खरीपाचे कर्जवाटप फक्त २८ टक्के बँकाचे कर्ज वाटपाचे लक्ष २,६२५ कोटी; शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी पीक कर्ज वाटप संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ६८४ शेतकऱ्यांना ७३२ कोटी ७३ लाखाचे कर्ज वाटप झाले आहे. त्याची टक्केवारी फक्त २७.९१ टक्के आहे. पीक कर्जासाठी बँकांनी २६२५ कोटी ७० लाखाचे लक्ष ठेवले असताना प्रत्यक्षात वाटप कमी आहे. बँकांनी विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे खासगी सावकारांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्याचे बोलले जात आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदरच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सर्व बँकांची बैठक घेऊन जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण, प्रत्यक्षात मात्र कर्जवाटपाचे प्रमाण कमी आहे. जुलै अखेर हे कर्ज वाटप केले जात असले तरी त्याची टक्केवारी महिनाभरात किती वाढेल याबाबत साशंकता आहे. ४ जुलै पर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेने १६ हजार १३० शेतकऱ्यांना ४६१ कोटी ३२ लाख कर्ज वाटप केले आहे. त्यांना १८५९ कोटी ८२ लाखाचे लक्षांक देण्यात आला होता. पण, या बँकांनी २४. ८० टक्केच कर्ज वाटप आतापर्यंत केले आहे. ग्रामीण बँकांनी १३ कोटी ४३ लाखाचे लक्षांक ठरवले होते. पण, प्रत्यक्षात १ कोटी ५ लाख कर्ज ६८ शेतकऱ्यांना दिले आहे. खासगी बँकांनी या वर्षी ४०४ कोटी ६५ लाखांचे लक्ष्य ठेवले होते. पण, आतापर्यंत या बँकांनी ५१ कोटी ३१ लाखाचे कर्ज २ हजार ५० शेतकऱ्यांना वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३४७ कोटी ८० लाखाचे कर्ज वाटपाचे लक्ष ठेवले होते. त्यांनी २१९ कोटी ५ लाखाचे कर्ज १२ हजार ४३६ शेतकऱ्यांना वाटप केले आहे. जिल्हा बँकेची अडचण गेल्या वर्षी ४ हजार ११ कोटीचे लक्षांक बँकेने ठेवले होते. त्यात जिल्हा बँकेचा आकडा मोठा होता. यावेळेस जिल्हा बँक अडचणीत असल्यामुळे त्यांनी हात आखडते घेतले. त्यामुळे या कर्ज वाटपावर परिणाम झाला. अगोदर दिलेल्या कर्ज वसुलीचे प्रमाणही कमी असल्यामुळे जिल्हा बँकेची अडचण झाली आहे. बँकाचे नियम अवघड राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी कर्जवाटपासाठी लक्षांक मोठे ठेवले असले तरी त्यांची कर्जवाटपाची टक्केवारी कमी आहे. या बँकाचे नियम व अटी किचकट असल्यामुळे त्यातून कर्ज वाटप कमी होते. त्याचप्रमाणे पीक कर्ज देण्यासाठी या बँकाही फारशा उत्सुक नसतात. त्यामुळे त्यांची कर्जवाटपाची टक्केवारी कमी आहे. पेरण्या २७.११ टक्के पावसाने वेळेस सुरुवात केल्यानंतर पुन्हा ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात ६ लाख ५२ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ७६ हजार ९२८ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी २७.११ टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही पावसामुळे निर्माण झाले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट