म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक मुंबई मराठी साहित्य संघाद्वारे आयोजित नाट्यगीत गायनात हर्षद गोळेसर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने कट्यार काळजात घुसली या नाटकातील सुरत पियाकी हे नाट्यगीत सादर केले. द्वितीय क्रमांक अजिंक्य जोशी याने मिळवला, त्याने ययाती देवयानी नाटकातील हे सुरांनो चंद्र व्हा हे नाट्यगीत सादर केले, तर तृतीय क्रमांक आरोह ओक याला मिळाला. त्याने पद्मनाभा नारायणा हे नाट्यपद सादर केले. मुंबई मराठी साहित्य संघाद्वारे कुसुमाग्रज स्मारकात या प्राथिमक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण आठ केंद्रांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाशिकला नाट्यगीत गायनासाठी प्रथमच संघात सामावून घेण्यात आले होते. पहिल्याच वर्षी नऊ स्पर्धकांनी नोंदणी करीत शुभारंभ केला. बेळगाव, गोवा, कणकवली, रत्नागिरी, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई या विविध केंद्रावर या स्पर्धा घेण्यात आल्या. विविध केंद्रातून निवडून आलेल्या सर्व स्पर्धकांची अंतिम स्पर्धा मुंबई येथे पार पडणार आहे. ही अंतिम स्पर्धा अ. ना. भालेराव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १२ डिसेंबर रोजी मुंबईला होणार आहे. नाशिकला झालेल्या स्पर्धेत पूर्वा क्षीरसागर, श्रेया पिसोळकर, प्राची खोत, सेजल काळे, संगीता चव्हाण, प्रणाली शंकपाळ यांनी सहभाग घेतला. या सर्व स्पर्धकांना संवादिनीवर आनंद अत्रे व तबल्यावर सुजीत काळे यांनी साथसंगत केली. नितीन पवार व मनोहर सोमण यांनी परीक्षण केले. नाट्यसंगीत ही आपली संस्कृती असून, त्याला उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी साहित्य संघाचे अनंत गोडबोले यांनी दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी मनोहर सोमण, आनंद पालव, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी प्रयत्न केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट