Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकची स्वच्छ झेप

$
0
0

स्वच्छतेत नाशिकचे मानांकन सुधारले

१५१ क्रमांवरून ६३ क्रमांकावर झेप,

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक महापालिकेने आपले मानाकंन सुधारले असून, देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नाशिकने गेल्या वर्षापेक्षा यंदा दमदार कामगिरी केली आहे. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक असे ब्रीद मिरवणाऱ्या स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकने यंदा १५१ क्रंमाकांवरून थेट ६३ व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे शहराची स्वच्छतेत सुधारणा झाली असली तरी, पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक पटकवण्याचे मुख्यमंत्र्याचे स्वप्न मात्र भंगले आहे.

केंद्र सरकारच्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली आहे. देशभरातील पाचशे अमृत योजनेतील शहरांच्या सर्वेक्षणानंतर ही यादी जाहिर केली आहे. त्यात नाशिकने ६३ वा क्रमांक पटकावला असून, चार हजार गुणांपैकी नाशिकला २७८६ गुण मिळाले आहेत. त्यामुळे स्वच्छतेत नाशिक महापालिकेची ही चांगली कामगिरी मानली जात आहे. गेल्या वर्षी स्वच्छतेत नाशिकचा १५१ वा क्रमांक होता. तर सन २०१५ मध्ये ८३, २०१४ मध्ये आठव्या स्थानी होते. त्यामुळे स्वच्छतेत नाशिक महापालिकेची कामगिरी सतत घसरली होती. परंतु गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत बैठक घेवून नाशिकच्या स्वच्छतेचा आढावा घेतला होता. त्यात नाशिकने स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासनानेही कामगिरी सुधारण्यासाठी जोर लावला होता.

मुख्यमंत्र्यांची इच्छा अपूर्ण

नाशिक शहर हे स्वच्छतेत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये यावे अशी इच्छा मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी जाहीर केली होती. महापालिकेत येवून त्यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर नाशिक पहिल्या दहा शहरात यावे यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश अधिकारी व लोकप्रतिनिधींना दिले होते. परंतु नाशिक हे पहिल्या ५० शहरांमध्येही आले नसल्याने मुख्यमंत्र्याची इच्छापूर्ती न करू शकणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंधरा किलो गांजा जप्त

$
0
0

धुळे एलसीबी पथकाची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिरपूर येथून पुण्याकडे जाणारे एक वाहन अवधान टोल नाक्याजवळ एलसीबीच्या पथकाने पकडून अंदाजे १५ किलो गांजा जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. २३) सकाळी झालेल्या कारवाईत पुण्याच्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

एलसीबीच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून पुण्याकडे होणारी गांजा तस्करी उघडकीस आणली असून, गांजा तस्करी प्रकरणी पुण्यातील एकास अटक केली आहे. यामध्ये उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. धुळे मार्गे पुण्याकडे एका वाहनातून गांजा तस्करी होत असल्याची माहिती धुळे पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह महामार्गावरील अवधान टोल नाक्याजवळ सापळा लावला होता. संशयित काळ्या रंगाची चारचाकी येताच पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. त्यात अंदाजे १५ किलो गांजा मिळून आला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला असून, वाहनासह आसिफ मजीद सातारकर (वय ३२ रा. कोंडवा जि. पुणे) ताब्यात घेतले आहे. सातारकर याची चौकशी सुरू असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम दुपारी उशीरापर्यंत सुरू होते.

तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत?
या गांजा जप्तीच्या धडक कारवाईनंतर आता अनेक प्रश्नांना वाट मोकळी झाली असून, हा गांजा कुठे जात होता? कुठून आणला होता? कधी पासून गांजा तस्करी सुरू होती या सर्व प्रश्नांबाबत एलसीबीने चौकशी सुरू केली आहे. या गांजा तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहे, याचाही पोलिस तपास करीत आहेत. अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय हेमंत पाटील, एपीआय भाबड, हवालदार प्रभाकर बैसाणे, मनोज बागूल, अशोक पाटील, उमेश पवार, रवी राठोड, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेकवाडेच्या मुकेशचे पीएसआय परीक्षेत यश

$
0
0

अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात ३३ वा क्रमांक

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शिरपूर येथील सर्वसामान्य कुटुंबातील मुकेश बापू शिरसाठ या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात ३३ वा क्रमांक मिळवला आहे.

मुकेश शिरसाठ हा टेकवाडे (ता. शिरपूर) येथील रहिवासी आहे. त्याचे वडील (कै) डॉ. बापू बाबुराव शिरसाठ हे शहादा येथे वैद्यकीय अधिकारी होते. १९९८ मध्ये त्यांचे अपघाती निधन झाले. त्याची आई निर्मलाबाई शिरसाठ येथील उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. मुकेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पढावद (ता. शिंदखेडा) येथील विवेकानंद हायस्कूल तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण टेकवाडे येथील आर. सी. पटेल महाविद्यालयात झाले आहे. त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्याला एक लहान भाऊ व विवाहित बहीण आहे.

पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी
उपनिरीक्षक पदासाठी मुकेशने आतापर्यंत चार परीक्षा दिल्या होत्या. चारवेळेस मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारूनही अपयश आल्यांनतरही त्याने जिद्द सोडली नाही. पाचव्यांदा यश मिळवायचेच या निश्चयाने झपाटलेल्या मुकेशने दररोज दहा तास अभ्यास केला. त्याला येथील विजयश्री अकॅडमीचे जितेंद्र शेटे यांनी अभ्यासिकेत विशेष सुविधा उपलब्ध करून दिली. कोणत्याही क्लासचे मार्गदर्शन न घेता त्याने एकाग्र चित्ताने व नेटका अभ्यास केला. त्याच्या यशाचे वृत्त कळताच अभ्यासिकेच्या सदस्यांनी एकाच जल्लोष करीत त्याचा सत्कार केला. अकादमीचे संचालक जितेंद्र शेटे ,सचिन पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या यशाचे शहरातून कौतुक केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत ११ किलो प्लास्टिक जप्त

$
0
0

पंचवटी : प्लास्टिक पिशव्या, थर्मोकॉल जप्ती मोहिमेत पंचवटी परिसरात रविवारी (दि. २४) सुमारे ११ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. मोहिमेत तीन व्यक्तींकडून ५ हजार रुपयांप्रमाणे १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पथकामार्फत नागरिकांना प्लास्टिक कॅरी बॅग न वापरण्याबाबत भाजी बाजार, रामकुंड आदी परिसरात जनजागृती करण्यात आली. डी. बी. माळेकर, दीपक चव्हाण, किरण मारू, गणेश गायकवाड यांनी ही मोहिम राबविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातानंतर तरुणाला मारहाण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायवेवरील स्पीड ब्रेकरवर वेग कमी करणाऱ्या वाहनास पाठीमागून धडक देणाऱ्या वाहनचालकाने आपल्या साथिदारासह नुकसान झालेल्या वाहनचालकास मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २२) रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा हायवेवरील जत्रा हॉटेलसमोरील स्पीड ब्रेकरवर झाली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

मोतीराम पवार आणि त्यांच्या दोन ते चार साथिदारांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी प्रकाश यादव वाकळे (३०, रा. टिळकनगर, ओझर, निफाड) यांनी फिर्याद दिली आहे. वाकळे आपल्या कुटुंबीयासह कारमधून (एमएच ०६, एडब्लू ७७२५) नाशिकच्या दिशेने येत होते. हायवेवरील स्पीड ब्रेकर दिसल्याने वाकळे यांनी कारचा वेग कमी केला. वाकळे यांच्या कारपाठीमागे असलेल्या चालक मोतीराम पवार यास मात्र कारचा (एमएच १५, ईपी ७३७९) वेग कमी करता आला नाही. पवार यांची कारची वाकळे यांच्या कारला पाठीमागून धडक बसली. अपघातानंतर पवारने त्यांच्या तीन ते चार साथिदारांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी वाकळे यास शिवीगाळ व मारहाण केली. घटनेचा अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

युवकाकडून महिलेचा विनयभंग

मुलीचा संसार का मोडलास, याचा जाब विचारणाऱ्या महिलेला संदीप रामकृष्ण हातगे (१९, रा. हनुमाननगर, मुंबई आग्राहायवे) या युवकाने शिवीगाळ करून मारहाण करीत विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजेच्या सुमारास आरोपीच्या घराजवळ झाली. संशयित आरोपीने फिर्यादी महिलेचा विवाह मोडला. याचा जाब महिलेने विचारल्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पीएसआय जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासाका’ रस्ता खिळखिळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक साखर कारखाना ते नाशिक-पुणे महामार्गादरम्यानच्या पाच किलोमीटरच्या रस्त्याला कोणीही वाली राहिलेला नसल्याने हा रस्ता खिळखिळा झाला आहे. यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे हा शंभर फुटी रस्ता अक्षरश: खड्ड्यात गेल्याची स्थिती आहे. 'नासाका'च्या तत्कालीन कारभाऱ्यांनी या रस्त्याची केवळ कागदोपत्री दुरुस्ती केल्याचा पराक्रम सध्या स्थानिक नागरिकांच्या जिवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे.

नाशिक सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाल्यानंतर या साखर कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. कारखान्याची अडचण ओळखून सुमारे ३५ वर्षांपूर्वी पळसे आणि शिंदे या दोन्ही गावांच्या शिवेवरील शिव नाल्याच्या कडेला शंभर फुटी रस्ता तयार करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आपल्या जमिनीतील जागा दिली होती. त्यानंतर येथे शंभर फूट रुंदीचा रस्ता उभारण्यात आला. सुमारे तीन दशके याच रस्त्याद्वारे नाशिक साखर कारखान्याला उसाची रसद मिळत होती. नाशिक साखर कारखान्याचा एकेकाळचा प्राण असलेला हा रस्ता आजमितीस शेवटच्या घटका मोजत आहे. मोठे खड्डे पडल्याने सध्या या रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यातूनच वाहने चालवावी लागत आहेत. शालेय विद्यार्थ्यांसह शेतमाल वाहणाऱ्या शेतकऱ्यांचेही अतोनात हाल होत आहेत.

दुरुस्ती केवळ कागदोपत्री

महामार्गावरील बंगालीबाबा थांबा ते 'नासाका'दरम्यानचा रस्ता 'नासाका'च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री दुरुस्त केल्याचा आरोप स्थानिक नागरिक रामदास पगार, नंदू नरवडे, चंद्रभान जाधव, राजू गायखे, ज्ञानेश्वर गायधनी, भाऊसाहेब सरोदे, दशरथ सरोदे, शिवाजी गायखे, माधव गायधनी, माधव एखंडे, सोमनाथ जाधव, दिलीप गायधनी आदींनी केला आहे. हा रस्ता 'नासाका'च्या मालकीचा असल्याचे कारण पुढे करून स्थानिक आमदार व खासदारांकडूनही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे.

स्थानिक राजकारणाचाही फटका

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणावेळी ठेकेदार कंपनीने या रस्त्याचा वापर अवजड मालाच्या वाहतुकीसाठी केला होता. त्यामुळे रस्त्याची आणखी जर्जर अवस्था झाली. यावेळी काही नागरिकांनी या कंपनीकडे रस्तादुरुस्तीची मागणी केली होती. कंपनीने प्रथम ही मागणी मान्यही केली होती. परंतु, ऐनवेळी स्थानिक राजकारणाची माशी शिंकल्याने कंपनीने चिंचोली रस्त्याची दुरुस्ती करून त्याचा वापर केला. परिणामी 'नासाका' रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही.

या गावांना जोडणारा रस्ता

पळसे व शिंदेसह दोनवाडे, राहुरी, वडगाव पिंगळा, पांढुर्ली, विंचुरीदळवी, शेवगेदारणा, नानेगाव, देवळाली कॅम्प, भगूर, घोरवड आणि चिंचोली या तेरा गावांना जोडणारा हा रस्ता आहे. याशिवाय औरंगाबाद व पुणे महामार्ग ते 'नासाका'मार्गे घोटी मार्गालाही हा रस्ता जोडला गेला आहे.

महामार्ग ते 'नासाका' रस्त्याची सध्या मोठी दुर्दशा झाली आहे. 'नासाका'च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी हा रस्ता यापूर्वी केवळ कागदोपत्री दुरुस्त केलेला आहे. प्रत्यक्षात या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने सध्या हा रस्ता खड्ड्यांत हरवला आहे. 'पीडब्ल्यूडी'कडे हा रस्ता आजवर वर्ग न झाल्याचे कारण पुढे करून स्थानिक आमदार व खासदारांनीही दुरुस्तीस रेड सिग्नल दिला आहे.

-नंदू नरवडे, स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाचा मुलगा झाला फौजदार

$
0
0

कृष्णा जाधव याचा राज्यात २९ वा क्रमांक

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

शिंदेगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील युवक कृष्णा बहिरू जाधव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षकाची परिक्षा राज्यात २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.

परिस्थिती संघर्ष करीत कृष्णाने यश मिळविले आहे. पुणे येथील पेपर कंपनीत नोकरी करून त्याने कुटुंबाला हातभार लावला. २०१६ मध्ये लोकसेवा आयोगाची जाहिरात आल्यावर पोलिस उपनिरीक्षक बनण्यासाठी त्याने नोकरी सोडली. नाशिकरोड येथील अटल ज्ञानसंकुल अभ्यासिकेत प्रवेश घेऊन दिवसातून दहा-दहा तास अभ्यास करून त्याने २०१७ मध्ये परीक्षा दिली. त्याने महाराष्ट्रात २९ वा क्रमांक मिळवला. जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास नवाळे, युनिव्हर्सल अॅकॅडमीचे राम खैरनार, मंत्रालयाचे कक्ष अधिकारी अमोल उगलमोगले यांचे मार्गदर्शन मिळाल्याने हे यश लाभल्याचे त्याने नमूद केले. आमदार घोलप हे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देताना म्हणाले, की स्पर्धा परीक्षेत शेतकरी कुटुंबातील व ग्रामीण भागातील मुले चमकू लागल्याने मनस्वी आनंद होत आहे. कृष्णाने उज्ज्वल यश मिळविल्याचा सार्थ अभिमान वाटतो. कृष्णाच्या सत्कारप्रसंगी नाशिक बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, भाऊराव तुंगार, नवनाथ गायधनी, ज्ञानेश्वर तुंगार, भाऊराव जाधव, प्रमोद सांगळे, रोशन जाधव, रवी तुंगार, किरण मते आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव पोलिसाकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी (दि.२३) मुंबई आग्रा महामार्ग लगत एका हॉटेल समोर सापळा रचला आणि दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली. या दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोविंद शाम पवार (१९, रा. धनगरवाडी, आडगाव शिवार) व मनोज संतोष आराध्ये (२४, रा. शांताई मंगल कार्यालयासमोर, पळसे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ९ वा मैल परिसरात दुचाकी चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेल्या खालसा पंजाब हॉटेल परिसरात आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे मुनीर काझी, विजयकुमार सूर्यवंशी, विनोद लखन, मनोज खैरे यांच्यासह आदींनी सापळा रचला. रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित दुचाकी चोरटे या भागात आले असता, पोलिसांची चाहूल लागताच पळ काढला. पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. त्यांनी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दोघांकडून दोन होंडा शाईन, दोन अॅक्टिव्हा, एक हिरो होंडा सीडी डिलक्स या दुचाकी जप्त करीत सुमारे १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट मुखत्यारपत्राद्वारे

जमीन मालकाची फसवणूक

पंचवटी : दिंडोरी रोडलगत असलेल्या जमिनीचे बनावट साठेखत व मुखत्यारपत्र तयार करून अहमदाबाद येथे राहणाऱ्या वृद्धाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदाबाद येथील सायन सिटी येथे असलेल्या अवध बंगलोज येथे राहणारे गौतम शांतीलाल मिश्री (वय ६५) हे राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित किशोर मोहनलाल सुगंध याने एक जून २००८ रोजी मिश्री यांच्या मालकीच्या पंचवटीतील दिंडोरी रोडलगत सिटी सर्व्हे नं. १३२/७/२ मधील ३९८५.५७ चौरस मीटरपैकी १४८५.७८ या क्षेत्राचे बनावट साठेखत व मुखत्यारपत्र तयार केले. त्यावर मिश्री व त्यांच्या नातेवाइकांच्या बनावट सह्या केल्या. संशयिताने यामध्ये मिश्री यांच्या वडिलोपार्जित जमिनीत स्वामित्वदोष निर्माण करून ते बनावट कागदपत्र खरे असल्याचे भासविले. या घटनेतील साक्षीदार हेमराज पाटील यांच्याकडून संशयिताने वीस लाख रुपये घेऊन पुन्हा वीस लाख रुपयांची मागणी करून गौतम मिश्री व हेमराज पाटील यांची फसवणूक केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेगर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंद दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न

$
0
0

नाशिक : वडाळारोडवरील साईनाथनगर परिसरातील बंद दुकानाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या विशाल उर्फ इंद्या वसंत बंदरे (वडाळा गाव) यास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी प्रकाश कैलास कटारिया यांनी फिर्याद दिली आहे. चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) पहाटे उघडकीस आली. इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली. घटनेचा अधिक तपास हवालदार सी.व्ही.माळोदे करीत आहेत.

वाहनचोरी

नाशिक : जनरल वैद्यनगर येथील व्यंकटेश अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये असलेली मोपेड (एमएच १५, एफएक्स ०९९५) चोरट्यांनी हॅण्टल लॉक तोडून हातोहात लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. २२) मध्यरात्री घडली. या प्रकरणी ऐश्वर्या बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार युनूस शेख करीत आहे.

तरुणाचा मृत्यू

नाशिक : चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. संतोष चोखाजी खिल्लारे (रा. राजीवनगर) असे या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (दि. २३) बेशुद्धावस्थेत पडल्याने संतोषला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास हवालदार एल. बी. भामरे करीत आहेत.

पैसे न दिल्याने मारहाण

नाशिक : मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याने रोहित काळे आणि त्याच्या जोडीदाराने शरद शिवाजी गवळी (२६, रा. अरिंगळे मळा, सिन्नर फाटा) या तरुणास मारहाण केली. ही घटना मुक्तिधाम मंदिराच्या मेनगेटसमोर मंगळवारी (दि. १९) रात्री आठ वाजता झाली. आरोपी आणि फिर्यादी ओळखीचे आहेत. संशयिताने पैसे देण्यास नकार देणाऱ्या गवळीच्या डोक्यात काचेची बॉटल फोडून मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वे स्टेशनजवळ वाहनचोरी

नाशिक : सिन्नर येथील भाटवाडी येथे राहणाऱ्या सुजित महाले (३२) याने नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळील भगत हॉटेल जवळ पार्क केलेली दुचाकी (एमएच १५, सीडब्लू ४७०९) चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ८ ते ९ जून या दरम्यान घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाची रिपरिप

$
0
0

कुठे सामसूम तर कुठे रिमझिमने दिलासा

टीम मटा

जिल्ह्यात पावसाने रविवारीही काही ठिकाणी हजेरी लावली तर काही ठिकाणी उघडिप दिल्याची परिस्थिती होती. जिल्ह्यात इगतपुरी, घोटी परिसरासह त्र‌यंबकेश्वर, येवला येथे पावसाने हजेरी लावली. तर सटाणा, कळवण, मालेगाव तालुक्यात विश्रांती घेतली होती.

इगतपुरीत बळीराजा सुखावला

घोटी : घोटी, इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दडून बसलेल्या पावसाला रविवारी (दि. २४) दुपारपासून सुरुवात झाली. हा पाऊस दमदार नसला तरी रिपरिप असल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा भाग समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसाने काही अंशी दडी मारली होती. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी शेतात भाताची पेरणी केल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा होती. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांनाही दिलासा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होत होता. तर इगतपुरी तालुक्याकडे मात्र वरुणराजाने पाठ फिरवली होती. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत असल्याने पावसाची चिन्हे जाणवत होती. अखेर दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने बळीराजा काही अंशी सुखावला.

त्र्यंबकला पर्यटक भिजले

त्र्यंबकेश्वर : येथे पावसाची रिपरिप सुरू झाली असून, रविवारी (दि. २४) पर्यटनास आलेल्या भाविकांमुळे शहर फुलले होते. त्र्यंबकेश्वरला दुपारनंतर पावसाचे आगमन झाले. दरम्यान, या पावसाने मंदिराच्या पूर्वदरवाजास असलेला कापडी मंडप पडला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे उत्तर दरवाजाने प्रवेश देण्यात येत आहे. मंदिरासमोरील रस्त्यावर भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी या पावसात भिजत असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. मंदिर प्रांगणात आल्यानंतर मात्र दर्शनबारीत भाविकांना पावसापासून निवारा मिळत आहे. पाऊस सुरू होताच पहिणे बारीतील सौंदर्य बहरास आले असून, शनिवार, रविवार पर्यटकांची पाऊले वळली आहेत. त्यामुळे या मार्गावर परिसरातील आदिवासी बांधवांनी पर्यटकांना खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी झाडांच्या पानांपासून साकारलेले शेड तयार केले आहेत.

येवल्यात शिडकावा

येवला : मृग नक्षत्राने बराच काळ दगा दिल्यानंतर त्यापाठोपाठ हत्ती वाहन घेऊन दोन दिवसांपूर्वी प्रवेशकर्ते झालेल्या आर्द्राने जोरदार सलामी दिली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने शनिवारी आणि रविवारी रिपरिप सुरूच ठेवली होती. या आर्द्राच्या पर्जन्यधारा खरीप हंगामासाठी आसुसलेल्या बळीराजासह सर्वांनाच दिलासा देणाऱ्या आहेत. रविवारी अधूनमधून ढगांचा गडगडाट होताना दुपारनंतर येवला शहर व तालुक्यात पावसाने शिडकावा केला. येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील अंदरसूल, मुखेड, पाटोदा परिसरासह सर्वदूर या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळताना रखडलेले खरिपाचे चक्र वेगाने पुढे सरकण्यास मदत होणार आहे. तसेच ओस पडलेली बि-बियाण्यांची दुकाने पुन्हा गजबजू लागली. मृगाने अंतिम पर्वातील गेल्या तीन दिवसांत मोठा दिलासा देताना येवला तालुक्यात पर्जन्यधारा बरसल्या. तीन दिवसांच्या या वरुणकृपेने तालुक्यातील शेतकऱ्यांची पावले येवला शहर व तालुक्यातील विविध ठिकाणच्या बि-बियाणे व रासायनिक खते विक्रीच्या दुकानांकडे वळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी संभ्रमात

$
0
0

विद्यार्थ्यांचे नुकसानीस कॉलेज जबाबदार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या प्रवेशाचा माहोल सुरू आहे. फार्मसीसारख्या विद्याशाखांना सध्या सुगीचे दिवस असल्याने अनेक कॉलेजांचे प्रस्तावदेखील शासन दरबारी पडून आहेत. या शाखेकडे काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता प्रवेश क्षमता वाढविण्याची मागणी होत होती. यानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम आदींच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही मान्यता देताना विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी कॉलेजांसाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असल्याची अट बंधनकारक करण्यात आली आहे. मान्यतेशिवाय विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास महाविद्यालयांची जबाबदारी असणार याचा अर्थ शिक्षण विभागाने हात झटकले, असा होत असल्याने विभागाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पालक अन् विद्यार्थीही संभ्रमात पडले आहेत.

राज्यात फार्मसीच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमांची प्रक्रिया सुरू झाली असतानाही अनेक कॉलेजांच्या हाती अद्यापही कौन्सिलची मान्यता मिळालेली नाही. परिणामी, मान्यता नसलेले हे कॉलेज प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा उलट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन त्यांच्या प्रवेशाचा खोळंबा होऊ नये, यासाठी कौन्सिलची मान्यता नसलेल्या कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एक पर्याय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने खुला करून दिला आहे. या पर्यायाच्या आधारावर प्रवेशाचा जुगार आता फार्मसीच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावर मान्यता नसलेल्या कॉलेजांनाही खेळता येणार आहे.

बोगस कॉलेजेसचा धोका

विद्यार्थी व पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेकदा कौन्सिलच्या मान्यतेशिवाय प्रवेश देणारी बोगस कॉलेजेसही या प्रक्रियेत डोके वर काढण्याचा मोठा धोका आहे. यासाठी कौन्सिल व संबंधित वरिष्ठ संस्थांनी निश्चित केलेले निकष तपासल्याशिवाय प्रवेश घेऊ नयेत, असेही आवाहन वेळोवेळी शिक्षण विभागाकडून करण्यात येते. यंदा मात्र प्रवेश क्षमता वाढविणे अन् कौन्सिकडून विलंबाने प्रतिसाद असल्यामुळे हमीपत्राचा निर्णय घेत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.

...म्हणून ठेवला पर्याय

नाशिक विभागात कौन्सिलची मान्यता नसणाऱ्या कॉलेजांचा तपशील माहिती करण्यासाठी तंत्रशिक्षण संचलनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबतचा अध्यादेश नवीन असल्याने संबंधित कॉलेजांची आकडेवारी व इतर तपशील तातडीने उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. अध्यादेश जाहीर होण्यापाठोपाठ शनिवार व रविवार आल्याने हा तपशील मिळविण्यास उशीर लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने मान्यतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कॉलेजांसाठी कौन्सिलची मान्यता मिळण्यास विलंब लागतो, तर दुसरीकडे यंदा प्रवेशक्षमता वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे हमीपत्राचा पर्याय कॉलेजांसाठी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरात-केंद्रासोबत करार करू नये

$
0
0

पाणीप्रश्नी भुजबळांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील दमणगंगा व नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील संपूर्ण पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित राहण्यासाठी पार-तापी-नर्मदा या नदीजोड प्रकल्पास महाराष्ट्राची असहमती असल्याबाबत कळवून या प्रकल्पाबाबत गुजरात सरकार व केंद्र सरकारशी करार करू नये, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नार, पार, औरंगा, अंबिका या खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गिरणा उपखोऱ्यात वळविण्यासाठी नार-पार-गिरणा उपसा जोड योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने ६ एप्रिल रोजी घेतला. मात्र, तो तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण आहे. नार-पार-औरंगा-अंबिका खोऱ्यामध्ये ३७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. नार-पार-गिरणा उपसा जोड योजनेद्वारे ३६२.६२ दलघमी (१२.८० टीएमसी) पाणी गिरणा उपखोऱ्यात वळवले जाईल. उर्वरित २४.२० टीएमसी गुजरातमध्ये वापरण्याचे नियोजन असल्याचे अहवालावरून दिसून येते.

पार-तापी-नर्मदा प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही. गुजरातची सिंचन क्षमता ४५ टक्के तर महाराष्ट्राची सिंचन क्षमता २२ टक्के आहे. त्यातही गोदावरी व गिरणा खोऱ्यातील सिंचन क्षमता ही सुमारे १३ टक्केच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात पाणी वळविण्यासाठी नदी जोड योजना करण्याऐवजी अतिरिक्त सिंचन क्षमता असलेल्या गुजरातसाठी पाणी वळविणे अन्यायकारक असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

गोदावरी व गिरणा हे अतितुटीचे खोरे आहे. या खोऱ्यांमधील तूट भरून काढण्यासाठी अभिकरणाने विपुलतेच्या खोऱ्यातून पाणी आणण्यासाठी योजना तयार करण्याची गरज आहे. मात्र, गुजरातच्या हिताच्या योजना केल्या जात आो. नार-गिरणा लिंकचा १२.६० टीएमसीचा डीपीआर 'डब्ल्यूएपीसीओएस' या संस्थेस बनवण्यास दिला आहे. त्यातही चणकापूर धरणापासून थेट पाइपलाइनने उजवा व डावा कालवा काढल्यास कसमादे-नांदगाव-चाळीसगाव-पारोळा-जामनेर तालुक्यास त्याचा लाभ होईल. तरी, त्याबाबत सरकारने आदेश द्यावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

पाण्यावरील हक्क सोडू नका

केवळ ३०० मीटर उंचीपर्यंतच्या नदी जोड योजना आर्थिक व्यवहार्यतेच्या निकषात बसत नाही म्हणून राज्याच्या पाण्यावरचा हक्क सोडण्यात येऊ नये. दमणगंगा व नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित राहण्यासाठी पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पास महाराष्ट्राची असहमती असल्याबाबत कळवून या प्रकल्पाबाबत गुजरात सरकार व केंद्र सरकारशी कोणताही करार करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रामा सेंटर शोभेपुरते!

$
0
0

अपुऱ्या सुविधा-डॉक्टरांचा वणवा; अपघातातील जखमींची परवड

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : शहर आणि जिल्ह्यात रस्ते अपघातात किमान एक हजार व्यक्ती मृत्युमुखी पडतात. जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे मजबूत जाळे पसरले असून, रस्ते अपघातात वेळीच वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय ठरते. यामुळे जिल्ह्यात चांदवडसह चार ठिकाणी ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात आले. न्युरोसर्जनसह इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि सुविधांअभावी हे ट्रामा सेंटर शोभेची वास्तू ठरतात. शिरवाडे-वणी येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमींना सिव्हीलसह खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याने ही बाब अधोरेखीत झाली.

अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता वाढीस लागते. यासाठी आरोग्य विभागाने हायवेलगत आणि अपघात प्रणव क्षेत्रांमध्ये ट्रामा सेंटर उभे करण्यास सुरुवात केली. नाशिकमध्ये सिव्हिल हॉस्पिटल, मालेगाव, चांदवड, सटाणा, इगतपुरी अशा पाच ठिकाणी ट्रामा सेंटर असून, सिन्नरला लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. शिरवाडे-वणी येथे झालेल्या अपघातात सहा व्यक्ती जागेवरच मृत्युमुखी पडल्या होत्या. उर्वरीत जखमींपैकी काहींना नजिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित एका बालिकेसह दोन महिलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील १२ वर्षांच्या मुलीसह एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वास्तविक चांदवड येथे ट्रामा केअर सेंटर असताना जखमींना इतर ठिकाणी हलवण्याची गरज का भासते, असा प्रश्न समोर येतो. चांदवडच नाही तर इतर सर्व ट्रामा केअरमधील सुविधांबाबत हीच ओरड असून, पूर्ण क्षमतेने ट्रामा केअर सुरूच होणार नसतील तर फक्त इमारती उभारण्याचा काय फायदा असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतो. ट्रामा केअर सेंटरमध्ये किमान चार ते पाच तज्ज्ञ डॉक्टर आणि २० पेक्षा अधिक सहायक कर्मचाऱ्यांची गरज असते. अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री देखील आवश्यक आहे. मात्र, हे निकष पूर्ण होत नाही. अपघातानंतर जखमींना थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात येते.

'१०८'वर निर्णयाची धुरा!

शहरापासून दूरवर झालेल्या अपघातग्रस्तांना दोन ते तीन तासांनी उपचार मिळतो. काही दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यातच एक मोठा अपघात झाला होता. यातील सात ते आठ जखमींना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. चांदवड ट्रामा सेंटरमध्ये डॉक्टर नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे १०८ सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्याने स्पष्ट केले.

न्युरोसर्जनची प्रतीक्षा

आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले, की नाशिक तसेच मालेगाव ट्रामा सेंटरसाठी दोन न्युरो सर्जनची पदे मंजूर आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे न्युरो सर्जन उपलब्ध होत नाही. या जागा भरण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी, की १०८ ची सेवा गतिमान असून, शक्य तितक्या पेशंट्सला सर्व सुविधा असलेल्या ठिकाणी दाखल करण्याकडे लक्ष दिले जाते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इतर महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध असल्याने कमीत कमी वेळेत जखमींना येथे आणण्यात येते.

लोगो : मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघमारे खूनप्रकरणाचा मुंबईच्या दिशेने तपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

संत कबीरनगर येथे जागेच्या झालेल्या वादातून राजू वाघमारे यांचा मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी संशियतांचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी मुंबईच्या दिशेने तपास सुरू केला आहे.

वाघमारे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांनी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत गंगापूर पोलिस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन केले होते. खुनाच्या गुन्हातील दोषींना अटक करण्याची मागणी करीत वाघमारे कुटुंब व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. याबाबत तपासी अधिकारी बी. वाय. बुऱ्हाडे यांना विचारले असता त्यांनी वाघमारे खून प्रकणात तपासासाठी पथके तयार केल्याचे सांगितले. तसेच पोलिसांचा तपास मुंबईच्या दिशेने सुरू असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघमारे खून प्रकरणात संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात, सुंदर लक्ष्मण खरात (रा. संत कबीरनगर) तसेच प्रशांत सुंदर खरात, त्यांचा मुलगा व त्यांच्या समवेत असलेले तीन ते चार एमआयडीसीतील अंबड गरवारे पॉइंट, गौतमनगर येथे आहेत.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्तेवर अंकुश; विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जबरी चोरीचे गुन्हे वगळता इतर गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र फसवणूक आणि विनयभंगासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे.

गेल्यावर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत विनयभंगाच्या ४८ तक्रारी समोर आल्या होत्या. यंदा मात्र याच कालावधीत हा आकडा ८६ इतका झाला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांची आकडेवारीदेखील अनुक्रमे ७५ आणि १११ इतकी आहे. दरम्यान, घरफोडी, वाहनचोरी, चेन स्नॅचिंग, चोऱ्या यासारख्या मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळालेले दिसते. याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की विनयभंगाच्या तक्रारींची लागलीच दखल घेतली जाते. बहुतांश गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचा समावेश असतो. शेजारी राहणारे वा शाळा कॉलेजमध्ये असलेले ओळखीचे या गुन्ह्यातील आरोपी असतात. सोशल मीडिया अथवा इतर भौतिकवस्तूंचा प्रभाव समाजावर पडत असून, त्याचे प्रतिबिंब अशा गुन्ह्यांच्या वाढीतून दिसते आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांचा विचार करता जमिनींच्या खरेदी-विक्रीत होणारे गुन्हे सर्वांत जास्त दिसतात. यापूर्वी अशा गुन्ह्यांची नोंद होत नव्हती. प्रकरण थेट कोर्टात पोहचत होते. आता गुन्हे दाखल होतात. यामुळे फसवणूक करणाऱ्यांना चाप लावणे हा उद्देश असून, त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मालमत्तेच्या गुन्ह्यांवर अंकुश निर्माण होण्याच्या कारणांबाबत बोलताना नखाते यांनी सांगितले, की या वर्षी क्राईम ब्रँचसह पोलिस स्टेशन पातळीवर गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करण्यात आला. अगदी दिल्लीसह कल्याण, श्रीरामपूर येथील इराणी टोळ्या जेरबंद झाल्या. गुन्हा केल्यानंतर क्राईम ब्रँच पकडतेच, असा संदेश सराईत गुन्हेगारांमध्ये पसरला असून, त्यामुळे ते दूर राहतात. स्थानिक किंवा परजिल्ह्यातील गुन्हेगार छोठे मोठे गुन्हे अधूनमधून करतात. विशेषत: हातातील मोबाइल खेचण्याचे प्रकार होत असून, त्यांच्यावर देखील कारवाई होईल, असे नखाते यांनी स्पष्ट केले.

--

गुन्हा २०१७ २०१८

दाखल-उघड दाखल-उघड

इतर जबरीचोरी ४०-१८ ५२-३५

चेन स्नॅचिंग ४७-९ ३७-१५

दिवसा घरफोडी २८-४ २०-६

रात्र घरफोडी ९९-१५ ८५-१९

इतर चोऱ्या १८०-३० १४४-५४

वाहनचोरी २३५-४० २१३-३६

फसवणूक ७५-५७ १११-८२

विनयभंग ४८-४५ ८६-८३

(आकडेवारी जानेवारी ते मे या महिन्यातील)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्यांच्या पश्चात उरली दृष्टी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागात बंबचालक म्हणून कार्यरत असलेल्या जगन्नाथ रामभाऊ पोटिंदे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मात्र, यातून सावरत कुटुंबियांनी सामाजिक भान जपत त्यांचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून त्यांचे डोळे इतरांना दृष्टी देणार आहेत.

नाशिक महापालिकेच्या शिंगाडा तलाव येथे जगन्नाथ पोटिंदे हे बंबचालक म्हणून कार्यरत होते. शहरात लागलेल्या अनेक आगींमध्ये व दुर्घटनांमध्ये त्यांनी प्राणांची बाजी लावून कामगिरी बजावली होती. बंबचालक असूनही ते सातत्याने आग विझविण्याच्या कामात सक्रिय असायचे. शुक्रवारी शिंगाडा तलाव येथे सकाळी ८ वाजता कामावर आले. संध्याकाळी चहा पिऊन आल्यानंतर ते दूरध्वनी कक्षात काम करीत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अचानक त्यांच्या छातीत कळ आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी खासगी दवाखान्यात नेले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे हृदय निकामी झाले होते. परंतु, डोळे चांगले होते. येथे उपस्थित त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बाब त्यांच्या नातेवाईकांना बोलून दाखवली. त्यांच्या नातेवाईकांनीही नेत्रदानाला लगेच होकार दिला. शहरातील एका नेत्रपेढीच्या तज्ञांना पाचारण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या नेत्रांचे रविवारी एक रुग्णावर रोपण करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांनी दाखवलेल्या दानशूरतेमुळे एका अंध व्यक्तीला दृष्टी मिळाली आहे. मृत्यूनंतरही त्यांच्या स्मृती नेत्ररुपाने आपल्यात असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलून दाखवली. गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत असणारे पोटिंदे अत्यंत मनमिळावू म्हणून परिचीत होते. आग लागल्याची खबर मिळताच क्षणाचाही विलंब न करता त्यांची धावून जाण्याची प्रवृत्ती सर्वांना परिचित होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाण तालुक्यास ‘जलयुक्त’साठी निधी द्यावा

$
0
0

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सोनवणे यांचे अर्थमंत्र्यांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यात यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल २८ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत नव्याने समावेश करण्यात आल्यामुळे या गावांना जलसंजीवनीची मात्रा मिळणार आहे. तरी या कामांसाठी शासनाकडून भरीव निधीची प्रतीक्षा कायम आहे.

या अंतर्गत वनविकास व जलसंधारणाच्या कामांसाठी भरीव निधी मिळावा या मागणीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी निवेदन सादर करून याबाबतच्या निधीची मागणी केली आहे.

राज्य सरकारने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. या योजनेत जलसंधारण अंतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनांद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या आर्थिक वर्षात बागलाण मधील एकवीस गावांचा या योजनेत समावेश होता. यंदाही बागलाणच्या सर्वाधिक २८ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार केला आहे. त्यामुळे या सर्व गावांना जलसंजीवनी मिळणार असली तरी या कामांना भरीव निधीची प्रतीक्षा आहे. अशावेळी या गावांना भरीव निधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी नुकतेच अर्थ मंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांना भेटून तालुक्यातील गावांना जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात, बागलाण हा आदिवासी बहुल तालुका असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्याच्या विकासासाठी वाहून जाणारे पाणी अडवून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून भरीव निधी मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाला खंडणीसाठी आई-वडिलांकडून धमकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या मुलास त्याच्या वडिलांसह दोन मामांनी दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद नाशिकरोड कोर्टाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

संजय सुदाम जाधव ( वय ५४, रा. लोखंडे मळा, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडील सुदाम सखाराम जाधव (वय ७४), संगिता आनंदा उन्हवणे उर्फ संगिता सुदाम जाधव (वय ४६, दोघेही रा. शिंदेगाव), दिलीप आनंदा उन्हवणे (वय ४२) आणि काळू आनंदा उन्हवणे (वय ३०, दोघेही रा. वडनेर गेट) या चौघा जणांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संजय जाधव यांची शिंदे गावात जमीन व घर आहे. या मालमत्तेवरून त्यांच्यात आणि आई-वडीलांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा येथे उड्डाणपुलाखाली अडवून वडील सुदाम सखाराम जाधव, मामा दिलीप उन्हवणे आणि काळू उन्हवणे या तिघांनी दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्या तिघांनी ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर जाधव यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. परंतु, असाच प्रकार सप्टेंबरमध्ये शिंदे गावात घडला. त्यामुळे फिर्यादीने शहर पोलिस आयुक्तांसह नाशिकरोड पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर ऑक्टोबरमध्येही जाधव यांना तिघांनी घरात मारहाण केली. मानसिक त्रास देणे, खंडणी मागणे, ठार मारण्याची धमकी देणे या प्रकारांनंतर जाधव यांनी तक्रार दिल्यानंतरही पोलिस कडक कारवाई करीत नसल्याचा आरोप करून थेट नाशिकरोड कोर्टात धाव घेतली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात वरील संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

..

चुलत भावाकडून मारहाण

नाशिकरोड : मागील भांडणाच्या कारणावरून चुलत भावाने दुसऱ्या भावास फावड्याच्या प्लास्टिक दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना पळसे येथील कारखाना रोडवरील बेद मळा परिसरात शनिवारी (दि. २३) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली. या मारहाणीत प्रदीप बाळू गायधनी (वय ३०) जखमी झाला. त्याच्यावर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी प्रदीपच्या जबाबानुसार, नाशिकरोड पोलिसांनी त्याला मारहाण करणाऱ्या सुनील होणाजी गायधनी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत वापरलेला फावड्याचा प्लास्टिकचा दांडाही पोलिसांनी जप्त केला आहे.

..

छेडप्रकरणी दोघांवर गुन्हा

सिडको : कामटवाडे, वृंदावननगर भागातील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड करण्यासह तोंड दाबून ब्लेडने वार केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दोघा अल्पवयीन मुलांवर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वृंदावननगरमधील अल्पवयीन मुलगी किराणा दुकानात जात असताना चार अल्पवयीन मुलांपैकी दोघा जणांनी तिला बळजबरीने काहीतरी खाण्यास दिले. त्यानंतर एकाने तिच्या मानेवर ब्लेडने वार केला. पोलिसांनी या प्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यातील एक मुलगा व पीडिता एकाच शाळेत शिकत असल्याचेही समोर आले आहे. पोलिस उपनिरीक्षक रुपाली खांडवी पुढील तपास करीत आहेत.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षणाचे धडे

$
0
0

अल्का सिंग यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खेळातून स्वच्छता व शिक्षणाचे धडे दिल्यासे मुलांचा बौद्धिक विकास घडतो, त्यांचे मन प्रसन्न राहते, अभ्यासात मन लागते, त्यांच्यात नेहमी उत्साह असतो, असा मंत्र रोटरी क्लब ग्रेप सिटीच्या प्रेसिडेंट अल्का सिंग यांनी दिला.

रोटरी क्लब ग्रेप सिटी नाशिक यांच्यातर्फे मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरामधील विद्यार्थ्यांना सफाई सापशिडीचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून क्लबच्या डायरेक्टर नेहा गायकवाड उपस्थित होत्या. 'करील मनोरंजन जो मुलाचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' या प्रमाणे रोटरी क्लब ग्रेप सिटी नाशिक यांच्या माध्यमातून सफाई सापशिडीच्या माध्यमातून वैयाक्तिक, शारीरिक व परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, याची माहिती खेळातून दिली जात आहे, असे अल्का सिंग यांनी यावेळी सांगितले.

मुले हे देवाघरची फुले असतात, त्यांना आनंदी बघितले की आम्हाला आनंद होतो. मुले आनंदी राहण्यातच आम्हाला समाधान आहे, असे नेहा गायकवाड यांनी मत व्यक्त केले. यावेळी इयत्ता दुसरी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना सफाई सापशिडीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास रोटरी क्लब ग्रेप सिटीच्या डायरेक्टर अचमा अलू, प्राचार्य अमोल कदम आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील शेवाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रकाश खैरनार यांनी सूत्रसंचालन केले तर मोहन माळी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगिता महाजन, विद्या महाजन, जयश्री पवार, प्रशांत गवळी, नीलिमा पडोळ, लक्ष्मण काशीद यांनी योगदान दिले. नियोजन सांस्कृतिक प्रमुख वैशाली राजभोज यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभराच्या बाँडवर फार्मसीत प्रवेशाचा जुगार

$
0
0

मान्यतेच्या प्रतीक्षेतील कॉलेजांना मुभा; प्रवेश देण्यास परवानगी

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendra.tarte@MT

- बोगस कॉलेजांचा धोका

- न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास संस्था जबाबदा

- शिक्षण विभागाची दुटप्पी भूमिका

नाशिक : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना चारदा कॉलेजची मान्यता व तत्सम निकष पडताळून बघा, असे आवाहन करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फार्मसी कॉलेजेसच्या बाबतीत मात्र घूमजाव केले आहे. ज्या फार्मसी कॉलेजांना अद्याप फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता नाही त्यांच्यासाठी शंभर रुपयांच्या बाँडचा पर्याय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने खुला करून दिला आहे. मात्र, प्रवेशप्रक्रियेत राहण्यासाठी या कॉलेजांना स्टॅम्प पेपरद्वारे भविष्यात मान्यता न मिळाल्यास याप्रश्नी संस्था स्वत:च जबाबदार असल्याचे लिहून घेतले जाणार आहे.

नव्या शासन निर्णयानुसार कौन्सिलची मान्यता नसणाऱ्या फार्मसीच्या कॉलेजांना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र सादर करावे लागणार आहे. हमीपत्र सादर केल्यापासून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची मान्यता सहा महिन्यांच्या आत घेण्याचे लिहून द्यायचे आहे. हमीपत्र सादर करून मग ही कॉलेज प्रवेश करू शकतील. पण, भविष्यात या मान्यतेअभावी काही न्यायालयीन प्रकरण उद्भविल्यास या प्रकरणी संबंधित संस्था पूर्णत: जबाबदार राहील, असा आशय या हमीपत्रात कॉलेजांनी सादर करायचा आहे. यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांपर्यंत शासन मान्यता दिलेल्या व अद्याप फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता न मिळविलेल्या संस्थांनाही लागू असणार आहे. संबंधित संस्थांनी दिलेल्या मुदतीत कौन्सिलची मान्यता न मिळविल्यास त्या संस्थेत पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश दिले जाऊ नयेत, असेही या आदेशात म्हटले आहे.

- विद्यार्थी संभ्रमात...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images