Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वर्षभरात कोटीचा दंड वसूल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक शाखेने २०१८ या वर्षात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांकडून प्रतिदिन सरासरी २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. वर्षभरात २१ हजार १६८ वाहनचालकांवर कारवाई करीत पोलिसांनी एक कोटी सहा लाख ७१ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षांमुळे जीवघेण्या अपघातांची संख्या वाढली आहे. यातील बहुतांश घटनांमध्ये वाहनचालकाचा जीव वाचणे शक्य होते. मात्र, हेल्मेट, सीटबेल्ट या प्राथमिक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात येते. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने वेळोवेळी जनजागृती मोहिमादेखील राबवल्या. वाहनचालकांकडून निबंधलेखन, गणपती आरती करून घेण्यात आली. मात्र, वाहतूक नियमांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांवर ठोस कारवाई करण्याची मोहीम गतवर्षी हाती घेतली. वाहतूक शाखेच्या चार युनिटच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी ही कारवाई राबवून तब्बल २१ हजार वाहनचालकांकडून दंड वसूल केली.

गेल्या वर्षीपेक्षा कारवाई कमी

हेल्मेटवापराबाबत २०१७ मध्ये वाहतूक पोलिसांनी खऱ्या अर्थाने कारवाईस सुरुवात केली होती. या वर्षी पोलिसांनी २२ हजार १६८ वाहनचालकांकडून एक कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले होते. यंदा हा आकडा काहीसा कमी झालेला दिसतो. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शहरात २०१८ मध्ये हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पोलिसांची कारवाई होणार असेल तर हा आकडा ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. हळूहळू दुचाकीस्वार हेल्मेट वापरण्यास प्राधान्य देत असल्याने हा फरक पडला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चार वेळा मोठी कारवाई

हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी २०१८ मध्ये चार वेळा मोठी कारवाई करण्यात आली. एकाच वेळी वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिस स्टेशनमार्फत कारवाई झाल्याने यात काही तासांतच लाखोंचा दंड झाला. नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी अवघ्या तीन तासांत १८ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. २०१७ मध्ये अशा प्रकारे पाच वेळा कारवाई झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघ शिक्षण संस्थेचा ७ पासून सुवर्ण महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क. का. वाघ शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून येत्या सोमवारपासून (दि. ७) यानिमित्त विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात आले आहे.

हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम येथे संस्थेच्या प्रांगणात सोमवारी सकाळी १० वाजता सत्यनारायण पूजेने महोत्सवास सुरुवात होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चंट असणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ भूषविणार आहेत. यावेळी समीर वाघ, अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, मुख्य-समन्वयक तथा प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, समन्वयक सुवर्ण महोत्सव समिती प्रा. एम. बी. झाडे, सर्व संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित असणार आहे. यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्षाचे 'बोधचिन्ह' आणि 'संस्थेचे गीत' यांचे अनावरणही करण्यात येणार आहे. तसेच पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवनावर आधारीत लघुचित्रपट प्रदर्शित करून दाखवला जाणार आहे. वाघ शिक्षण संस्थेच्या वाटचालीत मर्चंट कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याने अशोक मर्चंट यांना परिवारासह येथे गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्याविष्कारातून जिंकली मने

$
0
0

सुकदेव विद्यालयाचा बहारदार कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक, देशभक्तीपर व चित्रपटांतील गीतांवर नृत्याविष्कार सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते, सुखदेव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या 'आविष्कार कलागुणांचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

विद्यार्थ्यांचे विविध कलागुण जोपासण्याच्या उद्देशाने सुखदेव एज्युकेशन संस्था संचलित सुखदेव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल होते. दीपप्रज्ज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. देवाक काळजी रे, आई मला खेळायला जायचंय, आरा रा रा खतरनाक, टुकूर टुकूर, नमो नमो शंकरा, पहिले नमन, यांसारख्या अनेक मराठी हिंदी चित्रपट गीतांवर, देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य सादर करण्यात आले.

सरचिटणीस संजय काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी १९८१ च्या कलाकारांनी हजेरी लावली. तसेच कन्नू ठक्कर उर्फ ज्युनियर अमिताभ यांनी 'कौन बनेगा स्मार्ट विद्यार्थी' हा खेळ घेत वातावरण उत्साहवर्धक केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा रत्ना काळे, उपाध्यक्ष रंजय काळे, चिटणीस विजय काळे, कोषाध्यक्षा ललिता काळे, संचालक महेश गाढे, वैभव काळे, अर्चना काळे, वैशाली काळे, राहुल निरभवणे, विद्या निकम, सरला गाढे, मेहुल वाडिया, शशिकांत निकम, रणधीर सोनवणे, फिरोज शहा, मुख्याध्यापक नितीन पाटील, प्राचार्य बाबासाहेब खरोटे, मुख्याध्यापक हिरामण बारावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

\Bयांचा झाला गौरव \B

संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच दोन गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान केला जातो. यंदाचा फुले शिक्षक गौरव पुरस्कार इंदिरानगर येथील सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिरच्या उपशिक्षिका मनीषा बोरसे व सुखदेव ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक नीलेश गांगुर्डे यांना प्रदान करण्यात आला. तसेच इयत्ता बारावीचा मिथुन कांबळे यास 'जिनीयस ऑॅफ द इयर' व रजा पटेल यास आदर्श खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमधील १२ रिक्षा भंगारात

$
0
0

आरटीओ, पोलिसांची धडक कारवाई

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरात अनाधिकृत रिक्षांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक एच. जी. हेंबाडे आणि त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविकांत सोणवने यांनी शहरातील १२ रिक्षा ताब्यात घेतल्या. या रिक्षांचह मुदत संपलेली असल्यामुळे त्या स्क्रॅप करण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत. या कारवाईमुळे शहरातील रिक्षा चालकांमध्ये धडकी भरली आहे.

काही वर्षांपासून त्र्यंबक शहरात भाविकांचा ओघ वाढल्याने रिक्षा व्यवसायास चांगले दिवस आले आहेत. शहराच्या प्रवेशद्वारी असलेले संत गजानन महाराज मंदिर, श्रीस्वामी समर्थ गुरूपिठ, नीलपर्वत, गंगाद्वार अशा ठिकाणी जाण्यासाठी रिक्षांची गरज भासते. तथापि काही रिक्षाचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याच्या व कागदपत्रांची पूर्तता नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शुक्रवारी प्रादेशिक परिवहन विभागाची टीम शहरात दाखल झाली. त्यांच्या सोबतीला त्र्यंबक पोलिसांची कुमक मिळाली आणि रिक्षांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मुदत संपलेल्या १२ रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे पोलिस आणि आरटीओ विभागाची कारवाई सुरू असताना शहरातील अनेक रिक्षा गायब झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉटल रॉकेटने वेधले लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिकामी पाण्याची बाटली, सायकल ट्यूबचा वॉल, चिकटपट्टी अशा साहित्याचा वापर करून दोरीच्या साहाय्याने आकाशाच्या दिशेने झेपावणाऱ्या बॉटल रॉकेटने विज्ञानप्रेमींचे लक्ष वेधले. आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थीदेखील संधी मिळाली की स्वत:च्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवत कसे लक्षवेधी विज्ञानाविष्कार साकारू शकतात, याची प्रचीती आली. निमित्त होते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नाशिक आणि स्प्रिन्स स्टार आयटी सोल्यूशन्स यांच्यातर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे. आदिवासी विकास भवनात शुक्रवारी या एकदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना स्वत:ची सृजनशीलता शहरी भागात सादर करण्याची संधी मिळणे मोठे कठीण. अशा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी आदिवासी विकास भवन येथे एकदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पनांवर प्रशिक्षण देऊन या संकल्पनांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात साकारले होते. दिंडोरी तालुक्‍यातील निगडोळ, टिटवे, थेपनपाडा, गांडोळे व नाळेगाव या पाच आदिवासी पाड्यांवरील शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी २५ प्रकल्पांचे सादरीकरण यात केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सेवा निवृत्त आरोग्य महासंचालक तथा साळुंखे समिती अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. कृतीयुक्त शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असल्याचे कौतुक त्यांनी केले. शुक्रवारी दुपारी पारितोषिक वितरणाने या प्रदर्शनाचा समारोप झाला. आदिवासी विकास विभागाचे माजी आयुक्‍त आर. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाने गौरविण्यात आले. या प्रदर्शनाचे आयोजन स्प्रिन्सस्टार आयटी सोल्युशन्सचे प्रमुख अभिषाल वाघ, आकाश नानोटे, रूपल गुजराथी, प्रकाश गुजराथी, राहुल हरक यांनी केले होते. आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी कुमार आशीर्वाद, सहआयुक्त पानमंद, तांत्रिक समिती सदस्य हेमलता बीडकर, उपायुक्त प्रदीप पोळ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नीलेश अहिरे, आर. आर. पाटील उपस्थित होते. आयटीआयमधील विद्यार्थिनींनीही प्रदर्शनाला भेट दिली.

\Bयांनी मिळवले यश..

\Bशासकीय माध्यमिक आश्रमशाळा, ठेपणपाडा येथील कावेरी जयराम ठेपणे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. गृहसंरक्षक गजर प्रणाली हा प्रकल्प या विद्यार्थिनीने साकारला होता. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, नाळेगांव येथील मनीषा जगन पालवे या विद्यार्थिनीने द्वितीय पारितोषिक पटकावले. तिने जलशुद्धीकरण प्रकल्प साकारला होता. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, निगडोळ येथील दुर्गा रमेश वाघेरे, उज्ज्वला प्रकाश धोडी, हर्षदा पोपट वाघेरे या विद्यार्थिनीने तृतीय पारितोषिक पटकावले. रुग्णांचे किंवा आपद्ग्रस्तांचे वहन कसे करावे, हा प्रकल्प त्यांनी साकारला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसचिवांच्या वाढल्या अडचणी

$
0
0

नामकरण बदल तक्रारीची आयुक्तांकडून दखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रभाग क्र. ३१ मधील पाथर्डी फाट्यावरील जलशुद्धिकरण केंद्राच्या नामकरण वादात महिपालिकेचे नगररसचिव गोरखनाख आव्हाळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेच्या तक्रारीनंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणी तपशीलवार माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगरसचिवांवर कारवाई अटळ मानली जात आहे.

अठरा किलोमीटर लांबीच्या मुकणे थेट जलवाहिनी योजनेंतर्गत विल्होळी येथे जलशुद्धिकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत सदस्यांच्या विषय यादीमध्ये या केंद्रासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नामकरणाचा प्रस्ताव सादर झाला होता. त्यानंतर भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मागच्या दाराने १३३ (अ) अंतर्गत याच केंद्रासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नामकरणााच प्रस्ताव दाखल करून घेतला. महापौरांनी नियमानुसार ठराव मंजूर केल्यानंतर पाटील यांनी वाजपेयींच्या नावाचा ठराव करत, शिवसेनेचा ठराव दप्तरी दाखल करून घेतला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. पाटील यांनी प्रस्तावांमध्ये घुसखोरी केली. प्रस्तावाला आवक क्रमांक नसल्याचे पुरावे सादर करताना नगरसचिव आव्हाळे यांनी चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव ठेवल्याचा आरोप करत शिवसेनेने आयुक्तांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत नगरसचिवांची चौकशी सुरू झाली असून विरोधी पक्षांकडे सबळ पुराव्याच्या आधारे आव्हाळे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. निवृत्तीला अवघे तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना महापालिकेच्या नगरसचिव कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारराजाच्या साक्षरतेसाठी!

$
0
0

लाखभर लोकांनी घेतले 'व्हीव्हीपॅट'चे धडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक आयोगाचा पारदर्शक कारभार सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशिनची प्रात्यक्षिके दाखविली जात असून आतापर्यंत सुमारे ९० हजार नागरिकांनी ही प्रात्यक्षिके पाहून अभिप्राय दिला आहे. परंतु, ही प्रात्यक्षिके पाहूनही अभिप्राय न देणाऱ्या नागरिकांची संख्या त्याहून कितीतरी अधिक असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने केला आहे.

ईव्हीएम मशिनद्वारे मतदान केले तर आपले मत मनपसंत उमेदवाराला न जाता भलत्याच उमेदवारालाच जाते, असा आरोप गेल्या काही निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करता येत असल्याचा आरोपही अनेकदा झाले आहेत. हे वर्ष निवडणुकांचे असल्याने निवडणूक आयोगाने कामकाजातील पारदर्शकता नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर केला जाणार असून मतदानानंतर अवघ्या सातच सेकंदात आपण दिलेले मत योग्य व्यक्तीला मिळाले का हे संबंधित मतदाराला समजू शकणार आहे. यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे कामकाज नेमके कसे चालते, याचे प्रात्यक्षिक थेट खेडोपाडी जाऊन नागरिकांना दाखविले जात आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये याबाबतचे जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८३ हजार ६९० नागरिकांनी प्रात्यक्षिक पाहिल्याची नोंद केली आहे. प्रात्यक्षिक पाहणाऱ्यांना त्यांच्या नावाची नोंद विशिष्ट रजिस्टरमध्ये करण्याचे आवाहन जनजागृती पथकांकडून केले जाते. परंतु, अशी नोंद न करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने केला आहे.

अंतिम मतदारयादी १४ रोजी

दरवर्षी अंतिम मतदारयादी ५ जानेवारीला प्रसिद्ध केली जाते. यंदाही ती ५ जानेवारीलाच प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून सांगितले जात होते. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे ही यादी यंदा १४ जानेवारीला प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मतदारसंघ............प्रात्यक्षिके

देवळा............९०६७

बागलाण............७११८

दिंडोरी............७०९८

नाशिक मध्य............६५२५

निफाड............५८१५

सिन्नर............५५४६

चांदवड............४९५६

मालेगाव मध्य............१४६८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलपटूंच्या क्षमतेची लागणार कसोटी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित नाशिक पेलेटॉन २०१९ या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील १५ किलोमीटर आणि ५० किलोमीटरच्या सर्व वयोगटांतील स्पर्धांना आज (ता. ५) सकाळी ६ वाजता सिटी सेंटर मॉल येथून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे, तर रविवारी जॉय राइडसह इतर गटांतील स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या उपस्थितीत होईल.

शनिवारी होणाऱ्या मिनी पेलेटॉन स्पर्धेत १५ आणि ५० किमीच्या स्पर्धेचा समावेश असून, एकूण सहा गटांत या स्पर्धा होतील. स्पर्धेत ५० किलोमीटर मिनी पेलेटॉन स्पर्धा (१८ ते ३० वयोगट) पुरुष व महिला, तसेच (३० वर्षांपुढील वयोगट) पुरुष व महिला अशा चार गटांत होणार आहे. स्पर्धेचा मार्ग नाशिक- त्र्यंबकेश्वर- नाशिक असा असून, सिटी सेंटर मॉलपासून स्पर्धेला सुरुवात होऊन एबीबी सर्कलवरून त्र्यंबक रस्तामार्गे अंजनेरीजवळ यू टर्न घेऊन हॉटेल क्लाउड नाइन येथे स्पर्धेचा समारोप होईल. तेथून सर्व स्पर्धकांना स्पर्धा सुरू झालेल्या ठिकाणी आणण्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. १५ किमीची स्पर्धा १२ ते १४ वयोगट मुले आणि मुली आणि १५ ते १८ वयोगट मुले आणि मुली अशा दोन गटांत होणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी (दि. ६) रोजी होणाऱ्या १५० किमीच्या पेलेटॉन स्पर्धेची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार असून, स्पर्धेचे दोन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल, पाथर्डी फाटा तेथून महामार्गावरून कसारा घाटातील यू टर्नवर पहिला थांबा देण्यात आला आहे. तेथे आहार घेतल्यानंतर पुढचा टप्पा १२ वाजता सुरू होईल. हौशी सायकलपटूंसाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते गंगापूर नाका ही ५ किमी अंतराची जॉय राइड स्पर्धा होणार आहे.

दरम्यान, १५ आणि ५० किमीच्या मिनी पेलेटॉन स्पर्धेसाठीच्या स्पॉट नोंदणीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीचा आकडा आठशेवर गेला आहे. शनिवारीसुद्धा नाशिक सायकलिस्टतर्फे १५० किमीच्या पेलेटॉन सर्धेसाठी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्पॉट नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायकलिंग संघटनेची मान्यता मिळाल्यामुळे अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या सायकलपटूंनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे स्पर्धेची चुरस वाढली आहे. १५० किमीच्या स्पर्धेचे कीट घेण्यासाठी स्पर्धकांनी नाशिक सायकलिस्टसच्या ७४४७७७८८४४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये

प्रत्येक गटाच्या पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला ७० हजार रुपयांची सायकल आणि ३१ हजार रोख देण्यात येणार आहेत. बक्षिसाची एकूण रक्कम २० लाख

असून, घाटातील अंतर कमीत कमी वेळेत पार करणाऱ्या स्पर्धकाला 'घाटाचा राजा' किताब बहाल करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कहानी घर घर की!

$
0
0

मुंढेंचा निवासस्थान सोडण्यास मार्चपर्यंत नकार; गमेंच्या पदरी प्रतीक्षा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्तांच्या गडकरी चौकातील शासकीय निवासस्थानातील ताब्यावरून आजी-माजी आयुक्तांमध्ये शासकीय नियमांची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेत सध्या ही घरघर की कहानी चर्चेचा विषय बनली आहे.

शासकीय निवासस्थानासंदर्भातील एका आदेशाचा आधार घेत आणि मुलांच्या शिक्षणाचे कारण देत, तुकाराम मुंढे यांनी बदलीनंतरही आयुक्त निवास सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, मुंढेंनी ज्या शासन निर्णयाचा आधार घेतला, तो केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींसाठी लागू आहे, असे कारण देत मुंढेंना निवासस्थानात राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केला आहे. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी थेट नगरविकासाकडे पाठवले तसेच मुंढे यांना बांधकाम विभागाच्या मिळकतीमधून निवासस्थान द्यावे, अशी मागणी केलल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेतून बदली होऊन दीड महिने झाले तरी तुकाराम मुंढे विविध कारणांनी चर्चेत आहेत. आता ते आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानातील मुक्कामावरून चर्चेत आले आहेत. मुंढेंची २२ नोव्हेंबर २०१८ रोजी महापालिका आयुक्तपदावरून बदली झाली. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी राधाकृष्ण गमे यांच्या रुपाने नवीन आयुक्त मिळाले. मुंढेंची नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली होऊनही ते रुजू झाले नाहीत. त्यानंतर त्यांची एडस् नियंत्रण सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नुकतीच नियुक्ती झाली. महापालिकेच्या आयुक्तपदी असताना मुंढे यांचा गडकरी चौकातील महापालिकेच्या निवासस्थानी मुक्काम होता. मात्र, आता बदलीनंतर त्यांनी महापालिकेचे निवासस्थानही सोडणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांनी निवासस्थानावर ताबा कायम ठेवला आहे.

गमे यांना आता महापालिकेचे शासकीय निवासस्थान हवे आहे. परंतु, मुंढेंनी एका शासकीय आदेशाचा आधार घेत आणि मुलांच्या शिक्षणाचे कारण देत, मार्चपर्यंत घर सोडण्यास नकार दिला आहे. मुंढे यांची विनंती सरकारनेही मान्य केली आहे. परंतु, मुंढेंनी ज्या शासन निर्णयाचा आधार घेतला तो महापालिकेला लागू होत नाही. तो शासन निर्णय केवळ शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच लागू असल्याचा दावा गमे यांनी केला आहे. त्यामुळे मुंढेंनी या घरावरील ताबा सोडावा, अशी तक्रार सरकारकडे केली आहे. मुढेंना शासकीय निवासस्थान द्यायचे असेल तर सरकारच्या वाटप समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींमधून ते द्यावे. महापालिकेचे निवासस्थान रिक्त करण्यात यावे, अशी विनंती गमे यांनी या पत्राद्वारे प्रधानसचिवांकडे केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

शेरास सव्वाशेर

शासकीय नियमाप्रमाणे बदली झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यत शासकीय निवासस्थान वापरता येते. परंतु, मुंढेंनी हे निवासस्थान जास्त दिवस वापरण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार न करता थेट सरकारकडेच पत्रव्यवहार केला. त्यासाठी शासकीय नियमही शासनाला कळवले. मात्र, महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून शासनाचे सर्व नियम लागू होत नसल्याचे भान त्यांना राहिले नाही. त्यामुळेच अनुभवातून आयुक्त झालेल्या गमेंनीही शासन आदेश कशासाठी आहे, याचा खुलासा शासनाला करून दिला. त्यामुळे 'घर घर की कहानी'वरून शेरास सव्वाशेर भेटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्पोत्सवाचा पुन्हा दरवळ

$
0
0

- दहा वर्षांच्या खंडानंतर आयोजन

- २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान उपक्रम

- स्टॉल्स बुकिंगचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेचे मुख्यालय हे पुष्पोत्सव महोत्सवाने दरवळून निघणार आहे. वृक्षप्राधिकरण समितीच्या प्रस्तावाला आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने येत्या २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत मुख्यालयाच्या प्रांगणात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुष्पमहोत्सवाच्या प्रांगणात नर्सरीचालक तसेच बाग-बगीचा साहित्याशी संबंधित व्यावसायिकांसाठी नाममात्र दराने स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महापालिकेच्या वतीने प्रथम महापौर स्व. शांताराम बापू वावरे यांनी १९९३ पासून पुष्पोत्सव सुरू केला होता. परंतु, २००८ मध्ये महापालिकेच्या नगररचना विभागात उघडकीस आलेला कोटेशन घोटाळा आणि त्यात तत्कालिन उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील यांचा सहभाग यामुळे पुष्पोत्सवाची परंपरा खंड पावली. २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान तीन दिवसीय पुष्पोत्सवात विविध प्रकारची फुले, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे. विविध गटांत ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली असून, महत्त्वाची बक्षिसे नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समूह यांच्याकडुन पुरस्कृत करण्यात आली आहेत. शुक्रवार दि. २२ फेब्रुवारी पुष्पोत्सवाचे उद्घाटन तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर शनिवार व रविवार दि २२ व २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत हे पुष्पप्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहील. कार्यकमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या पुष्पोत्सवात विविध गटातील स्पर्धेत नागरिकांनी व वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था यांनी सहभाग घ्यावा. तसेच, वृक्ष प्रेमी व पक्षी मित्र, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांचे सक्रिय कामकाज करणारे पदाधिकारी यांनी कार्यक्रमात विविध परीक्षक व माहिती पट या क्षेत्रात काम करणा­ऱ्या सामाजिक व्यक्तींनी याबाबत सहभाग नोंदवण्यासाठी लेखी अर्ज करावे, असे आवाहन उद्यान विभागातर्फे करण्यात आले आहे.

आयुक्तांची सकारात्मक भूमिका

गतवर्षी तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी केली होती. परंतु, त्याआधीच त्यांच्या बदलीचे आदेश धडकल्यानंतर आयुक्तपदी विराजमान झालेल्या तुकाराम मुंढे यांनी आर्थिक तरतूद अल्प असल्याचे कारण देत पुष्पोत्सवाच्या आयोजनाला ब्रेक लावला होता. मुंढे यांच्या बदलीनंतर आयुक्तपदी विराजमान झालेल्या गमे यांनी सकारात्मक भूमिका घेत पुन्हा एकदा पुष्पोत्सवाच्या परंपरेला चालना देण्याचे ठरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्र मॅरेथॉन स्पर्धेलाललिता बाबर येणार

$
0
0

तीन हजारांवर खेळाडूंची नोंदणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहाव्या मविप्र राष्ट्रीय व ११ व्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत आतापर्यंत तीन हजारांवर खेळाडूंनी नोंदणी केल्याची माहिती मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी झालेल्या परिषदेत त्या बोलत होत्या. या स्पर्धेसाठी तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात ऑलिम्पिकमध्ये धडक मारणारी ललिता बाबर येणार आहे.

चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, सिडको महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर, डॉ. मीनाक्षी गवळी उपस्थित होत्या. मॅरेथॉन स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे असून, स्पर्धेचा धावनमार्ग, रिफ्रेशमेंट व स्पंजिंग पॉइंट, वैद्यकीय सुविधा, स्पर्धेसाठी असलेले गट, खेळाडूंची निवास व भोजनव्यवस्था याविषयी पवार यांनी माहिती दिली. स्पर्धेसाठी एकूण ७ लाख २३ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स संघटना, तसेच महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटना व नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेची मान्यता असल्याची माहिती पवार यांनी दिली. स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राष्ट्रीय निरीक्षक जी. कृष्णन व महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे आर. जोशी निरीक्षक असतील. मॅरेथॉन स्पर्धेसाठी आतापर्यंत तीन हजार धावपटूंनी रजिस्ट्रेशन केले असून, यामध्ये नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. यंदा मागील स्पर्धेचा रेकॉर्ड ब्रेक होऊन नवीन विक्रमाची नोंद होईल, अशी आशा व्यक्त केली. स्पर्धेची सुरुवात रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारात अंतिम फेरीत धडक मारणारी महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती संस्थेचे क्रीडाधिकारी पाटील यांनी दिली. संचालक सचिन पिंगळे यांनी आभार मानले. मविप्र मॅरेथॉनच्या स्मृतिचिन्हाचे अनावरण या वेळी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील विद्यालयात क्रीडा महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, गंगापूर येथे आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे हिच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून आंतरवर्गीय क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. खे‌ळासाठी शालेय विद्यार्थ्यांना आपण नेहमी मार्गदर्शन करू, अशी ग्वाही मोनिका हिने यावेळी दिली.

अध्यक्षस्थानी ज्ञान साधना शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे, गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर मोरे, शिवसेनेचे मनपा गटनेते विलास शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष संतू पाटील, सचिव हिरामण शिरसाट, संचालक सुदर्शन पाटील, एच. पी. पाटील आदी उपस्थित होते. मोनिका म्हणाली की, मला यश मिळविण्यासाठी आई-वडील, सणवार या साऱ्यांपासून दूर रहावे लागले. ४२ किमी अंतर काही तासांत पूर्ण करताना मला समोर मृत्यू दिसत होता, तरी मोठ्या जिद्दीने यश मिळवले. यशासाठी खूप कष्ट व सतत चिकाटी ठेवावी लागेल, असेही तिने नमूद केले. रत्नाकर चुंबळे यांनी सावित्रीबाई फुलेंचे कार्य आणि खेळाचे महत्त्व विशद केले. मोरे यांनी रहदारीचे नियम व मोबाइलच्या योग्य वापराविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विलास शिंदे यांनी क्रीडाशिक्षक हिरामण शिंदे व नंदू पवार यांचे विशेष कौतुक केले. संस्थेचे विश्वस्त सुदर्शन पाटील यांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. प्रास्ताविक व अध्यक्ष निवड प्राचार्य बापूराव खैरनार यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धांमध्ये डॉजबॉल, कबड्डी, खो-खो, लंगडी, मैदानी ५०, १००,२००,मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी आदी स्पर्धा होणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक बैरागी टिकमदास, क्रीडाशिक्षक, सर्व सहकारी शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकविना लघुउद्योग समिती!

$
0
0

सदस्यांमध्ये चक्क व्यंगचित्रकाराचीही वर्णी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिझर्व्ह बँकेने लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी एका तज्ज्ञ समितीचे गठन केले असून त्यावर उद्योगांचा प्रतिनिधीच नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, या समितीत चक्क व्यंगचित्रकाराला स्थान दिले गेले आहे. मग, ज्यांच्यासाठी ही समिती आहे त्या उद्योगांचा प्रतिनिधी का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशाच्या औद्योगिक विकासामध्ये या क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एकूण उद्योग संख्येच्या ९३ टक्के उद्योग लघुत्तम व लघु उद्योग आहेत. या क्षेत्रातील उद्योजकांना अलीकडच्या काळात जाणवणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना काय करता येईल आणि त्यांच्यात आर्थिक ताकद सातत्य कसे राखता येईल, यासाठी रिझर्व्ह बँकेने लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी तज्ज्ञ समितीचे गठन केले आहे. जून २०१९ अखेर या समितीला आपला अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करायचा आहे. या समितीने जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम इलाजांचाही विचार करून ते देशातील लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला कसे लागू करता येईल, याबाबतही सूचना करावयाच्या आहेत. या समितीवर एकूण ८ सदस्य असून त्यापैकी एकही सदस्य लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारा नाही. जे आहे ते सरकारी नोकर, बँकर, प्राध्यापक, महिला प्रतिनिधी असे असून शरद शर्मा या व्यंगचित्रकाराचीही नियुक्ती या समितीत करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच लघुउद्योग क्षेत्रात आश्चर्य आणि नाराजी पसरली आहे. देशातील बहुसंख्य लघुउद्योजक सहकारी बँकातूनही कर्ज घेत असले तरी त्या बँकिंग क्षेत्राचा प्रतिनिधी या समितीवर नसणे तितकेच आश्चर्यकारक आहे. लघुत्तम व लघु उद्योग क्षेत्रातील जिवंत समस्या जाणून घेऊन त्यावरील उपाययोजना काय असावी, याबाबत उद्योगांचा प्रतिनिधी गरजेचा असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरसारख्या संस्थेचा प्रतिनिधीही घेतला जाणे आवश्यक होते.

कितपत व्यवहार्य?

केवळ सरकारी बाबू, पुस्तकी पंडित आणि खासगी बँकांचे प्रतिनिधी अशांची तज्ज्ञ समिती कितपत व्यवहार्य मार्ग आणि उपाययोजना सुचवू शकतील, असा प्रश्न उद्योग वर्तुळातून विचारला जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी याचा विचार करून सदरहू तज्ज्ञ समितीवर लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा प्रतिनिधी घ्यावा, अशी मागणी होत आहे.

उद्योगांसाठीच्या समितीवर उद्योजक प्रतिनिधीच नाही, ही बाबच निराशाजनक आहे. ज्या कारणांसाठी समिती गठीत केली आहे तो हेतू यामधून साध्य होणार आहे का? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी दखल घ्यावी.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर

लोगो : चर्चा तर होणारच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय कुंग फुत नाशिकचे वर्चस्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय कुंग फु चॅम्पियनशिप स्पर्धेत सातपूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत पदकांची लयलूट केली.

या स्पर्धेत आर. जे. स्पोर्ट्स अँड एज्युकेशनल रिसर्च सेंटर व महाराष्ट्र कुंग फु असोसिएशनच्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, गुजरात, पंजाब आणि गोवा इत्यादी राज्यांच्या दोनशेवर खेळाडूंनी यात सहभाग घेतला.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत नाशिकच्या आर. जे. स्पोर्ट्स व महाराष्ट्र कुंग फु असोसिएशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. यात शुभम शर्मा, गौरी घाटोळ, मधू साळवे, प्रणाली शिंदे, अनिशा वर्मा, नारायण पवार, साहिल चंद्रमोरे यांनी सुवर्णपदक पटकावले. सूरज पेंढारे, आकाश खरे, विशाल प्रजापती, सरस्वती विधाते यांनी रौप्यपदक पटकावले. त्याचप्रमाणे लक्ष्मी मुंगटे, प्रतिभा ठोके यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

आंतरराष्ट्रीय कुंग फु परिषद व कुंग फु असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन पपून पॉल आणि प्रेसिडेंट ऑफ कुंग फु असोसिएशन इंडिया पूर्वचे सहाय्यक संचालक वेणूगोपाल घोष यावेळी उपस्थित होते. या खेळाडूंना आर. जे. स्पोर्ट्स व महाराष्ट्र कुंग फु असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव मास्टर राजूराम जैस्वाल व टीम मॅनेजर यशस्वी साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. राजूराम जैस्वाल यांना आंतरराष्ट्रीय थर्ड डॅन ब्लॅक बेल्ट ही पदवी बहाल करण्यात आली. सूरज पेंढारे यांना राष्ट्रीय फस्ट डॅन ब्लॅक बेल्टने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून मारहाण

$
0
0

घरात घुसून मारहाण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरात घुसून कुटुंबीयांना दमदाटी करीत तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या प्रकाराबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

राजू उर्फ शानू सैदाअप्पा वाघमारे (वय १८) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. कस्तूरबानगर भागात राहणारे त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. टिळकवाडीतील प्रकाश देवराम जेजूरकर (रा. जेजूरकर सोसा.) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल दिली. जेजूरकर कुटुंबीय मंगळवारी (ता. १) सायंकाळी आपल्या घरात असताना संशयित व त्याचे तीन साथीदार हातात लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉड घेऊन अनधिकृतपणे घरात शिरले. या वेळी संशयिताने आमचे नादी लागलात, तर तुम्हाला राहू देणार नाहीत. हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. या वेळी जेजूरकर यांचा मुलगा यतीन संशयितांना समजावण्यास गेला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

एकास अटक

नाशिक : तलावडीतील पंजाब बेकरी परिसरात उघड्यावर जुगार खेळविणारा रामेश्वर लक्ष्मण साबळे (रा. सहजानंद हाइट्स, हिरावाडी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६,२०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पंजाब बेकरी परिसरातील पेपर स्टॉल भागात साबळे सोरट आणि मटका जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी (ता. ३) सकाळी पोलिसांनी संशयितास अटक केली. त्याच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलिस शिपाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार केदारे तपास करीत आहेत.

सायकलचोराला अटक

नाशिक : केटीएचएम कॉलेजमध्ये पार्क केलेली सायकल लंपास करणारा अर्जुन बेलप्पा वाणी (वय ३९, रा. नशिराबाद, जि. जळगाव, हल्ली रा. नाशिकरोड रेल्वे स्टेशन) याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. अर्जुन वाणी याने २७ डिसेंबर रोजी प्रणय बाळासाहेब घुले (वय १९, रा. आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूर रोड) याची सात हजार रुपयांची केस्टो कंपनीची सायकल केटीएचएम कॉलेजमध्ये पार्क केलेली असताना लंपास केली. या प्रकरणी हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समजावून घ्या कृतिपत्रिकेचे गणित

$
0
0

रेषा केंद्र आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीत समाविष्ट करण्यात आलेली कृतिपत्रिका नेमकी काय आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांना नेमकी काय पूर्वतयारी करावी लागणार आहे. दहावीची पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यांच्यातील फरक काय, कृतिपत्रिका सोडविताना काय काळजी घ्यावी अशा प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व पालकांना समजावून सांगण्यासाठी ६ आणि १३ जानेवारी रोजी कृतिपत्रिका विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोड आणि नाशिकरोड अशा दोन्हीही ठिकाणी हा उपक्रम होणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेसाठी मोफत प्रवेश आहे.

गंगापूररोड आणि नाशिकरोड या परिसरात एकाच वेळी विज्ञान, गणित आणि मराठी या विषयांवर या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. रविवारी (६ जानेवारी) गंगापूररोडवरील रेषा एज्युकेशन सेंटर, ३ बी, कौस्तुभ, एसटी कॉलनी, गंगापूररोड येथे होणाऱ्या या कार्यशाळेत विज्ञान विषयावर दुपारी ३ ते ५ या वेळेत अध्यापनाचा तीन दशकांपेक्षाही अधिक अनुभव असलेल्या मुख्याध्यापिका अंजली ठोके मार्गदर्शन करतील. याच दिवशी नाशिकरोड येथील हॉटेल सेलिब्रेटा, जुनी अंध शाळा, नाशिक बिग बझारच्या जवळ येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत मराठीच्या नामवंत मार्गदर्शक निर्मल अष्टपुत्रे या मराठी विषयावरील कृतिपत्रिकेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

येथे करा नोंदणी

बदलत्या शैक्षणिक धोरणांमध्ये यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीला कृतिपत्रिकांचा आधार असणार आहे. त्यामुळे पारंपरिक परीक्षेच्या प्रचलित पद्धतीशिवाय कृतिपत्रिका सोडविण्यासाठी आवश्यक घटक कोणते, त्यांची तयारी पालकांनी कशी करून घ्यावी, विद्यार्थ्यांनीही कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावे आदी विषयांवर या उपक्रमात पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नस्तनपूरला आज यात्रोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शनी महाराजांच्या साडेतीन पीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या व प्रभू रामचंद्रांनी स्थापना केलेल्या नस्तनपूर येथील शनी मंदिरात शनी अमावस्येनिमित्त शनिवारी यात्रोत्सव होत आहे. या उत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, लाखो भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे.

उत्सवनिमित्ताने किल्ला, मुख्य प्रवेशद्वार अशा दोन ठिकाणी वाहनतळाची निर्मिती करण्यात आली आहे. आमंत्रित पाहुण्यांच्याहस्ते तसेच पंढरपूरच्या धर्तीवर (प्रायोगिक तत्वावर) दर्शन रांगेतील आरतीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या शनिभक्ताला सपत्नीक महापूजेचा व आरतीचा मान मिळणार आहे. नंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामी राहण्यासाठी स्वतंत्र कक्ष, यात्रा उत्सवात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आला असल्याचे मंदिर ट्रस्ट अध्यक्ष माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा विद्यार्थ्यांची पोलिस स्टेशन भेट

$
0
0

मनपा विद्यार्थ्यांची

पोलिस ठाण्यास भेट

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

'रेजिंग डे' पोलिस जनता मैत्री संवाद अंतर्गत नाशिकरोड पोलिस ठाण्यात महानगरपालिका शाळा क्रमांक ५६ च्या विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याचे कामकाज व कार्यप्रणाली समजावून सांगण्यात आली. सहाय्यक निरीक्षक जगदीश शेलकर, उपनिरीक्षक सुवर्णा हांडोरे, केंद्रप्रमुख राजश्री गांगुर्डे, समता शिक्षक परिषदेचे चंद्रकांत गायकवाड, सविता जाधव, प्रियंका सूर्यवंशी, बबन राठोड, पोलिस शिपाई कुणाल काळे, कुंदन राठोड, रमेश काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुवर्णा हांडोरे यांनी पोलिस खात्यात वापरली जाणारी शस्रे, पोलिस कोठडी, न्याय प्रक्रिया, ठाणे अंमलदार कक्ष, तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया, दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे, दिली जाणारी शिक्षा याविषयी माहिती दिली. जगदीश शेलकर यांनी लहान मुले, वृद्ध, महिला यांच्यासाठी कायद्यातील तरतूदी व कलमांची माहिती दिली. लहानपणापासून चांगली वर्तणूक ठेवा, सुजाण नागरिक बना, निर्भयपणे तक्रार करा, पोलिसांविषयी भीती न ठेवता त्यांना आपले मित्र करा, असे त्यांनी सांगितले. बबन राठोड यांनी पोलिसांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रामसिंहां’ची दहशत!

$
0
0

ठिकाण : जेलरोड

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड आणि जेलरोड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक, बालके जखमी झाल्याच्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. जेलरोड परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे महिला, लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नाशिकरोडला धोंगडेनगरमध्ये सहा महिन्यांपूर्वी एका गायीने धुमाकूळ घालून नागरिकांना जखमी केले होते. महापालिके भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी केली आहे. मात्र, या समस्येकडे नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

जेलरोडच्या ययातीनगर भागात वर्षभरापूर्वी मोकट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता. काही दिवसांपूर्वी ययातीनगरमध्ये चार वर्षीय बालिकेला, तसेच एका ज्येष्ठ व्यक्तीला पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले होते. जेलरोडच्या वर्दळीच्या भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटीतील नागरिकांना, तसेच दुचाकीसारख्या वाहनांवर जाणाऱ्यांना सातत्याने भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पहाटे क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, दूध विक्रेत्यांना व प्रेस कामगारांना या कुत्र्यांचा विशेष त्रास होतो. पहाटे घरोघर वृत्तपत्रवाटप करणाऱ्यांनाही कुत्र्यांचा जाच सहन करावा लागतो.

येथे संख्या अधिक

भटक्या कुत्र्यांची संख्या नाशिकरोडच्या जयभवानी रोड, देवळाली गाव, नेहरूनगर आणि जेलरोडच्या कॅनॉल रोडवर अधिक आहे. मांस-मच्छी विक्रेत्यांच्या टपऱ्यांजवळ कुत्र्यांची संख्या अधिक असते. जेलरोडच्या इंगळेनगर चौकात पन्नास वर्षे जुने मच्छी मार्केट आहे. येथे मटण आणि चिकन विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असते. दसक, पंचक, सायखेडा रोड, टाकळी रोड, उपनगर, जयभवानी रोड, आर्टिलरी सेंटर, विहितगाव, रोकडोबावाडी आदी ठिकाणी मटण विक्रेत्यांच्या टपऱ्या सुरू झाल्या आहेत. तेथेही कुत्र्यांचा मुक्काम असतो. काही वसाहतींमध्ये मांसाहारचे तुकडे टाकले जातात. तेथे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. जेलरोडच्या मॉडेल कॉलनीत नागरिकांनी ठेवलेल्या कचरापेटीत ही कुत्री रात्री घुसतात. शिळेपाके अन्न, तसेच मांसाचे तुकडे खाल्यानंतर कचरा विस्कटून टाकतात. त्यामुळे कचरा पसरून असह्य दुर्गंधी पसरते. जेलरोड परिसरातील भीमनगरमागील ब्रह्मगिरी सोसायटीत, तसेच कॅनॉल रोडवर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सकाळी वृत्तपत्रे घरोघरी पोहचविणाऱ्या विक्रेत्यांना, तसेच विद्यार्थ्यांना या कुत्र्यांचा त्रास होतो.

हे आहेत लक्ष्य

पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, कामगार, वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, कचरा वेचणाऱ्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास अधिक होतो. नोकरदार, तसेच क्लासवरून सायंकाळी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे कुत्री लागतात. जेलरोडला इंगळेनगर, पवारवाडी, जेलरोड- कॅनॉल रोड, तसेच उपनगर पोलिस ठाण्याच्या रोडवर हा त्रास होतो. ही कुत्री दबा धरून बसलेली असतात. सातपूर, अंबड येथून मध्यरात्री उशिरा कामावरून नाशिकरोडला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर जीव मुठीत धरूनच घरी यावे लागते. द्वारका व डीजीपीनगरमध्येही कुत्र्यांचा जाच आहे.

दहशतीच्या घटना

जयभवानी रोडच्या जाचक मळ्यात दोन वर्षांपूर्वी तीन बालकांसह आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. प्रकाश रहाणे यांचा पावणेतीन वर्षांचा मुलगा सिद्धार्थ शेजाऱ्यांबरोबर फिरायला निघाला असता एका कुत्र्याने सिद्धार्थला कानाच्या मागे व दंडावर चावा घेतला होता. काही वेळाने निवृत्त प्रेस कामगाराच्या कोपऱ्याला आणि नंतर पाच वर्षीय बालकाच्या दंडावर चावा घेतला. या कुत्र्याने पाटील कॉम्प्लेक्सजवळ प्रथम दीर-भावजयीला चावा घेतला. लहान मुलीला व वास्तुपार्कजवळ भाजी विक्रेत्यालाही कुत्र्याने चावा घेतला. कुत्री पकडण्यासाठी गाडी न आल्याने नागरिकांनी दुपारी साडेतीनपर्यंत वाट पाहून कुत्र्याला मारून दूरवर नेऊन टाकले. जेलरोडच्या ययातीनगर भागात काही महिन्यांपूर्वी चार वर्षीय बालिकेला, तसेच एका ज्येष्ठ नागरिकाला कुत्र्याने चावा घेतला होता. जेलरोडच्याच भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटीतील नागरिकांना, तसेच दुचाकीस्वारांवरही भटक्या कुत्र्यांनी अनेकदा हल्ला चढवला आहे.

भटक्या कुत्र्यांचा त्रास जेलरोडच्या भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटीतील नागरिकांना, तसेच दुचाकीस्वारांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, दूध विक्रेते, पेपर विक्रेते व प्रेस कामगारांचा पाठलागही ही कुत्री करतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.

- गणेश कुलथे, वृत्तपत्र विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदासच्या तांत्रिक त्रुटींचा कार्यक्रमांना फटका

$
0
0

रसभंग होतोय

कालिदासच्या तांत्रिक त्रुटींचा कार्यक्रमांना फटका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिराचे नुकतेच पुनरुज्जीवन करण्यात आले. साडे नऊ कोटी रुपयांचा चुराडा करूनही तेथे प्राथमिक सुविधादेखील नसल्याने अनेक कार्यक्रमांना त्याचा फटका बसत आहे. नुकत्याच झालेल्या काही नाटकांमध्येही अचानक लाईट गेल्याने प्रेक्षकांचा रसभंग होणे, तसेच कार्यक्रमाच्या वेळी पुरेसा प्रकाश नसणे यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागत असून कलाकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

प्रेक्षकांची वर्षभर पंचाईत करून महाकवी कालिदास कलामंदिर बंद ठेवण्यात आले. वर्ष उलटून गेल्यावरही सहा महिने कालिदास महापालिका आयुक्तांच्या धोरणामुळे बंदच होते या दिवसांमध्ये परशुराम साईखेडकर नाट्यगृह तसेच दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रम ठेवण्यात येत असत. दीड वर्षे नाशिककरांनी वाट पाहून त्यांच्या पदरात कालिदास कलामंदिर पडले मात्र तेथे प्राथमिक सुविधादेखील नसल्याने कलावंत तसेच प्रेक्षकांचा रसभंग होत आहे. याच प्रत्यय नुकताच एका नाटकादरम्यानदेखील आला. शांतेचं कार्ट चालू आहे, या नाटकात तब्बल वीस वेळा लाईट गेले. त्यामुळे नाटक सुरू ठेवावे की बंद करावे हेच कलाकारांना कळत नव्हते. अनेकदा तर त्यांनी काही काळासाठी थांबून घेणेच पसंत केले मात्र यात रसभंग झाल्याने नाशिक महापालिकेच्या नावाने बोटे मोडण्यात येत होती.

अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करूनही कलावंतांच्या पदरात असे नाट्यगृह पडणार असेल तर त्यापेक्षा इतर ठिकाणी नाटक केलेले काय वाईट अशी प्रतिक्रिया मुंबईहून आलेल्या कलाकारांमध्ये उमटत आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव याने तर फेसबूकवर कालिदास कलामंदिराविषयी एक पोस्ट लिहून त्याचे वाभाडच काढले. लोक इतके पैसे खर्च करून नाटक पाहायला येतात तर त्यांचा वीसवेळा रसभंग झालेला योग्य आहे का? त्यांच्या पैशांची व वेळेची किंमत मोठी आहे, त्यांनी असे अर्धवट आनंदात नाटक पहायचे का असा सवाल प्रियदर्शन यांनी केला असून टीव्ही, सिनेमा, इंटरनेट मोठ्या प्रमाणात असताना प्रेक्षकांनी नाटक का पाहायचे, रसभंग का करायचा? नाशिककरांना उत्तम सोयीसुविधा मिळायला हव्यात, हा वीजभंग लवकरात लवकर थांबवा अशा शब्दात प्रियदर्शनने महापालिकेला साकडे घातले आहे.

----

मुंबईच्या कलाकाराची पोटितडीक

प्रशांत दामले यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून कालिदासच्या दुरवस्थेचे वाभाडे काढले होते. त्यानंतर भरत जाधव यांनीदेखील पत्र देऊन महापालिकेला याबाबत सूचना केली होती. आता प्रियदर्शन जाधवने पोस्ट लिहून महापालिकेला काही प्रश्न विचारले आहेत. मुंबईच्या कलाकारांना येथे येऊन प्रयोग सादर करावे लागतात त्यामुळे ते या नाट्यमंदिराविषयी जागरूक राहून काही बदल सुचवतात ते लक्षात घेऊन महापालिकेने काम केले पाहिजे अशी चर्चा सांस्कृतिक वर्तुळात आहे.

---

नूतनीकरणानंतर नाशिकच्या वाटेचा अंधार सरेल असं वाटलं होतं पण 'कार्ट' ते कार्टंच. अजूनही ध्वनी आणि प्रकाशयोजना तंत्रज्ञ कालिदासच्या त्रुटींची यादी वाचून दाखवतात. पैशा परी पैसा गेलाच पण नाशिकच्या रंगभुमीची नाचक्की होते ती वेगळी. हे सगळं सुरळीत व्हावं ह्याशिवाय नटराजाकडे आणखी मागु शकतो.

- प्राजक्त देशमुख, नाट्यलेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images