नीरज चोप्राचा 'गोल्डन थ्रो'
सुधासिंग, नीना, धरुणला रौप्यपदक
वृत्तसंस्था, जकार्ता
भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारचा दिवस अॅथलेटिक्ससाठी 'गोल्डन' ठरला. नीरज चोप्राने भाला फेकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. भाला फेकमधील भारताचे हे एशियाडमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्याचबरोबर सुधासिंगने महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये, लांब उडीत नीना वरकिलने आणि पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीने रौप्यपदकाची कमाई केली.
भाला फेकमध्ये नीरजने ८८.०६ मीटर फेक करून सुवर्णपदक निश्चित केले. चीनच्या लियू क्विहेनने (८२.२२ मी.) रौप्य, तर पाकिस्तानच्या अर्षद नदीमने (८०.७५ मी.) ब्राँझपदक मिळवले. या प्रकारात एकेकाळी पाकिस्तानचे वर्चस्व होते. भारताचा दुसरा खेळाडू शिवपालसिंग (७४.११ मी.) आठव्या स्थानावर राहिला. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८३.४६ मीटर फेक केली. दुसरा प्रयत्न फाउल ठरला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८८ मीटरचा टप्पा ओलांडला. चौथ्या प्रयत्नात ८३.२५, तर पाचव्या प्रयत्नात ८६.३६ मीटर कामगिरी नोंदवली. अखेरचा प्रयत्न फाउल ठरला. त्याचबरोबर नीरजने नवा राष्ट्रीय विक्रमही रचला. या वर्षीच्या दोहा डायमंड लीगमध्ये त्याने ८७.४३ मीटर कामगिरी नोंदवली होती. १९८२नंतर भाला फेकमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. २० वर्षीय हरियाणाच्या सोनपतमधील नीरजने या वर्षीच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले आहे. भुवनेश्वरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१६मध्ये नीरजने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदक मिळवले होते.
३ हजार मी. स्टिपलचेस
सुधासिंगने महिलांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेसमध्ये आपला ठसा उमटविला. तिने ९ मिनिटे ४०.०३ सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले. बहरिनच्या विंफ्रेड यावीने ९ मिनिटे ३६.५२ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक, तर व्हिएतनामच्या थि ओन्हा न्गुयेनने ९ मिनिटे ४३.८३ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक पटकावले. ३२ वर्षीय सुधासिंगने २०१०च्या एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. त्या एशियाडमध्ये प्रथमच या प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. सुधासिंगची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ९ मिनिटे २६.५५ अशी असून, मोसमातील सर्वोत्तम वेळ ९ मिनिटे ३९.५९ सेकंद अशी होती. जूनमध्ये झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत तिने ही कामगिरी नोंदवली होती.
४०० मीटर अडथळा
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. धरुणने ४८.९६ सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले. धरुणने मार्च महिन्यात फेडरेशन कपमध्ये ४९.४५ सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम रचला होता. 'एशियाड'मध्ये त्याने आपल्या या कामगिरीत सुधारणा केली. कतारच्या अब्देररहमान साम्बाने ४७.६६ सेकंद वेळ नोंदवून स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. २१ वर्षीय तमिळनाडूचा धरुण ३०० मीटरपर्यंत चौथ्या स्थानावर होता. शेवटच्या १०० मीटरमध्ये त्याने वेग वाढवून दोन स्पर्धकांना मागे टाकले आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारताचे या प्रकारातील २०१०मधील पहिलेच पदक ठरले. त्या वेळी जोसेफ अब्राहमने सुवर्णपदक मिळवले होते.
लांब उडी
महिलांच्या लांब उडीत नीना वरकिलने महिलांच्या लांब उडीत रौप्यपदक मिळवले. तिची चौथ्या प्रयत्नातील ६.५१ मीटर उडी सर्वोत्तम ठरली. व्हिएतनामच्या थि थू थाओ बुई ६.५५ मीटर कामगिरीसह सुवर्ण, तर चीनच्या शू शिओलिंगने ६.५० मीटर कामगिरीसह ब्राँझपदक मिळवले. नीनाने सहा प्रयत्नांत अनुक्रमे ६.४१, ६.४०, ६.५०, ६.५१, ६.४६, ६.५० मीटर कामगिरी नोंदवली. नयना जेम्सला (६.१४ मी.) अकरा स्पर्धकांमध्ये दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
'पदक आईला अर्पण'
२१ वर्षीय धरुण म्हणाला, 'आठ वर्षांचा असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आईने खूप कष्टाने वाढविले. आमच्यासाठी तिने अनेक सुखांचा त्याग केला. हे पदक तिला अर्पण करतो. तू एक शिक्षिका असून, अजूनही तिला महिन्याकाठी केवळ १४ हजार मानधन मिळते.'धरुण हा तमिळनाडूमधील तिरुपूरचा रहिवाशी आहे. या कामगिरीने आपल्याला नोकरी मिळेल आणि घराला आर्थिक हातभार लावता येईल, अशी आशाही धरुणने व्यक्त केली. शर्यतीबाबत तो म्हणाला, 'माझे प्रतिस्पर्धी कुठे आहेत, याचा विचार डोक्यात नव्हताच. मला फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे होते. राष्ट्रीय विक्रमापेक्षा चांगली कामगिरी करू शकलो, याचा आनंद आहे.'आशियाई स्पर्धेच्या सहा महिने आधी तो पोलंड आणि चेक प्रजासत्ताकमध्ये सराव करीत होता. त्याचा फायदा झाल्याचे धरुण म्हणाला.
'पदकाने प्रेरणा मिळेल'
उत्तर प्रदेशच्या अमेठी येथील सुधासिंग म्हणाली, 'इंचिऑन एशियाडमध्ये मी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मात्र, पदक मिळवण्यासाठी ती पुरेशी ठरली नव्हती. स्टीपलचेसमध्ये अनेक नवीन मुली येत आहेत. ही आनंददायी गोष्ट आहे. या प्रकारात पूर्वी असे चित्र दिसत नव्हते. आशा आहे माझ्या या पदकाने भारताच्या इतर युवा अॅथलिटना प्रेरणा मिळेल.'