चुंचाळे शिवारातील घटना; पोलिसांकडून 'आकस्मात'ची नोंद
म. टा. वृत्तसेवा, सिडको
अंबड, चुंचाळे परिसरात शनिवारी (दि. ३) मध्यरात्री पाच दुचाकींसह रिक्षा अचानक जाळल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या जाळपोळीची धग इमारतीच्या पाचव्या मजल्यापर्यंत पोहचली. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मात घटनेची नोंद केली असून हा प्रकार इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांमुळे घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अंबड, चुंचाळे घरकुल योजनेजवळील इमारत क्रमांक आठमध्ये मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांनी अचानकपणे पेट घेतला. आगीत एमएच-१५ जीजी-६०६३, एमएच-१५-जीसी-९१२५, एमएच-१५-सीक्यू-८७४४, एमएच-१५-डीजे-०८२३ या गाड्या जळल्या. तसेच याचठिकाणी उभी असलेली एमएच-१५-ईएच-२४६२ या रिक्षासह एक एम-८० गाडीही जळून गेली. तसेच यावेळी वाहनतळावर असलेल्या दोन सायकलीही जळून गेल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सिडकोत यापूर्वीही अशाच प्रकारे वाहने जाळण्याचा प्रकार घटला होता. त्याचीच पुनरावृत्ती घडल्याचे मानले जात आहे.
पाचव्या मजल्यापर्यंत धग
पाच मजली असलेल्या इमारत क्रमांक आठमध्ये सर्वात उंचावरील मजल्यापर्यंत आगीची धग दिसल्याने रहिवाशी खडबडून जागे झाले. त्यांनी अग्निशामक दलाला तातडीने बोलावून आग विझविली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. आग कशामुळे लागली, याचा शोध पोलिस घेत आहेत. तरी आग लावण्यात आल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडला असून पोलिसांनी त्याचदृष्टीने तपास करावा, अशी मागणी केली जात आहे.
गुन्ह्याची नोंद का नाही?
गुन्हेगारी प्रवृत्तीतून ही जाळपोळ झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी असा प्रकार घडल्याने पोलिसांनी खऱ्या अर्थाने खाकीचा दरारा निर्माण करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले जात आहे. जाळपोळीची घटना घडल्यानंतर पोलीसांनी पंचनामा करून या प्रकरणी आकस्मात नोंद केली. मात्र, याप्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न उपस्थित स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
'त्या' घटनेची आठवण
सिडकोत काही वर्षांपूर्वी एकाच रात्री तब्बल ४० गाड्या जाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर सिडकोतील कामटवाडे, त्रिमूर्ती चौक यासारख्या भागांमध्ये गाड्या जाळण्याचे प्रकार घडले होते. यामध्ये सिडकोतील टिप्पर गँगचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण टोळी जेरबंद केली. परंतु, आता पुन्हा तसाच प्रकार घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून सिडकोत नवीन टोळी कार्यरत झाली तर नाही ना, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
..
अंबडला जाळण्यात आलेल्या गाड्या या फटाक्यांमुळे जळाल्या असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, फॉरेन्सिक विभागाला बोलावून याचा तपास करण्यात आला. हा प्रकार इलेक्ट्रॉनिक्सच्या गाडीतील शॉटसर्किटमुळे झाल्याचा अंदाज आहे.
- सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या जाळपोळीच्या घटनेने धक्का बसला आहे. घटनेतील संशयितांना पोलिसांनी पकडावे. परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी निर्माण करण्याची गरज आहे. पोलिस चौकी झाल्यास गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण होईल.
- राकेश दोंदे, नगरसेवक
चुंचाळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच असून याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. गुंडाची दहशत वाढत असून पोलिसांनी या परिसरात गस्त पथक राबविले पाहिजे. सणासुदीच्या काळात असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
- मालन हिवाळे
चुंचाळे व आमच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तच दिसून येत नाही. जाळपोळीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त वाढविण्याची गरज आहे.
- विजया कोरी