Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

प्रात्यक्षिकांचा थरारनौदल सप्ताहानिमित्त कोची

0
0

प्रात्यक्षिकांचा थरार

नौदल सप्ताहानिमित्त कोची येथील राजेंद्र मैदान येथे नेव्हल ऑपरेशन्स प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केरळचे राज्यपाल पी. सताशिवम यांनी प्रात्यक्षिकांची मुख्य पाहुणे म्हणून पाहणी केली. यावेळी अंगावर काटा आणणाऱ्या प्रात्यक्षिकांनी नौदलाने आपले सामर्थ्य दाखविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर परवानाच निलंबित!ऋ

0
0

वाहतुकीचे पाच नियम मोडणारे रडारवर

...

हे आहेत नियम

- ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह

- मोबाइलवर बोलणे

- सिग्नलचे उल्लंघन करणे

- राँगसाईड वाहन चालविणे

- माल वाहतूक वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीवघेण्या अपघातांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या पाच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास वाहनचालकाचा परवाना जप्त करून त्याचा वाहन परवाना थेट निलंबित करण्यात येणार आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, मोबाइलवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन, राँगसाईड, तसेच माल वाहतूक वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे अशा पाच नियमांचा यात समावेश आहे.

रस्ते अपघातांचा प्रश्न गंभीर होत असून, नाशिक शहरात वर्षागणिक सरासरी दीडशे ते दोनशे आणि जिल्ह्यात सहाशे ते सातशे नागरिकांचे दरवर्षी बळी जातात. यंदा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असून, दुचाकी चालक जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने एक विशेष अद्यादेश काढला आहे. वरील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, रस्ते अपघात होण्यामध्ये मद्यप्राशन, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, सिग्नल जम्पिंग करणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन राँगसाईडने पुढे नेणे तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवाशांची वाहतूक होणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. एवढे असूनही वाहनचालक सीटबेल्ट किंवा हेल्मेट सारख्या महत्त्वाच्या सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर नवीन आदेशानुसार वाहनचालकांचे परवाने थेट निलंबित करण्यात येणार आहेत. यापूर्वी वाहन परवाना निलंबित करण्यासाठी वाहनचालक दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करताना सापडणे आवश्यक होते. यावेळेस ही अट काढून टाकण्यात आली असून, आता पहिल्या वेळीस वाहनचालक सापडला तरी थेट कारवाई करता येणार आहे.

...

आरटीओचे काम वाढणार

वाहन परवाना देण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केले जाते. त्यामुळे वाहन परवाना निलंबित करण्याचे कामसुध्दा आरटीओ विभागालाच करावे लागणार आहे. या नवीन नियमानुसार वाहतूक पोलिस लवकरच कारवाई हाती घेणार असून, यामुळे आरटीओच्या कामात भर पडणार आहेत. त्यातच आरटीओने वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. पूर्ण पुराव्यानिशी आलेल्या प्रस्तावांवरच आरटीओकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यात वाहनचालकावर झालेली कारवाई, त्याअनुषांगाने फोटोग्राफ्स, आवश्यकता असल्यास सिव्हिल हॉस्पिटलचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलेले आहे.

..

लायसन्स निलंबित होणाऱ्या केसेसची यंदाची स्थिती

नियम - केसेस - दंड

मद्यप्राशन करून वाहन चालविणे - ४४१ - ७,६७,०००

मोबाइलवर बोलणे -२५३० - ५,०६,०००

सिग्नल जम्पिंग - ७६२७ - १५,२५,४००

राँग साईड - ३१९६ - ६,३९,२००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनोदी बाजाचे ‘व्हईल ते दणक्यातच’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गावाकडच्या लोकांनी नटसम्राट नाटक करायला घेतले. त्यांच्याकडे शहरी लोकांसारखा कावेबाजपणा नाही. त्यांना अस्सल मनोरंजनच द्यायचे आहे. त्यामुळे आपापल्या परीने ते या नाटकात पात्र आणतात. गावाकडची ती सारी पात्र आपापल्या स्वभावगुणधर्मानुसार नाटकातील कलाकार पार पाडतात आणि त्यातून गावकऱ्यांचे मनोरंजन होते. अशा आशयाचे हे नाटक होते.

राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी विजय नाट्य मंडळ प्रस्तूत, नेताजी भोईर लिखित 'व्हईल ते दणक्यातच' हे नाटक सादर करण्यात आले. रंगमंचावर एकाच वेळी अनेक पात्रांचा मनोरंजनात्मक धुमाकूळ हे दादांच्या नाटकाचे वैशिष्ट्य होते, ते नेहमीप्रमाणे जपण्यात आले. खेडेगावातील मंडळी सांस्कृतिक कलेत नेहमी रमलेली असतात. तमाशाबरोबर नाटकाचेही वेड त्यांच्या रोमारोमात भरलेले असते. जे करायचे ते जिद्दीने, मनापासून आणि प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन होईल असे. त्यात शहरी बेगडीपणा नाही याच वेडातून बऱ्याच वेळा आपल्याला न पेलणारी नाटके घेऊन आपल्या ग्रामीण प्रेक्षकांकरिता पाहिजे तसा पदरचा मालमसाला टाकून एकंदर प्रयोगाजा कसा चोथा करून बोजवारा उडवतात हे या नाटकात दाखवण्यात आले आहे. तात्यासाहेब शिरवाडकरांचे नटसम्राट हे प्रख्यात नाटक या ग्रामीण मंडळींनी बसवायला घेतले तर काय बहार येईल हे चित्र डोळ्यासमोर येते. नाटकात पाटलांसहीत सर्वांनी नुसती हौस भागवून घेतली आहे.

दिग्दर्शन सुनंदा रायते यांचे तर नेपथ्य किरण भोईर, संगीत वरुण भोईर, प्रकाशयोजना रवी रहाणे, वेशभूषा रेखा भोईर, संजय जरीवाला, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात राजेंद्र जव्हेरी, किरण भाईर, नामदेव ओहोळ, वरुण भोईर, अभिजीत काळे, कृष्णा रघुवंशी, पूनम भागडे यांनी भूमिका केल्या.

...

आजचे नाटक

अखेरचं बेट

विजय शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था

स्थळ : प. सा. नाट्यस्पर्धा

वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीए, लष्करी हद्दीत महापालिकेला ‘नो-एंट्री’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील वृक्षांची संख्या कळावी यासाठी वृक्षगणना हाती घेतली असली, तरी सुरक्षेचे कारण देत या वृक्षगणनेसाठी महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) आणि देवळातील लष्करी हद्दीत महापालिकेला या यंत्रणांनी नकार कळवला आहे. आता या क्षेत्रातील वृक्षांच्या जिओ टॅगिंगवर फुली मारावी लागली आहे. आर्टिलरी सेंटर व 'एमपीए'मधील किमान वृक्षसंख्या तरी कळवा, असे आर्जव महापालिकेला करावे लागले आहे.

महापालिकेच्या वतीने दीड-दोन वर्षांपासून वृक्षगणनेचे काम सुरू आहे. या वृक्षगणनेसाठी टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. मुंबई या मक्तेदार कंपनीला काम देण्यात आले असून, २१ नोव्हेंबर २०१६ पासून या वृक्षगणनेच्या कामाला सुरुवात केली होती. महापालिकेने २००५-०६ मध्ये केलेल्या वृक्षगणनेत शहरात १५ लाख वृक्ष असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे नव्या वृक्षगणनेत २५ लाख पेक्षा अधिक वृक्ष आढळतील, असा महापालिका प्रशासनाचा अंदाज होता. महापालिकेने वृक्षगणनेसाठी सव्वा दोन कोटींचा खर्च मंजूर केला आहे.

दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या सर्वेक्षणाता आथापर्यंत शहरात पालिकेच्या अंदाजापेक्षा दुपटीने वृक्ष आढळले आहे. सद्यस्थितीत शहरातील वृक्षगणना ४८ लाखांवर पोहचली आहे. मात्र, अद्यापही आर्टिलरी सेंटर-तोफखाना केंद्र, तसेच 'एमपीए'च्या हद्दीतील वृक्षगणना झालेली नाही. या क्षेत्रात वृक्षगणनेसाठी महापालिकेने अनेक वेळा केंद्रीय संरक्षण खाते, तसेच 'एमपीए'ला पत्र पाठविले आहे. परंतु, सुरक्षेचे कारण देत महापालिकेची वृक्षगणनेची मागणी या दोन्ही विभागांकडून फेटाळण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त (उद्यान) शिवाजी आमले यांनी स्वत: या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना वृक्षगणनेसाठी परवानगी देण्याची विनंती केली; परंतु तीदेखील फेटाळण्यात आली. त्यामुळे महाापालिकेची वृक्षगणाच अडचणीत सापडली आहे.

निदान वृक्षसंख्या तरी कळवा

महापालिकेच्या वृक्षगणनेत प्रत्येक वृक्षाचे जिओ टॅगिंग केले जाते. मनपाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे वृक्षाचे प्रत्यक्ष ठिकाण कळते. यामुळे 'एमपीए' आणि आर्टिलरी सेंटरच्या सुरक्षेचा मुद्दा उभा राहू शकतो. त्यामुळे या यंत्रणांनी महापालिकेच्या पथकाला नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आता जिओ टॅंगिंगचा नाद सोडला असून केवळ वृक्षगणना करण्याची तयारी सुरू केली आहे. यास्तव या दोन्ही यंत्रणाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वृक्षगणनेसाठी प्रवेश दिला जात नसेल तर संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनाच वृक्षगणनेचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत वृक्षगणनेचे काम पूर्ण करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित विभागांना सादर करण्याची तयारी केली होती; परंतु तो देखील फेटाळल्याने निदान तुम्हीच वृक्षांची संख्या कळवा, अशी मागणी महापालिकेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थापिकाविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा

0
0

सिन्नर नगरपालिकेतील प्रकार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीजपुरवठ्यासाठी ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात चार हजार २०० रुपयांची लाच मागणाऱ्या सिन्नर नगरपालिकेच्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापकाविरुद्ध अॅण्टी करप्शन ब्यूरोने गुन्हा दाखल केला. ३० ऑक्टोबर रोजी याबाबत पडताळणी करण्यात आली होती. संशयिताविरुद्ध सिन्नर पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. नीलेश मोतीराम बाविस्कर, असे संशयित सहाय्यक मिळकत व्यवस्थापकाचे नाव आहे.

सिन्नर येथील मंडप आणि लाइट डेकोरेशन व्यावसायिकाने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने फटाके स्टॉलसाठी तात्पुरत्या बांधलेल्या ४२ गाळ्यांना वीजपुरवठा करण्याकामी नगरपालिकेकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. या अर्जाचा लवकर निपटारा लावण्यासाठी तक्रारदाराने नगरपालिकेत जाऊन बाविस्करची भेट घेतली. मात्र, त्याने ना हरकत दाखल्याच्या मोबदल्यात शंभर रुपये प्रतिगाळा याप्रमाणे चार हजार २०० रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. सापळ्याची चाहूल लागल्याने एसीबीने लावलेला सापळा अयशस्वी झाला. मात्र ३० ऑक्टोबर रोजी सापळापूर्व पडताळणीत बाविस्कर दोषी आढळून आला होता. त्यानुसार, त्याच्याविरुद्ध सोमवारी (दि.३) सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी-कर्मचारी अथवा खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएलचा संप पुढे ढकलला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप करावे, पेन्शन रिव्हिजन, पेन्शन अंशदान मूळ वेतनावर व्हावे, आदी मागण्यांसाठी 'ऑल युनियन अॅँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल'तर्फे सोमवारपासून (दि. ३) देशव्यापी बेमुदत संप करण्यात येणार होता. मात्र, प्रशासनाने संघटनेशी चर्चा करण्याची तयारी दाखवल्याने हा संप तूर्त मागे घेण्यात असल्याचे युनियनच्या वतीने सांगण्यात आले.

'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' ने केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा न झाल्यास १० डिसेंबरपासून पुन्हा संप पुकारण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे. संघटनेने पुकारलेल्या संपाबाबत दूरसंचार विभागाचे सचिव आणि 'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' यांच्यात दिनांक २ रोजी बैठक झाली. सरकारी नियमानुसार फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप, पेन्शन रिव्हिजन, बीएसएनएलद्वारे पेन्शन अंशदान देण्याच्या मुद्द्यामध्ये सुधारणा करण्यार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तरीही तृतीय वेतन पुनरावृतीच्या प्रकरणात बोलणी आडली आहे. या विषयाच्या स्थितीवर दूरसंचार सचिवाने दिलेल्या उत्तराने 'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' चे समाधान झाले नाही. या मागण्यांबाबत संचार राज्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी 'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' संघटनेने एक आठवड्यासाठी संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संचार राज्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. योग्य समाधान न झाल्यास १० डिसेंबरपासून अनिश्चितकालीन संप सुरू होईल, अशी माहिती अनिल पाटील, शशिकांत भदाणे व दिलीप गोडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता पाणीपट्टीचा शॉक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार नवीन मिळकतींना एकीकडे सहापट दंडात्मक घरपट्टी वसुलीच्या नोटिसा पाठविल्या जात असतानाच, आता या मिळकतींना पाणीपट्टीचा नवा शॉक बसणार आहे. या मिळकतधारकांना ज्या पद्धतीने पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी आकारणी केली जाणार आहे, त्याच पद्धतीने व्यावसायिक दराने पाणीपट्टीची आकारणी करण्यात येणार असून, निवासी मिळकतींना व्यावसायिक पाणीपट्टी दराने बिले पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आधीच लाखोंच्या घरपट्ट्या हातात पडलेल्या मिळकतधारकांना व्यावसायिक पाणीपट्टीची बिले प्राप्त होण्यास सुरुवात झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात नव्याने सापडलेल्या ६२ हजार मिळकतींपैकी ३२ हजार मिळकतींची पडताळणी पूर्ण झाली असून, या मिळकतींना विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावण्यास आल्या आहेत. उर्वरित पडताळणी होत असलेल्या ३० हजार मिळकतींनाही नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. या मिळकतींकडून सहा वर्षांच्या पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी वसूल केली जात असून, तशा नोटिसाच मिळकतधारकांना पाठवण्यात आल्या आहेत. मिळकतधारकांच्या हातात लाखोंच्या घरपट्ट्या पडल्या असतानाच, ज्या मिळकतींना पूर्णत्वाचा दाखला नाही, परंतु त्यांचा वापर सुरू आहे अशा मिळकतींना आता पाणीपट्टीच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या इमारतींनाही घरपट्टीप्रमाणेच पूर्वलक्षी प्रभावाने पाणीट्टीची देयके दिली जात आहेत. विशेष म्हणजे या इमारती पालिकेच्या दफ्तरी अनधिकृत असल्याने या निवासी मिळकतींना आता व्यावसायिक दराने पाणीपट्टीची बिले दिली जात आहेत. महापालिकेच्या दफ्तरी सद्य:स्थितीत एक लाख ९८ हजार पाणीपट्टीची कनेक्शन आहेत. त्यात मिळकत सर्वेक्षणात नवीन आढळलेल्या मिळकतींचा यात समावेश नाही. त्यामुळे नव्याने मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना थेट व्यावसायिक दराने पाणीपट्टीची देयके पाठवली जात असल्याने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. घरपट्टीची बिले लाखात असताना, पाणीपट्टीचीही बिले हजारोत आल्याने हा दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासबिहारी करंडक सेंट लॉरेन्स स्कूलकडे

0
0

न्यू इराचा अवघ्या तीन धावांनी पराभव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित 'रासबिहारी क्रिकेट करंडक २०१८-१९' सेंट लॉरेन्स स्कूल संघाने जिंकला. न्यू एरा स्कूलला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

करंडकाच्या अंतिम फेरीत सेंट लॉरेंन्स स्कूल आणि न्यू एरा स्कूल यांत झालेल्या ४० षटकाच्या अंतिम सामन्यात न्यू एरा स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सेंट लॉरेन्स स्कूल संघाने प्रथम फलंदाजी करीत २८ षटकांतच सर्व गडी बाद करून फक्त ७४ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले. चुरशीच्या सामन्यात न्यू इरा स्कूल संघाला हे आव्हान पेलवता आले नाही आणि अवघा संघ ३४.३ षटकांत बाद झाला. सेंट लॉरेंन्स संघाचा मास्टर दुर्गेश येवलेकर यास सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने उत्तम गोलंदाजी करीत ७.३ षटकात केवळ १५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. सेंट लॉरेन्स संघाने ३ धावांनी विजय मिळवून रासबिहारी क्रिकेट करंडक पाटकविला.

सेंट लॉरेन्स संघाला क्रिकेट प्रशिक्षक सर्वेश देशमुख आणि न्यू इरा स्कूल संघाला रानडे यांचे मार्गदर्शन लाभले. महात्मानगर मैदानावर झालेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांचे हस्ते झाला. याप्रसंगी क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी समीर रकटे आणि सदस्य रतन कुयटे तसेच रासबिहारी शाळेच्या मुख्याध्यापिका बिंदू विजयकुमार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिल्पा आहिरे आणि व्यवस्थापक निवेदिता कमोद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया देशपांडे आणि साक्षी निकम यांनी केले. साक्षी हिने रासबिहारी शाळेची आणि क्रिकेट करंडकाची माहिती दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दामदुपटीपोटी १८ लाखांची फसवणूक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हात उसने घेतलेले पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून आपल्याच परिचितांकडून पैसे उकळणाऱ्या दोघांना क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. या दोघांनी एका वृद्धाकडून तब्बल १८ लाख १० हजार रुपये उकळले असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी गुन्ह्याचा तपास क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला.

शेखर माणिक क्षत्रिय (३३, रा. देवळाली गाव, नाशिकरोड) आणि जयराम होलाराम नागदेव (४८, रा. देवळाली कॅम्प) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी गंगाधर पोपट ठाकरे (६१, रा. फर्नांडिसवाडी, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली. संशयितांनी दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून परिसरातील अनेकांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळली. हा प्रकार जोरात सुरू असताना २०१६ पासून आजपपर्यंत दोघा संशयितांनी ठाकरे यांना पैसे दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखविले. मागील अडीच ते तीन वर्षांपासून ठाकरे यांनी संशयितांवर विश्‍वास ठेवत १८ लाख १० हजार रुपये दिले; मात्र, त्यांना या रकमेबाबत कोणताही परतावा मिळाला नाही. पैशांचा तगादा केला असता त्यालाही संशयित उडवाउडवीची उत्तर देऊ लागली. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार दोघा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपासासाठी हा गुन्हा लागलीच क्राइम ब्रँचच्या युनिट दोनकडे सोपविण्यात आला.

संशयितांना कोठडी

क्राइम ब्रँचच्या पथकाने दोघा संशयितांना अटक केली. या दोघांनी उकळलेल्या पैशांचे काय केले याचा तपास करण्यात येत असल्याचे युनिट दोनचे सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले. ठाकरे यांच्या फिर्यादीनंतर आणखी तीन ते चार तक्रारदार समोर आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती आणि फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता सोनवणे यांनी व्यक्त केली. संशयित आरोपींनी फसवणूक केलेली असल्यास नागरिकांनी लागलीच संपर्क साधावा, असे आवाहन देखील सोनवणे यांनी केले. दरम्यान, संशयितांना सोमवारी कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रौढ दिव्यांगांना पेन्शन

0
0

महापौरांच्या हस्ते दहा लाभार्थींना धनादेशाचे वाटप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने दिव्यांगासाठी योजनांचा पेटारा खुला केला असून अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून शहरातील दहा प्रौढ दिव्यांगाना पेन्शन योजनेचा लाभ देत योजनेस प्रारंभ करण्यात आला.

जागतिक अंपग दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रौढ बेरोजगारांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृहनेता दिनकर पाटील यांच्या हस्ते प्राधिनिधिक स्वरुपात दहा दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच दोन संस्थांना किबो स्कॅनिंग, रिडींग ॲण्ड लर्निंग मशिनचे वाटप झाले. मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे महापौरांच्या हस्ते योजनेस प्रारंभ झाला.

दिव्यांगांना सरकारच्या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात तसेच दिव्यांगांना अनुषंगिक दाखले देण्याच्यासाठी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय व डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये मनपातर्फे नियमित दाखले देण्याचे उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर भानसी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी दिनकर पाटील म्हणाले, की दिव्यांगांना दाखले देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन निर्देशांप्रमाणे दिव्यांगांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नगरसेवकांनी सर्व दिव्यांगांना रहिवासी दाखले देण्याचे सहकार्य करावे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील सर्व दिव्यांगांना महापालिका न्याय देण्याचा प्रयत्न करेल. स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले, की शहरातील दिव्यागांना अधिकाधिक न्याय देण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाईल. या योजना दिव्यागांपर्यंत पोहचविल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.

आठ दिवसात द्या अंपग प्रमाणपत्र

शहरात दहा हजारांहून अधिक दिव्यांग असताना महापालिकेच्या सदरी केवळ साडेसहा हजार दिव्यांगांचीच नोंद आहे. सध्या तीन हजार जणांकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र असल्याने हजारो लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा दावा प्रहार संघटनेचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी केला. शासन निर्देशांनुसार डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातही अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी महापालिकेने व्यवस्था केली. परंतु, आठवड्यातून केवळ एक दिवसच अधिकारी उपलब्ध होत असल्याने अपंगांना खेट्या माराव्या लागल्याची खंत दिव्यांगांनी व्यक्त केली. यावर अधिकाधिक दिव्यांगांना योजनेचे लाभ मिळण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आठवडाभर मोहीम राबविण्याच्या सूचना सभागृहनेते दिनकर पाटील यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूचा स्विकार ही आनंदाची गुरुकिल्ली

0
0

'मृत्यूचा स्वीकार ही आनंदाची गुरुकिल्ली'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मृत्यू हा अटळ असून प्रत्येकाला सामोरे जावेच लागणार आहे. मात्र त्याला सामोरे जाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असून आनंदाने त्याचा स्वीकार केल्यास आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणूस आनंदी होईल. जो मृत्यूला घाबरतो तो आनंदी होऊच शकत नाही. मृत्यूचा स्वीकार ही आनंदाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन श्रृतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले. शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात ही व्याख्यानमाला सुरू आहे. 'मृत्यू आणि पुर्नजन्माचे रहस्य' हा व्याख्यानमालेचा विषय असून ९ डिसेंबरपर्यंत ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे. यावेळी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले की, मृत्यू आला की हे शरीर सोडावे लागते हे सत्य आहे ते नाकारुन चालणार नाही, मरण हे कुणालाही चुकलेले नाही. सगळ्यांना जगण्याची इच्छा असते मात्र मरणाचे नाव काढले की अंगाचा थरकाप होतो. भीती निर्माण होते. मरण हे कुणाला अद्याप थांबवता आलेले नाही किंवा दुर ही ठेवता आले नाही. जो मृत्यूला घाबरतो तो आनंदी होऊ शकत नाही. जो केव्हाही मृत्यूला तयार आहे, तो नेहमी आंनदीच असतो. माणसाला जर मृत्यूचे रहस्य समजले तर तो निर्भय होईल ही अवस्था तुकाराम महाराजांची होती असे ते म्हणाले. व्याख्यानमालेची सुरुवात न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल यांच्या हस्ते स्वामीजींच्या सत्काराने झाली. स्वामीजींचा परिचय अॅड. मनीष चिंधडे यांनी करुन दिला. व्याख्यानाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या गारव्यामुळे आरोग्याच्या तक्रारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिवाळा हा मनाला उत्साह देणारा, तब्येत कमावण्यासाठी अत्यंत योग्य ऋतू मानला जात असला तरी या ऋतूत सर्दी, खोकल्याचे आजारही बळावतात. नाशिकमधील कडाक्याची थंडी हा तर कायम चर्चेचा विषय ठरत असतो. या थंडीपासून बचाव करून स्वत:ला आरोग्याच्या तक्रारीपासून वाचविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, बालकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या थंडीमुळे खोकला, सांधेदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. या ऋतूत व्यायाम करणे गरजेचे असून व्यायामातून प्रतिकारशक्ती वाढेल, असे मत फॅमिली फिजिशियन डॉ. स्मिता कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

००००००००००००००००

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. हवेतील गारवा जसजसा वाढतो, तसतसे सर्दी, खोकला, दमा, सांधेदुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. असेच चित्र सध्या शहरात आहे. वातावरणात वाढलेला गारवा व कमकुवत प्रतिकारशक्ती या आजारांमागील कारण ठरत आहे.

- -

\Bहे करा\B

- ताजे अन्न खा.

- व्यायाम करा.

- उबदार कपडे वापरा

- या ऋतुतील फळे खा.

- -

वातावरण बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. या तक्रारी उद्भवू नये यासाठी व्यायाम करणे, योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर व्हायरल इंन्फेशन होत नाहीत. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी आजारांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

\Bडॉ. स्मिता कांबळे, जनरल फिजिशियन

\B- - - - - - - - - - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाचे आमिष दाखवणारे भामटे गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक टक्का व्याजाने ५० हजार रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत बचतगटातील महिलांकडून लाखो रुपये उकळून पसार झालेल्या दोघा संशयित आरोपींना मुंबई नाका पोलिसांनी इंदूर येथून अटक केली. संशयित आरोपी सराईत असून, त्यांनी यापूर्वी याच पध्दतीने परराज्यात गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.

विजयकुमार लक्ष्मणराव सोनोने (रा. रुक्मिणीनगर, इंदूर) आणि कमलेश हरभजनसिंग सहानी (रा. अंबिकापुरी, इंदूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मुंबई नाका परिसरातील सुचेतानगर येथील सावरिया मायक्रो फायनान्स कंपनी थाटून बचतगटातील अनेक महिलांशी संपर्क साधला. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अवघ्या एक टक्का व्याजाने ५० हजार रुपयांचे कर्ज प्रत्येक महिलेला वाटप करण्याचे दोघांनी भासवले. यानंतर महिलांकडून दीडशे रुपये फॉर्म फी आणि विमा, एक हप्ता आणि फाइल चार्ज या नावाखाली दोन हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही कर्ज दिले नाही. हजारो महिलांनी पैसे भरले. लाखो रुपये जमा होताच संशयितांनी नाशिक सोडले. मुंबई नाका पोलिसांकडे तक्रारदार गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी इंदूर येथे पळून गेलेल्या दोघा संशयितांना शिताफीने पकडून आणले. आरोपींनी इंदूर, गुजरात व अहमदनगर येथेही अशाच प्रकारे महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी ‘कर’टोला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या व करजंजाळात नसलेल्या ६२ हजार मिळकतींना पूर्वलक्षी प्रभावाने दंडात्मक पद्धतीची घरपट्टीचे लाखोंची देयके वाटप करण्यास सुरुवात केल्यानंतर आता या घरपट्टी देयकांवरून बिल्डर आणि ग्राहकांमध्येच संघर्ष सुरू झाला आहे. दुसरीकडे महापालिकेने घरपट्टीची आकारणी करताना बराच गोंधळ केल्याचे समोर आले असून, नवीन करयोग्य मूल्याची आकारणी करतानाच, महासभेच्या नियमित १८ टक्के करवाढीचा बोजाही या मिळकतींना लावला आहे. शिवसेनेने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत, जर सहा वर्षे पूर्वलक्षी पद्धतीने करवसुली करायची तर, वाढीव १८ टक्केचा बोजा या मिळकतींवर का टाकला असा सवाल विरोधी पक्षनेते अजय बोरस्तेंनी उपस्थित केला आहे. मिळकत धारकांच्या मदतीसाठी शिवसेना कायदेशीर सेल सुरू करणार असल्याची घोषणा बोरस्तेंनी केली आहे.

महापालिकेने मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या व कर आकारणीपासून दूर असलेल्या ६२ हजार मिळकतींना नव्या करयोग्य मूल्याच्या आकारणीसह सहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टीची बिले पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मिळकतधारकांच्या हातात लाखांची बिले पडत असल्याने मिळकतधारक हवालदिल झाला आहे. या मिळकतींना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी १ एप्रिल २०१८ पासून ११ रुपये चौरस मीटर हे करयोग्य मूल्य लागू केले असले तरी, नवीन करयोग्य मूल्याच्या ६६ टक्के याप्रमाणे कर वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने एकाच वेळी नवीन करयोग्य मूल्य लागू करीत, महासभेच्या वाढीव १८ टक्के करवाढीचाही बोजा या मिळकतींवर टाकला आहे. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार या मिळकतींकडून गत सहा वर्षांचा कालावधी गृहीत धरून करवसुली करणे अपेक्षित असले तरी, त्यांचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाच तपासला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या नोटिसांमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. इमारत पूर्णत्वाचा दाखला नसतानाही मागील सहा वर्षांपासून घरपट्टीची देयके दिलीच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या प्रकरणात भाजपच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त केला आहे. बोरस्ते यांनी करबुडव्यांना कदापि समर्थन नसल्याचे सांगत महापालिकेच्या हितासाठी त्यांच्याकडून वसुली करण्याविषयी कोणाचे दुमत नसेल असे स्पष्ट केले. मात्र, वसुली करताना आता २०१८ मध्ये केलेल्या करयोग्य मूल्यावरील १८ टक्के वाढीची आकारणी २०१२ पासून कशी व्यवहार्य ठरेल, असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. मुळात मिळकत सर्वेक्षणात रेकॉर्डवर नसलेल्या मिळकतींकडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आहे का, किंवा त्यांनी बांधकाम परवानगी घेतली असेल तर ती कधी घेतली, याची तपासणी झालेलीच नसल्याच्या आरोप बोरस्तेंनी केला आहे. मिळकत सर्वेक्षकांनी आपल्या निष्कर्षांची नगररचना विभागाकडून पडताळणी करणे गरजेचे होते असे सांगत हा नागरिकांनाच चोर समजण्याचा नवा धंदा पालिकेने सुरू केल्याचा आरोप केला आहे.

प्रशासन मात्र ठाम

नव्या मिळकतधारकांना बजावलेल्या नोटिसांवर प्रशासन मात्र ठाम आहे. उपायुक्त महेश डोईफोडे यांनी करयोग्य मूल्याच्या ४८ टक्के आकारणी यापूर्वी होत होती, मात्र मार्च महिन्यात महासभेने करयोग्य मूल्यावरील ४८ टक्के वाढीत १८ टक्के भर टाकून ६६ टक्के इतकी केली आहे. त्यामुळे आता जरी घरपट्टी रेकॉर्डवर नवीन मिळकती आल्या असल्या व त्यांचे करयोग्य मूल्य वाढले असले तरी, त्यांच्याकडून ६६ टक्क्यांप्रमाणेच आकारणी अपेक्षित असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी अधिकच वाढणार आहे.

शिवसेनेची कायदेशीर मदत

शिवसेने या प्रकरणात भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली असून, घरपट्टी प्रकरणात नागरिकांचा उडालेला गोंधळ पाहता त्यांना कायदेशीर मदत देण्याची तयारी सुरू केली आहे. अजय बोरस्ते यांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळण्यामागे इमारतीत राहण्यासाठी गेलेले नागरिक कारणीभूत नसून, बिल्डरच दोषी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोजा टाकणे उचित नसल्याचे मत व्यक्त करीत बोरस्तेंनी ग्राहक पंचायतीचाही दरवाजा ठोठावणार असल्याचे म्हटले आहे. एखाद्या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसताना, महापालिकेने घरट्टीची बिले पाठवली तर ती कोणी भरावी, यासाठी ग्राहक पंचायतीत दावा दाखल करण्यासाठी कायदेशीर मदत देऊ अशी घोषणा बोरस्तेंनी यावेळी केली आहे. त्यांनी यावेळी केली.

घरपट्टी, पाणीपट्टीची लाखोंची बिले नागरिकांना पाठवून भाजपने भ्रष्टाचाराचे नवीन दुकान खोलले आहे. यात कर कमी करण्याच्या नावाखाली नागरिकांनाच लुबाडले जाणार आहे. बिल्डरांना जबाबदार धरण्याऐवजी नागरिकांनाच चोर ठरविण्याचा भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगरसेवक मागतात पैसे!’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या दिव्यांग योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर करण्यासाठी रहिवास दाखल्याची अट असून हा दाखला नगरसेवकांकडून दिला जातो. परंतु, या रहिवास दाखल्यासाठी नगरसेवक पैसे मागतात, असा गंभीर आरोप प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर, सभागृहनेते आणि स्थायी समिती सभापतींसमोर करीत खळबळ उडवून दिली. या आरोपामुळे व्यथित झालेल्या महापौर आणि सभागृह नेत्यांनी सदरील आरोप कर्त्याला जाब विचारत, पैसे मागणाऱ्या नगरसेवकांचे नाव सांगा, कारवाई करू असा पवित्रा घेतला. मात्र, प्रकरण अंगाशी आल्याचे पाहून आरोपकर्त्याच्या समर्थकांनी हे आरोप चुकीचे ठरवले आणि पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

दिव्यांगांसाठीचा निधी खर्चावरून आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने दिव्यांगांसाठीच्या योजनांचा पेटारा खोलला. महापालिका हद्दीतील दिव्यांगांच्या कल्याणार्थ महापालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून विविध आठ योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची अट जाचक असून रहिवास दाखला नसल्याने अनेक लाभार्थी वंचित राहिल्याचा दावा करत या दाखल्यासाठी नगरसेवक पैसे मागत असल्याचा आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, दत्तू बोडके यांनी केला. या आरोपांमुळे अवाक् झालेल्या महापौर व सभागृह नेत्यांनी कोणता नगरसेवक पैसे मागतो ते सांगा, लोकप्रतिनिधींवर बेछूट आरोप करू नका, अशा शब्दांत आरोपकर्त्योंना सुनावले. आपल्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी आल्याचा दावा करत भडांगे यांनी काही दिव्यांगांकडे अंगुलीनिर्देश केला. यावर योजनेच्या लाभासाठी रहिवास दाखल्याची अट योग्यच असल्याचे नमूद करत उपस्थित दिव्यांगांनीच आरोपकर्त्यांचे आरोप निराधार असल्याचे दाखवून दिले. यामुळे महापौर भानसी व सभागृहनेते पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आरोपकर्त्यांवरच 'प्रहार' उलटल्याने त्यांची चांगलीच फजिती झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धार्मिक स्थळांची बैठक शुक्रवारी

0
0

धार्मिक स्थळांची बैठक शुक्रवारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्त्यावरील तसेच मोकळ्या भूखंडावरील धार्मिक स्थळांवरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर महापालिकेकडून सर्व ५७५ धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी शुक्रवारी (दि. ७) धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. यात विश्वस्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केले आहे.

सर्वेक्षणावेळी सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांबाबत बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे. महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात २००९ पूर्वीची ७२ आणि २००९ नंतरची ५०३ अशा एकूण ५७५ धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्तांनी थेट उच्च न्याालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देत, पुन्हा नियमानुसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एक समिती गठीत करण्यात येणार असून या समितीकडून धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केले जाणार आहे.

त्यामुळे या धार्मिक स्थळांबाबत विश्वस्तांना महापालिकेला पुरावे सादर करावे लागणार आहेत. या बैठकीत या पुराव्यांसदर्भात माहिती दिली जाणार आहे. कोणकोणती कागदपत्रे विश्वस्तांनी महापालिकेला सादर करावी, यासाठी वकिलांकडूनच या बैठकीत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे विश्वस्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिभूती मुद्रणालयाकडे तीन कोटींची थकबाकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयाकडे पावणे तीन कोटींहून अधिक बिगर शेतसारा थकीत असून तो वसूल करण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. प्रेसचे १२ वर्षांपूर्वी महामंडळात रुपांतर झाले तेव्हापासून त्यांनी हा बिगर शेतसारा भरला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रेसचे १२ वर्षांपूर्वी महामंडळ तयार करण्यात आले; पण तेव्हापासून प्रेस प्रशासनाने बिगर शेतसारा भरलेला नाही. त्यामुळे २ कोटी ८६ लाखांच्या थकीत शेतसारा वसुलीसाठी महसूल यंत्रणेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. २०१६ पर्यंत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारित होते. ही सरकारी आस्थापना २००६ मध्ये स्वतंत्र महामंडळामध्ये रुपांतरीत झाली. केंद्र सरकारची मालमत्ता असेपर्यंत हा विभाग करमुक्त होता. मात्र, महामंडळात रुपांतर झाले तेव्हापासून संबधित आस्थापना करपात्र झाली आहे. त्यामुळे १२ वर्षांपासून करवसुलीसाठी महसूल विभाग प्रयत्नशील आहे. परंतु, मुद्रणालयाकडून अद्याप त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ४० टक्केही महसूल वसुलीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकलेले नाही. सध्या महसूल वसूलीचे कामकाज संथगतीने सुरू असून महसूल वाढीसाठी यंत्रणेकडून बैठकांवर जोर दिला जातो आहे. त्यामुळे थकीत कर वसुलीसाठी आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.

लोगो : चर्चा तर होणारच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरेंद्र जगताप यांची निवड

0
0

जगताप यांची निवड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी नरेंद्र जगताप यांची निवड झाली आहे. यंदा प्रथमच जिल्ह्यातील तीन जणांना राज्य संघटनेत स्थान मिळाले आहे. त्यामध्ये योगेश्वर कोतवाल यांची सहसचिवपदी तर त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयातील धनश्री कापडणीस यांना राज्य महिला प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

संघटनेचे १२ वे राज्यस्तरीय अधिवॆशन लातूर येथे नुकतेच झाले. याचवेळी संघटनेच्या नविन कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली. राज्य अध्यक्षपदी हेमंत साळवी यांची तर कार्याध्यक्षपदी विलासराव कुरणे यांची निवड झाली आहे. राहुल शेट्ये कोषाध्यक्ष म्हणून तर नंदकुमार बुटे संघटक म्हणून काम पाहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवाल आंदोलन

0
0

कोतवाल आंदोलनप्रकरणी

फरांदेंची शिष्टाई अपयशी

नाशिकरोड : राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी (दि. ३) धरणे आंदोलन करणाऱ्या कोतवालांना केली. मात्र, कोतवालांनी त्यांचे आवाहन धुडकावून लावल्याने आंदोलन मिटविण्याचे फरांदे यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

१५ दिवसांपासून काम बंद ठेऊन विभागीय आयुक्तालयापुढे कोतवालांचे धरणे आंदोलन सुरू आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा देऊन सहावा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. शासनाकडून आश्वासनांखेरीज पदरात काहीही न पडल्याने यावेळी कोतवालांनी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे न घेण्याचा पक्का निर्धार केलेला आहे. सोमवारी दुपारी आमदार देवयानी फरांदे यांनी आंदोलनस्थळी भेट देत कोतवालांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. राज्याची आर्थिक स्थिती बघता कोतवालांना सहावा वेतन आयोग दिला तर राज्याच्या तिजोरीवर अजून ताण येण्याची शक्यता आहे. मात्र, शासनाकडून कोतवालांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील, असे फरांदे यांनी सांगितले. त्यावर आमच्या मागण्यांकडे राज्यातील लोकप्रतिनिधींकडून वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले गेले असल्याचा आरोप करीत कोतवालांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. याप्रसंगी भाजपचे सुनील आडके हे देखील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिसेस फिटनेसचा निवेदिताला किताब

0
0

मिसेस फिटनेसचा निवेदिताला किताब

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या निवेदिता पॉलने मिसेस महाराष्ट्र एम्प्रेस आफ महाराष्ट्र सीझन थ्री स्पर्धेत मिसेस फिटनेस-२०१८ हा किताब मिळवला. पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये पॉल हिने पहिल्या दहामध्ये क्रमांक मिळवला.

निवेदिता ही नाशिकरोडचे सामाजिक कार्यकर्ते शंकर डे यांची कन्या तर राणेनगर येथील दिलीप पॉल यांची सून आहे. जेडीसी बिटको महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असणारी निवेदिता नृत्यदिग्दर्शिका असून या क्षेत्रात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. गांधीनगर येथील दुर्गा पूजा महोत्सवात आठ वर्षांपासून ती सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत आहेत. विनय आरान्हा आणि अंजना मॅस्केरन्स आणि काल मॅस्केरन्स आदींनी स्पर्धेचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images