आंध्र प्रदेशात मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'संक्रांती संबरलू' या उत्सवाचे आयोजन केले जाते. विशाखापट्टण्णमध्ये या उत्सवादरम्यान पारंपरिक वेशभूषा करून हा उत्सव साजरा करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
आंध्र प्रदेशात मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'संक्रांती संबरलू' या उत्सवाचे आयोजन केले जाते. विशाखापट्टण्णमध्ये या उत्सवादरम्यान पारंपरिक वेशभूषा करून हा उत्सव साजरा करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा .... ज्ञात स्रोतापेक्षा ७० टक्के जास्त संपत्ती पदाचा दुरुपयोग करून जमवली संपत्ती ... म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शासकीय सेवेत पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत मुंबईच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने आपल्या उत्पन्नापेक्षा तब्बल ७१ टक्के अपसंपदा जमविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे २०१२ मध्ये दाखल सापळ्याच्या गुन्ह्यात कोर्टाने निर्दोष सुटका केल्यानंतर याच प्रकरणात संबंधिताविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. शामराव महादेव शेटे व त्याची पत्नी शर्मिला शामराव शेटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शामराव शेटे सध्या मुंबईतील अंधेरी येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आरटीओ खात्यात १९८६ मध्ये पदभार स्वीकारणाऱ्या शेटे यांनी २०१२ पर्यंत जवळपास महाराष्ट्रभर काम केले. सन २०१२ साली नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या शेटे यांना ६०० रुपयांची लाच घेताना औरंगाबादच्या एसीबी पथकाने अटक केली होती. सापळ्यामध्ये अटक झाली तर अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येते. त्यामुळे शेटे यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली. मात्र, एसीबीने सुरू केलेल्या या चौकशीकडे शेटे यांनी वेळोवेळी पाठ फिरवली. त्यामुळे एसीबीने एकतर्फी ही चौकशी पूर्ण केली. त्यात शेटे यांनी नाशिक, कोल्हापूर आणि अन्य एका ठिकाणी बेनामी मालमत्ता घेतल्याचे समोर आले. २१ मार्च १९८६ ते १२ मार्च २०१२ या कालावधीत पदाचा दुरुपयोग करून शेटे यांनी उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ६९ लाख १७ हजार २२८ रुपयांची म्हणजेच ७०.९१% एवढी अपसंपदा स्वत:च्या व पत्नी शमीर्ला शेटे यांच्या नावे संपादित करून धारण केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास एसीबीच्या निरीक्षक मृदुला नाईक करीत आहेत. दरम्यान, शेटे यांच्या विरूद्ध दाखल सापळ्याच्या गुन्ह्यात त्यांची निर्दोष सुटका झाली असून, अपसंपदेच्या गुन्ह्यात काय घडामोडी होतात याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
वंचित आघाडीचे आज शक्तिप्रदर्शन; आघाडी-युतीला आव्हान .. म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक व दिंडोरी मतदारसंघात युती आणि आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच, तिसऱ्या आघाडीतील भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या एकत्रित बहुजन आघाडीनेही जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये प्रथमच हा प्रयोग होत असून, त्यासाठी भारिपचे डॉ. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असुद्दिन औवेसी हे रविवारी नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येत आहेत. वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केल्याने युती आणि आघाडीला धसका भरला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राजकीय पक्षांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने मात्र एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेचीही निवडणूक येत असल्याने यंदा राजकीय वातावरण अधिक काळ तप्त राहणार आहे. नाशिकमध्ये सध्या शिवसेना-भाजपचे वर्चस्व असून, नाशिकमध्ये शिवसेनेचा तर दिंडोरीत भाजपचा खासदार आहे. कधी काळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील या दोन लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या वेळेस युती आणि आघाडीत थेट सामना झाला होता. बसपानेही दिनकर पाटील यांच्या रुपाने उमेदवार दिला होता. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दिंडोरीत माकपच्या रुपाने युती आणि आघाडीला आव्हान दिले जाते. परंतु, यंदा माकपकडून आघाडीला बाय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सरळ लढत होईल असे चित्र असतानाच आघाडी आणि युतीपुढे वंचित बहुजन आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर आणि औवेसी यांनी राज्यात प्रथमच एकत्रिकरणाचा पहिला प्रयोग राबवला असून, वंचित आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यात या वंचित आघाडीच्या सभांना मोठा प्रतिसादही मिळत आहे. नाशिकमध्येही वंचित आघाडीची रविवारी दुपारी ३ वाजता जाहीर सभा होत आहे. या सभेला आंबेडकर, औवेसी उपस्थित राहणार आहे. अनंत कान्हेरे मैदानावर विशाल सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. आंबेडकरांनी समाजाची एकत्रित मूठ बांधत आघाडी आणि युतीपुढे आव्हान उभे केले आहे. तर औवेसींनीही मुस्लिम समाज आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरू केली आहे. नाशिकमध्येही यासाठीची चाचपणी केली जात असून, तिसरा पर्याय देण्यासाठी वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे वंचित आघाडीकडून रविवारी निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असून, उमेदवारांचीही घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे या आघाडीच्या सभेकडे लक्ष लागून आहे. .. दिग्गजांची उपस्थिती अनंत कान्हेरे मैदानावर रविवारी दुपारी होणाऱ्या या सभेत भारिप बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असुद्दीन औवेसी यांच्या सोबतच माजी आमदार लक्ष्मण माने, विजय मोरे, हरिदास भदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. वंचित आघाडीकडून या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B \Bकुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाच्या ज्योतिकलश सभागृहाच्या जागेवर राका कॉलनीतील स्थानिक रहिवाशांनी दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार ही जागा मनपाने रहिवाशांसाठी आरक्षित केली असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. महापालिकेने कुठलीही पूर्वसूचना न देता ज्योतिकलश सभागृह सील केल्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रात गदारोळ झाला. यातच राका कॉलनीतील स्थानिक रहिवासी आणि लोकहितवादी मंडळ यांच्यातील दुहीसुध्दा या निवेदनामुळे उघड झाली आहे. या सभागृहाबाबत पालिकेला स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे की, सद्यस्थितीत लोकहितवादी मंडळाच्या ताब्यात असणारी ही वास्तू व क्रीडांगणाची देखभाल केली जात नाही. करारनाम्यानुसार संबंधित ठिकाणाचे उद्यान विकसित केले गेलेले नाही. या वास्तूच्या मोकळ्या जागेत अनेकदा समाजकंटकांचा उपद्रव होतो. शिवाय मोकळ्या जागेचा उपयोग व्यापारी फायद्यासाठी केला जातो, अशा आशयाच्या तक्रारी रहिवाशांनी पालिकेकडे केल्या आहेत. ... लोकहितवादी मंडळाची भूमिका लोकहितवादी मंडळाच्या वतीने या सभागृहाच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही वास्तू बांधण्यासाठी कुसुमाग्रजांनी महापालिकेची मदत घेतली नव्हती. लोकवर्गणीतून उभी राहिलेली ही वास्तू असल्याने मंडळाच्या कलेच्या जपवणुकीच्या उद्दिष्टांसाठी ती मंडळाकडे सुरक्षित रहाणे गरजेचे आहे, अशी लोकहितवादी मंडळाची भूमिका आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. वृत्तसेवा, धुळे
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाकडून दरवर्षाप्रमाणे यंदाही दि. ११ ते २५ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा पंधरवडा सप्ताह राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी महामंडळाकडून ‘सुरक्षित सेवा व विना अपघात प्रवास’ अशी जनजागृती या सप्ताहादरम्यान केली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली.
दरवर्षाप्रमाणे यंदाही ३० वा रस्ता सुरक्षा सप्ताहाला राज्य परिवहन महामंडळाकडून शुक्रवारी (दि. ११) धुळे आगारात प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा पोलिस प्रमुख विश्वास पांढरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राकेश देवरे, गणेश सोनवणे, आगारप्रमुख भगवान जगनोर, यांत्रिक अभियंता रमेश अहिरे यांच्यासह धुळे राज्य परिवहन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला गेल्या वर्षभरात विना अपघात सेवा देणारे चालक, तसेच जास्तीचे उत्पन्न आणणारे चालक तसेच दोषमुक्त एसटी सेवेत देणारे कार्यशाळेतील यांत्रिक कारागिर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर कर्मचाऱ्यांशी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे म्हणाले की, जीवन जगतांना आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरक्षा आहे. आणि तिच आपल्याकडे नसेल तर जीवन जगण्यात काहीही अर्थ नाही. गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, वर्षभरात रस्ते अपघातात एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. मात्र हे प्रमाण कमी करायचे असेल तर वाहन चालविताना वाहतूकीचे नियम पाळून वाहन हाताळण्यास अपघात टाळणे सहज सोपे होणार आहे, असेही अधसीक्षक पांढरे म्हणाले.
पडताळणी करूनच वाहन हाताळा
विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा पंधरवाडा मोहीम तात्पुरता नसून कायमस्वरुपी वाहन चालविताना वाहनांचे नियम समोर ठेवून वाहन चालविले पाहिजे. आतापर्यंत महामंडाळाच्या धुळे विभागाने गेल्यावर्षी २ कोटी ५० लाख रुपये अपघात दावाप्रकरण भरपाई दिली आहे. मात्र तोट्यात असलेली एसटीचे कर्मचारी पगारवाढीसाठी निरनिराळे आंदोलने करून न्याय मागण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे विनाअपघात सुरक्षित सेवा दिल्यास कोट्यवधी रुपये एसटी महामंडळाचे वाचतील आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील. त्यामुळे सुरक्षित सेवा दिली पाहिजे. तसेच वाहनांचे यांत्रिक दोषामुळे ९९ टक्के आणि १ टक्का मानवी दोषामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी वाहनात कोणताही दोष नाही याची पडताळणी करूनच वाहन हाताळले गेले पाहिजे, असेही सपकाळ यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यास क्राइम ब्रँच युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित विक्रेत्याकडून तब्बल दोन लाख २२ हजार रुपये किमतीचे ३०० गट्टू हस्तगत करण्यात आले. पोलिसांची कारवाई सातत्याने होत असली तरी नायलॉन मांजाची चोरीछुपे शहरात विक्री होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणारी नायलॉन मांजाची विक्री व वापराबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्वच पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रीवर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात दररोज कोठेतरी नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. किरकोळ विक्रेत्यांना अटक केली जात असताना पुरवठादार मात्र पोलिसांच्या कचाट्यात सापडत नव्हता. यामुळे युनिट एकच्या पथकाने शहरातील सर्वात मोठ्या विक्रेत्याकडे लक्ष केंद्रीत केले. नायलॉन मांजाचा मोठा बॉक्स घेऊन एक विक्रेता रविवार कारंजा भागातून जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशातील पोलिसांनी शनिवारी (दि. १२) सापळा रचला. संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोपेडवरुन (एमएच १५, ईझेड ६३८१) संशयित दिलीप पांडुरंग सोनवणे हा नायलॉन मांजाचा बॉक्स घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली व झडती घेत त्याच्याजवळील बॉक्स जप्त केला. त्याच्याकडून नायलॉन मांजाच्या गुप्त साठ्याच्या ठिकाणाची माहिती घेत वाघ यांच्यासमवेत वसंत पांडव, आसिफ तांबोळी, स्वप्नील जुंद्रे आदींनी त्याठिकाणी धाड टाकली. तेथील गुदामात पोलिसांना दिल्ली येथून मागविण्यात आलेल्या नायलॉन मांजाचे ३०० गट्टू सापडले. ते हस्तगत करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत अंदाजे दोन लाख २२ हजार रुपये इतकी आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नायलॉन मांजाचा साठा असा एकूण पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सोनवणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शहरात ठिकठिकाणी हा मांजा पोहच होणार होता. या प्रकरणी विक्रेत्याविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत असलेले इंधनाचे दर पुन्हा वाढले आहेत. नाशिकमध्ये लिटरला पेट्रोलचा दर ७६ रुपये ४ पैसे, तर डिझेलचा दर ६६ रुपये ४ पैसे इतका झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून इंधनाच्या किमतीत चढउतार होत होते. मात्र, रविवारी पेट्रोल डिझेलच्या किमतीत एक रुपयाने वाढ झालेली दिसून आली. नाशिकमध्ये दहा दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर ७४ रुपये ४ पैसे, तर डिझेलचे दर ६४ रुपये २७ पैसे इतके होते. डिसेंबरच्या सुरुवातीला पेट्रोल ७८ रुपये ४६ पैशांपर्यंत पोहोचले होते. मात्र, अखेरीस पेट्रोलचा दर ७४ रुपये ५६ पैसे इतका खाली आला होता. डिझेलचा दर डिसेंबरमध्ये ६९ रुपये ७५ पैशांवरून ६४ रुपये ८३ पैशांवर आला होता. गेल्या दहा दिवसांत इंधन दरात १ रुपयाचा चढउतार होत होता. मात्र, रविवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ झाली. जानेवारीत इंधनाच्या किमती पुन्हा वाढू लागल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली असून, नववर्षात इंधनाच्या किमतीने पुन्हा उच्चांक गाठू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. \Bदहा दिवसांचे दर दिनांक............. पेट्रोल........... डिझेल \B१३ जानेवारी...... ७६.०४......... ६६.२५ १२ जानेवारी...... ७४.९७......... ६५.०७ ११ जानेवारी...... ७४.८१......... ६४.८० १० जानेवारी....... ७४.५४......... ६४.४३ ९ जानेवारी......... ७४.६७......... ६४.६१ ८ जानेवारी......... ७४.२६......... ६४.२२ ७ जानेवारी......... ७४.४२......... ६४.३७ ६ जानेवारी.......... ७४.२३......... ६४.३० ५ जानेवारी.......... ७४.४९......... ६४.६६ ४ जानेवारी........... ७४.०४......... ६४.२७
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
माजी खासदार समीर भुजबळ यांचा आरोप म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक स्मार्ट सिटी करण्याच्या नावाखाली शहरातील अनेक प्रकल्प पळविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आयोजित बुथ कमिट्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले, की शहरात आघाडी सरकारच्या काळात विविध विकासकामे केली. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली; मात्र सत्तेत आलेल्या शिवसेना भाजप सरकारने हे प्रकल्प रखडवीत धुळीला मिळवले. यातील काही महत्त्वाचे प्रकल्प नाशिकमधून पळविण्यात येत आहेत. नाशिक दत्तक घेऊन नाशिकला स्मार्ट सिटी करू अशा घोषणा केल्या त्यांनाच स्मार्ट सिटीचा विसर पडल्याची टीका त्यांनी केली. सरकारने अनेक स्वप्न दाखविले मात्र जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युती सरकारला पायउतार करण्याची गरज आहे. प्रत्येक बूथमध्ये असणारा कार्यकर्ता आणि त्याचे सहकारी यांच्यापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न एनसीपी कनेक्ट या अॅपच्या माध्यमातून सोडविले जाणार आहे. पक्षाच्या पुढच्या वाटचाली संदर्भातील ध्येय धोरणे पोहचविता येणार आहे. यातून प्रत्येक घरापर्यंत पोहचून पक्षबांधणी होणार आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. शहरातील सिडको येथे बुधवारी (दि. १६) होणाऱ्या निर्धार परिवर्तन यात्रेत सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
कार्टिंग एजंट्सच्या मक्तेदारीने रेल्वे मालधक्यावर तिढा म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) कामाचा परराज्यातील कंपनीचा ठेका स्थानिक कार्टिंग एजंटांच्या मक्तेदारीमुळे नाशिकरोड रेल्वे मालधक्का अडचणीत आला असून तेथे काम करणाऱ्या कामगारांचीही कोंडी झाली आहे. या ठेक्यावरून कामगार संघटनांत असंतोष असून त्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या शनिवारी (दि. १९) सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिकरोड रेल्वे धक्क्यावरील 'एफसीआय'मार्फत येणाऱ्या शासकीय धान्याच्या वाहतुकीचा ठेका न्यू हैदराबाद मेडक ट्रान्सपोर्ट या परराज्यातील कंपनीला मिळाला आहे. यापूर्वी हा ठेका नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील आनंद टान्सपोर्ट कंपनी या कार्टिंग एजंटकडे होता. आता हा ठेका दुसऱ्या कंपनीला मिळाल्याने स्थानिक कामगारांनी सहकार्य करू नये यासाठी स्थानिक कार्टिंग एजंट कंपन्यांनी कामगारांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी कामगार संघटना, कामगार उपायुक्त कार्यालय आणि कार्टिंग एजंट कंपन्यांत झालेल्या एका कराराचा आधार घेतला जात आहे. स्थानिक कामगार संघटनांनी परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीचे काम केल्यास या कथित कराराच्या आधारे संबंधित कामगारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची भीती कामगारांना दाखवली आहे. परिणामी नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांनी न्यू हैद्राबाद मेडक ट्रान्सपोर्ट कंपनीचे काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे 'एफसीआय'कडून आलेला शासकीय कोट्यातील धान्य नाशिकरोड येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये साठविणे आणि तेथून इतर ठिकाणी पाठविण्याचे काम ठप्प पडले होते. त्यानंतर या कंपनीने पोलिसांतही धाव घेतली. नाशिकरोड पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रश्नावर आता माथाडी कामगार मंडळ आणि कामगार उपायुक्त कार्यालय यांच्यात येत्या सोमवारी (दि. २१) बैठक होणार आहे. कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना कामगार उपायुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीत न्यू हैदराबाद मेडक ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या कामाबाबत निर्णय घेण्यापूर्वी शनिवारी (दि. १९) नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी, सिटू, राष्ट्रीय दलित पँथर आणि रिब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. माथाडी कामगार मंडळ आणि कामागार उपायुक्त कार्यालयाच्या सोमवारच्या (दि. २१) बैठकीत कोणताही निर्णय घेतल्यास त्यास विरोध करण्याची भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे. हा तिढा कार्टिंग एजंटच्या मक्तेदारीने निर्माण केल्याचे उघड झाले आहे. परिणामी मालधक्क्यावरील कामगारांत असुरक्षिततेचे वातावरण आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
नाशिक : 'जेव्हा जीवनातील सुखाची भावना बाजूला सारून, कल्याणकारी कार्य केले जाते, तो खरा जीवनगौरव होय. त्यामुळे समृद्ध जीवनासाठी अध्यात्मिक उपक्रमांची गरज असते. जेव्हा कौटुंबिकता आणि अध्यात्म जीवनात येते, तेव्हा जीवन आनंदी आणि सुखमय होते', असे प्रतिपादन विद्यावाचस्पती लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. श्री मोहिनीराज भक्त मंडळ नाशिकतर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी ७ वाजता शालिमार येथील मुं. श. औरंगाबादकर सभागृहात हा सोहळा झाला. सोहळ्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या मोहिनीराज भक्तांना 'श्री मोहिनीराज जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोहळ्याचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष किशोर गायधनी यांनी केले. मंडळाच्या विविध योजनांची माहिती मंडळाचे कार्यवाह सुधीर गायधनी यांनी दिली. सोहळ्यात 'श्री मोहिनीराज डॉट कॉम' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. भास्कर रत्नपारखी, श्रीकृष्ण रत्नपारखी, मालती दीक्षित, कालिंदी देव, पद्मावती दीक्षित, गंगाधर गायधनी, प्रवीण भावे, रमेश कुलकर्णी, श्रीधर दीक्षित, सुरेश चंद्रात्रे, वत्सला गायधनी, विश्वास गायधनी, प्रभावती शुक्ल, कालिंदी दीक्षित, प्रभाकर दीक्षित, प्रतिभा अग्निहोत्री यांना 'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२१ वी जयंती मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्याख्यान, शोभायात्रा, पुरस्कार सोहळे यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अशोकनगर, सातपूर येथे जिजाऊ ब्रिगेडतर्फे शिवव्याख्यात्या व नाशिक विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे यांचे व्याख्यान झाले. जिजाऊ पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैशाली देवरे, ब्रिगेड महानगर प्रमुख चारुशिला देशमुख यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. कुमुदिनी भामरे यांनी सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक केले. जिजाऊ ब्रिगेड राबवित असलेल्या उपक्रमांबाबत चारुशिला देशमुख यांनी माहिती दिली. स्त्री शक्तीचे महत्त्व वैशाली देवरे यांनी सांगितले. कार्यक्रमास जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश कार्याध्यक्षा शिवमती माधुरी भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले. संघटक नीलिमा निकम यांनी आभार मानले. जिजाऊ ब्रिगेडच्या सातपूर शाखा प्रमुखपदी कुमुदिनी भामरे यांची नियुक्ती करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक शेतजमिनीच्या वादातून कूळधारकास दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अजित भालचंद्र आंबीकर आणि नितीन भालचंद्र आंबीकर (दोघे रा. गितांजली सोसायटी, गंगापूररोड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी स्वप्नील राजेंद्र आहेर (२४, रा. मांडवड, ता. नांदगाव) याने फिर्याद दिली. स्वप्निलचे वडील राजेंद्र आहेर यांनी १३ नोव्हेंबर २०१८ रोजी संशयितांच्या दमदाटीला वैतागून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मांडवड (ता. नांदगाव) येथे आंबीकर यांच्या शेतजमिनीवर आहेर कुटुंबिय पणजोबापासून कूळ म्हणून शेतजमीन कसत आहेत. जमिनीच्या मालकी हक्काबाबत वाद उद्भवल्यानंतर महसूल विभाग आणि पुढे कोर्टात प्रकरण गेले. सध्या महाराष्ट्र महसूल न्याय प्राधिकरणाकडे वादाचे प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान, हा वाद सुरू झाल्यानंतर संशयित आरोपींनी वेळोवेळी राजेंद्र आहेर यांच्यासह फिर्यादी स्वप्निल यास दमदाटी केली. याच त्रासाला कंटाळून राजेंद्र आहेर यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी नांदगाव पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. स्वप्निलने याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षकांना भेटून आपली कैफियत मांडली. यानंतर नांदगाव पोलिसांनी दोघा संशयितांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक ढोल ताशांच्या गजर, वेद मंत्रोच्चाराच्या घोषात श्रृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांचा पाद्यपूजन व दर्शन सोहळा रविवार पेठेतील चित्तपावन मंगल कार्यालयात मोठ्या भक्ती भावाने पार पडला. निमित्त होते, वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित श्री लक्ष्मी कुबेर यागाच्या पूर्णाहुतीचे. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक सहभागी झाले. श्रृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य यांचे परिसरात आगमन होताच, एकमुखी दत्तमंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर फुलांनी सजवलेल्या पायघड्यावर चित्तपावन मंगल कार्यालयात प्रवेश केला. यावेळी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. यावेळी शांताराम शास्त्री भानोसे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मवृंदानी केलेल्या मंत्रघोषात वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित श्री लक्ष्मी कुबेर यागाची पूर्णाहूती त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित यजमानांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी शंकराचार्यांनी उपस्थितांना आर्शिवाद दिले. प्रत्येकाने धर्माचे आचरण करावे वेद अध्यायन करून आपली संस्कृती टिकवावी, असे मार्गदर्शन शंकराचार्य यांनी उपस्थितांना केले. यावेळी विविध संस्थांच्या वतीने त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उद्योजक धनंजय बेळे, वेदमूर्ती शांताराम शास्त्री भानोसे, वेदमूर्ती दिनेश गायधनी, वेदमूर्ती लोकेश आकोलकर, अंजली जाधव, वेदमूर्ती जयंत जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान, देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या दुर्गा मंगल कार्यालयात तीळभांडेश्वर लेन येथे सोमवारी (दि. १४) दुपारी ४ वाजता पाद्यपूजन केले जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
नाशिक : काम करताना शर्ट मशिनमध्ये सापडल्याने गळ्याला फास बसून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सातपूर एमआयडीसीतील सिकॉप कंपनीत शनिवारी (दि.१२) सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. मधुकर सीताराम राउतमाळे (वय ३६, रा. कुळबस्ते, ता. त्र्यंबकेश्वर) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. शनिवारी सकाळी राउतमाळे कंपनीत काम करीत असताना ही घटना घडली. मशिनवर काम करणाऱ्या राउतमाळे यांच्या अंगातील शर्ट चालू मशिनमध्ये अडकला. मशिनने शर्टला खेचल्याने शर्टचा फास राउतमाळे यांच्या गळ्याला बसला. मशिनचा जोर जास्त असल्याने त्यांच्या मानेचे हाड मोडले. इतर कामगारांनी राउतमाळे यांना लागलीच बाजूला काढीत उपचारासाठी जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना राउतमाळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. ... वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या नाशिक : अंबड परिसरात वेगवेगळ्या घटनेत ३० वर्षांच्या तरुणासह २५ वर्षांच्या युवकाने आत्महत्या केली. या दोन्ही घटनांप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध अंबड पोलिस घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल प्रवीणचंद संचेती (वय ३०, रा. स्वामी समर्थ अपार्ट. अतुल डेअरीजवळ, डीजीपीनगर) असे तरुणाचे नाव आहे. ११ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हर्षलने राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला होता. हर्षलच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसून, घटनेचा अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत. दरम्यान, आत्महत्येची आणखी एक घटना पांगरे मळा येथील शिताई अपार्टमेंटमध्ये झाली. या ठिकाणी राहणाऱ्या अश्विनी बंडू भोर (वय २५) या तरुणीने अज्ञात कारणातून ११ जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन केले. ही घटना उघडकीस येताच अश्विनीचा मित्र लाला असिफ शेख याने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास हवालदार गारले करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
सुखनवर : प्रा. अशोक पिंगळे --- हमारी ऩज्म रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिए आ आ फि़र से मुझे छोड के जाने के लिए आ *** शोला था जल बुझा हूँ हवा ये मुजे न दो मै कब का जा चुका हूँ सदाये मुजे न दो *** अब के हम बिछडे तो शायद ख्वाबों में मिले जिस तरह सुखे हुए फूल किताबों में मिले या अहमद फराज यांच्या संवेदनशील लेखनीतून उतरलेल्या व शहेनशा-ए-ग़ज़ल मेहदी हसन यांनी अनुक्रमे यमनकल्याण, किरवानी व जनस मोहिनी रागावर गायलेल्या या माईलस्टोन असलेल्या ग़ज़लांच्या पलीकडे एक पंजाबी पठाणाचे प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा व दु:खाचे लेखणीद्वारे प्रकट होणारे विवेचन अनेकांना माहितही असेल, परंतु त्यातील अनेक रंगछटा ग़ज़ल व ऩज्मद्वारे आपल्यासमोर प्रस्तुत करताना त्याचे किडनी विकाराने २५ ऑगस्ट २००८ रोजी निधनामुळे त्यांच्या पूर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी... 'जिंदा रहते कोई न जाने, मौत के बाद सब पहचाने' या शेरचा आधार घ्यावासा वाटतो. अहमद फराज यांचे मूळ नाव सैयद अहमद शाह अली. त्यांचे प्रारंभिक शिक्षण फारसीमध्ये झाले. ग़जल फॉर्म मुळत: फारसी असल्यामुळे १९ व्या शतकात विकसित होत असलेल्या या काव्य प्रकारात एक आगळं वेगळं योगदान दिलं, परंतु ते देत असतानाचा त्यांचा प्रवास अत्यंत रंजक होता. पाकिस्तानमधील पेशावर विद्यापीठात फारसी व उर्दू विषयाचे शिक्षण घेतल्यानंतर तेथेच ते प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. सुरुवातीच्या काळात सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्ताँ हमारा ज्यांनी वर्णन केले त्या डॉ. इकबाल यांच्या काव्याने प्रभावित असलेल्या फराज़ यांच्या ग़जल व ऩज्मवर फैज अहमद फैज आणि सरदार झाफरी व अहमद नदीम कासमी यांच्या भावूक, संवेदनशील व सामाजिक आशयाचा प्रभाव होता. मदर्द आशोबफ, मखाना बदोशफ, जिंदगी-ए-जिंदगी, शब खून, जानाँ-जानाँ, बे-आवाज़, गली-कूचों, नाबीना शहर में आईना, तनहा-तनहा यांसारखी ग़ज़ल व ऩज्म संग्रह प्रसिद्ध होती. २००४ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यानां हिलाल-ए-इम्तियाज या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले होते. रेडिओ पाकिस्तानमध्ये काम करताना अॅकॅडमी ऑफ लेटर्सच्या चेअमरनपदी काम केले. अहमद फराज़ यांचा स्वभाव सुरुवातीपासून रोमँटिक होता. प्रेमासाठी आतुर असलेल्या भावनांचे अंतरंग व्यक्त करताना ते म्हणतात - यूँ तो पहले भी हुए उस से कई बार ज़ुदा लेकिन अब के नज़र आते हैं कुछ आसार ज़ुदा वरील ग़जल शेरांमध्ये दयेचा प्रहार, सांत्वनाचे आघात, भेटणारे दुरावे, लाघवी नकार, जीवनाबद्दलच्या तक्रारी असे किती तरी शब्द आशय अधिक गहन व सुंदर करून जातात आणि प्रेम व्यक्त करताना व विरहात प्रेयसीच्या अवस्थेबद्दल वर्णन करताना हळूवार, रेशमी व सुचक बनतात. अखंड भारताच्या फाळणीनंतर नवीन राजकीय समीकरणात व सांस्कृतिक ध्रुवीकरणात साहित्यावर फैज अहमद फैज़ यांच्या मदाग़दार उज़ालाफ, मसुब्हे आज़ादीफ व अली सरदार जा़फरी, अदीब सहारनपुरी यांच्या कम्यूनिझम विचारसरणीवर आधारित आधुनिक विचार प्रवाहाची शैली रूढ होत गेली. काव्याच्या नव्या परिभाषेने जन्म घेतला. पाकिस्तानात इस्लामी आणि भारतात समाजवादी असे रुप दिले. त्यात अहमद फराज़ यांनी विविध ऩज्मद्वारे लोकक्षोभ व्यक्त केला. त्यात त्यांना झिया उल हक राजवटीत भर मुशायऱ्यातून पोलिसांनी उचलून नेले व त्यांना छळ सोसावा लागला. अनेकवेळा त्यांना पाकिस्तानातून परागंदा होऊन युरोप व कॅनडात जावे लागले. समाजातल्या एकूण अन्याय व पाखंडीपणा विरुद्ध आवाज उठविताना हा कवी म्हणतो- अमीरे-शहर फकीरों को लूट लेता है फराज़ कभी ब-हिला-ए-मजहब कभी बनामे व़फा जगामधील ढोंगी (पाखंडी) असा प्रस्थापित वर्ग हे फराज़ यांच्या ग़जलेचे मुख्य लक्ष आहे. फराज़ांच्या ग़ज़ल व विविध ऩज्ममधून त्यांचे जीवनविषयक चिंतन, जगण्यासाठी सामाजिक व राजकीय द्वंद्वातून उभा राहणारा भावनिक संघर्ष, त्यातून होणारा कोंडमारा आणि विविशता, प्रेम, विरह, प्रतीक्षा व मिलनापलीकडील हे सर्व काही त्यांच्या या प्रवासात त्यांना ज्या गोष्टींनी छळले व भाळले तेच त्यांनी त्यांच्या लेखणीतून व्यक्त केले होते. (लेखक गझलचे अभ्यासक आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
विधुभारती यांचा आज नागरी सत्कार नाशिक : शहरात विजययात्रेवर असलेल्या शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्य श्री विधुभारती यांचा नाशिकरांतर्फे सोमवारी (दि. १४) शंकराचार्य न्यास व सहयोगी संस्थांच्या वतीने नागरी सत्कार होणार आहे. यात धर्मजागरण पीठ, श्री शृंगेरी, नाशिक कैलास मठ, शुक्ल यजुर्वेदीय संस्था आणि महर्षी गौतमी-गोदावरी विद्या प्रतिष्ठान या संस्थांचा सहभाग आहे. डॉ. कुर्तकोटी सभागृह, जुना गंगापूर नाका येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमास शंकराचार्यांना सन्मानपत्र दिले जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक पर्यटन प्रदर्शनातच सहलींची बुकिंग करण्यास पर्यटकांनी पसंती दिली असून, सर्वाधिक पसंती भारतीय सहलींना देण्यात आली आहे. तीन दिवसात भारतीय सहलींसाठी ४०, तर विदेशातील सहलींसाठी ३० पर्यटकांनी नोंदणी केल्याचे आयोजकांनी सांगितले. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ नाशिक (तान) तर्फे शुक्रवार ते रविवार या काळात जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये तीन दिवसीय पर्यटन प्रदर्शन भरविण्यात आले. ते पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. या तीन दिवसांत सुमारे अडीच हजारांवर पर्यटकांनी प्रदर्शनास भेट दिली. विविध सहलींची माहिती घेण्यात आली. यामध्ये ५० पर्यटन कंपन्यांचे प्रतिनिधी नाशिककरांना सहलींची माहिती देत होते. दोन महिन्यांनी येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटनाला कोणत्या ठिकाणी जाणे शक्य असेल, कोणती सहली खिशाला परवडणारी असेल, कोणत्या सहलीची निवड करणे योग्य असते, याबाबतची माहिती पर्यटकांना प्रदर्शनात देण्यात आली. यामध्ये धार्मिक सहलींसाठी २५, तर क्रुझ सहलींसाठी ५ पेक्षा अधिक पर्यटकांनी नोंदणी केल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. रविवारी रात्री ८ वाजता आयोजकांसह विविध पर्यटन कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत प्रदर्शनाचा समारोप झाला. यातून नाशिककरांपर्यंत पर्यटनाच्या नव्या संधींची माहिती पोहोचवणे सोपे झाल्याचे मत आयोजकांनी मांडले. यावेळी स्पॉट बुकिंग करणाऱ्यांना सहलीच्या शुल्कात विशेष सूट देण्यात आली. प्रदर्शनाचे संयोजन असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भालेराव, उपाध्यक्ष राजेंद्र बकरे, सचिव मनोज वासवाणी, खजिनदार अंबरिश मोरे यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केले. फोटो : पंकज चांडोले
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०१८ या वर्षात वाहतूक पोलिसांनी तब्बल ३८६ वाहनचालकांचे वाहन परवाने जप्त केले. या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून ते प्रादेशिक परिवहन विभागास सादर करण्यात आले. यातील १३० परवाने निलंबित झाले असून, या वर्षी प्रलंबित २५६ वाहन परवान्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर शहर वाहतूक शाखेतर्फे संबंधीत वाहनचालकावर दंडात्मक कारवाई होते. दुसरीकडे वाहनचालकास जागेवर दंड भरायचा नसल्यास तो कोर्टात दाद मागू शकतो. अनेकदा 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह' अथवा 'ओव्हर स्पीड', अवैध प्रवासी वाहतूक, सिग्नल जम्पिंग असे गंभीर प्रकार सर्रास घडताना दिसतात. स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा वाहनचालकांचे परवाने वाहतूक पोलिस जप्त करतात. यानंतर तो परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठवले जातात. २०१८ या वर्षात वाहतूक शाखेने तब्बल ३८६ प्रस्ताव आरटीओकडे पाठवले. त्यातील १३० परवाने निलंबित झाले आहेत. २०१७ मध्ये वाहतूक शाखेने पाठवलेल्या १३४ प्रस्तावांपैकी सुमारे १३० परवाने निलंबित झाले होते. याबाबत वाहतूक पोलिसांनी सांगितले की, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, मोबाइलवर बोलणे, सिग्नल जम्पिंग, रॅश ड्रायव्हिंग तसेच मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे अशा प्रमुख पाच कारणांसाठी वाहनचालकाचा परवाना जप्त करण्यात येतो. जप्त परवाना आणि निलंबनाचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जातो. तेथे वाहनचालकाने आपली बाजू मांडल्यानंतर पुढील निर्णय होतो. वाहनचालकाने केलेली चूक पुन्हा होऊ नये, म्हणून ही कार्यवाही करण्यात येते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. वाहतूक पोलिसांशिवाय आरटीओ देखील आपल्या पातळीवर कारवाई करीत असते. वाहन परवाना निलंबित झालेल्या वाहनचालकास ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतरच निलंबनाचा कालावधी संपला की वाहन परवाना मिळू शकतो. संबंधित वाहनचालकांना बुधवारी आरटीओ कार्यालयात बोलवण्यात येते. त्याच्यावरील आरोप आणि वाहनचालकाने मांडलेली बाजू लक्षात घेता १५ दिवस ते सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला जातो. अवैध प्रवासी वाहतुकीच्या प्रकारात तर अनेकदा वाहन परवानादेखील काही कालावधीसाठी निलंबित करण्यात येतो. एखाद्या वाहनचालकाने चार महिन्यांच्या आत तीन वेळा नियमभंग केल्याचे समोर आल्यास त्याचा परवाना रद्द करता येतो. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यातून होणारा मनस्ताप देखील टाळता येऊ शकतो, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. -- महिना निलंबन प्रस्ताव निलंबित परवाने जानेवारी ६ ६ फेब्रुवारी ० ० मार्च १२७ ५३ एप्रिल ४४ १९ मे ५१ २३ जुन २९ ८ जुलै २१ ४ ऑगस्ट ५ १ सप्टेंबर ४ १ ऑक्टोबर १ ० नोव्हेंबर ० ० डिसेंबर ९८ १५ एकूण ३८६ १३०
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
खरेदीसाठी महिलांची गर्दी ... म. टा. प्रतिनिधी, नाशिक एक दिवसावर आलेल्या मकरसंक्रांत सणाच्या खरेदीसाठी महिलावर्गाने रविवारी बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. सुटीची पर्वणी साधत तीळगूळ, हळदी कुंकवाच्या वस्तू यासह आकर्षक पतंगीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. यावेळी हलव्याच्या दागिन्यांच्या साजाने थटलेल्या बाजारपेठेत संक्रांतीच्या गोड पदार्थांचा गोडवा दरवळत होता. यंदा मंगळवारी (१५ जानेवारी) मकरसंक्रांत आहे. त्या निमित्ताने रविवारी सुटीचा मुहूर्त साधत महिलावर्गासह तरुणांनी बाजारपेठेत गर्दी केली. बाजारातील रेडिमेड तीळगूळ, तिळाचे लाडू, चिक्की, गुळाची रेवडी, साखरफुटाणे खरेदीला यंदाही प्राधान्य देण्यात आले. तीळगूळ ११० ते १६० रुपये किलो, रेवडी १२० रुपये, तिळाचे लाडू १८० रुपये किलोने मिळत आहेत. तसेच संक्रांतीला विशेष मान असणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके वेल, झुमके, गजरे, मोहनमाळ, सुट्टे तनमणी, मंगळसूत्र, बांगडी, घड्याळ, नथ, छल्ला, हार, फुलगुच्छ, नेकलेस, अशा दागिन्यांना महिलावर्गाने पसंती दिली. हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी मेनरोड, दहिपूल, रविवार कारंजा या ठिकाणी महिलांची गर्दी अधिक दिसली. ... \Bपतंगांचे विशेष आकर्षण \B यंदा कापडी आणि कागदी पतंगांचे विशेष आकर्षण दिसून आले. यामध्ये कार्टून्स पतंगीला दरवर्षीप्रमाणे अधिक मागणी आहे. त्याचप्रमाणे कापडी पतंगांमध्ये गरुड, स्पायडरमॅन, फिश, अँग्रीबर्ड या पतंग ३० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून, यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. नायलॉन मांज्याला बंदी असल्याने सुतरी आणि बरेली मांजा ग्राहकांनी खरेदी केला असला, तरी छुप्या पद्धतीने अद्यापही नायलॉन मांजा विकला जात असल्याचे दिसून आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
लोगो - मार्केटवॉच ... म. टा. प्रतिनिधी, नाशिक बाजार समितीत पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. यामुळे हिरव्यागार पालेभाज्या १० ते १५ रु. जुडीने मिळत आहेत. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदापात विक्रीसाठी आणत आहेत. यामुळे कांदापातच्या जुडीचे दर ५ ते १० रुपयांपर्यंत घसरले आहेत. पाणी कमी पडू लागल्याने तसेच थोडा उन्हाचा चटका जाणवू लागल्याने पालेभाज्यांची आवक वाढू लागली आहे. मेथी, कांदापात, शेपू, पालक या पालेभाज्यांचे जुडीचे दर १० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कोथिंबीरचीही आवक चांगली असून, चांगल्या प्रतीच्या जुडीला ४० रुपये दर मिळत आहे. मात्र मेथीचे दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात १५ ते २० रुपयांना मिळणारी मेथीची जुडी १० रुपयांपर्यंत खाली आली आहे. पालकची जुडी ५ रुपयांना मिळत आहे. यामुळे ग्राहकांना कमी दरात भरपूर भाजीपाला मिळत आहे. फळभाज्यांचेही दर आवाक्यात असून, शेवगा मात्र भाव खात आहे. शेवग्याला ६० ते ८० किलोचा दर मिळत आहे. त्या खालोखाल कारले, गिलके व दोडके 'भाव' खात आहेत. या फळभाज्यांना किलोला दर ५० ते ६० रुपये दर मिळत आहे. वांगे, भेंडी, ढोबळी मिरची या भाज्यांचे किलोच दरही ४० रुपयांपर्यंत पोहाचले आहेत. टोमॅटोचे दर थोडे वाढले असून, २० रुपये किलोने मिळत आहेत. बटाट्याचे दर २० रुपये किलोवर स्थिर आहेत. उपवासाच्या पदार्थ तयार करण्यास पुढील महिन्यांपासून सुरुवात होईल. यामुळे बटाट्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. .. किरकोळ बाजारात कांदा महाग बाजार समितीत दर मिळत नसल्याने शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर कांदा फेकून दिला. असे असूनही किरकोळ बाजारात मात्र कांदा १० ते १५ रुपये किलोने विक्री होत आहे. लाल नवीन कांदा विक्रेते १५ रुपये किलोने विकत आहेत. .................... मोड आलेल्या कडधान्याला मागणी नाशिक : हिवाळ्यात मोड आलेले कडधान्य जेवणात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. यामुळे मटकी, मूग, हरभरा, चवळी या मोड आलेल्या धान्याची मागणी वाढली आहे. मटकीचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात ६० रुपये किलोने मिळणारी मटकी ४८ रुपये किलोने मिळत आहे. हरभरा ६०, मूग ६० तसेच, चवळी ६० रुपये किलोने मिळत आहे. यंदा दुष्काळामुळे कडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे मोड आलेल्या कडधान्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. .... पालेभाज्यांचे दर मेथी - १० रु. जुडी कांदापात - ५ ते १० रु. जुडी पालक - ५ रु. जुडी शेपू - ७ रु. जुडी कोथिंबीर - ४० रु. जुडी .. फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) टोमॅटो - २० काकडी - २० शेवगा - ६० ते ८० भेंडी - ४० वांगे - ४० कारले - ५० गिलके - ४० दोडके - ५० ते ६० गाजर - २० ढोबळी मिरची - ४० मिरची - ४० ते ५० बटाटा - २० कांदा - १० ते १५ मुळा - १५ रु.चे ८ कोबी - १० रु. नग फ्लॉवर - १० ते १२ रु. नग ................... ज्वारी खातेय 'भाव' .. म. टा. प्रतिनिधी, नाशिक यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ज्वारी, बाजरीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच, रब्बी हंगामातही गहू, हरभरा पिकांची लागवड कमी झाली आहे. यामुळे गहू, ज्वारी, बाजरीचे दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ज्वारी गहू, बाजरीपेक्षा महाग असून, किलोचे दर ३५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यंदा दुष्काळामुळे बाजरी व ज्वारीचे उत्पादन कमी झाले. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातही गहू व हरभरा पिकाची लागवड खूपच कमी झाली आहे. यामुळे या पिकांचे दर वाढले आहेत. गेल्या महिन्यात २६ रुपये किलोने मिळणारा गहू २९ ते ३० रुपये किलोने मिळू लागला आहे. बाजरीचे दर किलोमागे दाने ते तीन रुपयांनी वाढले आहेत. ज्वारी यंदा मात्र भाव खात आहे. ................ चव आणि दरमुळे द्राक्ष आंबटच! नाशिक : बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली असली तरी चव आणि जादा दरामुळे द्राक्ष आंबट लागत आहेत. द्राक्षांना किलोला १८० ते २०० रुपये दर मिळत आहे. द्राक्षानंतर डाळिंबाचे दर असून, किलोला ६० ते ९० रुपये दर मिळत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून फळांची आवक वाढू लागली आहे. बाजारात संत्री, पपई, चिक्कू, अॅपल बोर या फळांची सर्वाधिक आवक होत आहे. द्राक्षांची बाजारात हळूहळू आवक वाढू लागली असली तरी दर मात्र सर्वसामान्यांच्या आवकेबाहेर आहेत. द्राक्ष २०० रुपये किलोने विक्री होत आहेत. मात्र, साखर उतरली नसल्याने द्राक्ष थोडे आंबट लागत आहेत. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून द्राक्षांची आवक वाढणार आहे. डाळिंबाला चांगला दर मिळत असून, ६० ते ९० रुपये किलोने विक्री होत आहेत. इतर फळांचे दर मात्र जैसे थे आहेत. .. फळांचे किलोचे दर (रुपयांमध्ये) द्राक्ष - १०० ते १२० डाळिंब - ६० ते ९० स्ट्रॉबेरी - १८० चिकू - ५० ते ६० सफरचंद - १०० ते १४० पपई - २५ टरबूज - २० संत्री - ६० शहाळे - ४० रु. नग अननस - ६० रु. नग ड्रॅगन - १०० रु. नग किवी - ४० रु. नग केळी - ३० रु. डझन
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट