म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर पहाटेच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनासाठी वडाळागावाततून निघालेल्या सात ते आठ अल्पवयीन मुलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात, ११ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल नामदेव पवार (११, रा. वडाळागाव) असे या अपघतात मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. कृष्णा दत्तू खोडे (९), ऋषिकेश सुनील वाघ (१०), रोहन बापू मोरे (१२), साहिल खंडू कडाळे (१४), अश्विन दत्तू खोडे (१४), राहुल बापू मोरे (१५), तुषार गोविंद खाडम (१५, सर्व रा. वडाळागाव) अशी इतर जखमी मुलांची नावे आहेत. नवरात्रोत्सवात ग्रामदैवत कालिकेच्या दर्शनासाठी शहरवासीय मोठी गर्दी करतात. पहाटेच्या सुमारास दर्शनास अनेकजण पसंती देतात. रविवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वडाळा गावातील ही मुले कालिकेच्या दर्शनाला पायी निघाली होती. साईनाथनगर येथील चौफुलीवर या मुलांना एका भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. यात विशाल नामदेव पवार हा मुलगा जागीच ठार झाला, तर इतर मुले जखमी झाली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लागलीच या जखमींना पोलिस व्हॅनमधूनच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज करंजे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वडाळागावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षितता महत्त्वाची पहाटेच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी घराबाहेर पडतात. यात महिलांची संख्याही मोठी असते. बहुतांश रस्ते निर्मनुष्य असल्याने वाहनचालक भरधाव वेगात वाहने चालवितात. अनेकदा अंधाराचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंगसारखे प्रकार घडू शकतात. नागरिकांनी सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन या निमित्ताने पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट