Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सांस्कृतिकदृष्ट्या नाशिक महत्त्वाचे

$
0
0

मनपा आयुक्त गमे यांचे प्रतिपादन

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक नगरीचे केवळ धार्मिक महत्त्व नसून, सांस्कृतिक महत्त्वदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. महानगरीत कला संचलनालयाच्या वतीने प्रख्यात चित्रकार आनंद सोनार यांचा कालिदास कलामंदिरात सन्मान होतो आहे, हा मी नाशिक महापालिकेचा बहुमान समजतो, असे प्रतिपादन नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण समारंभावेळी ते बोलत होते. कालिदास कलामंदिरात बुधवारी हा सोहळा पार पडला. यावेळी नाशिकमधील ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पन्नास हजार रुपयांचा धनादेश व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आयुक्त गमे म्हणाले की, नाशिक ही संतांची भूमी आहे. त्याचप्रमाणे चित्रकार, गीतकार यांचीदेखील भूमी आहे. सत्काराला उत्तर देताना आनंद सोनार म्हणाले, की प्रत्येक कलाकाराने कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. कामात सातत्य ठेवले तर सन्मान आपोआप तुमच्याजवळ येतो. वा. गो. कुलकर्णी यांच्यासारखे गुरू लाभल्याने कलेची सेवा करता आली. सुरुवातीला जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविण्यासाठी पैसे नसल्याने मित्रांनी पैसे जमा करून प्रदर्शन भरवले, त्यांचा मी ऋणी आहे. यावेळी कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा म्हणाले की, संतांच्या भूमीत हे प्रदर्शन आयोजित करताना आम्हाला आनंद होतो आहे. यावेळी त्यांनी शासनाने केलेल्या पुरस्काराच्या रकमेत वाढ केली असल्याचे सागून रक्कम जाहीर केली.

...

लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

या कार्क्रमासाठी राज्यभरातून विद्यार्थी, शिक्षक आले असताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित रहाणार असे जाहीर करण्यात आले. मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे महापौर रंजना भनसी, खासदार हेमंत गोडसे, विधानपरिषद सदस्य हेमंत टकले, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे यादेखील अनुपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटीबससाठी निविदा प्रसिद्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या माध्यमातून सिटीबस चालविण्याचे मुख्यमंत्र्याचे स्वप्न पूर्णत्वास येणार असून, प्रशासनाने महासभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सिटीबसच्या संचालनासाठी मक्तेदार नियुक्तीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८ मार्चपर्यंत निविदा दाखल करता येणार असून ११ मार्च उघडल्या जाणार आहेत.

गेल्या आठवड्यात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सिटीबस संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी प्रशासनाने बससेवा संचालनासाठी मक्तेदार नियुक्तीची निविदा प्रसिद्ध केली आहे. २२ जानेवारी ते ८ मार्चदरम्यान मक्तेदारांना निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी मक्तेदारांसाठी प्री-बिड बैठक बोलाविण्यात आली आहे. ११ मार्च रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. या कालावधीत निविदा प्रक्रियेत भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्चपर्यंत निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून मार्ग निघून डिसेंबरअखेर महापालिकेची बससेवा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दहा वर्षांचा ठेका

सिटीबस चालविण्यासाठी ठेकेदाराला दहा वर्षांसाठी हा ठेका दिला जाणार आहे. या ठरावानुसार सीएनजीवर चालणाऱ्या चारशे बस खरेदीची जबाबदारी संबंधित मक्तेदाराची राहणार असून, चालकही मक्तेदाराचेच असतील. प्रवासी भाडे वसुली आणि भाडेदर निश्चिती मात्र बस सेवेच्या कंपनीमार्फत केली जाणार आहे. यासाठी वाहकनियुक्तीची स्वतंत्र निविदा कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखाना बंद करण्यासाठी हायकोर्टात याचिका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भद्रकाली परिसरातील पिंपळचौक, ठाकरे रोड या वर्दळीच्या भागातील अनैतिक देहव्यापार बंद करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. स्थानिकांच्या या विनंतीची दखल हायकोर्टाने घेतली असली तरी तीन आठवड्यात ठोस पुरावे सादर करण्याबाबतचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने कमलेश परदेशी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

संदर्भ रुग्णालयाच्या पाठीमागील भागात घर क्रमांक ११३ येथे अनेक वर्षांपासून अनैतिक देहव्यापार सुरू आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात येतात. पोलिस अधूनमधून कारवाई करतात. मात्र, या व्यवसायाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या प्रकारामुळे परिसरातील दुकानदार आणि रहिवाशांना येथे येणाऱ्या ग्राहकांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागते. मद्यधुंद अवस्थेतील पुरुषांमध्ये हाणामाऱ्या होतात. बऱ्याचदा सराईत गुन्हेगारांचाही येथे वावर असतो. अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८ नुसार पोलिसांनी भरवस्तीतील आणि मुख्यबाजारपेठेतील हा व्यवसाय त्वरित बंद करावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने कोर्टाकडे केली आहे. डिसेंबर महिन्यात कोर्टाकडे करण्यात आलेल्या या याचिकेबाबत नुकतीच सुनावणी झाली. न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. हर्षद पालवे आणि रामनारायण कंलत्री यांनी बाजू मांडली. तर, सरकारपक्षातर्फे अॅड. दीपक ठाकरे, अॅड. एस. डी. शिंदे यांनी काम पाहिले.

...

पुरावे सादर करण्याचे आदेश

याचिकाकर्त्याने वेश्या व्यवसायासह गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला असून, त्यादृष्टीने पुरेसे पुरावे देण्यात आलेले नाही. पोलिसांनी मात्र वेळोवेळी या प्रकरणी समोर आलेल्या तक्रारींची दखल घेतल्याचे दिसते, असे खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणी संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी आणि याचिकाकर्त्याने तीन आठवड्यात आणखी योग्य ते पुरावे सादर करावेत, असे आदेश खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षबाग नुकसानाची मिळावी भरपाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव ते सापुतारा महामार्गाच्या कामामुळे या परिसरातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. पिंपळगाव ते सापुतारा या महामार्गाचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने दीड ते दोन महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली. या महामार्गालगतच द्राक्षबागा असून, कामादरम्यान उडणाऱ्या मातीच्या धुरळ्यामुळे पिकांचे नुकसान होते आहे. गौण खनिजेही शेतांलगतच टाकली जात आहेत. मातीच्या धुरळ्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचेही त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देऊनही कंपनीने अंमलबजावणी केली नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई प्रशासनाने कंपनीकडून मिळवून द्यावी अशी मागणी अरुण घुगे, अंबादास घुगे, बबन घुगे, मंगेश घुगे, देवराम गायकवाड, भौरीलाल पारख आदींनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ बहुजन समाजाचे नेते

$
0
0

योगेश निसाळ यांचे पत्रकाद्वार प्रत्युत्तर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रसिद्धीपत्रक काढून बदनामी करणाऱ्या तुषार जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भुजबळ हे बहुजन समाजाचे नेते असल्याचे प्रत्युत्तर पत्रकाद्वारे देत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस योगेश निसाळ यांनी जगताप यांच्यावर टीका केली आहे.

मराठा समाजाचा नेता व मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणवणाऱ्या कथित आरोग्यदूत तुषार जगताप यांनी भुजबळ यांच्याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून चुकीची माहिती पसविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा 'बोलवता धनी' वेगळा असल्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पत्रक काढून आरोप करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे मत निसाळ यांनी मांडले आहे. मराठा समाज बांधव अशा पत्रकामुळे भुलणार नाही. भुजबळ हे देशातील बहुजन समाजाचे नेते असून त्यांनी जातीयवादाला कधीच थारा न देता प्रत्येक समाजातील नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या मराठा उमेदवारांसाठी भुजबळ हे राज्यभर फिरत आहेत. मराठा समाजाच्या उमेदवारांना ओबीसीसह मागासवर्गीय बांधवांची मते मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न असल्याचेही निसाळ यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरितक्षेत्राचा वाद आता ‘स्थायी’त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सीटी योजनेंतर्गत हनुमानवाडी व मखमलाबाद येथील ७५४ एकर क्षेत्रावर साकारण्यात येत असलेल्या स्मार्ट नगरनियोजन (टीपी स्कीम ) परियोजनेतील अडथळे कमी होत नसल्याचे चित्र आहे. स्थायी समितीतील भाजपच्या सदस्य भिकुबाई बागूल यांनी स्थायी समितीला पत्र देऊन सदरचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.

मानूरमधील शेतकऱ्यांनीही योजनेला अगोदरच विरोध दर्शवला आहे. त्यापाठोपाठ आता भाजपमधील सदस्यांनीच या प्रस्तावाविरोधात थेट जाहीर भूमिका घेतल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बागूल यांनी स्थायी समितीला पत्र दिले आहे. आपण प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेवक असून या योजनेत १० हजारापेक्षा अधिक लोकवस्ती असलेला भागही येणार आहे. त्यामुळे या भागात ही योजना राबविणे शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाची पुन्हा कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते कामांना प्राधान्य?

$
0
0

रस्ते कामांना प्राधान्य?

सत्ताधाऱ्यांनी या अखर्चित निधीतून रस्ते कामांचाही बार उडवण्याची तयारी केली आहे. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात नगरसेवकांना खुश करण्यासाठी २५७ कोटींची रस्ते योजना मार्गी लावली होती. परंतु, मुंढेंनी या रस्ते योजनेला ब्रेक लावून सर्व कामे गुंडाळून ठेवली होती. याउलट नागरी हिताच्या कामांना प्राधान्य दिले होते. परंतु, आता पुन्हा निधी शिल्लक असल्याचे सांगत, भाजपकडून रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याची चाल खेळली जात आहे.

रस्त्यांचे प्रस्तावही तयार आहेत, तर नगरसेवकांचीही मागणी असल्याचे सांगत, हा विषय पुढे रेटला जाणार आहे. त्यासाठी नगरसेवकांकडून पुन्हा रस्ते कामांचे प्रस्ताव मागवले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकांना कामे दाखवावी लागणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेतून गेलेले रस्त्याचे प्रस्तावच मदतीला धावणार आहेत.

गेले दोन वर्षे महापालिकेत सत्ता येऊनही नगरसेवकांची कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे ही कामे मार्गी लावून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा भाजपचा डाव असून त्यासाठीची तयारी केली जात आहे. परंतु, याला प्रशासन किती प्रतिसाद देईल यावरच भाजपच्या रस्ते योजनेला यश येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रा. पं. सदस्यावर टांगती तलवार

$
0
0

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राखीव जागांवर विजयी होऊनही मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. याबाबतच्या नोटिसा बजावण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामांकन दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सदस्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असून, फेब्रुवारीत या सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याचा पुरावा देणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेत बॉम्ब अन् सर्वांचीच दाणादाण!

$
0
0

हटिया एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा

....

- सोलापूर रेल्वे सुरक्षा दल कंट्रोलला निनावी फोन

- कोपरगाव स्थानकात थांबवली रेल्वे

- दोन तास कसून तपासणी

- प्रवाशाही भयभीत

...

म. टा. वृतसेवा, मनमाड

पुण्याहून हटिया येथे जाणाऱ्या धावत्या एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन बुधवारी दुपारी सोलापूर रेल्वे कंट्रोल ऑफिसला आला. त्यांनी तत्काळ मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांना सतर्क केले. यामुळे ही रेल्वे कोपरगाव स्थानकात थांबविण्यात आली. मनमाड लोहमार्ग पोलिस, कोपरगाव स्थानिक पोलिस व शिर्डी येथील बॉम्ब शोधक पथक यांनी संपूर्ण रेल्वेची कसून तपासणी केली. मात्र रेल्वेत बॉम्ब असल्याची अफवा निघाल्याने प्रवाशांसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुणे हटिया धावत्या एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन सोलापूर रेल्वे सुरक्षा बल कंट्रोलला आला होता. ही माहिती सोलापूर कंट्रोलने मनमाड येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यास चार वाजेच्या सुमारास देत सतर्क केले. यामुळे मनमाड रेल्वेचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने हे दहा पोलिस कर्मचाऱ्यांची कुमक घेऊन तातडीने कोपरगाव येथे रवाना झाले. कोपरगाव रेल्वे पोलिसांच्या स्टाफला याबाबत कळविण्यात आले आणि सदर रेल्वे कोपरगाव रेल्वे स्थानकात थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिर्डी येथून बॉम्ब शोध पथक व श्वान पथक मागविण्यात आले. हटिया एक्स्प्रेसच्या एसी डब्यासह सर्व बोगीतील प्रवाशांना कोपरगाव स्थानकात खाली उतरविण्यात आले. रेल्वेत बॉम्बच्या संभाव्य कल्पनेने प्रवाशीदेखील घाबरून गेले. रेल्वे पोलिसांनी दोन ते अडीच तास गाडीचा ताबा घेत संपूर्ण गाडी कसून तपासली. मात्र बॉम्ब काही सापडले नाही. रेल्वेत बॉम्ब ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे प्रवाशी व पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

...

अडीच तासांनी हटिया एक्स्प्रेस मार्गस्थ

दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी थांबविण्यात आलेली हटिया एक्स्प्रेस सायंकाळी पावणे सात वाजता कोपरगावहून पुढे मार्गस्थ करण्यात आली. मात्र रेल्वेत बॉम्ब याचीच मनमाड-जळगाव दरम्यान रेल्वे

प्रवासात चर्चा रंगली.

..

हटिया एक्स्प्रेस मनमाड स्थानकात आल्यानंतर देखील कसून तपासली जाण्याचे संकेत रेल्वे पोलिस प्रशासनाने दिले होते. मात्र, कोपरगाव येथे हटिया एक्स्प्रेस पिंजून काढल्यानंतर पुन्हा रेल्वे तपासण्याचा निर्णय रहित करण्यात आला.

- नवनाथ मदने, लोहमार्ग पोलिस निरीक्षक, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा एकच अंगारकी योग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा फक्त एकदाच अंगारकी चतुर्थीचा योग असून, सप्टेंबर महिन्यात १७ तारखेला ती आहे. आज (दि. २४) वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असून, चंद्रोदय ९ वाजून ५३ मिनिटांनी होणार आहे. आज सकाळपासून शहरातील गणेश मंदिरात भाविकांची गर्दी होणार आहे.

चतुर्थीनिमित्त शहरातील गणेश मंदिरांत पूजाविधींचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यंदा फक्त एकच अंगारकी योग असल्याने संकष्टीचे व्रत सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत भक्तांना वाट पहावी लागणार आहे. शुक्ल पक्षातील ज्या मंगळवारी चतुर्थी ही तिथी असते, तेव्हा अंगारकीचा योग येतो. यंदा २०१९ मध्ये असा योग फक्त सप्टेंबर महिन्यात आहे. विशेष म्हणजे, यंदाची अंगारकी चतुर्थी भाद्रपद महिन्यात असल्याने त्याला विशेष महत्त्व असणार आहे. तसेच गणेश चतुर्थी २ सप्टेंबर (सोमवार), तर अनंत चतुर्दशी १२ सप्टेंबर (गुरुवार) रोजी आहे. त्यामुळे यंदा बाप्पांचा मुक्काम ११ दिवसांचा असणार आहे. भाद्रपद महिन्यातील अंगारकीचा योग गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा असेल, असे पुरोहितांनी सांगितले.

ज्या गणेश भक्तांना संकष्टीच्या व्रताला प्रारंभ करायचा असेल. त्यांच्यासाठी यंदा एकच अंगारकी चतुर्थीचा योग आहे. त्यामुळे गणेश भक्त संकष्टीच्या व्रताला सप्टेंबर महिन्यात प्रारंभ करू शकतात. हा योग भाद्रपद महिन्यात आल्याने यंदा याचे महत्त्व अधिक आहे.

- अभिषेक काण्णव, पुरोहित

\Bया वर्षातल्या संकष्टी चतुर्थी\B

दिनांक............... वार......... चंद्रोदयाची वेळ

२२ फेब्रुवारी........ शुक्रवार..... ९.३६

२४ मार्च............. रविवार...... १०.१४

२२ एप्रिल............ सोमवार..... ९.५३

२२ मे................. बुधवार....... १०.२३

२० जून............... गुरूवार....... ९.५२

२० जुलै............... शनिवार....... ९.५१

१९ ऑगस्ट............ सोमवार....... ९.३७

१७ ऑक्टोबर.......... गुरूवार........ ८.४८

१५ नोव्हेंबर............ शुक्रवार........ ८.२३

१५ डिसेंबर............. रविवार......... ९.०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगा, बोटाचे ठसे उमटतील कुठं!

$
0
0

येथे येत आहेत नागरिकांना अडचणी

- टपाल कार्यालये, बँकांमध्ये बोटांचे ठसे जुळविण्यात अडचणी

- आधार केंद्रांकडून दुरुस्तीला टाळाटाळ

- थंब मशिन व आय स्कॅनरसारखी मशिनरी उपलब्ध नसल्याची कारणे

- जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरवर काम ढकलण्याचे प्रकार

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साहेब, बोटाचे ठसे उमटत नसल्यामुळे रेशन दुकानदार कुरकूर करतो. यंदा धान्य न देताच त्यानं मला पिटाळून लावलं. आधार सेंटरवर जाऊन बोटाचे ठसे देऊन ये म्हणाला. मी गणेशवाडीतील पोस्ट ऑफिसमध्ये गेले. इथं नाही होतं. कलेक्टर ऑफिसला जा, असे सांगत तिथल्या आधार सेंटरवाल्या पोरानं पाठवून दिलं. साहेब ते माझे बोटाचे ठसे कुठं उमटतील. मला या महिन्याचं रेशन तर मिळंल ना हो? ६४ वर्षे वयाच्या शारदाबाई राजपूत यांचा हा उद्विग्न सवाल. आधार दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेशनच्या कामास टाळाटाळ करून आधार सेंटरचालक नागरिकांच्या अडचणी वाढवित असल्याचे लक्षात आणून देण्यास पुरेसा आहे. शारदाबाईंची व्यथा हे एक उदाहरण झाले. अनेकांना अशा दिव्यातून जावे लागते आहे.

आधार दुरुस्ती व बायोमेट्रिक अपडेशनची कामे टाळण्याचे आणि ती जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरकडे ढकलण्याचे प्रकार शहरात वाढू लागले आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: टपाल कार्यालये आणि बँकांमध्ये नागरिकांना बोटांचे ठसे जुळविणे व तत्मस कामांत प्रकर्षाने अडचणी भेडसावत असून, आता आम्ही कुणाचे उंबरे झिजवायचे असा सवाल नागरिकांकाकडून केला जाऊ लागला आहे. आधार ही सर्वमान्य ओळख ठरत असून, प्रत्येकालाच आधारकार्ड जवळ बाळगणे अनिवार्य झाले आहे. परंतु, चुकांरहित आधारकार्ड मिळविणे नागरिकांसाठी दिव्य ठरते आहे. गणेशवाडीसारख्या काही ठिकाणच्या आधार केंद्रांवर नागरिकांची बायोमेट्रिक अपडेशनसारखी कामे नाकारली जात आहेत. थंब मशिन व आय स्कॅनरसारखी मशिनरी उपलब्ध नसल्याची कारणे त्यासाठी ऑपरेटर्सकडून दिली जात आहेत. ही मशिनरी नाही तर नवीन आधार नोंदणी कशी केली जाते असा सवाल संतप्त नागरिक त्यामुळे उपस्थित करू लागले आहेत.

जिग्नेष राजगुरू यांच्या मुलाचा दहावी परीक्षेचा अर्ज भरावयाचा आहे. त्याच्याही आधार कार्डचे बायोमेट्रिक अपडेशन करणे अनिवार्य ठरते आहे. अपडेशनची कामे आम्ही करीत नाही सांगत त्यांनाही जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले. तेथेही प्रचंड गर्दी व नागरिकांची झुंबड उडाल्याने मुदतीत हे काम मार्गी लागणार का याची चिंता राजगुरू यांना सतावते आहे. वैष्णवी शिंदे या विद्यार्थिनीलाही बायोमेट्रिक अपडेशनअभावी स्कॉलरशीपचा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्यास अडथळे निर्माण होत असून, अपडेशनची कामे न करणाऱ्या सेंटरचालकांवर कुणाचा वचक नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटचा ‘ताळा’ चुकणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सन २०१८-१९ या वर्षाच्या बजेटमध्ये तब्बल दोनशे कोटींचा निधी अखर्चित राहिला असतानाच, आता यावर्षी जमा बाजूत अवास्तव फुगवेल्या आकड्यांचा फुगा फुटला आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतलेल्या आढाव्यात दोन हजार कोटींपर्यंत फुगवलेल्या बजेटमधून १९८४ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असताना डिसेंबरअखेर ९३६ कोटी रुपयेच तिजोरीत जमा झाले आहेत. आज घडीस १०४७ कोटींची तूट येत असल्याने प्रशासनाचीही कोंडी झाली आहे.

महापालिका प्रशासनाकडून सध्या एकाच वेळी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट तयार करण्यासह सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटचाही आढावा घेतला जात आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी बजेटमध्ये अवास्तव फुगविलेल्या विकासकामांमुळे अर्थसंकल्पाची पूर्ण वाट लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी १४२० कोटी रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय बजेट स्थायीला सादर केले होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांची बदली झाल्यानंतर आलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुन्हा बजेटची मोडतोड केली. नागरी सुविधांना प्राधान्य देत, मोठ्या प्रमाणावर महसूल वाढविण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार घरपट्टीत मोठी वाढ सुचविण्यात आली. मुंढे यांनी स्थायी समितीला १७८५ कोटींचे बजेट सादर केले होते. स्थायी आणि महासभेने त्यात वाढ करीत हे बजेट तब्बल २०३१ कोटींपर्यंत फुगवले होते. महासभेने मंजूर केलेल्या बजेटमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात महापालिकेला १९८४ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, मुंढे यांची बदली होताच, पालिकेतील सगळी आर्थिक गणिते बदलली. घरपट्टी वाढ रद्द करण्यात आली तर, नगररचना विभागाकडून अपेक्षित निधी वसूल झाला नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर झाला आहे. गमे यांनी चालू वर्षाच्या बजेटचा आढावा घेतला असता अपेक्षित महसुलाच्या तुलनेत तब्बल एक हजार ४७ कोटी रुपयांची महसुली तूट असल्याची धक्कादायक बाब समोर आली. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत पालिकेला विविध स्रोतांच्या माध्यमातून जेमतेम ९३६ कोटी रुपयांचाच महसूल मिळाला असून, त्यात जीएसटी अनुदानाच्या ६५० कोटींचा समावेश आहे. उर्वरित तीन महिन्यांत जेमतेम तीनशे कोटींचे उत्पन्न पालिकेला अपेक्षित असले तरी, घरपट्टी वसुलीला लागलेला 'ब्रेक' आणि नगररचनातील पेच सुटत नसल्याने ही तूट कायम राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कामे मंजूर असताना दुसरीकडे निधी मिळणार नसल्याने पालिकेचा स्पीलओव्हर मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मंजूर खर्चातही कंजुषी

विशेष म्हणजे पालिकेला मिळालेला निधीही खर्च करण्यात अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. ९३६ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले असले तरी, प्रत्यक्षात खर्च मात्र ७४९ कोटी रुपयांचाच खर्च झाला आहे. सद्य:स्थितीत १८७ कोटींचा निधी अखर्चित आहे. २०३२ कोटींच्या बजेटची तुलना केली तर हा खर्च जेमतेम ३५ ते ४० टक्क्यांपर्यंतच झाला आहे. तीन महिन्यांत उर्वरित १२८३ कोटी रुपये खर्च कसे होणार, असा प्रश्न आहे. हा आकड्यांचा जुमला आता अधिकाऱ्यांनाही पेलवत नसल्याचे चित्र आहे.

बजेट फेब्रुवारीतच

एकीकडे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटचा आढावा घेत असतानाच, सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या प्रारूप अर्थसंकल्पीय बजेटची तयारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुरू केली आहे. सद्य:स्थितीत सर्व विभागांच्या मागणी सूचना प्राप्त झाल्यानंतर विभागनिहाय जमा-खर्चाचा आढावा आयुक्तांमार्फत सुरू आहे. आतापर्यंत बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत, यांत्रिकी, नगरनियोजन या विभागांची बैठक झाली असून, त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाकडे नोंदविल्या आहेत. समाजकल्याण, महिला बालकल्याण, घनकचरा आदी विभागांची आढावा बैठक लवकरच घेतली जाणार आहे. साधारणत: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन प्रारूप बजेट आयुक्तांमार्फत स्थायी समितीला सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक ‘टोल फ्री’वर आता मोबाइलद्वारेही संपर्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक, मतदान आणि मतदार या विषयीची कोणतीही माहिती सहजगत्या मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेची हेल्पलाइन बुधवारपासून मोबाइलवरही कार्यान्वित झाली. सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिक माहिती घेऊ शकणार आहेत.

मतदारांना त्यांच्या शंकाचे निरसन करवून घेता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पहिल्यांदाच टोल फ्री सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १८००२५३१९५० या टोल फ्री क्रमांकावरून नागरिक निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती जाणून घेऊ शकत होते. परंतु, ही सुविधा केवळ लँडलाइन फोनद्वारेच उपलब्ध होती. ती मोबाइलद्वारे कार्यान्वित करण्यास निवडणूक शाखेला यश आले आहे. त्यामुळे आता १९५० या चार आकडी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना मतदान व निवडणूक प्रक्रीयेविषयीच्या तक्रारी, सूचना आणि अभिप्राय मांडणे शक्य होऊ लागले आहे. यासाठी एका प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून या क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबत ऑनलाइन पाठपुरावा तक्रारदार करू शकणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी सहा या कालावधीत नागरिक या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार आणि मतदान याविषयीची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत. टप्प्या टप्प्याने हा कालावधीही वाढविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅफिक वॉर्डनचा प्रस्ताव महासभेवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला महापालिकेने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावेत, असे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून होमगार्डनच्या धर्तीवर आता ट्रॅफिक वॉर्डन योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी सदरचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

राज्य सरकारने होमगार्डच्या धर्तीवर शहरांमध्ये ट्रॅफिक वॉर्डन योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात बैठक झाली. ट्रॅफिक वॉर्डनवर खर्च करण्यासाठी सरकारकडे लेखाशीर्ष नसल्याने महापालिकांनी खर्चाचा भार उचलण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, महापालिकेने ट्रॅफिक वॉर्डनसंदर्भात विविध प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यात ट्रॅफिक वॉर्डनचा विषय महापालिकेशी संबंधित नाही, ट्रॅफिक वॉर्डनकडून कायमस्वरुपी सेवेत घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे हा विषय धोरणात्मक असल्याचे सांगत, महासभेवर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महासभाच याबाबतीत अंतिम निर्णय घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पनिविदांद्वारे लगीनघाई

$
0
0

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दोनशे कोटी खर्चाचे लक्ष्य

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे भांडवली कामांसाठी मंजूर झालेला सुमारे दोनशे कोटींचा अखर्चित निधी खर्चात लोकसभा निवडणूक आचारसंहिता अडसर ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्पातील अखर्चित असलेला दोनशे कोटी रुपयांचा बार आचारसंहितेपूर्वी उडवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी अल्पनिविदा मागवल्या जाणार आहे. त्याद्वारे निवडणूकांपूर्वीच ठेकेदार नियुक्त करून भूमीपूजन उरकण्याची घाई सत्ताधारी भाजपने सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त मुंढे यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात एकीकडे नगरसेवक निधीला कात्री लावत, दुसरीकडे भांडवली कामांसाठी मंजूर केलेल्या खर्चालाही त्रिसूत्री लावली होती. मुंढे यांची त्रिसूत्री आणि पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि सार्वजनिक आरोग्य या तीन विभागाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या धोरणाने विभागप्रमुखांनी बजेटमधील निधी खर्चाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे डिसेंबरमध्ये नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत बजेटमध्ये मंजूर केलेल्या एकूण निधीपैकी जवळपास सातशे कोटी रुपये खर्च झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गमे यांनी हा निधी तातडीने खर्च करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागप्रमुखांनी सध्या खर्चाचा सपाटा लावला असून काही कामे आता करण्याची योजना पूर्ण झाली आहे. त्यातही जेमतेम पाचशे कोटींचीच कामे मार्गी लागणार असून भांडवली कामासाठी असलेले दोनशे कोटी अजूनही अखर्चित राहण्याचा धोका सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे भाजपने हा निधीही खर्च करण्याची घाई सुरू केली आहे. हा निधी वाया जाऊ नये यासाठी अल्पनिविदा काढण्याची प्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे. लोकसभेपूर्वी अल्पनिविदा काढून कामे मार्गी लावायचे आणि निवडणुकांपूर्वी या कामांचे भूमिपूजन करण्याचा डाव भाजपने आखला आहे. त्यासाठी प्रशासनानसोबत चर्चा केली जात आहे. यातील बहुतांश कामे ही नगरसेवकांचीच धरली जाणार असल्याने नगरसेवकांनाही अच्छे दिन येणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रियंकांच्या नियुक्तीने काँग्रेसमध्ये जल्लोष

$
0
0

पेढे वाटून आंनदोत्सव साजरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्याने पक्षामध्ये उत्साह संचारला आहे. शहर काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आंनदोत्सव साजरा केला. प्रियंका गांधीच्या रुपाने काँग्रेसमध्ये नव्या युगाची चाहूल लागल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या सरचिटणीसपदी प्रियंका गाधी यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या पूर्वीच काँग्रेसचे नेतृत्त्व प्रियंका गांधीकडे द्यावे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात प्रियंका रोखू शकतील, असा दावा कार्यकर्ते करत होते. मात्र, प्रियंका गांधी यांच्याकडून राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत नव्हते. अखेरीस बुधवारी त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्येही चैतन्य संचारले आहे.

गांधी यांच्या नियुक्तीचा जल्लोष शहर काँग्रेस कार्यालयताही साजरा करण्यात आला. महात्मा गांधी रोडवरील पक्षाच्या शहर कार्यालयात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमेकांस पेढे भरवले. यावेळी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष वत्सला खैरे, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत, नगरसेवक राहुल दिवे, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, सातपूर ब्लॉक अध्यक्ष कैलास कडलग, सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, महिला उपाध्यक्ष ज्युली डिसुझा, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, वंदना पाटील, उपाध्यक्ष दीपक राव, अरुण दोंदे, रामकिसन चव्हाण, भरत पाटील, आण्णा मोरे, प्रवीण काटे, उत्तमराव बडदे, शोभा भोये, शोभा गोंदणेनकर, सोफिया खान, माया काळे, अमोल सूर्यवंशी, रोहन कातकाडे, प्रसाद नागवंशी, देवेंद्र सोहेल, पवन आहेर, शिवराज पाटील, हर्षल शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून ‘नाशिक आर्ट फेस्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'टॅलेंट ऑफ नाशिक' या संस्थेतर्फे गुरुवारपासून 'नाशिक आर्ट फेस्ट' आयोजित करण्यात आला आहे. शहरातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध कलागुणांसह स्पर्धा व खेळांची मेजवानी नाशिककरांना अनुभवता येणार आहे.

'नाशिक आर्ट फेस्ट'चे यंदा तिसरे पर्व असून, २४ ते २६ जानेवारीत हे फेस्टिवल होणार आहेत. गंगापूर रोड येथील आसाराम बापू पूलाजवळील गोदा पार्क येथे सायंकाळी ५ ते १० या वेळेत फेस्टिवल होईल. आज, गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते फेस्टिवलचे उद्घाटन होईल. शहरातील १५ ढोल पथकांद्वारे नाशिक आर्ट फेस्टमध्ये भव्य ढोलवादन करण्यात येणार आहे. या ढोलवादनानेच फेस्टला प्रारंभ होणार असून, ढोल ताशांच्या निनादात कलाविष्कारांच्या सोहळ्याला सुरुवात होईल. फेस्टिव्हलमध्ये नवोदित कलाकार विविध कलाविष्कार सादर करणार असून, गायन, अभियन, नृत्य कलेच्या पाश्चिमात्य छटा फेस्टिवलमध्ये सादर केल्या जाणार आहेत. त्यासोबतच चित्रकला, रांगोळी व फोटोग्राफी याच्या कार्यशाळा आणि प्रदर्शन असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला शिक्षक ठरला अनेकांचा जीवनदाता

$
0
0

अवयवदानातून जपली मानवतेची भावना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाच वर्षीय लेकीच्या वाढदिवसाच्या तयारीत गुंतलेल्या चाळीशीतील कला शिक्षकावर दुर्दैवाने अतिशय दुर्धर प्रसंग ओढावला. मेंदूत अचानक झालेल्या रक्तस्त्रावाच्या उपचारांसाठी त्यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. या अनपेक्षित संकटातून सावरत त्यांच्या कुटुंबीयांनी या कुटुंबप्रमुखाचे अवयवदान करण्याचा निर्णय धैर्याने घेतल्याने या कलाशिक्षकाने मृत्यूनंतरही अनेकांना जीवदान देऊन मानवतेची भावना जपली.

सिडकोतील रहिवासी असलेले मूळचे नाशिककर असलेले राजेश अर्जुन घनघाव (वय ४२) हे १३ वर्षांपासून मुंबई महापालिकेतील एका शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. कन्येच्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी नाशिकला आलेले घनघाव घराबाहेर पडले होते. वाढदिवसासाठी पदार्थांची बुकिंग केल्यानंतर मित्रांसोबत संवाद साधत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना दवाखान्यात तातडीने दाखल करण्यात आले. विविध आरोग्य तपासण्यांमध्ये घनघाव यांच्या मेंदूतील वाहिनीस इजा पोहचल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तीन दिवस डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी दीपिका घनघाव व पाच वर्षीय मुलगी सांची यांच्यावर काळाने घातलेल्या संकटाने घनघाव व संसारे कुटुंबीय अस्वस्थ झाले.

या अवयवांचे केले दान

रुग्णालयात स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी जिगिषा यादव यांनी कुटुंबियांचे समुपदेशन करत अवयवदान करण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय, यकृत, त्वचा, डोळे, हाडे दान करण्यात आले. मुलूंडच्या खासगी रुग्णालयात हृदयाच्या प्रतिक्षेत असलेल्या एका ४८ वर्षीय महिलेवर हृदय प्रत्यारोपण करताना पूनर्जीवन घनघाव कुटुंबियांच्या या निर्णयामुळे मिळू शकले. अशा बिकट परिस्थितीत घनघाव कुटुंबाने धैर्याने घेतलेला निर्णय मानवतेचे उदाहरण ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्नेहसंमेलनाला सामाजिक कोंदण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीवायकेच्या स्नेहसंमेलनाला यंदा सामाजिकतेचे कोंदण लावत, 'धान्य संकलन' उपक्रम राबवत राबविण्यात आला. 'कॉलेज डेज'च्या उत्साहात सामाजिक बांधिलकी म्हणून संकलित करण्यात आलेल्या सुमारे ७०० किलो धान्याचे बुधवारी वाटप करण्यात आले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थी विकास समितीतर्फे स्नेहसंमेलनात सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांकडून गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी हे धान्य संकलित करण्यात आले. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत झालेल्या स्नेहसंमेलनात हा उपक्रम राबविणय्ता आला. उपक्रमातून २५० किलो तांदूळ, २५० किलो गहू संकलित झाले. तसेच १५० किलो ज्वारी व बाजरी आणि ५० किलो डाळींचे संकलन झाले. सुमारे ७०० किलो धान्याचे बुधवारी शाळा व बालाश्रमात वाटप करण्यात आले. कृषिनगर परिसरातील महापालिकेच्या शाळेत २०० किलो, तर त्र्यंबकेश्वर येथील खंबाळे गावातील बालाश्रमात २५० किलो धान्य देण्यात आले. आज अशोकस्तंभ येथील अनाथाश्रमात २५० किलो धान्य देण्यात येणार आहे. स्नेहसंमेलनाच्या उत्साहासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दातृत्व रुजावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. बी. बी. गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी कमलेश काळे, अनिरुद्ध लोंढे, मृणाल पाटील, तेजस कुमावत, मयूर आहेर यांसह इतर विद्यार्थ्यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरनगरला घरफोडीत आठ लाखांचे दागिने चोरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरातील एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे आठ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीमुळे परिसरातील रहिवाशी भयभीत झाले असून, परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सावरकरनगरमधील शारदानगर येथे शिल्प बंगला असून, तेथे प्रतीक सुशील चक्रनारायण (वय ३६) कुटुंबीयांसह राहतात. १८ ते २१ जानेवारी या कालावधीत घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. यावेळी चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या मागील किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटे तोडून तिजोरीतील सात लाख ६० हजारांचे दागिने व ५० हजारांची रोकड असा आठ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images