Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे निधन

$
0
0

धुळे : ज्येष्ठ विधीतज्ज्ञ निर्मलकुमार सूर्यवंशी (वय ७१) यांचे शनिवारी (दि. १९) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. उद्या (दि. २१) सकाळी दहा वाजेला गिंदोडिया हायस्कूलच्या प्रांगणात (पारोळा रोड) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. निर्मलकुमार दयाराम सूर्यवंशी यांनी दिवाणी, फौजदारी, कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालये आणि घटनापीठाचे खटले, जनहित याचिका, धर्मदाय संस्थाशी निगडित खटले यासोबतच सुमारे पाच हजारापेक्षा अधिक आदिवासी कुटुंबींयांना विनामूल्य जमिनी मिळवून देणे आदी कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. सरदार सरोवर प्रकल्प आणि नर्मदा बचाव प्रकल्प यांच्याशी निगडित नर्मदा बचाव आंदोलन यांच्याशी निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा निकटचा संबंध होता. या आंदोलनांशी निगडीत खटल्याचे कामकाज पाहातांना सूर्यवंशी यांनी अनेक वेळा प्रभावी युक्तिवाद केला होता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याच्या खटल्यासाठी त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते माजी जिल्हाध्यक्ष व सल्लागार होते.सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे ते सल्लागार होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, पत्नी, नातवंडे, सुना आणि बहीण, भाऊ असा परिवार आहे. पत्रकार निखिल सूर्यवंशी यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राऊत, खैरनार यांची प्रदेश कार्यकारणीत वर्णी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (ओबीसी विभाग) प्रदेश उपाध्यक्षपदी विजय राऊत व भगवान खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नाशिक शहर ओबीसी विभगाचे अध्यक्ष म्हणून अनिल कोठुळे व जिल्हा ग्रामीण विभगाच्या अध्यक्षपदी सुरज चिंचोले यांनी संधी देण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाची प्रदेश कार्यकारणीची बैठक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी चेल्लर वामसिचंद रेड्डी, आशिष दुवा, संपत कुमार, सोनाल पटेल, ओबीसी विभागाचे प्रदेशअध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे टिळक भवन येथे झाली. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये उत्तर महाराष्ट्रातून उपाध्यक्ष म्हणून माळी समाजातील कार्यकर्ते व शहर काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष विजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. तर लाड शाखीय वाणी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भगवान खैरनार यांना प्रदेश कार्यकारिणी मध्ये स्थान देण्यात आले.

या बैठकीत नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील निकालांच्या आधारे महाराष्ट्रातही काँग्रेस मजबूत झाली पाहिजे, या उद्देशाने चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रभारी यांनी आपण कोणत्याही पक्षाशी युती न करता सत्तेत आलो याचे श्रेय काँग्रेस राहुल गांधी व त्यांचे सहकारी अशोकजी गहलोत, कमल नाथ यांनी ज्या पद्धतीने धुरा सांभाळली त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्यासाठी काँग्रेस मजबूत व्हावी यासाठी ओबीसी विभागाला बळकटी देण्यासाठी जुन्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात आले. नव्या पदाधिकारी निवडीचे स्वागत माजी मंत्री अंनिस अहमद, प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष अमित कारंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम. एम. शेख, हनीफ बशीर, शब्बीर पठाण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोटूल’ शिक्षणपद्धतीची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मध्य भारतातील आदिवासी समाजाची 'गोटूल' ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे. उपकारक, अहिंसक, आवडीप्रमाणे शिक्षण, मुलामुलींचे एकत्रित सहशिक्षण असे अनेक गुण या प्रणालीत मोलाचे आहेत. निसर्गाला ओरबाडून नाही, तर सोबत घेऊन आनंदाने शिक्षण मिळते. असे शिक्षण देणाऱ्या व्यवस्थेची आज सर्वत्र गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासातील अनुभवी व तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांनी केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेअंतर्गत हिरालाल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 'अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेसाठी आदिवासींच्या 'गोटूल'पासून शिकण्यासारखे काय?' या विषयावर त्यांनी ६१वे पुष्प गुंफले. परशुराम साइखेडकर नाट्यगृहात हे व्याख्यान पार पडले. कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक पालक योजना या व्याख्यानाचे आयोजक होते. पुढे ते म्हणाले की, आजची शिक्षणव्यवस्था ही माणसाला माणूस म्हणून जगणे शिकवत नाही, तर केवळ नोकरीसाठी तयार करते. परंतु, शिक्षण घेऊन नोकरी मिळाली नाही की बेरोजगारी, नैराश्याचा सामना करावा लागतो. याचा दोष त्या विद्यार्थ्यालाच दिला जातो. त्यामुळे जगण्याचे कौशल्य देणाऱ्या शिक्षणाची आज सर्वाधिक गरज आहे. आजची शिक्षण व्यवस्था मुलांना आनंद देते की नाही, हे जाणून घेण्यासाठी ते शाळेत जाताना, मधल्या सुटीत व शाळा सुटताना त्यांचा चेहऱ्याचे निरीक्षण करा. त्या चेहऱ्यावरुनच आपल्याला उत्तर मिळेल. शिक्षणाचे ओझे न वाटता विद्यार्थ्यांना आनंदाने ज्ञानार्जन करता येणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजच्या शिक्षणपद्धतीचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. याबरोबरच, चांगला मानवी समाज घडविण्यासाठी सर्वांकडून आवश्यक ते स्वीकारण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुकुंद दीक्षित, जितेंद्र भावे, सचिन मालेगावकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंधू चव्हाण खुनाची पुन्हा चौकशी करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील इंद्रकुंड येथे झालेल्या वृद्धेच्या खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी केलेल्या तपासात काही प्रमुख बाबी सुटल्या आहेत. तपास पुन्हा झाल्यास आरोपींची संख्या वाढू शकते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असा आदेश नाशिक जिल्हा कोर्टाने काढला आहे. या प्रकरणात बड्या बांधकाम व्यावसायिकाचा सहभाग असल्याची चर्चा खून प्रकरणानंतर सुरू झाली होती.

इंद्रकुंड येथील वल्लभाचार्य आश्रमातील एका खोलीत ८ फेब्रुवारी २०१६ रोजी सिंधू चव्हाण (वय ७५) या वृद्धेचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पवन सावकार, सूरज वर्मा, राहुल कुडीलकर, अक्षय अहिरे, तसेच तुळशीराम इंगोले आदी संशयितांना अटक केली होती. गॅस सिलिंडर चोरीच्या प्रयत्नात चव्हाण यांची हत्या झाल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र जागेच्या ताब्यावरून हा प्रकार झाल्याची चर्चा त्या वेळी होती. पंचवटी पोलिस स्टेशनच्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे कोर्टाच्या या निकालामुळे स्पष्ट झाले. पंचवटी पोलिसांनी तपास करून काही संशयितांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश देशमुख यांच्या कोर्टात हा खटला सुरू आहे.

बडा व्यावसायिक कोण?

दरम्यान, हत्येचा प्रकार समोर आला, त्या वेळी या प्रकरणात आणखी संशयित आणि बड्या बांधकाम व्यावसायिकाचा समावेश असल्याच्या वृत्तास पोलिस सातत्याने दुजोरा देत होते. संशयितांच्या लाय डिटेक्टर चाचणीची मागणीही पोलिसांकडून करण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले, हे पोलिसांनी कधीही स्पष्ट केले नाही. अटक केलेल्या संशयितांनी दिलेल्या जबानीनुसार या खटल्यात आणखी आणि प्रमुख आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपास करून समोर येणाऱ्या व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आणखी नेमकी किती संशयितांचा सहभाग आहे, तो बडा बांधकाम व्यावसायिक कोण, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले, की कोर्टात सुनावणीदरम्यान याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोर्टाचा आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही. कोर्टाच्या आदेशानुसार तपासात काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केळझर कालवा निविदा राष्ट्रवादीमुळे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

केळझर कालवा क्रमांक आठची निविदा लवकर काढावी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे काम पूर्ण करावे, यासाठी आमदार दीपिका चव्हाण यांनीच प्रयत्न केले. त्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात बागलाणच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच ही कामे मार्गी लागत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे सिंचनप्रश्नी वस्तुस्थिती न मांडता बागलाणच्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. धुळे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या सहा पैकी प्रत्येक मतदारसंघातील प्रश्नांबाबत एकटे खासदार लक्ष देऊच शकत नाही. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी आपापल्या भागातील प्रश्नांबाबत जागृत असतो. मात्र, डॉ. भामरे हे जिल्हा परिषद, पंचायत समिती व आमदारांनी मंजूर केलेली कामे हे मीच केले असे भासवतात. परंतु, केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा देणे गरजेचे असतांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पहायला डॉ. भामरे यांना वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनुदानाचा निर्णय घेणे किंवा कांदा पिकाबाबत निश्चित धोरण तयार करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणी आमदारांनी मंजूर केलेल्या कामांमध्ये डॉ. भामरे आपला वेळ खर्च करीत असल्याचा हल्ला त्यांनी केला आहे. याप्रसंगी गटनेते काका सोनवणे, विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, राहुल अहिरे, किरण सोनवणे, नगरसेविका सुरेखा बच्छाव, उषा भामरे, अॅड. रेखा शिंदे, शमा दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील जळगाव नेऊर येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पुन्हा चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला आहे.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव नेऊर गावातील नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगतच असलेल्या 'बीएसएनएल' कार्यालयाचे शटर शुक्रवारी (दि. १८) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वाकवले. तर, त्याशेजारीच असलेल्या जिल्हा बँकेच्या जळगाव नेऊर शाखाधिकाऱ्यांच्या खोलीचे कुलूप देखील तोडण्यात आले. या दोन्ही ठिकाणहून कुठलाच ऐवज चोरीस गेला नाही. मात्र, चोरीच्या या प्रयत्नामुळे खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपासून येवला शहर अन् तालुक्यात विविध ठिकाणी अज्ञात चोरट्यांकडून सुरू झालेल्या वाढत्या चोरी सत्रामुळे पोलिसांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. गेल्याच आठवड्यात रात्री येवला शहरातील कोटमगाव रोडवरील वसाहतीमधील घरफोडीत वृद्ध महिलेस मारहाण करत रोख रकमेसह ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे हक्काचे मतदान

$
0
0

\B

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शहर व तालुकास्तरावर ६३.३२ टक्के मतदान झाले. एकूण ४ हजार ६९२ पैकी २ हजार ९७१ मतदारांनी मतदान केले. ६९ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीमुळे सोमवारी सोसायटीला हक्काचे संचालक मंडळ मिळणार असून, तीनही पॅनल व अपक्षांनी आमचा विजय पक्का असल्याचा दावा केला आहे.

नाशिक पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २०१९ ते २०२४ या कालावधीसाठी संचालक पदासाठीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. सकाळी ८ वाजेपासून शहरात पंचवटी येथील आर. पी. विद्यालयात मतदानाला सुरुवात झाली. तर तालुकास्तरावर उपनिबंधकांच्या कार्यालयात मतदान घेण्यात आले. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.

१९५० नंतर सोसायटीच्या संचालक पदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासून सर्व पोलिस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, वायरलेस विभाग, पोलिस मुख्यालय, महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यासह इतर ठिकाणी कार्यरत पोलिसांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रगती, परिवर्तन आणि सहकार पॅनलसह चार अपक्ष उमेदवारांनी जिंकून येण्यासाठी प्रचंड जोर लावल्याचे यावेळी दिसून आले. या मतदानासाठी शहरात ग्रामीण व शहर आयुक्तालय मिळून ३ हजार १०५ पैकी १ हजार ९१८ मतदारांनी, तर तालुकास्तरावर १ हजार ५८७ पैकी १ हजार ५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे शहरापेक्षा तालुकास्तरावर उमेदवारांचा अधिक जोर असल्याचे दिसून आले. सोमवारी (२१ जानेवारी) हिरावाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात सकाळी ८ पासून मतमोजणी करण्यात येणार आहे. यानंतर सोसायटीवर कोणाची सत्ता येते, हे चित्र स्पष्ट होईल.

\Bमतदानाची आकडेवारी

तालुक्याचे नाव....... एकूण मतदार..... झालेले मतदान

\Bनाशिक..................... ३ हजार १०५........ १ हजार ९१८

त्र्यंबकेश्वर................. ६४..................... ४६

येवला....................... ६९..................... ५५

इगतपुरी..................... ११३................... ७२

कळवण..................... ५४..................... ४१

मालेगाव..................... ५५९................... ३८५

सिन्नर........................ १४३................... ८०

दिंडोरी........................ ७४..................... ५२

निफाड........................ १९१................... ११८

पेठ............................. २४..................... २२

सुरगाणा....................... ४८..................... २९

सटाणा......................... ६७..................... ३९

देवळा.......................... ४१..................... २४

चांडवड........................ ५२.................... ३४

नांदगाव........................ ८८..................... ५६

\Bएकूण........................... ४ हजार ६९२........ २ हजार ९७१

दादा, लक्ष राहू द्या!

\Bशहरातील मतदान केंद्रावर शहर व ग्रामीण पोलिसांची सकाळपासून दुपारपर्यंत गर्दी होती. यावेळी तीनही पॅनलसह अपक्ष उमेदवार मतदान केंद्राच्या आवारात उभे होते. मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला उमेदवारांनी 'दादा, लक्ष असू द्या', असे सांगितले. त्यावर कर्मचारी 'तुमच्याच नावावर शिक्का मारणार', असे उत्तर प्रत्येक उमेदवाराला देत होते. हा संवाद मतदानप्रक्रिया संपेपर्यंत केंद्राच्या परिसरात ऐकायला मिळाला. यावेळी पोलिस निवडणुकीचे नियम बाजूला ठेवत थेट मतदान केंद्राबाहेरच मतांचा जोगावा मागताना दिसून आले. मतदानाची अंतिम वेळ जवळ आल्यानंतर उमेदवारांकडून मतदारांच्या विनवणीचा जोर आणखीनच वाढला. अखेरीस बंदोबस्तासाठी तैनात पोलिस व निवडणूक अधिकारी यांनी उमेदवारांना दुपारी ३.३० वाजता मतदान केंद्राच्या बाहेर काढले.

\Bपोलिसांसाठी 'खाकी'चा बंदोबस्त!

\Bमतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून शहरासह ग्रामीण मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅलेट पेपरद्वारे घेण्यात आलेल्या मतदानात गोंधळ होऊ नये म्हणून, पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. मतदान केंद्राच्या परिसरात उमेदवार व समर्थक यांची गर्दी होऊ लागल्यानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी मतदान केंद्राचे दारे बंद केले. फक्त मतदारांनाच आत सोडण्यात आले. त्यामुळे पोलिसांसाठीच 'खाकी'चा बंदोबस्त, अशी चर्चा परिसरात रंगली.

\Bअसे होते उमेदवार

\Bसोसायटीच्या संचालक मंडळात १५ जागा असून, त्यातील खुल्या १० जागांसाठी ३२ उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या १ जागेसाठी ५, भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या १ जागेसाठी ३, इतर मागासवर्गीयांच्या १ जागेसाठी ३ उमेदवार, तर महिलांच्या २ जागांसाठी ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यातून नेमके कोणते पॅनल किंवा उमेदवार विजयी होतात, याकडे सर्व पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाला एकजुटीचे साकडे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथे झालेल्या गावसभेत तालुक्यावर झालेल्या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'नार-पार'च्या पाण्यासाठी एल्गार पुकारावा आणि एक फेब्रुवारी रोजी धडक मोर्चात सामील होऊन स्वाभिमानाची पताका फडकवावी असा सूर गावसभेत व्यक्त करण्यात आला.

सरपंच राजेंद्र घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली गावसभा झाली. निवेदने, मंत्र्यांच्या भेटी, बैठका, सातत्याने विविध माध्यमातून सरकारकडे मागण्या हे सर्व करूनही नारपारच्या आराखड्यात नांदगावचा समावेश नसल्याने समितीने संताप व्यक्त केला. गेल्या चार वर्षात तालुक्यातील जनता दुष्काळ, अवकाळी पाऊस , गारपीट, पिकांवरील विविध रोग यामुळे होरपळली गेली आहे. पण कोणीही लोकप्रतिनिधी विचारायला आला नाही. त्यामुळे एकजूट करीत एक फेब्रुवारीच्या मोर्चासाठी सज्ज व्हा अशी साद समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी गावसभेतून घातली.

यावेळी 'स्वाभिमानी'चे नीलेश चव्हाण, परशराम शिंदे, निवृत्ती खालकर, आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले, आदींनी 'नार-पार'चे महत्त्व स्पष्ट करून

मोर्चात सामील होऊन जनतेची शक्ती दाखवून द्या, असे आवाहन केले. गणेश जाधव, शिवाजी जाधव यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सद्भावना रॅलीतून ‘इंधन वाचवा’चा संदेश

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

भारत सरकार व हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्यातर्फे रविवारी शहरात सद्भावना सायकल रॅली काढण्यात आली. इंधन वाचवा देश वाचवा, स्वच्छ भारत स्वस्थ भारत असा संदेश देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.

पोलिस कवायत मैदान येथून सकाळी सात वाजता रॅलीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी, सहभागी नागरिक विद्यार्थ्यांनी संरक्षण सक्षम महोत्सव ही सामूहिक प्रतिज्ञा घेतली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पोलिस अधीक्षक निलोत्पल, प्रांत अजय मोरे, नितीन खैरनार, भूषण भोसले आदींच्या उपस्थितीत रॅलीस हिरवा झेंडा दाखवित सायकल रॅलीची सुरुवात झाली.

एकात्मता चौक, मोची कॉर्नर, सोमवार बाजार, रावळगाव नाका, कॉलेजरोड, साठ फुटी रोड मार्गे बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे या सद्भावना सायकल रॅलीची सांगता झाली. याठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या रॅलीत शहरातील र. वी. शाह, केबीएच, आरबीएच, काबरा हायस्कूल, या. ना. जाधव, टी. आर. हायस्कूल, ए. टी. टी., जे. ए. टी. आदी शाळांचे विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह मालेगाव सायकललिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून जोशींविरुध्द लढण्याची ऑफर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'काँग्रेसने मनोहर जोशी यांच्या विरोधात लढण्याची ऑफर दिली होती. पण, काँग्रेसने आपल्याच नेत्यांचा काटा काढण्यासाठी मला उमेदवारी दिली नाही,' असे गुपीत भाजपचे जेष्ठ नेते व निवृत्त आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार यांनी पत्रकारांना सांगितले. संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांना नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आता निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. पण, पक्षाने सांगितले तर निवडणूक लढवेल, असेही सांगितले.

गोल्फ क्लबच्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी चर्मकार बांधवांशी चर्चा केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांना आयोगाच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमोर शिष्यवृत्ती, शासकीय कर्ज योजना, अनुदान लाभासाठी येणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या. यावेळी पवार यांनी सामुहिक निवेदन देण्याची सुचना केली. या बैठकीला चर्मकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अशोक आहिरे, केदारनाथ बडोदे, राजाभाऊ आहिरे, दिलीप जाधव, रमेश पाधरे, हिरामण नांदगावकर, मनोज आसन, कृष्णा शिलावट, अनिल पवार यासह चर्मकार समाजाचे बांधव उपस्थित होते.

समाजमागे राहण्याची कारणे शोधणार

सरकारने ८ ऑक्टोंबर रोजी चर्मकार कल्याण आयोग जाहीर करुन मला अध्यक्षपद दिले. आता फेब्रुवारी महिन्यात मंत्रालय परिसरात मेकर चेंबरमध्ये कार्यालय मिळणार आहे. त्यासाठी १२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या आयोगाकडून अनुसूचित प्रवर्गातील इतर जातींच्या तुलनेत चर्मकार समाजाची काय स्थिती आहे? समाजमागे राहण्याची कारणे शोधून त्यावर उपाय सुचविण्याचे माझे काम आहे. त्यानंतर त्याची अमंलबजावणी सरकार करणार आहे. त्यासाठी राज्यभर दौरा करुन मी चर्मकार बांधवांच्या बैठकी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यानंतर त्याचा कल्याणकारी अहवाल सादर केला जाणार आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा हल्ला; गोऱ्ह्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रोडलगत असलेल्या बेलटेकडी परिसरात शनिवारी (दि. १९) पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून तीन वर्षाच्या गोऱ्ह्याला ठार केले.

वसंत तुकाराम आव्हाड यांचा गट नंबर १६२९ मध्ये बंगल्यालगतच जनावरांसाठी पडवी आहे. बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने गोठ्यात बांधलेली गाय व बैल पहाटेच्या सुमारास मोठमोठ्याने हंबरू लागले. तो आवाज ऐकू आल्याने आव्हाड यांनी बाहेर येऊन पाहिले. बिबट्याने गोठ्यातून तीन वर्षाच्या गोऱ्ह्याच्या मानेला पकडून जवळील शेतात ओढत नेत होता. बिबट्याला बघून आव्हाड यांनी आरडाओरड करीत आजूबाजूच्या लोकांना उठवले. जमावाच्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गोऱ्ह्याचा मृत्यू झाला होता.

आव्हाड यांनी माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या वतीने वनपाल डी. व्ही. तुपलोंढे, रोहिदास रेवगडे, वनमंजूर पाटीलबा मधे, काशिनाथ, कातोरे व भरत गांगड आदींनी घडनास्थळी भेट देत पंचनामा केला. परिसरात दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचालकाचे २२ हजार लुटले

$
0
0

येवला : तालुक्यातील बोकटे-अंदरसूल रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या भारत वाघ (वय २२, मूळ रा. औराळा, ता. कन्नड) या दुचाकीस्वारास तिघा अज्ञात लुटारूंनी लुटण्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. वाघ हे बचत गटाचे पैसे घेण्यासाठी येत होते. बोकटे-अंदरसूल रोडवर बोकटे शिवारात पाठीमागून दुचाकीवर येत असलेल्या २५ ते ३० वयोगटातील तिघा अज्ञात तरुणांनी वाघ यांच्या दुचाकी अडविली. यावेळी वाघ आपल्या गाडीवरून खाली पडले. तिघा तरुणांनी त्यत्नी पाठीवर लावलेली काळ्या रंगाची बॅग बळजबरीने हिसकावून घेत पळ काढला. बॅगेत २२ हजार ७८० रुपये होते. वाघ यांच्या फिर्यादीवरून तिघा चोरट्यांविरोधात येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलजागरता ठरतेय लक्षवेधी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळी तालुका असलेल्या नांदगावमध्ये पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असून 'नार-पार'चे पाणी नांदगावला मिळावे, यासाठी येत्या एक फेब्रुवारी रोजी नांदगावमधून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

'नार-पार'विषयी तालुक्यातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांनी या लढ्यात सामील व्हावे यासाठी गावोगावी गाव सभा होत आहेत. तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीतर्फे गावोगावी सुरू असलेला हा जलजागर लक्षवेधी ठरत आहे, वर्षानुवर्षे नांदगाव तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट आहे.

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नार-पार जल आराखड्यात नांदगावचा समावेश करावा, ही मागणी दीड ते दोन वर्षांपासून केली जात आहे. यात आश्वासनापलीकडे काही मिळत नसल्याने तालुका नार-पार जलहक्क समितीने एक फेब्रुवारी रोजी नांदगावमध्ये धडक मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. मोर्चात गावोगावचे शेतकरी, ग्रामस्थ सामील व्हावे, लढ्याला व्यापक स्वरूप यावे यासाठी समितीतर्फे नांदगाव तालुक्यात गावोगावी गाव सभा घेतल्या जात आहेत. गावसभांद्वारे होणारा जलजागर, पाण्यासाठी होणारे प्रबोधन ग्रामस्थांना संघटित करण्यात यशस्वी ठरले असून पाण्यासाठी नांदगाव कर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असा आशावाद जलहक्क समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनपुरीमध्ये यात्रोत्सव प्रारंभ

$
0
0

मशाल ज्योतीचे जेजरी येथून आगमन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरानजीकच्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथे सोमवारपासून (दि. २१) श्री खंडेराय महाराज यात्रोत्सव प्रारंभ होतो आहे. या यात्रोत्सव निमित्ताने जेजुरी येथून मशाल ज्योत प्रज्ज्वलित करून आणण्याची परंपरा आहे. जेजुरी येथून निघालेल्या मशाल ज्योतीचे रविवारी चंदनपुरी येथे आगमन झाले. मोठ्या उत्साहात या मशाल ज्योत व समवेत असलेल्या मल्हार भक्तांचे स्वागत करण्यात आले.

सोमवारी सुरू होणाऱ्या यात्रोत्सवासाठी चंदनपुरी सज्ज झाली आहे. मंदिर परिसरात रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी मंदिर परिसरात वाघ्या मुरळीही दाखल झाले आहे. जेजुरी इतकेच चंदनपुरीचे महत्त्व असल्याने जेजुरी येथून १५ जानेवारी रोजी माजी सरपंच राजेंद्र पाटील, पुजारी तुकाराम सूर्यवंशी, रामभाऊ सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी हे पायी मशाल ज्योत घेऊन चंदनपुरीच्या दिशेने रवाना झाले होते.

मशाल ज्योतीचे रविवारी आगमन झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, सरपंच योगिता अहिरे आदींसह जय मल्हार ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदींसह मल्हार भक्तांनी सवाद्य मिरवणूक काढून ज्योतीचे स्वागत केले. मशाल ज्योतीने मंदिर परिसरातील ज्योत, दीपमाळ, दिवट्या प्रज्ज्वलित करण्यात आल्या. यावेळी मल्हारभक्तांनी 'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. मशाल ज्योत यात्रेस राजेंद्र बेलन, छोटू बच्छाव, मंगलदास वाघ, पप्पू देवरे, साहेबराव बोरसे, शिरीष पाटील, शिवाजी सोनवणे, समाधान बोरसे आदींसह अनेक मल्हारभक्त सहभागी झाले. श्री

मिरवणूक, महाआरती आज

श्री खंडेराय महाराज व बानुबाई यांच्या मुखवट्यांची सोमवारी (दि. २१) सकाळी सवाद्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत मानाच्या काठ्या देखील असतील. मिरवणूक झाल्यावर मंदिरात महापूजा, आरती व तळी भरण्याचे धार्मिक विधी मान्यवरांच्या हस्ते होऊन यात्रोत्सावास प्रारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेली महिला ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. १९) सायंकाळी मायको सर्कल येथे घडली.

विठाबाई शांताराम ठाकरे (रा. त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. चेतन शांताराम ठाकरे (३१) हे त्यांच्या आई विठाबाई यांच्यासह आपल्या दुचाकीवरून (एमएच १५ जीपी ९१२६) मायको सर्कल परिसरातून जात होते. त्यावेळी (एमएच १५ ईएफ ०३६०) या खासगी बसने चेतन यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने विठाबाई यांचा मृत्यू झाला. तर चेतन ठाकरे जखमी झाले. अपघातानंतर बसचालक फरार झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात तरुण ठार

दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री गंगापूर रोडवरील आनंदवल्ली परिसरात घडली.

तरुणप्रताप रवींद्रसिंग श्रीखचेडूसिंग (३८, रा. उत्तप्रदेश) असे या अपघातत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरूण आपल्या दुचाकीवरून (एमएच १५ सीई ८८५०) शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेनऊवाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरून जात होते. यावेळी दुचाकीवरून (एमएच १५ इजे ३३९३) कुणाल दिनेश गवारे (रा. आनंदवल्ली) हा संत कबीरनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. कुणालचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो तरुणप्रताप यांच्या दुचाकीवर जाऊन आदळला. त्यात तरुणप्रताप आणि कुणाल हे दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तरुणप्रताप यांचा मृत्यू झाला. तर कुणालवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात कुणालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शाहूनगरमध्ये

भरदिवसा घरफोडी

बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचे दागिने, मोबाइल लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) अंबड येथील शाहूनगर परिसरात घडली.

या प्रकरणी सपना संतोष शर्मा (रा. शाहूनगर) यांनी तक्रार दिली. शर्मा यांच्या घरात दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान कोणी नसल्याची चोरट्यांनी संधी साधली. दोन तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा मुद्देमाल घेऊन चोरटा पसार झाला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

..

शहरात तिघांची आत्महत्या

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा तरुणांसह विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंचवटी, अंबड, म्हसरुळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे.

राहत्या घरात विषारी औषध सेवन करून ३२ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या करण्याची घटना शनिवारी (दि. १९) रात्री पंचवटीतील आडगाव नाका परिसरात घडली. अमनदीप बळवंतसिग संधू (३२) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. अमनदीपने शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारास घरात विषसेवन केले. हे निदर्शनास येताच त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यास खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सिडकोच्या महाकाली चौक परिसरात राहणाऱ्या गौरव यशवंत बडगुजर (२७) याने राहत्या घरात शनिवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या मित्राने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट समोर आले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगर परिसरात राहणाऱ्या निर्मला निलेश शार्दुल (२६) या विवाहितेने शनिवारी (दि. १९) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून राहत्या घरात विषसेवन केले होते. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिरवणुकीने वेधले लक्ष

$
0
0

फोटो : सतिश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढोल-ताशांचा गजर, वाऱ्यावर डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताका, ठिकठिकाणी होणारी गुलाब पाकळ्यांची उधळण, मलखांबासह लक्ष वेधणाऱ्या चित्तथरारक कसरती अन् हर हर महादेवच्या जयघोषाने नाशिकचे वातावरण रविवारी दुमदुमून गेले. निमित्त होते नरवीर तानाजी मालुसरेंचे सुपुत्र रायबा यांच्या गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकलेल्या कवड्यांच्या माळेच्या मिरवणुकीचे.

संस्कृती नाशिकच्या वतीने आयोजित शंभुपर्वाच्या सांगतेच्या दिवशी शहरातून या कवड्यांच्या माळेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मालुसरेंच्या बाराव्या वंशातील स्नुषा डॉ. शीतल मालुसरे ही माळ नाशिक येथे घेऊन आल्या होत्या. रविवारी गोदाघाटावरील रोकडोबा हनुमान मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवरायांच्या प्रसिद्ध कवड्यांच्या माळेचे पालखीतून दर्शन या उत्सवाचे खास आकर्षण ठरले. रामशेज किल्ल्यावरून मोटारसायकल रॅलीद्वारे शहरात आलेल्या क्रांतिज्योतीचे स्वागत गोदाघाटावरील ऐतिहासिक रोकडोबा हनुमान मंदिरात करण्यात आले. त्यानंतर रोकडोबा पटांगणातून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत विविध खेळ, कसरती, मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे दर्शन घडले. दहीपूल, धुमाळ पॉइंट, जुनी महापालिका, गाडगे महाराज पुतळा, शालिमार चौकमार्गे ही मिरवणूक कालिदास कलामंदिरात पोहोचली. मिरवणूक मार्ग परिसरात दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. उंटवाडी माध्यमिक विद्यालयाचे ढोलपथक, यशवंत महाराज व्यायामशाळेचे पथक, तुतारीचे वादनाने सर्वांचेच लक्ष वेधले. कवड्यांची माळ नेत्रात साठविण्यासाठी धडपड पाहायलास मिळत होती. लेझीम पथके, मल्लखांब, रोप मलखांब यांसारख्या चित्तथरारक अन मर्दानी खेळांनी अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कालिदास कलामंदिरातही ही ज्योत आणि कवड्यांच्या माळेचे हर हर महादेव, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडला रणपांडित्याचा प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आनंदात साजरा होणार, असे वृत्त पूर्वदिनी झळकण्याऐवजी दहशतवादी हल्ल्यांचे देशावर सावट, असे वृत्त वाचावे लागतात हे दुर्दैव आहे. स्वराज्य रक्षणार्थ समर्थ रामदास स्वामींनी 'आधी गाजवावे तडाखे अवघे भूमंडळ झाके' असा सल्ला धर्मवीर संभाजी महाराजांना दिला होता. याच ओळी आज दिल्लीच्या तख्तासमोर ठसठशीत अक्षरांत वठवायला हव्यात, असे प्रतिपादन व्याख्याते क्रांतिवीर प्रा. सचिन कानिटकर यांनी रविवारी नाशिकमध्ये केले. या वेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पांडित्य ते रणपांडित्याचा प्रवास उलगडला.

गेल्या तीन दिवसांपासून संस्कृती नाशिकतर्फे आयोजित छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा कथन करणाऱ्या 'धगधगते शंभुपर्व' या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी कानिटकर बोलत होते. छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास कानांत आणि मनात उतरविण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रोत्यांची संख्या प्रचंड असल्याने कालिदास कलामंदिर तोकडे ठरले. त्यामुळे कालिदास कलामंदिरातच नव्हे, तर आवारातही पाहावे तेथे श्रोत्यांचे दर्शन घडत होते. व्याख्यानमालेचा समारोपाचा दिवस असल्याने प्रा. कानिटकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पांडित्य ते रणपांडित्याचा प्रवास उलगडला. संभाजी महाराजांच्या शूरतेचे, उदारतेचे अनेक दाखले त्यांनी या वेळी दिले. अल्पायुष्यात संभाजी महाराजांनी तीन संस्कृत ग्रंथ लिहिले, हे अनेकांना माहीतही नाही. महाराजांच्या दरबारातील एकेक शिलेदार गावंढळ वाटत असला तरी तो हुशार, चाणाक्ष आणि पंडित होता. संभाजी महाराजांऐवजी राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्याचा घाट काहींनी घातला. मात्र, चतुरस्त्र संभाजी महाराजांनी हा घाट उधळून लावत पन्हाळगडावर सेवेकऱ्यांना रुजू होण्याचे फर्मान सोडले. त्यांच्या विरोधात द्रोह करणाऱ्यांना त्यांनी निखालस माफी दिली. इंग्रजांनीदेखील एका पत्रात त्यांचा उल्लेख दयाळू आणि उदारमतवादी राजा असा केल्याचे प्रा. कानिटकर म्हणाले. घातपाताचा कट रचला जात असल्याचे समजताच संभाजी महाराज संतापले. या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून बाळाजी आवजी चिटणीस यांनाही मृत्युदंड देण्यात आला. महाराजांच्या या कृत्याबद्दल समर्थ रामदास स्वामींनीदेखील नाराजी व्यक्त केली. 'आधी गाजवावे तडाखे अवघे भूमंडळ झाके ऐसे न होता धक्के राज्यासी बसती' अशा परखड शब्दांत महाराजांना कारभार कसा असावा, याबाबतची अपेक्षा व्यक्त केली. हल्ली पाकिस्तान, श्रीलंका यांसारखी काही राष्ट्रे भारतविरोधी कारवाया करीत असल्याने रामदास स्वामींचा हा सल्ला देशाच्या राजधानीत लक्ष वेधेल, अशा ठिकाणी लिहायला हवा, अशी अपेक्षा प्रा. कानिटकर यांनी व्यक्त केली. त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. शीतल मालुसरे गहिवरल्या

आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हणत झुंजार लढा देणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र रायबा यांच्या गळ्यात शिवाजी महाराजांनी कवड्यांची माळ घातली. नरवीरांच्या बाराव्या वंशातील स्नुषा डॉ. शीतल मालुसरे यांनी ही माळ नाशिककरांना दर्शन घेता यावे यासाठी सोबत आणली होती. पालखीतून ही माळ कालिदास कलामंदिराच्या व्यासपीठावर आणण्यात आली. तेथे मंत्रोच्चारात माळेचे पूजन करण्यात आले. डॉ. मालुसरे यांचाही मानपत्र, फेटा व पोशाख देऊन शाहू खैरे परिवार व संस्कृतीतर्फे सन्मान करण्यात आला. या सन्मानाला उत्तर देताना डॉ. मालुसरे भावूक झाल्या. पूर्वपुण्य म्हणून मी मालुसरे घराण्याची सून झाले. नाशिककरांनी केलेले आदरातिथ्य पाहून मी भारावले आहे. मला आईवडील नाहीत. भावंडेही लहान आहेत. त्यामुळे शाहू खैरे यांनी केलेला हा सन्मान मला माहेरचा सन्मान वाटतो, अशी भावना व्यक्त करताना त्यांना गहिवरून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवगांधार’मध्ये रंगले कोमकलींचे गायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'निनादिनी' प्रस्तुत, श्रेष्ठ गायक व गुरुवर्य पंडित राजाभाऊ देव यांच्या ११ व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त आयोजित देवगांधार महोत्सवात दुसऱ्या दिवशी पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीची 'विरासत' असलेल्या त्यांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिभावंत युवा कलाकार भुवनेश कोमकली यांचे गायन रंगले.

अत्यंत कठीण समजली जाणारी आणि तेवढीच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली कुमार गंधर्व यांची गायकी भुवनेश यांच्या गायनातून क्षणोक्षणी रसिकांनी अनुभवली. त्यांनी मैफलीच्या सुरुवातीला राग मुलतानीमध्ये 'गोकुल गाम' या बंदिशीत रागविस्तार आपल्या खास शैलीत सादर केला. अतिशय भारदस्त आवाज, आलापीतील वेगवेगळे लगाव, तालाशी खेळत, संवाद साधत चाललेले लयकारीचे काम, प्रचंड ताकदीच्या ताना या सगळ्या गोष्टींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी गायलेले 'म्हारा रसिया' या बंदिशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. 'बासुरी बजाऊ' ही अप्रतिम बंदीश अनेक सौंदर्यमूल्यांसह त्यांनी पेश केली. उत्तरोत्तर रंगलेला हा कार्यक्रम मध्यंतरानंतही रसिकांच्या हृदयाला भिडला. दोन्ही दिवस कलाकारांना संजय देशपांडे यांनी तबल्यावर, तर सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीवर साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस

$
0
0

माधवराव पाटील, अध्यक्ष, जनलक्ष्मी बँक

सचिन शहा, बांधकाम व्यावसायिक

रतन चावला, अध्यक्ष, सिंधी पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम मोडणार, त्याला कॅमेरा टिपणार

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात सीसीटीव्ही यंत्रणा इंदिरानगर येथील अंडरपासमध्ये बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेचा वापर २६ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. शहरात प्रथमच या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असून, 'वन वे'चा नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना यामुळे घरपोच दंडाची पावती पाठविणे शहर वाहतूक पोलिसांना शक्य होणार आहे.

छोटे आकारमान असलेला इंदिरानगर अंडरपास सुरुवातीपासूनच पोलिसांसह वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी येथे एकेरी वाहतुकीचा पर्याय निवडला. मात्र, पोलिस असेपर्यंतच येथे सर्व सुरळीत असते. पोलिस नसले की पुन्हा दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू होते आणि वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. या ठिकाणी २४ तास पोलिसांची नियुक्ती करणे शक्य नसल्याने पोलिसांसाठी ही नवी यंत्रणा मोठी फायद्याची ठरणार आहे. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांची माहिती या यंत्रणेमार्फत वाहतूक शाखेला मिळणार आहे. तसेच एकाच वाहनाने सलग किती वेळा नियम मोडला तर तेही वाहतूक पोलिसांना समजू शकणार आहे.

अॅम्ब्युलन्स अडकली अन्..

ही यंत्रणा अॅपक्राफ्टझ या सॉफ्टवेअर कंपनीच्या महेंद्र एकबोटे यांनी विकसित केली आहे. याबाबत एकबोटे म्हणाले की, एक दिवस या ठिकाणाहून जाताना एक अॅम्ब्युलन्स येथील वाहतूक कोंडीत सापडल्याचे दिसले. वाहनांच्या रांगा इतक्या विचित्र होत्या की, अॅम्ब्युलन्सची सहजतेने येथून सुटका होणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर पदरमोड करून आम्ही ही यंत्रणा विकसित करण्याचे ठरविले. यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केले. एआय संशोधन, कलर, ब्युटिफिकेशन असा चार लाख रुपयांपर्यंत खर्च गेला. पैशांचा प्रश्न होता, पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून ही योजना हाती घेतल्याचे एकबोटे यांनी स्पष्ट केले.

अशी असेल यंत्रणा

एआय तंत्रज्ञानावर अनेक अॅप यापूर्वी विकसित झाले आहेत. मात्र, वाहतूक नियोजन आणि त्यातून कायदेशीर दंड वसूल करण्याचा प्रयत्न झालेला नव्हता. त्यामुळे ही नाशिकच नव्हे तर राज्यात एकमेव अशी यंत्रणा ठरणार आहे. अंडरपासमध्ये तीन कॅमेरे बसविण्यात येणार आहे. गोविंदनगरकडून इंदिरानगरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर या कॅमेऱ्यांची नजर राहील. याशिवाय इतर भागांवरही कॅमेरे लक्ष ठेवून असतील. गोविंदनगरकडून एखादे वाहन अंडरपासच्या दिशेने आले तर एक 'वुटर' जोरात आवाज करून वाहनचालकास पुढे न येण्याचा इशारा देईल. यानंतरही वाहन पुढे आले, तर सीसीटीव्ही कॅमेरे नंबर प्लेटसह संपूर्ण वाहनाचा फोटो काढेल.

दंडाची पावती घरपोच

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेले फोटो लागलीच वाहतूक शाखेच्या सर्व्हरवर पाठविण्यात येतील. यानंतर वाहतूक शाखा वाहन क्रमांकाच्या आधारे वाहनचालकाच्या पत्त्यावर दंडाची नोटीस पाठवून देईल. दंडाची रक्कम भरली नाही तर अशा वाहनचालकांना थेट कोर्टात पाठवण्यात येते. एखाद्या वाहनाने किती वेळा नियम मोडला, याचीही नोंद होणार असून, अशा वाहनचालकांचा परवाना निलंबित करणे किंवा यापेक्षा कडक कारवाई करणे यामुळे सोपे होणार आहे.

--

२६ जानेवारीपासून कार्यान्वित

ही यंत्रणा २६ जानेवारीपासून कार्यन्वित होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सर्व लोकप्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

शहर सुव्यवस्थित असणे हे त्या शहरातील प्रत्येक नागरिकांची गरज बनली आहे. वाहतूक बेशिस्त असेल तर त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रात जाणवतात. या पार्श्वभूमीवर ही योजना हाती घेतली होती. आता ती पूर्णत्वास चालली आहे, याचे समाधान मोठे आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारे प्रथमच काम होत आहे.

- महेंद्र एकबोटे, संचालक, अॅपक्राफ्टझ कंपनी

--

एआय तंत्रज्ञानामुळे मोठा डेटाबेस तयार होतो. परदेशात याचा वापर व्यापक पद्धतीने होतो. वाहतूकच नव्हे तर गुन्हेगारी नियंत्रण, प्रतिबंधात्मक कारवाई यासाठी याचा वापर होणार आहे. उद्याचे भविष्य हे तंत्रज्ञान असून, त्यामुळेच त्याचा स्वीकार आपण केला. शहरातील इतर भागातसुद्धा याच पद्धतीने काम हाती घेण्यात येईल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images