म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार व्हावे व मुलांमार्फत स्वच्छतेचा प्रचार घरोघरी व्हावा यासाठी सर्व महापालिका शिक्षण विभाग सरसावला आहे. शहरातील सर्व खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळांमध्ये 'स्वच्छ हवा व स्वच्छतेचा जागर' हा उपक्रम २८ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. सप्तरंग बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. देशाची पुढची पिढी स्वच्छतेविषयी अधिक जागृत असावी, यासाठी विविध उपक्रमांतून शाळांकडून प्रयत्न करण्यात येतात. 'स्वच्छ हवा व स्वच्छतेचा जागर' या उपक्रमांतर्गत वर्गामध्ये वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ हवा व घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व व कचरा वर्गीकरणाचे फायदे सांगावे, अशी सूचना शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी शाळांना दिल्या आहेत. पर्यावरणपूरक स्वच्छतेचे तीन संदेश विद्यार्थ्यांना सांगत त्याची जाणीव करून द्यायची आहे. 'आम्ही झाडाचा पालापाचोळा व कचरा जाळत नाही. कचरा जाळल्यास रुपये पाच हजार दंड होतो, हे आम्हाला माहित आहे', 'आम्ही कचऱ्याचे वर्गीकरण करतो', 'आम्ही कचरा घटागाडीतच टाकतो रस्त्यावर नाही', असे तीन संदेश शाळेतील विद्यार्थ्यांनी कोऱ्या कागदावर कलात्मकरित्या लिहून त्यावर पालकांची स्वाक्षरी घेऊन शाळेतील वर्ग शिक्षकांकडे जमा करायचे आहे. त्यानुसार, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी संदेश लिहून त्यावर पालकांची स्वाक्षरी तपासणी करुन वर्ग शिक्षकांनी त्याची नोंद घ्यावी व सर्वोत्कृष्ट कलात्मक पद्धतीने संदेश लिहून आणलेला संदेश मुख्याध्यापकांकडे जमा करणे गरजेचे आहे. शाळेतील मुख्याध्यापकांसोबत एक फोटो काढून त्याचा अहवाल मनपा शिक्षण विभाग कार्यालयात जमा करायचा आहे. या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या वार्षिक गुण पत्रकात अ, ब, क, ड यानुसार श्रेणीत गुणदान करायचे आहे. स्वच्छ हवा व स्वच्छतेचा जागर हा उपक्रम शाळेमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट