सर्वेक्षण न केल्याबद्दल पाटबंधारेच्या मुख्य अभियंत्याना विचारला जाब
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयामुळे नाशिकवर अन्याय झाल्याचे सांगत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, अपक्ष या विरोधी पक्षांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देत हल्लाबोल केला. विरोधी पक्षांनी पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी यांना घेराव घालत निषेधाच्या घोषणा देत सिंचन भवन दणाणून सोडले.
जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय नाशिककरांवर अन्यायकारक असल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे नाशिककरांची बाजू का मांडली नाही, अशा शब्दात जाब विचारला. आपण आपल्या परीने प्रयत्न केल्याचा दावा करत, एवढे पाणी सोडण्याचा निर्णय पटला नसल्याचा खुलासा कुलकर्णी यांनी विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर केला.
गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असतांना महासभेत पाण्यावरून चर्चा घडवून स्वत:चे बोट सोडवून घेण्याच्या प्रयत्न असलेल्या भाजपवर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसने टीकास्र सोडत शुक्रवारी थेट सभात्यागाचे अस्र उगारले. महासभेत वायफळ चर्चा करण्यापेक्षा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी महासभेत आवाहन केल्यानंतर भाजप वगळता सर्व विरोधी पक्षांनी सिंचन भवनाला धडक दिली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, 'राष्ट्रवादी'चे गटनेते गजानन शेलार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गुरमित बग्गा, सुधाकर बडगुजर, डॉ. हेमलता पाटील आणि नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू करत निषेधाच्या घोषणा दिल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक मधुकर यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले.
नाशिकसाठी २०१८ करीता ६.५ टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय झाला असताना नाशिकचे हक्काचे पाणी जायकवाडीला कशासाठी सोडायचे, असा सवाल करत बोरस्ते यांनी मेंढेगिरी अहवालातील त्रुटींकडे लक्ष वेधून पाणीवापराच्या फेरसर्वेक्षणाची मागणी केली. २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतरही उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणीवापराचे फेरसर्वेक्षण का झाले नाही, असा सवाल बग्गा यांनी केला. जायकवाडी धरणात ६० टीएमसी पाणी शिल्लक असताना नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याची घाई कशासाठी, असा सवाल बडगुजर यांनी केला.
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी वापराचे फेरसर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले असून याविषयीची ९० ते ९५ टक्के माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाकडे प्राथमिक अहवालाद्वारे दिली आहे. समन्यायी पाणीवाटपाचे धोरण आणि उच्च न्यायालयाचे आदेश लक्षात घेता पाणीवाटप समितीच्या बैठकीत वस्तुस्थिती मांडल्याचे कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे निर्देशांनंतर पाणी सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. पाणी सोडावे लागत असल्याची हतबलता कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यावर नाशिकच्या धरणांतून पाणी सोडणे बंद करा, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधींकडून केली गेली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन कुलकर्णी यांना देण्यात आले.
उपायुक्त पाटलांची शिष्टाई
जाब विचारण्यासाठी आलेल्या पदाधिकारी आणि नगरेसवकांशी मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी कठोर भाषा वापरली. त्यामुळे बोरस्ते आणि कुलकर्णी यांच्यात हमरीतुमरी सुरू झाली. परंतु, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी कुलकर्णी यांना स्वर कमी करण्याचा सल्ला दिला. नाशिकचा पाणी सोडण्यास होणारा तीव्र विरोध लक्षात घेता पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधींच्या भावना गोपनीय शाखेमार्फत सरकारकडे मांडण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अन् पाचच मिनिटात प्रकट!
संतप्त नगरसेवक घोषणाबाजी करत पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्यांच्या दालनात शिरले. तेव्हा किरण कुलकर्णी दालनात हजर नव्हते. कार्यालयीन सहायक सोनल पाटील यांनी कुलकर्णी हे भंडारदारा धरणावर गेल्याचे सांगितले. पाटील यांनी कुलकर्णी यांचा मोबाइल नंबरही देण्यास नकार दिला. त्यामुळे काही संतप्त आंदोलकर्त्यांनी थेट कुलकर्णी याचे निवासस्थान गाठले. ते घरी असल्याचे आढळून आल्याने लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. सोनल पाटील यांनी कुलकर्णी यांच्याशी मोबाइलवर चर्चा केली. आपल्याला कार्यालयात येणे शक्य नसल्याने अधीक्षक अभियंत्यांकडे शिष्टमंडळ पाठवा, असे उत्तर कुलकर्णी यांनी दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी कुलकर्णी यांच्याशी संवाद साधत येण्याचे आवाहन केले. त्यानंतर कुलकर्णी लगेच पोलिस बंदोबस्तात आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यामुळे पाच मिनिटात कुलकर्णी भंडारदऱ्यावरून कसे आले, अशी चर्चा सुरू झाली.