Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शाकाहार मनुष्यासाठी सर्वोत्तम

$
0
0

शाकाहार मनुष्यासाठी सर्वोत्तम

डॉ. अनिरुद्ध धर्मधिकारी यांचा सल्ला

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आजच्या धकाधकीच्या जीवनात खाण्याच्या वाईट सवयी जडल्या आहे याशिवाय वाढते वजन व वाढत चाललेला मानसिक तणाव हा हृद्यविकारांसाठी महत्वाचा घटक बनला आहे. त्यासाठी आहार, विहार, विकार नियंत्रित असणे आवश्यक आहे आणि आजच्या आधुनिक मानव जीवनशैलीत शाकाहार हा सर्वोत्तम आहार असल्याचे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.

नाशिक तालुकास्तरीय योग शिबिराच्या समारोप्रसंगी ते उपस्थित योगसाधकांशी संवाद साधत होते. यावेळी मंचावर पतंजलीचे मंडल प्रभारी योगाचार्य गोकुळ घुगे,

चंद्रकांत गोडसे, योगशिक्षक सुदेश आमेसर, मिलिंद भुतडा, सुनीता सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजक नगरसेविका आशा गोडसे यांनी प्रास्ताविकातून मानवासाठी योग ही काळाची गरज असल्याचे सांगत करा योग रहा निरोगी असा संदेशही दिला. यावेळी योगाचार्य घुगे यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना मनुष्य जीवनात गायीचे अनन्य साधारण महत्त्व विशद करतांना गायीच्या विविध जाती व त्यांचा मानवी जीवनाला होणारा फायदा याबाबत माहिती दिली. याप्रसंगी डॉ. स्नेहल सोनवणे, प्रा. सुनीता आडके, अॅड. अशोक आडके, परमजीत सिंग कोचर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

---

११० साधकांची आरोग्य तपासणी

पाच दिवस चाललेल्या या योग्य शिबिराच्या समारोप्रपसंगी संतकृपा हॉस्पिटलच्या सहकार्याने ११० साधकांची डॉ. मनीष बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तशर्करा,

रक्तदाब, इसीजी, नेत्र, मोतीबिंदू आदी प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘एसएमएस’ सेवा

$
0
0

निवृत्तांसाठी 'एसएमएस' सेवा

मोबाइल नोंदणीसाठी महालेखापालांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा हिशेब काही केल्या समजत नाही. एकीकडे सरकार म्हणते पेन्शनमध्ये वाढ झाली पण ती नक्की कधीपासून झाली, किती पैसे हातात येणार याचा उलगडा होत नाही. आपल्या पेन्शनबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांसाठी महालेखापाल मुंबई यांच्या कार्यालयाने एसएमएस सेवा सुरू केली आहे.

या एसएमएस सेवेतून भविष्य निर्वाह निधी खात्याची वर्तमान स्थिती व निवृत्ती वेतनाच्या मंजुरीची वर्तमान स्थिती याची माहिती नोंदणीकृत मोबाइल नंबरवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आपला मोबाइल नंबर या खात्याच्या वेबसाइटवर नोंदणे आवश्यक आहे. आपला मोबाइल नंबर www.agmaha.cag.gov.in या वेबसाइटवर अपडेट करावा. ज्या कर्मचाऱ्यांना वेबसाइटवर जाऊन मोबाइल नंबर अपडेट करणे जमणार नाही अशा कर्मचाऱ्यांना पोस्टाद्वारेदेखील आपला मोबाइल नंबर रजिस्टर करता येणार आहे. पोस्टकार्डवर आपला मोबाइल क्रमांक लिहून वरिष्ठ सेवा अधिकारी, निधी विविध, महालेखापाल(ले.व.ह) १, महाराष्ट्र, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-४०००२० या पत्त्यावर पाठवावा. महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन प्रदानाच्या व अंतिम प्रदानाच्या आदेशाची प्रत ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे. तसेच निवृत्ती वेतनाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी grievances.mh1.ae@cag.gov.in या ईमेल आयडीची निर्मिती केली आहे, त्यावर देखील आपण तक्रार नोदवू शकतो. निवृत्त होणाऱ्या कर्मचार्ऱ्यांचे निवृत्ती वेतन व अंतिम प्रदान प्रकरणे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सहा महिने आधी, संबंधितांचा मोबाइल क्रमांक अर्जावर नमूद करून या कार्यालयास पाठविण्याची गरज आहे असे महालेखापाल यांनी कळविले आहे.

…----

ज्येष्ठ नागरिकांना कम्युटर ऑपरेट करता येत नाही. त्यामुळे रजिस्टर पोस्टाने मोबाईल नंबर अपडेट करण्याची चांगला सोय केली आहे. हीच सोय एसएमएस द्वारे केली असती तर आणखी चांगले झाले असते.

उत्तमराव तांबे, फेस्कॉम पदाधिकारी

-----

पेन्शन कमी जास्त आली की, बँकवाले सांगतात सांगतात पेन्शन ऑफिसला विचारा, आता पेन्शन ऑफिस पेन्शनबाबत घडणारे अपडेट कळवणार असल्याने सोयीचे होईल.

अनंत घोलप, अध्यक्ष फेस्कॉम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगत्वावर जिद्दीची ‘जयश्री’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अपंगत्व नशिबी आल्यावर समाज आणि व्यवस्था अशा दोघांच्या उपेक्षेचे धनी व्हावे लागते. परंतु, अशाही परिस्थितीत कुटूंबीयांचा सकारात्मक आधार आणि स्वतःकडील दुर्दम्य इच्छाशक्ती या दोन आयुधांच्या जोरावर अपंगत्वावर मात कशी करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिद्दी नेमबाज जयश्री टोचे. लहानपणीच डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन दिले गेल्याची किंमत जयश्रीला उजवा पाय गमावून चुकवावी लागली. एवढेच काय, तिला हात गुडघ्यावर ठेवूनच चालण्याची दुर्दैवी वेळ आली. यावेळी तिचे वय होते अवघे तीन वर्षांचे. हसण्या बागडण्याच्या वयातच जयश्रीवर अपंगत्व झेलण्याची वेळ आल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्काच बसला. परंतु, अशाही परिस्थितीत तिच्या आई वडिलांनी हार न मानता तिच्यावर देशातील विविध ठिकाणी उपचार करून जयश्रीला तिच्या 'पायावर' उभे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळाले. जयश्रीनेही आपले अपंगत्व मनातून झिडकारले आणि आई वडिलांच्या कष्टाला नेमबाजी खेळातून सुवर्णयशाचे तोरण बांधले.

जयश्री टोचे हे नाव सध्या नाशिकच्या क्रीडा क्षितिजावर चमकते आहे. जयश्री एका सामान्य कुटुंबातील मुलगी. वयाच्या तिसऱ्या वर्षीच तापावर उपचारादरम्यान डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन दिले गेल्याने ही धडधाकट मुलगी कायमची अधू झाली. तिच्या आई-वडिलांनी तिच्यावर हर तऱ्हेचे उपचार केले. विशाखापट्टणम येथील एका दवाखान्यात तिच्यावर ऑपरेशन केले. परंतु, फायदा झाला नाही. नुकतीच तिच्या पायावर राजस्थानमधील उदयपुर येथील श्री नारायण सेवा संस्थानमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे ती आता काही प्रमाणात हाताचा आधार न घेता पाऊल टाकू शकली आहे.

आपल्या अपंगत्वाची कधी तक्रार न करता जयश्रीने शालेय, महाविद्यालयीन आणि इंजिनीअरिंगच्या शिक्षणात यश मिळविले. शिवाय तिने नेमबाजीसारख्या खेळातही राष्ट्रीय पातळीवर सुवर्णयशाला गवसणी घालून आपण कुठेही कमी नसल्याचे सिद्ध केले आहे. नाशिकचे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू हंसराज पाटील यांच्यापासून जयश्रीने प्रेरणा घेत प्रशिक्षक मोनाली गोरे , श्रद्धा नालंबर, तेजस्विनी सोनपटकी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या एक्सेल टार्गेट शुटिंग क्लबमध्ये कठोर मेहनत घेत विविध स्पर्धांत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अवघ्या काही वर्षांतच जयश्रीने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. आतापर्यंत जयश्रीने जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या (२०१७) स्पर्धेत पॅरा कॅटेगरीत कांस्य पदक, कर्नाटकातील हुबळी येथील खुल्या शूटिंग राष्ट्रीय स्पर्धेत (२०१८) सुवर्णपदक, गुजरातमधील अहमदाबाद येथील वेस्ट झोन शूटिंग स्पर्धेत (२०१८) रौप्यपदकाची कमाई केलेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा असलेल्या राज्य शुटिंग स्पर्धेतही तिने यश मिळविले आहे. तामिळनाडूत झालेल्या जी. व्ही. मावळणकर राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेतही (२०१८) जयश्रीने सहभाग नोंदवला होता.

व्यवस्थेकडून उपहास

प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या जयश्रीला मात्र तिच्या अपंगत्वाचा समाजासह व्यवस्थेकडून उपहास केला जात असल्याची वारंवार प्रचिती येते. तिच्यासारखीच्या अपंगत्वाची दखल घेण्याऐवजी कमी लेखून कधी कधी खिल्लीही उडविली जात असल्याचा अनुभव सांगताना जयश्री हळवी होते. समाज व व्यवस्था अपंग म्हणूनच वागवते. सकारात्मक पाठिंबा क्वचितच मिळतो, असे ती सांगते. खेळाच्या करिअरमध्येही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या क्षेत्रातही वर्चस्ववादाचे राजकारण असल्याचे ती सांगते. तक्रार करण्याचीही सोय नाही. तक्रार केल्यास टार्गेट केले जाण्याची व करिअरवर पाणी फेरण्याची शक्यता जास्त असल्याचे तिचे म्हणणे आहे. शासकीय अधिकाऱ्यांची कायम मनधरणी करावी लागत असल्याचे तिने सांगितलेले वास्तव विस्तवासारखे असल्याचे वाटते. अशाही परिस्थितीत केवळ जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावर मात करून नेमबाजीसारख्या खेळात सुवर्ण यशाला गवसणी घालणाऱ्या आणि पॅरा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवणारी जयश्री नाशिककरांसाठी नक्कीच एक अभिमानास्पद खेळाडू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनव शिक्षक म्हणून रोहिणी जोशी यांचा सन्मान

$
0
0

रोहिणी जोशी यांचा सन्मान

पंचवटी : मॅकेडिया एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ युनायटेड अरब अमिरात यांनी आयोजित केलेल्या लीडरशीप एक्सिलन्स अॅवॉर्डमध्ये जेम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रोहिणी जोशी यांना सर्वाधिक अभिनव शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या विविध योगदानासाठी भारतातील एकवीस शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. दुबई येथे झालेल्या या कार्यक्रमात पारपंरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन आणि शाळेत आनंददायी नाविन्यपूर्ण शिक्षण तंत्रशिक्षण विकसित करण्याकरिता सर्जनशील मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी आणि कादंबरी तंत्रासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधू-वर मेळाव्यांची गरज

$
0
0

लोगो - सोशल कनेक्ट

वधू-वर मेळाव्यांची गरज

आमदार पंकज भुजबळ यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नाची रेशीमगाठ जुळविण्यासाठी वधू-वरांना एकाच व्यासपीठावर आणणारी वधू-वर मेळावा, ही संकल्पना दृढ होणे गरजेचे आहे. वधू-वर मेळाव्यांमुळे वधू-वरांची सर्वांना माहिती होते. या माध्यमातून लग्नाची लवकर बांधली जाते. तसेच समाजातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यक्तिसोबतचे हितसंबंध यामाध्यमातून अधिक घट्ट होण्यास मदत होते. वधूंची कमी असलेली संख्या विचाराधीन घेता, प्रत्येक समाजात वधू-वर मेळाव्यांची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार पंकज भुजबळ यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले वधू-वर मंडळाच्या वतीने रविवारी राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत हा मेळावा झाला. मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार पंकज भुजबळ, नगरसेविका सुप्रिया खोडे, चंद्रकांत खोडे आणि कुसुम शिंदे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या मेळाव्यासाठी राज्यभरातून १ हजाराहून अधिक वधू-वरांनी हजेरी लावली. मेळाव्यात वधू-वरांची ओळख करून देण्यासाठी, व्यासपीठावर प्रोजेक्टक स्क्रिनचा वापर करण्यात आला. त्यामुळे अनुरूप जोडीदाराची निवड करणे वधू-वरांना सोपे झाले होते. या मेळाव्याचे संयोजन गिरीश बच्छाव, शंतनू शिंदे, रमेश गायकवाड, सुरेश गायकवाड, फकीर लोंढे, महेश दरोडे, शेखर भुजबळ, विनायक पवार, भारती शेलार आणि मुरलीधर पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुडहुडी वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना यंदाची थंडी हुडहुडी भरविणार असे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानही खाली उतरत असून, दिवसभर वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. पुढील आठवडाभरात थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

नाशिकच्या थंडीची देशभरातील पर्यटकांना भुरळ पडते. येथील वातावरण आल्हाददायक असल्याने हिवाळ्यामध्ये जिल्ह्यात पर्यटकांचा ओघही वाढतो. अगदी चार अंशांच्या खाली तापमान जात असल्याने ही थंडी हुडहुडी भरविते असा गेल्या काही वर्षांचा सर्वांचाच अनुभव आहे. यंदाही बोचरी थंडी नाशिककरांना अनुभवास येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील किमान तापमान ११ ते ११.५ अंश सेल्सियसच्या दरम्यान असल्याचे निरीक्षण हवामान विभागाने नोंदविले आहे. किमान तापमान घसरत असतानाच आता कमाल तापमानातही लक्षणीय घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. गेले काही दिवस ३० अंश सेल्सियसच्या जवळपास असलेले कमाल तापमान रविवारी २६ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. कमाल तापमान कमी होऊ लागल्याने दिवसभर नागरिक वातावरणातील गारठा अनुभवत होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षाही तीन अंशांनी कमी झाले असून, गारठा वाढत जाणार असल्याचे संकेत त्यातून मिळू लागले आहेत. किमान तापमानही ११.४ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले आहे. पुढील आठवडाभरात किमान तापमान ९ अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ८ डिसेंबरपर्यंत कमाल तापमानही घसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, पुढील आठवड्यापासून खऱ्या अर्थाने थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

दिनांक किमान तापमान कमाल तापमान

२७ नोव्हेंबर ११.२ ३१.५

२८ नोव्हेंबर ११.६ २९.८

२९ नोव्हेंबर ११.३ ३०.३

३० नोव्हेंबर १०.८ २९.९

१ डिसेंबर ११.२ २६.२

२ डिसेंबर ११.४ २६.१

पुढील आठवड्याचा अंदाज

३ डिसेंबर ११.० २६.०

४ डिसेंबर ११.० २६.०

५ डिसेंबर १०.० २५.०

६ डिसेंबर १०.० २५.०

७ डिसेंबर ९.० २५.०

८ डिसेंबर ९.० २५.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माघारीसाठी मनधरणी अन् दबावही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या. या निवडणुकीत माघार घ्यावी यासाठी अनेक उमेदवारांवर दबावतंत्राचा वापरही करण्यात आला. तर काहींनी आपल्याला पॅनलमध्ये घ्यावे यासाठी अनेकांची मनधरणी केली. त्यामुळे सोमवारी माघारीसाठी मोठी गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे.

या निवडणुकीत वैध अर्जाची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता माघारीचे वेध लागले आहेत. त्यासाठी १ ते ४ डिसेंबर ही मुदत दिली आहे. एक डिसेंबर रोजी कोणीच माघार घेतली नाही. दोन डिसेंबरला रविवारची सुटी असल्यामुळे माघारीचा दुसरा दिवसही गेला. त्यामुळे ३ व ४ डिसेंबर हे माघारीसाठी मिळणार आहेत. त्यामुळे ३ डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एकाच पॅनलकडून अर्ज भरलेले डमी उमेदवार सोमवारी माघार घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पॅनलचे समर्थक असलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी आश्वासनही दिले जात आहे. यातील काही उमेदवारांना तज्ज्ञ संचालक करू असे सांगून त्यांचा राग कमी केला जात आहे. रविवारी सुटी असली तरी हा दिवस निवडणुकीसाठी मात्र महत्वाचा ठरला. पॅनलची तयारी करण्यासाठी ठिकठिकाणी वैयक्तिक बैठका, चर्चा व संपर्क करण्याचे काम सुरू होते. बहुतांश जणांना माघारीसाठी व मनधरणी करण्यासाठी फोनाफोनी सुरू होती.

२०० उमेदवार रिंगणात

वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात २०० उमेदवार आता रिंगणार आहे. त्यात सर्वाधिक गर्दी ही सर्वसाधारण गटातील १८ जागांसाठी झाली आहे. येथे १६७ उमेदवार रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे महिला राखीव गटासाठीच्या दोन जागांसाठी २२, तर अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस


एचआयव्ही बाधितांच्या औषधांचा तुटवडा

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvePravinMT

नाशिक :

एचआयव्हीबाधितांची भिस्त औषधांवरच अवलंबून असल्याने सरकारपासून आरोग्य यंत्रणेपर्यंत सारेच त्यांच्याकडे नियमित औषधसेवनाचा आग्रह धरतात; परंतु सिव्हिल हॉस्पिटलसह अन्य सरकारी हॉस्पिटल्समध्ये एचआयव्हीबाधित लहान मुलांच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या एक- दीड महिन्यापासून औषधे मिळत नसल्याने या बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. औषधे खरेदी करण्याची ऐपत नसल्याने या बालकांना औषधांशिवाय राहावे लागते आहे.

स्वत:ची कोणतीही चूक नसताना जिल्ह्यात सुमारे ६५० बालकांना एचआयव्ही एड्स या असाध्य आजाराची लागण झाली आहे. आईवडिलांच्या चुका, एचआयव्ही संसर्गित सुई अथवा सिरिंजचा वापर आणि एचआयव्हीबाधित मातेकडून तिच्या बाळाला अशा प्रकारांमधून ही बालके एचआयव्ही संसर्गाचे सावज ठरली आहेत. या मुलांची प्रकृती खालावू नये, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता एआरटीच्या माध्यमातून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून त्यांना Abacavir lamivudine आणि Nevirapen drug ही औषधे मिळू शकलेली नाहीत, अशी कैफियत पालकांनी मांडली आहे. या औषधांचा तुटवडा असण्याबाबत आरोग्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनीदेखील दुजोरा दिला आहे. मात्र, ती केव्हा उपलब्ध होणार याबाबतही अनिश्चितता वर्तविली आहे. ही औषधे महागडी असल्याने एचआयव्हीबाधित बालकांच्या पालकांना ती खासगी मेडिकलमधून खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे औषधांच्या नियमित सेवनात खंड पडला आहे. परिणामी, अशक्तपणा, अन्य साइड इफेक्ट यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी त्यांना भेडसावू लागल्या आहेत. एचआयव्ही जनजागृतीसाठी सरकारकडून यंदा know your status ही संकल्पना राबविली जात असताना सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधे उपलब्धतेबाबतचे स्टेटस त्यांच्याकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंध - बाबा पवार

$
0
0

बंध - बाबा पवार

मुलीच मुली!

पिंपळगाव जोपूळ रस्त्यावरील बेलबागेतील गणपत जगताप त्यांच्या नऊ महिन्यांच्या मुलीला माझ्याकडे गोवर कांजण्यांची लस देण्यासाठी घेऊन आला. साल होते १९७६. बालिकेला लस टोचताना माझे लक्ष तिच्या आईकडे गेले आणि माझ्या लगेच लक्षात आले की, गणपत दुसऱ्यांदा पितृत्वाच्या तयारीत आहे.

चार महिन्यांनी त्याला दुसरी मुलगी झाली. ती दहा महिन्यांची असताना तो तिला लस द्यायला घेऊन आला. तर पुनश्च तिच गत. मला रहावले नाही, मी गणपतला म्हणालो, 'अरे गणपत, दोन अडीच वर्षांचं अंतर ठेव.'

गणपत उत्तरला, 'यावेळी मुलगा झाला तर लगेच नसबंदी करून घेणार आहे.' पुढे १९७९ साली तोच पाठा. पुढील दहा वर्षात गणपत सहा मुलींचा बाप झाला. मग तो वडनेरला ब्राह्मणाकडे गेला. गुरुजींनी अभ्यास करून त्याला सांगितले की, 'या जन्मी तुला पुत्रप्राप्ती नाही.' पण गणपतला मुलगा हवाच होता. विमनस्क होऊन तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'अंबु गुरुजींनी सुमनकडून मला मुलगा होणार नाही असं सांगितलं. दुसरं लग्न करावं म्हणतो, करू का?'

गणपत तेव्हा चाळीशीत होता. अत्यंत कष्टाळू आणि हाडाचा शेतकरी होता. मी विचार केला XY व XX क्रोमोझोन याला समजविण्यात अर्थ नाही. त्याला समजेल अशाच भाषेत त्याला सांगावं. मी त्याला विचारले, 'तुला बाजरी काढायची असेल तर तू काय पेरशील?'

गणपत उत्तरला, 'बाजरी.'

'अन् गहू काढायचे असतील तर?'

'गहू!'

तर मग तू हे लक्षात घे. स्त्रीची भूमिका ही जमिनीसारखी असते आणि तू तुला बेणं समज. सौम्य शब्दात त्याला मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. पण गणपतरावाच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. त्याला मुलगा हवाच होता. गोरठाणच्या एका गरीब कुटुंबातील वीस वर्षीय मुलीशी त्याने लग्न केलं. पुढच्या पाच वर्षात त्याला तीन कन्या झाला. सालाबादप्रमाणे त्याने पुन्हा चान्स घेतला. तेव्हा कुणीतरी इंदूजवळच्या एका बाबाचा पत्ता दिला. बाबाने त्याला पुत्रप्राप्तीसाठी मंत्र टाकून अर्धाकिलो अंगारा दिला. पुढील नऊ महिने रोज पत्नीच्या नाभीखाली पोटावर गणपतनेच लावायचा असा मंत्र दिला. अंगाऱ्यालाही मुलगीच झाली.

ही सत्यकथा लिहावीशी वाटली ती एका वेगळ्याच पार्श्वभूमीवर. मला लिहायचे होते वेगळेच. मी सुरुवात केली व मला गणपत आठवला आणि फाटा फुटला असा. माझ्या या त्रेचाळीस वर्षाच्या दीर्घ व्यवसायात अवघे सहा सात सहकारी माझ्या सेवेत आले. त्यास जुन्या भाषेत कम्पाऊंडर म्हणतात. पहिला नामदेव. चार पाच वर्षे त्याने चांगली सेवा दिली. त्याला वडील नव्हते. एकुलता एक मुलगा. त्याच्या आईला जाण्यापूर्वी नातवाचे तोंड पाहायचे होते. म्हणून तिने अठरा वर्षांच्या नामदेवचा भावाच्या सोळा वर्षांच्या मुलीशी विवाह लावून दिला. त्याला सहा वर्षात तीन मुली झाली. मग तो त्याच्या गावी गेला.

नंतर आला दत्तू विधाते. खूप गरीब, कष्टाळू. दत्तूचे वडील क्षमेकरी होते. म्हणून त्याच्या आईने वयाच्या विसाव्या वर्षी जानोरीच्या काठेंच्या मुलीबरोबर उजळून टाकले. हेतू एकच. नातवाचे तोंड पाहायचे. दत्तूने सहा वर्षात तीन कन्यांचे तोंड आईवडिलांना दाखविले. पुढे दत्तूने वीस गुंठे द्राक्षबाग लावली व त्याने त्याच्या चुलतभावास माझ्या हवाली केले. तोही माझ्या सेवेत पाच सहा वर्षे राहिला. त्याचे लग्न मोहाडीच्या वाघांच्या पुष्पाबरोबर झाले. त्या पाच बहिणी. भाऊ नव्हता. वीस वर्षांनी बाळू मला नाशिकला पाइपलाइन रस्त्यावर भेटला. 'मुलं काय करतात?' म्हणून त्याला विचारले तर हसून म्हणला, 'बाबा, मला तीन मुलीच आहेत' बाळूनंतर मोतीरामने काही वर्षे माझ्याकडे काम केले.

मोतीराम खूप स्मार्ट होता. मी त्याला विनोदाने माझ्या सर्व कम्पाउंडर्सना तीन तीन मुली झाल्याचे सांगितले. त्यालाही पहिली मुलगीच झाली अन् त्याने माझ्याकडची नोकरी सोडली. गेली अठरा वर्षे गोकूळ माझा उजवा हात आहे. त्याला माझे सगळे पेशंट, नातेवाईक ओळखतात. कारण तोही फार कष्टाळू आणि हुशार आहे. माझ्यासारखाच संगीतप्रेमी आहे. खूप छान तबला वाजवतो अन् त्यालाही तीन मुलीच आहेत.

( लेखक ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक व साहित्यप्रेमी आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना सुरेल स्वरांची ऊब

$
0
0

ही इव्हेंट विभागाची बातमी आहे

-

फोटो : पंकज चांडोले यांनी काल हा फोटो सोडला आहे

-

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

विख्यात गायक शौनक अभिषेकी यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकीने कुडकुडणाऱ्या नाशिककरांवर धरलेली सुरेल स्वरांची ऊब.. नव्या दमाच्या, पण तेवढ्याच ताकदीच्या तरुण कलावंतांनी सतार, व्हायोलिन अन् तबल्याची जमविलेली अफलातून जुगलबंदी नाशिककर रसिकांसाठी जणू पर्वणीच ठरली. तालवाद्य कचेरी अन् एकल सतारवादनासारख्या बहारदार संगीत नजराण्याने शनिवारची सायंकाळ केवळ सूरमयीच नव्हे, तर शब्दश: श्रीमंत करून गेली. निमित्त होते स्वरसेतू आणि स्वरझंकार आयोजित 'एक सूरमयी संध्याकाळ' या कार्यक्रमाचे.

उस्ताद अझीझ खान यांच्या स्मरणार्थ भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. 'मटा कल्चर क्लब'च्या सदस्यांसह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायक शौनक अभिषेकी, सतारवादक शाकीर खान, सुधीरदास महाराज, विश्वास ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर अभिषेकी यांच्या बहारदार गायनास सुरुवात झाली. राग गावतीमध्ये त्यांनी 'आस लागी तुम्हारी चरण की' ही बंदीश सादर केली. अभिषेकी यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकीला नाशिककर रसिकांनी मनमुराद दाद दिली. बंदिशीमधील प्रत्येक शब्दाचा अर्थ अन् भाव अभिषेकी यांनी आपल्या सुश्राव्य गायनासह आलापीद्वारे रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविले. त्यांना सुभाष दसककर (संवादिनी), सुभाष कामत (तबला), सत्यजित बेळेकर आणि तन्मय जोशी यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. त्यानंतर सितार, व्हायोलिन आणि तबल्यामधील जुगलबंदीने रसिकजनांना आनंदाची अनुभूती दिली. शाकीर खान (सितार), तेजस उपाध्ये (व्हायोलिन) आणि आदित्य कल्याणपूर (तबला) या नव्या दमाच्या, पण तेवढ्याच कसलेल्या वादकांच्या कलेला नाशिककरांनी मनापासून दाद दिली. पं. सुरेश तळवलकर आणि सावनी तळवलकर यांच्या तालवाद्य कचेरीने या सूरमयी संध्याकाळची रंगत अधिकच वाढविली. उस्ताद शाहीद परवेझ खान यांचे सतारवादन आणि आदित्य कल्याणपूर यांनी तबल्यावर केलेल्या साथसंगतीने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सन्मान नव्हे जबाबदारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणारे अनेक दिग्गज असून, ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, याची खंत वाटते. सन्मान म्हणून नव्हे, तर जबाबदारी म्हणून हे पद स्वीकारल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि शब्द मल्हार प्रकाशनाच्यावतीने कुसुमाग्रज स्मारकात ढेरे यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सन्मानाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह व्यासपीठावर हेमंत टकले, मकरंद हिंगणे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना ढेरे म्हणाल्या, 'मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची उंची मी जाणते. त्या पदाइतकी माझी उंची नाही. म्हणूनच सन्मान म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून मी हे पद स्वीकारले आहे. नाशिककरांनी केलेला हा सन्मान कविकुळातील आनंद शतगुणित करणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी मधल्या पिढीतील असल्याने मला पाय ठेवायला सुपीक जमीन मिळाली. त्यामुळे मला अधांतरी राहावे लागले नाही, हे मी माझे भाग्य समजते. मिथकातील स्त्रियांशी जोडून घेणे आणि त्यांच्याबद्दलचा नवा विचार पुढे आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ढेरे यांनी केले. साहित्यात सत्तानिरपेक्ष सामर्थ्य असते. त्यावर सरकारचादेखील अंकुश नसतो. त्यामुळे अध्यक्षपदाचा उपयोग साहित्याच्या माध्यमातून समाजासाठी भरीव काही करण्यासाठी नक्की केला जाईल, अशी ग्वाही ढेरे यांनी यावेळी दिली. भाषा आणि नदी प्रवाही असते. परंतु, नदीकाठची गावं अशी ओळख आता पुसत चालली असून हे प्रगतीचे साइड इफेक्ट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोदावरी खोऱ्यासाठी काहीतरी करायला हवं, अशी भावना व्यक्त करतानाच आपण बोलतो ती मराठी भाषादेखील शुद्ध असावी असा आग्रह प्रत्येकाने धरायला हवा. भाषा ही 'जुनं ठेवणं' नाही. ती समृद्ध आहे. ती अधिक अचूक आणि शुद्धतेने वापरण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विक्रम गोखले नतमस्तक

अरुणा ढेरे या साहित्य क्षेत्रातील सृजनशील माता आहेत, असे गौरवोद्गार काढत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांना हात जोडून प्रणाम केला. मनोगत व्यक्त करीत असतानाच ते ढेरे यांच्यासमोर येऊन नतमस्तक झाल्याने ढेरेंसह सभागृहातील अनेकांना गहिवरून आले. सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त होते. पण या भीतीपासून दूर करणारे अरुणा ढेरे, मधु मंगेश कर्णिक यांसारख्या अनेक साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य आहे. असे साहित्य आपण वाचले आहे, हे सांगणारी पिढी तयार व्हायला हवी अशी अपेक्षा गोखले यांनी व्यक्त केली. अरुणा ढेरे यांच्याकडे मी लेखिका म्हणून नव्हे तर आई म्हणून पाहतो. साहित्य निर्मितीची केवढी बीजं त्यांच्यामध्ये आहेत. सृजनशील माताच हे करू शकते असे म्हणत ते ढेरे यांच्यापुढे नतमस्तक झाले. संस्कृती प्रथम की परंपरा, याचा विचार बुद्धिवादी साहित्यिकांसह वाचकांनी करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ढेरे यांनी मराठी भाषा शिकविणाऱ्यांचे मराठी चांगले व्हावे याकरीता जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हा माझ्या लेकीचा सन्मान

मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका घेऊन साहित्यिकांमध्ये स्पर्धा कशासाठी लावायला हवी, असा सवाल मधु मंगेश कर्णिक यांनी उपस्थित केला. साहित्यिकांचे आखाडे लावून महाराष्ट्राची करमणूक करू नका अशी मागणी मी अनेक वर्ष करीत आहे. भूगोलशून्य स्वामित्वाचे हे पद असून, त्यासाठी निवडणुका नसाव्यात असे ठाम मतही मांडले. रसिकत्वातून होणारी नियुक्ती परमोच्च आनंद देणारी असते. ढेरे यांच्या नियुक्तीतून महामंडळाला ही सुबुद्धी सुचली, याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. हे संमेलन म्हणजे शारदेचा देव्हारा आहे. तेथे विराजमान होणारी मूर्ती ही अरुणासारखी सरस्वतीच असावी, असे गौरवोदगार त्यांनी काढले. हा माझ्या लेकीचा सत्कार आहे. मराठी भाषेला ठोस दिशा देण्याचे काम तिने करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविजा सिंगल फर्स्ट आयर्न लेडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑस्ट्रेलियात झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकची रविजा सिंगल (वय १९) ही युवती चमकदार कामगिरी करून देशातील कमी वयातील फर्स्ट फुल आयर्न लेडी ठरली आहे. रविजा ही पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची कन्या असून, यापूर्वी सिंगल यांनीही आयर्न मॅनचा किताब पटकावला आहे.

ऑस्ट्रेलियात घेण्यात आलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत रविजा सहभागी झाली होती. अवघ्या १९ वर्षांच्या रविजाने आयर्नमॅन स्पर्धा १५ तास ५४ मिनिटांत पूर्ण केली. त्यामध्ये तिने ३.८ किलोमीटर स्विमिंग एक तास १० मिनिटांत पूर्ण केले. ९० किलोमीटर सायकलिंग ७ तास ५७ मिनिटांत, तर ४२.२ किलोमीटर रनिंग ६ तास ३९ मिनिटांत पूर्ण केले. ती यंगेस्ट एशियन गर्ल, द फर्स्ट यंगेस्ट इंडियन गर्ल आणि नाशिकची फर्स्ट फुल आयर्न लेडी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तिरथ मे तो सब पानी’

$
0
0

'तिरथ में तो सब पानी'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनुष्य प्राण्याचं आयुष्य सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा गोष्टींबरोबर व्यापलेलं असतं, दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्यावर कोणत्या ना कोणत्या विषयाने संवाद सुरू होतो. सामाजिक स्तरावरचा विषय केव्हा व्यक्तिगत स्तरावर येतो हे दोघांनाही समजत नाही आणि त्यातून घडत जाते नाट्य महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्यावतीने आयोजित ५८ व्या राज्य नाट्य स्पर्धेत 'तिरथ में तो सब पानी' या नाटकाचा प्रयोग संस्कृती नाशिक या संस्थेच्यावतीने रविवारी सकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सादर झाला.

नाटकाची सुरुवात होते तेव्हा एक स्त्री, मिसेस साने आणि एक पुरुष, मिस्टर राजापूरकर हे रस्त्यावर उभे असतात. यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. हे दोघेही स्त्री पुरुष रात्री उशिरापर्यंत रिक्षाची वाट पहात थांबलेले असतात. खूप वेळ होऊन जातो तरीही रिक्षा मिळत नाही आणि लगेचच पाऊस सुरू होतो. त्यावेळी दोघांच्या संवादाला सुरुवात होते. स्वत:बद्दल, स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल, भूतकाळाबद्दल ते दोघेही रात्रभर बोलतात. मनुष्य प्राण्याचं आयुष्य हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक गोष्टींबरोबर सर्वात जास्त व्यापलेले असते. एखादी स्त्री धार्मिकतेचा बाऊ करून एखाद्या महाराजांच्या सर्वात जास्त अधिन होते तेव्हा तिला भानावर आणण्यासाठी सांगावे लागते की, तिरथ में तो सब पानी हैं. तिचे महाराजांना अधिन होणे, स्वत: तिचे समाधानी असणे राजापूरकरच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीबद्दल असे अनेक प्रवाह या नाटकात आहे.

नाटकाचे लेखन सुरेश राघव यांचे होते तर दिग्दर्शन व प्रकाश योजना विनोद राठोड यांची होती. निर्मिती प्रमुख शाहू खैरे, नेपथ्य गणेश सोनवणे, पार्श्वसंगीत अमोल काबरा, वेशभूषा किशोरी शेळके, रंगभूषा माणिक कानडे, मंच वस्तु वैशाली खाटिकमारे यांची होती नाटकाला विशेष सहाय्य रवींद्र कदम व सुनील ढगे यांचे होते. नाटकात प्रमुख भूमिका लक्ष्मी गाडेकर व प्रशांत हिरे यांनी साकारल्या.

---------

आजचे नाटक

विजय नाट्य मंडळ

'व्हईल ते दणक्यातच'

लेखक - नेताजी भोईर

दिग्दर्शक - नंदा रायते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्ध भारतासाठी स्वच्छ भारत आवश्यक

$
0
0

स्वच्छतेतूनच घडेल समृद्ध भारत

खासदार गोडसे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्ध भारत घडविण्यासाठी स्वच्छ भारत असणे आवश्यक असून स्वच्छ भारतच समृद्ध भारत घडवू शकेल. या कार्यात सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील वर्षी २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे ध्येय पूर्ण करायचे आहे, यासाठी प्रचार, प्रसार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९निमित्त सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता जनजागृती मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फील्ड आऊटरीच ब्यूरो तसेच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने के. जे. मेहता हायस्कूल येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेच्या निमित्ताने एकाच दिवशी नाशिक महानगरपालिकेच्या ९० प्राथमिक आणि १३ माध्यमिक शाळांमधून द्यार्थ्यांच्या जनजागरण फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने के. जे. मेहता हायस्कूल येथे आयोजित मुख्य जनजागरण रॅलीचे उद्घाटन खासदार गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते विविध शाळांच्या रॅलींचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक घेतलेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित या रॅलींमधे स्वच्छताविषयक घोषवाक्यांनी पूर्ण शहर दुमदुमले. या वेळी बोलताना नगरसेवक संभाजी मोरूस्कर म्हणाले की पंतप्रधानांनी स्वच्छ भारताचे एक मोठे स्वप्न बघितले होते. सर्व देशवासियांच्या मदतीने हे स्वप्न निश्चितच पूर्णत्वास येईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नीळे यांनी केले. कार्यक्रमात अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. या वेळी औरंगाबाद येथील आभा कला मंच या कला पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेवर आधारित चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक संभाजी मोरूस्कर, मनपा शिक्षणाधिकारी उदय देवरे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, विद्यालयाच्या प्राचार्य अलका दुनबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊबदार कपड्यांचा बाजार गरम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना सध्या गारठ्याने गाठले असून त्यापासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या आठवड्यापासून किमान तापमानात होत असलेली घट थंडीचे प्रमाण वाढविण्यास कारण ठरत आहे. नाशिकच्या या गुलाबी थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी फॅशनेबल स्वेटर, जॅकेट्स खरेदीकडे नाशिककरांची पावले वळू लागली आहेत.

शहरात सकाळी व रात्री गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. किमान तापमानातही घट झाली असून ११.४ अंश सेल्सिअसवर तापमान स्थिरावले आहे. शनिवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण असल्याने शहरवासियांना सूर्यदर्शनही झाले नाही. यामुळे थंडीत प्रचंड वाढ झाली असून थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. विविध प्रकारचे जॅकेट्स, स्वेटर, स्वेटशर्ट, हातमोजे, पायमोजे, स्टोल्स, कानपट्टी, मफलर खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. लहान मुले व व पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बॉम्बर जॅकेट हा त्यातीलच एक प्रकार महिलावर्गाला आकर्षित करत असून, महाविद्यालयीन तरुणींची स्वेटरच्या तुलनेत या जॅकेट्सला चांगली पसंती आहे. याशिवाय, लोकरीपासून बनविलेल्या श्रग्ज खरेदीसाठीकडे महिलावर्गाचा चांगला कल आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांबरोबरच, मॉल्समध्येही या कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. विशेष म्हणजे, ब्रॅण्डेड कपड्यांवर हिवाळ्यानिमित्त ऑफर्स देण्यात आल्याने नाशिककर मॉल्समध्येही खरेदीला प्राधान्य देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम बेळे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

$
0
0

राम बेळे यांना जीवनगौरव पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील असंघटित शिक्षकेतरांना एका छताखाली आणून सन १९६६-६७ च्या काळात राज्यस्तरावरील संघटना बांधण्याचे काम करणारे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळची मुहूर्तमेढ रोवणारे राम बेळे यांना महाराष्ट्र खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगौडा या त्यांच्याच शिष्याच्या हस्ते संघटनेचा हा पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बेळे यांनी शिक्षकेतरांना पेन्शन योजना लागू करावी यासाठीही मोठा लढा उभा केला होता. पुरस्कार प्रदानाप्रसंगी नाशिक विभागीय सचिव बोराडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर कासार, संघटक सुधीर काकडे, अतुल कुलथे, विलास येवले, महेश रहाटळ आणि बेळे यांच्यासह सर्व बेळे परिवार उपस्थित होता. याप्रसंगी राम बेळे यांच्या जीवनकार्याचा परिचय व कार्यवृत्तांत सतीश नाडगौडा यांनी मांडला. बेळे परिवाराच्यावतीने संजय व विनय बेळे यांनी आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक- सांस्कृतिकी

$
0
0

नाशिक- सांस्कृतिकी

सोमवार, ३ डिसेंबर

व्याख्यानमाला

कार्यक्रम : शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला

स्थळ : शंकराचार्य न्यास संकुल, गंगापूररोड

दिनांक : ३ ते ९ डिसेंबर

वेळ : संध्याकाळी ६.३० वाजता

ठळक विशेष : या व्याख्यानमालेत स्वामी स्वरुपानंद सरस्वती विविध विषयांवर प्रबोधन करणार आहेत.

…------

समाधी दिन

कार्यक्रम : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा

स्थळ : वरद गणेश मंदिरासमोरील मैदान, मेरी लिंक रोड, अमृतधाम

दिनांक : ५ डिसेंबरपर्यंत

वेळ : पहाटे ५ वाजता

ठळक विशेष : संत ज्ञानेश्वर महाराज समाधीदिनानिमित्त दिवसभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

…---

राज्यनाट्य स्पर्धा

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्यावतीने आयोजित ५८ वी राज्यनाट्य स्पर्धा

दिनांक : ६ डिसेंबरपर्यंत

वेळ : सायंकाळी ७ वाजता

स्थळ : परशुराम साइखेडकर नाट्यगृह, टिळकपथ

ठळक विशेष : व्हईल ते दणक्यातच (३ डिसेंबर), अखेरचं बेट (४ डिसेंबर), विसर्जन (५ डिसेंबर), डोगरार्त (६ डिसेंबर)

…---

बुधवार, ५ डिसेंबर

कीर्तन

कार्यक्रम : प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्यावतीने किर्तनाचे आयोजन

दिनांक : ५डिसेंबर

वेळ : सायंकाळी ५ वाजता

स्थळ : प्रौढ नागरिक मित्र मंडळ हॉल, डिसुझा कॉलनी

ठळक विशेष : ह. भ. प. सिन्नरकर महाराज यांचे या कार्यक्रमात कीर्तन सादर होणार आहे.

…----

सभा

कार्यक्रम : विश्व हिंदु परिषदेच्यावतीने संत सभा

दिनांक : ५ डिसेंबर

वेळ : सायंकाळी ६ वाजता

स्थळ : गाडगे महाराज पुतळा

----

शुक्रवार, ७ डिसेंबर

कथाकथन स्पर्धा

कार्यक्रम : सार्वजनिक वाचनालय, नाशिक व आचार्य अत्रे कट्टा अंतर्गत कुटुंब रंगलय काव्यात आयोजित 'आजीने सांगितलेली गोष्ट ' कथाकथन स्पर्धा

दिनांक : ७ डिसेंबर

वेळ : सायंकाळी ६ वाजता

स्थळ : औरंगाबादकर सभागृह , सावाना, टिळकपथ

ठळक विशेष : या स्पर्धेत सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभाग नोंदविता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडीए’त नाशिकचा वाढता टक्का

$
0
0

१२ विद्यार्थ्यांचे परीक्षेत यश; राज्यात अव्वल

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या (एनडीए) १४२ व्या तुकडीसाठी व भारतीय नौदल अॅकॅडमीच्या १०४ व्या तुकडीच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ९ सप्टेंबर रोजी देशपातळीवर घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत नाशिकमधून १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. ही कामगिरी राज्यात अव्वल ठरली आहे.

देशभरातून सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातून केवळ ६ हजार ९०० विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शहरातील डिफेन्स मार्गदर्शन हर्षल आहेरराव यांच्या बारा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओंकार घोगरे, श्रीधर कठळे, प्रथम बाजड, स्वानंद कुलकर्णी, अथर्व खैरनार, हर्षद चंदरे, करण उगले, गौरव गायकवाड, आनंद यादव, अथर्व जाधव, आकाश काकड आणि समीर वाघोडे यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या मुलाखती संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी सुरू होतील. या मुलाखतीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वैद्यकीय चाचण्यानंतर एनडीए किंवा नौदल अॅकॅडमीच्या प्रशिक्षणासाठी दाखल होतील.

..

एकाच तुकडीत प्रथमच यश

राज्यभरात डिफेन्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधून इतक्या मोठ्या संख्येने एकाच तुकडीतून यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा नाशिकमधून मोठी आहे. या प्रवेश परीक्षेतील यशानंतर जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या मुलाखती आणि त्यानंतरच्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी घेण्यात येऊन यातील यशस्वी विद्यार्थी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तीनही दलातील अभ्यासक्रमासाठी जुलै दरम्यान दाखल होतील.

...

गेल्या दशकभराच्या तुलनेत नाशिकमधील विद्यार्थ्यांचा संरक्षण क्षेत्रातील करिअरमध्ये टक्का वाढतो आहे. या क्षेत्राकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होत असल्याने हा बदल घडत आहे.

- हर्षल अहिरराव, डिफेन्स करिअर मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात प्रचार शिगेला

$
0
0

भाजपसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अनुचित प्रकारांवर यंत्रणेची नजर

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. रविवारी (दि. २) सुटी असल्याने उमेदवारांनी आपापल्या प्रभागात सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. काहीच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी आता प्रचाराला वेग देत प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे. भाजपसमोर आमदार अनिल गोटे यांचे आव्हान असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीनेही पुन्हा महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या रविवारी (दि. ९) महापालिकेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेसह पोलिसही सतर्क झाले आहेत.

धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध नाट्यमय घडामोडी सुरूच आहेत. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भाजपचे मंत्रीविरुद्ध स्वाभिमानी भाजपचे आमदार असा सामना या ठिकाणी पाहायला मिळत असून, ही भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी आपली सत्ता टिकवत अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. शिवसेना व अपक्षांकडून आपणच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावाही केला जात असल्याने घोडामैदानात कोण बाजी मारणार, हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल.

थंडीत राजकीय वातावरण तापले
मात्र, ऐन थंडीत आलेल्या महापालिका निवडणुकीमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रचारासाठी विविध परवानगी घेण्यातच प्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांचा वेळ खर्च होत आहे. त्यामुळे प्रचाराला हवा तसा वेग आलेला नव्हता. मात्र परवानगी मिळाल्यानंतर लागलीच प्रचाराला सुरुवात करण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रचाराला वेग आला आहे.

पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा सज्ज
महापालिकेच्या मतदानपूर्वीच्या रात्रीतून अर्थपूर्ण घडामोडींना वेग येण्याची शक्यता लक्षात घेता अखेरचे ३६ तास डोळ्यात तेल घालून पहारा दिला जाणार आहे. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अधीक्षक पांढरे म्हणाले, निवडणुकीदरम्यान होणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासन अलर्ट झालेले आहे. मतदानाच्या दिवशी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यात ९७ पोलिस अधिकारी, १ हजार २०० कर्मचारी, राज्य राखीव पोलिस बल गटाची १ प्लाटून, ४ दंगा काबू पथके, ८०० होमगार्ड असा पोलिस बंदोबस्त असणार आहे. शिवाय, जिल्ह्यातील सर्व अधिकारी महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात राहणार आहेत. मतदारांना प्रलोभने देण्यासह दहशत निर्माण करण्याचे प्रकार रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविली असल्याचेही ते म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रचार, अप्रचार यावरही नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासाठी सायबर सेल कार्यतत्पर राहणार आहे, अशीही माहिती अधीक्षक पांढरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images