छगन भुजबळ पुन्हा आक्रमक म. टा. वृत्तसेवा, येवला कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांचे कार्य अविस्मरणीय होते. ते कृषिमंत्री असताना देशातील कृषी क्षेत्राचा विकासदर उच्चांकावर होता, अशा शब्दात पवारांवर स्तुतीसुमने उधळतानाच, सध्याच्या केंद्र सरकारमधील कृषीमंत्र्यांचे नाव देखील जनतेस माहीत नाही. आताच्या सत्ताधारी राज्यकर्त्यांची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील शेतीव्यवसाय अन् शेतकरी मोडकळीस आला आहे, असा घणाघाती आरोप माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी केला. गेले काही महिने एकंदरीत शांततेच्या भूमिकेत दिसणारे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपला आक्रमक पवित्रा घेतला आहे. येवला विधानसभा मतदार संघातील बलेगाव, उंदिरवाडी, नागडे या गावा विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन भुजबळांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या आक्रमक स्टाईलमध्ये केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर त्यांनी तोफ डागली. शेतकऱ्यांच्या शेतमालास दीडपट हमीभाव देणार, दरवर्षी दोन कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देणार, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण देणार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशा अनेक खोट्या घोषणा करून सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकवण्याची संधी सोडू नका, असे भुजबळ म्हणाले. देशातील प्रमुख विरोधीपक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची कारस्थाने देशभरात सुरू आहेत. मला देखील केवळ सूडापोटीच तुरुंगात पोहोचवले होते. वास्तविक, महाराष्ट्र सदन हे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असून, कुशल कारागिरांकडून सदनाचे काम करून घेतले आहे. शासनाचा एक पैसाही खर्च न करता ही वास्तू उभारण्यात आली. असे असतानाही मोठा घोटाळा झाल्याची अफवा उठविण्यात आली, असेही भुजबळ म्हणाले. तालुक्यातील विविध ठिकाणच्या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ॲड. माणिकराव शिंदे हे होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट