ व्या क्रमांकांनी उत्तीर्ण झाले. नायपर या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. औषधनिर्माणशास्त्रातील नामांकित संस्थांमध्ये संशोधक म्हणूनही विद्यार्थ्यांना याद्वारे करिअर घडविता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी प्रवेश सुरू

$
0
0

१७ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फार्मसी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी आणि डॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्या पदविका प्रवेश प्रक्रियेला गुरूवारी सुरुवात झाली. यासाठी प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. १७ जुलैपर्यंत विद्यार्थी या अभ्यासक्रमांच्या पदविका प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत. याच कालावधीत अर्जांची पडताळणी आणि निश्चिती करण्यात येणार आहे.

या कालावधीदरम्यान प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र हे सादर करावे लागणार आहे. ही कागदपत्रेही १७ जुलैपर्यंतच सादर करता येणार असल्याचे स्टेट कॉमन एन्टरन्स टेस्ट सेलच्या वतीने कळविण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर १८ जुलै रोजी तात्पुरता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. १९ ते २१ जुलै दरम्यान आक्षेप नोंदविले जातील. २२ जुलै रोजी या अभ्यासक्रमांसाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्जांसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांकडून ४०० रुपये तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांकडून ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahacet.org/postscdiploma2018 या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यासाठी अडले पोलिस आणि कोर्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा कोर्टासाठी अडीच एकर जागेचा ताबा घेतल्यानंतर कोर्ट प्रशासनाने आपला मोर्चा पोलिस मुख्यालयातील रस्त्याकडे वळवला आहे. यावेळी मात्र पोलिसांनी ठोस भूमिका घेतली असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला रस्ता सोडायचा नाही, यासाठी चंग बांधला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा कोर्टाने या रस्त्याबाबतचा अहवाल नुकताच सादर केला. यावर आज (दि. २२) सुनावणी होणार आहे.

जिल्हा कोर्टाची जागा कमी पडते म्हणून पोलिस मुख्यालयाची पाच एकर जागा मिळावी यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. जवळपास तीन वर्षांपेक्षा अधिक काळ खल झाल्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने तसेच शासनाच्या मध्यस्थीने पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा जिल्हा कोर्टासाठी वर्ग करण्यात आली. जिल्हा कोर्टाच्या वापरासाठी सीबीएस येथील मुख्य रस्ता असून, अंतर्गतही रस्ते उपलब्ध आहेत. असे असले तरी वकिलांनी पोलिस मुख्यालयातून जाणारा रस्ता कोर्टासाठी देण्याची मागणी केली होती. याबाबत हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अडीच एकर क्षेत्र कमी झाल्याचा ताण उर्वरित जमिनीवर पडत आहे. सर्वात महत्त्वाचे शस्त्रागार असून, त्याची सुरक्षा उघड्यावर आणता येणार नाही. पोलिस मुख्यालयात किमान एक हजार पोलिस कर्मचारी वास्तव्यास असून, त्यांच्या कुटुंबियांचा विचार करता रहिवाशांचा आकडा पाच हजारांच्या घरात जातो. कोर्टासाठी स्वतंत्र रस्ता असताना पोलिस मुख्यालयातील रस्ता घेण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे याबाबत सर्व शक्ती पणाला लावून हायकोर्टात विरोध दर्शविला जाणार असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले. सदर रस्त्याचा अहवाल तयार करून तो सादर करण्याबाबत जिल्हा कोर्टाला हायकोर्टाने आदेशित केले होते. त्यानुसार नुकताच हा अहवाल हायकोर्टाला सादर करण्यात आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे पोलिस, कोर्ट, वकील असे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस मुख्यालयातील मैदान महत्त्वाचे असून, उर्वरित जागेत वेगवेगळी कार्यालये तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानाच्या कामासदेखील मंजुरी मिळाली असून, पुढील ५० वर्षांचा विचार करता ही जागा अपुरी पडणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा तसेच पोलिस भरतीसारख्या मोठ्या इव्हेंटचे नियोजन अगदीच कमी जागेत कसे पार पडणार, असा प्रश्नही पोलिस प्रशासनाला सतावत असल्याने पोलिसांनी ही भूमिका घेतल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कामावर परिणाम

पोलिस मुख्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात असून, दंगल नियंत्रक पथक, शीघ्र कृती दल अशा अत्यावश्यक सेवा आणि गरजेनुसार पोलिस कर्मचारी येथून शहराच्या कोणत्याही भागात सहज पोहचू शकतात. मात्र, चहूबाजूंनी हळूहळू जागा कमी होऊ लागल्यास पोलिसांच्या मुख्यालयाच्या कामावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून उपस्थित होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरव समाजाच्या मेळाव्याचा निर्णय

$
0
0

गुरव समाजाच्या मेळाव्याचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक गुरव समाज एकता मंचातर्फे गुरव समाजातील सर्व पोटजातींसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्याचा निर्णय झाला. उपनगर येथील इच्छामणी गणेश मंदिरात मंच कार्यकारिणीची बैठक झाली. जिल्हा गुरव समाज मंडळ अध्यक्ष रमेश पवार, मंचाचे अध्यक्ष प्रशांत गुरव, समन्वयक भागवत गुरव, अशोक भालेराव, जिल्हा गुरव विकास मंडळ माजी अध्यक्ष पुंडलिक बाविस्कर, उपाध्यक्ष शिवदास शिंदे, प्रा. रवींद्र सोनोने, रमेश जाधव, सुरेश सोनवणे, पांडुरंग गुरव आदी उपस्थित होते. प्रशांत गुरव यांनी आत्माराम गुरव यांच्या स्मरणार्थ मेळाव्यासाठी आर्थिक योगदान देण्याचे जाहीर केले. समाजासाठी हक्काचे सभागृह असावे म्हणून प्रयत्न करण्याचा, तसेच पुढील महिन्यात सर्व गुरव संघटनांची चेतनानगरमधील डॉ. भागवत सभागृहात बैठक घेण्याचा निर्णय झाला.

सिंगल (लोगो : सोशल कनेक्ट)

---

रविवारी किल्ले खैराई दुर्गसंवर्धन

नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ६१ वी किल्ले संवर्धन श्रमदान मोहीम किल्ले खैराई (ता. त्र्यंबकेश्वर) येथे रविवारी (दि. २४)होणार आहे. जिल्ह्यातील गड-दुर्गांच्या अस्तित्वासाठी श्रमदानाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षे सतत राबणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या किल्ले खैराई येथे होणार असून, या मोहिमेत किल्ल्याच्या माथ्यावरील अस्ताव्यस्त पडलेल्या असुरक्षित झालेल्या तोफेचे संरक्षणासाठी कामकाज केले जाईल. वनदुर्ग म्हणून ओळख असलेल्या या किल्ल्यावर बीजारोपणही केले जाणार आहे. किल्ल्यावरील वेताळेश्वर देवस्थानाची स्वच्छता व माथ्यावरील सैनिकांचे जोते झाडाझुडपांतून मोकळे केले जाणार आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी ९४२३०५५८०१ या क्रमांकावर नावनोंदणी करावी. मोहिमेला येताना नियोजित दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत नाशिकच्या हुतात्मा स्मारकाजवळ शिवरायांच्या पुतळ्यासमोर जमावे, सोबत प्रवास खर्च, जेवणाचा डबा, पाणी, पायात बूट, पावसाळी रेनकोट आदी सोबत ठेवावे, असे आवाहन शिवकार्य गडकोट संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी खासगीतून मनपा शाळांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अध्यापन पद्धती, भौतिक बाबींचा अभाव या असुविधांचा पाढा एव्हाना विद्यार्थ्यांनाही तोंडपाठ झाला आहे. त्यामुळे या शाळांविषयीचे चित्रदेखील समाजात तितके सकारात्मक नाही. परंतु, डिजिटल क्लासरूम, मोफत शिक्षण या बाबी आता या शाळांच्या नकारात्मकतेवर वरचढ ठरत असून सामान्यांचा कल महानगरपालिकेच्या शाळांकडे वाढू लागला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९साठी खासगी शाळांमधील १७७ विद्यार्थ्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने ही बाब अधोरेखित झाली आहे. या संख्येत अजून किमान शंभर विद्यार्थ्यांची भर पडेल, असा विश्वास शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी व्यक्त केला आहे.

महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांनीही काळानुसार आता तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ई-लर्निंगच्या दृष्टीने व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्यात आल्या आहेत. मुळातच तळागाळातील विद्यार्थ्यांना शाळेत आणणे सरकारी शाळांमधील शिक्षकांपुढे असलेले आव्हान आता ई-लर्निंगने बऱ्यापैकी कमी केले आहे. यामुळे अर्थातच शाळा गळतीचे प्रमाणही कमी झाले आहे. या सुविधांच्या नावाखाली इतर खासगी शाळा लाखो रुपये पालकांकडून उकळतात. याच सुविधा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मोफत मिळत असल्याने तर आर्थिक परिस्थिती चांगली असलेले पालकही पाल्यांना येथे प्रवेशित करण्यासाठी उत्सुक दिसून येत आहे. याचेच उदाहरण या १७७ विद्यार्थ्यांमुळे समोर आले आहे. अद्याप काही केंद्रांवरील विद्यार्थी संख्येची पडताळणी करणे बाकी असून या शैक्षणिक वर्षात एकूण तीनशे विद्यार्थी मनपा शाळेत दाखल होतील, अशी माहिती उपासनी यांनी दिली.

\Bया शाळा 'हाऊसफुल्ल\B'

मागील शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर शहरातील १२६ शाळांपैकी ३७ शाळांचे विलीनीकरण करण्यात आले. पटसंख्येतील तफावत हे यातील महत्त्वाचे कारण होते. यानंतर विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. ते विद्यार्थी व खासगी शाळांमधील काही विद्यार्थी या संख्येमुळे अश्वमेधनगर, शिवाजीनगर, अंबड, चुंचाळे, पाथर्डी फाटा, वडाळा, म्हसरूळ येथील शाळा हाऊसफुल्ल झाल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

\Bअद्यावत प्रयोगशाळाही लवकरच\B

शिवाजीनगर व अंबड येथील दोन शाळांना अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. याचे उद्घाटन येत्या काही दिवसांत करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक अद्यावत बाबीदेखील शिकता येणार आहे.

\Bदोन विद्यार्थी इंटरनॅशनल स्कूलमधील\B

१७७ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल स्कूलमधून मनपाच्या शाळेत दाखल झाले आहेत. शाळांची बेसुमार फी व व्यवस्थापकांच्या मुजोरीला कंटाळून हे प्रवेश घेण्यात आल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या शिक्षकांनी शाळेच्या चांगल्या दिवसांसाठी मोठे प्रयत्न केले आहे. समाजाचा विश्वास मनपाच्या शाळा जिंकत असल्याचे यामुळे समोर आले असून पुरेशा भौतिक व शैक्षणिक सुविधांची उपलब्धता यामुळेही पालक विद्यार्थ्यांचे मनपा शाळेत प्रवेश घेत आहेत.

\Bनितीन उपासनी, प्रशासनाधिकारी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नार-पारचे पाणी ‘कसमादे’ला द्या!

$
0
0

जलचिंतनचे राजेंद्र जाधव यांची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार-पारच्या १५.३१ टीएमसी (४३४ दलघमी) पाण्याचा हक्क पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पासाठी गुजरातला देऊन तेवढाच पाण्याचा हक्क तापी खोऱ्यात देण्याची मागणी केली आहे. हा निर्णय राज्यातील जनतेची फसवणूक करणारा असून या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिला.

नार-पारचे ३७ टीएमसी पाणी कसमादे-नांदगाव-चांदवड-येवला-चाळीसगाव-पाचोरा-जामनेर तालुक्यांसाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून वापरणे शक्य आहे. तसा अहवाल तज्ज्ञ समितीने सरकारला जुलै २०१६ मध्येच सादर केलेला आहे. त्यामुळे नार-पार खोऱ्यातील पाण्याचा हक्क गुजरातला देणे ही मुख्यमंत्री यांची भूमिका म्हणजे महाराष्ट्राने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणेसारखे आहे. दुष्काळी भागातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यांच्या भावी पिढ्यांचे नुकसान होणार आहे. म्हणून फक्त १२.६० टीएमसी पाण्याचा नार-पार-गिरणा लिंकचा अहवाल बनवण्याऐवजी संपूर्ण ३७ टीएमसी पाणी महाराष्ट्रात वळवण्याचा अहवाल तयार करावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

या प्रकल्पाबाबत जाधव यांनी सविस्तर माहिती दिली. नार-पारच्या खोऱ्यात तज्ज्ञ समितीने ३७ टीएमसी इतके पाणी निश्चित केले आहे. त्यापैकी १५.३१ टीएमसी पाण्याचा हक्क गुजरातला द्यायचा व तेवढ्याच परिमाणाचा हक्क तापी खोऱ्यात घ्यायचा, अशी चाल आहे. मात्र, अय्यंगार समितीने तापी खोऱ्यातील पाण्याचे वाटप केल्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास १९१ टीएमसी इतके पाणी असून त्यापैकी महाराष्ट्राने आत्तापर्यंत फक्त ९१ टीएमसी इतकेच पाणी अडवले आहे. उर्वरित १०० टीएमसी पाणी गुजरातमधील उकाई धरणात वाहून जात आहे. याउलट गुजरातच्या वाट्याला १३९ टीएमसी पाणी असताना त्यांनी २८० टीएमसी क्षमतेचे उकाई धरण १९७० सालीच बांधले आहे. तेव्हापासून गुजरात या जलसंपत्तीचा लाभ घेत आहे, असा आरोप जाधव यांनी केला.

गुजरातची शिरजोरी

गुजरात राज्य तापी खोऱ्यातील १३९ टीएमसी पाण्याचा हक्क १५.३१ 'टीएमसी'ने कमी करण्यास राजी नाही, असे समजते. मात्र, शेजारच्या राज्यांचे पाणी हक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कवच वापरून विनामोबदला पदरात पडून घ्यायचे, अशी गुजरात सरकारची चाल असून त्यास महाराष्ट्रातील भाजप सरकार बळी पडत आहे. त्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेने एकजूट दाखवण्याची गरज असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची आवक वाढली

$
0
0

प्रतिक्विंटलमागे १५० रुपयांनी दरात वाढ

म. टा. वृत्तसेवा निफाड

कांद्याच्या भावात सलग आठव्या दिवशी सुरू असलेली वाढ गुरुवारीही कायम दिसून आली. लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये बुधवारच्या तुलनेत १५० रुपये प्रतिक्विंटल जादा दर मिळाला. भाववाढ होत असल्याने कांद्याची आवकही वाढली आहे.

यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा खराब झाला. परिणामी महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३०० रुपयांच्या आसपास असलेल्या कांद्याने आता हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक गुरुवारी वाढली.

जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक म्हणजे ३४ हजार ५३० क्विंटल कांदा आवक पिंपळगाव बाजार समितीत होती. तेथे सरासरी सर्वाधिक एक हजार ३०१ रुपये पुकारला गेला तर जास्तीत जास्त १४६६ रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीमध्ये २६ हजार ६०० क्विंटल आवक होती. जास्तीत जास्त १४८३ तर सरासरी १२५१ रुपये प्रतिक्विंटल दर होता. पिंपळगाव, लासलगाव, विंचूर, निफाड, उमराणा, चांदवड, वनी, दिंडोरी या कांदा मार्केटमध्ये गुरुवारी एकूण एक लाख ९ हजार ७०२ क्विंटल आवक होती.

निर्यातीला द्या अनुदान

इतर राज्यासह परदेशातही सध्या कांद्याला मागणी वाढली आहे. दुबई, कोलंबो, बांगलादेशासह अजून काही छोट्या देशातही लासलगावच्या कांद्याची निर्यात सुरू आहे. परंतु, ही निर्यात अपेक्षित उद्दिष्टाइतकी नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे कांदा निर्यातमूल्य शून्य डॉलर असले तरीही निर्यातीला पाच टक्के प्रोत्साहन अनुदान केलेली आहे. लासलगाव बाजार समितीच्या वतीनेही निर्यातीला प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केलेली आहे.

टप्प्या-टप्प्याने आणा माल

लासलगाव बाजार समितीच्या मुख्य व दुय्यम बाजार आवारांवर दिवसेंदिवस कांदा आवकेत वाढ होत आहे. त्यामुळे कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्यासाठी शेतकऱ्यांनी टप्या-टप्याने बाजार समितीमध्ये माल विक्रीस आणावा, असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती संदीप दरेकर यांनी केले आहे.

मागणीत वाढ

राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला असून येत्या १५ ते २० दिवसात तेथील कांदा संपणार आहे. तसेच तामीळनाडूतील कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. रमजानचे उपवास संपल्याने देशांतर्गत व परदेशात कांद्याची मागणी वाढल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या कांदा बाजारभावात तेजी निर्माण झाल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी घाई करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककर संभ्रमात

$
0
0

- पुरेशी जनजागृती न झाल्याचा परिणाम

- सोशल नेटवर्किंगवरील संदेशांमुळे गोंधळात भर

- प्लास्टिक संकलन केंद्रांचा शोध सुरूच

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई/नाशिक

प्लास्टिकबंदी लागू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे, मात्र नाशिककरांमध्ये याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुरेशी जनजागृती न झाल्याने कोणत्या पद्धतीचा प्लास्टिकवापर चालेल किंवा कोणते प्लास्टिक बाळगले तर दंडात्मक कारवाई होईल, या संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. प्लास्टिकच्या ५० मायक्रॉनवरील पिशव्या वापरल्या तर चालतीत, मॉलमध्ये मिळणाऱ्या किंवा सामानाच्या मोठ्या पिशव्या वापरल्या तर चालतील, अशा पद्धतीचेही संदेश सोशल नेटवर्किंगवरून फिरत असल्याने आणि सुरुवातीच्या काळात यातील कोणत्याच माहितीला अधिकृतरीत्या चुकीचे न ठरवल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

उद्या, शनिवारी २३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू होत आहे. घरातील प्लास्टिकच्या पिशव्या संकलन केंद्रांमध्ये जमा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिलेली असतानाही अनेक नाशिककर शेवटच्या क्षणी जागे झाले आहेत. नाशिकमध्ये प्लास्टिक संकलन केंद्रे कुठे आहेत, याची बहुतांश नागरिकांना माहिती नाही. त्यातही सुरुवातीला जाड्या प्लास्टिकच्या पिशव्या चालतील, अशा चर्चा होत असताना राज्य सरकार किंवा महापालिका कोणाकडूनही याचे खंडन करणारी जनजागृती न झाल्याने पातळ प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यासाठी अनेकांनी वापरल्या आणि जाड पिशव्या कशाला टाकायच्या म्हणून घरातच ठेवून दिल्या, असेही चित्र आहे. त्यातच हे पावसाचे दिवस असल्याने अनेकांनी बॅगा, पर्समधील सामान भिजू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या जवळ बाळगल्याचेही आढळते.

संकलन केंद्रे रिकामीच

केवळ दुकानामध्ये मिळणारे सामान, भाज्या, धान्य यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात असे नाही, तर कानातले, क्लिप्स ते इतर प्लास्टिकचे मग, बादली, कपड्यांचे चाप, डबे यासाठीही प्लास्टिकचेच वेष्टण उपलब्ध असते. या वस्तूही प्लास्टिकच्या आवरणातून बाहेर आलेल्या दिसत नाहीत. हातगाडीवरून हे सामान विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये तर या संदर्भात फारशी जाणीव-जागृतीही नाही. प्लास्टिकबंदीसंदर्भात ठिकठिकाणी फलक, विविध माध्यमांतून होणाऱ्या जाहिराती याचा मारा झाला असता तर अधिक लोकांपर्यंत या बंदीची माहिती पोहोचली असती. ही माहिती न पोहोचल्याने प्लास्टिक संकलन केंद्रांमध्येही प्लास्टिक पिशव्या फारशा संकलित झालेल्या नाहीत.

नाशिककरांनाही होणार दंड

नाशिक : राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केल्यानंतर त्याच्या विल्हेवाटीसाठी २३ जूनची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत महापालिका हद्दीत केवळ विक्रेत्यांवरच दंडात्मक कारवाई होत होती. आता मात्र बंदी लागू झाल्याने नाशिककरांवरही दंडात्मक कारवाई होईल. यासाठी ५ हजारांचा दंड केला जाणार असून, महापालिकेच्या वतीने सहा विभागीय कार्यालयांमध्ये या कारवाईसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कविताच... माझी कबर’चे रविवारी प्रकाशन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या 'कविताच... माझी कबर' या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता मु. श. औरंगाबादकर सभागृह सार्वजनिक वाचनालय, शालिमार येथे होणार आहे.

ख्यातनाम कवी वसंत आबाजी डहाके व डॉ. प्रभा गणोरकर यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन होत असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकदादा पाटील आहेत. याप्रसंगी कवी अरुण शेवते, डॉ. रमेश पाटील, शशिकांत गुळुमकर, सुरेश हिंगलासपूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संजय चौधरी यांचा माझं इवलं हस्ताक्षर या पहिल्या कविता संग्रहाचं रसिकांनी जोरदार स्वागत केले होते. २००५ मध्ये हा संग्रह प्रकाशित झाला आहे. साध्या सोप्या भाषेत जगण्याविषयीचं प्रवाही चिंतन चौधरी यांच्या कवितेत आहे. मराठी कवितेच्या परंपरेत वैशिष्ट्यपूर्ण कविता लिहिणाऱ्या कवींमध्ये संजय चौधरी यांचे नाव घेतले जाते. कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभास अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथाली प्रकाशन व संजय चौधरी मित्र परिवाराने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदभरती संभ्रमाचा परिणाम

$
0
0

डीटीएड, बी. एड कॉलेजेस जुळवताहेत प्रवेशाची समीकरणे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२०१२ पासून रेंगाळलेल्या शिक्षक भरतीचा परिणाम भावी गुरूजी घडविणाऱ्या डीटीएड आणि बी.एड. अभ्यासक्रमांना मिळणाऱ्या प्रतिसादावरही होत असल्याचे चित्र आहे.

शासनाने नुकतीच पदभरतीची घोषणा केली होती; मात्र त्यात शिक्षक पदाचा उल्लेख नव्हता. यामुळे या पदवी व पदविकाधारकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर लवकरच राज्यात सुमारे २४ हजार रिक्त पदांपैकी सुमारे १८ हजारावर शिक्षक भरण्याची तयारी दाखविली होती. मात्र सद्यस्थितीत शासकीय स्तरावरून या वृत्ताला आधार नाही. या संभाव्य जागांबाबत शासनाने तपशील जाहीर करावा, असा सूर आता या पदवीधारकांनी आळवला आहे.

याच महिन्यात बी. एड. पदासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी एन्ट्रन्स सेलला चांगलीच प्रतीक्षा करावी लागली. यातच आता या अभ्यासक्रमाचा कालावधीही वाढत असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. त्यात टीईटी व अभियोग्यता चाचणीसारख्या परीक्षा सलग काही वर्षांपासून घेऊन त्या विद्यार्थ्यांनाही अद्याप सरकारने सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली नाही. परिणामी, या पदव्यांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ घटत असल्याने विद्यार्थीसंख्येचा समतोल साधण्यासाठी कॉलेजांनाचा प्रयत्न करावे लागत आहेत. डीटीएड अभ्यासक्रमांची स्थिती मात्र जास्त त्रासदायक आहेत. काही ठिकाणी कॉलेजांवर विद्यार्थीसंख्येअभावी टाळे लावण्याची वेळ आली आहे.

पवित्र पोर्टलच घडवू शकेल बदल

शासनाने शिक्षक भरती लवकरच करण्याचे आश्वासन वेळावेळी उमेदवारांना दिले आहे. या पदभरतीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. या पोर्टलद्वारे होणारी शिक्षणसेवकांची भरती ही पारदर्शक पद्धतीने होईल, असा शासनाचा दावा आहे. यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी व शिक्षण निरीक्षक आदी घटकांचे जिल्हानिहाय प्रशिक्षण वर्गही सुरू झाले आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून प्रलंबित असलेल्या भरतीला गती मिळाल्यास या अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद पुन्हा वाढीला लागेल, असा आशावाद या अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या कॉलेजांना आहे.

रिक्त जागांचा तपशील जाहीर होण्यास अवकाश

सद्यस्थितीत पवित्र पोर्टलबाबत संबंधित घटकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरातील शाळांना पासवर्ड व आयडी पुरविण्यात येणार आहे. याच्या आधारे शाळेचे व्यवस्थापन त्यांच्याकडील पदभरतीसाठी आवश्यक त्या पदांची संख्या पोर्टलवर अपलोड करेल. या प्रक्रियेत ज्यावेळी सर्व शाळांचा समावेश होईल, त्यावेळीच राज्यभरातील एकूण रिक्तसंख्येवर प्रकाश पडू शकणार आहे. दरम्यानच्या कालावधीत पवित्र पोर्टल लवकर सुरू करून टीईटी व अभियोग्यता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी उमेदवारांच्या वतीने करण्यात येत आहे.

लोगो : शाळा / कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच महिलांचे दागिने ओरबाडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. २१) दुपारी दीड वाजता शिवाजीनगर येथील जनता विद्यालयाच्या बोर्डाजवळ एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे लॉकेट दोन अज्ञात व्यक्तींनी ओरबाडून धूम ठोकली. याच व्यक्तींनी आणखी चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे.

पुष्पावती भिकाजी कुलथे (वय ७९, रा. बोधलेनगर) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील जनता विद्यालयाजवळून पायी जात होत्या. त्याच वेळी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ओमपान असलेले लॉकेट ओरबाडून नेले. या दोघांनी हेल्मेट परिधान केलेले होते. दोघांनीही निळ्या रंगाचे शर्ट परिधान केलेले होते. कुलथे यांनी आरडाओरड केल्यावर आजूबाजूचे नागरीक गोळा झाले. परंतु, तोपर्यंत दागिने लुटणारे फरार झाले. याशिवाय उपनगर येथील कन्हैया स्वीट्सजवळ सुनीता प्रभाकर टर्ले, विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ जयश्री मंगेश गुबाडे, डावखरवाडी येथे मधुरा तुकाराम कुसाळे आणि म्हसोबा मंदिर येथे सायली विजय महाले या चार महिलांच्या गळ्यातील दागिनेही ओरबाडल्याची माहिती या फिर्यादीत दिली आहे. या चारही घटनांतील चेन स्नॅचर्स नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेले होते व निळ्या रंगाचे शर्ट परिधान केलेले होते. या साम्यामुळे या पाचही घटनांतील महिलांचे सोन्याचे दागिने संबंधित व्यक्तींनीच लुटले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनांतील लुटारूंचा शोध घेण्यासाठी उपनगर पोलिस ठाण्याचे एक पथक श्रीरामपूर येथे रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रभाकर रायते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशवासीयांचा योगाभ्यास

$
0
0

जळगावसह जिल्ह्यातही विविध कार्यक्रम; शाळांमध्ये उत्साह

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभरात गुरुवारी (दि. २१) चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्योदयापासून जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध संस्थांतर्फे तसेच शाळा, कॉलेजेस, शासकीय कार्यालयांमध्ये योगाचे प्रात्यक्षिके करण्यात आली.

लहान मुलांसह ज्येष्ठांना योग गुरूंकडून मार्गदर्शन, प्रात्यक्षिके बरोबरच उपस्थितांकडून करून घेण्यात आले. दररोज नियमित योग केल्यास शारीरिक व मानसिक काय फायदे होतात याचे विवेचन कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आले. या योग दिनी दैनंदिन योग करण्याचा निश्चयही अनेकांनी केला. सकाळपासून जिल्ह्यात तसेच शहरातील वातावरण योगमय झाले होते. जळगावात जिल्हा क्रीडा संकुल, काव्य रत्नावली चौकात शेकडो, अबालवृद्ध या कार्यक्रमात सहभागी झाले. जळगावातील काव्य रत्नावली चौकात सकाळी सामूहिक योगाभ्यास घेण्यात आला.

काव्य रत्नावली चौकात रिदमिक योग
काव्यरत्नावली चौकात भवरलाल अॅण्ड कांताबार्इ जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी रिदमिक योगाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. योगशिक्षिका हेतल पिंपरिया व डॉ. आदित्य जहागिरदार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या वेळी जळगावातील सुमारे ३४२ नागरिकांनी सहभाग घेतला.

गोदावरी फाउंडेशन
गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये योगदिनानिमित्त योगाभ्यासाचे धडे गिरविण्यात आले. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, भुसावळ, सावदा येथील सीबीएसई स्कूल, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, डॉ. वर्षा पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालय, विधी आणि विज्ञान महाविद्यालय, या शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे धडे गिरविण्यात आले. संस्थांमधील विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही योगाभ्यास करून योगदिन उत्साहात साजरा केला.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवारी योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. पदवीप्रदान सभागृहात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासाठी योग प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर, कुलसचिव भ. भा. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जे. बी. नाईक, राष्ट्रीय छात्रसेनचे कर्नल दिलीप पांडे, कर्नल अॅलेक्स जोसेफ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. गीतांजली भंगाळे यांनी योगासनाबाबत माहिती दिली तर श्रद्धा व्यास या विद्यार्थिनीने योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखविले. या वेळी एनसीसी बटालियन अठराचे विद्यार्थी, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठ उपअभियंता राजेश पाटील, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील तसेच विद्यार्थी विकास विभागाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

श्री स्वामी समर्थ विद्यालय
येथील स्वामी समर्थ विद्यालय व योगा कल्चर असोसिएशनकडून राष्ट्रीय खेळाडू राधिका सुधीर पाटील हिने विद्यार्थांना योगाबद्दल माहिती देऊन वेगवेगळे आसने करून दाखवली. या प्रसंगी संघटनेचे सचिव अश्रय सोनवणे, प्रवीण पाटील, मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, हर्षाली पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

धुळ्यात सामूहिक योगा उपक्रम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुवारी शहरातील पोलिस मुख्यालय मैदानावर आयोजित केलेल्या सामूहिक योगा उपक्रमात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या योगा उपक्रमाचे आयोजन पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्यास धुळे यांच्यावतीने करण्यात आले होते. जागतिक योग दिनाचे महत्त्व भारत स्वाभिमान न्याय धुळेचे जिल्हा प्रभारी प्रीतमसिंह ठाकूर यांनी विशद केले. तर पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी डॉ. राजेंद्र निकुंभ यांनी उपस्थितांकडून योगासने करवून घेतली. तत्पूर्वी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा अधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस, नगरसेविका प्रतिभा चौधरी, हिरामण गवळी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मान्यवरांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित नागरिकांनी योगासने केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंगमागे इराणी टोळी?

$
0
0

संशयितांच्या शोधासाठी श्रीरामपूरला पथक रवाना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात प्रथमच एकाच भागात आणि वेळातच तब्बल पाच चेन स्नॅचिंग झाल्याचा प्रकार उलगडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक श्रीरामपूरकडे रवाना झाले असून चेन स्नॅचिंगमध्ये इराणी टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शहरात जानेवारी ते मे महिन्याअखेरपर्यंत चेन स्नॅचिंगचे ३७ गुन्हे झाले. २०१७ मध्ये याच काळात ४७ गुन्हे झाले होते. गुन्ह्याचा तपासाचा विचार करता मागील वर्षी पोलिसांचे प्रदर्शन फार चांगले नव्हते. ४७ पैकी फक्त नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले होते. यंदा मात्र चेन स्नॅचर्सला कोंडीत पकडणाऱ्या पोलिसांनी ३७ पैकी ४१ टक्क्यांच्या सरासरीने १५ गुन्हे उघडकीस आणले. मागील महिन्याभरात पाच तर जूनच्या सुरुवातीलाच कॅनडा कॉर्नर येथे चेन स्नॅचिंगचा एक गुन्हा घडला होता. कॅनडा कॉर्नर येथे ७३ वर्षांच्या वृद्धेला टार्गेट करीत चोरट्यांनी तिच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला होता. सरासरीच्या तुलनेत चेन स्नॅचिंग कमी होत असल्याचा परिणाम पोलिसांच्या नाकाबंदीवर झाला. ठिकठिकाणी होणारी नाकाबंदी मागील काही दिवसांपासून लागत नव्हती. याचाच फायदा गुरूवारी चोरट्यांनी उचलला. काही मिनिटांत नाशिक-पुणे महामार्गावर तब्बल पाच महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन लुटून दुचाकीस्वार चोरटे फरार झाले. या घटनेची दखल घेत सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी हजर झाले.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार चोरटे शहराबाहेरील आहेत. कल्याणच्या आंबिवली परिसरात इराणी टोळ्यांचे वास्तव्य असून, श्रीरामपूर येथे त्यांचे सातत्याने येणे जाणे असते. अनेकदा हे चोरटे दुचाकीवर येतात आणि चेन स्नॅचिंग करून पुढे श्रीरामपूर येथे पोहचतात. श्रीरामपूर येथील इराणी टोळीतील सदस्य सुद्धा असाच फंडा वापरतात.

एंट्री-एक्झीट पॉइंटचा पुन्हा विचार

क्राइम ब्रँचचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले, की स्नॅचर्स टोळीचा तपास सुरू आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा तपास लवकरच पूर्ण होईल. चेन स्नॅचिंग रोखणे आणि तपास करणे अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत असून, त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. चोरट्यांनी गुरूवारी काही मिनिटांत संधी साधली. शहरातील एंट्री आणि एक्झीट पॉइंटबाबत पुन्हा विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी दारूचे अड्डे उद्धवस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी (दि. २१) विशेष मोहीम राबवित वाडिवऱ्हे आणि घोटी परिसरातील गावठी दारूच्या हातभट्या उद्धवस्त केल्या. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यात एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे. गावठी दारूसह रसायनासह तब्बल साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये संबंधी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

वाडिवऱ्हे परिसरातील दाराणा नदीपात्र परिसरात हातभट्या सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी कृष्णनगर-पारवेवाडी भागातील नदी किनारी छापे टाकून देवराम गंगाराम पारवे आणि अशोक कचरू पारवे (रा. दोघे कृष्णनगर-पारवेवाडी) यांना अटक केली. दोघांच्या हातभट्या नष्ट करण्यात आल्या. सशयितांच्या ताब्यातून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ५०० लिटर नवसागर मिश्रीत रसायन, २० लिटर गावठी दारू, २५ प्लास्टिक व पत्र्याचे ड्रम, अ‍ॅल्युमिनिअम पातेले असा सुमारे दोन लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

पिंपळगाव मोर शिवारातील मोरांचा डोंगराच्या पायथ्याशी दुसरी कारवाई करण्यात आली. याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता नंदू मेंगाळ आणि मोहन तांबडू भले (रा. दोघे बोरीची वाडी) तसेच अल्पवयीन युवक हातभट्टीवर गावठी दारूची निर्मिती करतांना आढळून आले. संशयिताच्या ताब्यातून १२ हजार ४०० लिटर नवसागर मिश्रीत रसायन, ५० लिटर गावठी दारू, ६२ प्लास्टिक व पत्र्याचे ड्रम आणि अ‍ॅल्युमिनिअमचे पातेले असा सुमारे सहा लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तीन गुन्हे दाखल

या प्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय नवनाथ गुरूळे, हवालदार राजू दिवटे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंद्रे, पोलिस नाईक जालिंदर खराटे, शिपाई संदीप हांडगे, सचिन पिंगळ, लहू भावनाथ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुद्ध पाण्यासाठी जबाबदारी निश्चित

$
0
0

जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून मार्गदर्शन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. याकामी दुर्लक्ष केल्यास किंवा दूषित पाण्यामुळे गावात साथ उद्भवल्यास ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची आढावा बैठक शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे व प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते यांनी नाशिक येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. डॉ. गिते म्हणाले, की जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्व गावातील, अंगणवाडी व शाळांमधील जलकुंभ व हातपंप यांची स्वच्छता करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तसेच टाक्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

कुपोषणाबाबत आढावा घेताना डॉ. गिते यांनी पुन्हा सर्वेक्षण करून वंचित बालके शोधण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ११ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व घरकुल पूर्ण करावयाचे असून, सन २०१८-१९ चे घरकुल देखील १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाने मोहीम स्वरुपात काम करण्याचे आवाहन गिते यांनी केले. आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध योजनांचा घेतला आढावा

महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी ग्राम बाल विकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहार संहिता याबाबत आढावा घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायतमधील जनसुविधेची कामे, घरकुल इ. योजनाची अपूर्ण बांधकामे याबाबत आढावा घेऊन सर्व काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅकवॉटरवर मद्यपींची जत्रा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या गंगापूर धरणाच्या परिसरात मद्यपी तरुणांची जणू जत्राच भरत असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसभर ओल्या पार्ट्या झडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, या प्रकारांबाबत तक्रारी करूनही शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या धरण परिसराच्या सुरक्षेकडे यंत्रणांचा कानाडोळ होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू होत असल्याचा घटना घडत आहेत. मात्र, तरीही गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात तरुणाई मद्याच्या पार्ट्या करून धरणात डुंबक्या मारताना दिसत आहे. त्यामुळे येथे बाटल्यांचा खच पडत असल्याचे चित्र असून, यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण राहील, असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराकडे सरकारचा कुठलाही विभाग लक्ष घालीत नसल्याने शहरवासीयांचे पिण्याचे पाणी दूषित होत असून, पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असे असतानादेखील शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वरदान ठरलेल्या गंगापूर धरणाच्या परिसरात तरुणाईच्या ओल्या पार्ट्या जोमात सुरू असल्याचे पाहायला मिळते. प्रशासनाकडून धरण परिसरात जाण्यास बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर तरुणांची गर्दी होत असल्याने यावर कारवाई करणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे महापालिका स्वच्छ नाशिक सुंदर नाशिकचा नारा देत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या परिसरात मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या व फेकलेले खाद्यपदार्थांचा खच पाहायला मिळतो. तरुणांसोबत आलेल्या तरुणीदेखील कुठलाही विचार न करता पार्टीत सहभागी होताना दिसतात. त्यामुळे आपले पाल्य नेमके कोठे असतात याबाबत शहरवासीयांनीदेखील योग्य माहिती ठेवायला हवी, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे गंगापूर धरणाचे पावित्र्य नष्ट करू पाहणाऱ्या येथील उघड्यावरील मद्याच्या पार्ट्यांना आळा घालण्याची मागणी परिसरातून होतआहे.

शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तरुणांच्या ओल्या पार्ट्या रंगत आहेत. मात्र, सरकारच्या कुठल्याही याकडे विभागाचे लक्ष नसल्याने धरण परिसरात बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. येथे येणाऱ्यांना अटकाव केला जावा.

-ज्ञानेश्वर गांगुर्डे, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे थकविल्यानेव्यापाऱ्याची जमीन जप्त

$
0
0

मालेगाव : मुंगसे येथील जय भोलेनाथ ट्रेडर्सचा कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी याने तालुक्यातील ७७७ कांदा उत्पादकांची दोन कोटींहून अधिक रक्कम थकवली आहे. या प्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी जमीन महसूल थकबाकी वसुलीच्या (आरआरसी) कार्यप्रणालीनुसार कठोर पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याप्रकरणी सूर्यवंशीच्या पत्नीच्या नावे असलेली मुंगसे शिवारातील १ हेक्टर ८२ आर जमीन शुक्रवारी जप्त केल्याची माहिती देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, सचिव अशोक देसले उपस्थित होते. गेल्या वर्षी सूर्यवंशीने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून तो बांग्लादेशी व्यापारी व पिंपळगाव येथील युनूस नामक व्यापाऱ्यास विकला होता. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी बाजार समितीचे पथक बांग्लादेशमध्ये जाऊन रिकाम्या हाताने परतले होते. अखेर हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेले. याविषयी देवरे यांनी सांगितले, की अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार २० जून रोजी सूर्यवंशीच्या घरून दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता थेट त्याच्या पत्नीच्या नावे मुंगसे येथील शेतजमीन जप्तीची कारवाई करण्यात आली. आता या जमिनीचा जाहीर लिलाव करण्याचा प्रस्ताव सोमवारी प्रांत अजय मोरे यांना देणार असल्याचे देवरे यांनी सांगितले. या लिलावातून जमा होणारी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल. पिंपळगाव येथील व्यापारी युनूसबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार आहे. सुनील देवरे यांनी सांगितले की, या कारवाईसोबतच सूर्यवंशी याचा जमीनदार अग्रवाल याच्यावरही आरआरसीनुसार कारवाई करण्याबाबत प्राधिकरणला पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड-भुसावळ शटल महिनाभर बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी नाशिकरोड-भुसावळ शटल तांत्रिक कारणास्तव शनिवारपासून (दि.२३) २० जुलैपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेने कळिवली आहे. नाशिकरोड ते भुसावळ दरम्यान देवळाली-पासून भुसावळपर्यंत ही रेल्वेगाडी धावत असते. पहाटे साडेचारला ही गाडी देवळालीला असते. तेथून पावणेपाचला सुटते. पाचला ही गाडी नाशिकरोडला येते. तेथून दहा मिनीटांनी ती भुसावळकडे निघते. गाडीला कायम गर्दी असते. महिनाभर ही गाडी बंद असल्याने भुसावळकडे जाणाऱ्या आणि रात्री नाशिकरोडकडे येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. नाशिकरोड ते भुसावळ दरम्यान रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती केली जाणार आहे. ती महिनाभर चालणार आहे. त्यामुळे २३ जून ते २० जुलै अशी महिनाभर ही रेल्वेगाडी बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी अन्य रेल्वेगाड्या वेळेत धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अन्य धावणाऱ्या गाड्यांच्या वेळेदरम्यान रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती केली जाणार आहे.

भुसावळ शटल बंद असल्यामुळे नाशिकमधील खान्देशी बांधवांची तसेच खान्देशातून नाशिकमध्ये येणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. पहाटे ही गाडी सुटते. त्यामुळे भुसावळला लवकर जाता येते. तसेच तिकडून रात्री सुटते. त्यामुळे या गाडीला कायम चांगला प्रतिसाद असतो.

अन्य गाड्यांचा आधार

भुसावळला जाण्यासाठी नाशिकरोडहून गीतांजली ही सुपरफास्ट गाडी सकाळी साडेनऊला, तर काशी एक्स्प्रेस दहा वाजता असते. या गाडीखेरीज मुंबई-भुसावळ पॅसेंजर अकरा वाजता नाशिकरोडला येते. रत्नागिरी एक्स्प्रेस सव्वाअकराला, पवन एक्स्प्रेस दुपारी तीनला, कामायनी एक्स्प्रेस पावणेचारला तर मंगला सायंकाळी सव्वापाचला आहे. सव्वासहाला पुणे-भुसावळ ही गाडी आहे. पावणेसातला सेवाग्राम एक्स्प्रेस आहे. यानंतरही अन्य गाड्या आहेत. मात्र, देवळाली-भुसावळ पॅसेंजर ही जिव्हाळ्याची व सोयीची आहे. ती बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीसगावच्या अमितचा कान्स फेस्टिवलमध्ये डंका

$
0
0

gautam.sancheti@timesgroup.com

@sanchetigMT

--

नाशिक : जागतिक पातळीवरील कान्स लायन इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ क्रिएटीव्हीटीमध्ये मराठमोळ्या अमित पाटे याच्या स्नॅप्टीविटी कंपनीने तब्बल दोन सुवर्ण लायन ऑस्कर पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे कान्समध्ये मराठी व्यक्तीचा प्रथमच डंका वाजला आहे. लंडन येथे राहणारा अमित हा चाळीसगावचा असून, तो 'नासा गर्ल' स्वीटी पाटेचा भाऊ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्पोर्ट टेक्नॉलॉजीमध्ये मोबाइल श्रेणीकरिता हे दोन सुवर्ण पुरस्कार त्याच्या कंपनीला मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवताना त्याने गुगल, अॅपल, टोयोटा, ऑडी, वेरिझॉन, पी अँड जी, ऑरेन्ज, नायकी, केफसी, कॅटबरी, ईअेका, द टाइम्स यासारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकले आहे.

अमित हा स्नॅप्टीविटी कंपनीचा संस्थापक व सीईओ आहे. या कंपनीला मिळालेले ऑस्कर पुरस्कार वेगवेगळ्या श्रेणीत आहेत. पहिला पुरस्कार मोबाइल टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठी आहे. दुसरा पुरस्कार हा सोशल या श्रेणीत रिअल टाईम रिस्पॉन्ससाठी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्रीडा व संगीतप्रेमी चाहत्यांना स्मार्ट फोनऐवजी लाइव्ह गेमला गुंतवून ठेवणारे तंत्र आहे. आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), सेन्सर व लाइव्ह डेटाचा वापर करून त्याचे जिवंत क्षण टिपले जातात. उच्च गती रोबोटिक कॅमेरे खेळपट्टीवर चालविण्याऐवजी क्रीडाप्रेमी चाहत्यांवर फोकस करून जिवंत क्रीडाप्रकाराचा त्यांचा अनुभव वाढविला जातो. सेल्फी काढण्याच्या नादात खेळाचा, संगीताचा खरा आनंद अनुभवता येत नाही. पण स्नॅप्टीविटीच्या या तंत्रामुळे आता हे शक्य झाले आहे.

एकाचवेळी क्रीडा व संगीताचा आनंद

क्रीडाप्रेमी, संगीतप्रेमी आपल्या महत्त्वाच्या क्षणांना प्राप्त करून आठवणीत साठवून ठेवू शकतात व त्याचबरोबर थेट क्रीडा व संगीत कार्यक्रमातही एकाच वेळेस सहभागी होऊ शकतात. यामुळे ब्रँड्सला प्रामाणिकपणे सोशल मीडियावर त्यांच्या प्रेक्षकांच्या संभाषणाला योग्य किमत देता येते. विशेष म्हणजे त्यांच्या समुदायाचा एक भाग बनणे शक्य होते. एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, वेम्बली स्टेडियम, इतिहाद स्टेडियम (मॅनकेटी एफसी) आणि ऑरेंज वेलॉड्रोम (फ्रान्स) सारख्या जगातील अग्रगण्य स्टेडियम्स सध्या स्नॅप्टीविटीचे तंत्रज्ञान वापरत आहेत.

या अगोदरही पुरस्कार

अमित पाटे यांनी यापूर्वी नोकियाकडून इनोव्हेशन चायलेंज हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच, त्यांना यंग अॅचिव्हर अॅवॉर्ड ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या स्नॅप्टीविटी कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रात ब्रिटिश सरकारची तसेच अनेक कॉम्प्युटर क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांची मान्यता प्राप्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images