महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही; पुनद पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेली ५१ कोटी रुपये खर्चाची पिण्याच्या पाण्याची पुनद योजना कोणत्याही परिस्थिती पूर्णत्वास नेण्यात येईल. राज्य व केंद्र सरकारने गत साडेचार वर्षांत आणलेल्या सर्वच योजना पूर्णत्त्वास नेल्या आहेत. यामुळे पुनद पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येईल, अशी ग्वाही राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सटाणा येथील पाठक मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. बागलाण तालुक्यासह सटाणा शहरातील पुनद पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, डॉ. शेषराव पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, रमेश देवरे, साहेबराव सोनवणे, डॉ. प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बागलाणमधील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा जाहीर सभेतूनच संगणकावरील कळ दाबून डिजिटल पद्धतीपे करण्यात आला. चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाठविले आहे. आपल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागाच्या विकासासाठी कोरा चेक दिला आहे. आपण ज्या काही योजना देणार त्यासाठी कितीही निधी लागेल तरी देण्याचा शब्द आपणास त्यांनी दिला आहे. बागलाण मधील तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे स्पष्ट करीत नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी मागणी केलेल्या देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकासाठी येत्या ७ दिवसात मंजुरी देण्यात येईल अशी घोषणा यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले, बागलाण मधील शेतीसिंचनाचे पाचही प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित होते. सदर प्रकल्पांसाठी आपण पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे. काहींचे भूमिपूजनही झाले आहे. आगामी काळात अप्पर पुनद प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली आहे. सुळे डाव्या कालव्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला आहे. पाइपलाइन देखील मंजूर केली असल्याची घोषणा त्यांनी केली. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शहरातील विविध विकासकामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रणगाड्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. कांद्याविषयी बोला हो... केंद्रींय संरक्षण राज्यमंत्री डॅ. सुभाष भामरे यांच्या भाषणावेळी किकवारी येथील कांदा उत्पादक शेतकरी दिलीप तुळशीराम काकुळते यांनी कांद्याविषयी बोला हो, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे सभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काकुळते हे सभास्थानी अंगावर पेट्रोल टाकून आले असल्याने पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. मनसेचे आंदोलन शेतमालाला हमी द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, आदी मागण्यांसाठी बागलाण तालुका मनसेच्या वतीने मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल यांचा ताफा सटाणा शहराकडे येत असताना कंधाणे फाट्यावर मनसेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, सटाणा शहर प्रमुख पंकज सोनवणे, मनसे पदाधिकारी मंगेश भामरे, विश्वास खैरनार, दादा इंगळे, ललीत नंदाळे, मनोज सोनवणे, दादू बैताडे, दिनेश जाधव, अरूण पवार यांनी निर्देशने केली. बुलेटस् कांदाप्रश्न, पुनद विरोधामुळे प्रवेशद्वारावर कसून तपासणी मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करूनच प्रवेश पाणी बाटली, खिशातील चैनीच्या बाबींना देखील मज्जाव प्रमुख अतिथी व मान्यवर कक्षांत अन्यांना प्रवेश निषेध
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट