\Bछटा दुष्काळाच्या
'मटा' विशेष\B
म. टा. वृत्तसेवा, बारामती
एकाबाजूला विकासाची पंढरी अशी ओळख आणि दुसऱ्याबाजूला तालुक्याच्या चाळीस टक्के भागाला भेडसावणारी पाणी समस्या, अशी स्थिती बारामती तालुक्याची आहे. येथील लोकप्रतिनिधींकडून नेहमी चकाचक बारामतीचाच उदोउदो होत असला तरी जिरायती भागाला लागलेला दुष्काळाचा शाप कधी संपणार असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. सध्या तालुक्यातील सहा गावे व ३५ वाड्यावस्त्यांमधील १२ हजार एकशे ८४ नागरिकांना सहा सरकारी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दुष्काळी परिसरात आतापर्यंत २४ कोटी रुपये खर्चून ७१ पाणीपुरवठा योजना उभारल्या. मात्र, तांत्रिकदृष्ट्या या योजना असंक्षम असल्याने यातील अनेक योजना सध्या गंजलेल्या अवस्थेत आहेत.
तालुक्यातील तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मूर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काऱ्हाटीसह या बावीस गावांसह ३५ वाड्यावस्त्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. बारामती तालुक्याचा पश्चिम भाग सोडून इतर सर्व तालुका नीरा डावा कालव्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुजलाम-सुफलाम झाला. शहरात कृषी संशोधनासाठी जागतिक पातळीवरील कृषी विज्ञान केंद्राची निर्मितीही करण्यात आली. अनेक संस्था, संघटना, दूध संघांचे जाळे उभे राहिले. मात्र, एका बाजूला सर्व काही अनुकूल परिस्थिती असतानाही दुसऱ्या बाजूला साठ वर्षांनंतरही तालुक्याच्या पश्चिम भागात कायम दुष्काळी परिस्थिती असते. लोकप्रतिनिधींकडून दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. हा सर्व भाग जिरायत समजला जातो. याठिकाणी नापिकी, जनावरांना चारा नसणे आणि पिण्यासाठी पाण्याचा अभाव असे एकत्रित संकट नेहमीच उभे असते. येथील नागरिकांना सिंचनासाठी नव्हे तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. गेल्या तीन वर्षांत तालुक्यातील पावसाचे प्रमाणही कमी झालेले दिसत आहे.
'सध्या बारामती तालुक्यातील अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मूर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काऱ्हाटीसह ३५ वाड्यावस्त्यांना सहा सरकारी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील जनावरांचा चारा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच नियोजन करण्यात येणार आहे,' असे तहसील प्रशासनाने 'मटा'ला सांगितले.
\Bशेतकरी, ग्रामस्थ आक्रमक\B
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ सततच्या दुष्काळामुळे आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून बारा डिसेंबर २०१३ मध्ये पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलान केले होते. काही गावांत घरांवर काळे ध्वज लावून व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यानंतरही प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकांवेळी या भागातून मोठा विरोध केला जातो.
---------
\Bबारामती तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान
\Bसन सरासरी पर्जन्यमान
२०१६ ४५० मिमी ४४४.७५ मिमी
२०१७ ४५० मिमी ५४८.३७ मिमी
२०१८ ४५० मिमी २२८.०० मिमी
--------
\Bसंभाव्य पाणीटंचाई असणारी गावे\B
\Bमहिना गावांची संख्या\B
नोव्हेंबर २०१८ ०५
डिसेंबर २०१८ ०९
जानेवारी २०१९ ११
फेब्रुवारी २०१९ ११
मार्च २०१९ १५
एप्रिल २०१९ ०५
मे २०१९ ०५
एकूण ६६
(यासाठी नियोजन म्हणून ९ बोअर आणि सात विहिरींचे प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात येणार आहे.)
---------
\B२४ कोटी खर्चूनही ७१ पाणीपुरवठा बंद
\Bतालुक्यात आतापर्यंत ७१ पाणीपुरवठा योजना उभारल्या. तांत्रिकदृष्ट्या या योजना असंक्षम असल्याने २४ कोटी रुपये खर्चूनही त्या सद्यस्थितीत गंजलेल्या अवस्थेत आहेत. पश्चिम भागातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक गावात अंदाजे दोन किंवा चार पाणीयोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. तालुक्यात २००४ ते २०१५ या कालावधीत पाणी प्रश्न निकाली काढण्याच्या उद्देशाने तब्बल ७१ योजना राबविण्यात आल्या आहे. यामध्ये स्वजलधारा ८, वर्धित वेग कार्यक्रमांतर्गत २७, भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत १०, बिगर आदिवासी २६ अशा एकूण ७१ योजनांचा समावेश आहे. यासाठी २४ कोटी ८६ लाख ४३ हजार ६०३ रुपये खर्च करण्यात आला. 'संबंधित विभागाने या भागांत योजना सुरू करताना पाणीपुरवठ्याचे जीआयएस मॅपिंग व ग्रामीण पाणीपुरवठ्याचा 'हायड्रॉलिक वॉटर सिम्युलेशन'ने अभ्यास केला नसल्याने पुढील दोडशे वर्षे अशा योजना राबविल्या तरी वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरूच राहतील,' अशी माहिती एका सेवानिवृत्त अभियंत्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर 'मटा'ला दिली.
--------
दुष्काळ आमच्या पाचवीलाच आहे. आम्हांला शेतीसाठी पाणी नाही दिले तरी चालेल. मात्र, पिण्यासाठीतरी पाणी द्या. नेहमीच या भागाकडे दुर्लक्ष करण्यात येत असते.
- ज्ञानेश भापकर
----------
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, विहीर खोदाई, पाणीउपसा बंदी करावी लागणार आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध असणारे पाण्याचे स्रोत्र आरक्षित करण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे.
- हनुमंत पाटील, तहसीलदार, बारामती
--------
\Bमूर्टी\B