रोटरी क्लबतर्फे 'भाजीपाला महोत्सव' म. टा. प्रतिनिधी, नाशिक कोणत्याही रसायनाचा वापर न करता, पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने शेतात पिकविलेला भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. शेतकरी ते थेट ग्राहक या तत्त्वावर आधारित भाजीपाला महोत्सवातील सेंद्रिय भाज्यांची 'चव' नाशिककरांनी चाखली. रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे सेंद्रिय फळे व भाजीपाला विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला. गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये प्रगतशील शेतकरी संदीप जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात रसायनविरहित भाजीपाला, फळे आणि धान्य विक्रीसाठी ठेवण्यात आले. त्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांनी महोत्सवात खरेदीसाठी गर्दी केली. महोत्सवात सेंद्रिय शेतीच्या आधुनिक तंत्रावर आधारित पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि इगतपुरी येथील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. अतिशय चांगल्या दर्जाचा हा भाजीपाला तसेच धान्य खरेदीसाठी दुपारनंतर ग्राहकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. गायीचे शुद्ध तूप खरेदीलाही ग्राहकांनी पसंती दिली. सिन्नरचे अनिल शिंदे, बोरगावचे सोमनाथ दळवी, चांदवडचे संदीप जाधव या प्रगतशील शेतकऱ्यांनी महोत्सवात स्टॉल लावले. महोत्सवाचे संयोजन रोटरी क्लब सदस्य हेमराज राजपूत, गौरी पाठक, मकरंद चिंधडे यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केले. बोरगाव येथील सोमनाथ दळवी यांनी सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची शेती केली असून, तिला या महोत्सवात सर्वाधिक मागणी होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट