आमने सामने : प्रशांत भरवीरकर
---
लोकहितवादी मंडळाचे, राका कॉलनीतील 'ज्योतीकलश' सभागृह महापालिकेने सील केले असून, स्थानिकांच्या तक्रारीमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी कॉलनीतील प्रतिनिधी समितीवर यावा, अशी साद घातली असून लोकहितवादीने आमच्यावर खोटे आरोप केले आहेत असे स्थानिक रहिवासी सुरेश दाते यांचे म्हणणे आहे.
---
कॉलनीतील प्रतिनिधी समितीवर यावा
राका कॉलनीतील रहिवासी अनेकदा आमच्याशी व्यक्तिगत संवाद साधतात. त्यावेळी मी राका कॉलनीमध्ये पोहोचतो आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करतो. अनेकदा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आम्ही कारवाई केली असून, सरकार वाडा पोलिस स्टेशनला तशी तक्रारही देण्यात आली आहे. दारू, गांजा पीत असणाऱ्यांची तक्रार आम्ही अनेकवेळा केलेली आहे. राका कॉलनीतील रहिवाशांचे जे म्हणणे आहे, ते त्यांनी आमच्यासमोर येऊन मांडावे.
या कॉलनीतील लोकांना, स्वाध्यायासाठी आम्ही आठवड्यातून तीन दिवस ज्योतीकलश सभागृह उपलब्ध करून देतो. तसेच कायमस्वरूपी योगा क्लास येथे चालतात. रोज गार्डनमध्ये सगळे जमतात. त्यापेक्षा मला असे वाटते की, कार्यकारिणीवर एक त्यांचा माणूस असावा. यातून आमच्या समस्या त्यांना कळतील, तशी मी त्यांना साद घालतो आहे. लोकहितवादी मंडळाच्या ज्योतिकलश सभागृहामध्ये सातत्याने नाटकाच्या प्रॅक्टिस चालतात. नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्यांसाठी तसेच एकपात्री प्रयोग करणाऱ्यांसाठी फ्रीमध्ये हे सभागृह दिले जाते. तात्यासाहेबांच्या नावाने एक काव्य स्पर्धा येथे घेतली जाते. उर्दू हायस्कूलची मुले त्यात कविता म्हणतात. नव्या पिढीला, कॉन्व्हेंटला तात्यासाहेब कोण होते हे त्यातून माहीत होते. त्यामुळे लोकहितवादी हे चांगले कार्य करत आहे, असे मला वाटते. तात्यासाहेबांनी लोकहितवादी मंडळाची मुहूर्तमेढ रोवली, ज्योतिकलश सभागृह लोकसहभागातून उभे केले. ब. चिं. सहस्रबुद्धे यांनी करारनामा केला. त्या करारनाम्यानुसार आम्ही येथे आहोत.
५० हजार रुपये पावतीचा जर विषय असेल तर त्या बाईंनी वर्षभर सभागृह वापरले त्यामुळे त्यांना हे शुल्क भरावे लागले. महिन्याकाठी पाच हजार रुपये ती देणगी म्हणून आम्ही त्यांच्याकडून स्वीकारले. त्याचे व्यवस्थित ऑडिट झालेले आहे. लाखाच्या आत उत्पन्न आहे तर देणगी स्वरुपात आम्ही पैसे घेणार ना! कारण इतर खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसा कुठून येणार? कलाकार मंडळी त्यांचा वेळ देऊ शकतात. परंतु, पैसे देऊ शकत नाही. पन्नास-साठ लोकांचा राबता येथे असतो, नाटक बंद पडू नये अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही शहरासाठी काहीतरी करीत आहोत स्थानिक रहिवाशांचे म्हणणे असेल की मागे शेड बांधले. तेथे नाटकाचे साहित्य ठेवलेले आहे. त्याव्यतिरिक्त काहीही असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्यासाठी आम्ही तयार असून, सामान सांभाळावेच लागणार आहे. कॉलनीतील लोकांची कोणतीही तक्रार आम्ही सोडवायला तयार आहोत. बिल्डिंग आमची आहे, असे आम्ही अजिबात वागत नाही तर ती स्थानिकांची बिल्डिंग आहे असेच आम्ही वागतो. ते म्हणतात की, सिक्युरिटी ठेवा परंतु इतके पैसे आम्हाला परवडणार नाही. आमची अशी विनंती आहे की त्यांनीही यात खारीचा वाटा घ्यावा. दोघे मिळून ठरवू. ते सांगतील तसे होईल. त्यांना वाटते बगीचा डेव्हलप करावा, आम्ही त्यासाठी तयार आहोत. करारानुसार आम्ही सर्व गोष्टी करण्यासाठी बांधील आहोत. मुलांना खेळण्यासाठी गार्डन पाहिजे आम्ही दिवसभर ते उपलब्ध करून देतो. आम्हाला तेथे राहायचे असेल तर आम्ही आमचा त्रास कशाला होऊ देऊ? स्थानिक रहिवासी म्हणत असतील की इतर कार्यक्रमांसाठी हे सभागृह उपलब्ध करून द्यावे, ते ही आम्ही देण्यासाठी तयार आहोत. परंतु, येथे जेवणाची परवानगी आम्ही देत नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छा आहे. आमचा जन्म नाशिक शहरात झालेला आहे, आम्ही बाहेरचे नाही. दोघांच्या समन्वयाने जे होईल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत
-जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ
---
लोकहितवादीने केलेले आरोप खोटे
राका कॉलनीतील 'ज्योतिकलश' या नावाने ओळखली जाणारी वास्तू व क्रीडांगण गेल्या अनेक वर्षांपासून लोकहितवादी मंडळाच्या ताब्यात असून ही जागा महानगरपालिकेने कॉलनीतील रहिवाशांसाठी आरक्षित केलेली आहे. लोकहितवादी मंडळ अनेकदा ही जागा इतर संस्थांना वापरण्यास देते, असे दिसते. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तूचे व क्रीडांगणाची कुठलीही देखभाल होत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने लोकहितवादी मंडळाकडून ही जागा ताब्यात घेऊन कॉलनीचा रहिवाशांसाठी जागेचा वापर करावा अशी विनंती महापालिकेला करण्यात आलेली आहे.
लोकहितवादी मंडळाच्या ताब्यातील जागा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. येथे बाहेरील लोकांचा नेहमी उपद्रव होतो. स्थानिकांना या जागेचा कोणताही उपयोग होत नाही. त्यांना कुठल्याही कामासाठी ही जागा हवी असेल तर त्यासाठी पैसे भरावे लागतात. ओपन स्पेस स्थानिकांची असेल तर त्यासाठी पैसे कशाला भरावे लागले पाहिजे? लोकहितवादी मंडळाने वेळोवेळी स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यापेक्षा त्यांनी स्थानिकांवर आरोप करण्याला जास्त प्राधान्य दिले आहे. गार्डन करण्यासाठी स्थानिकांनी त्यांना कुठलाही अटकाव केला नाही. त्यांनी ग्रीन जीम करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नव्हता, तसे असेल तर त्यांनी पुरावा द्यावा. महापालिकेच्या कोणत्याही अटी-शर्तींचे पालन लोकहितवादी मंडळाने केलेले नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओपन स्पेसची मालकी स्थानिकांकडे असते त्यामुळे ही मालकी आमच्याकडे मिळावी असे आमचे म्हणणे आहे. गेल्या ३८ वर्षांपासून स्थानिकांनी लोकहितवादी मंडळाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केले आहे. परंतु, आता या गार्डनमध्ये बाहेरील लोकांचा उपद्रव वाढलेला आहे. येथे येऊन लोक मद्य पितात, गांजा पितात, जुगार खेळतात. या गोष्टींचा विपरीत परिणाम होत असून स्थानिकांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकहितवादी मंडळाने अनेक खोटे आरोपही केले असून नाटकाची तालीम चालू असताना कुठलेही दगड आम्ही फेकलेले नाही. दगड फेकता हा खोटा आरोप त्यांनी केला आहे तसेच स्थानिकांनी बोर्ड फाडला असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, स्थानिक लोक बोर्ड फाडतील कशाला, तो आम्हीच लावला आहे. याउलट स्थानिकांचाच वेळोवेळी अपमान झालेला आहे.
-सुरेश दाते, स्थानिक रहिवासी
---