Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मांगीतुंगी यात्रेच्या समारोपात कुस्ती दंगलचा थरार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील श्री क्षेत्र मांगीतुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथे वार्षिक यात्रेचा समारोप राज्यभरातून आलेल्या पैलवानांच्या कुस्ती दंगलीने झाला. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सुरू झालेली ही कुस्ती दंगल सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यंदा प्रथमच या कुस्तीदंगलीत महिला व मुलींचा समावेश झाल्याने या कुस्तीदंगलीला प्रचंड उत्साहात प्रारंभ झाला.

श्री मांगीतुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथे देवस्थानचे मुनीश्री विकसंत महाराज, आवश्यक सागर महाराज, माताजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात अभिषेक पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सुमेरमल काले, व्यवस्थापक डॉ. सुरजमल जैन, भिलवाड सरपंच बाळासाहेब पवार, उपसरपंच उखा कुवर जैन उपस्थित होते. मंगळवारी यात्रोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने कुस्ती दंगल ठेवण्यात आली होती. या कुस्ती दंगलीत सहभाग घेण्यासाठी कोल्हापूर, नंदुरबार, नागपूर, धुळे, जळगाव येथील मल्ल मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. भिलवाड सरपंच बाळासाहेब पवार, यात्रोत्सव समिती अध्यक्ष रमेश पवार, उपसरपंच उखा कुवर, जायखेडा पोलिस ठाण्याचे स. पोलिस निरीक्षक गणेश गुरव, भाऊसाहेब गावीत, रामभाऊ पवार, यांच्या प्रमुख उपस्थिती कुस्ती दंगलीस प्रारंभ झाला. या दंगलीत प्रथमच महिला व तरुणींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मागण्यांवर चर्चेसाठी चार डिसेंबरला बैठक

$
0
0

निदेशकांच्या समस्यांबाबत मंत्र्यांशी चर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) निदेशकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी येत्या चार डिसेंबर रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सचिव, संचालक आणि संघटना यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनी मान्य केले आहे.

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवारी आंदोलन झाले. आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळासोबत मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांची मंत्रालयात चर्चा झाली. याबाबत संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी यांनी माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील शासकीय आयटीआयमधील निदेशकांची भरती रखडलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सेवाप्रवेशाचे जुनेच नियम निदेशकांच्या विभागांर्तगत प्रगतीसाठी मारक ठरत आहेत. तसेच पदोन्नती रखडलेल्या आहेत, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी कौशल्य विकास व उद्योजकता या स्वतंत्र विभागाच्या निर्मितीमधून हे प्रश्न मार्ग लागतील, अशी अपेक्षा हाती. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने निदेशक संघटनेने आंदोलन केले. त्यानंतर मंत्री पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेप्रसंगी नॅशनल फेडरेशन ऑफ गर्व्हमेंट आयटीआय एम्प्लॉईज असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष भोजराज काळे, संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी, उपाध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस विनोद दुर्गपुरोहित आदी उपस्थित होते.

आमदार दराडेंची भेट

आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनप्रसंगी विधान परिषद आमदार किशोर दराडे यांनी भेट देत निदेशकांच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार कल्याण काळे, आमदार बाळाराम पाटील, डॉ. सावंत यांनीही आंदोलकांची भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

क्रांतिनगर येथील गं. पा. माने शाळेजवळ असलेल्या गोदामात काम करणाऱ्या वायरमनचा एलईडी लाईटिंग माळ शोल्डर करीत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सचिन रमेश परदेशी (बेलदार) यांचे क्रांतिनगर येथे गं. पां. माने शाळेजवळ इलेक्ट्रिकल सामानाचे गोदाम आहे. परदेशी यांच्याकडे अभिषेक रतन सोनार (वय १९, उदय कॉलनी, क्रांतिनगर, मखमलाबाद रोड) हे वायरमनचे कामकाज बघत होते. अभिषेक हे मंगळवारी (दि. २७) दुपारी एक वाजता एलईडी माळ शोल्डर करत असताना विजेचा धक्का लागून पडला. तो बराच काळ बेशुद्ध अवस्थेत होता. त्याचा भाऊ रमेश गिरी सोनार याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांने मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसआयची रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0

उपनगर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरची घटना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा जेलरोड

विवाहितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद देणाऱ्या महिलेचा पती सुद्धा पोलिस दलात कार्यरत आहे.

साजन शंकर सानप (३७, रा. जेलरोड, सध्या, मुंबई) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो मूळचा संगमनेर तालुक्यातील सोनुशी गावचा असल्याचे समजते. जेलरोड येथे राहणाऱ्या विवाहितेने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार तिचा पती मुंबईत पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना साजन सानपही तेथेच रायटर म्हणून नेमणुकीस होते. महिला व सानप जेलरोडचे रहिवासी असल्याने पतीच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. एप्रिल २०१४ मध्ये घरात स्वयंपाक करताना पीडितेचा चेहरा भाजला. तेव्हा तिला पाहण्याच्या निमित्ताने सानप घरी आला. तिचा फोन नंबर घेतला. नंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले.

पतीविरुद्ध काही महत्त्वाचा पुरावा देण्याच्या बहाण्याने या दोघांची जवळीक वाढली. माझ्याकडे काही फोटो असल्याची धमकी सापन याने मे २०१४ मध्ये तक्रारदार महिलेस दिली. हे फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे महिलेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सानपने २ जून २०१४ रोजी महिलेच्या घरी मद्यपान करून तिलाही मद्य पाजले व बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास पतीस सांगण्याची तसेच आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर साडेतीन वर्षे हा प्रकार सुरू होतो, असा आरोप महिलेने केला आहे.

आपल्यामधील संबंधांची माहिती सांगितल्यास पतीची नोकरी घालविण्याची व त्याला ठार मारण्याची धमकी सानपने दिली. मात्र, महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. सानपचे फोनवर रेकॉर्ड केलेले बोलणेही ऐकविले. तेव्हा सानपने एका पोलिस अधिकाऱ्याला घेऊन महिलेचे घर गाठले व माफी मागितली. पुन्हा त्रास देणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, सानप हा गणेश आगवणे या मित्राकरवी महिलेचा पाठलाग करुन माहिती गोळा करत राहिला. या मित्राने महिलेला ती काम करते त्या ठिकाणी जाऊन धमकी दिली. सानपने महिलेच्या मैत्रिणीला फोन करुन बदनामी केली. महिलेच्या पतीने सानपला जाब विचारला असता त्याने आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पतीसोबत उपनगर पोलिस ठाणे गाठून २६ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. ही तक्रार रात्री पाऊणे बारा वाजेच्या सुमारास नोंदवण्यात आली.

सकाळी सापडला मृतदेह

सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सानप यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे येथील संगम पुलाच्या येथे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. पुण्याहून शिवाजीनगरकडे जात असताना सानप अचानक रेल्वेसमोर जाऊन उभे राहिले. रेल्वे जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

खात्यातंर्गत परीक्षा देऊन पीएसआय

पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या सानपने खात्यातंर्गत परीक्षा दिली होती. नुकतेच प्रशिक्षण घेतलेल्या सानपची पहिलीच नियुक्ती मुंबईत झाली होती. पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असताना सानप महिलेच्या पतीकडे रायटर म्हणून काम करीत होता. त्यातूनच या दोन कुटुंबाची सलगी वाढल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांच्या कुंचल्यांनी साकारली चित्रे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोर, पाण्याचा हंडा घेऊन जाणारी महिला, नदीच्या झुळझुळत्या पाण्यालगतची जैविक सृष्टी या आणि अशा अनेक संवेदनशील विषयांवरील चित्रप्रदर्शनाने नाशिककरांचे लक्ष वेधले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरत असून, विद्यार्थ्यांच्या कलेला नाशिककरांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. पाटील लेनमधील निर्माण हाऊस चौकाजवळील हार्मनी आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू आहे.

सारा माय आर्ट स्टुडिओतर्फे स्टुडंट आर्ट लाइफ प्रदर्शन २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. २०१५ पासून हे प्रदर्शन दरवर्षी भरविले जाते. यावर्षी बालचित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या सुमारे ३०० कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. सोमवारपासून सुरू झालेले हे प्रदर्शन बुधवार (२८ नोव्हेंबर)पर्यंत सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. ज्येष्ठ चित्रकार मुक्ता बालिगा, चित्रकार संजय साबळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हेमंत शेवाळे प्रदर्शनाचे संयोजक आहेत. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि मुलांचे करिअर चांगले घडविण्याकरिता हे प्रदर्शन भरविले जात असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. हे प्रदर्शन नि:शुल्क असून, सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनाला भेट देऊन बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांच्या सेवेत एसटी ‘पास’

$
0
0

चांदवड तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही मिळणार मोफत पास

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

शिक्षणासाठी चांदवड-देवळा तालुक्यातून इतर तालुक्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता परिवहन महामंडळ मोफत पास देणार, असे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले. चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी रावते यांची भेट घेवून यासाठी पाठपुरावा केला. चांदवड तालुका दुष्काळग्रस्त असतानाही लासलगाव आणि पिंपळगाव आगाराने या तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास नाकारला होता. त्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत परखड भूमिका घेत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात चांदवडचा समावेश आहे. त्यानुसार विद्यार्थांना शिक्षणासाठी मोफत पास सुविधा मिळणार होती. मात्र विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी शेजारील लासलगाव, पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयात महामंडळाच्या बसने दररोज प्रवास करतात. मात्र या आगाराने विद्यार्थ्यांना मोफत पासची सुविधा दिली नव्हती. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने विद्यार्थ्याच्या समस्यांना वाचा फोडत २५ नोव्हेंबरच्या अंकात 'मोफत पासला डबल बेल' या शिर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी या वृत्ताची दखली घेत आज, मंगळवारी मुंबई येथे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. रावते यांनी लवकरच शासन निर्णयात बदल करून या भागातील विद्यार्थ्यांनाही मोफत पासची सवलत लागू करणार असल्याची ग्वाही दिली. या निर्णयाचा चांदवड, देवळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

मोफत पास सुविधेबाबत त्वरित कार्यवाही करणार असल्याची मंत्री रावते यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

-डॉ. राहुल आहेर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांसाठी२० कोटींचा निधी

$
0
0

चांदवड : चांदवड व देवळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थ संकल्पात सार्वजनीक बांधकाम विभागाने २० कोटी ७० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. लासलगाव-वाकी-तळेगावरोही-वडगाव पंगु रापली मार्गे, खडकजांब ते खडकओझर, गुऱ्हाळे, देवरगाव, हिरापूर, पाटे, कोलटेक, काजीसांगवी, गंगावे, दुगाव, कोकणखेडे, निमोण, कानडगाव ते मनमाड, राहूड, कळमदरे, सुतारखेडे, हरनूल, पन्हाळे, सोनीसांगवी, रेडगाव, वाहेगावसाळ, वाकी, सोमठाणदेश या रस्त्यात सुधारणा करणे आदी कामासाठी हा निधी मिळाला असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रानवड’ सुरू करण्यासाठी स्वाभीमानीचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करावा यासाठी वारंवार आंदोलन करूनही सरकार जर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत नसेल तर सरकारची 'तिरडी' काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिला आहे.

रानवड येथील के. के. वाघ सहकारी साखर कारखान्याची मुदत संपून पाच महिने उलटले. मात्र निविदा काढण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निविदा काढली तरी ती २५ दिवसांच्या मुदतीची काढू असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा हंगाम पूर्णपणे वाया घालवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप वडघुले यांनी केला आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पार पडली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करून, असा इशारा वडघुले यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकप्रतिनिधी लागले कामाला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिकेतील 'प्रशासकीय' राजवट संपुष्टात आली असून, लोकप्रतिनिधी पुन्हा जोमाने पालिकेत कार्यरत झाले आहेत. महापौर रंजना भानसी आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांनी मंगळवारी खातेप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. मुंढे यांच्या काळात लोकप्रतिनिधींना न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांना लगाम लावण्यास सुरुवात केली आहे. शहरात अस्वच्छता दिसल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याबरोबरच नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन कामे न केल्यास थेट कारवाईचाच इशारा महापौरांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींपासून लांब ठेवत, त्यांना लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे जाण्यास मज्जाव केला होता. महापौरासंह अन्य पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकांना अधिकारी जात नसल्याने लोकप्रतिनिधीच अस्वस्थ झाले होते. त्यामुळे अधिकाराचा वाद सुरू होवून मुंढे आणि पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीच भिडले होते. मुंढे यांच्याकडून नागरिकांना तक्रारी देण्यासाठी नगरसेवकांकडे न जाता थेट अॅपवर तक्रारी देण्याचे आवाहन केले जात होते. दालनात न जाण्याच्या कडक सूचना होत्या. मुंढे यांच्या वागणुकीमुळे पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकही महापालिका कार्यालयात येत नव्हते. परंतु, आता मुंढे यांच्या बदलीनंतर पदाधिकारी आणि नगरसेवक पालिकेत पुन्हा कार्यरत झाले आहेत. पदाधिकारी व नगरसेवकांची पावले पुन्हा एकदा महापालिका मुख्यालयाकडे वळली असून महापौर रंजना भानसी व सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी खातेप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शहराच्या बिघडत्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना महापौरांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या. स्वाइन-फ्लू, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य वैद्यकीय विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देताना डास निर्मूलनासाठी प्रभागनिहाय जंतूनाशक फवारणी व धुरळणी करण्याच्या सूचना मलेरिया विभागाला देण्यात आल्या. बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेले टाकाऊ बांधकाम साहित्य त्वरित उचलावे, साईडपट्ट्यांची स्वच्छता करून तणनाशक फवारण्यात यावे. उद्यान विभागाने उद्यानांतील पालापाचोळा उचलून खेळण्यांची दुरुस्ती करावी, पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. जलवाहिन्यांचे लिकेज दुरुस्त करावेत, अशा सूचना महापौरांनी दिल्या. शहर स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे तसेच उपलब्ध सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहराची नियमित स्वच्छता करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले. विभागीय स्वच्छता निरीक्षकांनी तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी शहर स्वच्छतेची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला. कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना हातगाड्या पुरविण्याच्या सूचना सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केल्या.

आता हयगय नको

दिनकर पाटील यांनी नेहमीच्या शैलीत यावेळी अधिकाऱ्यांना उद्देशून आता हयगय चालणार नाही, अशा इशारा दिला. मुंढे गेल्याने पालिकेचे कामकाज थांबले असे वाटू देऊ नका. ते नसले तरी कामकाज थांबले नाही पाहिजे, असे सांगत तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही सांगा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. स्वच्छतेसाठी हातगाड्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. प्रत्येक अधिकाऱ्याने आपापली जबाबदारी पार पाडावी असे सांगत, हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

शाळांना पाणी द्या, स्वच्छता करा!

महापौरांनी गेल्या महिन्यात केलेल्या प्रभागनिहाय दौऱ्यात सिन्नरफाटा भागातील शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे आढळून आले होते. याचा संदर्भ देत महापालिकेच्या सर्व शाळांमधल्या पाणीपुरवठा व शौचालयांच्या स्थितीबाबत ताडडीने दौरा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या आवाहनानंतर आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे यांना दिले.

मोर्चा की इव्हेंट?

पालिकेच्या आयुक्तपदावरून मुंढेंची बदली झाली असली तरी काही मुंढेसमर्थकांकडून त्यांना परत आणण्यासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी येत्या २९ नोव्हेंबरला समर्थकांकडून मुंढेंना परत आयुक्तपदावर आणण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची इव्हेंटप्रमाणेच तयारी सुरू आहे. नागरिकांना सोशल मीडियावर समर्थनासाठी येण्याचे आवाहन करण्यासोबतच विशेष ऑडिओ क्लिप तयार करण्यात आल्या असून, त्यांचा नागरिकांमध्ये प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे हा मोर्चा की इव्हेंट, अशी चर्चा पालिका वर्तुळात नगरसेवकांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविनाश शिरोडे स्पेस अॅम्बॅसेडर

$
0
0

अमेरिकेच्या नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे निवड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पेस टेक्नॉलॉजीत अधिकाधिक संशोधन व्हावे, विद्यार्थ्यांना स्पेस एज्युकेशनच्या प्रवाहात आणावे, स्पेस टेक्नॉलॉजीच्या संदर्भात असणाऱ्या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, यासाठी खगोलशास्त्रात संशोधनकार्य करणारे आणि नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सचे माजी अध्यक्ष अविनाश शिरोडे आता स्पेस अॅम्बॅसेडर बनले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल स्पेस सोसायटीकडून तीन वर्षांसाठी (२०१८ ते २०२१) शिरोडे यांची स्पेस अॅम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

नासा, इस्त्रो, युरोप आणि फ्रेंच स्पेस एजन्सीमध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, तसेच कमी खर्चात यशस्वी अवकाशयान बवनिण्याच्या तंत्राचे विद्यार्थ्यांना धडे देणे, या विशेष उल्लेखनीय कामागिरीबद्दल शिरोडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एरोनॉटिक्स विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. वाऱ्यावर गाडी चालविणे यासह इतरही संशोधनाचे पेटंट शिरोडे यांच्या नावावर असून, गेल्या कित्येक वर्षांपासून खगोलशास्त्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. अर्ज नोंदणी, खगोलशास्त्रात केलेल्या कार्याचा संपूर्ण अहवाल आणि त्याचे लाइव्ह प्रेझेंटेशन याद्वारे शिरोडेंची निवड करण्यात आली असून, पुढील तीन वर्षांत विद्यार्थ्यांना स्पेस एज्युकेशनकडे वळविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ग्लोबल वॉर्मिंग व इतर समस्यांमुळे पृथ्वी धोक्यात येऊ लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पेस एज्युकेशनकडे वळविणे गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीने खगोलशास्त्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. येत्या काही वर्षांत मंगळावर आणि चंद्रावर जीवसृष्टी साकारण्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीत विद्यार्थ्यांचे संशोधन आवश्यक असून, सौरऊर्जेसाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढील तीन वर्षे कार्य करणार आहे

- अविनाश शिरोडे, इंजिनीअर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटल अभियानाला मुख्यमंत्री येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कळवणसह पाच आदिवासी तालुक्यांमधील रहिवाशांसाठी आयोजित अटल आरोग्य अभियानाच्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही सतर्क झाले असून, मंगळवारी नांदुरी येथे भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला.

आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या तक्रारींचे निदान होऊन त्यांच्यावर उपचार करता यावेत, यासाठी कळवण तालुक्यातील नांदुरी येथे अटल आरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. कळवणसह देवळा, बागलाण, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमधील रहिवाशांना या अभियानाचा लाभ दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधीक्षक संजय दराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, कळवण कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, तहसीलदार कैलास चावडे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, संदीप जाधव आदींनी नांदुरी येथे भेट देऊन अटल आरोग्य शिबिराच्या जागेची पाहणी केली. वाहनतळ, भोजनव्यवस्था, रुग्ण तपासणी कक्ष, मुख्य मंडप, नियंत्रण कक्ष आदी व्यवस्थांबाबत राधाकृष्णन यांनी माहिती घेतली. रुग्णाच्या नोंदणीपासून तो परत जाईपर्यंत त्यास कोणतीही अडचण येणार नाही या दृष्टीने कक्षांची व्यवस्था करा अशा सूचना यंत्रणेला करण्यात आल्या. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शिबिरस्थळी पोहोचणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेलिपॅडच्या जागेचीही पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडी, वाहनांची कमी; रहिवाशांची जास्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट रोडवर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाहतूक कोंडीची समस्या कमी जाणवली. वाहने स्मार्टरोडच्या दिशेने जाणार नाहीत, याची काळजी घेतल्याने हे झाले. दुसरीकडे अशोक स्तंभाजवळ प्रशासनाने तातडीने काही ठिकाणी पंक्चर सुरू करून परिसरातील नागरिकांना व व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

शहर वाहतूक शाखेने सोमवारी उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अशोक स्तंभाकडून मेहेरकडे व वकीलवाडीकडे जाणारी वाहतूक रोखली. अशोकस्तंभाकडे येणाऱ्या वाहनांना रविवार कारंजामार्गे पुढे काढण्यात आले. एमजीरोडकडून येणाऱ्या वाहनांना जिल्हा कोर्टाच्या दिशेने पुढे जाऊ देण्यात आले नाही. परिणामी त्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना दुतर्फा वाहनांना समोरे जावे लागले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी येथील वाहतुकीत बराच फरक होता. अशोक स्तंभ ते एमजीरोड या भागात मोठी बाजारपेठ आणि रहिवाशी परिसर असून, आज त्यांची मात्र कोंडी झाल्याचे चित्र दिसले. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी व महिलांनी आंदोलन छेडून वापरण्यासाठी रस्ता देण्याची मागणी केली. त्यामुळे प्रशासनाने लागलीच सर्कल टॉकीज समोर आणि कृष्णा सिल्क साडी सेंटर दुकानासमोर रस्त्यास पंक्चर करण्याचे काम हाती घेतले. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होऊ शकतो. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पार्किंग व्यवस्था हवी

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर अनेक हॉस्पिटल्स, क्लासेस, व्यावसायिक अस्थापने, बँका असून, येथे येाऱ्या नागरिकांच्या अडचणीत भर पडते आहे. अशोक स्तंभाकडून मेहेर चौकात वाहने येऊ नये म्हणून अशोक स्तंभाजवळ बॅरकेडिंग लावण्यात आले आहे. आतील भागात जाणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने या बॅरकेडिंगजवळ लावली. मात्र, काहीच वेळेत आलेल्या टोइंग व्हॅनने येथील वाहने नेली. रस्त्याचे काम होईपर्यंत आतील भागात कामानिमित्त येणाऱ्या वाहनचालकांसाठी घारपुरे घाटाकडे पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत ४२ लाखांचा गुटखा पकडला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंदी असलेला तब्बल ४२ लाख रुपयांचा गुटखा ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आहे. नाशिक वणी मार्गावरून गुटख्याची बेकायदा वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी पाठलाग करून ही कारवाई केली. या प्रकरणी कर्नाटक राज्यातील चालकास अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून गुटख्यासह आयशर ट्रक असा सुमारे ५३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

उद्धव रामराव राठोड (२३ रा. बिदर, कर्नाटक, हल्ली, पिंपरी चिंचवड) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोमवारी दिंडोरी ते कळवण दरम्यान गस्त घालीत असताना त्यांना ही टीप मिळाली. वणीकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आयशरमध्ये गुटख्याचा साठा असल्याचे कळताच पथकाने करंजखेड फाटा परिसरात सापळा लावला. यावेळी आयशर (एमएच १४ ईएम ३४९७) पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेगात आलेल्या ट्रक चालकाने हुलकावणी दिल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. अर्धा किलोमीटरअंतरावर पोलिसांनी ट्रकला अडविले. या ट्रकमध्ये ४२ लाख ८ हजार ६०० रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी सुपारी मिळून आली. हा सर्व साठा गोण्यांमध्ये भरलेला होता. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. वणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ लाखांच्या निधीस मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सिन्नर, पेठ व येवला तालुक्यासाठी ७५ लाखांचा निधी वितरणास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंजुरी दिली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे दुष्काळी भागात टँकर व निकडीच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवर हा निधी खर्च केला जाणार आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या उपाययोजनाकरिता 'नैसर्गिक आपत्तीत निकडीचा पाणीपुरवठा' लेखाशीर्षाखाली २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला ४ कोटी ७ लाख ५८ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. यातून यापूर्वी २ कोटी ६८ लाख ९५ हजारांचा निधी वितरित करण्यात आला असून, नव्याने पेठ (३ लाख १२ हजार ५५४), सिन्नर (३२ लाख) व येवला (४० लाख) या तीन तालुक्यांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठीचा खर्च करावयाचा असून, त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी सांगितले आहे.

भेटी आणि पाहणी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी मंगळवारी कळवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. नांदुरी येथे भेट देऊन महाआरोग्य शिबिराच्या तयारीची माहिती घेतली. नांदुरी येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळेस भेट देऊन गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांची माहिती घेऊन लाभार्थ्यांशी चर्चा केली. ग्रामपंचायत अभोणा येथे भेट देऊन दप्तराची तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांना शोधणारे ‘आनंद ओवरी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तुकाराम महाराजांचा भाऊ कान्होबा हा त्यांच्यासोबत सावलीसारखा रहात होता. तुकाराम भंडारा डोंगरावर गेले म्हणजे त्यांना शोधून आणणारा, तुकाराम चार आठ दिवस कोठे गायब झाले तर त्यांचा ठाव घेऊन त्यांना पुन्हा घरी घेऊन येणाऱ्या या कान्होबाची कैफियत सादर करणारे नाटक सादर झाले.

राज्य नाट्य स्पर्धेत प. सा. नाट्यगृहात मंगळवारी सुरभी थिएटर्सचे 'आनंद ओवरी' हे नाटक सादर करण्यात आले. तुका वैकुंठासी गेला म्हणजे नक्की काय झाले, याचा शोध घेणारे हे नाटक होते. संत तुकाराम महाराज हे संत म्हणून सर्वांना परिचित होते; परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे कुणीही फार पाहिले नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती, समस्या, तुकाराम महाराजांच्या विरक्त स्वभावामुळे त्यांच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट यावर आनंद ओवरी हे नाटक गोष्ट करते. तुकोबारायांचे बंधू कान्होबा यांच्या दृष्टीकोनातून तुकोबारांयांचे जीवनचरित्र उलगडत जाते. तुकोबा एका अर्थाने बंडखोर कवी. वेदान्त तुकोबारायांच्या अभंगवाणीतून सामान्य जणांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकोबारायांचा इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली होती. तुकाराम हे देखील हाडामांसाचा माणूस होते. त्यांनी भयंकर दुष्काळ पाहिला, घरातल्यांचे मृत्यू डोळ्यादेखत पाहिले. अशा अनुभवांवर त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण झाले होते. ही विरक्तीपेक्षा जीवनानुभूती होती. त्यामुळे तुकारामांकडे त्याच दृष्टीकोनातून बघितले गेले पाहिजे, असे या नाटकातून दाखविले आहे.

आनंद ओवरीचे लेखक दि. बा. मोकाशी असून त्याचे नाट्यरुपांतर व दिग्दर्शन सुरेखा लहामगे यांनी केले. नेपथ्य शैलेंद्र गौतम, प्रकाशयोजना रवी रहाणे, संगीत शुभम शर्मा, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा सुलभा लहामग यांची होती. या नाटकात संदीप कोते, राजेश शर्मा यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

बें बें बकरी

संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

लोगो : \Bराज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या भाजपच्या तीन नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. या सदस्यांना अपात्र करण्याबाबतची फाइल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या टेबलवर पोहोचली असून, त्यावर बुधवारी (दि. २७) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सुरगाणा नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या गटनेत्यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हिप सदस्यांना बजावला होता. मात्र, या निवडणुकीत दोन महिला नगरसेविकांसह एका नगरसेवकाने व्हिप मोडत पक्षविरोधी काम केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाईअंतर्गत या तिन्ही सदस्यांचे पद रद्द करावे, अशी विनंती गटनेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यावर जिल्हाधिकारी बुधवारी निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट -

$
0
0

\Bआज सुन्नी इज्तेमा\B

नाशिक : भद्रकाली परिसरातील बागवानपुरा येथे बुधवारी (२८ नोव्हेंबर) सुन्नी इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये शहजाद-ए-सदरुश्शरीआ हुजूर मोहद्दीसे कबीर मुफ्ती जियाउल मुस्तफा कादरी व दामादे हुजुर मोहद्दीसे कबीर हजरत मुफ्ती शाहीद रजा अमजदी उपस्थित राहतील. ताजुश्शरिया कमिट व नौजवानाने अहले सुन्नत बागवानपुरा यांच्या वतीने इज्तेमा होणार आहे. खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन खतीब अध्यक्षस्थानी असतील. हजरत वासिक रजा कादरी आणि नाकिबे अहेले सुन्नत मोहम्मद ईरफान रजा अजहरी यांचे प्रवचन होईल.

\Bआज जलाभिषेक\B

नाशिक : अयोध्येत श्रीरामाचे मंदिर लवकरात लवकर व्हावे, यासाठी अयोध्येतील शरयू नदीच्या पाण्याने बुधवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी ८.३० वाजता जलाभिषेक होणार आहे. पंचवटीतील काळाराम मंदिरात हा जलाभिषेक होईल, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.

\Bरविवारी व्याख्यान\B

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तकमित्र मंडळातर्फे 'हेही गांधी तेच' या विषयावर प्रसिद्ध लेखक व प्रकाशक रामदास भटकळ यांचे २ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळक पथ, नाशिक येथे हे व्याख्यान होईल. पुस्तकमित्र मंडळाचे प्रमुख रमेश कडलग, सुभाष सबनीस व सावाना कार्यकारी मंडळाने ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात ३५६ उमदेवार रिंगणात

$
0
0

धुळे महापालिका निवडणुकीत माघारीअंती चित्र स्पष्ट; सर्व पक्षांकडून प्रचार सुरू

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी ४६७ उमेदवारांपैकी १११ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७३ जागांसाठी ३५६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

दरम्यान, प्रभाग १२ वगळता उर्वरित सर्वच प्रभागातील उमेदवारांना मंगळवारी (दि. २७) चिन्ह वाटप करण्यात आले, असून आज (दि. २८) पासून प्रचाराचा रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. या निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून मैदानात आहेत. माघारीमुळे निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झालेले असून बऱ्याच प्रभागांमध्ये चौरंगी, तिरंगी लढती पाहायला मिळत असून काही प्रभागांमध्ये सरळ लढती आहेत.

गेल्या दोन पंचवार्षिक पासून महापालिकेत केवळ तीन जागांवर समाधान मानणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत मात्र सर्व शक्ती पणाला लावत ७३ पैकी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. मुस्लिमबहुल प्रभाग वगळता सर्वच जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपकडून रणनिती आखण्यात आलेली आहे. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक रिंगणात दाखल झाले आहेत.

‘आघाडी’ला फटका?
महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसशी हात मिळवून आघाडी स्थापन केली आहे. आघाडीच्या माध्यमातून ७३ पैकी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. यामध्ये विद्यमान महापौरांसह आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवकांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज पदाधिकारी भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीने आता काही नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. याचा आघाडीला फटका बसण्याची शक्यताही जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेकडून तरुणांना संधी
शिवसेनेकडून महापालिकेच्या निवडणूक रिंगणात स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. त्यामध्ये ७३ पैकी ५० जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये दोन महानगरप्रमुखांसह आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांनाही संधी मिळाली आहे. तसेच नवीन तरुण उमेदवारांना शिवसेनेकडून संधी मिळाली आहे.

गोटेंच्या समर्थकांना वेगवेगळे निवडणूक चिन्ह
महापालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी चिन्ह वाटप करण्यात आले. या वेळी भाजप विरोध स्वाभिमानी भाजप लोकसंग्रामतर्फे निवडणूक रिंगणात सर्वच ७३ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. परंतु, आमदार गोटे हे लोकसंग्राम पक्षाकडून ‘शिट्टी’ या चिन्हसला पसंती देतात. मात्र, आदर्श आचारसंहितेचे पालन करीत नियमानुसार लोकसंग्राम किंवा आमदार गोटे समर्थकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एकच चिन्ह देण्यास नकार दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा आमदार गोटेंचे स्वप्न भंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत गोटेंनी प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असता नियमानुसार एकच चिन्ह देता येणार नसल्याचे सांगण्यात आले यामुळे आ. गोटेंच्या समर्थकांना निरनिराळ्या निवडणूक चिन्हांवर आता प्रचार करावा लागणार आहे.

निवडणूक मैदानातील उमदेवार...
स्वाभिमानी भाजप लोकसंग्राम.......७३
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी....६९
भाजप.....................................६२
शिवसेना...................................५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फौजिया यांची उमेदवारी रद्दच; सपाच्या अन्सारी फातिमा बिनविरोध

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

धुळे महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या फौजिया अन्सारी बानो यांचे नामांकन सोमवारी (दि. २६) खंडपीठाने बहाल केले होते. यास समाजवादी पार्टीच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अन्सारी फातीमा नुरूल अमीन यांनी आव्हान दिले होते. फौजिया यांनी आपले वय १९ वर्षे असल्याचे नामांकन अर्जात म्हटल्याची बाब खंडपीठासमोर लपविली असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकारामुळे खंडपीठाने फौजिया बानो यांचे नामांकन रद्द ठरविले. खंडपीठाच्या निर्णयामुळे प्रतिस्पर्धी समाजवादी पार्टीच्या उमेदवार अन्सारी फातीमा यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जात प्रमाणपत्र न जोडणे, उमेदवारी अर्जावर सूचक अनुमोदकाची स्वाक्षरी नसणे, अपत्य प्रमाणपत्र न जोडणे, वैधता प्रमाणपत्र जोडणे परंतु जात प्रमाणपत्र जोडलेले नसणे, पडताळणी अर्जाच्या खाली उमेदवाराची स्वाक्षरी नसणे , तीनपेक्षा जास्त अपत्ये, मनपाचे कंत्राटदार असणे अशा स्वरूपाच्या काही किरकोळ तर काही गंभीर चुका व आक्षेप यावरून नामनिर्देशन रद्द केल्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाला २८ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावर खंडपीठाचे न्या. एन. एम. जामदार यांनी सर्व याचिका फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्णय कायम ठेवलेला आहे. धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ अ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार फौजिया अन्सारी बानो यांचे नामांकन खंडपीठाने सोमवारी बहाल केले होते. बानो यांचे वय १९ वर्षे असून महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार नगरसेवक म्हणून निवडणूक लढविण्यासाठी २१ वर्षे वयाची अट आहे. बानो यांचे वय १९ वर्षे असल्याने त्यांचे नामांकन रद्द केल्याची बाब खंडपीठातील सुनावणी प्रसंगी लपविण्यात आली. केवळ नामांकन अर्जावर इतरत्र स्वाक्षरी असल्याने रद्द केल्याचे सांगण्यात आले होते. निवडणूक आयोग आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराने ही बाब खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज सादर करून निदर्शनास आणून दिली. त्यामुळे खंडपीठाने सोमवारी दिलेला आपला निर्णय मागे घेत फौजिया बानो यांचे नामांकन रद्द केले. यामुळे आता संबंधित प्रभागात बिनविरोध निवडीची घोषणा करावी लागणार आहे. महापालिकेच्या वतीने अमोल सावंत, निवडणूक आयोगातर्फे शिवाजी टी. शेळके, याचिकाकाकर्त्या अन्सारींतर्फे पवन पवार यांनी काम पाहिले.


‘ती’ व्हायरल क्लिप कोणाची?
धुळे महापालिकेच्या निवडणुकीतील रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांच्या भानगडी वेशीवर टांगल्या जात असल्याने प्रचाराला वेगळेच वळण मिळू पाहत आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. २७) सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअॅपच्या काही ग्रुप्सवर मंगळवारी (दि. २७) दोन व्यक्तींचे संभाषण व्हायरल होत आहे. त्यात आमदार गोटे यांना जीवे ठार मारण्याबाबतचे संभाषण असून, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे संभाषण व्हायरल झाल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. या ऑडिओ क्लिपमधील बोलणारे दोन व्यक्ती कोण आहेत, ती क्लिप केव्हाची आहे यांसारखे अनेक प्रश्न या वेळी उपस्थित होत असून, पोलिसांकडून आता सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अशा नकारात्मक गोष्टी निवडणूकीच्या कालावधीत होत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् रेल्वेस्थानकावर झाली महिलेची प्रसुती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर एका गरोदर महिलेने मंगळवारी सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला. रेल्वे स्थानकावरील व्यावसायीक, अधिकाऱ्यांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित महिलेच्या चेहऱ्यावर प्रसववेदनेनंतर हास्य फुलले होते.

मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुनीता विशाल गायकवाड व त्यांची मावशी मीरा अनिल पाथरे (देवगाव) या दोन्ही महिला लासलगाव रेल्वे स्थानकावर उभ्या होत्या. त्यांना चाळीसगाव तालुक्यातील मोहुणबारे या ठिकाणी जाण्यासाठी काशी एक्स्प्रेसची वाट पाहत होते. रेल्वेगाडी आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे रेलरोको आंदोलन सुरू असल्यामुळे गाडीला उशिर झाला. यादरम्यान सुनीता गायकवाड या महिलेला लासलगाव रेल्वे स्थानकातच प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांच्यासोबत असलेल्या मीरा यांना या कठिण परिस्थितीमुळे रडू आले. त्या मदतीची याचना करीत असताना याच फलाटावरील कँटीनचे संचालक नितीन शर्मा त्यांच्या मदतीला धावले. शर्मा यांनी 'कोणी डॉक्टर आहे', अशी हाक दिली. रेल्वेस्थानकाजवळ दवाखाना असलेले डॉ. विजय केंगे हे लागलीच मदतीला धावे. तोपर्यंत शर्मा यांनी स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवासी महिलेकडून साडी, शाल घेतली व अडोसा केला. त्यानंतर शर्मा यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली. मात्र रुग्णवाहिका येण्याआधीच सुनीता यांनी एक मुलाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि बाळंतीणीला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

सदर प्रसूत झालेली महिला सुनीता विशाल गायकवाड ही मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील आहे. त्या आपल्या आईकडे चाळीसगावला मावशीसोबत जात होत्या. नितीन शर्मा यांच्यासह लासलगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक समाधान सुरवाडे, डॉ. विजय केंगे, नितीन शर्मा व रेल्वे पोलिस कर्मचारी व महिला प्रवासी मदतीसाठी धावून गेल्या. स्थानकावर काजी सांगवी येथील बेबी वाघ या महिलेने नवजात बालकाचा सांभाळ केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images