आत्महत्या करणे सोपी बाब नक्कीच नाही. मात्र, असा निर्णय घेण्यापूर्वी एकदा मन मोकळं करणे आवश्यक आहे. कोठे तरी न्याय मिळेल, जगण्याची ऊर्मी सापडेल. धारणकरांच्या आत्महत्येने महापालिकेचे प्रश्न सुटले नाहीत. सिडकोत एका १४ वर्षांच्या मुलाने सहज मृत्यूला आपलेसे केले. वर्षागणिक आत्महत्येचा प्रश्न बिकट होतो आहे. त्याचा वेगळ्या अर्थाने विचार करणे आवश्यक झाले आहे.
अरविंद जाधव
arvind.jadhav@timesgroup.com
वाढते वजन धोकादायक आहे, हे समजण्याइतपत सर्वच स्थरातील नागरिकांची समज नक्कीच आहे. मात्र, वजन कमी करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम करण्याचा प्रश्न उद्भवल्यास नकारघंटा असते. वेळ नाही, जमत नाही, अशी अनेक कारणे पुढे येतात. आरोग्याची हेळसांड एखाद्या दिवस छोटी-मोठी व्याधी मागे लावण्यास पुरेशी ठरते. मग त्या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांकडे आणि तेथून व्यायामाकडे परतावे लागते. ज्याचे दुखते त्यालाच कळते, ही म्हण यामुळेच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. स्वत:चे आर्थिक, शारीरिक अथवा मानसिक नुकसान झाल्याखेरीज दुसरा मार्ग स्वीकारायचा नाही, ही बहुतांश नागरिकांची मानसिकता असते. शहरात अवघ्या सहा महिन्यांत ४० दुचाकीस्वारांचा मृत्यू फक्त हेल्मेटचा वापर न केल्यामुळे झाला, ही बाब वाहनचालकांचे डोळे उघडण्यासाठी पुरेशी होती. मात्र, आज त्याचा कोठेही गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. अपघातात मरणाऱ्या ४० दुचाकीस्वारांचा आणि इतरांचा थेट संबंध नसल्याचा तो परिणाम असू शकतो. असो. अपघातापेक्षाही आत्महत्येची समस्या सध्या समाजात भीषण रूप घेत आहे. अगदी १४ वर्षांच्या मुलापासून तरुण आणि संसाराची जबाबदारी खांद्यावर असलेल्या व्यक्ती सहज मृत्यूचा पर्याय स्वीकारतात, यापेक्षा वाईट ते काय असू शकते? आत्महत्या करणारे भित्र्या मनाचे असतात, असे म्हंटले जाते. दुर्दैवाने यात तथ्य नाही, असे म्हणावे लागेल. आत्महत्या करणे सोपे नाही आणि नव्हतेही! महापालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयातील घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील सहाय्यक अधीक्षक संजयदादा धारणकर (वय ४७) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मागील आठवड्यातील ही घटना सर्वांनाच चटका लावून गेली. शहराची पालक संस्था असलेल्या महापालिकेचा कारभार यामुळे चव्हाट्यावर आला. धारणकरांची दोनच ओळींची एक सुसाइड नोटदेखील सापडली होती. त्यात कामाच्या अतिताणामुळे सोडून जात असल्याचा उल्लेख होता. यानंतर महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासन यांच्यात उघड संघर्ष सुरू झाला. या प्रकरणी पोलिसांनी जाबजबाब नोंदवून घेतले. धारणकरांच्या कामाच्या ताणाचा आणि त्यांच्या आत्महत्येचा यात फारसा संबंध नसल्याचे आजवरच्या जबाबांमधून तरी स्पष्ट होते. त्यामुळे या चौकशीतून आणि होत असलेल्या आरोपांमधून फार काही समोर येईल, याची शाश्वती दिसत नाही. महापालिका प्रशासनानेही आपली बाजू मांडून हात वर केले आहे. आता प्रश्न असा उरतो, की धारणकरणांच्या आत्महत्येने काय साध्य झाले? महापालिकेचे कामकाज आजही सुरळीत सुरू आहे. कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. उलट आत्महत्येने प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिक गडद झाला, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मागील आठवड्यातच सिडकोत एका १४ वर्षांच्या मुलाने राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी ही शहरातील पहिलीच घटना होती, असेही नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये याच वयोगटातील मुलीने आईवडील घरात गळफास लावून घेतला होता. सातपूर परिसरातील ही घटना झाली होती. मुले-मुली, युवक, तरुण अशा सर्वच वयोगटातील व्यक्ती सहजतेने मृत्यूला कवटाळण्याच्या विचारापर्यंत पोहचतातच कशी, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. दुर्दैवाने अपघातांच्या घटनांप्रमाणे येथेही समाजाच्या निरपेक्षवादाची प्रचीती येते. आत्महत्या करणारी व्यक्ती वेगवेगळ्या कारणांमुळे डिप्रेशनमध्ये पोहोचतात.
प्रत्येकाची कारणमीमांसा वेगळी असू शकते. व्यसन, कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्थिती, शारीरिक अडचणी, सततचे प्रेशर अशी काही कॉमन कारणे पुढे येतात. या सर्वांत महत्त्वाचा ठरतो तो संवाद! निसर्गाने दिलेल्या या शक्तीचा वापर कमी झाला म्हणजे संवादच खुंटला, तर विचारांची चक्रे आपोआपाच थांबतात. कोणीही नाही. परिस्थिती बदलणार नाही, अशी भावना मनात घर करून राहिली, की जगण्यापेक्षा मरण सोपे वाटू लागते. अशा वेळी संबंधित व्यक्तीने घरातील सदस्यांसोबत, मित्रांबरोबर, शेजारी, शिक्षक, दूरचा नातेवाईक असा कोणाचा तरी हात पकडून आपली घुसमट व्यक्त करायला हवी. मिळेल कोठून तरी मदत. कोणीच पुढे येत नसतील तर पोलिसही आहेत. मागितल्याशिवाय मिळत नाही. बोलणाऱ्याची माती विकली जाते, ही शिकवण आपल्या पूर्वजांनी घालून दिली. मात्र, बदलत्या जीवनशैलीने अशा बोधकथांआडून भावी पिढी सक्षम करण्याच्या पद्धतीला केव्हाच गिळंकृत करून टाकले आहे. गेल्या वर्षी ब्लू व्हेल या गूढ अॅप गेमने जगभरातील लहान मुलांना शिकार केले होते. ब्लू व्हेल गेमच्या सडक्या विचारसरणीच्या डेव्हलपरच्या दमदाटीमुळे एकटी घरात बंद होऊन मुले शेवटी आत्महत्येचा मार्ग निवडत होती. काही महिन्यांच्या तपासानंतर त्या अॅप डेव्हलपरला अटक झाली अन् आत्महत्येचा तो खेळ संपला. भविष्यात आणखी एखादा प्रकार भावी पिढी बर्बाद करण्याची तयारी करीत असेल हे निश्चित!
मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी राज्यभरात आंदोलने छेडली जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न जैसे थे असताना काही तरुणांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी आत्महत्येचा मार्ग पत्कारला. एकापाठोपाठ काही तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धारणकर, तो अल्पवयीन मुलगा, आरक्षणासाठी जीव देणारे तरूण कोणत्या तरी समस्येशी चार हात करीत होते. त्यांच्याबरोबर इतर होते. मात्र, काहींनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. राज्यासह देशभरात शेतकरी आत्महत्या, महिलांच्या आत्महत्या सातत्याने होत असतात. मात्र, शेतकऱ्यांच्या अथवा महिलांच्या आत्महत्यांमुळे त्यांचे प्रश्न सुटतीलच असे नाही. जीवनात संघर्ष असेल तर लढाईला नक्कीच बळ मिळते. यात अपयश आल्यास आत्महत्या करण्यापूर्वी इतर पर्याय मात्र चाचपून पाहायला हवे. आपली पत्नी, मुले, आईवडील यांच्याशी बोलून मोकळे व्हायला हवे. त्यांच्याशी पटत नसेल तर शेजारी, नातेवाईक, मित्रांना गाठून अगदी रडूनही मोकळा होता आले तर तसा प्रयत्न करून पाहायला हवा. दोन मिनिटांच्या रडण्याने पराभूत होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तो निर्माण होतो जेव्हा जगण्याची सर्व हत्यारे म्यान केली जातात तेव्हा!