Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तेरा स्कूलबसवर कारवाई

$
0
0

मालेगाव विभागात आरटीओची विशेष तपासणी मोहीम

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, मालेगाव शहरासह विभागात अनेक शाळांच्या स्कूलबसेसने विद्यार्थ्यांची ने-आण केली जात आहे. मात्र, या बसेस विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमांची पूर्तता करीत आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. अशाच नियमांची पूर्तता न करणाऱ्या एकूण १३ बसेसवर मालेगावचे उपविभागीय परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने कारवाई केल्याची माहिती अधिकारी किरण बिडकर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

येथील आरटीओ कार्यालयाकडून स्कूलबस धारकांनी स्कूलबसची तपासणी करून घेत नियमांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मालेगावसह विभागातील २४५ पैकी १६७ स्कूलबसेसने तपासणी करून घेतली होती. त्यानंतर वायूवेग पथकाकडून गेल्या दोन दिवसांमध्ये स्कूल बसेस विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत २५ हून अधिक बसेस तपासण्यात आल्या. त्यात मालेगाव विभागातील देवळा व सटाणा तालुक्यातील एकूण १३ स्कूलबसेसकडून नियमांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व तेरा बसेस आरटीओंकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व स्कूलबसेस विरुद्ध मोटार वाहन कायद्यातील विविध कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

स्कूलबसधारकांनी आपल्या वाहनांची तपासणी आरटीओ कार्यालयामार्फत करून घ्यावी. तसेच वाहन परवाना, योग्यता प्रमाणपत्र, विमा, चालकाचे लायसन्स मुदतीत असल्याची खात्री करावी. त्यानंतरच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करावी.

- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव

स्कूलबसमध्ये आवश्यक बाबी...

वेग नियंत्रणासाठी स्पीड गव्हर्नर बसवणे

प्रथमोपचार पेटी

अग्निशामक उपकरण

खिडक्यांना दांडे बसवणे

वाहनाचा रंग पिवळा

शाळेचे नाव

मदतनीस व्यक्ती नेमणूक

विद्यार्थ्यांच्या नावांची यादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छगन भुजबळ करणार राज्यभर दौरे

$
0
0

मुंबईमधील समता परिषदेच्या बैठकीत घोषणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बहुजन समाजातील लोकांनी नाशिकसह राज्यभरात विविध मोर्चे काढले या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व जाती धर्मातील व विविध राजकीय पक्ष संघटना सहभागी झाले. या सर्व मोर्चेकऱ्यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रभर दौरे करावे अशी उपस्थितांनी साद घातली. यावेळी आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दौरे करणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्य कार्यकारिणी बैठक मुंबई येथे रविवारी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, समता परिषद मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह, उपाध्यक्ष बापू भुजबळ, प्रा. हरी नरके, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, माजी आमदार जयंत जाधव, आमदार लक्ष्मणराव तायडे, तुकाराम बिडकर, तोतरांम कायंदे, माजी आमदार हरीराम वरखेडे, दिलीप खैरे आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले, की समता परिषदेच्या माध्यमातून अडीच वर्षांनंतर आपण भेटलो; सगळ्यांनी या अडीच वर्षाच्या काळात मोलाची साथ दिली. आंदोलन, मोर्चे काढले त्याबद्दल सर्वांचे आभार. या पुढील काळातही आपण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. देशात ओबोसींचे संघटन करून जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले. मात्र, सरकारकडून अद्यापही जातनिहाय आकडेवारी घोषित करण्यात येत नसल्याने यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मध्य प्रदेशात आमचा संघर्ष

बैठकीत सिद्धार्थ कुशवाह म्हणाले, की आज संपूर्ण देशात भययुक्त स्थिती आहे. मध्य प्रदेशात १५ वर्षांपासून आमचे शोषण सुरू आहे. छोट्या-छोट्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. त्यामुळे मध्य प्रदेशात छगन भुजबळ यांनी येऊन दौरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्तावित जल आराखड्याची व्हावी प्रभावी अंमलबजावणी

$
0
0

सरकारने जल आराखड्यास मान्यता दिल्याने अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्‍त केला आहे. हा आराखडा जल परिषदेने मंजूर केल्यावर त्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही व्हावी आणि नद्यांचे होणारे प्रदूषण थांबविण्याकडे सरकारने सकारात्मकतेने पाहावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. मात्र, यापूर्वीचा अशा योजनांच्या अंमलबजावणीचा अनुभव पाहत यापूर्वी जाणवलेल्या उणिवा प्रारंभापूर्वीच दूर कराव्यात. असे झाले, तरच यामागचा मूळ उद्देश सफल होऊ शकेल, अशी अपेक्षादेखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पाण्याचे नियोजन करण्यास उपयुक्त

जल आराखड्यास मान्यता देऊन सरकाने चांगले काम केले आहे. हा अत्यंत चांगला निर्णय असून, यामुळे पाण्याचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. नदीखोऱ्यांचा आराखडा करणारे आपले राज्य पहिले ठरल्याने अभिमान वाटत आहे. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व चांगली होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जुना तिढा सुटण्यास मदत होईल.

-महेश महाजन

नदी परिसराचा व्हावा विकास

या निर्णयामुळे नद्यांलगतच्या परिसरात सरकारने चांगली झाडे लावून तो परिसर आकर्षक केला पाहिजे. आदिवासी भागात किंवा शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर नद्यांचे प्रदूषण होत असते. नद्यांमध्ये केर, कचरा टाकला जात असल्याने त्यांची त्यापासून मुक्तता होणे गरजेचे आहे. सरकारने नद्यांचे प्रदूषण होणार नाही यादृष्टीने सुरक्षा ठेवली पाहिजे.

-कुणाल जाधव

गोदावरी खोऱ्याचा समावेश लाभदायक

जल आराखड्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे पाण्याचे नियोजन होण्यास मदत होणार आहे. यात गोदावरी खोऱ्याचा समावेश करणे लाभदायक ठरणार आहे. वास्तविक सरकारने हा निर्णय यापूर्वीच घेणे अपेक्षित होते. मात्र, आता हा निर्णय घेतल्याने त्याचे स्वागतच आहे. पण, हा निर्णय जरी चांगला असला, तरी त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही हेही पाहावे.

-मनोज सावंत

पाण्याचे स्रोत वाढण्यास मदत

पाण्याचे नियोजन ही काळाची गरज आहे. या आराखड्यामुळे पाण्याचे स्रोत वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे. याला विरोध झाला, तरी उत्तर महाराष्ट्रातील व राज्यातील नद्यांचे संवर्धनदेखील महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हे जल आराखडा तयार करणारे पहिले राज्य ठरल्याने आता उत्तम नियोजन करून आदर्श निर्माण करावा.

-पवन शेवाळे

नद्यांच्या संवर्धनाची करावी तरतूद

पाण्याचे नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, पाण्याबरोबरच नद्यांचेदेखील संवर्धन केले गेले पाहिजे. आज शहरातील अनेक नद्या प्रदूषणाला बळी पडल्याचे वास्तव आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण करण्याची तरतूद यात केली पाहिजे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे.

-निशिकांत पाटील

---

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण शेतकऱ्याची मालेगावात आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील शेरूळ येथील एका तरुण शेतकऱ्याने रविवारी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. संदीप सुपडू महाले (वय ३५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत संदीप यांच्या नावे शेतजमीन नाही. मात्र, त्यांचे वडील सुपडू महाले यांच्या नावे पाडळदे येथे १.२७ हे. आर शेतजमीन आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी शेतात कपशीची लागवड केली होती. परंतु, पाऊस लांबल्याने दुबार पेरणी करावी लागेल या तणावात त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते आहे. या आत्महत्येसंदर्भात तलाठ्यांनी प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयास दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक-पुणे मार्गाची कामे त्वरित करावीत’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक-पुणे महामार्गाची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस ग्रामीण कमिटीचे सरचिटणीस रतन जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या महामार्गाची कामे अद्याप सुरू असून, नागरिक, प्रवाशांची गैरसोय होत आहे. कामे सुरू असतानाही चार महिन्यांपासून टोल वसुली होत आहे. शिंदे गावच्या सर्व्हिसरोडचे काम अपूर्ण आहे. महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने गावकऱ्यांना मुख्य रस्त्यावर येताना त्रास सहन करावा लागतो. शिंदे, बंगालीबाबा, चिंचोली फाटा येथील भरावांवरील पथदीपांची कामे अपूर्ण आहेत. याच रस्त्यावरील सर्व्हिसरोडवर मात्र पथदीप लावले आहेत. टोल नाक्यावर स्थानिकांसाठी स्वतंत्र लेन ठेवावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

------------------------------------

पेठरोडवरील इमारतींना झुडपांचा विळखा (फोटो)

पंचवटी : पेठरोड येथे असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य रेसिडेन्शिअल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ असलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. वापराविना पडून असलेल्या या इमारतींना झुडपांचा विळखा पडला आहे. काटेरी झुडपे, तसेच गाजरगवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जवळच वस्तीत राहणाऱ्या रहिवाशांना या झुडपांच्या विळख्यामुळे गैरसोय सहन करावी लागत आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.

--

देशी दारू जप्त

नाशिकरोड : शिंदे गावातील भांगरे मळा येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या नितीन श्यामराव तुंगार (वय ३० ) याला नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५२ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १५ बाटल्या आढळल्या.पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

--

रस्त्यांची दुर्दशा (फोटो)

सातपूर : सातपूर परिसरातील मळे विभागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवाशांचा प्रवास खडतर बनला आहे. पावसाळा सुरू होऊनदेखील या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नसल्याने स्थानिक रहिवाशांच्या गैरसोयीत आणखी भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने किमान खड्डे पडलेल्या ठिकाणांची तरी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

--

रिक्षाच्या धडकेत मृत्यू

पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कॉर्नर येथे रिक्षा बोलावण्यासाठी गेलेल्या हिरामण महादेव बेंडकुळे (वय ३८, चारी नंबर ७, माडसांगवी) यांचा भरधाव रिक्षाच्या धडकेने मृत्यू झाला. दुपारी चार वाजता झालेल्या या अपघातात बेंडकुळे यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. हवालदार माळी यांनी पंचवटी पोलिसांना माहिती कळविली असून, हवालदार सोनवणे तपास करीत आहेत.

--

फांदीचा अडथळा (फोटो)

पंचवटी : औरंगाबादरोडवर नांदूरच्या मळे परिसरातील भागात वादळी वाऱ्याने तुटलेली फांदी अर्ध्या रस्त्यावर पडली आहे. झाडाच्या वरच्या बाजूची तुटलेली फांदी खालच्या फांदीवर पडल्याने खालची फांदी रस्त्याच्या अर्ध्या भागावर लोंबकळत आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांना या फांदीचा अडथळा सहन करावा लागत आहे. रात्री या फांदीचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

--

पावसाची प्रतीक्षा

सातपूर : सातपूर पंचक्रोशीतील बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. थोडाफार पाऊस झाला असला, तरी पेरणीसाठी लागणारा पाऊस पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून महिना संपत आला, तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला असून, त्याच्याकडून जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत पाऊस, नाशिकमध्ये प्रतीक्षा

$
0
0

पेरण्यांना उशीर, बळीराजा चिंताक्रांत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई परिसरात व मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असला तरी, राज्यातील इतर भागात मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. विदर्भात दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले असून, जूनचा शेवटचा आठवडा उजाडूनही उत्तर महाराष्ट्रात विशेष करून नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबारमध्ये पेरण्यांनाही सुरुवात झालेली नाही.

जूनच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. मुंबईत विशेष करून वसईत रविवारी जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातही औरंगाबाद वगळता सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाला. मात्र, नाशिकमध्ये फक्त शिडकावा झाला. जूनचा शेवटचा आठवडा उजाडला असून, अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीटंचाई जाणवत नसली तरी ग्रामीण भागातून टँकरची मागणी वाढू लागली आहे.

१ जूनपासून जिल्ह्यात ११७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७८.५६ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. १४ जून २०१७ रोजी तर शहरात अवघ्या दोन तासांत ९२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. यंदा मात्र पाऊस काहीसा लांबणीवर पडला आहे.

धरणांमध्ये ११ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यात एकीकडे पावसाला विलंब होत असून, धरणांमधील उपलब्ध पाण्याची पातळीदेखील दिवसेंदिवस खाली जाते आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून सध्या सात हजार ११८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा ११ टक्क्यांवर आला आहे. गंगापूर धरण समूहात १९ टक्के, तर गंगापूर धरणात २५ टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी सद्यस्थितीत धरणात २० टक्के पाणीसाठा होता. यंदा तो पाच टक्क्यांनी अधिक आहे.

-

धरण समूहातील पाणीसाठा

गंगापूर धरण समूह : १९ टक्के

पालखेड धरण समूह : ८ टक्के

गिरणा धरण समूह : २४ टक्के

---

विदर्भावर दुबारसंकट

नागपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच विदर्भात मान्सूनचे आगमन झाले. तीन दिवस दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. कापूस, सोयाबीनच्या सुमारे ५५ टक्के पेरण्या पूर्ण करण्यात आल्या. नंतर चौदा दिवसांपासून पाऊस न झाल्याने दुबारचे संकट गडद झाले आहे. पावसाअभावी वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील वडद येथील ३० शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला.

- सविस्तर वृत्त...९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक महापालिकेकडून चारशे किलो प्लास्टिक जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्र विघटनशील व अविघटनीशल कचरा नियंत्रण कायदा, २००६ नुसार रविवारी सुट्टीच्या दिवशीदेखील प्लास्टिक बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी शहराच्या सहाही विभागांतून अंदाजे चारशे किलो प्लास्टिक व अंदाजे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रविवारी खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना कापडी पिशव्या घेऊनच निघावे लागले. व्यापाऱ्यांनीही कागद, कापडी पिशव्यांचाच वस्तू देण्यासाठी वापर केला.

नाशिक महानगरपालिका कायक्षेत्रात २३ जूनपासून प्लास्टिकबंदी करण्यात आली. पहिल्या दिवशी प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर रविवार असूनही दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू ठेवण्यात आली. या कारवाईसाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात सहा निरीक्षक नेमण्यात आले असून, बाजारपेठा व संकुलांमध्ये कडक तपासणी करण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी याचा चांगलाच धसका घेतला. बाजारात नागरिक कापडाच्या पिशव्या घेऊन जाताना दिसत होते. त्याचप्रमाणे भाजीविक्रेत्यांनी देखील पिशवी घेऊन येणाऱ्यांनाच भाजी देण्यास प्राधान्य दिले. कारवाईच्या आदल्या दिवशी स्वच्छता निरीक्षकांनी बाजारात फिरून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन त्यांना सूचनादेखील केल्या होत्या. रविवारी व्यापाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली. नाशिकरोड विभागात जेलरोडवर असलेल्या भवानी स्वीट्स या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा सापडल्याने त्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सुभाषरोडवर असलेल्या काही मटण विक्रेत्यांवरदेखील कारवाई करण्यात आली. या परिसरात स्वच्छता नसल्याने अधिकाऱ्यांनी कडक सूचना केल्या. नाशिकरोड विभागात २० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले असून, २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पंचवटी विभागातदेखील तीन व्यापाऱ्यांकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा सापडला. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून १५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. सर्वात जास्त कारवाई नाशिक शहरातील पूर्व विभागात करण्यात आली. या ठिकाणी ७ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच एका व्यापाऱ्याच्या दुकानासमोर कचरा आढळल्याने त्याला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. शालिमार परिसरात असलेल्या फळविक्रेत्यांची देखील तपासणी करण्यात आली. पश्चिम विभागात दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच किरकोळ प्लास्टिक जप्त करण्यात आले.

अडगळीतून निघाल्या कापडी पिशव्या

नागरिकांना रिकाम्या हाती जाऊन वस्तू खरेदी करण्याची सवय लागली होती. मात्र महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबल्याने अडगळीत गेलेल्या कापडी पिशव्या बाहेर निघाल्या आहेत. नागरिक मुकाट्याने गाडीच्या डिकीत कापडी पिशव्या ठेवू लागल्याचे दृष्य पहायला मिळते आहे. महापालिकेने केलेली प्लास्टिकबंदी योग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला थोडा त्रास होईल, मात्र एकदा सवय लागल्यावर त्याचे चांगले परिणाम याच पावसाळ्यात पहायला मिळतील असे नागरिकांचे म्हणणे आहे. भाजी विक्रेतेही या त्रासातून बाहेर पडले असून, प्लास्टिकच्या पिशव्या खरेदीचा त्यांचा मोठा खर्च वाचला आहे.

सरकारने योग्य कारवाई केली आहे. नाशिक महापालिकेने कडक कारवाई करावी व प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करावे. सवय लागण्यास थोडा अवधी लागेल. परंतु, त्याचे दूरगामी चांगले परिणाम होतील.

- उल्हास शुक्ल, नागरिक

--

लोक पावशेर भाजी घ्यायचे व प्लास्टिक पिशवी मागायचे. बरे झाले सरकारने हा कायदा केला. आमचे पैसेही वाचतील व पावसाळ्यात पाणीही तुंबणार नाही.

-सरिता पवार, भाजी विक्रेती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षक मतदार’साठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज (दि. २५) जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. तसेच हे अधिकारी व कर्मचारी आपापल्या साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांच्यासह निवडणूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण २१ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये जळगाव तालुक्यात चार, चाळीसगाव, भुसावळ व अमळनेर तालुक्यात प्रत्येकी दोन तर धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण २१ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

फिरती भरारी पथके कार्यरत

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १२०५६ इतके मतदार असून, त्यात पुरुष मतदारांची संख्या ९३६३, तर स्त्री मतदारांची संख्या २६९३ इतकी आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २३८० मतदार जळगाव तालुक्यात असून, त्यानंतर भुसावळ तालुक्यात १३६४, अमळनेर तालुक्यात १०३३ तर चाळीसगाव तालुक्यात ९९२ इतके मतदार आहेत. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, जिल्हास्तरावर आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुकास्तरावर फिरती भरारी पथके कार्यरत आहे. या पथकांसमवेत व्हिडिओग्राफर देण्यात आले आहेत. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्राकरीता केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.

या निवडणूकीसाठी सेक्टर ऑफिसर म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी त्या त्या तालुक्याचे तहसीलदार हे मतदान केंद्रावर लक्ष ठेवून असणार आहेत. तर सूक्ष्म निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रीय बँकाचे अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांची यादी...

जळगाव - आर. आर. विद्यालय, पूर्व-पश्चिम इमारत, खोली क्र. ६ व १३

भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिर, पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र. २ व ४

अमळनेर - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय आणि राजसारथी सभागृह, अमळनेर

भुसावळ - डी. एस. हायस्कूल, भुसावळ पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडील खोली क्र. २ व ३

चाळीसगाव - चव्हाण कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव पूर्वेकडील उत्तर-दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्र. ३ व ५

चोपडा - तलाठी मिटिंग हॉल, तहसील कार्यालय,

यावल - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय,

रावेर - संजय गांधी योजना शाखा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नवीन तहसील कार्यालय,

मुक्ताईनगर - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय,

बोदवड - सभागृह तहसिल कार्यालय,

धरणगाव - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय

एरंडोल - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय

पारोळा - मिटिंग हॉल तहसील कार्यालय

भडगाव - तहसीलदार यांचे दालन तहसील कार्यालय

पाचोरा - तहसीलदार यांचे दालन तहसील कार्यालय

जामनेर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेन हॉल, वाकी रोड, जामनेर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपनगर नाक्यावर आज चार कॅमेऱ्यांचे लोकार्पण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर नाका येथील अपघातांना आळा घालण्यासाठी चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होत आले आहे. आज, मंगळवारी (दि. २६) दुपारी दोनला त्यांचे लोकार्पण होणार आहे. रोटरी क्लब ऑफ व्हिजन नेक्स्ट आणि उपनगर पोलिस ठाण्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रोटरीचे अध्यक्ष कौसर आझाद आणि उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी ही माहिती दिली.

उपनगर येथील आमंत्रण दुकानाचे संचालक प्रवीण अग्रवाल आणि माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी सीसीटीव्हीसाठी मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टचे सचिव अजित गुप्ता, विनायक बेडीस, मोहन भावे, ऋषिकेश मऱ्हाळकर, महेश दंदणे, दिनेश खांदरे आदी उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. टाकळीतील महापालिका शाळेतील चार आणि सामनगाव शासकीय तंत्रनिकेतनमधील ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पणही आजच होणार आहे. उपनगर नाक्यावर सिग्नल लावण्यात आल्यानंतरही वाहनचालकांमध्ये बेशिस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत, अशी माहिती कौसर आझाद यांनी दिली. या आधी क्लबतर्फे चिंचोलीत १२० सीसीटीव्ही, तसेच वायफाय यंत्रणा बसविण्यात आली आहे. तेथे सहा-सात लाखांचे काम झाले आहे. दि. १ जुलैपासून सीसीटीव्ही कार्यान्वित होणार आहेत. क्लबने चिंचोली दत्तक घेतले आहे. या गावाला आदर्श गावाचे बक्षीसही मिळाले आहे.

--

(२ कॉलम, फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्याय द्या, मग कारवाई करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिकबंदीसाठी सुरू केलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने पंचवटी येथील पाटिदार समाजाच्या कार्यालयात बोलावलेल्या सर्व व्यापारी संघटना व उद्योजकांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत बंदी केलेल्या नियमांचे पूर्ण स्पष्टीकरण होत नाही व प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, असा पवित्राही व्यापाऱ्यांनी यावेळी घेतला. ही कारवाई सुरूच ठेवली तर व्यापाऱ्यांनी त्याविरोधात लढा देण्याची तयारीसुद्धा या बैठकीत व्यक्त केली.

चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महानगरातील सर्वच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या अडचणी मांडत कारवाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत चेंबरचे उपाध्यक्ष अनिल लोढा, माजी अध्यक्ष खुशाल पोद्दार, दिग्विजय कापडिया, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, लेवा पाटिदार समाज ट्रस्टचे अध्यक्ष बकेश पटेल यासह विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम. जोशी, उपप्रादेशिक अधिकारी अशोक करे, महापालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. सचिन हिरे यांनी प्लास्टिकबंदीबाबत माहिती दिली. या बैठकीचे प्रास्ताविक माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी केले. यावेळी त्यांनी कायद्याची अमंलबजावणी करताना व्यापाऱ्यांपुढे काय अडचणी येतात, या गोष्टी अधिकाऱ्यांनी सरकारपर्यंत पोहचवायला हव्यात. त्याचप्रमाणे येथील अधिकाऱ्यांनी प्लास्टिकबंदी कशावर आहे, याची माहिती द्यावी असे आवाहन केले.

कारवाईचा अतिरेक करू नका

चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने भूमिका मांडत आपला संताप व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, प्लास्टिकबंदी करताना व्यापाऱ्यांना व उद्योजकांना विश्वासात घ्यायला हवे होते. वेफर्सच्या पाकिटाला सूट देता, मग साडीच्या प्लास्टिक वापराला का नाही? साडीचे ५० प्रकार आहेत, ते व्यापारी कसे दाखवतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी रोटी, कपडा और मकानचे उदाहरणही दिले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. ब्रिटिशांना जसे हाकलले तशी वेळ तुमच्यावर येऊ नये. ग्राहक नसला तर व्यापार बंद होईल व सरकारला करही मिळणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे पगार कसे होतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

..तर व्यापारी रस्त्यावर उतरतील

व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल संचेती म्हणाले की, नोटाबंदीचा एक त्रास संपला व दुसरा घाला सरकारने घातला. पर्यावरणाच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. पर्यावरण वाचवायचे असेल तर अगोदर पर्याय द्या. नोटाबंदीने आधीच व्यापारी बेजार झाले असून त्यांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे जोपर्यंत पर्याय देत नाही, तोपर्यंत कारवाई करू नका, अन्यथा व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल व ते रस्त्यावर येतील, असे ते म्हणाले.

दोन दिवसांनंतर पुन्हा बैठक

व्यापाऱ्यांचा संताप बघून अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवावी, कायद्याचे पूर्ण स्पष्टीकरण करावे. याबाबात दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊ व त्यानंतर पुढची दिशा ठरवू असा निर्णय या बैठकीत सर्वांच्या वतीने चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी जाहीर केला.

आज चेंबरची मुंबईत बैठक

प्लास्टिक बंदीमुळे व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या असून, त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी राज्यातील व्यापारी पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर कॉमर्सच्या पुढाकाराने होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसमोर व्यापारी व उद्योजकांच्या अडचणी मांडून चर्चा करणार असल्याचे चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाणे-भुजबळ भेट

$
0
0

सहाणे-भुजबळ भेट

जेलरोड : नाशिकरोड येथील माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी सोमवारी (ता.२५) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. सहाणे यांनी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश करून विधान परिषद निवडणूक लढविली. मात्र, शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्याकडून त्यांचा धक्कादायक पराभव झाला. नाशिक जिल्ह्यात आपल्याला कुठे मते मिळाली, कुठे धोका झाला याची माहिती सहाणे यांनी भुजबळ यांना दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रीन फिल्ड’साठी टेंडर मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अंगलट आलेल्या ग्रीन फिल्ड लॉन्सप्रकरणी भिंत पुन्हा बांधून द्यावी, असे कोर्टाने आयुक्तांना आदेश दिल्यानंतर १७ लाख ५१ हजार रुपयांच्या टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळताच येत्या काही दिवसांत या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

नाशिक महापालिकेने शहरातील लॉन्सवर धडक कारवाईचा विडा उचलला होता. या कामाची सुरुवात गंगापूर रोडवर असलेल्या ग्रीन फिल्ड लॉन्सपासून होणार होती. मात्र, या लॉन्सचे मालक विक्रांत मते यांनी न्यायालयातून या कारवाईबाबत मनाई हुकूम मिळवला होता. या हुकमाची प्रत महापालिकेच्या कार्यालयात पोहच करण्यात आली होती. मात्र मनाई हुकूम मिळूनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भिंत पाडण्याची कारवाई सुरूच ठेवली होती. महापालिकेने भिंत पाडून टाकल्यानंतर, आम्हाला मनाई हुकूम मिळाल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र विक्रांत मते यांनी हा मनाई हुकूम बांधकाम पाडण्याअगोदर महापालिकेत सादर केल्याचा पुरावा न्यायालयात दिला. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले होते. ही पाडलेली भिंत महापालिकेने आपल्या खर्चाने बांधून द्यावी असे आदेश देण्यात आले. त्यामुळे महापालिकेने ही भिंत बांधण्यासाठी टेंडर काढले होते. या कामासाठी एकूण ५ टेंडर आले होते. १९ लाख ५८ हजार रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र ठरवलेल्या रकमेपेक्षा १२ टक्के कमी दराने टेंडर मंजूर करण्यात आले आहे. हे टेंडर गडाख असोसिएट्स या कंपनीला देण्यात आले असून, या कामापोटी १७ लाख ५१ हजार रुपये निधी खर्च होणार आहेत.

नागरिकांच्या खिशाला झळ

महापालिकेने केलेल्या कारवाईचा भुर्दंड नाशिकरांच्या खिशातून जाणार असून, हा खर्च दोषी अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर रस्त्यावर खडीचा ढीग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर येथील अप्पू चौक रस्त्याचे काम रखडले असून, या कामासाठी आणलेल्या खडीचा ढीग रस्त्यावर टाकण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून होत आहे. ढिगातील खडी मुख्य रस्त्यावर पसरली असल्याने दुचाकी घसरून अपघातांचा धोका वाढला आहे.

या चौकापासून इच्छामणी गणेश मंदिरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. जुना रस्ता पूर्ण उखडण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता बंदच आहे. त्याच्या कामाबाबत हालचालही दिसत नाही. त्याचे काम अर्धवट आहे. नाशिकला जाण्यासाठी जेलरोडचे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक उपनगरच्या रस्त्याचा वापर करतात. दुसरा मार्ग टाकळीतून जातो. मात्र, उपनगरचा रस्ता जवळचा असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. चौकात जेथे खडी आहे, तेथेच गतिरोधकही आहेत. दोन्हींमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ताकामासाठी आणलेली खडी आठवडाभरापासून चौकातच पडून आहे. ती मुख्य मार्गावर पसरू लागली असून, रस्ताकाम त्वरित पूर्ण केल्यास खडीचा प्रश्नही मार्गी लागेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

फोटो आहे. (सिंगल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीचे रणांगण सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर सोमवारी वाजला. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची करण्याबरोबरच सोमवारपासूनच आचारसंहिता लागू केल्याची घोषणा केली. १ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, ३ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत, दोन वेळा मतदार याद्यांची पडताळणी झाली. निवडणूक जाहीर झाल्याबरोबर अनेक इच्छुकांनी हालचालींना गती दिली.

महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण २० प्रभागातून ७८ सदस्य निवडण्यासाठी १ ऑगस्टला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी एकूण ४ लाख २३ हजार मतदार पात्र ठरले आहेत. यावेळी सैन्यात असणाऱ्यांसाठी मतदानाची संधी देण्याचा निर्णय यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने घेतला आहे. याचबरोबर आदर्श मतदान केंद्र खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. प्रत्येक उमेदवाराला तीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च करता येणार आहे.

निवडणूक काळातील आचारसंहितेबाबत सोमवारी निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सूचना दिल्या. निवडणूक तयारीची माहिती घेतल्यानंतर आयोगाने निवडणूक आचारसंहिता लागू करत एकूण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, अशी माहिती सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकारांना दिली.

विद्यमान सभागृहाची मुदत १३ ऑगस्टला संपत आहे. त्याआधी नवे सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची घोषणा होत नसल्याने पंधरा दिवसांपासून निवडणूक होणार की प्रशासक येणार, अशा चर्चेने जोर धरला होता. ही चर्चा सुरु असतानाच मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला. यावर हरकती घेताना काही प्रभागातील लोकसंख्येपेक्षाही मतदारांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या घोळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका सहा महिने पुढे जातील, अशी अफवाही पसरली. आता रितसर निवडणूक जाहीर झाल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांची वाहने, मोबाइल आणि इतर सुविधा काढून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्त म्हणाले, 'निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक तयारीची माहिती घेतली. यावेळी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी काही नवीन योजना राबवण्याचे ठरवले आहे. सैनिकांना मतदान करता यावे, यासाठी सर्व्हिस वोटर उपक्रम राबवला जाणार आहे. तीनही शहरांतील सर्व म्हणजे ५६४ मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे ठरावीत, अशी उपाययोजना राबवली जाणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील समिती असेल.

त्याचबरोबर उमेदवारांना सायबर कॅफेधारकांना उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज भरणे : ४ ते ११ जुलै

छाननी : १२ जुलै

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत : १७ जुलै

निवडणूक चिन्हांचे वाटप :१८ जुलै

मतदानाचा दिनांक : १ ऑगस्ट

मतमोजणी : ३ ऑगस्ट

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततधारेने समाधान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संततधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरवासी सुखावले आहेत. सोमवारी दिवसभर पावसाने शहरात मुक्काम ठोकल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठांमधील गर्दीचा ओघही पावसामूळे ओसरला. दिवसभरात शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात १ ते २५ जून या कालावधीत ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

रविवारी रात्रीपासून शहराच्या बहुतांश भागात संततधार पावसाला सुरूवात झाली. शहरवासियांची सकाळ उजाडली तीच पावसाच्या दर्शनाने. त्यामुळे अनेक भागात नागरिकांना सोमवारी सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. कधी भूरभूर तर कधी संततधार पावसामुळे नागरिकांना छत्र्या, रेनकोटसारखी साधने घेऊन घराबाहेर पडणे भाग पडले. सकाळी दहा ते साडेबाराच्या सुमारास शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी दोननंतर पावसाचा जोर वाढला. संततधार पावसाने नागरिकांना चिंब भिजविले. या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाची तळी साचल्याने त्यामधून वाहने नेताना नागरिकांची धांदल उडाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने विद्यार्थी तसेच कामावरून सुटलेल्या नोकरदार वर्गाची धांदल उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत हा जोर कायम राहिला. शहरात कॉलेजरोड, गंगापूर रोड, सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, इंदिरानगरच्या काही भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

पंचवटीत सरींवर सरी

पंचवटी : जून महिन्याअखेर मान्सूनचे खऱ्या अर्थाने आगमन झाले आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या वळवाच्या पावसानंतर सोमवारी (दि. २५) सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. कधी हलका तर कधी जोरदार पाऊस झाला. यंदा पावसाळी गटारींची साफसफाई व्यवस्थित झालेली नसल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याचे चित्र होते.

पंचवटी परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे. त्यात औरंगाबाद रोडवर नांदूरनाका परिसर, श्रीसेवा सोसायटी, सेवाकुंज, मखमलाबाद नाका, नवीन शाहीमार्ग, चरणपादुका रोड आदी परिसरात पाणी साचले होते. रिमझिम असला तरी दमदार पाऊस असल्यामुळे पाणी वेगाने वाहून जात नाही. साचलेल्या पाणी उताराच्या मार्गाने वाहत आहे. अनेक ठिकाणी ढापे बुजलेले असल्यामुळे पाणी तुंबत असल्याचे चित्र होते. हे ढापे मोकळे करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात होता.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मात्र, मुंबईला पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची मागणी कमी होऊन दरांत घसरण झाली. पावसामुळे सर्वच लिलाव आता सेलहॉलमध्ये घेण्यात येत आहेत. सोमवारच्या दिवसभराच्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी होण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

सखल भागांत साचले पाणी

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहर परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी साचून शहराला तलावाचे स्वरुप आले आहे. शहरातील शिवाजी पुतळा, दत्तमंदिर, बिटको चौक, विभागीय आयुक्त कार्यालय रस्ता, उड्डाणपूल, एकलहरे टी पॉइंट, सिन्नर फाटा, हनुमान मंदिर, चेहेडी शिव आदी ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस पावसाच्या पाण्याचे तळेच निर्माण झाले आहे. या पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच अडवला गेल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी दरवर्षी साचत असते. नाशिक-पुणे महामार्गावर चेहेडी गाव ते सिन्नर फाटा या दरम्यान ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. चेहेडी जकात नाका, चेहेडी शिव, अस्वले मळा, निसर्ग लॉन्स, सिन्नर फाटा पोलिस चौकी, हनुमान मंदिर, एकलहरे टी पॉइंट या ठिकाणी महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. चेहेडी शिव येथे महामार्गावरील खड्ड्यांमुळे पावसाची संततधार सुरू असताना दुचाकीस्वारांचे अपघातही झाले आहेत.

विजेचा लपंडाव

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील बहुतेक उपनगरांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. सोमवारी सायंकाळी चार वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता. असे असतानाही शहरातील कोणतेही फिडर ब्रेक डाऊन झालेले नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

देवळाली जलमय

देवळाली कॅम्प : आद्रा नक्षत्राने देवळालीसह पंचक्रोशीवर चांगलीच कृपादृष्टी केल्याने दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने देवळाली परिसर जलमय झाला आहे. देवळाली भागात परवाच्या दुपारपासून मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहे तर काल पुन्हा दिवसभर चांगलाच भिज पाऊस दिवसभर सुरु होता.दुपारनंतर सुरु झालेल्या या पावसाने शहरातील विविध रस्त्यांवर पाण्याचे तळे निर्माण झालेले पहायला मिळाले.सतत सुरु असलेल्या या पावसामुळे दुपारी दोन व सांयकाळी साडेपाचच्या सुमारास परतणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. सोमवारी अनेक दुकाने व लेव्हीट मार्केट बंद असल्याने शहर परिसरातील रस्ते पावसामुळे सुने-सुने होते. देवळाली शहरात प्रवेश करणाऱ्या लामरोड, हौसन रोड, सतीश कॉम्प्लेक्स, मेन स्ट्रीट, आनंद रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते. दस्तगीर बाबा रोड, ओमशांती नगर, संसरी लेन या परिसरात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ओमशांती नगर परिसरात तर थेट पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. यामुळे येथील नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला धारेवर धरत रस्त्यांची अर्धवट स्वरूपाची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

पावसाने उडविली दाणादाण

सातपूर : शहरात पावसाने संततधार सुरू केल्याने सुखद धक्का दिला. परंतु, चाकरमान्यांची पावसाने चांगलीच दाणादाण उडविली. रात्रीपासून सुरू

असलेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते. यात कामावर जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्यातून कसरत करून वाहने चालविण्याची वेळ आली.

सातपूर भागातील सर्वच रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहत असल्याने पादचाऱ्यांनाही वाहत्या पाण्यातून बचाव करत प्रवास करावा लागला. पावसाळी पाइपलाइनीत पावसाचे पाणी

वाहून जाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच पाणी वाहून जाण्यासाठी असलेले

नैसर्गिक नालेच गायब झाल्याने रस्ते जलमय होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूर परिसरात उघड्यावर मांसविक्री

$
0
0

(पेज फोटोशेजारी)

सातपूर परिसरात उघड्यावर मांसविक्री

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर परिसरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांमुळे अस्वच्छता पसरत आहे. श्रमिकनगर भागात जलनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उघड्यावर मांस फेकले जात असल्याने या रस्त्यावर प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असल्याचे दिसून येत आहे.

उघड्यावर फेकण्यात येणाऱ्या मांसामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या उघड्यावर मांस फेकलेल्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावरदेखील वाढल्याने नागरिकांना येथून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवर, तसेच उघड्यावर मांस फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडवरील त्रिवेणी पार्क येथे शुक्रवारी (दि. २२) रात्री पावणे आठवाजेच्या सुमारास दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत डोक्याला मार लागल्याने अमोल रामभाऊ लेंगुळे (रा. बोराडे मळा, सायट्रिक, जेलरोड) या दुचाकीस्वाराचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

अपघातातील मृत अमोल लेंगुळे शुक्रवारी रात्री सैलानी बाबा चौकाकडून बिटको चौकाकडे जात असताना त्रिवेणी पार्क येथे त्याच्या दुचाकीस (एमएच १५ सीएफ २५८५) सचिन सुरेश शहाणे (रा. श्रीकृष्णनगर, जेलरोड) याच्या दुचाकीची (एमएच १५ सीझेड २९३९) जोरदार धडक झाली. या अपघातात अमोल लेंगुळे याच्या डोक्यास गंभीर इजा झाली. त्यास स्थानिक नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, बिटको रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमी अमोल यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जखमी अमोल यास त्याच्या नातेवाइकांनी शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र औषधोपचारांचा खर्च जास्त असल्याने त्यास पुन्हा सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना जखमी अमोलचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत भारत ज्ञानेश्वर नाईकनव्हरे यांनी सचिन शहाणे याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदसरी!

$
0
0

जिल्ह्यात संततधार; बळीराजा सुखावला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केले असून, सोमवारी दिवसभर संततधार पावसाने नाशिकमध्ये तळ ठोकला. जवळपास सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांतील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने नद्या आणि धरणांमधील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये पुढील २४ तासांत मुंबई हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना पावसाने सोमवारी दिलासा दिला. रविवारी रात्रीपासून अनेक भागात संततधार पावसाला सुरुवात झाली. सोमवारी कधी भूरभूर, उघडीप तर कधी संततधार पावसाचा अनुभव नाशिककरांनी घेतला. शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. पावसामुळे ठिकठिकाणी पावसाची तळी साचली. तसेच, बाजारपेठांमधील गर्दी ओसरली होती.

-

बळीराजा सुखावला

पावसाचे पुनरागमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार असून, बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. दहा तासांत नाशिक (१७.१ मिमी), इगतपुरी (२७ मिमी), त्र्यंबकेश्वर (२५ मिमी), पेठ (३६.५ मिमी) पाऊस झाला. सिन्नर, चांदवड, येवला, बागलाण, कळवण, मालेगाव, देवळा आणि नांदगाव तालुक्यात सोमवारी अवघ्या दोन ते पाच मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

-

मराठवाडा, विदर्भात दोन दिवसांत चांगला पाऊस

मुंबई : मध्य भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंबाबत अहवाल मागविला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक आणि नाशिक विधानपरिषदेची आचारसंहिता सुरू असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमाबाबत मनसेचे संदीप भवर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीबद्दल आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.

आयुक्त मुंढे यांनी आचारसंहितेच्या काळात 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम घेऊन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार भवर यांनी केली होती. त्यावर अभिप्राय सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे उपसचिव अ. ना. वळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती संदीप भवर यांनी दिली आहे. त्यामुळे मुंढे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांमध्ये सोमवारी सकाळी हाणामारी झाली. शिवसेनापुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घेतल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांची 'राष्ट्रवादी'चे समर्थक योगेश गांगुर्डे यांच्याशी शाब्दिक वाद झाला. लागलीच त्याचे पर्यवसन हाणामारीत होऊन दराडे आणि बेडसे समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर एकमेकांवर खुर्च्या टाकून पोलिसांसमक्ष तुंबळ हाणामारी केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत वाद मिटवला.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बी. डी. भालेकर शाळेतील पाच मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी व टीडीएफ गट पुरस्कृत संदीप बेडसे आणि शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांच्या समर्थकांना बूथ लावले होते. निवडणूक काळात दराडे यांनी शिक्षकांना पैठण्या वाटल्याचा व पैठणी जाळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 'राष्ट्रवादी'च्या बेडसे समर्थकांनी व्हायरल केल्याचा आरोप दराडे समर्थकांकडून केला जात होता. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसह समर्थकांमध्ये अगोरदच तणाव होता. मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी समर्थक योगेश गांगुर्डे यांना जाब विचारण्यासाठी उमेदवार किशोर दराडे यांचे बंधू आमदार नरेंद्र दराडे हे गेले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. किशोर दराडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याचा संदेश नाशिकमध्ये फिरत होता. यावरून आमदार दराडे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त बेडसे समर्थकही मग हमरीतुमरीवर आले. दोघांच्या समर्थकांमधील एकमेकांना शिव्याची लाखोळी वाहत हाणामारी सुरू केली. राष्ट्रवादी समर्थकाने दराडे समर्थकावर थेट खुर्चीने हल्ला केला. त्यामुळे वाद आणखी चिखळला. आमदार दराडे यांनीही यावेळी बेडसे समर्थकांना मारहाण करण्याचा प्रयत्न करीत शिवीगाळ केली. वातावरण तापल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. बेडसे आणि दराडे समर्थकांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेत, प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे मतदान केंद्रावरील तणाव निवडला. या वादानंतर या केंद्रावरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

दराडेंची शिवराळ भाषा

बेडसे आणि दराडे समर्थकांमध्ये शाब्दिक वाद सुरू असतानाच आमदार नरेंद्र दराडे हे 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करीत त्याच्या अंगावर धावून गेले. या संदर्भात झालेल्या चित्रीकरणातही दराडे हे बेडसे समर्थकांना अपशब्द वापरत असल्याचा दावा 'राष्ट्रवादी'च्या समर्थकांनी केला आहे. यासंबंधीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दराडे यांनी शिवीगाळ केल्यानंतर हा वाद चिघळून थेट हाणामारीपर्यंत गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. दुसरीकडे, हा केवळ कार्यकर्त्यांमधील वाद असल्याचा दावा दराडे यांनी केला आहे.

शिवसेनेची फौज

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये थेट हाणामारी झाल्यानंतर शिवसैनिकांनी या केंद्राकडे धाव घेतली, तर राष्ट्रवादीचेही नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी धावून आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय कंरजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी या ठिकाणी गर्दी केली. त्यामुळे तणावात अधिकच भर पडली. परंतु, आमदार दराडे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी समंजसपणा स्वीकारत हा वाद मिटवला.

'राष्ट्रवादी'च्या उमेदवारांकडून आमच्या उमेदवाराबाबत चुकीचे संदेश पसरविले जात होते. त्यासंदर्भात आमच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. परंतु, ही लढाई केवळ दोन कार्यकर्त्यांमध्येच होती. परंतु, हा विषय मोठा करण्यात आला. जिल्हा बँक असो वा विधान परिषद निवडणुकीत मला राज्यस्तरावर प्रसिद्धी देऊन मोठे केले जाते. यासंदर्भात आमची कोणताही तक्रार नाही.

- नरेंद्र दराडे, आमदार, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images