म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा घालणाऱ्या दाम्पत्यास मध्यरात्रीच्या सुमारास गाठून तिघांनी लुटले. कोयत्याचा धाक दाखवत चोरट्यांनी दाम्पत्याकडील दागिने आणि रोकड असा ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिसऱ्या फेरीनिमित्त परिसरात बंदोबस्त वाढविण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येते आहे. श्रावण महिन्यातील दर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा घालण्यासाठी जातात. त्र्यंबकेश्वरमधून सुरू होणारी फेरी रात्रभरात पार पडते. याच फेरीसाठी फिर्यादी तानाजी काशीनाथ मुसळे (वय ३४, रा. शिवाजीनगर, कसारा, ता. शहापूर) आणि त्यांची पत्नी नंदिनी असे दोघे रविवारी दुपारी एका मित्राकडे दुचाकी लावून रिक्षाने त्र्यंबकेश्वर येथे पोहोचले. कुशावर्तात स्नान करून सायंकाळच्या सुमारास दोघे पेगलवाडी-पहिनेमार्गे निघाले होते. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरच्या दिशेने परतत असताना या दाम्पत्यास तिघा चोरट्यांनी सापगाव शिवारात गंगाद्वाराकडे जाणारा डांबरी रस्ता व सापगावकडे येणारा सिमेंटचा रस्ता या तीनफुलीच्या ठिकाणी अडविले. चोरट्यांनी मुसळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच एकाने कोयता दाखवून गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर मुसळे दाम्पत्याकडील २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, जोडवे, एक मोबाइल, दोन हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल काढून चोरट्यांनी धूम ठोकली. यावेळी आजूबाजूस एकही वस्ती नसल्याने घाबरलेले मुसळे दाम्पत्य चालतच त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. बंदोबस्त वाढविण्याची मागणी दर वर्षी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना असे प्रकार घडतात. श्रावणातील फेरीला भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. त्यामुळे श्रावण महिन्यात पोलिस बंदोबस्तात वाढ करून चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी फेरीसाठी सर्वाधिक संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने तिसऱ्या फेरीसाठी या परिसरात बंदोबस्त वाढविण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट