म. टा. प्रतिनिधी, नाशिक महासभेत इतिवृत्तावरुन झालेल्या गोंधळाची गंभीर दखल आयुक्त राधकृष्ण गमे यांनी घेतली आहे. गमे यांनी नियमांवर बोट ठेवत महिन्याच्या १० तारखेच्या आतच नगरसेवकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश नगरसचिवांना दिले आहेत. तुकाराम मुंढे आयुक्त असताना महासभेत जादा विषय येत नव्हते. त्याबद्दल मुंढे यांनी नगरसचिवांना सूचना केल्या होत्या. त्यांची बदली होताच राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर पहिल्याच महासभेत जादा विषय येण्यास सुरुवात झाली. जादा विषय आल्यानंतर त्यावर अभ्यास करता येत नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी घेतला होता. या मुद्द्यावरुन राधकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी यांना लक्ष्य करण्यात आले होते. 'टक्केवारीच्या महापौर' असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे महत्त्वाच्या विषयासाठी विशेष महासभा बोलविण्यात येईल, असे जाहीर केले होते. स्मार्ट सिटी अंतर्गत हरितक्षेत्र विकास नगरपरियोजना तयार करणे, महापालिकेच्या मिळकती संस्थांना भाडे कराराने देणे, त्याचप्रमाणे अक्षयपात्र योजनेत सेन्ट्रल किचन सुरू करणे असे प्रस्ताव होते. मात्र, आता राधाकृष्ण गमे यांनी केलेल्या नियमांमुळे भाजपच्या नगरसेवकांची गोची होणार आहे. महिन्याच्या १० तारखेच्या आत सादर होणारे प्रस्तावच स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत नगरसचिव कार्यालयाला तशा सूचना करण्यात आल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या १० तारखेपर्यंत जे विषय येतील तेच पुढे मार्गी लागणार आहेत. त्यानंतरची कामे खोळंबणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट