म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संततधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरवासी सुखावले आहेत. सोमवारी दिवसभर पावसाने शहरात मुक्काम ठोकल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठांमधील गर्दीचा ओघही पावसामूळे ओसरला. दिवसभरात शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात १ ते २५ जून या कालावधीत ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
रविवारी रात्रीपासून शहराच्या बहुतांश भागात संततधार पावसाला सुरूवात झाली. शहरवासियांची सकाळ उजाडली तीच पावसाच्या दर्शनाने. त्यामुळे अनेक भागात नागरिकांना सोमवारी सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. कधी भूरभूर तर कधी संततधार पावसामुळे नागरिकांना छत्र्या, रेनकोटसारखी साधने घेऊन घराबाहेर पडणे भाग पडले. सकाळी दहा ते साडेबाराच्या सुमारास शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी दोननंतर पावसाचा जोर वाढला. संततधार पावसाने नागरिकांना चिंब भिजविले. या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाची तळी साचल्याने त्यामधून वाहने नेताना नागरिकांची धांदल उडाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने विद्यार्थी तसेच कामावरून सुटलेल्या नोकरदार वर्गाची धांदल उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत हा जोर कायम राहिला. शहरात कॉलेजरोड, गंगापूर रोड, सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, इंदिरानगरच्या काही भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
पंचवटीत सरींवर सरी
पंचवटी : जून महिन्याअखेर मान्सूनचे खऱ्या अर्थाने आगमन झाले आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या वळवाच्या पावसानंतर सोमवारी (दि. २५) सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. कधी हलका तर कधी जोरदार पाऊस झाला. यंदा पावसाळी गटारींची साफसफाई व्यवस्थित झालेली नसल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याचे चित्र होते.
पंचवटी परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे. त्यात औरंगाबाद रोडवर नांदूरनाका परिसर, श्रीसेवा सोसायटी, सेवाकुंज, मखमलाबाद नाका, नवीन शाहीमार्ग, चरणपादुका रोड आदी परिसरात पाणी साचले होते. रिमझिम असला तरी दमदार पाऊस असल्यामुळे पाणी वेगाने वाहून जात नाही. साचलेल्या पाणी उताराच्या मार्गाने वाहत आहे. अनेक ठिकाणी ढापे बुजलेले असल्यामुळे पाणी तुंबत असल्याचे चित्र होते. हे ढापे मोकळे करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात होता.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मात्र, मुंबईला पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची मागणी कमी होऊन दरांत घसरण झाली. पावसामुळे सर्वच लिलाव आता सेलहॉलमध्ये घेण्यात येत आहेत. सोमवारच्या दिवसभराच्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी होण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
सखल भागांत साचले पाणी
नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहर परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी साचून शहराला तलावाचे स्वरुप आले आहे. शहरातील शिवाजी पुतळा, दत्तमंदिर, बिटको चौक, विभागीय आयुक्त कार्यालय रस्ता, उड्डाणपूल, एकलहरे टी पॉइंट, सिन्नर फाटा, हनुमान मंदिर, चेहेडी शिव आदी ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस पावसाच्या पाण्याचे तळेच निर्माण झाले आहे. या पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच अडवला गेल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी दरवर्षी साचत असते. नाशिक-पुणे महामार्गावर चेहेडी गाव ते सिन्नर फाटा या दरम्यान ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. चेहेडी जकात नाका, चेहेडी शिव, अस्वले मळा, निसर्ग लॉन्स, सिन्नर फाटा पोलिस चौकी, हनुमान मंदिर, एकलहरे टी पॉइंट या ठिकाणी महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. चेहेडी शिव येथे महामार्गावरील खड्ड्यांमुळे पावसाची संततधार सुरू असताना दुचाकीस्वारांचे अपघातही झाले आहेत.
विजेचा लपंडाव
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील बहुतेक उपनगरांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. सोमवारी सायंकाळी चार वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता. असे असतानाही शहरातील कोणतेही फिडर ब्रेक डाऊन झालेले नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
देवळाली जलमय
देवळाली कॅम्प : आद्रा नक्षत्राने देवळालीसह पंचक्रोशीवर चांगलीच कृपादृष्टी केल्याने दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने देवळाली परिसर जलमय झाला आहे. देवळाली भागात परवाच्या दुपारपासून मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहे तर काल पुन्हा दिवसभर चांगलाच भिज पाऊस दिवसभर सुरु होता.दुपारनंतर सुरु झालेल्या या पावसाने शहरातील विविध रस्त्यांवर पाण्याचे तळे निर्माण झालेले पहायला मिळाले.सतत सुरु असलेल्या या पावसामुळे दुपारी दोन व सांयकाळी साडेपाचच्या सुमारास परतणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. सोमवारी अनेक दुकाने व लेव्हीट मार्केट बंद असल्याने शहर परिसरातील रस्ते पावसामुळे सुने-सुने होते. देवळाली शहरात प्रवेश करणाऱ्या लामरोड, हौसन रोड, सतीश कॉम्प्लेक्स, मेन स्ट्रीट, आनंद रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते. दस्तगीर बाबा रोड, ओमशांती नगर, संसरी लेन या परिसरात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ओमशांती नगर परिसरात तर थेट पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. यामुळे येथील नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला धारेवर धरत रस्त्यांची अर्धवट स्वरूपाची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
पावसाने उडविली दाणादाण
सातपूर : शहरात पावसाने संततधार सुरू केल्याने सुखद धक्का दिला. परंतु, चाकरमान्यांची पावसाने चांगलीच दाणादाण उडविली. रात्रीपासून सुरू
असलेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते. यात कामावर जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्यातून कसरत करून वाहने चालविण्याची वेळ आली.
सातपूर भागातील सर्वच रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहत असल्याने पादचाऱ्यांनाही वाहत्या पाण्यातून बचाव करत प्रवास करावा लागला. पावसाळी पाइपलाइनीत पावसाचे पाणी
वाहून जाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच पाणी वाहून जाण्यासाठी असलेले
नैसर्गिक नालेच गायब झाल्याने रस्ते जलमय होत आहेत.