म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्मार्ट सिटीतील हरितक्षेत्र विकास योजनेला शेतकऱ्यांनी विरोध केला असला तरी, ही परियोजना होईलच असा विश्वास स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला. स्मार्ट सिटीतील हरितक्षेत्र विकास योजनेला शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला असून, सर्वेक्षण बंद पाडले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आलेले सीताराम कुंटे या प्रस्तावावर ठाम राहिले आहेत. टीपी स्किमचे अहमदाबाद हे यशस्वी मॉडेल असून, ते डोळ्यांसमोर ठेवूनच ही योजना राबविली जात आहे. शेतकरी, जमीनमालकांच्या काही अपेक्षा असतील, तर त्यांच्याशी चर्चा करून सांमजस्याने मार्ग काढता येईल. सुनियोजित शहर साकारायचे असेल, तर कुठेतरी तडजोड करावीच लागेल. शेतकऱ्यांचा नगर परियोजनेला विरोध म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नाही. वाटाघाटीच्या माध्यमातून मार्ग काढता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यात जमीन वाटपात ६०:४०, ५५:४५ या पर्यायांचादेखील विचार होत आहे. राज्यात काही ठिकाणी याप्रमाणे जमीनवाटप झाल्याने कायदेशीर अडचणी निर्माण होणार नसल्याचे कुंटे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा वाढवून यातून तोडगा काढला जाईल असे सांगत, स्मार्ट सिटीच्या या प्रस्तावावर कुंटे ठाम राहिले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात वर्दळ वाढणार असल्याने त्याआधी स्मार्ट रोड होणे गरजेचे आहे. ठेकेदार कंपनीला ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत रोजच्या कामाचा अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरदार सरोवरालाही विरोध धुळे जिल्हाधिकारी असताना सन १९९३ साली सरदार सरोवर प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध होत होता. हा प्रकल्प होईल की नाही असे त्यावेळी वाटले होते. परंतु, समजुतीने आणि चर्चेनंतर आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्या ठिकाणी काम करण्याचा आपणास आणि गमे यांनाही अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कितीही विरोध असला स्मार्ट सिटीअंतर्गत नगर परियोजना होईलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरदार सरोवर प्रकल्पातील स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्याचेही ते म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट