म. टा. वृत्तसेवा, येवला यंदाच्या संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना जायकवाडीला पाणी देण्याचा घाट घातला जात आहे. आपल्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जात आहे. नव्हे तर यासाठीच येवला तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे, असा आरोप करीत शासनाचा हा डाव तालुक्यातील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी दिला. येवला तालुक्यातील एरंडगाव येथे आयोजित पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पालखेडच्या आवर्तनासाठी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची रविवारी (दि.२१) एरंडगाव येथील पालखेड डावा कालवा कार्यालयाच्या प्रांगणात बैठक झाली. रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर दोन आवर्तने पूर्ण क्षमतेने मिळावेत यासाठी लढा उभारण्याबरोबरच पालखेड धरण समुहातील पाणी जायकवाडीसाठी जाऊ नये यासाठी न्यायालयीन लढाई लढणे, जलहक्क समितीअंतर्गत पालखेड डावा कालवा कृती समिती स्थापन करणे आदींबरोबरच इतर विषयांवर याबैठकीत चर्चा करण्यात आली. पाण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. भागवंतराव सोनवणे, हरिभाऊ महाजन, अनिस पटेल, एकनाथ गायकवाड, सुनील गायकवाड, किरण चरमळ आदींनी मार्गदर्शन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट