पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये केंद्र व राज्य सरकारने केलेली कपात म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील साक्री येथे शनिवारी (दि. ६) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सरकारवर चौफेर टीका करताना ते म्हणाले की, या सरकारने मागील ४ वर्षांत केलेल्या भाववाढीच्या तुलनेत दोन दिवसांपूर्वी केलेली कपात अतिशय कमी आहे. स्वयंपाकाच्या गॅसमध्येही सरकारने जनतेची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आयोजित सभामध्ये ते म्हणाले की, सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत नाही. धुळ्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांवर ऑक्टोबरमध्येच दुष्काळ घोंगावत आहे. पण, सरकार अजून दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. दोन वर्षांपूर्वी विदर्भातल्या ११ हजार गावात दुष्काळ असतानाही या सरकारने त्याची घोषणा केली नाही. शेवटी काँग्रेसचे कार्यकर्ते नागपूर खंडपीठात गेले. त्यामुळे न्यायालयाने सरकारची कानउघाडणी करून दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश दिले. यंदा तरी सरकार स्वतःहून दुष्काळ जाहीर करणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून विखे पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी केली.
या सरकारची कर्जमाफी योजना फसवी ठरली असून, धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी थेट मंत्रालयात जाऊन विष प्राशन केले, असे विखेपाटील म्हणाले. या सरकारने वारंवार जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता लोकांनी हे सरकार खाली खेचण्याचा निर्धार केल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.
‘भाजप सरकारला कर्करोग’
नंदुबार येथे काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी नंदुरबार येथे संबोधित करताना सांगितले भाजपला कर्करोग झाला आहे आणि तो वाढत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपयशी झाले आहेत. शेतकरी आणि महिला सुरक्षित राहिले नाहीत. नोटंबंदीमुळे राज्याचा विकास घटला आहे. नंदुरबार हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे. त्यामुळे काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस आता येतील. परिवर्तन घडल्याशिवाय आता राहणार नाही असे खासदार चव्हाण म्हणाले. यानंतर काँग्रेसची संघर्षयात्रा धुळे शहरात पोहोचली. शहरातील हिरे भवनात शनिवारी (दि. ६) रात्री उशिरा काँग्रेसची सभा घेण्यात आली.
यंदाही महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. मात्र, महसूलमंत्री दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करतील आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर करतील, तोपर्यंत अजून शेतकरी आत्महत्या करून मरतील. त्यामुळे हे सरकार फक्त घोषणांचा पाऊस करीत आहे. आता लोकांचा विश्वास राहिलेला नसून, खान्देश व मराठवाड्याला शासनाने लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी शिरपूर येथे जाहीर सभेत बोलताना केली. शिरपूर येथील जनसंघर्ष यात्रेस व जाहीर सभेपूर्वी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्यावतीने जन संघर्ष यात्रेची सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान, खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री माणिकराव गावित, रत्नाकर महाजन, आमदार अमरिश पटेल, सचिन सावंत आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट