आठ लाख झाडांची करणार लागवड म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र समृद्धी महामार्गादरम्यान काही ठिकाणी वृक्षतोड होत असून तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात नव्याने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रूतगती महामार्ग प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) त्याविषयी धोरण आखले असून प्रस्तावित महामार्गादरम्यान तब्बल आठ लाख झाडांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. यानुसार प्रति किलोमीटर १ हजार ३२६ झाडांची लागवड करण्यात येणार आहे. लखनऊ येथील राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्थेचे (एनबीआरआय) मार्गदर्शन यासाठी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड पर्यावरणाला धक्का पोहोचवणारी आहे. त्यामुळे यावर मार्ग काढत 'एमएसआरडीसी'ने वृक्षलागवडीचे धोरण आखले आहे. ७०१ पैकी ६०० किमी मार्गावर अशा प्रकारे सुमारे आठ लाख झाडांची लागवड केली जाणार आहे. समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांतून जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची माती, हवा, पाणी, पर्जन्य प्रमाण, हवामानाची स्थिती या सगळ्याचा अभ्यास करून महामार्गाच्या दुतर्फा नेमकी कोणती झाडे लावली जावीत, याचा अभ्यास राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था करणार आहे. संस्थेने केलेल्या शिफारशींनुसार रोपवाटिका विकसित केली जाणार असून त्यानंतर महामार्गाच्या दुतर्फा संस्थेने सुचवलेलीच झाडे लावली जातील, याची खबरदारी एमएसआरडीसी घेणार आहे. तसेच प्रस्तावित महामार्गादरम्यान इंटरचेंज, रेस्ट एरिया, वेसाइड अॅमेनिटीज अंतर्गत येणाऱ्या भूभागावरील पट्ट्यातही वृक्षांची लागवड केली जाणार आहे. समृद्धी महामार्गाची उभारणीबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळही ठाम असून महामार्गाच्या उभारणीदरम्यान अधिकाधिक वृक्षलागवड करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय रस्ते परिषदेच्या नियमांत महामार्गादरम्यान प्रति किलोमीटर अंतरावर ५८३ झाडे लावावीत, असे नमूद आहे. परंतु, आम्ही समृद्धी महामार्गाची उभारणी करताना त्यापेक्षा कितीतरी अधिक झाडांची लागवड केली जाईल. - राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट