म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
'पाणी हा आता कळीचा मुद्दा झाला असून, पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पाणी प्रश्नात राजकारण व पक्षीय मतभेद नकोत. शेतकरी बांधवानी कमी पाण्यात होणाऱ्या शेतीची आधुनिक तंत्रे शिकावी.' असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी कृषिथॉनमध्ये केले.
कृषिथॉन २०१८ प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी सकाळी 'महिला शेतकरी सन्मान सोहळा' आयोजित करण्यात आला. यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जि.प.सदस्या अमृता पवार ,माजी खासदार देविदास पिंगळे, नाडाचे अध्यक्ष विजूनाना पाटील तसेच संयोजन समिती अध्यक्ष खा. हरिशचंद्र चव्हाण उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संयोजक संजय न्याहारकर यांनी व संचालिका अश्विनी न्याहारकर यांनी केले.
भुजबळ म्हणाले,'शेतीमध्ये ७५ टक्के महिलांचे योगदान असले तरी त्यांच्या नावावर शेतीचा हिस्सा फक्त १२ टक्के आहे. शेतीत महिला राबतात. जगातील प्रगतशील देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात ४० टक्के वाटा महिलांचा असतो. भारतात तो फक्त १७ टक्के आहे, असेही ते म्हणाले.
हरितक्रांती होऊनही आत्महत्या
भुजबळ म्हणाले, 'शेतमालाला दीडपट हमीभावाची घोषणा झाली. मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व त्याच्या परिवाराच्या कष्टांचा विचार होत नाही. देशात हरितक्रांती होऊनही शेतकरी आत्महत्या का होतात? याचा विचार व्हायला हवा. शेती खर्चिक झाली असून, जीएसटीचा बोजा वाढला आहे.'
तापीचे पाणी गुजरातला
'तापी खोऱ्यातील पाणी आपण अडवू शकत नसल्याने गुजरातला जाते. मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होत आला आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल,' असे सांगून ते पुढे म्हणाले, शेतीतील प्रगतीसाठी अनेक मार्ग आहेत. योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा.'
समुद्राचे पाणी शुद्ध करा
खा. हरिशचंद्र चव्हाण म्हणाले,'नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मुंबईला देण्यापेक्षा समुद्राचे पाणी शुद्ध करून मुंबईकरांना द्यावे. ही काळाची गरज असून, हे अशक्य नाही. त्यामुळे पाण्यावरून होणारा संघर्ष कमी होईल.'
हेल्मेटबाबत जनजागृती
नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त यावी व हेल्मेट वापराबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने कृषिथॉन प्रदर्शनात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर पोलिस ठाण्यातर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी, नागरिकांशी संवाद साधला.