डॉ. राजेंद्र फडके यांचा दावा .. म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक 'बेटी बचाव बेटी पढाओ' उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे लोकांमध्ये जागृती झाली असून, स्त्री भ्रूणहत्येत घट होऊन मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही मुलींचा जन्मदर कमालीचा वाढला असून चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये तर तो एक हजारपेक्षाही अधिक असल्याचा दावा बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचे राष्ट्रीय राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केला आहे. भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी हितगूज साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाव बेटी पढाओ' (बीबीबीपी) या ड्रीम प्रोजेक्टच्या साडेतीन वर्षांच्या काळातील फलनिष्पत्तीची माहिती डॉ. फडके यांनी दिली. यावेळी प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, गिरीश पालवे व्यासपीठावर होते. सन २०१४ मध्ये मुलींचा जन्मदर सरासरी ९२९ इतका होता. काही राज्यांत तर हा दर प्रतिहजारी ८५० पेक्षाही कमी होता. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आदी राज्यातील १६१ जिल्ह्यांत मुलींच्या जन्मदराची परिस्थिती भयावह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर देशातील स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण रोखावे आणि समाजाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घातले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या विषयाला हात घालून २१ जानेवारी २०१५ ला 'बीबीबीपी' या उपक्रमाला चालना देऊन त्याच्या राष्ट्रीय संयोजकाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. सहा राष्ट्रीय पथकांच्या मदतीने या उपक्रमाची सुरुवात झाली. सर्व राज्ये, सर्व जिल्हे आणि अगदी मंडल स्तरावर याची रचना करण्याचे निश्चित झाल्यानंतर अथक प्रयत्नातून अनेक ठिकाणी ही रचना पूर्ण झाली, तर काही ठिकाणी ती प्रगतीपथावर आहे. स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, संत-महंत यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम जणू जनचळवळ बनली आणि हळूहळू त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले, असे डॉ. फडके यांनी नमूद केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट