डॉ. भालचंद्र कांगो यांचा पंतप्रधानांना टोला; आयटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला प्रारंभ
...
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात विविध योजनांची माहिती देतात. मात्र सरकारने लागू केलेल्या योजना तळागाळात अजून पोहोचलेल्या नाहीत. अंगणवाडी आणि आशा सेविकांना अद्याप वेळेत मानधन मिळत नाही. उद्योगधंद्यांची भरभराट आहे पण तरुणवर्ग बेरोजगार आहे, यावर पंतप्रधान मोदी कधी बोलणार? आश्वासक गप्पांची 'मन की बात' करण्यापेक्षा नोकरदारांच्या प्रश्नांवर तोडगा आणि नोकरीच्या संधी या संदर्भातील 'काम की बात' पंतप्रधान मोदी केव्हा घेणार, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी उपस्थित केला.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे १८ वे राज्य अधिवेशन नाशिक-पुणे महामार्गावारील श्रीकृष्ण लॉन्स येथे होत आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी कांगो बोलत होते. यावेळी आयटक दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा, 'एआयबीईए'चे राष्ट्रीय सहसचिव देवीदास तुळजापूरकर आणि आयटक महाराष्ट्रचे सरचिटणीस श्याम काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयटक नाशिक जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे आणि सत्रप्रमुख आयटक महाराष्ट्र राज्याध्यक्ष सुकुमार दामले स्वागताध्यक्ष होते.
डॉ. कांगो यांनी उपस्थित कामगारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पैशांच्या मागणीसाठी एल्गार करणारी संघटना म्हणून आयटककडे बघितले जाते. हा समज आपण सर्वांनी मिळून पुसला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आयटकने कामगारांच्या विविध हक्कांसाठी काम केले आहे. सध्याच्या सरकारने कामगार संघटनांना कमकुवत केल्या आहेत. कंपन्यांच्या मालकांच्या विरोधात स्थानिक कामगार संघटना एल्गार करीत नसल्याचा हा परिणाम आहे. आयटकच्या माध्यमातून कामगार चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. या अधिवेशनात रिक्त जागा, पेन्शन प्रश्न, शेतमजुरांना किमान वेतन यांसह शेतकरी आत्महत्या या विषयावर संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
..
\Bराष्ट्रव्यापी संप काळाजी गरज\B
नवीन आर्थिक धोरण आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर कामगारांची संख्या कमी केली जात आहे. त्यामुळे कामगार संघटना खिळखिळी होऊ लागली आहे. पुढील काळात कामगारांची संख्या अधिक खालावत जाईल म्हणून राष्ट्रव्यापी संप करण्यात येणार आहे. कामगारांच्या हक्कासाठी हा संप काळाजी गरज आहे, असे सांगत ८ व ९ जानेवारी २०१९ रोजी पुकारण्यात येणाऱ्या राष्ट्रव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.
..
\Bजॉब लेस ते जॉब कट
\Bतंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व काही शक्य होत असल्याचे सांगत कामगार कमी केले जात आहेत. जे कामगार आहेत त्यांना कमी पैशात अधिक कामाची जबाबदारी दिली जात आहे. हे वास्तव जॉब लेस ते जॉब कटपर्यंत येऊन पोहोचले आहे. भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होईल, अशी चिंता डॉ. कांगो यांनी व्यक्त केली. \B
..
शेतकरी व कामगारांनी एकत्र यावे
\Bशेतकरी व कामगारांच्या समस्या सारख्या आहेत. दोघांच्या हक्कांवर घाला घालण्यात येत असून, शेतकरी व कामगारांनी एकत्र येत एल्गार करण्याची गरज असल्याचे मत कृषी अभ्यासक प्रा. अशोक सोनवणे यांनी मांडले. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात 'शेतकरी-कामगारांच्या चळवळीची एकजूट काळाजी गरज' या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे हे होते.
\B...
कविवर्य सुर्वेंच्या आठवणींना उजाळा
\Bअधिवेशनात संध्याकाळी ८ वाजता कविवर्य नारायण सुर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कवी भीमराव कोते यांच्या संकल्पनेतून कविवर्य सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. कोते यांना कार्यक्रमात मानसी देशमुख, रविकांत शार्दूल, आरती बोराडे यांची साथ लाभली.
...\B
आज रॅली अन् सभा
\Bआज (दि. २५) दुपारी १ वाजता द्वारका येथील खरबंदा पार्क ते अधिवेशनाच्या ठिकाणापर्यंत आयटकतर्फे रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १.३० वाजता आयटक राष्ट्रीय महासचिव अमकजित कौर यांची जाहीर सभा होणार असून, या सत्राचे अध्यक्ष आयटक महाराष्ट्राचे राज्य सचिव राजू देसले असणार आहेत.