म. टा. वृत्तसेवा, निफाड घरातील कर्त्या मुलाने शेतीत काही पिकत नाही आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडावे अशा विवंचनेत असल्याने मृत्यूला कवटाळले. त्याच्या उत्तर कार्यानिमित्त तेराव्याच्या दिवशीच पुत्रवियोगाने वडिलांचेही निधन झाल्याची हृदयदावक घटना निफाड शहरात घडली. विठ्ठल लहानू जाधव या द्राक्षउत्पादक शेतकऱ्याने ११ नोव्हेंबर रोजी विषारी औषध सेवन केले होते. निफाड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे रविवार २५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंब दुखवियोगात असतानाच दशक्रिया विधी पूर्ण झाला. विठ्ठल यांचा शुक्रवारी तेराव्याचा विधी होता. मात्र, त्याच दिवशी रात्री एक वाजेच्या सुमारास विठ्ठल यांचे वडील लहानू जाधव यांचे निधन झाले आणि जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. अत्यंत शोकाकुल वातावरणात लहानु जाधव यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. लहानु जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना, दोन मुली असा परिवार आहे. लहानू जाधव यांचे मोठे पुत्र विठ्ठल यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात आपल्यावर २७ लाख रुपयांचे कर्ज असून शेती करणे परवडत नाही. कर्ज फेडावे तरी कसे असा प्रश्न असल्याने मी जीवनाला हरलो आहे. म्हणून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कुटुंबीयांना मित्र परिवाराने आधार द्यावा, अशी विनंतीही विठ्ठल यांनी चिठ्ठीतून केली होती. विठ्ठल यांची सामाईक ५९ आर जमीन आहे. त्यांनी द्राक्षबाग लावलेली होती. त्यांच्यावर निफाड नागरी सहकारी पतसंस्था आणि निफाड विकास कार्यकारी सोसायटी यांचे कर्ज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट