उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असलेली अतिवेगवान राजधानी एक्सप्रेस पश्चिमऐवजी मध्य रेल्वेच्या मार्गाने १९ जानेवारीपासून धावणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकादरम्यान धावणारी गाडी नाशिकरोड, मनमाड, भुसावळ येथे थांबणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईत जाऊन दिल्लीची गाडी पकडावी लागणार नाही. केवळ १७ तासांत नाशिककरांना दिल्लीत पोहचणे शक्य होणार आहे. गाडीला घाटामध्ये पुश-पुल तंत्र वापरले जाणार असल्याने वेळेत बचत होणार आहे.
नाशिक, नगर, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, धुळे येथील रेल्वे प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी मुंबई येथून रेल्वेगाडी पकडावी लागत असे. यामुळे वेळ आणि पैसे यांचा भुर्दंड बसत होता. तसेच शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागत होता. आता त्यातून सुटका होणार आहे. खासदार गोडसे यांनी राजधानी एक्सप्रेस पश्चिमऐवजी मध्य रेल्वे मार्गाने धावावी यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तसेच विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. राज्यात मध्य रेल्वेचे ४६५ किमीचे जाळे असूनही दिल्लीला जाण्यासाठी अतिवेगवान रेल्वेगाडी उपलब्ध नसल्याचे गोडसे यांनी रेल्वे मंत्रालयाचे सचिव प्रवीण गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
आठवड्यातून दोनदा
राजधानी एक्सप्रेस मुंबई-कल्याण, नाशिक-मनमाड-भुसावळ या रेल्वेस्थानकांवरुन दिल्लीकडे रवाना होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बुधवार आणि शनिवारी मुंबईहून ही गाडी मध्य रेल्वेमार्गे धावेल. मुंबईहून ही गाडी दुपारी २.२० वाजता सुटणार असून, दिल्लीत दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० वाजता दिल्लीत पोहचेल. येताना दिल्लीहून गुरुवारी आणि रविवारी सुटणार आहे. दिल्लीहून ती दुपारी ३.४५ वाजता सुटून मुंबईला सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल. शनिवारी सायंकाळी प्रथमच ही गाडी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणार असल्याने शिवसेना कार्यकर्ते, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी स्वागताला उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही टोकांना इंजिन
राजधानी एक्सप्रेससाठी पुश-पुल तंत्र वापरले आहे. या तंत्रात रेल्वेगाडीच्या दोन्ही टोकांना इंजिन असते. दोन्ही इंजिने रेल्वेला एकाच दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करतात. घाटात पुढील इंजिन गाडीला ओढते तर मागील इंजिन पुढे ढकलते. कसारासारख्या अवघड घाटात पुश-पुल तंत्र वापरणे आवश्यक आहे. सध्या अतिरिक्त इंजिन (बॅकर) संबंधित रेल्वेस्थानकांमध्ये गाडीला जोडले जाते. त्यामुळे गाडी घाट जोमाने चढते; मात्र, इंजिन जोडण्यासाठी कसारा आणि इगतपुरीत गाडीला वीस मिनिटे जास्त लागतात. राजधानी एक्सप्रेसला मुंबईपासूनच मागेही इंजिन जोडले जाणार असल्याने गाडीला इगतपुरी, कसाऱ्यात थांबावे लागणार नाही. पुश-पुल तंत्राच्या सहाय्याने मुंबई विभागातील कसारा आणि इगतपुरी दरम्यानच्या घाटांच्या प्रदेशात राजधानी एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली. चाचण्या समाधानकारक झाल्याने गाडीला हिरवा झेंडा मिळाला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पुश-पुल ट्रायल्स लवकरात लवकर पूर्ण करुन गाडी नियमितपणे सोडण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट