Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पृथ्वीराज चव्हाण आज घेणार काँग्रेस कार्यकर्त्यांची शाळा

$
0
0

पृथ्वीराज चव्हाण आज घेणार

काँग्रेस कार्यकर्त्यांची शाळा

पक्षसंघटनेचा घेणार आढावा; गणवंत विद्यार्थ्यांचाही गुणगौरव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मरगळ आलेल्या शहर व जिल्हा काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन कशा पद्धतीने नव्याने उभे करता येईल यावर, चव्हाण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. चव्हाण रविवार आणि सोमवार असे दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागून आहे.

शहर व जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. विशिष्ट चौकटीच्या पलीकडे पदाधिकारी काम करत नसल्याने कार्यकर्त्यांनामध्येही मरगळ आलेली आहे. महिनाभरापूर्वी माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या दौऱ्यामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले होते. परंतु चिदंबरम याची पाठ फिरताच, वरिष्ठ नेत्यांच्या 'नरो वा कुंजरो वा' भूमिकेमुळे पुन्हा मरगळ निर्माण झाली आहे. लोकसभा व विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना, पक्षातील ही मरगळ झटकण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीनी वरिष्ठ नेत्यांना जिल्हास्तरावर जाण्याचे फर्मान सोडले आहेत. त्यामुळे रविवारी नाशिकमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत असून, दोन दिवस त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत.

रविवारी दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांच्या एकूण परिस्थितीवर व महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर चव्हाण बोलणार आहेत. तसेच आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन उभे करण्यासाठी कशा पद्धतीने काम करावे यावर चव्हाण बोलणार आहेत. या कार्यक्रमास सर्व कॉंग्रेस पक्षाच्या व काँग्रेस विचारांच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक शहर काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कालिदासचे बुधवारी लोकार्पण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बहुप्रतीक्षित कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (१५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन व मध्यवर्ती नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

जुलै २०१७ मध्ये कालिदास कलामंदिर नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल वर्षभर कालिदास कलामंदिर बंद होते. सद्यस्थितीत अत्यंत सुबक असे कालिदास कलामंदिर उभे राहिले आहे. कालिदास कलामंदिराच्या लोकार्पणाला मुख्यमंत्री येणार म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून काम पूर्ण होऊनही हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. परंतु, कलाकारांची खप्पामर्जी झाल्याने तसेच रोजच कालिदास कलामंदिर बंद असल्याची ओरड होत असल्याने बुधवारी हा लोकार्पण सोहळा होत आहे. यावेळी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर रंजना भानसी यांसह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता चांगली नसेल तर प्रॉडक्ट यशस्वी होत नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हुशार मुले शक्यतो उद्योगाकडे वळत नाहीत. त्यांचा कल नोकरीकडे असतो. कमी श्रमात पैसे कमावण्याचे त्यांचे स्वप्न असते. ते काहीअंशी पूर्णदेखील होते. जे बुद्धिमत्तेने कमी असतात, परंतु ज्यांच्याकडे कौशल्य असते, तेच उद्योगाकडे वळतात. त्यातही विभाग असतात. गुणवत्ता चांगली नसेल तर प्रॉडक्ट यशस्वी होत नाही, असे प्रतिपादन पीतांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागातर्फे 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम सुरू आहे.

प्रभुदेसाई म्हणाले, की हिंदवी स्वराज्यामध्ये मराठी माणसाने जगभर आपला ठसा उमटवला होता. मराठी माणसाने विचार पक्का केला तर तो काहीही करू शकतो. काही जणांना आर्थिक जोड समजत नाही. ती समजली, की व्यवसायाचे महत्त्व कळू शकेल. पैशांसाठी काही करणे ही प्रतिष्ठेची गोष्ट नव्हती, तेव्हापासून आम्ही काम करीत आहोत. मुळात हा माणूस उद्योग करतोय हेच चांगले मानले जात नव्हते. मात्र, या चांगल्या- वाईटाच्या काळामध्ये संघाने केलेले संस्कार इतके पक्के होते, की पीतांबरीचे शंभर प्रॉडक्ट बनवले, परंतु मी मात्र संघाचे प्रॉडक्ट आहे हे सांगायला अजिबात कचरत नाही, असेही प्रभुदेसाई म्हणाले.

वडिलांनी विक्रम ट्रान्स्पोर्ट नावाने व्यवसाय सुरू केला; परंतु त्यात मला रस नव्हता. मला माझे वेगळे काही करायचे होते. त्यातूनच मी टाइल्सचा व्यवसाय सुरू केला. मात्र, मला ६० लाख रुपये तोटा झाला. आता वडील व्यवसायाला विरोध करतील असे वाटले. मात्र, त्यांनी मला रिकामे राहू नको, असा सल्ला दिला. आठ तास वाचन करायला लावले. त्यातून दिशा सापडली व पीतांबरीच्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यासपीठावर राजाभाऊ मोगल, शरयू देशमुख, रवींद्र झेंडे व देवेंद्र बापट उपस्थित होते. वसंत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ महिलेस मिळाले जीवदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक / म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

---

चित्रपटाच्या कथानकाला शोभवा असा प्रसंग शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गोदावरीवरील रामवाडी पुलावर घडला.

मानसिक स्वास्थ बिघडलेल्या महिलेने जीव देण्यासाठी पुलावरून उडी मारली. गटांगळ्या घेत असलेल्या महिलेला वाचविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी धाडस दाखवत तिला पाण्यातून बाहेर काढले. अगदी गळ्यातील ओढणी, स्कार्फ काढून महिलांनी दोर तयार केला. जवळपास २० ते २५ मिनिटे हा थरार सुरू होता. बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये महिला, मुली, एक महिला पोलिस कर्मचारी, रिक्षाचालकांसह इतरांचाही सहभाग लक्षणीय ठरला.कोणत्याही तांत्रिक मदतीशिवाय फक्त समयसूचकतेच्या आधारे सर्वांनी या महिलेला सुखरूप बाहेर काढले. आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला पंचवटी परिसरात राहते. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला असून, तिने पुलावरून उडी मारली. ही बाब पुलावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तिच्या मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. काय झाले हे पाहण्यासाठी इतरही धावले. यात महिलांची संख्या मोठी होती. या घटनेबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शी असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचारी रोशनी भामरे यांनी सांगितले, की सुटी असल्याने मी कुटुंबीयांसमवेत कारमधून दिंडोरी येथे जात असताना रामवाडी पुलावर गर्दी दिसली. काय झाले म्हणून विचारले असता एक महिला पाण्यात बुडत असल्याचे समजले. कार थांबवून गर्दी असलेल्या ठिकाणी गेले. तेथे एक महिला बुडताना दिसली. यावेळी येथे पोहण्याची माहिती असलेला एक युवक होता. त्याला पोलिस असल्याचे सांगत विश्वास देऊन मदतीसाठी पाण्यात उतरण्याबाबत भामरे यांनी आवाहन केले. मात्र, बुडणारी महिला त्या युवकाच्या हाताबाहेर होती. त्यामुळे अन्य एका युवकाने मदतीसाठी पाण्यात उडी मारली. यामुळे त्या महिलेचे डोके पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान काही महिलांनी आपल्याकडील ओढण्या, स्टोल्स, स्कार्प अशा कपड्यांच्या मदतीने एक रोप तयार करून पाण्यात सोडला. महिलांकडून सुरू असलेली धडपड पाहता परिसरातील एक तरूण नॉयलॉन रोप घेऊन आला. याचवेळी एक बोट नदीच्या किनाऱ्यावर उभी असल्याची भामरे यांनी पाहिले. भामरे यांच्यासह इतर नागरिकांनी मदतीसाठी त्यास आवाज देण्यास सुरूवात केली. काही वेळातच बोट तेथे आली आणि त्या महिलेला घेऊन किनारी आली. महिलेच्या नाकातोंडात पाणी गेले होते. भामरे यांनी पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर त्या महिलेला पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

--

आजच पती गावी परतला अन…

२४ वर्षांच्या या विवाहितेचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला. तिचे सासर चोपडा येथे असून, तिचा पती कंपनीत छोटे-मोठे काम करतो. पत्नीला बरे वाटावे म्हणून तिचा पती मागील महिनाभर तिला घेऊन नाशिकला आला होता. माहेरीची आर्थिक स्थिती हातावरील आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी महिलेचे आई-वडील कामधंद्यासाठी घराबाहेर पडले. पतीही चोपड्याला गेले. घरात एक लहान भाऊ आणि आजोबा असताना ही महिला घराबाहेर पडली आणि थेट रामवाडी पुलावर पोहोचली. या महिलेची मानसिक स्थिती लक्षात घेता तिच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही, असे पंचवटी पोलिसांनी स्पष्ट केले.

----

मशिन अंगावर पडून कामगाराचा मृत्यू (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामगारांकडून अवजड मशिनच्या सफाईचे काम सुरू असताना अचानक ते मशिन अंगावर पडून आसाम येथील कामगार हरिहर बर्मन (वय २२) याचा मृत्यू झाला.

अवजड मशिन अंगावर पडल्याने जखमी झालेल्या हरिहरला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत. दरम्यान, विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांना वरचे वर अपघातांना सामोरे जावे लागते. याकडे सरकारचा औद्योगिक सुरक्षा विभाग नियमावर बोट ठेवत लक्ष देत नसल्याचा आरोप अपघातग्रस्त कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे यांनी केला आहे. किमान मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना तरी कंपनी मालकाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.

---

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची खुलेआम विक्री

राज्यभरात प्लास्टिकबंदी असतानाही शहरात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची खुलेआम विक्री होत आहे. पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा वावर असलेल्या शरणपूर पोलिस चौकी सिग्नल परिसरात अशी विक्री होत असतानादेखील कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज आरोग्य तपासणी

$
0
0

आरोग्य तपासणी शिबिर

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि श्रीमती सविता देसाई हॉस्पिटल मेडिकल ट्रस्ट व हेल्पिंग ऑपरेस्ड पीपल फॉर एज्युकेशन फाउंडेशन (होप)तर्फे आज, रविवारी (दि. १२) शहरातील लहान मुलांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. शालिमार येथील श्रीमती सविता देसाई हॉस्पिटल येथे सकाळी १० ते १२ या कालावधीत हे शिबिर होईल.

--

आज शोकसभा

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप पवार यांचे वडील तथा मविप्रचे माजी मुख्याध्यापक नारायणराव पवार यांचे गुरुवारी (दि. ९) निधन झाले. दिवंगत नारायणराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज, रविवारी (दि. १२) दुपारी चार वाजता रावसाहेब थोरात सभागृह येथे शोकसभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आक्षेप ९४१ कोटींचे!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या स्थानिक निधी लेखापरीक्षण समितीने केलेल्या महापालिकेच्या २०११ ते २०१५ या पाच आर्थिक वर्षांच्या अहवालात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावल्याचे समोर आले आहे. लेखापरीक्षणात गेल्या पाच वर्षांत विविध कारणांमुळे तब्बल ९४१ कोटी ८९ लाख रुपयांची रक्कम आक्षेपाधीन असून, अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून ४३ कोटी ७३ लाखांची रक्कम वसूलपात्र असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांनी माहितीच्या अधिकाराकडून ही बाब उघडकीस आणली आहे.

महापालिकेच्या कारभाराचे महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाबरोबरच राज्य सरकारच्या स्थानिक निधी लेखा समितीमार्फत दरवर्षी लेखापरीक्षण केले जाते. या समितीमार्फत केलेल्या २०११-१२ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षणातील आक्षेपित परिच्छेद संख्या, आक्षेपाधीन थकबाकी रक्कम, वसूलपात्र रक्कम याबाबतची माहिती व महापालिकेने अहवालातील आक्षेपांची पूर्तता केल्याची माहिती जानी यांनी माहितीच्या अधिकारात मागविली होती. महापालिकेचे उपमुख्य लेखापरीक्षण तथा जनमाहिती अधिकारी यांनी उपरोक्त माहिती जानी यांना दिली असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत तब्बल ८०२ परिच्छेद संख्या असून, आक्षेपाधीन रक्कम ९४१ कोटी ८९ लाख रुपये, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वसूलपात्र रक्कम ४३ कोटी ७२ लाख असल्याची माहिती महापालिकेकडूनच देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे लेखापरीक्षण अहवालातील पूर्तता न करणे, वसूलपात्र रक्कम मक्तेदाराकडून वेळेत वसूल न करणे, आक्षेपाधीन रकमेबाबत अनुपालन व खुलासा न करणे अत्यंत चुकीचे असून, महापालिकेच्या अर्थतंत्रावर प्रशासनामार्फत घालण्यात आलेला घाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जानी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढेल!

$
0
0

सर्जन डॉ. श्रीखंडे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यायाम न करणे, फास्ट फूड खाणे, स्मोकिंग करणे, मद्यप्राशन यामुळे कॅन्सरचा धोका बळावत आहे. सध्याची बदलती लाइफस्टाइल कॅन्सरसारख्या गंभीर रोगांना आमंत्रण देणारी आहे. अनेक जण व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यातच व्यायामाचा अभाव आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेवर याचा परिणाम होत आहे. असेच सुरू राहिले तर भारतातील कॅन्सरग्रस्तांची संख्या अधिक वाढेल, अशी माहिती डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी दिली.

ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यासातर्फे 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. उपक्रमातील तिसरे पुष्प शनिवारी गंगापूर रोडवरील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात झाले. कॅन्सर सर्जन डॉ. श्रीखंडे यांनी 'कॅन्सरचे बदलते स्वरूप' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ए. के. पवार आणि कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. राज नगरकर उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. श्रीखंडे म्हणाले, की कॅन्सरचे प्रमाण भारतात वाढत आहे. त्यानुसार उपचार पद्धतींमध्ये नव्या टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे. कॅन्सर पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. जर कॅन्सर बरा होणार नसेल, तर नियंत्रित करता येतो. मात्र, यासाठी रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कॅन्सर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. या वेळी उपस्थितांनी कॅन्सरसंबंधित शंकांचे निरसन करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्लॅमरस ‘श्रावणक्वीन’मध्ये त्वरेने नोंदवा सहभाग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सौंदर्य, कलागुणांचे बहारदार सादरीकरण, मनमोहक अदा आणि चातुर्य यांच्या जोरावर 'श्रावणक्वीन'चा मुकुट पटकावयचा असेल, तर त्यासाठी ऑफलाइन रजिस्ट्रेशन सुरू आहे. 'श्रावणक्वीन'मध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचे आहे. त्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केले नसेल, तर ही ग्लॅमरस संधी सोडू नका. आजच, स्पर्धेत सहभागी व्हा आणि चंदेरी दुनियेच्या करिअरची कवाडं खुली करा.

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'वामन हरी पेठे ज्वेलर्स' प्रस्तुत 'श्रावणक्वीन' स्पर्धा पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि रेजेन्सी ग्रुप, चॅनेल पार्टनर झी युवा या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे रजिस्ट्रेशन अंतिम टप्प्यात आले आहे. रजिस्ट्रेशन ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुरू आहे. तुमचे सौंदर्य, तुमच्यातील टॅलेंट, तुम्हाला येणाऱ्या कलेच्या अफलातून सादरीकरणाच्या जोरावर श्रावणक्वीन स्पर्धेत स्वतःला आजमावण्यासाठी सज्ज व्हा. वय वर्षे १८ ते २५ वयोगटातील अविवाहित तरुणी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्लॅमरस जगतातल्या अनेक संधी आजमावता येतील. स्पर्धेची प्राथमिक फेरी लवकरच होणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेसाठी सज्ज व्हावे, ज्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे.

...

बना 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन'

श्रावणक्वीन स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीतून काही स्पर्धकांची सिटी फिनालेसाठी निवड होईल. या स्पर्धकांना सिटी फिनालेच्या ग्रुमिंग सेशनमध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे. सिटी फिनाले नाशिकमध्येच होईल. त्यातून अंतिम तीन स्पर्धक निवडले जातील. या स्पर्धकांना मुंबईत होणाऱ्या ग्रँड फिनालेसाठी जावे लागेल. ग्रँड फिनालेसाठीचे ग्रुमिंग सेशन मुंबईत होईल. या ग्रुमिंग सेशनमध्येही विजेत्यांना सहभागी होणे अनिवार्य आहे. ग्रँड फिनाले नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे या विभागाच्या श्रावणक्वीनमध्ये रंगेल. या स्पर्धेतून तुम्हाला महाराष्ट्राची श्रावणक्वीन होण्याची संधी आजमावता येईल. या सोहळ्याचे प्रक्षेपण झी युवा वाहिनीवर करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मरणाने प्रश्न सुटतील काय?

$
0
0

आत्महत्या करणे सोपी बाब नक्कीच नाही. मात्र, असा निर्णय घेण्यापूर्वी एकदा मन मोकळं करणे आवश्यक आहे. कोठे तरी न्याय मिळेल, जगण्याची ऊर्मी सापडेल. धारणकरांच्या आत्महत्येने महापालिकेचे प्रश्न सुटले नाहीत. सिडकोत एका १४ वर्षांच्या मुलाने सहज मृत्यूला आपलेसे केले. वर्षागणिक आत्महत्येचा प्रश्न बिकट होतो आहे. त्याचा वेगळ्या अर्थाने विचार करणे आवश्यक झाले आहे.

अरविंद जाधव

arvind.jadhav@timesgroup.com

वाढते वजन धोकादायक आहे, हे समजण्याइतपत सर्वच स्थरातील नागरिकांची समज नक्कीच आहे. मात्र, वजन कमी करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम करण्याचा प्रश्न उद्भवल्यास नकारघंटा असते. वेळ नाही, जमत नाही, अशी अनेक कारणे पुढे येतात. आरोग्याची हेळसांड एखाद्या दिवस छोटी-मोठी व्याधी मागे लावण्यास पुरेशी ठरते. मग त्या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांकडे आणि तेथून व्यायामाकडे परतावे लागते. ज्याचे दुखते त्यालाच कळते, ही म्हण यामुळेच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. स्वत:चे आर्थिक, शारीरिक अथवा मानसिक नुकसान झाल्याखेरीज दुसरा मार्ग स्वीकारायचा नाही, ही बहुतांश नागरिकांची मानसिकता असते. शहरात अवघ्या सहा महिन्यांत ४० दुचाकीस्वारांचा मृत्यू फक्त हेल्मेटचा वापर न केल्यामुळे झाला, ही बाब वाहनचालकांचे डोळे उघडण्यासाठी पुरेशी होती. मात्र, आज त्याचा कोठेही गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. अपघातात मरणाऱ्या ४० दुचाकीस्वारांचा आणि इतरांचा थेट संबंध नसल्याचा तो परिणाम असू शकतो. असो. अपघातापेक्षाही आत्महत्येची समस्या सध्या समाजात भीषण रूप घेत आहे. अगदी १४ वर्षांच्या मुलापासून तरुण आणि संसाराची जबाबदारी खांद्यावर असलेल्या व्यक्ती सहज मृत्यूचा पर्याय स्वीकारतात, यापेक्षा वाईट ते काय असू शकते? आत्महत्या करणारे भित्र्या मनाचे असतात, असे म्हंटले जाते. दुर्दैवाने यात तथ्य नाही, असे म्हणावे लागेल. आत्महत्या करणे सोपे नाही आणि नव्हतेही! महापालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयातील घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील सहाय्यक अधीक्षक संजयदादा धारणकर (वय ४७) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मागील आठवड्यातील ही घटना सर्वांनाच चटका लावून गेली. शहराची पालक संस्था असलेल्या महापालिकेचा कारभार यामुळे चव्हाट्यावर आला. धारणकरांची दोनच ओळींची एक सुसाइड नोटदेखील सापडली होती. त्यात कामाच्या अतिताणामुळे सोडून जात असल्याचा उल्लेख होता. यानंतर महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासन यांच्यात उघड संघर्ष सुरू झाला. या प्रकरणी पोलिसांनी जाबजबाब नोंदवून घेतले. धारणकरांच्या कामाच्या ताणाचा आणि त्यांच्या आत्महत्येचा यात फारसा संबंध नसल्याचे आजवरच्या जबाबांमधून तरी स्पष्ट होते. त्यामुळे या चौकशीतून आणि होत असलेल्या आरोपांमधून फार काही समोर येईल, याची शाश्वती दिसत नाही. महापालिका प्रशासनानेही आपली बाजू मांडून हात वर केले आहे. आता प्रश्न असा उरतो, की धारणकरणांच्या आत्महत्येने काय साध्य झाले? महापालिकेचे कामकाज आजही सुरळीत सुरू आहे. कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. उलट आत्महत्येने प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिक गडद झाला, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मागील आठवड्यातच सिडकोत एका १४ वर्षांच्या मुलाने राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी ही शहरातील पहिलीच घटना होती, असेही नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये याच वयोगटातील मुलीने आईवडील घरात गळफास लावून घेतला होता. सातपूर परिसरातील ही घटना झाली होती. मुले-मुली, युवक, तरुण अशा सर्वच वयोगटातील व्यक्ती सहजतेने मृत्यूला कवटाळण्याच्या विचारापर्यंत पोहचतातच कशी, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. दुर्दैवाने अपघातांच्या घटनांप्रमाणे येथेही समाजाच्या निरपेक्षवादाची प्रचीती येते. आत्महत्या करणारी व्यक्ती वेगवेगळ्या कारणांमुळे डिप्रेशनमध्ये पोहोचतात.

प्रत्येकाची कारणमीमांसा वेगळी असू शकते. व्यसन, कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्थिती, शारीरिक अडचणी, सततचे प्रेशर अशी काही कॉमन कारणे पुढे येतात. या सर्वांत महत्त्वाचा ठरतो तो संवाद! निसर्गाने दिलेल्या या शक्तीचा वापर कमी झाला म्हणजे संवादच खुंटला, तर विचारांची चक्रे आपोआपाच थांबतात. कोणीही नाही. परिस्थिती बदलणार नाही, अशी भावना मनात घर करून राहिली, की जगण्यापेक्षा मरण सोपे वाटू लागते. अशा वेळी संबंधित व्यक्तीने घरातील सदस्यांसोबत, मित्रांबरोबर, शेजारी, शिक्षक, दूरचा नातेवाईक असा कोणाचा तरी हात पकडून आपली घुसमट व्यक्त करायला हवी. मिळेल कोठून तरी मदत. कोणीच पुढे येत नसतील तर पोलिसही आहेत. मागितल्याशिवाय मिळत नाही. बोलणाऱ्याची माती विकली जाते, ही शिकवण आपल्या पूर्वजांनी घालून दिली. मात्र, बदलत्या जीवनशैलीने अशा बोधकथांआडून भावी पिढी सक्षम करण्याच्या पद्धतीला केव्हाच गिळंकृत करून टाकले आहे. गेल्या वर्षी ब्लू व्हेल या गूढ अॅप गेमने जगभरातील लहान मुलांना शिकार केले होते. ब्लू व्हेल गेमच्या सडक्या विचारसरणीच्या डेव्हलपरच्या दमदाटीमुळे एकटी घरात बंद होऊन मुले शेवटी आत्महत्येचा मार्ग निवडत होती. काही महिन्यांच्या तपासानंतर त्या अॅप डेव्हलपरला अटक झाली अन् आत्महत्येचा तो खेळ संपला. भविष्यात आणखी एखादा प्रकार भावी पिढी बर्बाद करण्याची तयारी करीत असेल हे निश्चित!

मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी राज्यभरात आंदोलने छेडली जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न जैसे थे असताना काही तरुणांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी आत्महत्येचा मार्ग पत्कारला. एकापाठोपाठ काही तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धारणकर, तो अल्पवयीन मुलगा, आरक्षणासाठी जीव देणारे तरूण कोणत्या तरी समस्येशी चार हात करीत होते. त्यांच्याबरोबर इतर होते. मात्र, काहींनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. राज्यासह देशभरात शेतकरी आत्महत्या, महिलांच्या आत्महत्या सातत्याने होत असतात. मात्र, शेतकऱ्यांच्या अथवा महिलांच्या आत्महत्यांमुळे त्यांचे प्रश्न सुटतीलच असे नाही. जीवनात संघर्ष असेल तर लढाईला नक्कीच बळ मिळते. यात अपयश आल्यास आत्महत्या करण्यापूर्वी इतर पर्याय मात्र चाचपून पाहायला हवे. आपली पत्नी, मुले, आईवडील यांच्याशी बोलून मोकळे व्हायला हवे. त्यांच्याशी पटत नसेल तर शेजारी, नातेवाईक, मित्रांना गाठून अगदी रडूनही मोकळा होता आले तर तसा प्रयत्न करून पाहायला हवा. दोन मिनिटांच्या रडण्याने पराभूत होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तो निर्माण होतो जेव्हा जगण्याची सर्व हत्यारे म्यान केली जातात तेव्हा!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत होणार २० कोटींचे रस्ते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी त्रिसूत्रीला काहीशी ढिलाई देत नगरसेवकांना खूष करण्याचे काम सुरू केले आहे. अंबड औद्योगिक वसाहतीपाठोपाठ आता सिडको विभागातील १३ किमी लांबीच्या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणासाठी तब्बल १९ कोटी ७२ लाख रुपयांचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला आहे. महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास सिडकोतील रस्ते चकाचक होणार आहेत.

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी भाजपच्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला कामाची निकड, तांत्रिक व्यवहार्यता आणि उपलब्ध निधी अशा त्रिसूत्रीने ब्रेक लावला होता. तसेच बजेटमध्येही रस्ते डांबरीकरणाच्या विषयांना बगल दिली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. रस्त्यांचे कामे करताना, जेथे कच्चे रस्ते आहे तेथे खडीकरण, खडीकरण तेथे डांबरीकरण व त्यानंतर पुढे अस्तरीकरण असा क्रम ठरवला होता. नगरसेवकांच्या आवडीचे विषयच बंद झाल्याने मुंढेविरोधातील असंतोषाची धग वाढत चालली होती. त्यातच मागील महासभेत अंबड औद्योगीक वसाहतीत जवळपास १७ किमीचे सुमारे १९ कोटी रूपयांचे रस्ते करण्याचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला. त्यामुळे नागरी भागातही रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी वाढली होती. त्यामुळे प्रशासनाने आता सिडकोतील रस्त्यांसाठी निधीची उपलब्धता करत, या भागात १३ किलोमीटर रस्ते कामाचे प्रस्ताव तयार केले आहेत. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी १९ किमीची वाहिनी तसेच नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांसाठी फुटपाथासाठी १९ कोटी ७२ लाख रूपयांचा खर्च केला जाणार आहे. प्रामुख्याने आठ ते दहा वर्षापूर्वी मंजूर अभिन्यासातील २५ ते ५० टक्के विकसित भूखंड भागात हे रस्ते केले जाणार आहे. खडीकरणाची ४.४० किमी तर डांबरीकरणाची १३.१० किमी लांबीचे रस्ते तसेच अन्य सुविधांवर १९ कोटीचा खर्च दोन टप्प्यात होईल. चालू वर्षी ११ कोटी ४ लाख ७० हजार तर पुढील वर्षी ८ कोटी ६८ लाख ६ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे दोन वर्षात सिडकोतील हे रस्ते चकाचक होणार असल्याचे चित्र आहे.

अन्य भागामध्ये मागणी वाढणार

सिडकोतील २४, २५, २७, २८, २९ व ३१ अशा सहा प्रभागांमध्ये १९ कोटी ७२ लाख रुपयांचे रस्ते होणार आहेत. सिडकोत शिवसेनेचा वरचष्मा असून, आयुक्तांच्या या निर्णयामुळे शिवसेनेचे नगरसेवकांचे चांगभले होणार आहे. अंबड पाठोपाठ सिडकोतील रस्तेकामांमुळे शिवसेनेला झुकते माप मिळाले असल्याने पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पूर्व, पश्चिम व सातपूर या प्रभागामध्येही रस्ते कामांची मागणी जोर धरणार आहे. त्यामुळे प्रशासनाचीही कसोटी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राची डांगी गाय धोक्यात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील डांगी गाय धोक्यात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या महाराष्ट्रातील दूध उत्पादनासाठी राज्याबाहेरील गायींच्या प्रजातींना मागणी वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील डांगी गायींची संख्या कमी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन डांगी गायींचाच उपयोग महाराष्ट्रातील दूध व्यावसायिकांनी करावा, या हेतूने डांगी गायींचे संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सह्याद्री डांगी गो संवर्धन संस्थेतर्फे डांगी गायींच्या संवर्धनासाठी १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत कालिका मंदिर हॉलमध्ये राज्यव्यापी महासंमेलन होणार आहे.

पशुसंवर्धन सहआयुक्त धनंजय परकाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे आणि निवृत्त पशुसंवर्धन अधिकारी संभाजी आव्हाड यांच्या हस्ते महासंमेलनाचे उद्घाटन होईल. डांगी गायीची सुधारणा, संवर्धन आणि संशोधनासाठी ही संस्था कार्यरत आहे. भारतात गायीच्या प्रजातींची संख्या ३४ पेक्षा अधिक आहे. त्यातील काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रजातींमध्ये गुजरातमधील गीर, पंजाबमधील साहिवाल, राजस्थानमधील थरपार्कर गायी सर्वाधिक दूध देतात. हे दूध मानवी आरोग्यासाठी लाभदायक असते, असे मार्केटिंग सध्या बाजारात सुरू आहे. मात्र, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील डांगी गायदेखील दिवसाला ५ ते ७ लिटर दूध देते. या डांगी गायींचे योग्य संवर्धन झाल्यास १० ते १२ लिटर दूध गाय देऊ शकेल. या गायीचे दूध आरोग्यास लाभदायक आहे. त्यासाठी डांगी गायींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. सध्या नाशिक, अहमदनगर, ठाणे या भागातील दोनशेहून अधिक गायींचे संवर्धन सह्याद्री संस्थेतर्फे केले जात आहे. या गायींचे संवर्धन करून सेंद्रिय पंचगव्ये विकसित करण्याचा मानस संस्थेचा आहे. यासाठी राज्यव्यापी महासंमेलन आयोजित केले आहे, अशी माहिती संस्थेचे योगेश सामृत, जगमोहन परदेशी, संदीप सोनवणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळावा जागतिक दर्जा

सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये सहजतेने डांगी गाय वावरते. जास्त पावसातही या गायीला त्रास होत नाही. असे असूनही महाराष्ट्रातील डांगी कायम दुर्लक्षित असते. म्हणून सह्याद्री डांगी गो संवर्धन संस्थेने डांगी गायींचे संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून डांगी गायीला जागतिक दर्जा मिळावा, अशी मागणीदेखील संस्थेच्या वतीने केली जात आहे. महासंमेलनात पशुवैद्य, पशुसंवर्धन अधिकारी आणि गोपालक मार्गदर्शन करतील. या वेळी व्यावसायिक तत्त्वावर देशी गायीच्या वंशाचे धोके, देशी गायींची अनुवंशिक सुधारणा, वार्षिक चारा व खाद्य नियोजन, संवर्धनासाठी शासकीय योजना, गायीच्या गव्यापासून विविध उत्पादने या विषयांवर चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांगरीतील मराठा आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे ६ ऑगस्टपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन थांबविण्यात आले आहे. सकल मराठा समाज राज्य समितीचे पुढील निर्देश येईपर्यंत जिल्ह्यात आंदोलने थांबविण्यात येत असल्याची घोषणा सकल मराठा समाज नाशिकने केली होती. त्यामुळे हे आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक आंधळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे, रमेश पांगारकर, धनेश्वर पांगारकर, संपत पगार, चंद्रकांत दळवी, गणेश जाधव, सोमनाथ पेखळे, संदीप पांगारकर, प्रकाश पांगारकर, शरद शिंदे, निखिल पांगारकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुख, समृद्धी अन् लक्ष्मी नांदू दे दारी!

$
0
0

\Bदीप अमावस्येनिमित्त दिव्यांप्रती कृतज्ञतेची भावना

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंधार दूर करून आपले जीवन प्रकाशमान करणाऱ्या दिव्यांची शनिवारी दीप अमावस्येनिमित्त पूजा करण्यात आली. मिणमिणत्या दिव्यांपासून लामणदिवा, समई, कंदिलांची स्वच्छता करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून पूजा करण्यात आली. घराघरात दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून फुले वाहून व गूळ, फुटाणे, लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. गूळ, कणकेपासून बनविलेल्या दिव्यांनाही यादिवशी विशेष मान असल्याने हे दिवेही पूजेत मांडण्यात आले होते. यादिवशी, शनी मंदिर, कपालेश्वर मंदिरात जाऊनही नाशिककरांनी मनोभावे पूजा केली.

आषाढी अमावस्या 'दीप अमावस्या' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे व समई स्वच्छ करून दीपपूजा केली जाते. श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला दीपपूजन केले जाते. दिव्यांची स्वच्छता करून, आरती केली जाते. देवासमोर दिवे लावत दिव्यांच्या कहानीचे वाचनही यावेळी केले जाते. सुख, समृद्धी आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होण्यासाठी व घरातील इडापिडा टळावी म्हणून प्रकाश देणाऱ्या दिव्यांची पूजा करावी, असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचे पालन करीत आजही दीप अमावस्येला दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. आषाढ महिन्यातील हा शेवटचा दिवस असल्याने या महिनाभरात करावयाचे सर्वच विधी या दिवशी मनोभावे पूर्ण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायीच्या पोटात १२ किलो प्लास्टिक

$
0
0

नाशिक : मोहगाव येथील एका गाईच्या पोटातून १२ किलो वजनाचे प्लास्टिक काढण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. सचिन शेळके यांनी शस्त्रक्रिया केली. यावेळी गायीच्या पोटात प्लास्टिकचे बॉल आढळून आले. संपत टिळे यांची गाय आठ दिवसापासून आजारी होती. तिला पोट फुगीचा त्रास होता. डॉ. शेळके म्हणाले,'नागरिक प्लास्टिकच्या पिशवीत शिळे अन्न भरून फेकतात तसेच प्लास्टिकच्या पिशव्या उघड्यावर फेकून प्रदूषण करतात. हे प्लास्टिक जनावरे खातात. प्लास्टिक पचत नाही त्यामुळे ते पोटात साठून राहते. प्लास्टिक खाल्यामुळे जनावरांना अपचनाचा त्रास सुरू होतो. तसेच पोटफुगीचाही त्रास होतो. त्यामुळे कालांतराने ते हळूहळू चारा कमी करतात व अशक्त बनतात. तसेच यामुळे त्यांचे दूधही कमी होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा जाळीची दुर्दशा

$
0
0

सोमेश्वर

सुरक्षा जाळीची दुर्दशा

सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा जाळीची सध्या अशी अवस्था अशी झाली आहे. त्यामुळे सुरक्षा कशी राहणार? धोकादायकपणे सेल्फी घेण्याचे प्रकार नित्याचेच आहेत. त्यातून एखादी दुर्घटनादेखील घडू शकते. याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी.

-हेमंत साळी

शहर परिसर

ग्राहकसेवेचे काय?

खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याने स्टेट बँकेने ग्राहकांकडून दंड वसूल केला आहे. इतर सेवांचे दरही वाढविले आहेत. परंतु, या बँकेच्या अनेक शाखांमधील ग्राहकसेवेचा दर्जा मात्र दिवसेंदिवस खालावत चालला आहे. बँक प्रशासनाने या बाबीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.

-दिलीप सांगळे

शहर परिसर

वाहनचालकांत व्हावी जनजागृती

वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर वारंवार कारवाई केली जाते. मात्र, त्यावेळी वाहनांची कागदपत्रे नसतील, तर पंधरा दिवसांची मुदत असते. याबाबत माहिती नसल्याने अनेकांची लुबाडणूक झाली. आता डिजिटल कागदपत्रेही चालणार असल्याने त्याबाबत जनजागृती व्हावी.

-जय जोशी

कॉलेजरोड

डीपी बनली धोकादायक

कॉलेजरोडवरील पाटील लेन येथील डीपी अशी धोकादायक बनली आहे. या डीपीच्या वायर्स अशा गवतात उघड्या स्थितीत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची भीती वाढली आहे. संबंधित यंत्रणांनी याची त्वरित दखल घ्यावी.

-गोवर्धनदास अग्रवाल

बोरगड

दिशादर्शक फलक झाकोळला

बोरगड परिसरातील महावीरनगर आणि श्रीरामनगर भाग दर्शविणारा दिशादर्शक फलक सध्या गाजरगवताने झाकोळला गेला आहे. परिणामी या भागात नव्याने येणाऱ्या वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. महापालिकेने याप्रश्नी त्वरित लक्ष द्यालून गैरसोय दूर करावी.

-प्रवीण पुजारी

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड स्थानकावर रेल्वेची विशेष मोहीम

$
0
0

नाशिकरोड स्थानकावर रेल्वेची विशेष मोहीम

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मध्य रेल्वेच्या आदेशानुसार नाशिकरोडसह प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे प्रशासनाने ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत अनधिकृत विक्रेत्यांना पंधराशे रुपये, फुकट्या प्रवाशांकडून ७७७४ रुपये, तर अस्वच्छता करणाऱ्यांकडून चारशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिकरोडचे स्थानकप्रमुख आर. के. कुठार आणि मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा यांनी ही माहिती दिली. मुख्य तिकीट तपासनीस जितेंद्र जैन, आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील यांनी सहकाऱ्यांसह मोहिमेत भाग घेतला आहे. नाशिकरोडसह सर्व प्रमुख स्थानकांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. फुकटे प्रवासी आणि अनधिकृती विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. स्थानकातील अन्न पदार्थाच्या दर्जाची तपासणी केली जात आहे. स्थानक परिसरात बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या चालकांना दोनशे रुपये दंड केला जात आहे. तिकीट न काढता रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दंड केला जात आहे. सीसीटीव्ही व अन्य सुरक्षा यंत्रणांची तपासणीही विशेष पथकाने केली. स्थानकात भटके आणि भिकारी यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यावर आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने नियंत्रण आणले जात आहे. शिस्त न पाळणाऱ्या आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्या रिक्षाचलकांवर कारवाई केली जात आहे. स्थानकातील रेल्वे इंडिटेकर बोर्ड व अन्य साहित्याची तपासणी करून दुरुस्ती करण्यात येत आहे. वेटिंग रूम, कार्यालये, स्थानक व परिसरातील स्वच्छता नियमित कशी केली जाईल, याबाबतही कार्यवाही केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांची नाराजी भोवणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी करण्यात आलेल्या जाचक अटींमुळे गणेश मंडळांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यामुळे आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. याबाबत राज्य गुप्त वार्ता विभागाने गृह विभागास आपला अहवाल दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नियमांच्या अतिरेकामुळे यंदा गणेशभक्त पुरते भांबावले आहेत. महापालिका प्रशासनाने यंदा नियमांचा भडिमार करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणारच नाही, याची दक्षता घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात सर्वत्र डीजेचा सर्रास वापर होत होता. मिरवणुकीच्या वेळाही टाळल्या जात होत्या. शहर पोलिसांनी सर्व गणेश मंडळांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहित केले. डीजे वापरण्याबाबत पोलिसांनी केलेल्या आवाहनाचा चांगला परिणाम दिसून आला. नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याचा बडगादेखील उगारला. यंदा यात आणखी सुधारणा अपेक्षित असताना महापालिकेने मात्र कायद्याची जंत्री पुढे करीत गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण टाकले आहे. शहर पोलिसदेखील याबाबत आपले म्हणणे मांडण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. गणेशोत्सव हा शहराचा असून, नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र, नियमांची अंमलबजावणी करताना सर्वसामान्यांना विश्वासात घेण्याचे काम यंत्रणांनी करायला हवे, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. गणेश मंडळांनी अर्ज केल्यानंतर महापालिकेच्या वतीने जागेची पाहणी करून मंडपाचा आकार ठरविला जाणार आहे. सहकार खात्याकडे नोंदणी असेल, तरच मंडपांना परवानगी मिळणार आहे. दुसरीकडे मंडळाच्या ठिकाणी होणाऱ्या जाहिरांतीवरदेखील कर वसूल केला जाणार असल्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अडचणी वाढण्याची चर्चा

महापालिकेच्या या भूमिकेचा सार्वजनिक गणेश मंडळावर थेट परिणाम होणार आहे. बऱ्याच मंडळांनी याविरुद्ध उघड नाराजी व्यक्त केली असून, त्याचा थेट परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होण्याचा धोका दिसून येत आहे. महापालिकेच्या भूमिकेमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी थेट चर्चा पोलिस वर्तुळात रंगली असून, त्यावर उघड भाष्य करण्यास कोणीही तयार नाही. राज्य गुप्त वार्ता विभागाने नुकताच आपला अहवाल गृह विभागाला सादर केल्याची सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षलच्या अटकेनंतरच घोटाळ्याची उकल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मिरजकर सराफ घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार हर्षल नाईकला अटक झाल्याखेरीज या गुन्ह्याच्या तपासाला चालना मिळणार नसल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या महेश मिरजकरच्या चौकशीत फारसे काहीही हाती लागले नसून, हर्षल नाईक केव्हा अटक होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या सर्वच संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर पुढील आठवड्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मिरजकर सराफच्या संचालकांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत शेकडो गुंतवणूकदारांकडून रोख आणि सोन्याची गुंतवणूक घेतली. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हर्षल नाईक असून, तो मिरजकरचा भाचा आहे. मूळचा कर्नाटकधील गुलबर्गा जिल्ह्यातील चिटगुप्पा येथील हर्षल काही वर्षांपूर्वी मिरजकरांना व्यवसायात मदत करण्यासाठी आला होता. हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच तो बेपत्ता झाला आहे. कर्नाटकमध्ये त्याने काही गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा कयास आहे. याबाबत बोलताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की हर्षल नाईकने कनार्टकातील मूळ गावी काही शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नाईकचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. हर्षलसह इतर फरार संशयितांना पकडण्यासाठी क्राइम ब्रँचच्या दोन्ही युनिटकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. संशयित आरोपी मिरजकरची कोठडी संपली असून, त्याच्या नावे फार काही मालमत्ता आढळून आलेली नाही, तसेच या घोटाळ्याचा कर्ताकरविता हर्षलच असल्याचे मिरजकरने सांगितले.

मिरजकरच्या खात्यात ठणठणाट

मिरजकरच्या बँक खात्यांमध्येही ठणठणाट असून, हर्षलच्या अटकेनंतरच गुंतवणूकदारांची मालमत्ता कोठे गेली, याचा शोध लागू शकतो. या घोटाळ्यात एकूण ११ कोटी रुपयांची रोकड आणि सुमारे साडेपाच कोटींचे १८ किलो सोने अडकल्याचे आजवरच्या तपासात निष्पन्न होते. नवीन गुंतवणूकदार समोर येतील तसा हा आकडा आणखी वाढू शकतो. संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून १६ किलो चांदी आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्ययावत तंत्रज्ञानाने कॅन्सरवर मात शक्य

$
0
0

डॉ. शैलेंद्र बोंदार्डे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतात स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे पहिल्या टप्प्यावरच निदान होणे सहज शक्य आहे. जेनेटिक तपासण्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या असून, जगभरात विविध रोगांवर होणाऱ्या संशोधनापैकी २५ टक्के संशोधन फक्त कर्करोगासंबंधी असते. केमोथेरपीत होणारा त्रास ८० टक्के कमी करण्यात यश मिळाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे कॅन्सरवर मात करून सर्वसामान्य जीवन जगणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. शैलेंद्र बोंदार्डे यांनी केले.

नाशिकमध्ये आयोजित दोन दिवसीय चौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेचे प्रास्ताविक करताना डॉ. बोंदार्डे बोलत होते. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरील उपचारांमधील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचे अदान प्रदान व्हावे, यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेला महाराष्ट्रातील विविध कॅन्सरतज्ज्ञ उपस्थित आहेत. असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मेडिकल आँकॉलॉजिस्टतर्फे शहरातील हॉटेल गेट वे येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात परिषदेचे औपचारिक उद्घाटन डॉ. पुर्वेश पारीख, डॉ. गोविंद बाबू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. चंद्रशेखर पेठे, अँमोचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. शनिवारी सकाळी स्तनाच्या कॅन्सरवर परिसंवाद, विविध प्रकारच्या हार्मोनल ब्रेस्ट कॅन्सरवर मार्गदर्शन, व्यवस्थापन, एएससीओ २०१८ मध्ये सादर झालेल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती, फुफ्फुसाचा कर्करोग, त्याचे व्यवस्थापन, उपचारांमधील क्रमवारी, प्रोस्टेट कॅन्सरमध्ये योग्य रुग्णावर योग्य वेळी उपचार, किडनी कॅन्सरमधील टीकेआय थेरपी अशा विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद पार पडला. स्तनाच्या कर्करोगासाठी स्क्रिनिंग, कर्करोगाचा धोका वेळीच ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान यावर परिषदेत चर्चा घेण्यात आली. यावेळी स्तनाच्या कर्करोगाच्या अवघड केसेसमध्ये शेवटच्या टप्प्यातील कर्करोगावर उपचार करताना रुग्ण जगण्याची शाश्वती आधीपेक्षा २० ते २५ टक्क्यांनी वाढली असून, यात अजून प्रगती कशी करता येईल यावरील तंत्रज्ञानाची माहिती परिषदेत देण्यात आली. त्याचप्रमाणे देल्या दशकात टप्प्याटप्प्याने अद्ययावत होत असलेली इम्युनो थेरपी आता फुफ्फुस आणि लिव्हरच्या कॅन्सरमध्ये उपयोगात आणली जात असून, रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती लक्षात घेऊन त्याच्या शरीरातील कॅन्सरग्रस्त पेशी शोधून त्यावर उपचार केले जात आहेत.

...

आज चर्चासत्र

आज (१२ ऑगस्ट) रोजी डोक्याचा आणि मानेचा कर्करोग, या कर्करोगावरील विविध केमोथेरपीवर मार्गदर्शन, चर्चासत्र तसेच गर्भाशयाचा कर्करोगातील केमोथेरपीचे महत्त्व, सर्व्हायकल कॅन्सरमधील अद्ययावत तंत्रज्ञानाचे आकलन, चर्चासत्र असे उपक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा संशयास्पद मृत्यू?

$
0
0

डोंगराळे भागात सापडला बिबट्याचा मृतदेह

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील डोंगराळे गावातील एका शेतात शनिवारी मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मालेगावी आणले होते. अन्नाच्या शोधात निघालेल्या बिबट्यास अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र पर्यावरण प्रेमी नागरिक व सामाजिक संघटनाकडून बिबट्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील डोंगराळे गावातील शेतकरी कारभारी शांताराम पगार यांच्या शेतात शुक्रवारी रात्री गावातील एक ग्रामस्थ शेळ्यांसाठी चारा आणायला गेले असता त्यांना बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ याची माहिती शेतकरी पगार यांना दिली. त्यानंतर वनविभागाला याची माहिती कळविण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी याचा पंचनामा करून मृत बिबट्यास शवविच्छेदानासाठी मालेगावी आणले.

गाळणे डोंगराळे परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे येथे नेहमीच बिबट्याचा वावर आढळून येत असतो. तालुक्यात बिबट्याचा हल्ला झाल्याच्या अनेक घटना देखील गेल्या काही महिन्यात समोर आल्या आहेत. मात्र बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान विभागीय वनअधिकारी कांबळे यांनी अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती दिली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे त्यांनी 'मटा'ला सांगितले.

बिबट्याचे अधिवास धोक्यात

अवैध वृक्षतोडीमुळे बिबट्याचे खाद्य असलेल्या प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे गाळणे वनपरिक्षेत्रातील बिबट्याचा अधिवास धोक्यात आला आहे. वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. डोंगराळे येथे बिबट्याचा मृत्यू संशास्यास्पद वाटतोय.--निखील पवार, पर्यावरणप्रेमी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images