जलशुद्धीकरण केंद्राला अखेर वाजपेयी यांचे नाव म. टा. प्रतिनिधी, नाशिक मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मध्ये उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या नामकरणावरून सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत सुरू झालेल्या वादात अखेर भाजपची सरशी झाली आहे. या केंद्राला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव दप्तरी दाखल करून घेत, माजी पंतप्रधान 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जलशुद्धीकरण केंद्र' असे नाव देण्याचा ठराव संमत केला आहे. मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्रभाग क्र. ३१ मधील पाथर्डी फाटा परिसरातील जुन्या जकात नाक्याच्या जागेत जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी केली आहे. या प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक सुदाम डेमसे यांनी या केंद्राला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव १९ डिसेंबर रोजीच्या महासभेच्या पटलावर सादर केला होता. शिवसेनेपाठोपाठ भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव व रवींद्र धिवरे यांनीही महासभेवर प्रस्ताव दाखल करीत या केंद्राला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली होती. परंतु, आता शिवसेनेचा प्रस्ताव बाजूला ठेवत दिनकर पाटील यांच्या प्रस्तावाचे ठरावात रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्राला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचेच नाव देण्यात आले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट