म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लेखकाच्या लिखाणावर मर्यादा येत आहेत, त्याने काय लिहावे आणि काय नाही याचा निर्णय समाजातील काही मूठभर लोक घेऊ पाहत आहे. त्यामुळे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीच आहे. उद्या तर लेखकाने काहीच लिहू नये, असे म्हणायलाही हे लोक मागेपुढे पहाणार नाहीत. समाजाची वाटचाल झुंडशाहीकडे होत आहे. पुन्हा एकदा आपण टोळीजीवनाकडे चाललो असून, टोळीयुद्ध होण्याचा काळ जवळ आला आहे, असे प्रतिपादन नाटककार व चित्रपट लेखक संजय पवार यांनी केले. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सुर्वे साहित्य पुरस्कार व कैलास पगारे विशेष काव्य पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. पवार पुढे म्हणाले की, दिनकर मनवर यांच्या कवितेवर जे वादंग उठले ते चुकीचे आहे. आता व्यक्त होताना विचार करावा लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निखळ काही मिळणारच नाही. हा एका लेखकाचा प्रश्न नाही. तरीही इतकी शांतता का आहे, किमान चर्चा तर करा. आपण त्या गावचेच नाही असे का करीत आहात असा सवाल पवार यांनी विचारला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, यशोधरा पगारे आणि माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांची उपस्थिती होती. कवी इरफान शेख, कादंबरीकार मेघा पाटील, कथाकार मिलिंद जाधव यांसा सुर्वे साहित्य तर फेलिक्स डिसोझा यांना कैलास पगारे विशेष काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन राकेश वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. मनीषा जगताप यांनी केले. कुसुमाग्रज-सुर्वेंवर खटला भरणार का? 'स्त्री देहाचे वर्णन केवळ दिनकर मनवर यांनीच केलेले नाही तर कुसुमाग्रज, बोरकर, नारायण सुर्वे यांनीही केले आहे मग महिला आयोग त्यांच्यावर खटले भरणार का? त्यांनाही जाब विचारणार का? त्यासाठी त्यांना खाली बोलावणार का?' असे सवाल संजय पवार यांनी केले. कोणत्या लेखकाने काय लिहावे याचा निवाडा महिला आयोग कसा करणार, मनवरांना स्पष्टीकरणासाठी २० तारखेला मुंबईला बोलावले आहे, हा अन्याय आहे असेही पवार म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट