म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची विशेष याचिका सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळल्याने मराठवाड्यातील जायकवाडी धरणात गंगापूर आणि दारणा धरणामधून पाणी सोडणे अनिवार्य ठरले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता पाणी सोडा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले असून पाटबंधारेसह पोलिस आणि महावितरण यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. पाणी सोडण्याच्या मुद्दयावरून कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणात पाण्याची तूट असल्याने समन्यायी पाणी वाटपाच्या तत्वानुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यातील काही धरण समूहांमधून एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडा, असे आदेश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने २३ सप्टेंबर रोजी दिले होते. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, पालखेड आणि दारणा समूहातून ३.२४ टीएमसी पाणी सोडा, असे महामंडळाच्या आदेशात म्हटले होते. मात्र, या धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेला जिल्ह्याचा बहुतांश भाग दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करीत असल्याने पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. महामंडळाच्या या आदेशाला विखे पाटील कारखान्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याचे गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने बुधवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला कळविले. त्यामुळे गुरुवारी (दि.१ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पाणी सोडण्याच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी समन्वयाच्या बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी पाटबंधारे, पोलिस आणि महावितरण विभागाला दिले आहेत. त्यामुळे सकाळी १० वाजता गंगापूर आणि दारणा धरणातून एकाचवेळी पाणी सोडण्यात येणार आहे. ४८ ते ६० तासांमध्ये हे पाणी जायकवाडी धरणाच्या प्रवरासंगमजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. वहन मार्गात पाणीउपसा होऊ नये, यासाठी महावितरणकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गोदावरी, दारणा नदीपात्राच्या दोन्ही बाजूचा वीजपुरवठा सकाळी खंडित केला जाणार आहे.
टप्प्या-टप्प्याने वेग वाढविणार
गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे महामंडळाचे आदेश आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजता २५०० क्युसेक्सने पाणीविसर्ग सुरू करण्यात येणार आहे. टप्प्या-टप्प्याने तो वाढविला जाणार आहे. २५०० ते ३५०० क्युसेकने पाणीविसर्गाचे नियोजन करण्यात आले आहे. दारणा आणि मुकणे धरणातून २.४० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. सकाळी आठ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात होईल. टप्प्या-टप्प्याने हा वेग वाढविण्यात येणार असून १५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
पोलिसांची कुमक सज्ज
जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडू नये याकरीता विविध स्तरावर आंदोलने झाली आहेत. महामंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी होतेवेळी देखील पाणी सोडण्यास विरोध केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता ग्रामीण पोलिसही सज्ज झाले आहेत. गंगापूरसह अन्य धरणांवर बुधवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. राज्य राखीव पोलिस दल, दंगल काबू नियंत्रण पथकाची बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली आहे. पाण्याच्या वहन मार्गावर ठिकठिकाणी हा बंदोबस्त असणार आहे.
नदीकाठच्या रहिवाशांना इशारा
दारणा धरणातून ११ हजार क्युसेकने, गंगापूर धरणातून ३५०० क्युसेकने तर मुकणे धरणातून १००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे. त्यामुळे दारणा आणि गोदावरी नदीतून पाण्याचा मोठा प्रवाह वाहणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी कोणतेही आंदोलन करून पाण्याच्या विसर्गास अडथळा आणू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी केले आहे. कुणीही नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रातील वीजपंप सुरक्षित ठिकाणी ठेवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची मालमत्तेची अथवा जीवितहानी झाली तर जलसंपदा विभाग त्यास जबाबदार राहणार नाही असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
महामंडळाच्या आदेशानंतर जिल्ह्यात लोकशाही मार्गाने आंदोलने झाली आहेत. त्यामुळे आंदोलकांवर कारवाई करण्याची आवश्यकता भासली नाही. परंतु, पाणी सोडतेवेळी अनुचित प्रकार घडण्याची किंवा कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कडेकाट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- संजय दराडे, पोलिस अधीक्षक
गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आणि सुरक्षितरित्या पाणी जायकवाडीमध्ये पोहोचविणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता गंगापूर आणि दारणा या धरणसमूहांमधून पाणी सोडण्याबाबतच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. पाणी सुरक्षितरित्या जायकवाडीत पोहोचावे याकरीता पोलिस, महावितरण, पाटबंधारे विभागाने काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे गुरूवारपासून महामंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल.
- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी