म. टा. प्रतिनिधी, नाशिक महापालिका अग्निशमन विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि लष्कर विभागांशी तातडीने संपर्क साधत प्रशासकीय यंत्रणेने आपल्या गतिमानतेचा प्रत्यय दिला. यातून घटनेची वरिष्ठांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती देण्यात येऊन संबंधितांना मदत उपलब्ध करून देणे शक्य झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायर ऑफिसर गायकवाड यांना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निफाड तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थांकडून विमानाच्या दुर्घटनेबाबतची फोनद्वारे माहिती मिळाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला दुर्घटनेबाबत कळविले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन अन्य यंत्रणांशी समन्वय साधण्यास सुरूवात केली. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त विमान लष्काराचे असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगितले जाऊ लागल्याने देवळाली येथील लष्कराच्या कार्यालयाशीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने संपर्क साधला. दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी घटनास्थळाला भेट देत अपघाताची माहिती घेतली आणि या दुर्घटनेची कारणे शोधा, असे निर्देश संबंधितांना दिले. एसबी २१० असे या सुखोई विमानाचे नाव असून त्याची चाचणी घेण्यात येत होती. ओझरपासून साधारण २० किलोमीटरवर गेल्यानंतर विमानामध्ये बिघाड झाल्याचे दोन्ही पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पॅराशुटद्वारे उड्या मारल्या. त्यानंतर हे विमान कोसळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या दुर्घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल माहितीस्तव राज्य सरकारला पाठविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. घटनास्थळावर मदतीसाठी एअर फोर्सने हेलिकॉप्टर पाठविल्याचे सांगितले जात होते. परंतु हेलिकॉप्टर पाठविण्याची आवश्यकता भासली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दुपारी स्पष्ट करण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट