म. टा. प्रतिनिधी, नाशिक जिल्ह्यात जूनपर्यंत पुरू शकेल एवढा चारा उपलब्ध असला तरी दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर चाराटंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी गाळपेराबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. या बैठकीला राज्यभरातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कृषी, पशुधन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपलब्ध चाऱ्याची माहिती सुरुवातीला घेण्यात आली. जिल्ह्यात १५ लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध असून जून २०१९ पर्यंत तो पुरू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या लावण्याची गरज भासणार नाही असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात चाऱ्याची लागवड करण्याच्या सूचना राज्य सरकारने १५ नोव्हेंबर रोजी केल्या आहेत. त्यानुसार झालेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यात १५०० हेक्टर क्षेत्र निश्चित केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. एकूण ४१ प्रकल्पांमध्ये चारा लागवड करण्यात येणार असून त्यामध्ये ११ मोठ्या, पाच मध्यम तर २५ लहान प्रकल्पांचा समावेश आहे. दुष्काळ निवारणासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये कामे केली जातात. सिन्नर आणि चांदवड तालुक्यातील गावे निवडून फाऊंडेशनने यापूर्वी कामे केली आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आचारसंहितेपूर्वी गावांची निवड करावी अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. २० पासून लागवड चारा लागवडीसाठी किती बियाण्यांची गरज आहे, याचा अंदाज घेऊन २० डिसेंबरपासून प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात व्हायला हवी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. चाऱ्याचे उत्पादन करू इच्छिणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट