म. टा. वृत्तसेवा, निफाड राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेले २०० रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी बाजार समित्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागायची कार्यवाही सुरू झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या काळात कांदा लिलावात आणलेल्या शेतकऱ्यांनी तीन जानेवारी २०१९ पर्यंत अर्ज करावे, असे या आवाहन करण्यात आले आहे. ज्या नावाने ७-१२ आहे त्याच नावाने कांदाविक्री केल्याची हिशेब पावती, ७-१२ उताऱ्यावर कांदा पीक लागवडीची नोंद, बँक पासबूक, झेरॉक्स, आधारकार्ड अशी कागदपत्रे छायांकित केलेल्या प्रति बाजार समितीकडे जमा करायच्या आहेत. यासाठी लागणारे अर्ज लासलगाव सह उपबाजार विंचूर, निफाड येथे उपलब्ध करून दिले आहे. या शिवाय http:/bit.ly/2Rh0Gng या लिंकवरून डाऊनलोड करून ते भरून ज्या बाजार समिती आवारात कांदा लिलाव केले त्याच बाजार समिती, उपबाजार येथे जमा करायचे आहेत. तीन जानेवारीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. लाभ कसा मिळणार? कांदा अनुदानासाठी अर्ज करायला अवघ्या आठ दिवसांची मुदत आहे. शिवाय काही उत्पादकांचा कांदा हा भाडे तत्वाने ठरविलेला ट्रॅक्टर अथवा पिकअप व्हॅन यांनी लिलाव केल्याने हिशेब पावती त्यांच्या नावावर झाली आहे. अनुदानासाठी सात बारा उतारा आणि हिशेब पावती ही एकच व्यक्तीचे नावे असेल तरच अनुदानास पात्र असणार आहे. त्यामुळे या अटीमुळे अनेकांना या अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही; शिवाय हे अनुदान फक्त उन्हाळ कांद्याला की या दरम्यान लिलाव झालेल्या लाल कांद्यालाही हादेखील संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट