Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

समाजाची वाटचाल झुंडशाहीकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लेखकाच्या लिखाणावर मर्यादा येत आहेत, त्याने काय लिहावे आणि काय नाही याचा निर्णय समाजातील काही मूठभर लोक घेऊ पाहत आहे. त्यामुळे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीच आहे. उद्या तर लेखकाने काहीच लिहू नये, असे म्हणायलाही हे लोक मागेपुढे पहाणार नाहीत. समाजाची वाटचाल झुंडशाहीकडे होत आहे. पुन्हा एकदा आपण टोळीजीवनाकडे चाललो असून, टोळीयुद्ध होण्याचा काळ जवळ आला आहे, असे प्रतिपादन नाटककार व चित्रपट लेखक संजय पवार यांनी केले.

कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सुर्वे साहित्य पुरस्कार व कैलास पगारे विशेष काव्य पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. पवार पुढे म्हणाले की, दिनकर मनवर यांच्या कवितेवर जे वादंग उठले ते चुकीचे आहे. आता व्यक्त होताना विचार करावा लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निखळ काही मिळणारच नाही. हा एका लेखकाचा प्रश्न नाही. तरीही इतकी शांतता का आहे, किमान चर्चा तर करा. आपण त्या गावचेच नाही असे का करीत आहात असा सवाल पवार यांनी विचारला.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, यशोधरा पगारे आणि माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांची उपस्थिती होती. कवी इरफान शेख, कादंबरीकार मेघा पाटील, कथाकार मिलिंद जाधव यांसा सुर्वे साहित्य तर फेलिक्स डिसोझा यांना कैलास पगारे विशेष काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन राकेश वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. मनीषा जगताप यांनी केले.

कुसुमाग्रज-सुर्वेंवर खटला भरणार का?

'स्त्री देहाचे वर्णन केवळ दिनकर मनवर यांनीच केलेले नाही तर कुसुमाग्रज, बोरकर, नारायण सुर्वे यांनीही केले आहे मग महिला आयोग त्यांच्यावर खटले भरणार का? त्यांनाही जाब विचारणार का? त्यासाठी त्यांना खाली बोलावणार का?' असे सवाल संजय पवार यांनी केले. कोणत्या लेखकाने काय लिहावे याचा निवाडा महिला आयोग कसा करणार, मनवरांना स्पष्टीकरणासाठी २० तारखेला मुंबईला बोलावले आहे, हा अन्याय आहे असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कबड्डी स्पर्धेत क्रीडाप्रबोधीनीला दुहेरी मुकुट

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

६६ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला नाशिक जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नाशिकच्या क्रीडाप्रबोधीनीने पुरुष व महिला गटाचे अजिंक्यपद पटकावून दुहेरी मुकुट प्राप्त केला.

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, आनंदेश्वर व्यायामशाळा पंचक, श्रीगणेश एकता कला व क्रीडा मंडळ नाशिकरोड, सर्वज्ञ सोशल फाउंडेशन, छत्रपती चौक जेलरोड व कै पंडित बोराडे कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, बोराडे फाउंडेशन यांच्या वतीने १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान स्वामी विवेकानंद म. न. पा शाळा क्र. १४ व ३४ च्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत पुरुषांच्या ५२ तर महिलांच्या १४ संघांनी सहभाग घेतला. महिलांच्या प्रथम उपांत्यफेरीच्या सामन्यात क्रीडाप्रबोधिनी नाशिकने शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगावचा पराभव केला. तर रचना स्पोर्ट्स क्लब नाशिकने समाजश्री प्रशांतदादा हिरे क्लबचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात नाशिक ग्रामीण पोलीस संघाने ब्रह्मा स्पोर्ट्स आडगावचा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात क्रीडाप्रभोधिनी नाशिकने एन. टी. पी.एस. स्पोर्ट्स क्लब एकलहरेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

महिलांच्या अंतीम फेरीच्या सामन्यात गटविजेत्या क्रीडाप्रबोधिनी नाशिकने सुनंदा पवार, मालती गांगुर्डे, ज्योती पवार,चंदा बर्डे यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर रचना स्पोर्ट्स क्लब नाशिकचा ३० विरुद्ध १२ असा दणदणीत १८ गुणांनी पराभव करून सलग तिसऱ्या वर्षी या गटाचे अजिंक्यपद पटकावले. पुरुषांच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतीमफेरीच्या सामन्यात राकेश खैरनार, प्रणव अहिरे, गुरुदत्त शिंदे, सौरभ पाटील, प्रसाद टिळे, कुंदन सोनवणे, राजू मांढरे, अन्सार शेख, प्रतिक शिंदे यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर नाशिक ग्रामीण पोलीस संघाचा ३६ विरुद्ध २८ असा ८ गुणांने पराभव करून या गटाचे अजिंक्यपद प्राप्त केले. विजयी संघांना प्रशांत भाबड एन.आय.एस. प्रशिक्षिका भारती जगताप, शरद पाटील, विलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य कर्मचारी आक्रमक

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्यसेवक कौतिक बाबूराव आहिरे यांच्या आत्महत्येची नि:पक्षपातीपणे चौकशी करून या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेने केली आहे. विविध मागण्यांसाठी संघटनेने जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलक आक्रमक झाल्याने जिल्हा आरोग्याधिकारी विजय डेकाटे यांना माफी मागावी लागली.

आरोग्यसेवक कौतिक आहिरे यांनी आत्महत्या केल्याने प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर शोकसभा झाली. या शोकसभेला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आरोग्यसेवक आहिरे यांच्या मुलीही उपस्थित होत्या. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, रिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावीत, तीन कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक पद्धतीने केलेली निलंबनाची कारवाई रद्द करावी, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जॉब चार्ट निश्चित करण्यात यावा, आहिरे यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्त्वावर तत्काळ सेवेत रुजू करून घ्यावे, कुटुंबकल्याण कामकाजाची सक्ती थांबवावी, अन्य विभागांची कामे आरोग्य कर्मचाऱ्यांवर लादू नयेत आदी मागण्या करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागावी, या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले. त्यामुळे डेकाटे यांना आंदोलकांसमोर येऊन माफी मागावी लागली. आंदोलनात विलास पगार, विजय सोपे, सुभाष कंकरेज, अशोक पवार आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वजित लोणारीचीराज्य कुस्तीसाठी निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शहरातील 'डी पॉल' इंग्लिश मेडिअम स्कूलचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी तथा येथील कै. धोंडीराम वस्ताद तालमीचा उदयोनमुख शाळकरी युवा मल्ल विश्वजित प्रविण लोणारी याने नंदूरबार येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रेक्षणीय कुस्त्या करीत बाजी मारली. १४ वर्षांखालील मुलांच्या ७५ किलो वजन गटातील 'फ्रीस्टाईल' विभागातील अंतिम कुस्तीत सुवर्णयश संपादन करणाऱ्या विश्वजितची वर्धा येथे होणाऱ्या राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नंदूरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात दोन दिवस चाललेली विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा स्पर्धेतील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यातील शाळकरी मुले व मुलींच्या मोठ्या सहभागाने लक्ष वेधून गेली. नाशिक जिल्हा संघाच्या येवला येथील विश्वजित लोणारी याने अंतिम फेरीच्या प्रेक्षणीय कुस्तीत चपळाई, आक्रमकता व डावांच्या जोरावर आपल्या प्रतिस्पर्ध्यास अस्मान दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. विश्वजित याचा मोठा भाऊ व 'डी पॉल' शाळेचाच विद्यार्थी इंद्रजित लोणारी याने १४ वर्षांखालील मुलांच्या ६८ किलो वजन गटात अंतिम फेरीपर्यंत धडक मारत आपल्या वजनगटात उपविजेतेपद पटकावले. विश्वजित लोणारी यास धोंडीराम वस्ताद तालीम संघाचे अध्यक्ष तथा 'उपमहाराष्ट्र केसरी' वस्ताद राजेंद्र लोणारी, महाराष्ट्र चॅम्पियन विजय लोणारी, रामेश्वर भांबारे, दीपक लोणारी, प्रवीण लोणारी यांच्यासह 'डी पॉल' शाळेचे प्राचार्य जोमी जोसफ यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रद्धा, मनीषाचे नेमबाजीत यश

$
0
0

नाशिक : मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात श्रद्धा नालमवरने रौप्य पदक तर १० मीटर एअर पिस्तूल गटात मनीषा राठोडने कांस्य पदक पटकावले. वरळी शुटिंग रेंजवर ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्य नेमबाजी स्पर्धा झाल्या. या दोघी भीष्मराज बाम मेमोरियल शुटिंग रेंज वर मोनाली गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न पेटणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाच्या अवकृपेमुळे पाणीप्रश्नाची झळ जाणवू लागली असून, नाशिक-अहमदनगर व मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागते. यंदा या दोन्ही जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये पावसाळ्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. दुष्काळाच्या दाहकतेचा अनुभव जिल्हावासी घेत असताना मराठवाडावासी पाण्याची मागणी करू लागल्याने पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धरणांमधील उपलब्ध पाण्याची स्थिती, जायकवाडीची पाण्याची मागणी याबाबतच्या चर्चेसाठी सोमवारी (दि. १५) औरंगाबादमध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणी उपलब्धतेची माहिती दिली. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नसल्याची माहिती मिळाली आहे. जायकवाडी धरणामध्ये सध्या ५६ टक्के पाणीसाठा असताना नगर-नाशिकमधील धरणातून पाणी सोडण्याची गरज आहे का, यावर अभ्यास करून त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

...

नगरकर एकवटले

या बैठकीवेळी नगरवासीयांनी अस्वस्थता प्रकर्षाने व्यक्त केली. जायकवाडीला पाणी देण्यास विरोध दर्शविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, साखर कारखान्यांचे पदाधिकारी, शेतकरी संघटनांचे नेते असे शंभरावर लोक उपस्थित होते. पाणीप्रश्नी नगरवासीयांनी पुढाकार घेतला असून, विविध राजकीय पक्षांमधील पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यासही सुरुवात झाली आहे.

...

नाशिककर उदासीन

निवेदनबाजीचे मोहोळ उठविण्यात तरबेज नाशिकमधील लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र या पाणीप्रश्नाच्या बैठकीच्या ठिकाणी जाऊन विरोध दर्शविण्याबाबत कमालीची उदासीनता दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, आज (दि. १६) भाजप पदाधिकारी बैठक घेऊन गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास विरोध दर्शविणार आहेत. गेल्या वेळेस पाणी सोडण्याचे समर्थन करणारे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोध करणार आहेत.

..

जायकवाडीत पाणी सोडणार

औरंगाबाद : समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून सहा ते सात टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट असल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या तीन दिवसांत नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येईल, असे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांनी सांगितले.

- सविस्तर वृत्त...?

....

आकडेवारीत तफावत

- जायकवाडीसाठी साडेसहा टीएमसी पाण्याची मराठवाड्याकडून मागणी

- नाशिक आणि नगरमधील अधिकाऱ्यांनी फारतर चार टीएमसी पाणी देता येऊ शकेल, अशी बाजू मांडल्याचे समजते.

- दोन्ही विभागांकडून सादर झालेल्या आकडेवारीत तफावत असल्याने या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अष्टमी-नवमीचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शारदीय नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात आला असून, आज, बुधवारी (दि. १७) अष्टमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी होमहवनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, आजच उपवास करावेत, असे पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे.

नवरात्रीमध्ये देशभरात प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा केली जाते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा दिसून येते. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित केला जातो. आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रतिपदा आणि द्वितीया एकाच दिवशी आल्याने नवरात्र आठ दिवसांचे होते. त्यामुळे अष्टमी व नवमी केव्हा साजरी करायची याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. मंगळवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी अष्टमीस प्रारंभ झाला असून, ती आज, बुधवारी दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राहणार आहे. आजच दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी नवमीला सुरुवात होणार असून, ती १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी संपणार आहे. याच दिवशी ३ वाजून २८ मिनिटांनी दसऱ्यास सुरुवात होणार आहे. शारदीय नवरात्रोत्सव याअगोदर १९६७, २०११, २०१२, या वर्षांमध्ये नवरात्र आठ दिवसांचे होते. २००० व २०१६ मध्ये ते दहा दिवसांचे होते.

--

आज धरावेत उपवास

अनेक कुटुंबांत नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. काही जणाकडून फक्त अष्टमीचा उपवास केला जातो. ज्यांना अष्टमीचा उपवास करायचा असेल अशांनी तो आज, बुधवारी करावा आणि १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दसऱ्याच्या दिवशी सोडावा, असे पंचांगकर्त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, यापूर्वीही असा तिथीचा क्षय झाल्याचे दिसून आले आहे. वासंतिक नवरात्र सन २००० (अष्टमी क्षय), २०१५ (तृतीया क्षय), २०१६ (तृतीया क्षय), २०१७ (प्रतिपदा क्षय) या वर्षी आठ दिवसांचे होते. २०१८ (नवमी क्षय), २०२५ (तृतीया क्षय), २०२६ (प्रतिपदा क्षय) या वर्षीही ते आठ दिवसांचे असेल. २०२९ (द्वितीयावृद्धी) या वर्षी ते दहा दिवसांचे असेल.

--

यंदा नवरात्रीत एकाच दिवशी दोन तिथी आल्यामुळे लोकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. मात्र, अष्टमी आज, बुधवारी दुपारपर्यंत राहणार असून, नवमी गुरुवारी दुपारी संपणार आहे. प्रत्येकाने त्या अनुषंगाने कुलाचार करावा.

-उल्हास शुक्ल, पंचांग अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेसह वृद्धाचे सव्वा लाख लंपास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कपड्यांवर डाग पडल्याचे, तसेच कारखाली पैसे पडल्याचा बनाव रचत चोरट्यांनी एका वृद्धासह पुणे येथील महिलेचे पैसे लंपास केले. चोरट्यांनी तब्बल एक लाख ३० हजार रुपये लंपास केले आहेत. पंचवटीतील ही दुसरी घटना असून, काही दिवसांपूर्वी पेठ फाटा भागात याच पद्धतीने रोकड लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी पंचवटी आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

नारायण कृष्णा वैद्य (वय ७८, रा. शिवशाही अपार्ट., भारतनगर, आडगाव शिवार) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वैद्य आडगाव नाका येथील देना बँकेत पैसे काढण्यासाठी सोमवारी (दि. १५) आले होते. दुपारी बाराच्या सुमारास एक लाखाची रक्कम काढून ते घरी जाण्यासाठी निमाणी बसस्थानकाकडे पायी जात असताना ही घटना घडली. मागून आलेल्या तरुणाने त्यांना कपड्यांवर पाठीमागून कसले तरी डाग पडल्याचे सांगत रकमेवर डल्ला मारला. रस्त्यातील एका झाडाजवळ वैद्य आपल्याजवळील बाटलीतील पाण्याने डाग पुसण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्याने झाडाच्या बुंध्याजवळ ठेवलेली एक लाखाच्या रकमेची पिशवी घेवून पोबारा केला. सहाय्यक निरीक्षक इंगोले तपास करीत आहेत.

कारमधून रोकड लंपास

पैसे पडल्याचे सांगून चोरट्याने कारमधील महिलेची पर्स लंपास केल्याची घटना वर्दळीच्या महात्मा गांधी रोडवर घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील मानसी सागर मोरे (हल्ली रा. संजीवनी हॉस्पिटल) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. मानसी मोरे सोमवारी दुपारी एमजी रोड परिसरात आल्या होत्या. नहार आइस्क्रीमसमोर त्या आपल्या कारमध्ये (एमएच १५/ईपी ०९५७) बसत असताना एकाने त्यांना गाठले. या व्यक्तीने कारखाली पैसे पडल्याचे सांगितल्याने मोरे पैसे पाहण्यासाठी कारमधून उतरल्या. हीच संधी साधत चोरट्याने कारच्याविरुद्ध दिशेचा दरवाजा उघडून पर्स लंपास केली. पर्समध्ये ३० हजारांची रोकड, मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल होता. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा गाइड- सोना कितना ‘सोना’ है?

$
0
0

मटा गाइड

सोना कितना 'सोना' है?

भारत हा जगातील सर्वाधिक सोने वापरणारा देश आहे. आपल्या संस्कृतीत सोन्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे त्याची सांगड अनेक सण, उत्सवांशी घातलेली आढळते. हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांवर सोने खरेदी शुभ मानली गेली आहे. त्यात विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी सोनेखरेदीस प्राधान्य दिले जाते. मात्र, खरे सोने कसे ओळखायचे, ते खरेदी करताना काय काळजी घ्यायची याची माहिती नसते. हल्ली बहुतांश सराफी पेढ्यांनी कामकाजात पारदर्शकता आणली असली तरी शुद्ध सोने कसे ओळखावे, याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. खालील प्रकारांनी तुम्ही शुद्ध सोने ओळखू शकता….

१. बीआयएस हॉलमार्क

सोने खरेदी करताना त्यावर बीआयएस हॉलमार्कचा शिक्का पहावा. यातून सोन्याची शुद्धता प्रमाणित केली जाते. सध्या प्रत्येक सराफाकडे हॉलमार्किंग केलेलेच दागिने असतात. सामान्यपणे २४ कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत. कारण शुद्ध सोने खूपच मऊ असते. दागिन्यांसाठी २२ कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी शुद्ध सोन्याचा वापर केला जातो. भारतीय हॉलमार्किंग योजनेनुसार दागिने प्रमाणित केले जातात. २२ कॅरेट सोन्यावर ९१६, २१ कॅरेट सोन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्यावर ७५० असा हॉलमार्किंगचा शिक्का असतो. त्यावरून आपल्या दागिन्याची शुद्धता प्रत्यक्ष लावलेल्या भावाशी पडताळून पहावी.

२. दंत चाचणी

ही सर्वात सोपी आणि कोणालाही अगदी सहज करता येण्यासारखी चाचणी आहे. शुद्ध सोने दाताखाली दाबले तर मऊ असल्याने त्यावर दाताचे निशाण पडते. सोन्यात इतर धातू मिसळलेले असतील, तर त्यावर दाताची खूण पडत नाही. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळविल्यानंतर खेळाडू ते दाताखाली चावण्याची प्रथा आहे. कदाचित, त्यामागे ते मेडल शुद्ध सोन्याचे आहे की नाही, हे तपासण्याचा प्रकार असावा.

३. जलचाचणी

सोने हा हलका धातू असला तरी तो पाण्यात पूर्णपणे बुडतो. सोन्याचा दागिना बादलीभर पाण्यात टाकून पहा. जर पाण्याच्या धारेबरोबर तो काही वेळ तरंगला तर त्यात भेसळीची शक्यता असते. सोने कितीही कमी प्रमाणात म्हणजे लहान आकाराचे असले तरी ते पाण्यात बुडतेच.

४. चुंबक चाचणी

ही अतिशय सोपी आणि सहज करण्यासारखी चाचणी आहे. एखादे शक्तिशाली चुंबक दागिन्याजवळ धरावे. दागिना थोडाजरी त्याकडे आकर्षित झाला, तरी त्यात भेसळ आहे, असे समजावे. शुद्ध सोने चुंबकाकडे आकर्षित होत नाही.

५. आम्ल चाचणी

ही चाचणी घरी करणे धोक्याचे ठरू शकते. मात्र, यातून सोन्याची शुद्धता कळते. एका लहानशा स्टीलच्या वाटीत सोने ठेवावे. त्यावर नायट्रिक अॅसिडचा एक थेंब टाकावा. त्यावर हिरवट रंग आला तर तो इतर धातू असून त्यावर पॉलिश केलेली आहे, असे समजावे. पिवळट रंग आला तर ते सोन्याचे पाणी दिलेले पितळ आहे, असे समजावे. पांढरा रंग आला तर शुद्ध चांदीवर सोन्याचा मुलामा दिलेला आहे, असे समजावे आणि अॅसिड टाकून काहीच फरक पडला नसेल तर ते सोने शुद्ध आहे, असे समजावे.

कॅरेटनुसार शुद्ध सोन्याची टक्केवारी

२४ कॅरेट- ९९.९

२३ कॅरेट - ९५.८

२२ कॅरेट- ९१.६

२१ कॅरेट- ८७.५

१८ कॅरेट- ७५.०

१७ कॅरेट- ७०.८

१४ कॅरेट- ५८.५

९ कॅरेट- ३७.५

Carat नव्हे Karat

सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. मात्र, ते अनेकदा Carat असे लिहिले जाते. Carat हे हिरे, माणकांचे वजन मोजण्याचे परिमाण आहे. एक carat=२०० मिलीग्रॅम. सोन्याची शुद्धता Karat मध्ये मोजली जाते. एक कॅरेट म्हणजे चोवीसावा भाग. एखादा दागिना तयार करताना त्यात १८ कॅरेट सोने आणि ४ कॅरेट इतर धातू मिसळला असेल तर तो दागिना १८ कॅरेटचाच ठरतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्या शाळेचा संघ खेळणार राज्यस्तरावर

$
0
0

नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय खो-खो स्पर्धेत (१४ वर्षांखालील) नाशिकच्या शासकीय कन्या शाळेचा संघ अजिंक्य ठरला. १५ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा पार पडली. उपउपांत्य फेरीचा पहिला सामना कन्या शाळा विरुद्ध जळगाव या दोन संघांज झाला. कन्या शाळेन हा सामना १ डाव १० गुणांनी सहज जिंकला. उपांत्य फेरीच्या सामन्यात नाशिकच्या संघाने धुळे संघाचा १ डाव १ गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. तेथे खिर्डी येथील अनुदानित आश्रम शाकेच्या संघाला १ डाव ५ गुणांनी पराभूत केले. निशा बैजल, मनीषा पेडर, सोनाली पवार, वृषाली भोये, दीपिका बोरसे, सोनाली हडळ, दीदी ठाकरे यांनी चांगला खेळ केला. नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान शासकीय कन्याशाळेला प्रथमच मिळाला आहे. १४ वर्षाखालील शालेय खो-खो स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या शासकीय कन्या शाळेच्या संघाने थेट राज्यस्तरावर सहभागी होण्याचा पराक्रम केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीवायके’ला विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षा आतील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत बीवायके कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने अनेक प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत एकूण २० महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात केटीएचएम महाविद्यालयास पराभूत करत बीवायके संघाकडून कर्णधार आदित्य डावरे, यश जाजू, तनुज खांडेकर, मोहित नेगी, ओम गायखे आदी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. नंदूरबार येथे होणार असलेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत हा संघ खेळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकी स्पर्धेत केटीएचएम विजयी

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. एन. केला हायस्कूल (नाशिकरोड) येथे झालेल्या शालेय १९ वर्षाआतील मुलांच्या विभागीय हॉकी स्पर्धेत केटीएचएम कॉलेजच्या संघाने विजय मिळविला. या संघाची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. केटीएचएमच्या संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरीत मालेगाव मनपा संघावर ६-५ अशा फरकाने विजय मिळविला. अंतिम फेरीत नाशिक ग्रामीण संघाचा २-० फरकाने पराभव करून विजेतेपद मिळविले. गोलकीपर कुशल सिनकर, अभिराज मोरे, पियूष मोरे, तेजस मगर, क्रिष्णा मोरे, सुयश भुसारे, शुभम शिंदे, मनोज महाले, संकेत कटाळे, प्रतिक मोरे, आदित्य शिंदे, अमीरहुमजा शेख यांनी चांगला खेळ केला. विजयी संघाला प्रा. डी. एम. आहेर, प्रा. के. पी. लवांड, प्रा. बी. बी. शिंदे, प्रा. सुनिल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षात गुंजणार गंगा आरतीचे सूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हरिद्वारप्रमाणेच आता नाशिकमध्येही गंगा आरतीचे सूर गुंजणार आहेत. या आरतीसाठी प्रामुख्याने अडथळा ठरणारा निधीचा प्रश्न मार्गी लागला असून, सरकारने यासाठी २४ लाख ५० हजारांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली असून, नववर्षात या आरतीचे सूर गोदाघाटावर गुंजतील, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमधील गोदामाई ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. येथील धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी आणि भाविकांनाही आरती सोहळा अनुभवता यावा यासाठी येथे गंगा आरती सुरू करण्याचे प्रस्तावित होते. निधीअभावी या विषयाला गती मिळत नव्हती. परंतु, आता या अभिनव उपक्रमासाठी २४ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा उपयोग गंगा आरतीचे साहित्य, ध्वनियंत्रणा, पुरोहितांचा विशिष्ट पोशाख आणि आरतीसाठी ते जेथे थांबतील त्या व्यवस्थेसाठी केला जाणार आहे. गोदावरीचे प्रदूषणाचे ग्रहण दूर करण्यासाठी आणि भाविकांना तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी दररोज नदीची महाआरती सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सायंकाळी भाविकांनी आवर्जून हजेरी लावावी असा माहोल येथे तयार केला जाणार आहे. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांनी सायंकाळची वेळ या महाआरतीसाठी राखून ठेवावी या उद्देशाने हे नियोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबतचे वृत्त वारंवार प्रसिद्ध केले असून, निधी मंजूर झाल्याने या पाठपुराव्याला यश आले आहे.

गंगापूर धरण परिसरासाठी दोन कोटी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने शहरा लगतच्या गंगापूर धरण परिसरात सुमारे दोन कोटींच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात या परिसरातील पयर्टनस्थळांचे रुपडे बदलणार आहे. मातीचे एकमेव धरण म्हणून प्रचलित असलेल्या गंगापूर धरणाचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटला आहे. या परिसरात रस्ते व तत्सम विकासकामे करण्यासाठी तब्बल दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रेप पार्क आणि साहसी क्रीडा संकुल येथे शिव रस्त्याची भू रेखांकनाची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी ८७ लाख ३८ हजारांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. याच संदर्भातील विद्युत विभागाच्या कामांकरीता सुमारे १६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गंगापूर धरण येथे कन्वेशन सेंटरचे काम करण्यात येणार असून, त्याकरीता ९७ लाख ३२ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. १६ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी या निविदा उघडण्यात येणार असून, त्यानंतर या कामाला गती मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून कारचालकाला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कारजवळ थांबलेल्या चालकास बेदम मारहाण करून चार जणांनी लुटल्याची घटना आंबेडकरवाडी भागात घडली. गणेश शेवरे, तुकाराम शेवरे, भावेश पवार आणि मुन्ना दोंदे (रा. सर्व सुयोगनगर) अशी या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये या चौघांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल शेखर साबळे (रा. अयोध्यानगर, आंबेडकरवाडी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. कुणाल साबळे सोमवारी कारने येत असताना आंबेडकरवाडी येथील श्रीकृष्ण लॉन्स परिसरात पेट्रोल संपले. त्यामुळे ते कारजवळ उभे असताना संशयितांनी कुठलेही कारण नसताना त्यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या वेळी संशयितांनी कारच्या काचा फोडून साबळे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल घेऊन पोबारा केला. सहाय्यक निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

कारमधून लॅपटॉप चोरी

हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमधून चोरट्यांनी लॅपटॉपसह सुमारे ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल क्वालिटी इनमध्ये घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष सुरेश स्वामी (रा. ओरिएंट पार्क, हडपसर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. कामानिमित्त स्वामी शहरात आले होते. हॉटेल क्वालिटी इनमध्ये दुपारी बाराच्या सुमारास ते थांबले. या वेळी चोरट्यांनी त्यांच्या कारमधून लॅपटॉप, डोंगल आणि महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ७२ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हवालदार शिंदे तपास करीत आहेत.

मोलकरणीचा दागिन्यांवर डल्ला

पतीच्या निधनामुळे घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरणीने घरातील रोकडसह दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अनिता प्रकाश वाघ (रा. मोतीवाला कॉलेजशेजारी, गंगापूर शिवार) असे संशयित महिलेचे नाव आहे. गंगापूर पोलिस स्टेशन जवळच राहणाऱ्या गीता रमेश नारंग (रा. स्प्रिंग फिल्ड टॉवर्स) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. नारंग यांच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर घरकामासाठी त्यांनी संशयित महिलेस कामावर ठेवले. गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत संशयित महिलेने कुटुंबाचे घरात लक्ष नसल्याची संधी साधत कपाटात ठेवलेली चार लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे पाच लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. हवालदार गायकर तपास करीत आहेत.

गावठी कट्टा बागळणाऱ्यास अटक

जेलरोड परिसरातील दसक स्मशानभूमी भागात पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा आढळला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल अंबादास वाडेकर (वय २२, रा. गणेशनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिकरोड पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी साडेसातच्या सुमारास दसक गावातील स्मशानभूमी भागात संशयितास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे आढळली. उपनिरीक्षक काबुगडे तपास करीत आहेत.

हुसैनी चौकात सहा जुगारी गजाआड

जुन्या नाशिक येथील हुसैनी चौकात एका इमारतीच्या टेरेसवर जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असफ अब्दुल कोकणी (रा. पॅराडाइज बिल्डिंग), जरीन राजिक खान (रा. खडकाळी), सुलतान नूर सय्यद, अकीब इम्तियाज शेख (रा. दोघे मुलतानपुरा), एजाज कादीर सय्यद (रा. तैबानगर, वडाळा गाव) आणि समीर जावेद खान (रा. खडकाळी) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. हुसैनी चौकातील इक्बाल हॉटेलसमोरील पॅराडाइज बिल्डिंगच्या टेरेसवर संशयित जुगार खेळत होते. भद्रकालीचे हवालदार उत्तम ठाकरे यांना मिळालेल्या माहितीवरून सोमवारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - १७ ऑक्टोबर

$
0
0

वाढदिवस - १७ ऑक्टोबर

--

जगन्नाथ खापरे...... द्राक्ष निर्यातदार

रवी बारटक्के.... उद्योजक

बाळासाहेब धारराव...... कवी

विलास लोणारी..... सल्लागार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान

राजाराम शेलार...... माजी नगराध्यक्ष, निफाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अहमदाबाद विमानसेवा लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑक्टोबर अखेरीस सुरू होणारी नाशिक-अहमदाबाद विमानसेवा महिनाभर लांबणीवर पडणार आहे. अहमदाबाद येथे स्लॉट उपलब्ध होत नसल्याने ट्रुजेट कंपनीने विमानसेवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा १ डिसेंबरपासून सुरू होण्याची चिन्हे आहेत. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस ही सेवा दिली जाणार आहे. ज्या प्रवाशांनी तिकिटे बुक केली आहेत, त्यांनी मुंबई ऑफिसशी संपर्क करुन तिकीट बदलून घ्यावे, असे संदेश कंपनीच्यावतीने दिले जात आहेत. स्पाईसजेट या कंपनीपाठोपाठ आता ट्रुजेट कंपनीची सेवाही लांबणीवर पडली आहे. तिकीट बुक केलेल्या प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी पुन्हा औरंगाबादवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला अधिकाधिक पाणी मिळावे यासाठी मराठवाडा आग्रही असले तरी नाशिकमधील उपलब्ध पाणी, त्याची आवश्यकता आणि त्याचा वापर याबाबतची तपशीलवार माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा औरंगाबादवारी करावी लागणार आहे. पाण्याची उपलब्धता आणि वापराबाबत नाशिक आणि औरंगाबादमधील अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आकडेवारीत तफावत असल्याने पुढील बैठकीतच नेमक्या आकडेवारीचा उलगडा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमधील निम्म्याहून अधिक तालुके दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करीत आहेत. जिल्ह्याला आतापासूनच टंचाईच्या झळा जाणवत असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना मराठवाड्याने जायकवाडीसाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातून सहा टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. याबाबत औरंगाबादमध्ये महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणने सोमवारी बैठक बोलावली होती. त्यामध्ये मराठवाड्याला पाण्याची अधिक गरज का, याबाबतची माहिती देताना अधिकाऱ्यांनी आकडेवारी सादर केली. नाशिकसाठीची पाण्याची आवश्कता आणि उपलब्ध पाणीसाठा कमी असल्याची माहिती सादर केली. मात्र, दोन्ही विभागांनी सादर केलेल्या आकडेवारीत तफावत असल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही माहिती सादर करण्यासाठी औरंगाबादवारी करावी लागेल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी घेणार १९ ला आढावा

जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे आरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या आठवड्यात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी विविध विभाग आणि यंत्रणांची पाणी आरक्षणाची मागणी समजून घेण्यासाठी बैठक बोलावली होती, ज्यामध्ये शहरासह आसपासच्या परिसराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नाशिक महापालिकेने ४,६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदवली आहे. औद्योगिक वसाहती, पाणीपुरवठा योजना आणि तत्सम यंत्रणांची पाण्याची मागणी समूजन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १९) पाणी आरक्षणाची बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर शेवटच्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाणी आरक्षणाची बैठक होण्याची शक्यता आहे.

गाळाशिवाय पाणीमोजणी आवश्यक

मराठवाड्याकडून होणारी पाण्याची मागणी आणि पाणी द्यावेच लागेल या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सूचक विधानानंतर गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे संस्थापक देवांग जानी यांनी प्रस्तावित पाणी विसर्गाबाबत हरकत घेतली आहे. वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गंगापूर धरण ५.६२ टीएमसी क्षमेतेचे असून, मेरी संस्थेच्या २००२ च्या सर्वेक्षणानुसार धरणात ४३.७५ एमसीयूएम म्हणजेच २७.५ टक्के गाळ होता. अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ असून, मध्यम स्वरूपाच्या पावसातही धरण ९५ टक्के भरून जाते. गाळामुळे या धरणाची जल साठवणुकीची क्षमता कमी झाली आहे. गंगापूर धरणातील पाणीमापक यंत्र गाळासह पाण्याचे लाइव्ह स्टोअरेज दाखविते. धरणातील गाळ वजाजाता उपलब्ध पाणीसाठ्याची मोजणी होणे आवश्यक आहे. समन्यायी पाणीवाटपाच्या सबबीखाली नाशिककरांवर अन्याय होता कामा नये, अशी मागणीही जानी यांनी नोंदवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेत डेंग्यूवर लक्षवेधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यूसह स्वाइन फ्लू आणि साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना, प्रशासनाच्या अपयशी कारभारावर आता विरोधी पक्षांनी बोट ठेवले आहे. डेंग्यू, स्वाइन फ्लूसह साथीचे आजार नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अपयश आल्याने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यानी येत्या महासभेत साथीच्या आजारावरून लक्षवेधी सूचना मांडली आहे. महापौरांनी शिवसेनेची लक्षवेधी दाखल करून घेतली असून, सेनेच्या लक्षवेधीला काँग्रेस, मनसेचीही साथ लाभल्याने महासभेत भाजपसह प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

शहरात सध्या डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. स्वच्छतेचा डांगोरा पिटणाऱ्या प्रशासनाचा दावा यातून फोल ठरला असून, स्वाइन फ्लू्च्या मृत्यूचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात नाशिक शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूने कहर केला आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर महिन्यात शहरात ३६८ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले, तर ऑक्टोबरच्या पंधरवड्यात २६ जणांचा बळी गेला आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऑक्‍टोबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात ७३ रुग्ण आढळले. जानेवारी ते ऑक्‍टोबर या कालावधीत २१५१ रक्तनमुने तपासण्यात आले. त्यातील ६०६ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सोबतच साथीचे आजारही नियंत्रणाच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे येत्या महासभेत विरोधी पक्षांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या लक्षवेधीवरून पालिकेच्या गलथान कारभाराची चिरफाड करण्याचे घाटत असून, ही महासभा गाजण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाभरात अपील सादर करा

$
0
0

पाणीपुरवठा खासगीकरणाच्या ठरावावर विखंडनाची प्रक्रिया सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यंत्रणेच्या खासगीकरण करण्याचा प्रस्ताव महासभेने फेटाळल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढेंनी हा ठराव शासनदरबारी पाठपुरावा करून निलंबित करून आणला आहे. या निलंबित ठरावावर शासकीय सोपस्कार पाडण्याचे काम सुरू झाले असून, सत्ताधाऱ्यांना त्यावर अभिवेदन (अपील) करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. महिनाभरात यावर अभिवेदन सादर केले नाही तर विखंडनासाठी हा ठराव पुढे रेटला जाणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना हा मोठा दणकाच असणार आहे.

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेत गळती असल्याचे सांगत, वितरण व देखभाल दुरुस्तीची कामे खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव मुंढेंनी महासभेवर ठेवला होता. पाठोपाठ मलनिस्सारण यंत्रणेचेही खासगीकरणाचाही त्यात समावेश होता; परंतु सत्ताधाऱ्यांनी महासभेत खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, आयुक्त मुंढेंनी हा ठराव विखंडनासाठी राज्य सरकारकडे पाठवला होता. नगरविकास विभागाने मुंढेंच्या बाजूने निर्णय देत, हा ठराव विखंडित करण्याच्या दिशेने पावले उचलत, तो निलंबित केला आहे. हा निलंबित ठराव विखंडित करण्यासाठी त्यावर अभिवेदन सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार शहर अभियंत्यांनी महापौरांना पत्र लिहून महिनाभरात अभिवेदन सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी महिनाभरात या निलंबित ठरावावर अभिवेदन सादर करायचे आहे. सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हे अभिवेदन सरकारकडे जाणार असून, त्यांनतर विखंडनाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासनाने विखंडनासाठीची प्रक्रिया सुरू केल्याने सत्ताधाऱ्यांसाठी हा मोठा दणका मानला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निपरीक्षेला आव्हान!

$
0
0

नीतीमूल्यांच्या रक्षणासाठी माणसांनी तयार केलेली व्यवस्थाच जेव्हा ही मूल्ये पायदळी तुडवू पाहते, तेव्हा अशा व्यवस्थेच्या अंगी असूर संचारतो. असा निर्ढावलेला व्यवस्थेचा असूर एखाद्या अबलेच्या पुढ्यात उभा ठाकला तर त्याला पाहून गर्भगळीत होण्याऐवजी त्याच्याशी दोन हात करीत दुर्गा बनण्याचा पर्याय स्वीकारावा, असाच संदेश जातपंचायतीविरोधात दोन वर्षांपासून चिवटपणे लढणाऱ्या ओझर (जि. नाशिक) येथील छाया सतीश तमायचेकर यांनी कृतीद्वारे दिला आहे. ही कहाणी आहे पतीच्या पश्चात जात पंचायतीसारख्या निर्ढावलेल्या व्यवस्थेलाच आव्हान देणाऱ्या दोन तान्हुल्यांच्या आईची! वयाची अवघी तिशी ओलांडण्याच्या आतच छाया यांच्या पतीचे हृयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या दु:खाघातातून बाहेर येत नाही तोच, दुसरा आघात झाला, जो अनपेक्षित आणि धक्कादायक होता. नंदूरबारमध्ये सासरच्या मंडळींनी त्यांना चारित्र्य सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्यासाठी जात पंचायतीसमोर हे प्रकरण नेले. संबंधित जात पंचायतीनेदेखील या महिलेस सुनावलेली परीक्षा क्रूरता आणि विकृतपणाचा कळस गाठणारी होती. तीनशे गोवऱ्यांच्या रात्रभर पेटलेल्या विस्तवात कुऱ्हाड तापवून ती या महिलेच्या बारा वर्षांच्या मुलाच्या हाती ठेवायची. त्या अगोदर मुलाच्या हातावर रूईच्या झाडाची पाने कच्च्या दोऱ्याने बांधायची आणि त्याने सात पावलांचे अंतर चालायचे. या प्रकाराने मुलाचे हात भाजल्यास चारित्र्यावरील कलंक सिद्ध होईल, न भाजल्यास चारित्र्य शुद्ध असल्याचे स्पष्ट होईल, असे तारे जात पंचायतीने तोडले. कलंक सिद्ध झाला तर त्याच्या निवारणासाठी नंतरच्या टप्प्यातही सांगितलेल्या शिक्षा लज्जास्पद व क्रूरतेच्या परिसीमा गाठणाऱ्या होत्या. जात पंचायतीच्या हुकुमतीला धैर्याने विरोध करीत कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा पर्याय घरातल्या मंडळींसमोर ठेवला. मात्र, तो त्यांनी धुडकावून लावल्यानंतर छाया तमायचेकर यांनी धाडसाने नंदूरबारबारमधील पोलिस ठाणे गाठले. तेथेही, 'हा तुमचा समाजांतर्गत प्रश्न असल्याने तो समाजातच सोडवा' असा तऱ्हेवाईक सल्ला देण्यात आला. हे ऐकून त्यांना आणखी एक धक्का बसला. मात्र, यातूनही हार न मानता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची मदत घेत त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. अखेर या कार्यकर्त्यांच्या मदतीने जात पंचायतीच्या पाशवी नियमांविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवित नवा लढा धैर्याने उभा केला. हा लढा थांबावा यासाठी प्रतिपक्षाकडूनही आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी करीत आपल्याला दबावात आणण्याचा प्रयत्न झाला असला, तरीही माहेरची मंडळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या मनोबलामुळे जात पंचायतीच्या विरोधात या दुर्गेने बंड पुकारले आहे. आपल्यासारख्या अन्यायाला बळी पडणाऱ्या इतर महिलांसाठीही आपण हयातभर ढाल बनून उभे राहू, असा मनोदय छाया तमायचेकर व्यक्त करतात.

केवळ स्वत:वरचा अन्याय दूर करण्याइतका मर्यादीत हा लढा नाही. तर, असे प्रकार राज्यात जेथे-जेथे घडतात त्या-त्या ठिकाणी जातपंचायत मूठ-माती अभियानाच्या वतीने छाया तमायचेकर उपस्थित राहून शोषितांचा आवाज बनत आहेत. स्वत:च्या लढ्याचे अनुभव राज्यभर कथन करून त्या प्रबोधन करीत आहेत. महिलांचे शोषण करणाऱ्या व्यवस्थेचेच समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प या नवदुर्गेने सोडला आहे.

(संकलन : जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images